चित्रपट गीत संगीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चित्रपट गीत संगीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

'चलो ज़िंदगी को मोहब्बत बना दें' : जगजीत आणि चित्रा सिंग - एका अनोख्या प्रेमाची कथा ...


रात्र गडद होत गेल्यावर चित्रासिंग आपल्या शयनकक्षातले दिवे मालवतात. म्लान उजेडाच्या साथीने तिथे अंधार वसतीस येतो. चित्रांना आता वेध असतात रात्रीतून तिथे सुरु होणाऱ्या मैफलीचे. आस्ते कदम तिथे मंच उभा राहतो, प्रेक्षक जमा होतात, पुढ्यात हार्मोनियम घेऊन बसलेले जगजीतसिंग अवतीर्ण होतात. रात्र जशी सरत जाते तसतशा गझलांच्या एकामागून एक मैफली सजतात. लोक आनंद घेत राहतात. टाळ्यांचा गजर होत राहतो. 'वन्समोअर'चे पुकारे होत राहतात, वीणा झंकारत राहते. मधूनच भानावर येणाऱ्या चित्रा आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत दीर्घ निश्वास सोडतात. उत्तररात्रीच्या अखेरच्या प्रहरी थकलेल्या चित्रा त्यांच्या नकळत डोळे मिटून शांतपणे झोपी जातात. तेंव्हा फुलांनी सजलेला मंच अदृश्य होतो, टाळ्या वाजवणारे रसिक श्रोते लुप्त होतात. एक नीरव शांतता पसरते आणि खांद्यावर मखमली किरमिजी रंगाची शाल पांघरलेले, पांढऱ्या शुभ्र वस्त्रातले जगजीतजी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कोमल म्लान चेहऱ्यावरून आपला थरथरता हात फिरवतात. त्यांच्या डोळ्यातून ओघळणारा उष्म अश्रूंचा थेंब चित्रांच्या गाली पडायच्या आधी अदृश्य होतात. शीतल वाऱ्याच्या झुळुकेने जाग यावी तद्वत चित्रा जाग्या होतात. एकवार डोळे उघडतात आणि किंचित मंद स्मित करत पुन्हा झोपी जातात.

मंगळवार, ९ मे, २०१७

पुराने 'जख्म' - तुम आये तो आया मुझे याद....


१९९८ मध्ये महेश भट्टनी 'जख्म' हा चित्रपट काढला होता. त्यात एक अवीट गोडीचं अर्थपूर्ण गाणं होतं. "तुम आये तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला.."
अलका याज्ञिकनी अगदी जीव ओतून हे गाणं गायलं होतं. आर्त हळव्या स्वरातील ही रचना गाणं ऐकल्यानंतर ओठांवर रेंगाळत राहते. गाणं बारकाईने बघितलं तर लक्षात येतं की या दाखवलेला प्रसंग म्हणजे महेश भट्ट आणि परवीन बाबीच्या जीवनातला 'तो' प्रसंग आहे.

महेश भट्टच्या प्रेमात देहभान हरपलेली परवीन एकदा सुरा हातात घेऊन त्याच्या घरात घुसली होती आणि महेशनी अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर हात जोडल्यानंतर तिने तिथून पाऊल काढते घेतले होते. (हाच प्रसंग त्यांनी 'अर्थ'मध्ये दाखवला होता). या नंतर बरेच दिवस महेशभट्ट परवीन बाबीकडे फिरकले नाहीत. तिनं मात्र पिच्छा पुरवला. शेवटी काही दिवस तिच्यापासून स्वतःला चुकवत फिरणाऱ्या महेश भट्टनी तिचं घर गाठलं तर त्यांना दारात उभं पाहून तिला हर्षवायुच व्हायचा राहिला होता. महेश आत आल्यावर तिनं भाबडेपणाने सगळी दारं खिडक्या लावून घर बंदिस्त करून घेतलं. जणू आता महेश तिच्या घरात कायमचे कैद झाले असा तिचा होरा असावा. पण पुढे जाऊन नियतीने तिची क्रूर चेष्टा केली हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच. असो.... ही घटना महेश भट्ट यांच्या मनावर खोल कोरली गेली अन तिचे पडद्यावरील प्रकटीकरण म्हणजे 'जख्म'मधलं हे गाणं...

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

सौतन - पडद्यामागची करुण कथा ...




