रेड लाईट डायरीज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रेड लाईट डायरीज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १५ जून, २०२६

वेश्या व्यवसाय कायदेशीर की बेकायदेशीर?



A)17 सप्टेंबर 1999. खोली नंबर 8, दुसरा मजला, देविका बिल्डिंग, जोगेन दत्त लेन, सोनागाची कोलकता. थंडीचे दिवस होते. अधून मधून पावसाची एखादी सर पडून जात होती. अख्ख्या सोनागाचीमध्ये बायकांच्या गलक्याने आणि विविध प्रकारच्या आवाजांनी एकच गहजब माजवला होता. आसमंतात सतराशे साठ प्रकारचे गंध दरवळत होते. दाटीवाटीने वसलेल्या त्या कोंदट वस्तीत मधूनच वाऱ्याची एखादी शीतल झुळूक येऊन गेली की बरे वाटे. कानाकोपऱ्यातून आलेले हजार तऱ्हेचे पुरुष हव्या त्या बाईच्या शोधात फिरत होते. 'बुरी'ला त्या दिवशी खूप लवकर झोप लागली होती कारण मागच्या काही दिवसात तिला थकवा जाणवत होता. बुरी उर्फ छाया रानी पॉल हिच्या आयुष्यातली तीस वर्षे सोनागाचीच्या रेड लाइट एरियात गेली होती, तिथल्या भल्या बुऱ्या गोष्टींना ती पुरती जाणून होती.

मागील काही वर्षांपासून बुद्धदेव कर्माकर हा अट्टल गुन्हेगार तिच्याकडे यायचा. तिला जबरी भोगायचा, कधी पैसे दयायचा तर कधी तसाच निघून जायचा. कधी कधी मारहाण देखील करायचा. मात्र त्याच्यासोबत तिचे नाव जोडले गेल्याने तिला इतरांचा त्रास कमी झाला होता. तरीही त्याचे पाशवी वागणे तिला असह्य व्हायचे. त्याचा स्पर्शदेखील नकोसा वाटायचा. त्याच्या तोंडाला येणारा दारूचा वास आणि घामेजलेलं अंग ह्याची तिला तिडीक बसली होती. त्याला हाकलून दिले पाहिजे असे तिला राहून राहून वाटत असे.

शनिवार, २३ मे, २०२६

ट्रेन, टागोर आणि एका वेश्येचा आत्मशोध!


26 डिसेंबर 1977 च्या दिवशी तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांच्या हस्ते मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे आताचे सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवून गीतांजली एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आलं. मुंबई ते हावडा असा तिचा रूट होता. महान कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या 'गीतांजली' या जगप्रसिद्ध पुस्तकाचे नाव ह्या ट्रेनला देण्यात आलं होतं. 'गीतांजली' म्हणजे 'गाण्यांची भेट'.

ही ट्रेन सुरू झाली, तेव्हा ती भारतातील पहिली क्लासलेस ट्रेन म्हणून ओळखली जात होती, म्हणजेच, सर्व वर्गांमध्ये समान सुविधा असलेली आणि वातानुकूलित डबे नसलेली ट्रेन असं तिचं स्वरूप होतं. हुगळी नदीच्या काठी असलेल्या हावडा शहरातलं हे स्टेशन, भारतातलं सर्वात मोठं आणि सर्वात व्यस्त, तसेच सर्वात जुन्या जंक्शनपैकी एक रेल्वे जंक्शन आणि मुंबईचं व्हीटी त्याच्या तोडीस तोड!

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

जगण्याची आणि मोक्षाची, संगीतमय कश्मकश!


