![]() |
नर्तकीच्या घरातला फोटो |
इथे मोठ्या प्रमाणात 'लिची'चे पीक घेतले जाते. बिहारच्या उत्तरपूर्वेस असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघाचे भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्व खूप आहे. याच्या उत्तरेस सीतामढी आणि पूर्वी चंपारण हे जिल्हे आहेत. दक्षिणेस वैशाली आणि सारन हे जिल्हे आहेत तर पूर्वेस दरभंगा आणि समस्तीपूर आहेत. दक्षिणेस गोपालगंज! हा सर्व बेल्ट बिहारच्या राजकारणावर इतिहास काळापासून प्रभुत्व राखत आलाय.
रामायणानुसार प्रभू रामचंद्राची पत्नी देवी सीता ही मातीतून लाभलेली कन्या होती. जनक राजाला ती जिथे गवसली ती जागा म्हणजे "जहाँ सीता मिट्टी में मढ गयी थी वो सीतामढी"! सीता इथेच मिळाली अशी मान्यता आहे. राजा जनक यांचे जे मिथिला राज्य होते तो भाग म्हणजे उत्तर बिहारची भूमी जी नेपाळच्या तराई भागास लागून आहे. दरभंगा, मधुबनी, समस्तीपूर, मुजफ्फरपूर, मधेपूर, पूर्णिया, सौपोल, बेगुसराय, आरारिया, सरसा आणि कटीहार हे आताचे जिल्हे मिथिला भागात येतात. या प्रत्येक जिल्हयाला स्वतःची कहाणी आहे. बिहारच्या राजकारणाची ही खाण होय.
सूर्यवंशीय राजा इक्ष्वाकु याचा मुलगा विशाल याने इसवीसन पूर्व सहाव्या ते पाचव्या शतकाच्या काळात लिच्छवी राज्याची स्थापना केली होती, या राज्याची राजधानी असणारे शहर राजा विशाल याच्या नावानेच ओळखले गेले, तेच हे 'वैशाली' शहर वेगळ्या स्वरूपात अजूनही अस्तित्वात आहे! त्या काळात 2 ते 3 लाख यांची एकूण जनसंख्या होती, लिच्छवी गणराज्याच्या विधानसभेत 7707 सभासद निवडून दिले जात. देशातली नव्हे तर जगातली पहिली लोकनिवड प्रक्रिया इथे होत होती यावरून लक्षात येईल की या भागातील लोकांना राजकारणात अफाट स्वारस्य का आहे!
याच कालखंडा दरम्यान मगधचा सामर्थ्यशाली सम्राट अजातशत्रू याने हा भाग हल्ला करून काबिज केला. गंगेच्या एका काठावर त्याचे पाटली हे गाव होते त्याच गावावरून पुढे पाटलीपुत्र रूढ झाले. तर त्याच्या विरुद्ध टोकास नदीच्या त्या काठावर लिच्छवी होते! हा भाग पुढे जाऊन पूर्णतः बुद्धमय झाला. भगवान गौतम बुद्ध यांनी त्यांच्या हयातीत वैशाली नगराला तीन वेळा भेट दिली होती. त्यांचा अंतिम उपदेश त्यांनी येथूनच दिला होता आणि निर्वाणास जात असल्याचे त्यांनी इथूनच जाहीर केले होते.
याच काळात जैन धर्माचे चोविसावे नि अखेरचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म क्षत्रियकुंड (बसु कुंड) येथे झाला होता. आताच्या मुजफ्फरपूरपासून केवळ 34 किमी अंतरावर हे स्थान आहे. आम्रपालीचा कालखंडही हाच आहे. आताच्या वैशाली शहरातील अमरा या उपनगरीय खेड्यात ती लहानाची मोठी झाली. तिला नगरवधू केलं गेलं होतं. ती याच लिच्छवी जातीकबिल्यातली मुलगी होती. ती एक कुशल नृत्यांगना होती. तिच्या सौन्दर्याची भुरळ राजा बिंबिसारला देखील पडली होती. असे असले तरी तिला वेश्या संबोधणे अनुचित होय. ती नाचगाणे जरूर करे मात्र देहविक्रय तिने कधी केला नाही.
वैशाली ते चतुर्भुज स्थान हे अंतर फक्त 62 किमी आहे! बुद्धांचा प्रभाव ओसरल्यानंतर या भागातील राजे महाराजे आपल्या वारसांना इथे चौसष्ठ कला शिकण्यास पाठवत असत. तेहजीब आणि अदब शिकण्याचे हे एक प्रसिद्ध केंद्र होते. भगवान विष्णूंची चार हातांची मूर्ती असलेल्या मंदिरामुळे हा भाग चतुर्भुज स्थान याच नावाने ओळखला जाऊ लागला. आम्रपालीच्या पश्चातही नृत्यकलेसाठी रासलीलेसाठीही हा भाग प्रसिद्ध होता मात्र त्याचे स्वरूप विकृत नव्हते! कला सादर करणारे नि तिची कदर करणारे देखील त्याकडे रसपान म्हणूनच पाहत असत!
मुघलांचा उदय होण्याच्या आधीच्या शतकापर्यंत इथली तसवीर बदलून गेली, इथे केवळ नाचगाणी उरली. चौसष्ट कला लोप पावल्या! वास्तवात श्रीकृष्ण वगळता चौसष्ट कला कुणालाही आत्मसात नव्हत्या असे भागवत पुराण सांगते. मुघल काळात हा इलाखा निव्वळ अय्याशीचा अड्डा झाला असेही नव्हते. या चतुर्भुज मंदिराच्या दुसऱ्या टोकाला गरीबस्थान मंदिर आहे. हे शिव मंदिर आहे. या दोन मंदिराच्या परिघात जो भाग आहे तो आताचा चतुर्भुजस्थान रेड लाइट एरिया आहे. शुक्ला रोड भागात हा परिसर येतो.