1967 चे वर्ष होते. तरुण सावनकुमारला चित्रपट सृष्टीत आपलं नाव कमवायचं होतं, इतरांपेक्षा वेगळं काही करून दाखवायचं होतं. अभिनेता संजीवकुमारला नायकाच्या भूमिकेत ठेवून त्याने ‘नौनिहाल’ हा आगळा वेगळा सिनेमा निर्मिला मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सपशेल पडला. सावनकुमार दुःखी झाला. मात्र तो हार मानणाऱ्यापैकी नव्हता. त्याने एक कथा लिहिली होती, त्यावर त्याला सिनेमा बनवायचा होता नि त्याचे दिग्दर्शनही स्वतःच करायचे होते. त्याच्या मित्राने कथा ऐकली नि त्याला सांगितले की या कथेसाठी नायिका म्हणून मीनाकुमारीच सर्वश्रेष्ठ ठरेल. दुसऱ्याच दिवशी सावनकुमारने मीनाकुमारीला फोन केला. मीनाच्या बहिणीने फोन उचलला. सावनने आपलं काम सांगितलं. त्याच दिवशी दुपारी मीनाने त्याला घरी बोलवलं. घरी जाताच त्याने आपली ओळख करून दिली आणि आपलं कामही सांगितलं. मीनाकुमारी थक्क झाली कारण तिच्यापेक्षाही वयाने लहान असणारा आणि केवळ जुजबी अनुभव असणारा तरुण तिला कथा ऐकवत होता. कथा ऐकून आणि त्या तरुणाविषयीच्या अकस्मात भावना आकर्षणातून तिने होकार दिला. सिनेमाची तयारी पूर्ण झाली. चित्रिकरण सुरू झाले. या दरम्यान त्यांच्या दोघांमध्ये एक प्लेटोनिक नाते तयार झाले जे देह आणि लैंगिक जाणिवांच्या पुढचे होते. सिनेमाचे शुटींग सुरू झाले नि मीनाकुमारीची तब्येत वरचेवर बिघडू लागली. 2 डिसेंबर 1971 ला मीनाकुमारीवरतीच अखेरचा शॉट शूट झाला. त्यानंतर तिची प्रकृती इतकी खालावली की तिच्या मृत्यूच्या वावड्या उठू लागल्या. तिच्या आयुष्यातील अखेरच्या काळात याच सावनकुमारने तिची सेवा सुश्रूषा केली. तिच्या रक्ताच्या उलट्या तो हाताने साफ करायचा. सिनेमा पूर्ण होऊनदेखील रिलीज होण्यास आर्थिक अडथळे येत होते. मीनाकुमारीने तिच्या नावावर असलेला बंगला विकून त्याला पैसे दिले. 31 मार्च 1972 रोजी तिचे देहावसान झाले. सावनकुमार अतिव दुःखात बुडाला. मीना त्याची पत्नी नसली तरी त्याचे सर्वस्व होते, त्याच्यासाठी तीच देव होती; तीच मसिहा होती. मीनाच्या मृत्यूनंतर आठ महिन्यांनी 22 नोव्हेंबर 1972 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाचे नाव होते ‘गोमती के किनारे’! सिनेमा दणकून आपटला! सावनकुमारला याचे विलक्षण दुःख झाले. मीना आणि त्याच्या प्रेमभावनेविषयी त्याने कविता लिहिली. त्यातलंच एक गीत त्याला अजरामर करून गेलं! त्यासाठी आपल्याला आणखी एक दशक पुढे जावे लागेल!

गुरुवार, ३० मार्च, २०१७

'शोले', आरडी आणि जिना लोलोब्रिजीड - एक अनटोल्ड स्टोरी...



खाली दिलेल्या लिंकमधील कृष्णधवल फोटोची गोष्ट 'शोले'शी संबंधित आहे आणि यातील उजव्या बाजूच्या स्त्रीविषयीची माहिती अत्यंत रम्य आहे. पण त्या आधी हा सर्व काय प्रकार होता याची थोडीशी माहिती घेतली तरच सर्व नीट उमजेल..... १९७५ ला 'शोले' रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसला अशी आग लावली की ऑलटाईम ब्लॉकबस्टर मुव्ही लिस्टमध्ये अजूनही तो अग्रस्थानी आहे. 'शोले'बद्दल अनेकांनी अनेकवेळा लिहिलंय कारण त्यात प्रचंड कंटेंट ठासून भरलेलं आहे. 'शोले'तलं हेलनवर चित्रित केलेलं 'मेहबूबा मेहबूबा' हे अप्रतिम गाणं अफाट गाजलं होतं. आरडींना हे गाणं आधी आशाजींकडून प्लेबॅक करून हवं होतं.

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

सदाबहार 'वक्त' आणि 'आगे भी जाने ना तू'ची रंजक कथा ......



