सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

महाकवी सावरकर


१३ जुलै १६६० च्या रात्री सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटून जाण्यासाठी शिवाजीराजे बाजीप्रभू, बाजींचे बंधू फुलाजीप्रभू आणि सहाशे मावळयांच्या साथीने बाहेर पडले. वीर शिवा काशिद यांनी दिलेले बलिदान बाजींनी आपल्या प्राणाची बाजी लावून व्यर्थ जाऊ दिले नाही. आपल्या रक्ताने बाजींनी घोडखिंड पावन केली आणि आपल्या राजाला या संकटातून बाहेर काढताना स्वतःचे प्राण त्यागीले. त्या अभूतपूर्व रणसंग्रामाला, बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्य रक्षणासाठी पावनखिंडीत देह ठेवला त्याला ३७० वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या ऐतिहासिक घटनेवर लिहिलेला पोवाडा १९१०च्या दशकात स्वराज्याच्या चळवळीला खूप स्फुर्तीदायी ठरला होता. आजही हा पोवाडा नुसता वाचला तरी मनगटे आवळतात, मुठी वळतात, धमन्यातले रक्त सळसळून उठते, छाती फुलून येते. स्फुल्लिंग पेटून उठतात.

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

शब्दसूर्य - नारायण सुर्वे !



‘ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती.’ फुटपाथवरच्या खुल्या आकाशाखाली जगाच्या खुल्या विद्यापीठात शिकलेल्या नारायण सुर्वेंनी झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. मागे वळून पाहताना त्याच आयुष्यावर, 'एकटाच आलो नाही, युगाची ही साथ आहे' असं रसरशीत भाष्यही केले.
नदी आणि ऋषी यांचे कुळ आणि मूळ शोधू नये असे म्हटले जाते. नारायण सुर्वे हे लाक्षणिक अर्थाने आणि आशयघन निर्मितीच्या दृष्टीने मराठी साहित्यातले कबीर होते असं म्हणणे संयुक्तिक ठरेल. कारण १९२६-२७ मध्ये मुंबईतील चिंचपोकळीमध्ये एका कापडगिरणीसमोर गंगाराम गुरुजी सुर्वे या गिरणी कामगाराने रस्त्यावरील एक अनाथ जीवास उचलून घरात आणले. त्यांची पत्नी काशीबाई सुर्वे यांनी या अश्राप जीवाला पोटच्या मुलासारखे प्रेम दिले.

सुर्वे दांपत्याने या जीवाला नुसते प्रेमच नव्हे तर आपले नावही त्याला दिले. तोच हा नारायण ! नारायण गंगाराम सुर्वे ! मराठी साहित्यात आपले स्वतंत्र स्थान संघर्षमय वाटचालीतून निर्माण करणारे आणि आशयाच्या नव्या वाटा चोखाळणारे सुर्वे मास्तर !! अक्षरवाटेवरील पांथस्थासाठी अंधाऱ्या भवतालात आपल्या आयुष्याचा दिवा करून उभे राहिलेल्या सुर्व्यांच्या आयुष्याची सुरुवातच नाट्यमय आणि संघर्षमय अशी होती. ‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. ‘सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे’ या निर्भीड वृत्तीने तब्बल सहा दशके सुर्व्यांनी मराठी सारस्वताच्या दरबारात शब्दरूपी तळपती तलवार परजत ठेवली.

मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

जयललितांचे आयुष्य - सापशिडीचा पट !



"जयांच्या आयुष्यात सातत्याने उतार चढाव येत गेले. पण त्या फिरून फिरून नशिबाची व कर्तुत्वाची साथ लाभून वर येत राहिल्या. त्यांचे आयुष्य म्हणजे जणू काही सापशिडीचा पट ! सापशिडीत देखील सुटकेच्या ९९ क्रमाकाच्या शेवटच्या घरापाशी साप असतो तसे त्या त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च स्थानी पोहोचल्या असताना मृत्यूकडून त्यांना कायमची मात खावी लागली. पण त्यातही त्यांनी ७३ दिवस झुंजार बाण्याने लढा दिला मग हार पत्करली. सावज आलं आणि सहजपणे सापाने गिळलं असं त्यांच्या आयुष्यात कुठंच घडलं नाही. खडतर बालपण, यशस्वी रुपेरी कारकीर्द, राजकारणातले शह काटशह, मुख्यमंत्री ते कैदी नंबर ७४०२ आणि पुन्हा मुख्यमंत्री असा रंजक राजकीय प्रवास अशा अनेक घटनांनी हा सापशिडीचा आयुष्यपट रंगलेला आहे......" 

शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

रेड लाईट डायरीज - शिल्लक



गिलटाचे वाळे, चांदीचे पाणी दिलेलं काळपट पैंजण
आणि बेन्टेक्सचे खोटे दागिने.
छिद्रे पडलेल्या, झिरून गेलेल्या, फॉल निसटलेल्या
पदरावरची नक्षी उडालेल्या दोन साड्या.
डागांचे ओघळ दाटून घट्ट झालेले, रंग विटून गेलेले
नाडी तुटायच्या बेतात आलेले परकर.
समोरील बाजूची काही बटनं तुटलेले, काजी फाटून गेलेले,
वीण उसवलेले दोन ब्लाऊज.
एका कॅरीबॅगमधली कधी न घातलेली नवी कोरी पण
ठेवून ठेवून घडीवर झिरून गेलेली अनवट साडी.
गंधाचे जुने डाग असलेला, टवके उडालेला,
पिवळट पडलेला यल्लम्माचा फोटो.
कुठली तरी जुन्या जमान्यातली
बहुधा कुण्या मायलेकींची फिक्कट झालेली धुरकट तसबीर.
हातात बांधायचे काही लाल काळे दोरे, एक अंगारयाची पुडी.
स्पंज निघालेली बेरंग झालेली राखी.
ब्लाउजपीसच्या पुरचुंडीत बांधून ठेवलेल्या कचकडयाच्या हिरव्या बांगडया,
मणीमंगळसूत्र आणि न वापरलेली घडीव जोडवी.
काचेला तडा असलेली एक रिकामी फोटो फ्रेम,
बोरमाळीच्या सरीला असणारया लेसचे घट्ट झालेले लाल गोंडे.
कुठल्या तरी देवाची चेमटून गेलेली पितळेची मूर्ती.
वरचे अस्तर खरवडून गेलेली,
पैसे ठेवण्याची जुन्या पद्धतीची एक रिकामी छोटीशी पर्स.
फाटलेल्या जुन्या नोटांचे दुमडून गेलेले घड्या पडलेले तुकडे, काही जुनी नाणी.
मखमली कापडांचे काही वेडेवाकडे कापलेले तुकडे.
इतकं सारं सामावून घेणारी कडी कोयंडा मोडलेली, गंजून गेलेली, फुलांचे चित्र धुरकट झालेली पत्र्याची संदूक.
देशी दारूच्या गुत्त्यातलं देणं, चहा कँटीनची किरकोळ उसनवारी.
करपून गेलेल्या इच्छा, चक्काचूर झालेली स्वप्ने,
मरून गेलेल्या वासना, घुसमटुन गेलेलं मन,
खंगलेलं कलेवर.

