शुक्रवार, २४ जुलै, २०२०

रेड लाईट डायरीज - भवताल


एका आर्टिकलमध्ये वाचण्यात आलेलं की मुलं किती छान संस्कारी पद्धतीने वागत आहेत, घरातल्या सर्व व्यक्तींची त्यांना चिंता आहे वगैरे. वाचून अनेकांनी मुलांचं कौतुक केलेलं, काहींनी पालकांचेही अभिनंदन केलेलं. भवतालच्या वातावरणाचा आणि पालकांच्या वर्तनाचा प्रभाव मुलांवर पडतो. लहान मुलं खूप अनुकरणशील असतात. यावरून मला ताहिरा आठवली. तिची चिमुरडी पोर आयेशा आठवली. ताहिरा धंदा करायची. कामाठीपुऱ्यातल्या तेराव्या लेनमध्ये यमुनाबाईच्या कुंटणखान्यात तीन बाय सहाच्या फळकुटात राहायची. 2007 ची घटना असेल. यमुनाचा कुंटणखाना दुसऱ्या मजल्यावर होता. तळमजल्यावर अरुण परदेशीचा दारू धंदा चाले. दिलीप पांडे नावाच्या इसमाची ती इमारत होती. त्यानं सुनील मथाईला ती किरायाने दिलेली. मथाईने तिथे धंदा उघडलेला. विकास मिश्रा याने तिथे युपीमधून मुली आणलेल्या. ( हा विकास मिश्रा पुणे पोलिसांनी 2012 मध्ये गजाआड केला, पुढे जामीनवर सुटल्यानंतर त्यानं नागपूरचं गंगाजमुना गाठलं) मथाईच्या अख्ख्या इमारतीची पूर्ण कळा गेलेली होती. संपूर्ण इमारतीत जवळपास चारशे बायकापोरी होत्या. सगळ्या युपीबिहारच्या. यांच्यातलीच एक होती ताहिरा. 1992 मध्ये ताहिराला बाईपणाचे भोग कळले. देहातली एक भेग काळजाच्या चिरफळ्या कशा उडवते ते तिने अनुभवलेलं.

सोमवार, ६ जुलै, २०२०

लॉकडाऊन स्टोरीज - रामपुकार पंडीतची अनसुनी पुकार


हा फोटो एका अत्यंत असहाय हतबल बापाचा आहे...
'शोले'मध्ये एक सीन आहे ज्यात कोवळ्या अहमदला (सचिन) गब्बरने हालहाल करून ठार मारून त्याचं प्रेत घोडयावर लादून रामगढला पाठवून दिलेलं असतं. अहमदचं कलेवर पाहून गाव थिजून जातं. संतापाची लाट येते आणि सर्वांचा राग जय वीरूवर उफाळून येतो. ठाकूर बलदेवसिंग मध्ये पडतो तरी गावकरी ऐकत नाहीत. ते म्हणतात की आम्ही इतकं दुःख सहन करू शकत नाही, या दुःखाचं कारण असणाऱ्या जय वीरूला गब्बरच्या हवाली केलंच पाहिजे. इतका वेळ आपल्या मुलाच्या मृतदेहावरून हात फिरवणारा म्हातारा रहीमचाचा कळवळून उठतो आणि दुःखाचा आवेग आवरत म्हणतो, "जानते हो दुनिया का सबसे बडा दुख क्या होता है ?"

रविवार, ५ जुलै, २०२०

बेंजामिन मोलॉईस - गीत विद्रोहाचे


मार्टिन ल्युथर किंग यांचं “ए रायट इज ए लँग्वेज ऑफ अनहर्ड !”(ज्यांचं ऐकून घेतलं जात नाही अशांची भाषा म्हणजे दंगे !) हे वक्तव्य प्रसिद्ध आहे. या वक्तव्याच्या संदर्भाशिवाय हा लेख अधुरा राहील. सद्यकाळात अमेरिकेस दंगलींच्या खाईत लोटणाऱ्या घटनेची पार्श्वभूमी आजच्या लेखास समांतर आहे. बनावट चलनाविषयीची एक तक्रार मिनिआपोलिसच्या पोलिसांकडे आली होती. यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनी कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांची गाडी रोखली. पोलिसांनी त्यांना कारपासून दूर जाण्यास सांगितलं. त्याचा त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांना हथकड्या ठोकण्यात आल्या. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक श्वेतवर्णीय पोलीस जमिनीवर पडून असलेल्या फ्लॉईड यांच्या गळ्यावर तब्बल नऊ मिनिटे गुडघा दाबून बसल्याचं दिसतं. "प्लीज, मला श्वास घेता येत नाहीये," "माझा जीव घेऊ नका," अशी विनवणी फ्लॉईड करतात. रस्त्यावरच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला. जगाला मानवाधिकाराचे डोस पाजणारं अमेरिकेन नेतृत्व स्वतःचे हात किती डागाळलेले आहेत यावर कधी भाष्य करत नाही. वंशवाद आणि वर्णभेद आजही तिथे मोठ्या प्रमाणत आढळतो. कृष्णवर्णीयांनी अमेरिका सोडून जावं असं जाहीररित्या सांगणारे उजव्या विचारांचे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून तर वर्णभेदास अधिक धार चढली आहे. त्यामुळे साहजिकच श्वेतवर्णीय उन्मत्तांना बळ प्राप्त झालंय. आपल्याला असुरक्षित समाजणाऱ्या कृष्णवर्णियांना अधिकच भीती वाटू लागलीय. काही दशकापूर्वी जगात सर्वाधिक वर्णभेद दक्षिण आफ्रिकेत केला जायचा, विशेष म्हणजे तो तिथे गुन्हा नव्हता. त्याच आफ्रिकेत एका कवीने त्या राजवटीचे बुरूज ढासळवणार्यात कविता रचल्या आणि जगापुढे नवा इतिहास मांडला गेला. त्या कवीचे नाव होते बेंजामिन मोलॉईस.

करोनाबाधेतील एक दुजे के लिये...

curtis and betty tarpley
कर्टीस आणि बेट्टी टारप्ले  

अमेरिकेत कोरोनाने प्रचंड हाहाकार माजवलेला असल्याच्या बातम्या आपण सर्वचजण पाहतो आहोत. संपूर्ण अमेरिका या विषाणूच्या साथीने स्तब्ध झालीय. त्याची एक गहिरी दास्तान या इस्पितळात लिहिली गेलीय. त्याची ही अद्भुत चैतन्यमय हकिकत. १८ जून २०२० ची ही घटना आहे. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतामधील फोर्टवर्थ भागातलं टॆक्सास हेल्थ हॅरिस मेथॉडिस्ट इस्पितळ. पहाटेपासूनच कर्टीस टारप्ले यांचा श्वास मंदावत चालला होता. त्यांची पल्स हरवत होती. डोळे अर्धमिटले झाले होते. गात्रे शिथिल होत होती. ओठ थरथरत होते, त्यांना काही तरी सांगायचं होतं. त्यांच्या सेवेत असलेल्या परिचारिका ब्लेक थ्रोन यांनी ते ओळखलं होतं. कर्टीससोबत त्यांची गाढ दोस्ती जी झाली होती.

फिर तेरी कहानी याद आई ...

fir teri kahani yaad ayee


तो एक प्रतिभाशाली कर्तृत्ववान विवाहित पुरुष, एका बेसावध क्षणी एका कमालीच्या देखण्या अप्सरेचं त्याच्यावर मन जडतं. तो तिला टाळू पाहतो पण तिच्यापासून दूर जाऊ शकत नाही आणि तिला जवळही करू शकत नाही. त्याचा संसार उध्वस्त व्हायची वेळ येते. त्याची पत्नी उन्मळून जाते, त्यांचं आयुष्य विस्कटतं. पण तो पत्नीशी सर्व गोष्टी शेअर करतो. ती ही त्याच्यावर विश्वास ठेवते. तुझे मन माझेच असेल, देह कोणाचाही असू शकतो असं त्याला सांगते. मात्र तरीही त्यांच्यात गैरसमज होत जातात. अखेर त्यांचा घटस्फोट होतो. तोवर बराच उशीर झालेला असतो. ती शापित अप्सरा तोवर खचून गेलेली असते. ती अंधाऱ्या विजनवासाच्या एकांती गुहेत जाते. इकडे तो दुसरे लग्न करतो तेही एका मनस्वी समजूतदार स्त्रीशी !

रविवार, २८ जून, २०२०

पोशिंद्याचा धनी...


