बुधवार, ३० मार्च, २०१६

फोटोची गोष्ट - तपकीरवाली मावशी .....



काही क्षणच असे असतात की एका झटक्यात काही वर्षे मागे घेऊन जातात, तसाच हा क्षण होता...."विटून गेलेल्या हिरव्या रंगाचे काठापदराचे नऊ वारी लुगडं अन रुपेरी बुट्टीची इरकली खणाची चोळी अशा टिपिकल गावाकडच्या वेशातल्या आजींना पाहून मी एका झटक्यात अनेक वर्षे मागे गेलो. खिळे ठोकलेल्या ढवळपुरी जाड चपला त्यांच्या पायात होत्या. नक्षीचे छर्रे उडालेल्या हिरव्या बांगड्या त्यांच्या दुई हातात भरलेल्या होत्या, माळकरयांचे भूषण असणारी तुळशीची माळ अन एक काळ्या मण्यांची सर गळ्यात होती. कपाळावर बारीक तुळशीचे पान गोंदवलेलं होते....."

सोमवार, २८ मार्च, २०१६

सर्वसामान्याचा अनोखा ताजमहाल !



महाल,राजवाडे,प्रतिके,स्मारके काय राजे लोकांनीच बांधावीत का ? सामान्य माणसाचे प्रेम हे बादशहाच्या प्रेमाइतके उत्तुंग प्रेम नसते का ? साध्या भोळ्या सर्वसामान्य माणसालाही प्रेमाचे प्रतिक निर्माण करावे वाटले तर त्याने काय करावे ? राजा महाराजांनी आपल्या प्रेमाच्या खातीर उंचे राजवाडे, महाल उभे केले म्हणून त्यांचे प्रेम श्रेष्ठ अन म्हणूनच इतरांचे प्रेम कदाचित तितके श्रेष्ठ ठरवले जात नाही असे का ? राजा महाराजांकडे तितकी संपत्ती, तितके मनुष्यबळ सहज उपलब्ध होते, सामान्य माणसाचे तसे नसते. पण एखाद्या सर्वसामान्य माणसाला देखील आपल्या प्रेमाचे तसेच उत्तुंग प्रतिक उभारावे वाटले तर त्याकडे जग कुतूहलाने पाहते. आपल्या पत्नीवर असीम प्रेम करणारी काही आगळी वेगळी माणसे अशीच झपाटून जातात अन काही तरी वेगळे करून दाखवतात. ही माणसे इतरांच्या दृष्टीने चर्चेचा विषय बनतात.

गुरुवार, २४ मार्च, २०१६

गोष्टीवेल्हाळाची बाराखडी - साहित्यिक वर्कशॉप !



एखादं गाणं विविध गायकांनी कसं गायलं असतं याचं सादरीकरण आपण अनेकदा ऐकतो, पाहतो. मात्र एक समान रचना विविध लेखकांनी कशी सादर केली असती याची अनुभूती आपल्याला क्वचित लाभते. त्यादृष्टीने हा खटाटोप.
इथे एका वाक्यात एक घटना नमूद केलीय. या एकपंक्तीय घटनेची मांडणी विविध साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेच्या नि कल्पनाविलासाच्या आधारे कशी केली असती याचे हे प्रकटन.
"वडाच्या झाडापाशी बराच वेळ वाट पाहून झाल्यावर सांजेस सुजित नजरेस पडला तेंव्हा कौमुदीस बरे वाटले..." – हे ते वाक्य !