बुधवारातली शांताबाई
वार्धक्याने पहिल्या पावसाच्या दमट हवेत
तडफडून मरून पडली तेंव्हा तिची शिल्लक इतकीच होती...

- समीर गायकवाड.

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

'ब्लॉग माझा' - एक धक्का सुखाचा ...



ब्लॉग'माझा' नव्हे ब्लॉग 'तुम्हा सर्वांचा' - गोष्टीवेल्हाळाची बाराखडी...

तुम्हा सर्वांना सांगायला आनंद होतो की, 'एबीपीमाझा' या वृत्तवाहिनीतर्फे मराठीतील सर्वोत्कृष्ट वाचनीय ब्लॉग निवडीसाठी घेतलेल्या 'ब्लॉगमाझा' ह्या स्पर्धेसाठी माझ्या ब्लॉगची निवड प्रथम क्रमांकासाठी करण्यात आलेली आहे.

पोळा- मुक्या जीवाचे ऋण...

पोळ्याचं आवतण बैलाना कालच दिलंय. कालच खांदमळणी अगदी दमात झालीय. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर लावलीय आणि हळद तेल-तुपाने त्यांचे दमलेले खांदे मस्त पैकी मळून झालेत. सगळ्यांची शिंगे साळून झाली आहेत. त्याला आता केशरी लाल हुंगुळ लावला की शिंगे चमकदार दिसतील अन बैल उठून दिसतील..आंबाडीचे सुत काढून तयार केलेली नवी वेसण दुरडीत तयार आहे. नवा कोरा पांढरा शुभ्र कासरा लावून लाल लोकरीचे गोंडे, नविन घुंगर माळा, कवड्यांचे हार, नविन रंगीबेरेंगी चित्रांच्या झुली दुपारी यांच्या अंगावर चढतील. पैंजण, पट्टे,झेंडूचे हार अशी सामग्री तयार आहे.

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

गावाकडची रम्य सकाळ ....


वर्षभरातला कोणताही ऋतू असला तरी गावाकडच्या दिनमानात फारसे बदल होत नसतात. त्यातही सकाळचे दृश्य कधी बदलत नाही. राज्यातील कोणत्याही खेड्यात कोणत्याही ऋतूमानात गेलं तरी एक सुखद प्रभातचित्र सृष्टीने साकारलेले असते. हे प्रभातचित्र ज्याला बघायला मिळते तो व्यक्ती नशीबवानच. आणि ज्या लोकांना हे सुख प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ते खरे भाग्यवंत होत. गावाकडची सकाळ खरं तर नेमक्या शब्दात चितारणे अशक्य आहे कारण तिला अनेक पैलू आहेत, अनेक रंगढंग आहेत. नानाविध पदर आहेत. मातीवर जीव असणाऱ्या प्रत्येक सृजनास वाटते की आपण आपल्या परीने हे चित्र रंगवावे, ते पूर्णत्वास जात नाही याची माहिती असूनही हा प्रयत्न अनेकांनी केला आहे. 


शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

बिनकामाचे शहाणे...



पेशवाईत साडेतीन शहाणे होते. त्यातला एक 'पूर्ण शहाणा' माणूस इतका पाताळयंत्री आणि छद्मी होता की कुणी त्याला मारूही शकले नाही अन टाळूही शकले नाही. काही माणसं असून अडचण नसून खोळंबा असतात. तर काहींची नुसती अडचण असते असे नव्हे तर त्यांचा प्रचंड उपद्व्यापही असूनही त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येत नाही. पेशवाईत असाच एक मुत्सद्दी होऊन गेला, सखाराम बापू बोकील त्यांचं नाव. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांपासून ते माधवराव अन अखेरीस नारायणराव पेशवे या सर्वांच्या काळात खऱ्या अर्थाने खलपुरुष जर कोण असतील तर ते सखाराम बापू होत. रामायणात जी भूमिका मंथरेने निभावली तशा आशयाची भूमिका सखारामबापूंनी पेशवाईत बजावली.
एक उचापतखोर, कुरापतखोर, कपट कारस्थानी आणि भ्रष्ट माणूस अशी त्यांची इतिहासात प्रतिमा आहेच पण या जोडीला असणारी पराकोटीची छद्म बुद्धी, कुशाग्र कूटनीती आणि तल्लख बुद्धिमत्ता ही त्यांची गुणवैशिष्टये होती. त्यांचे पूर्ण नांव सखाराम भगवंत बोकील. हे हिंवर्‍याचा कुलकर्णी होते. त्यांचे पूर्वज पणतोजी गोपीनाथ कुलकर्णी यांना १६५९ मध्ये शिवरायांकडून हिंवरें गांव इनाम मिळालेले होते.