घरोघरच्या अंगणातली सकाळची कळा अजून पुरती सरली नव्हती तोवरच गुबुगुबूचा आवाज करत नंदीबैलवाला दाखल झाला. भाऊसाहेब गोंडे त्याचं नाव. गल्लीच्या तोंडावरच असणाऱ्या रुख्माआत्याच्या दारापुढं येताच थरथरल्या आवाजात बोलला,
"दुसऱ्याचं घर भरवणाऱ्या बाप्पा तुझं घर उसवू नकोआत्महत्या करू नकोस !"
भाऊसाहेब असं का म्हणतोस रे बाबा म्हणून खोदून खोदून विचारल्यावर तो बोलला की, “गावात शिरताच पोलीस पाटलाचं घर गाठलंआमी आल्याची अन शंभूचा खेळ करणार आसल्याची वर्दी त्यास्नी दिली. नावपत्तानिशाणी लिहून झाल्यावं परवांगी गाव्हली. तिथून पारापाशी येण्याधी पैल्या गल्लीला लक्षिमण रावताचं घर लागतं. तिथं ढोलकी घुमवलीशंभूच्या पायातली घुंगरं थिरकली. वाड्याचं दार कराकरा वाजवत उघडलं आणि आतून बोडख्या कपाळाची सारजाकाकू सूप हातात घेऊन आल्या. त्यास्नी तसं बगुन काळीज करपलं. बाई ईधवा झाली म्हंजीच लई वंगाळ झालं असं न्हवं. पर ज्या हातानं सोनं पिकवलंजगाला घास भरवला त्याच हातानं फास लावून घ्यायचा. घरच्या लक्ष्मीला लंकेची पार्बती करायचं म्हंजे वाईच इस्कोट... बंद्या रुपयागत कुक्कु कपाळाला लावणारी घरची लक्षुमी अशी कपाळावर बुक्का लावून बघितली की पोटात कालिवतं. तिच्या कपाळावरलं काळं ठिक्कर पडलेलं गोंदण बगवत न्हाई. तिच्या हातनं पसाभर जुंधळा सुपातून घ्यायचा म्हंजे झोळीदिकून म्होरं करूशी वाटत न्हाई. सारजाकाकूच्या मोत्याच्या दाण्यांना न्हाई म्हणता आलं नाई. तवा जाऊन रुख्माआत्याच्या दाराम्होरं आल्यावर त्यास्नी भायेर यायच्या आदी आमीच बोल लावलं. आमचं चुकलं का बापू तुमीच काय ते सांगा ! आमी पडलो अनपड अडाणी. .. 
भाऊसाहेबाने माझ्या डोळ्यात पाणी आणलेलं. मी कसला बोलणार ! माझ्यापेक्षा अधिक संवेदनशील तर तोच होता.

शनिवार, ६ जून, २०२०

लॉकडाऊन स्टोरीज – जिंदगी का सफर...

लॉकडाऊनच्या काळातील काहींच्या वेदना इतक्या टोकदार आहेत की कुणाही सुहृदाच्या आतडयाला पीळ पडावा. अशीच एक कहाणी महंगी प्रसाद यांची आहे. आजही लॉकडाउनमुळे देशभरातील मजूर कामगार मिळेल त्या मार्गाने प्रवास करत आपल्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेकजण तर कित्येक वर्षांनी आपल्या घरी जात आहेत. अशाच अभागी लोकापैकी एक होते महंगी प्रसाद ज्यांनी तब्बल तीस वर्षांपूर्वी रागाच्या भरात आपलं घर सोडलं होतं. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यामधील कैथवलिया हे त्यांचं गाव. खेड्यातलं सामान्य जीवन जे देशभरात अनुभवायला येतं तसंच शांत रम्य ग्रामजीवन त्यांच्या गावी देखील होतं. घरातल्या छोट्याशा कुरबुरीवरून नाराज होत त्यांनी गाव सोडलं होतं ते साल होतं 1990चं ! तेंव्हा ते संतापाच्या इतक्या आहारी गेले होते की आपल्या जबाबदार्‍यांचा विसर त्यांना पडला होता, आपण कोणता अनर्थ करत आहोत याचं त्यांना जरादेखील भान नव्हतं. वास्तवात हे भान हरपल्यामुळेच आणि जोडीला विवेक गमावल्यामुळेच त्यांनी आपल्या गावाची वाट कायमची सोडून दिली होती. घर सोडून परागंदा झाले तेंव्हा ते काही पोरजिन्नस होते वा अगदी पंचविशीतले तरुण होते अशातलीही बाब नव्हती. ते खरे तर परिपक्वतेच्या उंबरठ्यावर होते, कारण तेंव्हा त्यांचं वय तब्बल चाळीस वर्षांचं होतं.

रविवार, ३१ मे, २०२०

लॉकडाऊन स्टोरीज – अमरप्रेम ...

'तो' कुलाब्याच्या कॉजवे मार्केटहून यायचा. हॅण्डसम देखणा. अगदी मदनबाण वगैरे म्हणतात तसा अतिशय आकर्षक नसला तरी तरुण पुरुषाच्या अंगी असणाऱ्या खाणाखुणा त्याच्या ठायी होत्या. उंचापुरी भक्कम पिळदार अंगयष्टी. गौर वर्ण, कुरळे केस, उभट चेहरा, काहीशा दाट जाड भुवया आणि त्याखालचे मत्स्याकृती पाणीदार डोळे, विस्तीर्ण कपाळ, त्यावर रेंगाळणारी मस्तीखोर झुल्फं, सरळ नाक, वर आलेले गालाचे चीक मसल्स, उभट निमुळती हनुवटी यामुळे त्याचं इम्प्रेशन मॉडेलिस्टीक असायचं. कुणीही त्याला पाहिलं की किमान काही दिवस तरी त्याला विसरणं शक्य नसे, त्याची वेशभूषा ही अत्यंत आटोपशीर आणि रॉकींग होती. बहुतांश करून फिकट रंगशैलीचा चौकडा शर्ट आणि काळी जीन्स, व्हाईट स्पोर्ट्स शूज असा त्याचा वेष असे. शर्टचं वरचं बटन खुलं असे ज्यातून त्याची भक्कम छाती डोकावत असे.त्याची नजरही कमालीची तीक्ष्ण होती. तो काही एकटक पाहायचा नाही मात्र त्यानं एकदा जरी पाहिलं तरी समोरच्या व्यक्तीला वाटे की तो एकसारखा आपल्याकडेच पाहतो आहे. प्रत्यक्षात त्यानं आपल्याकडे पाहत राहावं असं समोरच्याची अपेक्षा असे. तो कॉजवे मार्केट परिसरात एका मरीन कंपनीत सेल्स एक्झिक्युटीव्ह होता. कमाई खूप काही नव्हती पण जितकी होती त्यात तो खुश होता. एके दिवशी त्याच्या आयुष्यात 'ती' आली.

गुरुवार, २८ मे, २०२०

रेड लाईट डायरीज - लॉकडाऊनच्या वेदना : पुणे ते मेलबर्न



ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे करोना संक्रमणाची जी नवी घटना उजेडात आली आहे त्याचं प्रेरणास्थान दिल्लीत आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. करोना रुग्ण आणि संशयित व्यक्ती यांच्यासाठी सुरु असलेल्या मेलबर्नमधील आलिशान हॉटेल्समधील क्वारंटाईन सेंटर्समध्ये सेक्स रॅकेट चालवले जात होते आणि त्यातून शेकडोंना बाधा झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आपल्याकडे काय घडलं होतं याची माहिती घेतल्यास ही घटना अधिक धक्कादायक वाटेल.

रविवार, १७ मे, २०२०

लॉकडाऊन स्टोरीज - दत्तूमामा

लॉकडाऊनमध्ये कुणाच्या जीवाचे काय हाल होताहेत यावर किती लिहावे तितके कमी पडेल अशी आताची एकंदर स्थिती होतेय. हे वर्तमानच असे आहे की आगामी काळात मागे वळून पाहताना आपली मान शरमेने खाली जावी, भयंकराच्या दारात उभ्या असणाऱ्या अनेक जीवांना आपण अंधाऱ्या खोल दरी लोटून दिलेलं असावं आणि त्यांच्या आर्त किंकाळ्यांनी आपलं काळीज विदीर्ण व्हावं. यातल्याच काही निवडक घटनांना थोडासा मुलामा चढवून इथे पेश करतोय. आजची लॉकडाऊन स्टोरी आहे दत्तूमामा केंजळयांची.

शुक्रवार, ८ मे, २०२०

मुक्या जीवाचं लॉकडाऊन...

गावाकडचं लॉकडाऊन शिथिल होईल तेंव्हा खूप बरं होईल. वस्तीवरल्या गुरांच्या पाळीवर येणारा महादू वावरात यायचा बंद झाल्यापासून गायींनी वैरण खायची सोडून दिलीय आणि म्हशी काही केल्या धार देत नाहीत. मागल्या साली वासरू मेल्यावर चंद्रीच्या पुढ्यात तिचं वासरू पेंढा भरून त्याचं भोत करून ठेवलेलं. धारा काढायची वेळ झाली की पितळी चरवी घेऊन महादू हजर व्हायचा. एकेक करून सगळ्या दुभत्या जीवांच्या कासा हलक्या करायचा. सगळ्यात शेवटी चंद्रीपुढं जायचा. तिच्या जवळ येताच तिच्या पाठीवरून हात फिरवायचा, पेंढा भरून ठेवलेलं तिचं वासरू वस्तीतल्या कोठीतून बाहेर काढायचा, चंद्रीपासून दहाबारा फुटावर उभं करून ठेवायचा. वासराकडं बघताच चंद्रीचं आचळ तटतटून फुगून यायचं. आचळावरच्या लालनिळ्या धमन्यांचं जाळं गच्च दिसायचं, महादूने कासेला हात लावायचा अवकाश की पांढऱ्या शुभ्र धारा चरवीत पडू लागायच्या. चरवी गच्च भरायची. मखमली फेस दाटून यायचा. धारा काढून होताच महादू चंद्रीच्या पाठीवरून मायेने हात फिरवायचा. तिच्या मऊ पन्हाळीला कुरवाळायचा. वशिंडाला अलगद दाबायचा. पोटापाशी मालिश केल्यागत हात फिरवायचा. चंद्री खुश व्हायची. हंबरडा फोडायची. तिच्या डोळ्यात कधी तरी पाझर फुटलेला दिसे मात्र चंद्रीचं दूध आटेपर्यंत महादूच्या डोळ्याचं पाणीही आटलं नव्हतं. तिचं दूध काढून झालं की त्याच्या डोळयाच्या कडा पाणावलेल्या असत. खरं तर त्याला वाटायचं की आपण चंद्रीला फसवतोय, तिच्या मेलेल्या वासराला दाखवून आपण तिचं दूध काढून घेतॊय. पण चंद्रीचं दूध आटण्यासाठी तिची कास कोरडी होणं गरजेचं होतं हे त्यालाही ठाऊक होतंच !