व्यंकटेश माडगूळकर –
ती वैशाखातली रणरणती दुपार होती. गावाबाहेरल्या माळावरच्या जुन्या वडाखाली उभ्या असलेल्या कौमुदीचे चित्त कशातच लागत होते. वारं पिऊन तर्राट झालेलं ते झाड कोष्ट्याच्या माळावरून पालथ्या घागरीसारखं दिसायचे. आजूबाजूला भरड मुरमाची जमीन अन डाव्या अंगाला असणाऱ्या पाझर तलावावरून येणारी गार हवा यामुळे त्या डेरेदार सावलीच्या झाडाखाली कुणीही आलं की त्याला पेंगुळल्यागत व्हायचे. आसपासच्या माळावर गुरं चरायला आणणारे गुराखी दुपारची भाकरी खायला तिथंच यायचे पण आज गावात जत्रा असल्याने कुणी तिथं येणार नाही याची खात्री असल्याने कौमुदी तिथं बिनघोर थांबली होती. दुपारची गरम हवा सरत आली तरी सुजित अजून आला नव्हता त्यामुळे तिला जरा चिंता वाटत होती. दावणीचा दोर ओढून रोजच्या सवयीने तिथं आलेली एक अवचिंदी जाफराबादी म्हैस अन तिच्या मागोमाग शेपूट हलवत आलेले मरतुकडे काळे कुत्रे वगळता भवताली कुणीच नव्हते. मधूनच आभाळात उडणारा भोरडयांचा थवा अन वाऱ्यावर डुलणारी गवताची पाती इतकीच काय ती हालचाल होत होती. दिस जाता जात नव्हता अन डोईवरची उजेडाची उतळी घेऊन सूर्यनारायण मावळतीकडे रवाना झाला. बाभळीच्या बांधावरून दिसणारा काळा ठिपका मोठा होत गेला, तिचं लक्ष तिकडंच होतं. तो सुजितच होता !

मंगळवार, २२ मार्च, २०१६

पाऊलवाट…



पाऊलवाट हे वाटसरूच्या मनावर होणारे एक गारुड असते, वाटसरूनी तयार केलेले ते जादुई रस्ते असतात. कधीतरी कुणीतरी उजाड माळरानातून पायी जाताना या वाटा तयार होतात.कधी भरल्या रानातून तर कधी उंच सखल शिवारातून पायी जाताना या वाटा तयार होतात. आधी गेलेला खाच खळग्यातून, अडथळ्यातून पार गेलेला असतो. त्याच्या पावलाच्या ठसे मागून येणारयाला दिशा दाखवतात. अन अनेक माणसे त्या वाटेने जाऊ लागतात, अन तयार होते पाऊलवाट.वाटेने लागणारे काटे-कुटे जाणारा प्रत्येक माणूस काढून बाजूला टाकून देतो, काटाडयांनी भरलेले वाळके फांद्यांचे तुकडे देखील आधी जाणारे मागून येणारयासाठी बाजूला सरकवत जातात. पाऊलवाटेत अडथळे काहीही असोत ते बाजूला केलेले असतात, एखादी भली मोठी शिळ आडवी आली तर तिला वळसा घालून ही वाट पुढे सरकते. डोंगराच्या अल्याड पल्याड नाचत नाचत जाते,खोल दरीत निसरडी होऊन हळूवार उतरते पण चालणारयाला हाताचा आधार मिळेल याची तजवीज करते. झरे,ओहोळ,ओढे,नाले याना पार करून मागे पुढे जाते. शेताच्या रस्त्याने कधी नागमोडी होते तर कधी सरळसोट असते. पाऊलवाटेवर कधी कुठले दिशादर्शक फलक नसतात, पण आधी जाणारयाने मागच्यासाठी एक विश्वास तयार केलेला असतो त्याच्या आधारावर मागचा त्याच वाटेने पुढे जातो......

बुधवार, १६ मार्च, २०१६

चक्रव्युहातले भुजबळ ….