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

सच्च्या प्रेमाची अदुभूत गाथा - अमृता - इमरोजची लव्ह स्टोरी !



शारीरिक ओढीच्या पलीकडचे प्रेम कसे असते ? जाणून घ्यायचंय ?
मग अवश्य वाचा सच्च्या प्रेमाची मधुर गाथा ....
ती एक हळव्या मनाची किशोरी ; वयाच्या १६ व्या वर्षी असंवेदनशील, व्यसनी आणि थोराड पुरुषाबरोबर तिचं लग्न झालं तर ?
ती त्याच्याशी विवाह करते, मात्र त्याला पूर्णतः स्वीकारत नाही, ती त्याला तन देऊ शकते पण मन देऊ शकत नाही.
एकमेकाचे विचार भिन्न असूनही एकत्र राहणे योग्य की अयोग्य ?
मग 'तिला'च याची जाणीव होते अन ती स्वतःची सारी कुचंबणा त्याच्या गळी उतरवते. पुढे ते विभक्त होतात, पण तोवर तिच्या पोटी त्याचं बीज वाढतं.
या दरम्यान तिच्या आयुष्यात तिच्या सारखाच हळव्या मनाचा,प्रतिभाशाली, संवेदनशील व उमदा कवीमनाचा पुरुष येतो.
ती त्याच्यात पूर्ण गुंतून जाते आणि एके दिवशी आपल्या कवितेच्या इप्सिताच्या शोधात तो तिला अर्ध्यात निरोप देऊन आपलं राहतं शहर सोडून मुंबईला निघून जातो.

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

रंग 'हरवलेली' रंगपंचमी ...

'बालपण देगा देवा’ असं सर्वचजण म्हणत असतात पण बालपण काही केल्या परत मिळत नसतेमात्र आयुष्यात काही क्षण असे येतात की आपल्याला बालपणाचा आनंद पुन्हा लुटता येतोहे क्षण आपल्याला पुन्हा त्या वयातील आठवणींचा पुनर्प्रत्यय देतातत्या आनंदाची तशीच पुनरावृत्ती होतेआपणही त्या क्षणांत हरखून जातोप्रत्येकाच्या जीवनात काही प्रसंगकाही घटना आणि काही आठवणी अशा असतात की मनाच्या गाभाऱ्यात त्या चिरंतन टिकून असतातत्यातही शैशवाच्या गोड स्मृतींना उजाळा देण्याचं काम हे क्षण करत राहतातअशा चैतन्यदायी क्षणांची अख्खी शृंखला आपल्यासमोर साकारण्याचे काम रंगपंचमी करायची.

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

सवाल...



एका प्रश्नाचे उत्तर शोधित निघालो होतो तेंव्हाची ही कथा.....
उत्तराच्या शोधात हातोडयाने राजकारणी लोकांच्या डोक्यात खिळे ठोकले तेंव्हा सर्वांचेच रक्त लाल निघाले,
भगवे, हिरवे वा निळे अन्य कुठल्या रंगाचे रक्त कुठेच दिसले नाही.
देशाच्या नकाशात कुठे भाषा, प्रांत, जात, धर्माची कुंपणे दिसतात का बघावीत म्हणून दुर्बीण घेऊन बसलो,
पण कोण्या राज्यांच्या सीमांवर कसलीही कुंपणे दिसली नाहीत.
सर्व महापुरुषांची पुस्तके वाचून काढली, त्यांचे विचार अभ्यासले, त्यांना अनुभवले,
पण एकानेही एकमेकाविरुद्ध लिहिल्याचे कुठे वाचनात आले नाही.
वरपासून खालपर्यंत वाहणारया नदयांचे काही बोडके तर काही समृद्ध खोऱ्यांचे का धुंडाळले,
नदयांचा प्रवाह कुठे भेद करत नव्हता, मार्ग मिळेल तिकडे आरामात वळत होता.

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

कवितेचे बंड - ज्योती लांजेवार


‘घर काळोखात उभे
आत तान्हुला रडतो
देह सजवी माऊली
पान्हा चोळीत गळतो’
स्त्रियांचे नेहमीच शोषण होत गेले पण स्त्रियांनी त्यामुळे आपला स्त्रीत्वाचा धर्म कधीही सोडला नाही. स्त्रियांनी आपल्या अंगभूत कर्तव्यांशी कधी बेईमानी केली नाही, प्रसंगी शील विकले पण आपल्या कर्तव्यांना त्या सन्मुख राहिल्या. मनाला स्पर्श करणाऱ्या मोजक्याच पण हळव्या शब्दात स्त्रीत्वाचे दुःख आणि स्त्रीची कर्तव्य सापेक्षता या कवितेत समोर येते. कवयित्री प्रा. डॉं.ज्योती लांजेवार यांची ही कविता.

"स्त्रियांना संरक्षण तीस टक्के आरक्षण
एक क्रांतिकारी पाऊल आहे-
भ्रष्टाचाराच्या जंगलात चोरांची चाहूल आहे. .... "
आपलं म्हणणं मांडताना ते थेट लक्ष्यावर घाव घालणारे मर्मभेदी असलं पाहिजे याची पुरेपूर जाणीव कवयित्री लांजेवार यांना आहे. दलितांच्या आरक्षणाबद्दल आणि हक्काबद्दल तर अगदी आक्रमक व अभ्यासू पद्धतीने त्या आपले म्हणणे मांडतातच. खेरीज महिलांच्या हक्काबद्दलही त्या सजग आहेत. स्त्रीत्वाचा हुंकार त्या गर्जनेच्या स्वरुपात देतात, त्यात उपेक्षित भिक्षुकीच्या छटा न येऊ देता आपला मुलभूत हक्काचा रेटा उतरवतात. स्त्रियांच्या आरक्षणाची जी काही टक्केवारी आहे त्यावर भाष्य करताना या तरतुदीतून निर्माण झालेल्या समस्येवर त्या अचूक बोट ठेवतात. स्त्रियांच्या आरक्षणाची ही योजना निश्चितच क्रांतिकारी आहे हे मान्य करून त्यातली उणीव पुढच्याच पंक्तीत अधोरेखित करतात. कारण या स्त्री आरक्षणाच्या आडून पुरुषच पत्ते पिसतात आणि त्यातून सोयीस्कर लोकांची वर्णी हव्या त्या जागी लावून भ्रष्टाचाराची नवी कुरणे निर्माण करतात.

