'गवाक्ष'-ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
'गवाक्ष'-ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

आयुष्याची लढाई!

जगण्याची लढाई आयुष्य कामगार श्रमिक


संध्याकाळी बागेजवळ एका टोपल्यामध्ये खापराच्या मटक्यात कोळशाचे निखारे ठेवून गरम शेंगा विकणाऱ्या माणसाच्या सर्वच शेंगा विकल्या गेल्या तरी त्यातून त्याला किती रुपये मिळत असतील या प्रश्नाने नेहमीच पिच्छा केलाय!याच्या जोडीने आणखी नोंदी मागोमाग येतात.
गर्दीच्या ठिकाणी दिवसभर फिरस्ती करुन खेळणी विकणाऱ्याचं पोर घरी खेळणीसाठी रडत असतं,
बांधकाम मजूरास पत्र्याच्या वा तत्सम घरात राहावं लागतं,
लोकांची घरे रंगवणाऱ्या रंगाऱ्याच्या घराचे पोपडे उडालेले असतात,
हमाली करणाऱ्याचं ओझं कुणीच उचलत नसतं,
जगाच्या चपला शिवून देणाऱ्याच्या पायतल्या वाहणा झिजलेल्या असतात,
कापडाच्या दुकानात कामास असलेला कामगार कॉलरजवळ विरलेले शर्ट नि कंबरेत अल्टर केलेली विजार वापरतो,
मिठाईच्या दुकानातल्या सप्लायवाल्याच्या घरी वर्षाला देखील नीट गोडधोड होत नसतं,
हॉटेलमधल्या वेटरचा आपलं कुटुंब घेऊन हॉटेलात जेवायला जाण्याचा बेत कधीच तडीस जात नाही,
दिवसभर बाजारात उभं राहून गजरे विकणाऱ्या फुलवाल्याची बायको मोगऱ्याविनाच असते,
वखारीत काम करणाऱ्याच्या घरी सैपाकासाठी इंधन नसतं,
आडत बाजारात शेकडो पोती धान्य वाहून नेणाऱ्याच्या घरी धान्याची भांडी भरलेली नसतात,
चार घरची कामे करणाऱ्या मोलकरणीला आपल्या घरची धुणीभांडी करताना लाख आवंढे गुमान गिळावे लागतात...
या नोंदी काही केल्या संपत नाहीत.

कष्टाच्या अंगमेहनतीच्या कामासाठी जी माणसं राबत असतात त्यातील तळाच्या माणसाचे हात रितेच असतात आणि त्याचं घरही उतरतीला लागलेलं असतं. 
श्रमणाऱ्या हातांचे बक्कळ कमावते असण्याचे एखाद दुसरे अपवाद असू शकतील मात्र अपवाद म्हणजेच सकल सत्य नसतं.

सद्यकाळात कष्टकऱ्यांना, 
अंगमेहनत करणाऱ्याना समाजात कसलेही मानाचे स्थान नाही आणि दिवसेंदिवस श्रमाच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित होत असतानाही जे लोक नाईलाजाने स्वतःला जुंपून घेतात त्यांच्या श्रमास मूल्य नाही!
किती क्लेशदायी विरोधाभास आहे हा!

या माणसांचीही काही स्वप्ने असतील का आणि त्या स्वप्नांचे पुढे जाऊन काय होत असेल?

वास्तवात ही माणसं आपली रोजमर्राची जंग दिवसाढवळ्या हरत असतात तरीही आयुष्याच्या लढाईला ते रोज उठून कशाच्या आधारे सामोरे जात असतील हा प्रश्न नेहमी अस्वस्थ करत आलाय आणि प्रेरणाही देत आलाय!

आयुष्याच्या लढाईच्या न सुटणाऱ्या गुंत्यातल्या नोंदी..

- समीर गायकवाड

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

हे विधात्या इतके तर तू करू शकतोस!