'आगे भी जाने ना तू ..' हे गाणं होतं बी. आर. चोप्रा निर्मित आणि यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’मध्ये. साठीच्या दशकात आलेला वक्त अनेकार्थाने महत्त्वपूर्ण चित्रपट होता. व्यवसायाच्या दृष्टीने तर तो खूप यशस्वी ठरलाच; पण सुनील दत्त, शशी कपूर, राजकुमार, बलराज सहानी, साधना, शर्मिला टागोर, अचला सचदेव अशी मोठी नावे असलेल्या वक्तने मल्टीस्टार चित्रपटांचा ट्रेंडही स्थिर केला. शिवाय काळाच्या तडाख्याने कुटुंबाची ताटातूट होणे आणि त्याच काळाच्या कृपेने कुटुंब पुन्हा एकत्र येणो या जुन्याच फॉर्म्युल्याचेही पुनरुज्जीवन केले. पुढे अनेक वर्षे त्यावर अनेक बरेवाईट चित्रपट येत गेले. पण 'वक्त'चे वेगळेपण तेवढय़ापुरतेच मर्यादित नाही.
नेहरूप्रणीत आधुनिक, समाजवादी आणि उपभोगविरोधी विचारांच्या पार्श्वभूमीवर 'वक्त'ने नशिबाला मुख्य भूमिका देणारे आणि भोगविलासाला अपराधगंड न बाळगता स्वीकारणारे श्रीमंती नाटय़ मांडले. असे चित्रपट यापूर्वी येतच नव्हते असे नाही. पण 'वक्त'ने त्याला मल्टीस्टार प्रतिष्ठा दिली, यश दिले.

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

'हमें तुमसे प्यार कितना'ची रसाळ 'कुदरत' ....



७०-८० चे दशक हे अमिताभचे एकहाती दशक होते, वनमॅन  इंडस्ट्रीचा अनुभव बॉलीवूड घेत होते. अमिताभच्या आधीचा सुपरस्टार राजेशखन्ना बरयापैकी पिछाडीवर पडला होता. त्याला इंडस्ट्रीत अस्तित्व टिकवण्यासाठी एका हिट सिनेमाची प्रचंड गरज होती पण त्याचे सिनेमे त्याला साथ देत नव्हते. महबूबा, त्याग, पलकों की छाँव में, नौकरी, जनता हवलदार, चक्रव्यूह,बंडलबाज असे अनेक सिनेमे दणकून आपटले होते, नाही म्हणायला ७९मध्ये आलेल्या अमरदिपने थोडाफार व्यवसाय केला होता. पण त्याची धडपड सफल झाली आणि १९८१ मध्ये चेतन आनंदने दिग्दर्शित केलेल्या 'कुदरत'ने त्याला तारले व पुढे काकाने अनेक बरयापैकी हिट सिनेमे देऊन आपली पत शाबूत राखली...

सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६

सीमा - 'तू प्यार का सागर है' एक अलौकिक गीत ..



तू प्यार का सागर है या गीताच्या रसग्रहणाच्या निमित्ताने मी तुम्हाला नेतोय थेट एकसष्ट वर्षे मागे ...
येणार का माझ्या बरोबर या अर्थपूर्ण गाण्याची कथा ऐकायला ?
चला तर मग .....

कृष्णधवल हिंदी सिनेमांच्या सुवर्ण इतिहासातले रुपेरी नाव म्हणजे 'सीमा'. माझा जेंव्हा जन्मही झाला नव्हता, तेंव्हाचा हा सिनेमा..१९५५चा हा सिनेमा मी आवर्जून डीव्हीडी आणून घरी पाहिला, कारण यातील 'तु प्यार का सागर है' हे अजरामर गाणे. हे गाणे मी यु ट्यूब वर बरयाच वेळा पाहीले, ऐकले अन दरवेळेस अनामिक शांतता मनाला मिळत गेली. बालपणी फाटक्या कपड्यात शेजारयांच्या घरी जाऊन हा सिनेमा एका रविवारच्या सांजेस दूरदर्शनवर पाहिल्याचे आठवत होते. पण सिनेमा कथानकासह आठवत नव्हता....
आज पाहू, उद्या पाहू करत करत बराच काळ निघून गेला अन मागच्या आठवड्यात जावेद अख्तर यांच्या तोंडून 'सीमा' बद्दल काही फिल्मी किस्से ऐकले आणि जिज्ञासा अधिक चाळवली. परवाच्या रविवारी अगदी आवर्जून 'सीमा' पाहिला.

शुक्रवार, २९ जुलै, २०१६

चिंगारी 'अमरप्रेम'मधली ....