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

विद्रोही 'फिर्याद' - हिरा बनसोडे



सखी, आज प्रथमच तु माझ्याकडे जेवायला आलीस,
नुसतीच आली नाहीस तर तुझी जात विसरून आलीस.
सहसा बायका परंपरेची विषमता विसरत नाहीत
परंतु तु आभाळाचे मन घेऊन आलीस,
माझ्या वीतभर झोपडीत,
वाटले, जातीयतेचा तु कंठच छेदला आहेस,
माणसाला दुभंगणाऱ्या दऱ्या तु जोडत आली आहेस.
खरेच सखे, फार फार आनंदले मी,
शबरीच्या भोळ्या भक्तीनेच मी तुझे ताट सजविलं,
किती धन्य वाटलं मला !
पण ....पण ताट पाहताच तुझा चेहरा वेडावाकडा झाला,
कुत्सित हसून तु म्हणालीस,
" इश्श ! चटण्या, कोशिंबिरी अशा वाढतात का ?
अजून पान वाढायला तुला येत नाही
खरच, तुमची जात कधीच का सुधारणार नाही ?"
माझा जीव शरमून गेला ....
मघाशी आभाळाला टेकलेले माझे हात
खटकन कुणीतरी छाटल्यासारखे वाटले,
मी गप्प झाले ...
जेवण संपता संपता तु मला पुन्हा विचारलेस,
" हे गं काय ? मागच्या भातावर दही, ताक काहीच कसं नाही ?
बाई गं, त्याशिवाय आमचं नाही हो चालत.......?"
माझं उरलंसुरलं अवसानही गळालं
तुटलेल्या उल्केसारख,
मन खिन्न झालं,सुन्न झालं पण ....
पण दुसऱ्याच क्षणी मन पुन्हा उसळून आलं
पाण्यात दगड मारल्यावर जसा तळाचा गाळ वर येतो,
तसं सारं पुर्वायुष्य हिंदकळून समोर आलं,
" सखे, दही- ताकाच विचारतेस मला ! कसं सांगू गं तुला ?
अगं लहानपणी आम्हाला चहाला सुद्धा दुध मिळत नव्हतं,
तिथं कुठलं दही अन कुठलं ताक ?
लाकडाच्या वखारीतून आणलेल्या टोपलीभर भुश्श्यावर
माझी आई डोळ्यातला धूर सारीत स्वैपाक करायची
मक्याच्या भाकरीवर लसणाची चटणी असायची कधीमधी,
नाहीतर भाकरी कालवणाच्या पाण्यात चुरून खायचो आम्ही,
सखी, श्रीखंड हा शब्द आमच्या डिक्शनरीत नव्हता तेंव्हा,
लोणकढी तुपाचा सुगंध घेतला नव्हता कधी माझ्या नाकाने,
हलवा, बासुंदी चाखली नव्हती कधी या जिभेने,
सखी, तुझी परंपरा तु सोडली नाहीस,
तर तिची पाळेमुळे तुझ्या मनात रुजलेली आहेत
हेच त्रिवार सत्य आहे ....
मैत्रिणी, मागच्या भातावर दही नाही
म्हणून रागावू नको गं .....!
तुला वाढलेल्या ताटात आज पदार्थांचा क्रम चुकला
यात माझा काय दोष, हे मला सांगशील का ?
माझा काय दोष मला सांगशील का ?'
कवयित्री हिरा बनसोडे यांची 'फिर्याद' या काव्यसंग्रहातली ही कविता.

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

ग्लॅमरचा भयाण अंत - परवीन बाबी .....

paraveen babi


१९ जानेवारी २००५. मध्यरात्र उलटून गेलीय. रात्रीचे दोन वाजलेले. जुहू परिसरातल्या इमारतीतले दिवे मालवलेले होते, रस्त्याला किंचित पेंग येत होती. तिथल्याच पाम बीचवरील रिव्हीएरा ह्या बहुमजली

इमारतीतील चौथ्या मजल्यावरील पश्चिमेकडील फ्लॅटमध्ये मात्र लाईट्स चालू होत्या. या फ्लॅटमधील लाईटस मागील पंधराएक वर्षात रात्री क्वचितच बंद व्हायच्या...फ्लॅटच्या दर्शनी हॉलमध्येच 'तिने' आपला बिस्तरा लावला होता. तिच्या समोरच्या भिंतीवर दोन मोठे पोट्रेट होते. उजव्या दिशेला कोपरयातील मेजावर एक कोरा कॅनव्हास होता. या भिंतीलगत आतल्या खोलीत जाण्याची एक चौकट होती, तिच्या डाव्या हाताला एक छोटीशी बेडरूम होती.

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

दोन पावले मागे सरलेला 'वाघ' ...


आज उद्धव ठाकरेंनी केलेले काम संजय राऊत यांनी सामनामधून वेळीच केले असते तर आज ही वेळ शिवसेना पक्षप्रमुखांवर आली नसती..
संजय राऊत यांनी वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीची प्रसिध्द केलेली बातमी मराठा समाजाला त्या व्यंगचित्रापेक्षाही क्लेशदायक वाटल्याचे अनेक जणांच्या विचारांतून जाणवले.
सामना / संजय राऊत यांनी माफी मागून जे काम सहज शक्य होते ते त्यांनी केले नाही.

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

'अनसोशल' मीडियावरवरचा 'भगवा' मुळचा आहे तरी कसा ?