माणसाला त्याच्या मृत्यूची, मोक्षाची चाहूल लागत असेल का! काही दिवसांपूर्वी निवर्तलेल्या आशा भोसले यांना त्यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जे काही लिहिलं आहे, ते याकडेच निर्देश करते. आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये आशाताई, इंटरनॅशनल बँड 'गोरिल्लाज' सोबत दिसल्यात. पोस्टमधील फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये भारतीय वस्त्या, हत्ती आणि जीर्ण झालेल्या वस्तूंची दृष्टीस पडतात. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय -"The Shadowy Light' या गाण्याचा माझ्यासाठी अत्यंत सखोल अर्थ आहे. वाराणसीला भेट देऊन आणि पवित्र गंगा नदीच्या काठानं प्रवास करून, तसेच तिथे मला जे काही दिसलं, त्याचं बारकाईनं निरीक्षण करून आणि ते समजून घेऊन, मला जीवनाचा खरा अर्थ उमजला, मी कोण आहे आणि या पृथ्वीवर माझे काय प्रयोजन आहे. 'द शॅडोई लाइट' (The Shadowy Light) मध्ये, या खोल नदीचा पैलतीर गाठणं हे माझ्या जीवनप्रवासाचं प्रतीक आहे, माझा जन्म, माझे नातेसंबंध, संगीताप्रतीची माझी निष्ठा, माझी कर्तृत्व आणि एक कन्या, माता, भगिनी, पत्नी आणि एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्य. या प्रवासात, 'संगीत' हाच माझा नावाडी आहे, तो मार्गदर्शक, जो मला या जीवननदीच्या पैलतीरी घेऊन जातो. जेव्हा मी त्या पैलतीरावर पोहोचेन, तेव्हा माझा हा प्रवास पूर्ण होईल. तेव्हा मला 'मोक्ष' प्राप्त होईल, आपल्या सभोवताली सतत तरंगणाऱ्या अगणित नादांमध्ये मी विलीन होईन. जेव्हा त्यातील काही नाद एकत्र गुंफले जातात, तेव्हा त्यातून एक सुंदर सुरावट निर्माण होते. त्याचप्रमाणे, मी देखील त्या नादांपैकीच एक नाद बनेन, असा नाद, जो अंतिमतः एका सुंदर गीतातील सुराचं रूप धारण करेल. असं गीत, जे पिढ्यानपिढ्या, हजारो वर्षे सातत्यानं ऐकलं जात राहील. हेच स्वातंत्र्य, निसर्गाशी एकरूप होण्याचं स्वातंत्र्य, नदीच्या पलीकडील तीरावर माझी वाट पाहत आहे..."

बुधवार, ८ एप्रिल, २०२६

ऑर्केस्ट्रामधल्या डान्सर्सचा मागोवा!


हे थोडेसे गंभीर आणि महत्वाचे आहे.

बिहार निवडणुकांत प्रचार सुरू असताना मतदानापूर्वीच्या दिवसांत मी एक लेख लिहिला होता, जो सारन जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा डान्सर मुलींविषयीचा होता. बिहार, बंगाल, झारखंड या तीन राज्यांमधून मुली एस्कॉर्ट केल्या जातात आणि त्यांना एकतर जबरदस्तीने नाचवले जाते नाहीतर लालूच दाखवली जाते.

एकदा का शीलभ्रष्ट(!) झाले अथवा पैशाची चटक लागली की या मुली यातून बाहेर पडत नाहीत हे वास्तव आहे. या संपूर्ण धंद्याची सूत्रे सारन जिल्ह्यातील छपरा शहरामधून हलवली जातात. यात महिन्याकाठी कोट्यवधीचे व्यवहार होतात.

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

बेपत्ता होणाऱ्या जिवांचे व्याकुळविश्व!