दोनेक वर्षांपूर्वीच्या कडक उन्हाळ्यातली गोष्ट. बरड रानातल्या बांधालगत असणाऱ्या भल्याथोरल्या उंच पिंपळावर वरच्या बाजूला धनेश (हॉर्नबिल) पक्षाने घरटे केले होते. जाडजूड फांदीच्या ढोलीत खचका पाहून घरटं बांधलेलं. एरव्ही भयंकर एकजीव असणारी नर मादीची जोडी घरटं बांधताना नर खाली साठलेले चिखल मातीचे गोळे वर घेऊन जायचा. झाडाच्या बुंध्यापाशी जुनी डोबी होती, त्यातलं पाणी झिरपून तिथं ओल तयार झाली होती. त्याच चिखलाचे गोळे नराने वर नेलेले. मादीने बहुतके तीन अंडी घातली होती, ती आतच बसून होती. अंडी उबवून पिले जन्माला यायच्या काळात घरट्याचे तोंड जवळपास पूर्णतः बंद झालेलं. फक्त मादीची चोच बाहेर राहील इतकीच सांद त्याने ठेवली होती. पिले जन्मली. मादी पिलांसोबत आत घरट्यात आणि नर सकाळ संध्याकाळ घरट्यापाशी! दिवसातून दोनतीन वेळा तरी तो त्यांचं खाद्य घेऊन तिथं यायचा. मादीच्या तोंडात घास घालायचा, ती आपल्या चोचीतून पिलांच्या चोचीत घालायची. पिले दोन तीन आठवड्याची झाली असतील. एव्हाना मे महिन्याचे कडक उन्हाचे तडाखे बसू लागले होते. एके दिवशी हवेतला उष्मा अतिशय टोकाला पोहोचला. वाऱ्याचे नामोनिशाण नव्हते. जीवाची नुसती काहिली होत होती. रणरणत्या उन्हात सारं चराचर म्लान होऊन निपचित पडलं होतं. त्या जीवघेण्या उन्हातही नर बाहेर पडला होता. मात्र त्यादिवशी अघटित घडलं. अवकाळी पाऊस बरसला. विजेच्या कडकडाटासह नि मेघगर्जनेसह पाऊस कोसळत होता. जवळपास तासभर पाऊस पडत होता. दोन तीनदा तरी वीज कोसळल्याचा आवाज आला. काळजात धस्स झालं. संध्याकाळ सरून गेली. गडद रात्र आली. नर परतला नव्हता. पिले व्याकुळ होऊन गेली होती. त्यांचा आवाज कुंठला होता, दोनच दिवसांनी मादीने जीव सोडला. धनेश पक्षाच्या जोडीतला नर मरण पावला तर मादी पिलांसकट जीव सोडते! किती हे प्रेम, किती उत्कट या संवेदना! कुठले विधी न करता नि कुठले प्रस्थ न माजवता हे पक्षी मुक्याने आपली प्रेमकथा निसर्गाच्या पटावर लिहून जातात. ही संवेदनशीलता अफाट आहे.

शुक्रवार, २ जुलै, २०२१

मला दिसलेला श्रीमंत माणूस ...

घराकडे जायच्या रस्त्याला जुना पुणे नाक्याच्या वळणाच्या पुढे काही भणंग भटके नेहमी नजरेस पडतात. गर्दीत त्यांचे अस्तित्व नगण्य असते तरी रोज एकदा तरी त्यांच्याशी दृष्टादृष्ट होतेच. त्यांचा ठिय्याच आहे तो. असो. आजचीच एक घटना आहे.. 

चार वाजण्याआधी घाईने दुपारी घराकडे जाताना समोरून एक टू व्हिलरवाला पोरगा अगदी वेगाने जवळून निघून गेला. रस्ता अगदी मोकळा होता तरीही त्याचं बेदरकार बाईक राइडिंग जाणवलं.

मी माझ्या तंद्रीत पुढे सरकलो. काही क्षणांनी एक क्षीण आवाज जाणवला, फट्ट ! काही तरी फुटलं असावं असं त्यातून जाणवलं.

आरशातून मागे पाहिलं तर बाईकस्वार पुढे निघून गेला होता मात्र रस्त्यावर कुत्री गोळा झाली होती, ती भुंकत नव्हती. एका विशिष्ट स्वरात कुळकुळत होती.

रविवार, ७ एप्रिल, २०१९

झाडांची अज़ान..