मागील काही दिवसांपासून कोण कुठल्या जातीचा आहे किंवा कोण आपला आहे वा परका आहे यावरून सोशल मिडियावर मोठे रणकंदन पहावयास मिळते आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा सोशल मिडिया वापरण्याचा उद्योग शिक्षित लोक व ज्यांच्याकडे वारेमाप इंटरनेट वापरण्या इतका पैसा खिशात खुळखुळतो तेच मोठ्या प्रमाणात दिवसभर अगदी रोजंदारीने कामावर असल्यागत नित्यनेमाने करत असतात. ज्याला दोन वेळची खाण्याची भ्रांत असते, ज्याला अन्न वस्त्र निवारा यांची ददात असते त्याच्या गावी या भानगडी नसतात. ज्यांचे आर्थिक उत्पन्न अगदी तुटपुंजे आहे आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा मोबाईल असूनही इंटरनेट नाही असे लोकही या भानगडीत पडत नाहीत.

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

गावाकडचे दिवस ....भावार्थ रामायण .



गावात भावार्थ रामायणाचे पारायण सुरु असले की अजूनही काही दृश्ये हमखास जशीच्या तशी नजरेस पडतातच. गावातले वातावरण या काळात संपूर्णतः भारलेले असे असते. रोज संध्याकाळी शेतातली कामे करून थकून भागून आल्यानंतर वेशीतल्या मारुतीरायाच्या देवळात रामायण ऐकायला जाणे हे एक स्वर्गस्थ सुखच असे. बत्तीच्या उजेडात थोड्याशा उशीरपर्यंत चालणारया या श्रवण सोहळ्याचे अनेक क्षण मनावर कोरलेले अगदी जसेच्या तसे आहेत.
पारायणात रामाचा जन्म झाल्यावर आया बायांना आपल्याच घरात पाळणा हलल्यागत वाटायचे. राम लक्ष्मण जसजसे मोठे होत जायचे तसतसे याना स्फुरण चढायचे.

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

मला उमगलेला 'मराठयांचा मूकमोर्चा'....


शिवरायांना बाह्य शत्रूंनी जितका त्रास दिला तितकाच त्रास अंतर्गत शत्रूंनी दिला. भाऊबंदकीच्या शापाने शिवरायांनाही त्रास झाला आणि संभाजीराजांना त्याची अधिक झळ पोहोचली. इतिहासावर चिंतन करताना हा मुद्दा अनेक वेळा माझ्यासारख्या अनेक शिवप्रेमींचा मानसिक छळ करतो. शिवछत्रपतींनी अनेक वेळा आपल्या नातलगांना, आप्तेष्टांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. भाऊबंदकी मिटावी म्हणून प्रयत्न केला, पण वैरभाव संपला नाही. सर्वच शिवप्रेमींना या गोष्टीची खंत वाटते की आपला समाज राजांच्या हाकेस ओ देऊन एकीने का सामोरा गेला नाही. आज हे परिवर्तन घडत्येय. निमित्त कोपर्डीच्या चिमुरडीवरील अत्याचाराचे झाले आहे. त्यातून लाखोंच्या मनात खदखदणारा असंतोष म्हणा वा माझ्यासारख्या सामान्य माणसासारख्यांची ही जुनी नासूर होऊन छळणारी खंत बाहेर पडते आहे. जे काम शिवरायांच्या काळात होऊ शकले नाही ते आज होतेय असे होत असताना निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन बसणे योग्य वाटत नाही. कारण एकीकडे खंत व्यक्त करायची की मराठे कधीच एकत्र येत नाहीत, मराठे एकमेकाला सदैव पाण्यात बघतात, मराठे म्हणजे एकमेकाच्या अंगावर चढणारे खेकडे आहेत म्हणून हिणवायचे आणि प्रत्यक्ष अशी एकत्रित होण्याची पहिलीच ऐतिहासिक वेळ आल्यानंतर त्यातील दोष शोधत बसणे हा दुटप्पीपणा ठरतो.

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

अखिल बिरादरीचा बापवृक्ष .....



माती आणि आई ही प्रेमाची सर्वोच्च रूपे आहेत. प्रत्येक जण प्रेम व्यक्त करताना यांचा दाखला देतोच. ममता, माया, स्नेह आणि आपुलकीने ओथंबलेलं नातं दर्शवताना आई किंवा मातीचं रूपक वापरलं जातंच. जो तो आपल्या परीने हे ममत्व जोपासतो. आपण आपल्या आईवर किती प्रेम करतो किंवा आपली काळी आई आपल्यासाठी किती प्राणप्रिय आहे हा सर्वांचा जिव्हाळयाचा विषय असतो. आईवरचं प्रेम कुणीही व्यक्त करू शकतो, अगदी वन्य वा पाळीव प्राण्यातही पिलांचा आपल्या मातेप्रती स्नेहभाव असतो. ज्या प्रमाणे गाय आपल्या वासराला चाटते त्याच मायेने वाघीण देखील आपल्या बछडयाला तितक्याच मायेने चाटत असते. हे सर्व आपले प्रेम व्यक्त करू शकतात कारण ते सचेतन सजीव आहेत. चालू बोलू शकतात. मात्र मातीवर प्रेम व्यक्त करणाऱ्या जीवात अचल सजीवही असतात ! फक्त माणूसच ह्या काळ्या आईवर प्रेम करतोय असं काही नाही. माणूस बोलून दाखवतो पण वृक्षवल्ली आपलं प्रेम कसं व्यक्त करत असतील याचं नेमकं उत्तर देता येणार नाही. म्हणूनच मातीवर प्रेम करणाऱ्यांचा धांडोळा घ्यायचा झाला तर केवळ माणसांचाच विचार करून चालणार नाही. मातीवरील अस्सल प्रेमाचे जगातील सर्वात श्रेष्ठ प्रतिक काय असेल तर तो वटवृक्ष ! एका अंकुराच्या रूपाने उगवलेलं इवलंसं रोप मातीत खोल रुजत जातं आणि त्याची देहयष्टी फुलत जाते. बघता बघता त्याचा बुंधा भरत जातो अन त्याच्या फांदया वाऱ्याला कवेत घेऊ पाहतात. कधी काळी हातांच्या मिठीत मावणारे त्याचे खोड काही वर्षात भले मोठे होऊन जाते. चार जणांनी फेर धरला तरी त्याचा बुंधा हातात मावत नाही इतका प्रचंड पसारा वाढतो.