रविवार, ३ मे, २०२०

लॉकडाऊनच्या काळातली ‘ती’ची देखभाल ...

जिला रक्ताच्या नात्यांनी झिडकारलेलं असतं, समजाने धुत्कारलेलं असतं, शासनदरबारी जिची कोणती किंमत नसते, जिचं अस्तित्वच मुळात कलंकीत ठरवलं गेलेलं असतं अशी ती म्हणजे वेश्या होय. लॉकडाऊनच्या या कठीण काळात तिचं कसं होणार या विषयीची पहिला आवाज मी 27 मार्च रोजी उठवला होता. त्यास प्रतिसाद देत विविध दिग्गजांनी मदतीचे आश्वासन दिले होते. काहींनी तर मलाच पैसे पाठवले होते, जे मी त्यांना तत्काळ परत केलेले. राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या कार्यालयातूनही याची दखल घेतली गेली. तसेच समाजकल्याण खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीनेही मदतीचे आश्वासन मिळालं. खेरीज कालच सुप्रिया सुळे यांच्या वतीनेही विचारणा झाली. दरम्यानच्या काळात विविध ठिकाणी एनजीओजच्या वतीने मदतीचा ओघ सुरू झाला होता.

मनाचे लॉकडाऊन...


कोरोना व्हायरसच्या जगभरातील थैमानाला आता दोन महिने पुरे झालेत. सर्वत्र हाहाकार उडालेला आहे आणि जो तो दिग्मूढ होऊन गेलेला आहे. यावर भाष्य करणारी एक कविता युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर केली गेलीय. किंबहुना तिथल्या बहुतांश देशातील प्रमुख वर्तमानपत्रात देखील तिची दखल घेतली गेलीय. ब्रिटीश राजकवी सायमन आर्मिटेज यांनी ही कविता लिहिली आहे. कवितेचे शीर्षक आहे 'लॉकडाऊन' ! ही कविता लोकांना भावण्याचं एक प्रमुख कारण आर्मिटेज यांच्या शब्दरचनेत आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की या तर माझ्याच भावना आहेत. अगदी सहज सोप्या शब्दात प्रवाही चित्रमय लेखन शैलीत आर्मिटेज यांनी लॉकडाऊनच्या वेदनांना तरल स्वरूपात मांडलंय. बारकाईने वाचलं तर ही कविता एक पोट्रेट आहे, ज्यात एका मनाची तगमग आहे जे कित्येक दिवसापासून अज्ञाताच्या अंधारकोठडीत कैद आहे. देहाचंच नव्हे तर मनाचंही लॉकडाऊन झाल्यावर मनाला असंख्य इंगळ्या डसतात आणि त्यातून प्रसवणाऱ्या वेदना केवळ स्मृतीविलाप करणाऱ्या न उरता अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या ठरतात. आर्मिटेजनी कवितेत वापरलेल्या रूपकांचा पसारा इतका अफाट आहे की त्यांच्या अर्थाचा पट नभातून विस्तीर्ण व्हावा. महाकवी कालिदासाच्या मेघदूतपासून ते प्लेगबाधित ईयमच्या विजयापर्यंत अनेक बिंदू कवितेत लखलखत राहतात. त्यातून सुरु होतो स्वत्वाचा शोध जो वाचकास अंतर्मुख करून जातो.

रविवार, १२ एप्रिल, २०२०

कोरोना व्हाया ‘अल कॉलरा’..

सोबतचे चित्र - 1562 मधलं पीटर ब्रुगेल यांचं 'ट्रायंफ ऑफ डेथ'.
कोरोना व्हाया ‘अल कॉलरा’..
लेखक, कवी हे खऱ्या अर्थाने संवेदनशील असले तर ते कालानुगतिक सुखदुःखांच्या झुल्यावर शब्दांची मैफल सजवत जातात त्यावर कधी अश्रू झोका घेतात तर कधी हसू ! निर्मिकाचं कामच मुळात असं असतं. स्वमग्नतेच्या कोषात दंग होऊन निर्मिलेलं साहित्य तात्कालिक यश मिळवू शकतं मात्र काळाच्या कसोटीवर लिहिलेलं साहित्य दीर्घकालीन ठसा उमटवतं. भवतालच्या विश्वाचा आपल्याला जसा उमगेल तसा धांडोळा घेणं हे सच्च्या साहित्यिकाचं लक्षण मानलं जातं. त्या त्या कालखंडात येऊन गेलेल्या साथी, रोग, नैसर्गिक आपत्ती, मानवी चुकांमुळे घडलेल्या घटना, युद्धे, गृहकलह, मानवी वर्तनातील विरोधाभास आणि मानव विरुद्ध इतर चराचर अशा अनेक बाबींचं प्रतिबिंब खऱ्या साहित्यात जोरकसपणे उमटतं. जगभरातील प्रतिभावंतांनी आपापल्या परीने ते शब्दबद्ध केलंय.

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

कोरोनाचे संक्रमण - इतिहासाचं अनोखं स्मरण !


सोबतचा फोटो चार एप्रिलला युरोपमधील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे छायाचित्र म्हणजे मानवी इतिहासाला निसर्गाने दिलेली चपराक आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. हे दृश्य ग्रीसमधलं आहे. यात दिसणारा पेरिक्लेसचा पुतळा अथेन्समधला आहे. पेरिक्लेसचा काळ अडीच हजार वर्षापूर्वीचा असला तरी आताच्या कोरोना व्हायरस आऊटब्रेकशी त्याचा एका अर्थाने संबंध आहे. आजघडीला कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर युरोप हादरून गेलंय, त्यात ग्रीस देखील सामील आहे. कोरोनाचा संसर्ग सर्वव्यापी झाल्यावर अथेन्समधल्या सर्व प्रमुख इमारती, गर्दीचे चौक, रस्ते धुण्यास सुरुवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून पेरिक्लेसचा पुतळा सॅनिटाइझ केला गेला. नेमक्या त्याच क्षणी हा फोटो क्लिक केला गेला आणि अख्ख्या युरोपमध्ये तो व्हायरल झाला ! असं काय होतं या फोटोत ? हे जाणून घेण्यासाठी इतिहासात बरंच मागे जावं लागेल.

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

लॉकडाऊनवरच्या विजयाची गाथा...

लॉकडाऊनवरच्या विजयाची गाथा...  
    
चीनमधल्या लॉकडाऊन  स्टोरीज आता एकेक करून समोर येताहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या चीनी दैनिकात एक कथा प्रसिद्ध झालीय. आशियाई देशात ती खूप व्हायरल झाली. पुढे जाऊन जागतिक आरोग्य संघटनेने देखील त्या व्यक्तीची मुलाखत प्रसिद्ध करायचं ठरवलं जेणेकरून लोकांच्या मनातली भीती कमी व्हावी आणि करोनाविरुद्धच्या लढ्याला जिंकण्याची जिद्द निर्माण व्हावी. ही दास्तान आहे फेंग ली या तरुणाची. सहा महिन्यापासून आपल्या आईवडिलांना भेटायला जायचं त्याच्या मनात घाटत होतं. कामाचा ताण काही केल्या कमी होत नव्हता. वुहानला जायची सवड काही केल्या मिळत नव्हती. अखेर योग जुळून आला. डिसेंबरच्या मध्यास त्यानं वुहानला आपल्या आईवडिलांकडे यायचं नियोजन पक्कं केलं. तो घरी येताच त्याच्या मातापित्यांना प्रचंड आनंद झाला. दरम्यान शहरात एकेक करून करोना व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू होण्यास सुरुवात झाली होती. लीच्या घरीही याची दहशत जाणवत होती. मात्र पुढे जाऊन इतकं कठोर लॉकडाऊन होईल आणि आपलं आयुष्य त्यात गोठून जाईल याची त्याच्या कुटुंबातील कुणीच कल्पना केली नव्हती. जानेवारीत वुहानच्या सगळ्या सीमा सील करण्यात आल्या. लॉकडाऊन फारतर दोनेक आठवडे चालेल असा त्यांचा कयास होता. पण तसं झालं नाही. काळ जसजसा पुढं जात होता तसतसं लॉकडाऊनचा फास घट्ट आवळत होता. कसलीही दयामाया नव्हती की कुणाला त्यात सूट सवलतही नव्हती. पहिल्या दोन आठवड्यात भाजीपाला आणि जरुरी अन्नधान्य आणण्यासाठी घराबाहेर पडण्यास अनुमती होती. सुपरमार्केटस त्यासाठी खुले ठेवण्यात आले होते. पुढे जाऊन घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. सर्वांच्या घराच्या दरवाजांवर सील लावण्यात आलं.

सोमवार, ३० मार्च, २०२०

गोष्ट एका डॉक्टरांच्या फोटोची...



सोबतच्या छायाचित्राला एक गौरवशाली इतिहास आहे. नॅशनल जिओग्राफिकने 1987 चे सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून याची निवड केली होती. कारण या छायाचित्रामागची पार्श्वभूमी होतीच तशी. छायाचित्राच्या केंद्रस्थानी एक डॉक्टर दिसतात, त्यांची भावमुद्रा गंभीर आहे. रुग्णाच्या पॅरामीटर्सवर त्यांची नजर खिळलेली आहे. तसबिरीच्या मधोमध एका स्ट्रेचरवर निद्रिस्त अवस्थेतील वयस्कर रुग्ण दिसतो. सर्व बाबी निरखून पाहिल्या तर लक्षात येतं की हे छायाचित्र एका ऑपरेशन थियेटरमधलं आहे. ऑपरेशन झालेला रुग्ण कदाचित अजूनही शुद्धीवर आलेला नसावा आणि त्याच्या बाजूस बसलेले डॉक्टर त्याच्या वैद्यकीय मानकांवर कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत. स्ट्रेचर भवती केबल्सचं जाळं आहे. विविध वैद्यकीय सामग्री नजरेस पडते. छायाचित्राच्या उजव्या कोपऱ्यात एक सर्जन बसल्या जागीच झोपी गेलेले दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा खूप काही सांगून जातो. एखादी मोठी जिकिरीची शस्त्रक्रिया पार पाडल्याची लक्षणं या छायाचित्रातून आपल्याशी बोलत राहतात. जगातील बोलक्या छायाचित्रात आजही याची गणना होते...