मागील काही दिवसांपासून राज्यांतील बेपत्ता व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बातम्यांची संख्या वाढलेली दिसतेय. खरेतर ही वाढ केवळ राज्य पातळीवर नसून देश पातळीवर, जागतिक पातळीवरही दिसते आहे. ही वाढ मागील काही दशकांच्या तुलनेत अधिक आहे. मुंबई आणि उपनगरात जून ते डिसेंबरमध्ये 93 मुलींसह 145 जण बेपत्ता झाल्याची माहिती मध्यंतरी फोकसमध्ये आली होती, नंतर काही दिवसात तिचे बातमीमूल्य शून्य झाले. महाराष्ट्रातील मुले आणि मुली बेपत्ता होण्याबाबतची 2024 -2025 या काळातील अधिकृत आकडेवारी भीषण आहे. एका आकडेवारीनुसार वर्षभरात राज्यात एकूण 37695 मुली आणि महिला बेपत्ता झाल्यात, त्यातील 4096 मुली अल्पवयीन आहेत तर सज्ञान महिलांची संख्या 33599 आहे. या काळातली मुंबई आणि इतर शहरांमधील आकडेवारी अधिक चिंताजनक आहे. एकट्या मुंबईमध्ये 1 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या अवघ्या छत्तीस दिवसांत मुंबईतून 82 मुले बेपत्ता झाली. यापैकी 60 महिला/मुली होत्या. जून ते डिसेंबर या सहा महिन्यात एकूण 134अल्पवयीन मुले बेपत्ता झाली, ज्यामध्ये 86 मुलींचा समावेश होता. नवी मुंबईमध्ये जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान 499 मुले बेपत्ता/अपहरण झाल्याची नोंद झाली, त्यापैकी 458 मुले शोधण्यात पोलिसांना यश आले असून 41 मुले (34 मुली आणि 7 मुले) अजूनही बेपत्ता आहेत. नागपूर शहरात जानेवारी 2024 ते मे 2025 या काळात 5897 बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारी आल्या, ज्यामध्ये 776 मुले होती. महाराष्ट्रात, देशांत मुलं मुली बेपत्ता होण्यामागे विविध कारणे आहेत. मानवी तस्करी (Human Trafficking), बालविवाह (Child Marriage), पळून जाणे (Elopement), लैंगिक शोषण (Sexual Exploitation), कामासाठी शोषण (Labour Exploitation), आणि कौटुंबिक समस्या (Family Issues), प्रेमसंबंध किंवा सामाजिक माध्यमांवरील फसवणूक (Social media enfluence) इत्यादींचा समावेश होतो; यांतील काही घटनांमध्ये कधी फसवून नेले जाते तर कधी मुलं मुली स्वतःच काही कारणास्तव घर सोडून जातात, आणि अनेकदा पोलिसात तक्रार दाखल होण्यास उशीर होतो किंवा प्रतिष्ठेचा विषय समजून प्रकरणे दाबून टाकली जातात, ज्यामुळे ही समस्या गंभीर बनते.

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

कविता - जिचे मरण स्वस्त झाले!


ही ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे कारण अतिशय वेदनादायी आहे. अगदी खात्रीशीर माहिती स्त्रोताच्या आधारे सांगावे लागतेय की, महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने एड्स, एचआयव्ही बाधित रुग्णांना मदत, उपचार देणाऱ्या अनेक केंद्रांचा, स्वयंसेवी संस्थांचा निधी मागील तीन महिन्यापासून थांबवला आहे. सरकार कुठे कुठे कसे कसे पैसे खर्च करतेय हे आपण सारेच पाहत आहोत!

या जीवघेण्या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण घटले असले तरी संपलेले नाही, निर्मूलन झालेले नाही हे सत्य आहे! अजूनही शेकडो रुग्ण प्रत्येक केंद्रात उपचार घेतात. या बायका लाडक्या नाहीत का? यांना उपचार मिळावेत असे वाटत नाही का?

दोन हजारात त्यांची महिन्याची औषधे येत नाहीत हे या क्षेत्रात काम करणारा कोणताही माणूस सांगेल! कवितासारख्या कित्येक बायकांना नवजीवनाची संजीवनी देण्यापासून आपण मागे हटू शकत नाही! हे पाप आहे, हा कोतेपणा आहे, हे मानवतेला धरून नाही!

सरकारने रोखून धरलेली मदत पुन्हा पूर्ववत करावी आणि गांजलेल्या, नाडलेल्या अभागी महिलांचा दुवा घ्यावा! कल्याणकारी राज्यात ही गोष्ट होणं अनिवार्य आहे. ही फार मोठ्या रकमेची बाब नाही. अवघ्या काही कोटींची ही समस्या आहे, सरकार यावर विचार करेल काय? असो.

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

इतिहास बदनाम वस्तीचा - मीरतच्या कबाडी बाजारचा!



उत्तर प्रदेशच्या मीरतमधील कबाडीबाजार भागातील एका पियक्कड थोराड बाईने एका भेटीत 'ओल्ड मंक' पिणाऱ्या तरूण, प्रौढ आणि वयस्कर पुरूषांची गुणलक्षणे आणि सवयी सांगितल्या होत्या!विशेष म्हणजे तिन्ही वर्गवारीतील पुरुषांच्या त्या गोष्टी आणि त्यांची प्यायची पद्धत यांच्यात एक परस्पर सूत्र होतं, जे अफाट होतं! तेव्हापासून ओल्ड मंक पिणाऱ्या ओळखीच्या इसमांना ते वर्णन फिट बसतंय का हे चेक केल्यानंतर अक्षरश: अवाक होण्याची वेळ आली!

रेड लाइट डायरीज सिरिजमधील माझ्या आगामी पुस्तकातील मदिराक्षीच्या प्रकरणात विविध रंजक संदर्भ आणि नोंदी आहेत, त्यातच ही नोंद समाविष्ट आहे.

कबाडी बाजारची ही बदनाम वस्ती मुघल काळापासूनची आहे. 2019 मध्ये इथला हा व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासनाने जंग जंग पछाडले. धंदा पूर्ण बंद झाल्याचे जाहीरही केले पण याचवर्षी सप्टेंबरमध्ये एका रेडद्वारे वीस जणींची सुटका करण्यात आलीय, यावरून काय ते कळावे.

शनिवार, २४ मे, २०२५

परंपरेच्या आडून भरणारा वासनांचा बाजार!


ही गोष्ट आहे एका लिलाववजा बाजाराची जिथे वयात आलेल्या मुलीची, तरुण स्त्रीची आणि पोक्त महिलेची बोली लावली जाते. इथे बायकांचा बाजार भरवला जातो. सोबतच्या फोटोतली निळ्या लहंग्यामधली मुलगी कंवरबाई आहे. तिचं मुळचं नाव अनिता. ती मध्यप्रदेशातील शिवपूरीची. बंचरा या भटक्या जमातीत तिचा जन्म झालेला. या जातीत एक प्रथा पाळली जाते, घरातील थोरल्या स्त्रीने घर नीट चालावे म्हणून बाहेरख्याली व्हायचं. त्यासाठी या बायकांचा रीतसर बाजार भरतो. बंचरा समाजाच्या तरुण पिढीच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. परंपरेच्या नावाखाली आपल्या मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावावे असे आजही अनेक पुरुषांना वाटते. एकेकाळी या जमातीमधील कर्त्या पुरुषांनी आपल्या मुली स्थानिक सरदारांना देण्यासाठी गरीब समाजबांधवांवर दडपण आणलं. पुढे जाऊन याचीही परंपरा तयार झाली. आपल्या मुलींची बिनपैशाची सोय लागते या नीच स्वार्थी हेतूने हा रिवाज कधीच बंद झाला नाही!

शुक्रवार, २ मे, २०२५

मुजफ्फरपूर, चतुर्भुजस्थान आणि सीतामढी - पोक आलेल्या लोकांचा देश!