गावात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मुस्लिमांचे उंबरठे होते. त्यातला एक उंबरा मकबूल हुसैन यांचा होता. बाकीची घरं त्यांच्या जामातमधली, रिश्तेदारीतली होती. काही दिवसापूर्वी साठीतले मकबूलचाचा गाव सोडून थोरला मुलगा मोहसीनकडे हवापालटासाठी गेले तेंव्हा रणरणत्या उन्हात त्यांना निरोप द्यायला अख्खं गाव सडकेवर लोटलेलं. तेंव्हा ताठ कण्याचा तो डेरेदार पिंपळ माणसांच्या गर्दीने गलबलून गेला. "जिंदगी में हज जा न सका लेकीन विदाई तो उससे भी बेहतरीन मिल गयी, न जाने अब ये मिट्टी नसीब में गंवारा होगी की नही.." असं म्हणत चढलेल्या बसमधून खाली उतरून त्यांनी मातीचं चुंबन घेतलं तेंव्हा आयाबायांनी डोळयाला पदर लावला. वाकताना त्यांच्या पांढूरक्या दाढीला माती चिकटली, ती त्यांनी पुसलीदेखील नाही. तसेच स्तब्ध होऊन उभं राहिले. त्यांच्या भावूक अवस्थेनं गलबलून गेलेल्या गावातल्या जुन्या खोंडांनी मोहसीनला हक्कानं फर्मावलं, "मकबूलकडे लक्ष दे बाबा, त्याला काय पाहिजे काय नको याची वास्तपुस्त कर. तब्येतीकडं ध्यान दे.." मोहसीन मान हलवत होता. इकडे मकबूलचाचांना लोकांच्या नानाविध सूचना सुरु होत्या. काहींनी त्यांना खाण्यापिण्याच्या जिनसा दिल्या, कुणी पायजमा बंडीचं कापड दिलं, तर कुणी पानाची चंची दिली. तेव्हढ्यात मध्येच सवाष्ण बायका पोरी त्यांच्या पायावर डोकी टेकवत होत्या. ते उदार अंतःकरणाने आशीर्वाद देत होते. काही लोक दुआ मागायला आलेले. मकबूलभाई त्यांच्या मस्तकावर हात ठेवून डोळे मिटत आकाशाकडे बघत तीन वेळा 'बिस्मिल्लाह' म्हणून दुआ पुटपुटायचे. यामुळे सडकेवरची गर्दी काही केल्या कमी होईना तसं आत बसलेल्या मोहसीनसह बसमधले बाकीचे प्रवासी वैतागले, कंडक्टरने घंटी वाजवायचा सपाटा लावला. अखेर गावकरी मागे हटले पण मकबूलचाचांचे पाय काही केल्या उचलत नव्हते.

शनिवार, ४ एप्रिल, २०१५

शेवंता.....


शेवंता म्हणजे अजब रसायन होतं. लिंबाच्या बुंध्यागत भरल्या अंगाची ठसठशीत बाई ! गाजरासारखा रंग अन नितळ काया. अंगणात बसली तर केळीच्या खोडासारख्या तिच्या तराट गोर्‍यापान पिंडर्‍याकडे जादू झाल्यागत नजर जायचीच. तटतटलेल्या पायावर रंगीत घुंगरांचे सैलसर चांदीचे पैंजण उगाच चाळा करत रहायचे अन बघणारा गपगार व्हायचा. काजळ घातलेल्या तिच्या पाणीदार मोसुळी डोळ्यात सदोदित एक आवतण असायचं. मोठ्या कपाळावर आडवी रेष अन त्यावर बारीक गोलाकार गंध असायचा. जो तिच्या उभट चेहऱ्याला फारच खुलून दिसायचा. कानातले लंबुळके झुबे सतत डुलत रहायचे. ओठाच्या पाकळ्या उघडल्या की पांढर्‍याशुभ्र मोगर्‍याच्या कळ्यासारख्या दंतपंक्ती बेचैन करत. क्वचित कधी ती मोकळया केसानिशी उभी असली की अजूनच जालीम दिसायची. बहुतकरून सैलसर अंबाडा बांधून त्यावर तिने एखादा गजरा माळलेला असायचा. गळ्यात मोहनमाळ आणि काळ्या मण्यांची सैलसर बारीक सोनेरी तारेतली सर असायची. पाठीवर लाल रेशमी गोंडा असणारी ही काळी सर तिच्या गळ्यावर अशी काही रूळायची की समोरचा सतत तिच्या भरदार छातीकडे चोरून बघायचाच. आवळ पोलके नेसल्यानं गच्च दंडावर करकचून बांधलेल्या काळ्या दोर्‍यातली बारीक काळपट पितळी पेटी अधिकच चेमटलेली वाटायची. तिच्या गुटगुटीत मनगटालाही काही दोरे गुंडाळलेले असायचे. लुसलुशीत पोटाला बांधलेली चांदीची साखळी अन दुहेरी गुंफलेला कटदोरा इतका घट्ट असायचा की कधीकधी तिच्या पोटाच्या कोपऱ्यावर लालसर वळ दिसायचे. तिचं सारं अंगांग गाभूळल्या चिंचेसारखं होतं, बघणार्‍याच्या तोंडालाच लाळ सुटायची.