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

एक आर्त हाक वेश्यांची...



एक आर्त हाक मदतीची...

एफबीवर कमी होतो कारण एका जिव्हाळ्याच्या प्रश्नात गुंतून पडलो होतो.

अर्थातच देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. हा त्यांच्यासाठीचा सार्वधिक भयंकर काळ आहे तेंव्हा त्यांच्यासाठी शक्य ते करणं हे सर्वाधिक प्राधान्यतेचं काम झालं.

सध्या आपण सगळेजण रोज सकाळी बाहेर पडून आवश्यक ती खरेदी करू शकतो आणि वेळेत घरी परत येऊ शकतोय.

मात्र या बायकांकडे ना पैसे ना घर !

करोना व्हायरसची तीव्रता वाढली तसा यांना सर्वात अधिक फटका बसला, फेब्रुवारीएन्ड पासून यांची ओढाताण सुरु झाली आणि आता त्या कंगाल अवस्थेत आहेत.

रोजच्या कमाईवर जगणाऱ्या इतर अनेक घटकांप्रती समाजात सहानुभूती आहे मात्र यांचं असं नाही. बाकीच्या सर्व घटकांना समाजात थोडंफार स्थान आहे, मान आहे, आदर आहे यांच्या वाट्याला मात्र तिरस्कार आणि हेळसांड आहे.

रविवार, २२ मार्च, २०२०

पॅलेस्टाईनची द्रोहफुले - अरेबिक : खालेद अब्दुल्लाह


पॅलेस्टाईनची द्रोहफुले...

ताकद, दहशत आणि राक्षसी आकारमान याच्या जोरावर कुणी अमर आणि सर्वकालिक राहू शकत नाही. त्यास आव्हान देणारे, त्याच्याशी झगडून आपलं छोटंसं का होईना पण स्वतंत्र अस्तित्व दाखवणारे निर्माण होतच राहतात. कितीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली वा कसलीही षडयंत्रे रचली तरीही अशा आव्हानांना नेस्तनाबूत करता येत नाही. मातीतून अंकुर उगवावा इतक्या सहजतेने ही विद्रोही रोपटी तग धरत नसली तरी चिकाटीने दगडमातीचं काळीज भेदून आपल्या परीने ती उगवत राहतात, जमेल तशी वाढत राहतात. अगदी जेत्यांच्या चिरेबंदी गढ्यांच्या परसदारात, अंगणातदेखील ही द्रोहफुले उगवतात. त्यांच्यातल्या प्रत्येकाला तरवारीचं पातं लाभलं नसलं तरी त्यांचा दरवळ अस्मान पेटवण्यास पुरेसा ठरतो. पॅलेस्टिनी कवी खालेद अब्दुल्लाह यांच्या 'सीड्स ईन फ्लाईट' या मूळच्या अरेबिक कवितेचा स्वैर मराठी अनुवाद याला साक्ष आहे. जीवनाच्या रसरशित जाणिवांनी आणि अर्थपूर्ण प्रतिमांनी ही कविता सजलेली आहे. पहिल्या पंक्तीपासून ती मनाचा ताबा घेते. कवितेच्या अखेरीस विद्रोहाचं बीज वाचकांच्या मनात अलगद पेरण्यात कवी यशस्वो होतो. उत्तुंग आशयाने आणि कवीच्या पार्श्वभूमीने ही कविता बोलकी झाली आहे. कवीच्या मातृभूमीची ओढ यात आस्ते कदम तरळत जाते आणि अखेरीस दृढ होत होते.

शनिवार, २१ मार्च, २०२०

करोना व्हायरसवर मात करणारं प्रेम - टफर दॅन द रेस्ट


काल रात्री रशिया टुडे (RT) वाहिनी पाहत असताना करोना व्हायरसच्या जागतिक विध्वंसाच्या बातम्यांची मालिका सुरु होती. मात्र त्यात आपल्याकडील 'टॉप फिफ्टी बातम्या सुपरफास्ट' असा भडक मामला नव्हता. एका बातमीपाशी वृत्तनिवेदिकेने आवंढा गिळल्याचे स्पष्ट जाणवले. बातमी इटलीच्या करोनाबाधितांच्या मृत्यूची होती. ब्रिटिश, स्पॅनिश सरकारांनी देखील इटलीप्रमाणेच मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची त्यांच्या नातलगांशी अखेरची भेट स्काईपद्वारेच करून दिली जावी, त्यांना इस्पितळात येण्यास सक्त मनाई करावी असा नियम जारी केल्याची ती बातमी होती.

शनिवार, ७ मार्च, २०२०

लाहोरच्या हिरा मंडीची समृद्धी


लाहोरच्या हिरा मंडीची समृद्धी...

एकविसाव्या शतकात आपल्या देशभरात मुजरानृत्य क्षेत्रातल्या मुली डान्सबार कल्चरमध्ये गेल्या. डान्सबार बंद झाल्यानंतर त्यांचे शोषणच झाले. मुंबईच्या ग्रांट रोडवरील केनेडी ब्रिजजवळील जुन्या काँग्रेस हाऊसमध्ये अनेकांनी आपला बाजार मांडला. आजघडीला आपल्या देशात फक्त आग्रा शहरातच मुजरा शिकवला जातो. मात्र इस २००० पर्यंत आताच्या बंगालमध्ये बनारसी तवायफ आपलं अस्तित्व टिकवून होत्या. आता चोबीस परगणा, बार्दवान, बांकुरा, वीरभूम या जिल्ह्यात पेरिफेरल भागात काही कोठे अजूनही अस्तित्वात आहेत. इतरत्र सांगायचे झाल्यास बनारसच्या शिवदासपूरमध्ये त्यांचे अस्तित्व आहे. अन्यत्र त्यांची संख्या नगण्य आहे. अलीकडे हिंदी सिनेमातही मुजरानृत्ये घटत चालली आहेत. कदाचित लोकांना त्यात पूर्वीसारखी रुची राहिली नसावी. डिजिटल युगात करमणुकीच्या व्याख्या वेगाने बदलत चालल्याचा हा परिणाम असू शकतो. एका अर्थाने हे बरे आहे कारण यातून स्त्रियांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि शारीरिक शोषणही व्हायचे, तसेच याच्या आहारी गेलेल्या अनेकांचे संसारही उद्धवस्त झाले. ज्या मुजरा नार्तिकांकडे अन्य काही कौशल्य नव्हते त्यांच्यावर मात्र या मरगळीपायी कुऱ्हाड कोसळली. पैकी उपजीविकेचे साधन नसल्याने त्यातल्या अनेकींनी देहविक्रयाचा मार्ग नाईलाजाने निवडला. अलीकडील काळात इंटरनेटसह अन्य अनेक कारणामुळे व मनोरंजनाच्या बदलत्या व्याख्यांमुळे आपल्याकडे तमाशा कलावंतांची जशी उपासमार होऊ लागलीय आणि त्यांच्याकडे छुप्या देहविक्रयाच्या वासनेने पाहिले जाऊ लागलेय तसेच काहीसे मुजरा कलावंतांच्या अखेरीस घडले होते.

सोमवार, २ मार्च, २०२०

मुजरानर्तिका ते तवायफ...



लखनौ आणि बनारस ही मुजरा कलावंतांची दोन प्रमुख केंद्रे होती. पैकी बनारसमधल्या अदाकारा गंगेकाठची एकेक नगरे पार करत कोलकत्यात जाऊन वसल्या. या बायकांकडे जाणं म्हणजे खूप मोठं लांच्छन समजले जाई. त्यामुळे मोठमोठे आमीरजादे इच्छा असूनही त्यांच्या दारी जात नसत पण छुप्या पद्धतीने त्यांच्या मैफली आपल्या इलाख्यात भरवत, त्याचा आनंद घेत. बऱ्याचदा एखाद्या धनिकास पसंत पडलेल्या कोठेवालीस तो अंगवस्त्र समजून ठेवून घेई, तिची उमर ढळेपर्यंत तिची देखभाल करे. पण सर्वच ठिकाणी असे होत नसे, अनेकदा त्यांना वापरून टाकून दिले जाई. मात्र गायकीवर, नृत्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या स्त्रीसौंदर्याच्या रसिकांनी यांना भरभरून प्रेम दिले. अनेक दशके हीच परिस्थिती होती. लखनौच्या नवाबपदी आलेल्या शुजाउद्दौलाने हे चित्र पालटले. हा शुजाउद्दौला मराठ्यांच्या इतिहासातही आढळतो. अहमदशहा अब्दालीच्या खांद्याला खांदा लावून त्याने पानिपतमध्ये मराठ्यांचा दुर्दैवी पराभव केला होता. याच शुजाचा इंग्रजांनी बक्सरच्या लढाईत १७६४ मध्ये दारूण पराभव केला होता. या लढाईने इंग्रजांचा पाया बळकट झाला होता. हा शुजाउद्दौला एका वेगळ्या कारणाने लखनवी इतिहासात प्रसिद्ध झाला, तो इतिहास म्हणजे त्याचा बायकांचा शौक ! हा माणूस कमालीचा शौकीन होता, त्याचा हा शौक कित्येकदा पिसाटासारखा असे. हा पहिला नवाब होता ज्याने महालात मजा घेण्याऐवजी कोठेवाल्या बायकांच्या कोठ्यावर जाऊन बसून मैफली लुटल्या आणि शीलही लुटले, पण बदल्यात अफाट दौलतजादा केली !