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

शुक्रतारा - मंगेश पाडगावकर


'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून
आठवते बालपण जेव्हां होतो मी खेळत
होतो बांधीत मी घर सवंगड्यांच्या संगत
कौले पानांची घराला आणि झावळ्यांच्या भिंती
आठवते अजूनहि होतो रंगत मी किती !
पण अकस्मात होतो जात सारे उधळून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून.........

घर असूनहि आता घर उरलेले नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणीं सांगावे ? असेल पूर्वज्मींच्या हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप …
कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून …
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून...'

सर्वांच्या मनामनात एक अवखळ, निष्पाप निरागस असं शैशव दडून बसलेलं असतं, प्रत्येकाला अखेरपर्यंत ते जाणवतं मात्र ते कधी व्यक्त करता येत नाही. जनमानसाच्या मनातील भावनांच्या प्रकटीकरणाचं हे काम कवी मंडळी करतात. सर्वच कवींना हे जमतं असं नाही. काही कवी ते वैयक्तिक अनुभव म्हणून मांडतात मग तो त्यांच्यापुरता मर्यादित होऊन जातो. मात्र अद्वितीय प्रतिभा लाभलेला एखादा कवी अगदी सहजतेने, उत्कटतेने अशा काही शैलीत हा अक्षरगंध रेखाटतो की त्या भावना वैयक्तिक कवीपुरत्या सीमित न राहता सर्वंकष स्वरूप धारण करतात. ते काव्य वाचताच रसिक उद्गारतात की नेमके माझ्या मनातले भावच कवींनी मांडले आहेत. ही किमया करतानाच जर त्या कवींनी बालकवितांपासून प्रेमकविता, गूढकविता, निसर्गकविता, सामाजिक आशयाच्या कविता, बडबडगीते, विरहगीते, चित्रपटगीते, भावगीते अशा सर्व प्रकारचे विपुल काव्यलेखनातून एक अलौकिक श्रेष्ठ दर्जाची साहित्यनिर्मिती केली असेल तर त्या कवीला कविश्रेष्ठच म्हटले पाहिजे. कवी मंगेश पाडगावकर यांचे नाव यामुळेच मराठी साहित्यात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहे.

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

चित्रकवी - वसंत आबाजी डहाके ....



आता डोक्यात चंद्र घेऊन उभं राहायचं विठ्ठलासारखं,
कमरेवर हात ठेवून.
नाही तर विष्णूसारखं पडून
राहायचं पाण्यावर तरंगत.
चांदणं पाझरत राहील आत आत
सगळ्या नळ्यांमधून सावकाश.
आपलं शरीर इथं सापडतं
संतांना विठ्ठल सापडल्यासारखं.

‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटल'मधून वावरताना कवी वसंत आबाजी डहाके यांना सुचेलेली ही कविता 'चित्रलपी' या काव्यसंग्रहातील आहे. या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता...

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

नावाची 'जन्म'कथा.....



घटना फार जुनी नाही. माझ्या एका मित्राला मुलगी झाली अन त्याने विचारले की माझ्या चिमुकल्या डिअर डॉटरसाठी काही नाव सुचवशील का ?
मी काहीच बोललो नाही मात्र थोडा विचारात पडलो. थोडा मागे भूतकाळात गेलो ….
खरे तर आजकालची नावे काहीशी क्लिष्ट, अगम्य, दुर्बोध तर असतातच पण त्यातलं मराठीपण हरवत चालले आहे. शिवाय भावंडांना हाक मारण्यासाठी दादा, ताई, अक्का, जिजी, माई, भाऊ अशी संबोधनेही वेगाने लोप पावताना दिसताहेत. आईबाबांच्या ऐवजी मॉम डयाडची ब्याद कमी होती की काय म्हणून ड्यूड, ब्रो, सिस, बेबी याचं फॅड सगळीकडे वाढलंय ! या आंग्लाळलेल्या संबोधनात भर घालण्याचे काम प्रेमीयुगुलंही नेटाने करताहेत. वानगीदाखल बोलायचे झाले तर काही मुली दिवसभरातून (चार वेगवेगळ्या) मित्रांना माझं पिलू, माझं कोकरू असल्या नावाने आळवत असतात. तर मुलंही मागे नसतात तेही अनेकींना एकाच वेळी सनम, जानम, जानू, पाखरू अशा नावांनी आळवत असतात. सखी आणि मित्रही हरवले आहेत. तिथे रुक्ष फ्रेंड आलेय.

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

पुरुषी वासना आणि सखाराम बाईंडर......


पुरुषी विकार-वासना ह्या कधी प्रकट तर कधी अप्रकट स्वरुपात असतात. ह्या वासना कधीकधी पुरुषाचा कब्जा घेतात अन त्याच्या जीवनात रोज नवे नाट्य घडू लागते.
इतर लोकांना कधी बलात्कार वा अन्य अनैतिक बाबीतून हे नाट्य जाणवत राहतं. एखाद्या पुरुषाच्या मनात किती व कोणते वासना विकृती विकार असू शकतात किंवा तो वासनांचे शमन राजरोसपणे बायका ठेवून कसे करतो या बाबी समाजाच्या दृष्टीने नेहमीच औत्सुक्य विषय झाल्या आहेत !
मराठी रंगभूमीवर या अंतहीन पुरुषी वासनांचा वेध एका नाटकाने घेतला होता ते नाटक म्हणजे 'सखाराम बाईंडर'....त्याच्या अनुषंगाने या विकाराचा एक छोटासा धांडोळा...  