नर्तकीच्या घरातला फोटो 

लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्यात, फरक पडेल की नाही सांगता येत नाही. इथे आशावादी असणं पुरेसे नाही. या ठिकाणी एकदा गेलेला माणूस पुन्हा जाऊ इच्छितो हे नक्की! ही एका अशा शापित भूमीची दास्तान आहे जी अस्वस्थ करुन सोडते. या भूमीचे नाते देवी सीता सोबत आहे, जिला नगरवधू म्हटलं गेलं त्या आम्रपालीशीही आहे आणि नाचगाणं करून पोट भरणाऱ्या तवायफ, वेश्यांशीही आहे! आज घडीला संपूर्ण देशात चतुर्भुज स्थान हा एकच रेड लाइट एरिया असा आहे की जिथे गाणं बजावणं होतं, रीतसर मैफली बसतात. (अर्थात हे आपल्या हैसियत आणि औकातनुसार अनुभवाला येतं) आपल्याकडे लोकनाट्य कलाकेंद्रांचा जसा पसारा असतो तशा इथे गल्ल्या आहेत. त्यात सिंगल खोल्या आहेत, अपार्टमेंट्स आहेत, काही गलिच्छ घरे आहेत तर काही जुने वाडेही आहेत! काही घरांच्या बाहेर नावाचे बोर्ड आणि टायमिंग लिहिलेलं असतं तर काही फक्त आणि फक्त रात्रीच खुली असतात! तर अपार्टमेंट्समध्ये शक्यतो दिवस डोक्यावर आल्यापासून पहाटेपर्यंत मैफल लावता येते. आपण पैसे किती खर्च करणार यावर नर्तकींची, गायिकांची संख्या ठरते. हार्मोनियम मास्तर आणि ढोलकीपटू सोबत असतातच. तिथेच खान पान आणि पेयपान करायचे असेल तर त्याचीही सोय असते मात्र तिथले मद्य बहुत करून बनावटी असते. जेवणात मात्र अस्सल बिहारी व्यंजन दिले जातात, आपण कसे पेश होतो त्यावर बरेच काही अवलंबून असते. असो. प्रस्तावनाच फार मोठी झालीय. चतुर्भुज स्थान हे एक उपनगर असल्यासारखे आहे, बिहारच्या मुजफ्फरपूर शहरातला हा भाग आहे. मुजफ्फरपूर जिल्ह्याचे हेच मुख्य शहर आहे. गायघाट, औराई, बोचहां, सकरा, कुरहानी आणि मुजफ्फरपुर हे तालुके आताच्या मुजफ्फरपूर लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येतात.

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

वाराणसी गँगरेप आणि 546 मुलींचे शोषण - धक्कादायक आणि भयंकर!

वाराणसी गँग रेपची न्यूज क्लिप इमेज  

वाराणसीमध्ये एकोणीस वर्षे वयाच्या मुलीवर सात दिवसांत 23 जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. या घटनेस अनेक पैलू आहेत. मुलीचीही एक महत्वाची चुक आहे. यातला एक पैलू केवळ उत्तर प्रदेश सरकारचा नसून उत्तरेकडील समग्र राज्यांचा आहे. कथित साधू संन्यासी जोगे फकीर ही मंडळी इकडे सर्रास चिलीम फुकताना दिसून येतात. यांच्या व्यसनांना आळा घालायचा म्हणजे धार्मिक भावना, अस्मिता आदींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे सरकारची पंचाईत आहे.

वाराणसीमध्ये पिशाच्च मोचन नावाचा एक भाग आहे. इथे एक कुंड आहे जिथे काही विधी केले तर पिशाच्च बाधा दूर होते अशी धारणा आहे. इथे काही लोंक पिंपळाच्या झाडाला नाणी चिटकवतात आणि आपल्यात बाधा आहे की नाही हे जाणून घेतात. अर्थातच हा सगळा श्रद्धा अंधश्रद्धा यांचा बाजार. तर रात्री या भागात नशेडीच अधिक आढळतात. मुलीवर पहिला रेप याच भागात झालाय.

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

आओगे जब तुम साजना..


2007 साली 'जब वी मेट' हा सिनेमा आला होता. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या प्रेमाची केमिस्ट्री त्यात जबर जमली होती. सिनेमा हिट झाला होता आणि गाणीही गाजली होती, बाकी गाण्यांच्या तुलनेत 'आओगे जब..' हे गाणं जास्त गाजलं नव्हतं; ते माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक! असो.
 