मणिकर्णिकेच्या घाटावरच्या स्मृती...


गंगेच्या काठी असलेल्या मणिकर्णिकेच्या घाटावरती मृतदेहांवर अंतिम संस्कार करताना त्यांच्या कपाळावर आणि डोक्याच्या मागील बाजूस मानेवर ठोकतात. याच्या मागचं कारण असं सांगितलं जातं की मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मस्तिष्कात कोणत्याही आठवणी राहू नयेत. त्याचे माइंड ब्लॅन्क राहिलं की त्याचा अंतिम प्रवास कमी यातनादायी होईल असं त्यांना सुचवायचं असतं. तर काहींना भीती वाटते की मृत्यूपश्चात त्या व्यक्तीचा आत्मा भटकू नये, त्याचा आपल्याला त्रास होऊ नये याकरिता त्याच्या स्मृती पुसलेल्या बऱ्या ! खरं तर देह अचेतन झाला की सगळं संपून जातं.

रविवार, १ मार्च, २०२०

कवितेचे मर्म - शमसूर रहमान : बांगलादेश, उर्दू कविता


कवितेचे मर्म  - शमसूर रहमान : बांगलादेश, उर्दू कविता - poecy पोएसी 

एके दिवशी मी वृक्षाकडे गेलो आणि त्याला विचारलं,
“प्रिय वृक्षराज, तुम्ही मला कविता करून द्याल का ?”
वृक्ष उत्तरला,
“जर तू चिरफाळ्या उडवल्यास माझ्या सालीच्या
अन् खोडाशी एकरूप होऊन गेलास,
तर तुला नक्की कविता गवसेल. !”
ढासळण्याच्या बेतात आलेल्या भिंतीच्या कानी पुटपुटलो
"मला कविता देशील का ?"
घोगऱ्या स्वरात जुनाट भिंत वदली,
"माझ्या विटांत, आजोऱ्यात कविता दिसेल तुला !"
मग एका थकलेल्या वृद्धापाशी जाऊन गुडघ्यावर बसून तोच प्रश्न विचारला.
नि:शब्दतेची सतार वाजवत तो उत्तरला,
माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तुझ्या वदनी कोरून घे
मग पाहा, तुला कविता गवसेलच !....

फक्त कवितेच्या काही पंक्तींसाठी या
झाडापाशी, भिंतीपाशी आणि वृद्धापाशी बसून राहावं ?
आणखी किती काळ मी गुडघे दुमडून घ्यावेत ?
-------------------------

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

रेड लाईट डायरीज - तस्नीम आणि चुकलेल्या वाटा

#लोकमत #दुनियादारी #डान्सबार #चुकलेल्या वाटा

एक दशक होतं जेंव्हा डान्स बारमुळे अख्ख्या महाराष्ट्राची तरुण पिढी भयंकराच्या वाटेवर उभी होती. प्रारंभीच्या काळात हे खूळ फक्त महानगरात होतं, त्या नंतर मोठया शहरात ते फ़ैलावलं. यातून मिळणारा अमाप पैसा अनेकांना खुणावू लागला आणि राज्यातील जवळपास सर्व मुख्य शहरात याने पाय रोवले. पाहता पाहता तालुक्यांची ठिकाणे देखील व्यापली गेली आणि शहरांच्या बाहेर असणारे हमरस्ते डान्सबारसाठी कुख्यात झाले. 
#लोकमत #दुनियादारी #डान्सबार #चुकलेल्या वाटा
खेड्यापाड्यातली तरुण मुले देखील याच्या नादी लागली. पुणे मुंबई सारख्या अक्राळ विक्राळ शहरातील काही गटांचे उत्पन्न ही तसे अफाट तगडे होते की ज्यांना कितीही दौलतजादा केली तरी फरक पडत नव्हता.

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

सदीचे गुलाब - मार्सेलिनी डेसबोर्डेस : फ्रेंच कविता

सदीचे गुलाब.
आज तुझ्यासाठी मला गुलाब आणायचे होते.
खरं तर त्यांनी माझी पोतडी इतकी ठासून भरली होती की,
तिच्या गाठी आवळून बांधाव्या लागल्या होत्या.

गाठी सुटल्या, गुलाब वाऱ्यावर उधळले गेले.
बेभान झालेल्या वाऱ्याने त्यांना समुद्राकडं उडवलं.
पाण्याने त्यांना पुढे नेलं पुन्हा कधी न परतण्यासाठी.
लाटांना लालिमा चढला, जणू दग्ध लाव्हाच !
अजूनही आजच्या रात्रीस माझे कपडे सुगंधित वाटताहेत,
त्या गंधभारीत स्मृतींत जणू श्वासच जारी आहेत !

शनिवार, २५ जानेवारी, २०२०

वासनेच्या काजळडोहात डोकावताना....



रामन राघववर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सनी त्याला त्याच्या कामवासनेविषयी विचारलं तेंव्हा त्याने निर्विकारपणे उत्तर दिलेलं की, "सेक्स हे रेशनसारखं असतं. गाडीला जसं पेट्रोल लागतं तसं परिपक्व शरीराला सेक्स लागतं."
रामनचं त्याच्या आईवर प्रेम नव्हतं, त्यानं सांगितलेलं की आईचंच त्याच्यावर प्रेम नव्हतं.
रामनला त्याचे वडील आवडायचे, वडीलांनी चोऱ्यामाऱ्या शिकवल्या हे उपकारच होय असं त्यांचं म्हणणं.
रामनच्या मात्यापित्यांचा लवकर मृत्यू झाला.

ऋतूचक्र...


आपल्याकडे हेमंत आणि शिशिर या दोन ऋतूमध्ये हिवाळा विभागलाय. गुलाबी थंडीचं हवामान ज्याला म्हटलं जातं तो हेमंत आणि कडाक्याच्या थंडीत जीवसृष्टी गोठून जाते, पानगळीने झाडं मोकळी होऊन जातात तो शिशिर !
इथं काही कवी मंडळी याची गल्लत करताना दिसतात म्हणून हे ज्ञानकण !
विशेष म्हणजे दिवाळसणाच्या आधी असणारा अश्विन मास शरद ऋतूत येतो, शरदाचं चांदणं खुल्या आभाळाखाली अनुभवल्या नंतर हेमंतातील रजईमधलं गुलाबी चांदणं अनुभवावंसं वाटणं ही या ऋतूची खासियत !
शृंगारासाठीच्या सर्वोत्तम रात्रवेळा हेमंत ऋतूत येतात.
आरोग्य, मन आणि शरीर या सगळ्यांची प्रसन्नता हेमंत ऋतूत कमाल असते.

मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

नागरिकत्वाबद्दलची अनास्था...



संसदेत एका महत्वाच्या विधेयकावर चर्चा सुरु आहे. सिटीझनशिप अमेंडमेंट बिल. (CAB)
हे विधेयक म्हणजे दाखवायचे दात आहेत आणि खायचे दात म्हणजे एनआरसी आहे( नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझनशिप - नागरिकत्वाची राष्ट्रीय नोंद)
हे कसे ते पाहुयात -
आपल्या देशाचे नागरीकत्व कुणाला द्यायचे याच्या मसुद्यात सुधारणा करणारं विधेयक असं या CAB बद्दल ढोबळमानाने म्हणता येईल.

देशाचे नागरीकत्व मिळवण्यासाठी काही अटी आहेत जसे की त्या व्यक्तीचा भारतात जन्म झालेला असावा वा त्याच्या जन्मदात्यापैकी एकाचा जन्म भारतात झालेला असावा किंवा ज्याचा सामान्यतः अकरा वर्षांचा रहिवास पूर्ण असावा. या खेरीज फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात विस्थापित झालेल्या लोकांसाठी काही उपकलमे आहेत.
आता या महत्वाच्या विधेयकात दुरुस्ती केली जातेय.
काय आहे ही दुरुस्ती -
या दुरुस्तीनुसार देशात त्या हिंदू, शीख, पारशी, बुद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्मीय लोकांना नागरिकत्व मिळेल जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेले असतील. या खेरीज ११ वर्षे रहिवासाची अट शिथिल करून ६ वर्षे करण्याची शिफारस यात आहे.
आता यात केवळ मुस्लिमांना सरकारने वगळले आहे.

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

बदनाम गल्ल्यांचा 'अक्षर फरिश्ता' - मंटो !



सआदत हसन मंटो यांच्या जीवनावरचा नवाजुद्दिन सिद्दिकी अभिनित 'मंटो' हा चित्रपट २१ सप्टेबर रोजी रिलीज झालाय. नंदिता दास यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. मंटोच्या कथांवर आधारलेले 'काली सलवार', 'मिर्जा- गालिब', 'शिकारी', 'बदनाम', 'अपनीनगरियां' हे सिनेमे येऊन गेलेत. शिवाय पाकिस्तानमध्येच त्यांच्यावर जिओ फिल्म्सने बनवलेला याच नावाचा बायोपिक येऊन गेलाय. या चित्रपटात मंटोच्या काही प्रसिद्ध कथा समोर येतात, कथेतली पात्रे येतात, मंटोच्या आयुष्यातील काही महत्वाच्याघटनांचा पट रंगत असताना या कथातील पात्रे मध्ये येतात त्यामुळे रसभंग होतो. मंटो दाखवायचे म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचा पट उलगडताना त्यांच्या कथांवर भाष्य होणं अनिवार्यच आहे. मात्र चित्रपट संपल्यानंतर मंटो जितके लक्षात राहतात तितक्याच त्यांच्या कथाही लक्षात राहतात. मात्र एकूण परिणाम साधण्यात चित्रपट कमी पडतो. असं का होतं ? हा या चित्रपटाच्या रसग्रहणाचा भाग होऊ शकतो. इस्मत चुगताई कोण होत्या, मंटोच्या जीवनात वेश्यांचं काय स्थान होतं आणि मुख्य म्हणजे मंटोनी तत्कालीन साहित्याच्या तथाकथित मापदंडांना सुरुंग लावत कोणतं साहित्य लिहिलं होतं हे विस्ताराने समोर न आल्याने ज्यांना या विषयी काहीच माहिती नाही वा अल्पशी माहिती आहे त्यांच्या पदरी फारसं काही पडत नाही. मंटो समजून घेण्याआधी त्यांचं साहित्य समजून घ्यायला हवं मग ते पानागणिक उलगडत जातात !

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

रेड लाईट डायरीज - नाळेचं कर्ज ...



सोबतचा जिन्याचा फोटो श्रेया कालराने काढला आहे. फोटोबद्दल जाणून घेण्याआधी हे वाचलं तर संदर्भ लागतील..
श्रेया फोटोस्टोरीमेकर आहे. भारतीच्या केसमुळे तिची माहिती मिळालेली.
तामिळनाडूमधल्या ईरोडे या शहरातील गांधीनगर या स्लममधील भारतीने स्वेच्छेने वेश्याव्यवसाय स्वीकारत मुंबई गाठली होती त्याला दशकं उलटून गेलीत. कामाठीपुऱ्याची एक खासियत आहे, इथे भाषेगणिक वर्गीकरण असलेल्या इमारती आहेत. कानडी, तेलुगू, उडिया, आसामी, मल्याळी, मराठी, हिंदी अशा बहुतेक सर्व भाषेच्या कन्या इथं राहतात. एके रात्री ईरोडेमधून मुंबईत आलेल्या एका व्यक्तीने भारतीला ओळखलं. खातरजमा करून तिची माहिती तिच्या घरी कळवली. काही दिवसात तिला घेऊन जाण्यासाठी तिच्या घरची मंडळी कामाठीपुऱ्यात आली. ती ऐकत नाही हे लक्षात येताच त्यांनी तिला झोडपायला सुरुवात केली. तिला मारहाण होऊ लागल्यावर बाकीच्या बायका मध्ये पडल्या आणि त्यांनी तिच्या नातलगांना पिटाळून लावलं.

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

आत्महत्त्या केलेल्या आईच्या शोधात...



आईच्या आयुष्यात डोकावता येतं का ?
आई हयात नसताना तिच्याजागी स्वतःला ठेवून तिचं दुःख आणि तिच्या इच्छा आकांक्षांचा चुराडा मांडता येईल का ? आईने भोगलेली दुःखे तिला सहन करावा लागलेला दुस्वास, तिची आयुष्यभराची परवड काटेकोर तशीच लिहिता येईल का ? आईच्या इच्छा वासना ; तिच्या भावनांची गळचेपी, न गवसलेलं इप्सित हे सगळं मांडता येईल का ?

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

सौंदर्यवती दुर्गांची कर्तृत्ववान गाथा...


आजचा रंग हिरवा... 
ही पोस्ट वाचण्याआधी तुमच्याकडून एक प्रॉमिस हवंय, द्याल का प्रॉमिस ? 
खूप काही मागत नाही मी. फक्त तुमची छोटीशी साथ हवीय, मला खात्री आहे पोस्टच्या अखेरीस तुम्ही होकार द्याल. ताजमहाल पाहायला जाल तेंव्हा माझी पोस्ट विसरू नका एव्हढी विनंती लक्षात असू द्यात. 
फोटोत दिसणाऱ्या तरुणीचं नाव आहे शबनम, तिच्यावर ऍसिड हल्ला झाला होता. 

शबनमवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला वाटलं होतं की 
एका प्रसन्न क्षणी शबनम 
इतक्या भयानक ऍसिड हल्ल्यानंतर शबनम मरून जाईल किंवा विद्रुपतेच्या भीतीने घरात बसून राहील, तिच्या आयुष्याची पुरती धूळधाण होईल याची त्याला खात्री होती. हल्ला झाल्याला आता काही वर्षे उलटून गेलीत पण त्या दिवसानंतर शबनमच्या आयुष्यात काहीच भयप्रद वा दुःखद घडलेलं नाही.

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

तुमच्यात मी दुर्गेला पाहतो... - 'रेड लाईट डायरीज'मधल्या दुर्गा...



धवल भगवा ... २९-३०/०९/२०१९
सोशल मीडियाच्या आभासी जगातल्या नटलेल्या, सजलेल्या आणि कथित तृप्तीच्या रंगात न्हालेल्या स्त्रियांचे नवरात्रीच्या नवरंगातले फोटो दिसून येतात. या फोटोत आणि या स्त्रियांत खऱ्या भारताचे प्रतिबिंब दिसते का ? या प्रश्नावर माझे उत्तर नाही असे आहे. असो...
नवरात्रीच्या कथित रंगशृंखलेत आजचा रंग केशरी आहे आणि उद्याचा रंग शुभ्रधवल आहे,
हे दोन्ही रंग या एकाच फोटोत आहेत.
फोटोतल्या सगळ्याच जणी देवदासी आहेत...
परंपरा, प्रथा हे आपले दाखवायचे दात आहेत, खरे दात तर मनमुराद शोषणाचे आहेत.

टिप - माझे मत अनेकांना अमान्य असू शकते, त्यात वावगं काही नाही. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ! .. असो .. मुळात नवरात्रीच्या नऊ रंगाच्या साड्यांची कल्पना हीच बाजारू दृष्टीकोनातून माथी मारली गेलीय परंतु त्या फोल कल्पनेने आता रूढीचे स्थान मिळवले आहे ही बाब भूषणावह खचितच नाही...

________________________________________




सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

गडकोटांच्या संवर्धनासाठी लक्षावधींचं आर्थिक नियोजन करणारे शिवराय...


ब्लॉगपोस्ट नीट वाचल्याशिवाय कमेंट करू नयेत.

किल्ल्यांनो, गडकोटांनो तुम्ही तेंव्हाच बेचिराख व्हायला हवं होतं कारण ... कारण... तुमचा पोशिंदा आता हयात नाहीये..     
त्यांचे पोशिंदे असलेले शिवबाराजे आपल्या किल्ल्यांची किंमत जाणून होते. किल्ल्यांवर त्यांनी जीवापाड प्रेम केले होते. .
शिवराय म्हणजे गडकोट, स्वराज्य म्हणजे गडकोट आणि गडकोट म्हणजे रयत !
हे समीकरण इतिहासाने आपल्या सर्वांच्या मस्तकात असं भिनवलंय की गडकोट हा शब्द उच्चारताच शिवराय आठवतात, झुंजार रणमर्द मावळे आठवतात ! लढाऊ मराठ्यांचा तेजस्वी इतिहास डोळ्यासमोर येतो.

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

रेड लाईट डायरीज - लता, नट्टीबाई, गुरुदत्त आणि प्यासा ...


सोबतच्या फोटोत दिसणारी लता आहे. सात महिन्याची गर्भवती आहे, तरीही बाजारात उभी आहे. या अवस्थेत असताना तिच्याकडे येणार्‍या गिऱ्हाईकात सगळे आंबटशौकीन भरलेले असत. गर्भवती बाईसोबतची 'मजा' कशी असते याचा अधाशी हव्यास असणारे लोक तिच्याकडे येत. पन्नास ते पंधरा असा त्यांच्या वयाचा लंबक होता. असो..     
लताच्या फोटोचा आणि गुरुदत्तच्या 'प्यासा'चा घनिष्ट संबंध आहे. लताला पाहिल्याबरोबर गुरुदत्तचा 'प्यासा'मधला तो सीन आठवला होता कारण लता सात महिन्याची गरोदर असूनही चमडीबाजारमध्ये रात्रीच्या अंधारास आपल्या उरावर घेण्यासाठी नटून थटून तयार व्हायची. शक्य झालं असतं तर अंधारानेही तिच्याशी समागम केला असता का असा प्रश्न पडावा अशी स्थिती.

दुपारची जेवणं झाली की या बायका आपली दमलेली शरीरं घेऊन आपआपल्या पिंजऱ्यात झोपी जातात, अस्ताला जाणारा सूर्य यांच्यापर्यंत पोहोचत नाही पण तो अस्त पावल्याची खूण म्हणून अंधार तिथं येतो, पाठीवरचं कुबड सांभाळत पाय खुरडत खुरडत यावं तसा हा अंधार येतो. जिला जास्त गरज असते ती आपल्या देहाचं गाठोडं ढिलं करते आणि आरशापुढे बसते, लेप चढवत राहते. आरसा छद्मीपणे हसत राहतो, रात्रभर कपडे चढत राहतात उतरत राहतात. तयार होण्याआधी चरबटलेल्या केसांवर वेटोळं घालून बसलेला अधाशी मोगरा मध्यरात्री उलटून गेल्यावर पुरता चोळामोळा झालेला.

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

दुर्गापूजा आणि वेश्या - एक अनोखा संबंध ..

आतल्या खोलीचा मुख्य भाग ज्यात दुर्गा प्रतिष्ठापना केली गेली होती..

दुर्गापूजेचा वेश्यावस्तीशी संबंध आहे हे आपल्याला  ठाऊक नसते ! हे लिहिण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. तुम्ही म्हणाल गणेशोत्सवाचा याच्याशी काय संबंध ?
आहे, संबंध आहे. खास करून पुण्या, मुंबईतील गणेशोत्सवाचा तर नक्कीच आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ज्या परिसरात आहे तिथून वेश्यावस्ती असलेली बुधवार पेठ खूप जवळ आहे ! केवळ एव्हढ्या एका गोष्टीसाठी मी सुतावरून स्वर्ग गाठत नाहीये.....