काळोख्या रात्री हेलकावे खात चाललेली नाव. नावेवर प्रत्येक क्षणाला आदळणाऱ्या लाटा आणि त्यांचा सपासप आवाज. नावेच्या पुढच्या टोकाला धूसर दिसणारा नावाडी आहे जो एका संथ लयीत वल्ही मारतोय. नावेवरच्या शाकारलेल्या झोपडीत पाठमोरी बसलेली आहे, ती पुष्पा ! डोईजवळच्या हलत्या कंदीलाच्या फिकट पिवळसर उजेडात ती अगदी दिलखुलास सुरेख दिसतेय, अगदी मन लट्टू व्हावे अशी दिसत्येय ती. आनंदी रंगाची निळ्या झाकेतली साडी तिला खूपच खुलून दिसत्येय. फिकट निळ्या रंगाचे किंचित आवळ पोलके घालून बसलेल्या पुष्पाने हातात गच्च भरलेल्या जर्दनिळ्या बांगड्या, गळ्यात सोन्याचे सर आणि कानात हलणारे गोलाकार झुबे घातलेत ! कपाळावर ठळक मोठा गोलाकार गंध. नाकात सोन्याची लखलखती मोरणी...खरे तर तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्यांनीच माणूस घायाळ व्हावा आणि तिच्या मासोळी डोळ्यात सदा पाझरणारे स्नेहाचे भाव बघून पुन्हा जीवित व्हावा !...

गुरुवार, २८ जुलै, २०१६

वो शाम कुछ अजीब थी ....


'वो शाम कुछ अजीब थी' हे अवीट गोडीचं गाणं होतं गुलजारच्या 'खामोशी'मधलं. पुन्हा पुन्हा पहावा आणि स्वतःशीच पडताळून घ्यावा असा सिनेमा म्हणजे 'खामोशी'. मागे एका प्रसिद्ध क्रिटीक्सने लिहिलं होतं की मरण्याआधी पुन्हा एकदा 'खामोशी' बघेन आणि मग प्राण सोडेन. इतकं काय होतं त्या सिनेमात ? आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती दुसऱ्यावर प्रेम करते हे कळले की कोणतीही संवदेनशील स्त्री उन्मळून पडते. त्यातून सावरण्यासाठी एका समदुखी जीवाला अशाच वेदनेतून बाहेर पडण्यास मदत करते. तिला वाटते की तो आता आपल्यावर प्रेम करू लागलाय. प्रत्यक्षात त्याच्या मानसिक आजारातून बाहेर पडावा यासाठीची ती एक क्रिया होती. हे कळल्यावर तिचं भावविश्व हरवून बसते. तिने बऱ्या केलेल्या प्रेमवेडयाला आता तिच्या बरया होण्याची आस लागून राहते.

शनिवार, १९ सप्टेंबर, २०१५

'द ग्रेट गॅम्बलर'ची दो लफ़्ज़ों की है दिल की कहानी....



सिनेमा, गाणी आणि नाटक यांचे वेड असलेल्या भारतीय माणसाला व्हेनिस या शहराबद्दल विचारले तर तो लगेच दोन उत्तरे देईल एक म्हणजे शेक्सपिअरचे 'मर्चंट ऑफ व्हेनिस' आणि दुसरे आपले आवडते 'दो लफ़्ज़ों की है दिल की कहानी' हे गाणे ! ४० वर्षांपूर्वी द ग्रेट गॅम्बलर (१९७६) हा सिनेमा मी आमच्या सोलापुरातील भागवत चित्रमंदिरमध्ये पाहिला होता. तेंव्हा यल्ला दासी नावाचे एक जबरदस्त चित्रकारद्वय सोलापुरात होते, ते कोणत्याही सिनेमाचे असे काही पोस्टर्स बनवायचे की नुसते पाहत राहावे असे वाटायचे. मला आठवते की माझे सिनेमा पाहणे कमी होते पण केवळ त्या पोस्टर्सपायी चित्रपट गृहाबाहेर रेंगाळणे जास्त असायचे. आजच्या सारखी रेडीमेड डिजिटल पोस्टर्स तेंव्हा नव्हती पण त्या पोस्टरमध्ये जो जिवंतपणा आणि रसरशीतपणा होता ती बात या छापील पोस्टर्समध्ये नाही. या द ग्रेट गॅम्बलरचे त्यांनी बनवलेले 'दो लफ्जोंकी...' चे पोस्टर आजही डोळ्यापुढे येते. खरे तर महानायक अमिताभचा 'द ग्रेट गॅम्बलर' हा सिनेमा एक तद्दन गल्लाभरू चित्रपट होता. पण शोलेपासून या माणसाने बॉक्स ऑफिसचा एकहाती कचरा केला होता त्याला तोड नाही.त्यामुळे हा सिनेमाही यशस्वी झाला.