हे गाणं फर्माईश म्हणून अनेक प्रेमभंग झालेल्या तरुण पोरांनी गायला सांगितलेलं अजूनही पक्कं स्मरणात आहे. त्याहीआधी 1991 मध्ये नाना पाटेकर, डिम्पल, माधुरी यांच्या 'प्रहार'मध्ये शुभा गुर्टू यांनी गायलेली 'याद पिया की आये..' ही ठुमरी खूप जीव लावून ऐकलेली! तिच्याशी जसे एकरूप होता येत होतं तसेच 'आओगे जब तुम साजना'बाबतीत व्हायचे!

बुधवार, २६ मार्च, २०२५

एक दिवस शोषित जिवांच्या आनंदाचा!

'क्रांती महिला संघ' स्नेहमेळावा 

आपल्याकडे वेश्यांकडे अजूनही अत्यंत तिरस्काराने पाहिले जाते. समाज त्यांना आपला घटक मानत नाही हे वास्तव आहे. वेश्या म्हणजे किटाळ, नीच आणि व्यभिचारी स्त्रिया असंच मानलं जातं. मात्र त्याच बरोबरीने त्यांच्याकडे जाणाऱ्या म्हणजेच वेश्यागमन करणाऱ्या पुरुषांना समाज फारशी नावे ठेवताना दिसत नाही. जुगार खेळणाऱ्यास जुगारबाज म्हटले जाते, दारू पिणाऱ्यास दारूबाज म्हटले जाते परंतू वेश्येकडे जाणाऱ्यास रंडीबाज म्हटले जाते ही बाब आपल्याला खटकत नाही कारण अन्य वेळी व्यसनावरून नावे ठेवणारा समाज इथे मात्र त्या पुरुषाला नावं ठेवण्याऐवजी त्या स्त्रीलाच रंडी म्हणतो आणि तिच्याकडे येणाऱ्यास नाव ठेवताना तिलाच शिवी देऊन रंडीबाज म्हणतो! रंडी ही एक शिवी आहे जी समाज व्यभिचारी स्त्रियांना देतो, वास्तवात या बायका कुणाच्या घरी येऊन जोरजबरदस्ती करत नाहीत तरीही यांनाच नावे ठेवली जातात कारण आपल्या समाजात या स्त्रियांना छदामाचीही किंमत नाही. अशा समाजात एखादी तरुणी अक्षरश: क्रांती करावी तसे काम करते नि त्यांच्यात एकी घडवून आणते, त्यांच्या समस्यांसाठी लढते, अल्पवयीन मुलींना यातून बाहेर पडण्यास मदत करते, ज्यांच्या मुली मोठया आहेत त्यांच्या शिक्षणासाठी धडपड करते नि या स्त्रियांच्या बेसिक गरजांसाठी संघटन उभं करते तेव्हा निश्चितच काही चांगल्या गोष्टी घडतात.

गुरुवार, १३ मार्च, २०२५

ज्युलिअस सीझर - वासनांच्या मुळाशी जाणे कठीण नाही!

 

रोमन सम्राट ज्युलियस सीझरच्या काळात बलात्कार आणि सेक्स संबंधी गुन्हे इतके वाढले होते की तो हताश होऊन गेला होता. त्यात जबरी समलिंगी संभोगींचींही बरीच संख्या होती. यावर त्याने एक अभ्यासगट नेमला पण त्याच्या अहवालाची वाट पाहण्याइतका वेळ त्याच्याकडे नव्हता.

त्याने त्याच्या काही शहाण्या लोकांना निरीक्षणे नोंदवायला सांगितली. त्यात एक निरीक्षण होतं सिन्येडसबद्दलचे (cinaedus याचा उच्चार किनायडूस असाही करतात). पिळदार देहयष्टी असलेले पण शारीरिक ढब फेमिनाईन असलेले हे तरुण डफ वादक होते.