गुरुवार, २५ जुलै, २०१९

जगणं ...

तुझ्या शहरात आता पाखरांचा किलबिलाट तर होतच नाही
खूपच नीरस संध्याकाळ असेल ना !
घराकडे निघालेली माणसं आणि तुडूंब भरलेले रस्ते असंच काहीतरी..
'ती डोळे मिटून म्हटली जाणारी रामरक्षा आता कानी पडत नाही'
अंगणातल्या तुझ्या तुळशी वृंदावनाने कालच निरोप धाडलाय !
घरात आता माणसं कमी असतात, ऐसपैस खोलीत भिंतींशी बोलतात म्हणे.
एकाच डायनिंग टेबलवरती तुम्ही भिन्न वेळांना जेवता
बिछान्यात शेजारीच झोपूनही एकमेकांना अनभिज्ञ असता...

बरं ते जाऊ दे.
मला एक सांग, शेवटची मिठी कधी मारलीस तू बाबांना
आईच्या मखमली गालांचा मुका कधी घेतला, आठवत नसेल नाही का ?
तुझ्या गार्डन एरियातलं हिरमुसलेलं झाड सांगत होतं,
"आता उरलोय मी सेल्फीपुरतं !"

अरे तू मैदानात खेळायचास ना ?
तळ्यातल्या पाण्यात पाय सोडून बसताना दंग होऊन जायचास
सोनेरी स्वप्नांच्या रुपेरी कथा सांगायचास
कुणी चिडवलं तरी खळखळून हसायचास
तेंव्हा तुझे मोत्यासारखे दात आकर्षित करायचे
आता यंत्रवत आखीव रेखीव वागत असतोस.

वाचनखुणा म्हणून पानं दुमडून ठेवून कैक पुस्तके तू एकाच वेळी वाचायचास,
आता पुस्तकांवरची धूळही तुझ्या नजरेस पडत नाही, खरंय का हे ?
मित्रा तू वाचणं विसरलेला नाहीस,
तू तर जगणंच विसरलास !

- समीर गायकवाड

मंगळवार, २५ जून, २०१९

झोएशा इराणी ते केतकी चितळे : ट्रोलच्या बळी


काळ मोठा महान असतो तो सर्वांना पुरून उरतो. तो कोणाला कसा सामोरा येईल हे कुणी सांगू शकत नाही. आपल्या कर्मानुरूप त्याचं प्रत्यंतर येत राहतं. आपण जे पेरतो तेच उगवत जातं हे सूत्र सर्वंकष लागू पडतं आणि ते ही सर्व बाबतीत ! अगदी सोशल मीडियावरच्या ट्रोलराक्षसाच्या बाबतीतही ! मुद्दा ट्रोलचा आहे म्हटल्यावर कालपरवा घडलेली एक महत्वाची घटना चक्षुसमोर येणं साहजिक आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी इन्स्टाग्रामवर टाकत असलेल्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांना भाजपच्या रणरागिणी असंही म्हटलं जातं. विरोधी पक्षाचा हल्ला आक्रमकपणे परतावून लावण्यात त्यांचं विशेष कसब आहे. सोशल मीडियावर त्या बऱ्यापैकी सक्रीय असतात. अनेक नेत्यांसोबत झडलेली ट्विटरवॉर्स विशेष स्मरणीय आहेत. फाडून काढणे किंवा धूळ चाटायला लावणे यासाठी त्यांची खासियत आहे. त्यांनी केलेल्या पोस्टच्या वा प्रत्युत्तराच्या समर्थनार्थ आयटी सेलची भली मोठी फौज काम करत असते. आयटीसेलचे नेटकरी म्हटले की त्यात ट्रोल आलेच. ट्रोल म्हटलं की जे जे वाईट आणि अश्लाघ्य आहे ते ते सर्व आलेच. पण 'छु' म्हणून दुसऱ्याच्या अंगावर सोडलेलं श्वान कधी कधी आपल्याही अंगावर येऊ शकतं. याचं प्रत्यंतर बऱ्याच जणांना येऊ लागलंय, राहिलेल्या उत्साही आणि उतलेल्या नेटकऱ्यांनाही येईलच. कारण ती निसर्ग नियमानुसारची बात आहे.

सोमवार, १७ जून, २०१९

दहावी निकाल : ‘सर्वाना शिक्षणा’चे अपयश



या आठवड्यातील एक महत्वाची घटना म्हणजे दहावीचे निकाल होय. आपल्या कालविसंगत शिक्षण आणि परीक्षा पद्धतीत दहावी व बारावी इयत्तांच्या परीक्षांचे अवाजवी स्तोम माजवले गेलेय, त्यांची मांडणी व मुल्यांकन दोन्हीही गचाळ पद्धतीने होतेय. दहावीच्या परीक्षेत साठोत्तर काळात फर्स्ट क्लास मिळाला तरी विद्यार्थी हुशार समजला जायचा. ऐंशीच्या दशकानंतर या गृहितकावर बोळा फिरवत मुलांची टक्केवारी ऐंशी ते नव्वदच्या घरात पोहोचली तेंव्हा मुलं हुशार म्हणून ओळखली जाऊ लागली. यावर कडी करत २००८ मध्ये तत्कालीन राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने एक आमुलाग्र बदल घडवत नवं धोरण आणलं. त्याची फलश्रुती त्याच वर्षी समोर आली.

रविवार, १६ जून, २०१९

मोळीवाला - एक आठवण वडीलांची...



'फादर्स डे'निमित्त सकाळी सोशल मीडियावर माझ्या वडीलांचा फोटो पोस्ट करताना विख्यात शायर, कवी निदा फाजली यांच्या 'मैं तुम्हारे कब्र पर फातेहा पढने नही आता' या कवितेचा अनुवाद दिला होता. त्या पोस्टवर व्यक्त होण्याऐवजी इनबॉक्समध्ये येऊन एका ज्येष्ठ स्नेहींनी वडीलांची विचारपूस केली, त्यांची माहिती ऐकून ते चकित झाले. त्या अनुषंगाने पोस्टमध्ये आणखी थोडं तरी वडीलांबद्दल लिहायला हवं होतं असं मत त्यांनी नोंदवलं. आईबद्दल आपण नेहमीच भरभरून बोलतो, वडीलांबद्दल लिहिताना, बोलताना आपण नेहमीच हात आखडता घेतो हे सत्य स्वीकारत वडीलांची एक आठवण इथे लिहावीशी वाटतेय.

गुरुवार, १३ जून, २०१९

रेड लाईट डायरीज - दाखले


धगधगत्या दुपारच्या असह्य उकाडयातच,

मी तान्हुल्याच्या वाटयाला येते.

कवटाळताच उराशी गच्च त्याला,

रंडक्या भिंतींतले आभाळ गदगदून येते.

 

कुणास ठाऊक, मातृवत्सल स्तनातील,

दुध किती त्याच्या ओठांत झिरपते!

चिल्बटलेल्या बिछान्यावर उन्मळून पडताच,

माझ्यातली माय अश्रू छातीतून ढाळते.

सोमवार, १० जून, २०१९

विद्रोही परखड लेखनाचे दीपस्तंभ - गिरीश कार्नाड


आपल्या जन्मदात्या वडीलांच्या वंशातून न जन्मलेल्या पण आपल्या जन्माआधीपासूनच आपल्या मायपित्यासोबत राहणाऱ्या आपल्या सावत्र भावास आपल्याच वडीलांचं नाव लावता यावं म्हणून कुठल्या धाकट्या भावानं संघर्ष केल्याचं तुमच्या पाहण्यात आहे का ?
नाही ना ?
पण एक माणूस होता असा.
त्याची ही दास्तान.
गिरीश कार्नाड  त्याचं नाव.

गुरुवार, ६ जून, २०१९

ग्रामीण मतदाराचा बदलता कौल -



सतराव्या लोकसभा निवडणूकांचे निकाल लागून आता दहाएक दिवस झालेत. निकालातले औत्सुक्य संपलेय. अनेक राजकीय अभ्यासकांद्वारे, विचारवंतांद्वारे आपआपल्या परीने या निकालाचे अन्वयार्थ लावून झालेत. काही ठिकाणी ही प्रक्रिया अजूनही सुरु आहे. विविध राजकीय पक्षांनी आपल्या विजयाचे, पराभवाचे विश्लेषण करण्यास सुरुवात केलीय, विजेत्यांनी विजयोत्सव साजरे करण्यास सुरुवात केलीय तर पराभूतांनी जमेल तितकं आणि झेपेल तितकं आत्मचिंतन सुरु केलंय. विविध माध्यमं आपआपल्या कुवतीनुसार या निकालांचे मतितार्थ शोधत आहेत, आपले अंदाज चुकुनही आपणच किती नेमकं भाष्य केलंय हे सांगण्याची अहमहमिका सुरु झालीय. तसं पाहता अगदी मोजक्या लोकांचे अंदाज बरोबर आलेत, अन्य सर्वांचे अंदाज चुकलेतच. अंदाज चुकण्यास अनेक घटक कारणीभूत होते. सरकारबद्दलचा कथित असंतोष, कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या लोकांची संख्या, विविध धोरणात झालेली फसगत आणि त्यातून झालेली जनतेची फरफट, जातीय धार्मिक ध्रुवीकरणावरची नाराजी, शेतकरी वर्गाबद्दलची अनास्था, वर्तमानाचे काटे मागे फिरवून देशाला मध्ययुगाकडे नेण्यासाठी सुरु असलेली सनातनी कसरत आणि कट्टरतावाद्यांचा वाढता प्रभाव इत्यादी घटक आणि त्याविषयी सोशल मीडियात सुरु असलेली चर्चा यामुळे अनेकांचे अंदाज चुकण्यास मदतच झाली. विशेष बाब म्हणजे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येण्याआधीपासूनच्या काळात सोशल मीडियावर पूर्णतः काँग्रेसविरोधी वातावरण होते पण मागच्या तीन वर्षात मोदीविरोधी लेखनास सोशल मीडियात बऱ्यापैकी धार चढली होती. विशेषतः मागच्या वर्षात याचं प्रमाण जाणवण्याइतकं होतं. याचा प्रभाव अंदाज वर्तवण्यात झालेल्या चुकात दिसून येतो. पण ढोबळ मानाने हे सर्व घटक शहरी, निमशहरी, नागर भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील कक्षेशी निगडीत होते, ग्रामीण भागाचं प्रतिबिंब यात नव्हतं, किंबहुना ग्रामीण जीवनाचा या घडामोडीशी फारसा संबंध नव्हता. उलट गावजीवनाशी संलग्न असलेल्या प्रश्नांवर अनेकांची नाराजी स्पष्ट दिसत होती तरीदेखील ग्रामीण भागातही निवडणुक निकालांचे तेच चित्र दिसले जे शहरी भागातल्या मतदानातून समोर आले होते. असं का घडलं असावं याची अनेक कारणे असतील. देशभरातील विविध राज्यात याची कारणे थोडीफार वेगळी असतील, पण त्यांचा पिंड एकच असणार. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास निवडणुकीआधी दोन महिनाभरच्या काळात राज्याच्या विविध ग्रामीण भागात फिरता आलं,लोकांशी मनमोकळं बोलता आलं, त्यांच्या मनात डोकावता आलं त्यातून काही गोष्टी जाणवल्या त्या काँग्रेसला उभारी घेण्यास अडवून गेल्या हे नक्की. त्याचा हा गोषवारा.