मराठी रंगभूमीने कात टाकली होती तेंव्हाच्या एका नाटकाची ही गोष्ट आहे. 
सत्तरचे दशक होते.
‘सखाराम बाईंडर’मधील सखारामचे काम निळू फुले करायचे.
यातील सखारामची एण्ट्री अंगावर काटा आणणारी अशी असायची.
सत्तरीच्या दशकात निळू फुुलेंनी त्यांच्या मुरब्बीपणाने व  इरसाल आवाजात केलेली ती संवादफेक अन त्यात घेतेलेले पॉझेस अगदी प्रेक्षकाचा कलेजा खलास करणारे होते. “हा राजाचा महाल नाही हे सखाराम बाईंडरचे घर आहे” अशी सुरुवात होऊन हा सखाराम प्रेक्षकाच्या डोळ्यातून मेंदूत उतरायचा. 
नाटक पुढं सरकत रहायचं. सखाराम आणि त्याच्या एकापाठोपाठ त्याच्या आठ बायका रंगमंचाचा नव्हे तर नाट्यगृहातील प्रेक्षकांचा ताबा घेत. त्याच्या घरात या सगळ्या बायका राहून मागे पुढे होत निघून जातात अन एक गेली की दुसरी असं चालत राही. लक्ष्मी ही त्याची सातवी आणि चंपा ही आठवी बायको !
ज्या ज्या वेळी घरात सखारामच्या घरात नवीन स्त्री येते किंवा आणली जाते तेव्हा तो तिला या घरात राहताना काय आहे, काय नाही, याची स्वच्छ शब्दांत कल्पना देतो.

सखाराम तिला सांगतो म्हणण्यापेक्षा सुनावतोच - "तोंड शिवराळ आहे. परिस्थिती जेमतेम, पण दोन वेळा खायला नक्की मिळेल. दोन पातळं सुरुवातीला, मग वर्षाला एक. ते पण भारी नाही. मग तक्रार चालणार नाही. घरात सगळं शिस्तशीर आणि बिनचूक करावं लागेल. गलथानपणा घडायला लागला की बाहेरची वाट. गय होणार नाही. नंतर दोष देता कामा नये. आपल्या घरात आपण राजे असतो. गावात जोड्याशी उभे न का करीनात, घर कसं घरासारखं हवं आपल्याला. काय?..."
नाटक पाहताना अडीच तास प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन राहायचा. नाटकाला तुफान व्यावसायिक यश मिळाले अन तितकीच वादग्रस्त लोकप्रियता देखील मिळाली. हे यश फक्त त्यातल्या निव्वळ भाषेमुळे, अभिनयामुळे नव्हते तर सखारामचे पुरुषीपण आणि त्याला शांतपणे आव्हान देणाऱ्या लक्ष्मीच्या बाईपणाची शरीर-भाषा यांचे होते. हे द्वंद्व नाटकाला अविस्मरणीय करून गेलं. वासना समजून घेण्यासाठी ही शरीर-भाषा सजगतेने पाहावी आणि ऐकावी लागते.

सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक श्रेष्ठ नाटक. सखाराम बाईंडरमध्ये हाताळलेला स्फोटक विषय रसिकांपर्यंत पोहचविण्यास दिग्दर्शकाला कंबर कसूनच काम करावे लागते. निळू फुले, लालन सारंग या कलाकारांनी या नाटकाचा पहिला प्रयोग १९७२ केला होता. पुढे वाद-विवादांमुळे हे नाटक समाजात सतत गाजत राहिले. इंग्रजी भाषेतही याचे भाषांतर झाले. न्यूयॉर्क शहरातही  दीर्घकाळपर्यंत या नाटकाचे प्रयोग होत राहिले. 

नाटकाचा विषय असलेला बाईंडर वाईला राहायचा, खाणावळ चालवायचा. म्हणजे त्याने त्या वेळी ठेवलेली बाई ती खाणावळ चालवायची. तेंडुलकर या बाईंडराला भेटले होते. त्यांना तो चांगलाच लक्षात राहिला होता. तो तऱ्हेवाईक होता म्हणून नव्हे, तर तो 'खरा' होता, म्हणून. ते त्याच्याविषयी बोलायचे, विचार करायचे. या तुकडयातुकडयांतील विचारांतून ती व्यक्तिरेखा त्यांच्या मनात आकार घेत होती. एके दिवशी संध्याकाळी डॉ. श्रीराम लागू यांच्याशी बोलताना तेंडुलकरांना वाईचा हा बाईंडर आठवला. त्याच्याबद्दल लागूंशी बोलताना कल्पनेत असलेले, नसलेले अनेक तपशील स्पष्ट झाले. त्या बोलण्यातून 'सखाराम बाईंडर' ही व्यक्तिरेखा जन्माला आली. तो नाटकात बोलणार असलेली अनेक वाक्ये तेंडुलकरांना ऐकू येऊ लागली. 

त्याच रात्री तेंडुलकरांनी नाटकाचा पहिला अंक एकटाकी लिहून काढला. सखाराम बाईंडरमधे प्रमुख पात्राचं अगदी सुरवातीलाच भलंथोरलं स्वगत आहे. निळू फुल्यांच्या आवाजातलं हे स्वगत मेंदूला पोखरण्यास पुरेसं होतं. 'बाईंडर'चं नाट्य त्या स्वगतामध्ये नाही. नाटक पाहिल्यानंतर त्या सुरुवातीच्या स्वगताविषयी विचार केला, तर हे लक्षात येतं की त्या स्वगतात अर्थ नाही. म्हणजे, आपण कसे आहोत ह्याविषयी बाईंडरला जे वाटतं ते वेगळं आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या बायका त्याचं जे काही करतात ते वेगळं. आणि हे कुणी समजावून सांगत नाही, तर आपलं आपण समजून घेतो. तेंडुलकरांच्या अनेक नाटकांमध्ये सुरूवातीला 'मी कोण' हे सांगणारी स्वगतं असतात. 'शांतता कोर्ट चालू आहे' मध्येही बेणारेबाई मी अमुक मी तमुक असं सांगते. अनेक पात्रं घटना सांगतात. पण ते काहीसं नैसर्गिक वाटावं म्हणून आख्ख्या नाटकालाच एका खोटया खोटया वाटणाऱ्या पण तरीही खरोखर समाजात चालणाऱ्या कोर्ट केेसचं स्वरूप दिलेलं आहे.