बालपणीचे हलाखीचे दिवस काढणाऱ्या भुजबळांपासून ते आताच्या अब्जाधीश भुजबळांच्या वाटचालीचा मागोवा घेणारा हा लेख …
छगन चंद्रकांत भुजबळ यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिक जिल्ह्यातला. भुजबळ चार वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील वारले . त्यांच्या आईच्या मावशीने त्यांचा व त्यांच्या भावंडाचा सांभाळ केला. त्यामुळे त्यांचे बालपण हलाखीचे गेले. माझगावला पत्रा चाळीत ते वाढले. पुढे पोटापाण्यासाठी भायखळा भाजी मंडई बाजारात ते भाजीपाला विकू लागले. मात्र, नंतर तेथील जागा, दुकान गावगुंडांनी ताब्यात घेत हडप केले. पुढे काहीतरी करायचे म्हणून स्थानिक नेत्यांच्या मदतीने आपल्या जागेचे दिवसाला दोन रुपये भाडे गोळा करण्याचे काम सुरु केले. २ रुपये घ्यायचे व जमेल तशी भाजी गोळा करून फूटपाथवर विकत बसायचे. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा केला. शिक्षण घेत असताना त्यांनी आपला व्यवसाय बंद केला नव्हता ह्या बाबीचा इथे उल्लेख करावा वाटतो. भाजी मंडई, नातेवाईकांची शेती व या शेतीवर आधारित व्यवसाय भुजबळांनी सुरु केला. पुढे सामाजिक व राजकीय क्षेत्रात रस निर्माण झाला व त्यातूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या दरम्यान त्यांचे डिप्लोमाचे शिक्षण सुरु होते अन तरीही ते सक्रीय शिवसैनिक झाले ! ते सेनेत शाखाप्रमुख झाले. ७० - ८० च्या दशकातला सेनेचा शाखाप्रमुख काय चीज असायची हे वेगळे लिहायचे गरज नाही !

मंगळवार, १५ मार्च, २०१६

भावकवी - भा.रा.तांबे....


कविवर्य भा.रा. तांबे अंथरुणास खिळले होते तेंव्हाच्या काव्यजन्माची एक कथा आहे. आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो असल्याचे त्यांना जाणवत होते. त्या दरम्यानच्या काळातच त्यांचे एक स्नेही जवळ येऊन त्यांच्यापाशी कविता लिहिण्याचे आर्जव करू लागले. तांबेंनी आयुष्याच्या अंतिम वाटेवर काही तरी बोलावे किंवा लिहावे अशी विनवणीही त्यांनी जाता जाता केली. काही दिवसांनी त्या संपादक महोदयांचे कविता पाठविण्यासाठीचे आठवण वजा विनंती करणारे पत्र तांबेंना मिळाले. त्यांच्या त्या विनंतीस उत्तर म्हणून भा.रा. तांबेंनी या प्रसंगावर त्यांना सुचलेली एक कविता पोस्टकार्डावर लिहून त्या संपादक मित्रास पाठवली होती.

तांबेंनी लिहिलेली ती कविता म्हणजे मृत्यूकडे केलेली एक तक्रारवजा कैफियत आहे ! अंथरुणाला खिळलेल्या तांबेंनी आपल्या मित्राची विनंती पुरी करताना आर्त शब्दात स्वतःच्या वेदना भावबद्ध केल्या अन एक अजरामर कविता जन्मास आली ती म्हणजे, 'मधु मागसी आता …"

गुरुवार, १० मार्च, २०१६

मर्मकवी - अशोक नायगावकर !



मोठाल्या मिशांचे नायगावकर आपल्या त्या चिरंतन हास्य मुद्रेत ऐसपैस मांडी घालून बसतात, त्यांच्या उजव्या हातात कवितेचे टिपण वाट बघत असते. मंचावरील निवेदकांनी, संयोजकांनी माईकचा ताबा त्यांच्याकडे दिला की ते थोडे बाह्या सरसावून बसतात आणि मग सुरु होते शब्दांची आतिशबाजी, कोट्यांचे षटकार अन अंगावर न उमटणारे पण मनावर करकचून आसूड ओढणारे शब्दांचे फटके !
एकामागून एक फुलबाज्या उडाव्यात तसे तडतडणारे काव्यात्मक रचना ते लीलया पेश करत जातात. ऐकणाऱ्याच्या कानाखाली जाळ निघावा अशा आशयाच्या कवितांना ते हास्यरसाच्या रुपेरी वर्खात बेमालूमपणे गुंडाळून समोरच्यांना सुपूर्द करतात. मधूनच मिशीवरून हात फिरवत समोरच्या श्रोत्यांकडे मिश्कील नजरेने बघत समोरच्या श्रोत्यांची तल्लीनता किती रंगली आहे याचा अंदाज घेतात. त्यानंतर ते नकळत सभागृह ताब्यात घेतात आणि शब्दांच्या शस्त्राने गुदगुल्या करत करत अंतर्मनावर घावही करून जातात. ते हे कसे आकारास आणतात ते भल्या भल्यानाही उमगत नाही.