विख्यात हिंदी साहित्यिक देवकी नंदन खत्री, रामवृक्ष बेनीपुरी, जानकी वल्लभ शास्त्री यांची ही कर्मभूमी! महान क्रांतिकारक खुदिराम बोस इथेच फासावर चढले! 1920 आणि 1927 मध्ये गांधीजींनी या भागास भेट दिली होती. 1972 पर्यंत वैशाली हा मुजफ्फरपूरचाच एक भाग होता मात्र नंतर त्यास स्वतंत्र जिल्हा म्हणून मान्यता मिळाली. 1952 ते 1971 पर्यंत मुजफ्फरपूर लोकसभा क्षेत्रातून कॉँग्रेस उमेदवार विजयी झालेले. यातलं मोठं नाव नवलकिशोर सिन्हा यांचं होतं. 1977 ते 2004 या दरम्यान जॉर्ज फर्नांडिस इथे अनुक्रमे जनता पक्ष, जनता पार्टी सेक्युलर, जनता दल, जेडीयु आणि समता पक्ष या पक्षांचे प्रतिनिधी म्हणून पाच वेळा निवडून आले. मात्र त्यांच्या कार्यकाळाच्या मधोमध कॉँग्रेसचे ललितेश्वर प्रसाद शाही आणि आरजेडीचे जय नारायण निषाद हे निवडून आले. निषाद निवडून आले त्याचे कारण बिहारमधील जातीय समीकरण आधारित राजकारणाची सरशी! या माणसाची करामत अशी की याने एकूण पंधरा वेळा पक्षांतर केलं तेही पाच पक्षात! तरीही पाच वेळा एकाच लोकसभा क्षेत्रातून तो निवडून येत राहिला! 2004 मध्ये जॉर्ज फर्नांडिस निवडून आले होते तरीही 2009 मध्ये त्यांना तिकीट दिले गेले नाही मग ते अपक्ष उभे राहिले. निषाद जिंकले आणि जॉर्ज हरले! त्यांचा अतिशय वाईट पराभव झाला. इथूनच त्यांचा ऱ्हास सुरु झाला. निषाद वृद्ध झाले, थकले. मग त्यांचे चिरंजीव अजय निषाद सक्रिय झाले, ते भारतीय जनता पक्षाकडून दोन वेळा निवडून आले. थोडक्यात बिहारमधील सर्व मुख्य पक्षांचे खासदार होऊन गेलेत!
आजवर यातील एकाही खासदाराने वा या मतदार संघात असणाऱ्या एकाही आमदाराने चतुर्भुज स्थानच्या बदहाली विषयी ब्र शब्द देखील उच्चारला नाही! इथल्या बायका पूर्वीही शोषणस्थानी होत्या आणि आजही आहेत. कोविड काळात आणि त्याही आधी इथल्या स्त्रियांना इथून हाकलून लावले पाहिजे म्हणून काही संस्कृती रक्षकांनी आणि काही राजकीय लोकांनी आंदोलने केली मात्र त्याचा असर पडला नाही. अपहरण न करता मिळणारी 'फिरौती' कुणाला नको असते? ती इथे बक्कळ मिळते! आम्रपालीला जाऊन अडीच हजार वर्षे झाली, सीतामातेला जाऊन पाच हजार वर्षे (अदमासे) झाली! इथे इतकी मोठी दिग्गज माणसं जन्माला आली आणि काळाच्या पडद्याआड गेलीही! इथे बुद्ध येऊन गेले, भगवान महावीर रहिवास करून गेले, गांधीजीही येऊन गेले! इथे भारतीय इतिहासातील महान मगध साम्राज्याचा राजा चाल करून आला, इथेच वैशालीच्या रूपाने जगातली पहिली लोकशाही नांदली! तरीही इथल्या स्त्रियांचे भोग का संपत नाहीत? का कुणाला वाटत नाही की या सर्वच स्त्रियांचे एक उत्तम असे पुनर्वसन केले जावे!
काही शहरे इतिहासातला समृद्ध वारसा मिरवत असतात तर काहींच्या मस्तकी भळभळती जखम येते! मुजफ्फरपूरच्या वाट्याला हे दोन्ही आलेय, इथले सामान्य सभ्य लोक पहिल्या आयडेंटीटीवर खुश असतात तर या स्त्रिया दुसरी आयडेंटीटी थेट जगतात! इथल्या स्त्रियांची एक पोस्ट मागे लिहिली होती ज्यात 'हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानतें..' हे गीत गाणाऱ्या मुलीची नोंद होती, जीव कासावीस झाला होता!
इथं अनेक कथा कादंबऱ्याचा ऐवज दडून आहे आणि त्याही पलीकडे इथला नावालाच जिवंत असलेला अशक्त देह रोज रात्रीला चेहऱ्याला लेप चढवून आहे!
हे लेप उतरवले तर आपल्या समाजाचा भेसूर चेहरा दिसेल, ज्यात गोंदवल्यात सीतेच्या नि आम्रपालीच्याही वेदना!
हा देश माझा आहे, आपल्या सर्वांचा आहे! मात्र हळूहळू इथले सारेच लोक पोके पोके होत चाललेत!
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा