गुरुवार, ३० मार्च, २०१७

'शोले', आरडी आणि जिना लोलोब्रिजीड - एक अनटोल्ड स्टोरी...



खाली दिलेल्या लिंकमधील कृष्णधवल फोटोची गोष्ट 'शोले'शी संबंधित आहे आणि यातील उजव्या बाजूच्या स्त्रीविषयीची माहिती अत्यंत रम्य आहे. पण त्या आधी हा सर्व काय प्रकार होता याची थोडीशी माहिती घेतली तरच सर्व नीट उमजेल..... १९७५ ला 'शोले' रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसला अशी आग लावली की ऑलटाईम ब्लॉकबस्टर मुव्ही लिस्टमध्ये अजूनही तो अग्रस्थानी आहे. 'शोले'बद्दल अनेकांनी अनेकवेळा लिहिलंय कारण त्यात प्रचंड कंटेंट ठासून भरलेलं आहे. 'शोले'तलं हेलनवर चित्रित केलेलं 'मेहबूबा मेहबूबा' हे अप्रतिम गाणं अफाट गाजलं होतं. आरडींना हे गाणं आधी आशाजींकडून प्लेबॅक करून हवं होतं.

मंगळवार, २८ मार्च, २०१७

नवविचारांची गुढी ...

चैत्र शुक्ल प्रतिपदेस 'सालाबादप्रमाणे यंदाही'च्या धर्तीवर महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. त्या निमित्ताने राज्यभर विविध आक्षेप साक्षेपांच्या फैरी झडतात. त्यातील काही मुद्द्यांचा हा परामर्श..



गुढीपाडवा साजरा करताना त्यामागे असणारी धार्मिक पार्श्वभूमी सांगितली जाते. यानुसार गुढीपाडव्याच्या परंपरेस मुख्यत्वे तीन घटना कारणीभूत आहेत.

गुरुवार, २३ मार्च, २०१७

घाल घाल पिंगा वाऱ्या - कवी निकुंब


एक काळ होता जेंव्हा दळणवळणाची साधने अत्यंत पुरी होती. विवाह हे बहुतांश करून पारंपारिक भारतीय पद्धतीने होत असत. विवाहेच्छुक मुलगा नवऱ्या मुलीला बघायला तिच्या घरी येई. यथासांग मुलीला पाहून झाल्यावर तो त्याची पसंती वा नापसंती कळवत असे. या प्रक्रियेत बऱ्याचदा मुलींचे मत विचारात घेतले जात नसे. पसंती कळवल्यानंतर लगीनघाई होई. पुढे जाऊन मुलाच्या वा मुलीच्या निवासी भागात किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री विवाह सोहळा संपन्न होई. पूर्वी ग्रामीण भागातले लग्नाचे वऱ्हाड बैलगाडयातून जाई, निमशहरी भागातले वऱ्हाड बंदिस्त ट्रकमधून तर शहरी भागातील वऱ्हाड एसटीबस मधून जाई.

एखादयाचा आर्थिक स्तर थोडा चांगला असला की याहून थोडीशी वरच्या स्तरावरची व्यवस्था याकामी ठरलेली असे. लग्न लागले की सासरला निघालेली नवरीमुलगी काहीशी धास्तावूनही जायची आणि तिला नवजीवनाचा आनंदही वाटायचा. मनाच्या द्विधा मनःस्थितीत अडकलेली ती नवविवाहिता तिच्या निरोपसमयी आईवडिलांच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडत असे. तिची भावंडे तिला मिठया मारून रडत. सारे वातावरण शोकाकुल होऊन जाई, मग जमलेल्या बायाबापड्यादेखील डोळ्याला पदर लावत. कुणाला नुकत्याच निवर्तलेल्या एखाद्या नातलगाची आठवण निघाली मग सारेचजण शोकसागरात बुडून जात.

बुधवार, १५ मार्च, २०१७

'व्हॅलेंटाईन डे' रेड लाईट एरियातला..



व्हॅलेंटाईन-डे रेड लाईट एरियातही साजरा होतो. 
तिला सोडवू न शकणारे, 
तिच्या सुटकेसाठी आवश्यक असणारे पैसे जवळ नसलेले, 
तितकी धमक मनगटात नसलेले, 
तिला कोठे न्यायचे आणि 
कसे सांभाळायचे याचे उत्तर माहित नसलेले, 
पण तिच्यावर मनापासून प्रेम करणारे 
आजच्या दिवशी भर दुपारी इथे येताना किंचित सुकून गेलेला, 
पाकळ्या झडायच्या बेतात असलेला, 
लाली फिकी झालेला थोडासा स्वस्तातला गुलाब 
शर्टमध्ये लपवून येतात. 
जोडीला पाच पन्नास रुपयांची कचकडयाची भेटवस्तूही आणतात.

आम्ही सोलापूरी ....



सोलापूरातल्या अनेक बोळ वजा गल्ल्या आणि आडव्या उभ्या चाळीमध्ये काही अभूतपूर्व वाणाची माणसे राहतात, ही म्हटली तर देवमाणसे आहेत नाहीतर सीधी-साधी महापुरुष वजा सोलापूरी माणसे ! विश्वनिहंत्याने ही माणसे घडवताना एक वेगळीच आगळ्या धाटणीची मूस वापरलेली असणार आहे, त्यामुळे यांची जडणघडण जगावेगळी अगम्य आहे. या माणसांत सोलापूरच्या लाल चटणीचे, मऊ इडलीचे, आंबुस ताडीचे, कडू बाजरीचे, गोड हुरडयाचे, उजनीच्या खारटतुरट पाण्याचे, खरमुडया वाणाचे, गोडतिखट सांबाराचे, हलवाई गल्लीतल्या घमघमाटाचे, आबे काबे म्हणणारया एकेरीपणाचे अन डोळे वटारून उग्रट वाटणारया पण हळव्या मनाच्या माणसाचे सगळे गुण अगदी ठासून भरलेले आहेत.

बुधवार, ८ मार्च, २०१७

अजरामर ग़ालिब .....



ग़ालिबच्या पत्नीने अनेक अपत्यांना जन्म दिला. मात्र त्याचं एकही अपत्य जगत नव्हतं. तेव्हा माणसाच्या काही सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत हे उमजून असलेला ग़ालिब लिहितो…'हजारों ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले…' या पातळीचं सत्य लिहिल्यानंतरही गालिब स्वतःच्या आयुष्यातून पुत्राच्या इच्छेला बाहेर काढत नाही आणि तो सतत मूल जगण्याची वाट पाहत राहतो. पाचवीला पूजलेली आर्थिक चणचण, एकही अपत्य न जगणं, प्रेयसीचं निधन अशा नैराश्याच्या फेरयात अडकलेला गालिब लिहितो …
'कैदे हयात, बन्देगम, अस्ल में दोनों एक हैं
मौत से पहले आदमी गम से नजात पाए क्यों?…'
असं जेंव्हा तो मन व्यक्तवतो तेव्हा मनातल्या भावना मांडणारे अचूक शब्द आणि त्या शब्दांत भरून राहिलेला अर्थ जाणवून ऐकणारा स्तिमित होतो.

बुधवार, १ मार्च, २०१७

रेड लाईट डायरीज - 'पवित्र' गंगा-जमुना ...



पवित्र काय आणि अपवित्र काय याच्या व्याख्या व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतात, पण रेड लाईट एरियात त्या जितक्या तीक्ष्ण आणि कटू असतात तितक्या अन्यत्र असू शकत नाहीत....

जमुनाबाईचे ओठ सदा न कदा पान खाऊन लाल झालेले असत.
वरवर साधी वाटणारी पण एकदम फाटक्या तोंडाची, पक्की जहांबाज !
तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला की भल्याभल्यांना घाम फुटे.
आवाज एकदम मधाळ, ओठातून साखरपाक ओघळावा इतका.
तारसप्तकात चढला तरी त्यातही एक गोडवा वाटे.
हापूस आंब्यासारखी रसरसलेली काया अन मुखडयावर कत्लवाली नजाकत.
एका नजरंत पुरुषाचं पाणी जोखणारी, डोक्यात त्याची कुंडली बनवणारी.
कुणाला कुठवर घोळवायचं, कुणाला खेळवायचं अन कुणापुढं नांगी टाकायची हे तिला चांगले ठाऊक.
कुठल्याही विषयावर बोलताना बागेतून फिरवून आणून अखेरीस आपल्याला हवं तसं धोपटून काढण्यात तिचा हातखंडा.
बोलताना विषय पुरत नसत. तिचे पदराचे चाळे सुरु असत. अंगठा जमिनीवर मुडपून पाय हलवत खुर्चीत रेलून बसे आणि केसांचं विस्कटणं सुरु होई.
आपण काहीही बोललो नसलो तरी ती म्हणे, “हां तो क्या कह रहा था तू ?”
तिनं टाकलेला तो फास असे, सावज त्यात अलगद अडके. मग ती त्याला आपल्या साच्यात घुसळून काढे.
जमुनाचं रसायनच वेगळं होतं, ती या लाईनमध्ये फिटही होती आणि अनफिटही होती.
एका उन्हाळ्यातल्या संध्याकाळी चाईल्डसेक्सवर्कर्सची नवी रसद आल्याचे कळल्यामुळे खबरबात मिळवण्यासाठी तिच्याकडे गेल्यावर तिने आधी हजेरी घेतली.
कदाचित त्या दिवशी माझ्या आधी कुणी तरी तिचा भेजाफ्राय करून गेलं असावं.
नया बच्ची लोग का मालुमात हैं क्या असं म्हणायचा अवकाश तिने विचारलं, “तुला कशाला हवी रे ही जानकारी ?”
तिथेच मी चुकलो, चुकून बोलून गेलो – “ये ऐसाच ग्यान बटोरने के लिये !”
झालं. उत्तर ऐकताच तिच्या डोळ्यात चमक दाटून आली.
“कसलं ग्यान ?” – हातभर पुढे सरकत जमुना बोलली.
माझी तंतरली होती, ऐन वेळेस काय बोलावं ते सुचलं नाही. गडबडीत बोलून गेलो - “तेच ज्ञान, आपलं कर्म आणि कर्माच फळ, त्या शिवाय का कुणी इथं येतं ?”
"बापू तू रंडीखान्यात गीतेचं ग्यान शोधतोस का ! पागल आदमी...
अरे, इथे चमडीचा धंदा होतो, जिस्मफरोशी ! दहा मिनिटात काम तमाम...
वाटल्यास अर्धा एक तास ज्यादा. जास्तीचा कंड असेल तर बारा घंटे नाहीतर फुल नाईट. ..