शनिवार, १ जून, २०१९

महात्मा गांधींनी हिटलरला लिहिलेलं पत्र..

जितिश कल्लाट या भारतीय कलाकाराने निर्मिलेले बापूंनी हिटलरला पाठवलेल्या पत्राचे डिजिटल कव्हरींग लेटर 

सोशल मीडियावरती अनेक लोक गरळ ओकत असतात. अश्लील, अर्वाच्च शिवीगाळ करत असतात. राजकीय पोस्टवर याचा सुकाळ असतो. विशेषतः असे लोक ज्यांचे समर्थन करत असतात त्यांचे नेतेही अशीच भाषा वापरत असतात, एनकेन मार्गाने हनन सुरु असते ज्याच्या पातळीस आता कुठलाही स्तर उरलेला नाही.
आपण म्हणतो, जाऊ द्या ! कशाला शहाणपण शिकवायचे ? घाणीत दगड टाकला की काही शिंतोडे आपल्याच अंगावर उडतील !
ही माणसं बदलणार नाहीत तेंव्हा आपली डोकेफोड का करावी या विचाराने आपण मुकाट बसून राहतो.
आपल्या डोळ्यादेखत सभ्यतेचं वस्त्रहरण सुरु असते आणि आपण आपल्याशी घेणंदेणं नाही या वृत्तीने मूक राहतो.

तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे ?
असाच प्रश्न गांधीजींना पडला होता.

शुक्रवार, ३१ मे, २०१९

शुगर अँड ब्राऊनीज - दारिया कोमानेस्क्यू (रोमानिया)


जेंव्हा कधी 'टिकटॉक' ओपन केलेलं तेंव्हा तेंव्हा हे गाणं कानावर आलेलं. आपली जिज्ञासा मूलतःच चौकस असल्यानं सवयीनं या गाण्याचा पिच्छा पुरवला.
मग हाती लागली एक सुंदर प्रेम कविता आणि एक संवेदनशील प्रतिभाशाली तरुण गायिका, कवयित्री.
दारिया कोमानेस्क्यू तिचं नाव. धारिया हे तिचं निकनेम.

शनिवार, २५ मे, २०१९

हुस्न, इश्क और बदन : गुजरी हुई जन्नत...

नवाबाच्या दरबारातलं पण आम आदमीसाठी खुलं असलेलं गाणं बजावणं 
मागे काही दिवसापूर्वी मुजरेवाल्या तवायफांवर एक लेख लिहिला होता. त्यातला एक संदर्भ लागतच नव्हता. लखनौमधील एक मित्र योगेश प्रवीण यांनी तो संदर्भ मिळवून दिला. एका जमान्यात बनारस हे तवायफ स्त्रियांचं मुख्य शहर होतं. सुरुवातीच्या काळात लोक त्यांच्याकडे लपून छपून जायचे. बाकी अमीरजादे या गल्ल्यात पाय ठेवत नसत कारण कैकांनी आपल्या बगानवाडीत अशा खंडीभर बायका ठेवलेल्या असत. या बायकांकडे जायचं म्हणजे पुरुषांना खूप कमीपणा वाटायचा. शिवाय लोकलज्जेचा मुद्दाही होता. पण हे चित्र एका माणसामुळे बदलले. त्याचं नाव होतं सिराज उद्दौला. आपल्याला सिराज उद्दौला म्हटलं की फक्त प्लासीची लढाई आठवते. मात्र या खेरीजही या माणसाचं एक सप्तरंगी चरित्र होतं.

शनिवार, ११ मे, २०१९

गुलकी बन्नो आणि जग्गी ...


विख्यात हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती यांच्या अनेक रचना लोकप्रिय आहेत. त्यांची 'गुलकी बन्नो' नावाची एक कथा आहे. गुलकी नामक एका कुबड्या मध्यमवयीन स्त्रीचं भावविश्व त्यात रेखाटलं आहे. घेघाबुवाच्या ओसरीवर बसून भाजीपाला विकून गुलकी आपला चरितार्थ चालवायची. आपल्या पित्याच्या मृत्यूच्या पश्चात ती पूर्णतः एकाकी झालेली. तिचा नवरा मनसेधू यानं दुसरं लग्न केलेलं. खरं तर गुलकीला कुबड येण्यास मनसेधूचं वागणंच अधिक कारणीभूत असतं. गुलकी अल्पवयीन असतानाच मनसेधूसोबत तिचा विवाह झालेला असतो. खुशालचेंडू मनसेधूच्या संसाराचं ओझं उचलताना गुलकी दबून जाते. अतिकष्ट आणि शरीराची झिज यामुळे तिच्या पाठीवर कुबड येतं. वयाच्या पंचविशीत तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळं पसरतं. ती कंबरेत वाकते. देहाने आणि मनाने खचून जाते. घेघाबुवाच्या कट्ट्यावरल्या तिच्या भाजीपाल्याच्या दुकानाभवती गल्लीतली सगळी पोरंठोरं दंगामस्ती करत असतात. त्यांच्या खेळण्याचा तो ठिय्या असतो. ही पोरं तिथं खेळतही असतात आणि जोडीनंच गुलकीची यथेच्छ टिंगलही करत असतात. त्यांच्या दृष्टीने ती टवाळीचा विषय असते. या मुलांत जानकी उस्तादाची मिरवा आणि मटकी ही बहिण भावंडं सामील असतात. जानकी उस्ताद अज्ञात रोगानं मरण पावल्यानंतर ही भावंडं रस्त्यावर आलेली, त्यांना कुणी वाली नव्हता पण त्यांचं अल्लड बालपण अजून पुरतं सरलेलं नसल्यानं परिस्थितीच्या झळा त्यांना बसल्या नव्हत्या. ही भावंडंही रोगग्रस्त आणि अपंग होती. गोड गळ्याच्या बोबड्या मिरवाला गायला खूप आवडायचं. गुलकीच्या दुकानाजवळ बसून तो गायचा. गल्लीतल्या पोरांना रागे न भरणाऱ्या गुलकीचा मिरवा आणि मटकीवर विशेष जीव होता. मिरवा गाऊ लागला की त्याच्यासाठी ती मटकीपाशी खाण्याची जिन्नस देई. मिरवा आणि मटकीच्या कंपूत झबरी नावाची कुत्रीही सामील होती.

रविवार, २१ एप्रिल, २०१९

न्यायाच्या प्रतिक्षेतला इतिहास...



दक्षिणपूर्व इंग्लंडमधील केंट येथील एका पबमध्ये एके दिवशी लेखक किम वॅग्नर यांना शोकेसमध्ये ठेवलेली एक कवटी दिसली. कुतुहलापोटी त्यांनी ती उचलून घेतली. कवटीच्या आतल्या बाजूस एक हस्तलिखित चिठ्ठी होती. चकित झालेल्या वॅग्नरनी ती चिठ्ठी वाचली. त्यावरील मजकुरानुसार ती कवटी ब्रिटीश सैन्यात सेवेस असलेल्या आलम बेग या भारतीय जवानाची होती. ४६ व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीचा तो शिपाई होता. १८५७च्या बंडानंतर झालेल्या कारवाईत त्याला ठार मारण्यात आलं होतं. भारतात वास्तव्यास असलेल्या काही ब्रिटीश नागरिकांची हत्या केल्याचा आरोप ठेवून त्याला तोफेच्या तोंडी देऊन मारण्यात आलेलं. त्यावेळी तिथं तैनात असलेल्या आयरिश सैन्य अधिकाऱ्यानं त्याचं शीर इंग्लंडला आणलं. जणू काही ट्रॉफीच आणली असा अविर्भाव त्यामागे होता ! ती कवटी पाहून अस्वस्थ झालेल्या वॅग्नरनी यावर संशोधन करायचे ठरवलं आणि त्यातून जे समोर आलं ते थक्क करणारं होतं. त्यांनी त्यावर झपाटल्यागत काम केलं, त्यातून एक शोधकादंबरी प्रसवली.