बाईंडरच्या आधी निळूभाऊंचे देखील फारसे नाव नव्हते. अभिनेता म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी सुरवातीच्या काळात त्यांनी माळी म्हणून पुण्यातील एका मेडिकल कॉलेज मध्ये नोकरी केली होती. “कथा अकलेच्या कांद्याची” हे भाऊंचे पहिले नाटक. या नाटकाचे निळू भाऊंनी जवळ जवळ २००० प्रयोग केले. या नाटकामुळेच भाउंना त्यांचा पहिला सिनेमा “एक गाव बारा भानगडी” मिळाला होता. 'एक गाव बारा भानगडी'च्या झेलेअण्णांच्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झाली. त्यानंतर निळूभाऊंना 'सखाराम बाईंडर' नाटक मिळालं आणि या नाटकानं इतिहास घडवला. निळूभाऊंच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड असं या नाटकाचं वर्णन करावं लागेल. वास्तविक तेंडुलकर निळूभाऊंना 'सखाराम' पेलवेल का, याविषयी साशंक होते. मात्र, कमलाकर सारंग निळू फुलेंच्याच नावावर ठाम होते. त्यांनी तेंडुलकरांना 'कथा'चा प्रयोग दाखवला. त्यानंतर निळूभाऊंना हे काम मिळालं. 'बाईंडर' आणि त्याचा पुढचा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे. या नाटकानं निळूभाऊंना आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून दिलं. 'कथा अकलेच्या कांद्याची', 'सखाराम बाईंडर', 'सूर्यास्त', 'जंगली कबुतर' या सर्वाचे त्यांनी जवळपास दहा एक हजार प्रयोग केले. त्यातही 'कथा'चे दोनेक, 'जंगली कबूतर'चे दीडेक हजार, 'सखाराम'चे आठशे प्रयोग केले. 

'सखाराम बाईंडर’ या नाटकामध्ये निळूभाऊसोबत १९७२ मध्ये चंपाचे काम लालन सारंग यांनी असं काही साकारलं की त्यांचं सार्वजनिक जीवन ढवळून निघालं. हे त्यांचं पहिलं मराठी नाटक होतं. त्यात वेगळेपणाही होता अन्‌ भूमिका साकारण्यासाठी त्यांना स्वातंत्र्यही दिलं होतं. खरंतर ही भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविरुद्ध होती. त्यांना स्वतःला त्या चंपाची भूमिका इतकी दर्जेदार करतील अन्‌ हे नाटक खूप गाजेल, विशेष म्हणजे हे नाटक इतिहास घडवेल होईल, असं कधीही वाटलं नव्हतं. मात्र ही भूमिका सगळ्याच दृष्टिकोनातून वेगळी ठरली. असो...बाईंडरची कथा हा या नाटकाचा प्राण होता... 

एका झोपडपट्टीत बाईंडर राहतो. तो आपल्या घरी बायका आणतो. अशा सात बायका त्यानं ठेवलेल्या असतात. त्यातल्या काही जणी निघून जातात, तर काहींना त्यानं सोडून दिलेलं असतं. या नाटकातील चंपा त्याची आठवी बायको असते. चंपा म्हणजे सखारामाच्या आयुष्यात आलेलं एक वादळच. त्यालाही चक्रावून टाकणारं. चंपा बिनधास्त आहे. बेफिकीर आहे. आपण आकर्षक आहोत, याचं तिला भान आहे. पुरुष आपल्याकडे आकृष्ट होतात हेही तिला ठाऊक आहे. तिनं जीवनातले बरेच अनुभव घेतले आहेत. 
नवरा नपुंसक असल्यानं तिनं त्याला सोडलं आहे. तीही गरज म्हणूनच सखारामाकडे आलेली असते. त्याच्या अटी ऐकूनही न ऐकल्यागत करते. अरेरावी करणारा, आक्रमक असणारा सखारामही चंपाचं वागणं पाहून अवाक होतो. सखाराम आणि दाऊद, दोघंही चंपावर भाळतात. 
सखारामाला शरीरसुख देण्यास ती नाखुष असते. डोक्यावर छप्पर हवं असेल, तर कोणत्यातरी पुरुषाला शरीर द्यावं लागणारच, या हिशोबानं दारू प्यायल्यानंतरच ती सखारामच्या अधीन होते. खरं तर ती तिच्या पहिल्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून सखारामच्या आश्रयाला आलेली असते. ती तिथ मुक्तपणे जगण्यासाठी धडपड करते. चंपावर फिदा झालेला बाईंडर तिला आपल्या घरी कायमचे 'ठेवतो'. ती घरात येताच त्याची आधीची बाई लक्ष्मी घरी परत येते.

ही लक्ष्मी सुरुवातीला सदाचरणी, भाबडी, सहृदय आहे. तिला मूलबाळ नाही, आणि म्हणून पहिल्या नवऱ्यानं तिला टाकलं आहे. सासरी आणि माहेरी तिला कोणी विचारत नाही. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. ती देवावर उत्कट प्रेम करते. देवानं निर्माण केलेल्या जीवांवरही प्रेम करते. कावळा, मुंगी-मुंगळ्याशी बोलते. त्यांना खायला देते. ती घरात आल्यापासून देवपूजा, निरांजन लावणं वगैरे गोष्टी गृहिणीप्रमाणे करत असते. आपण गरजू असल्यानं सखारामाकडे राहायला आलो आहोत, याची तिला जाणीव असते. पण त्याचबरोबर आपली व्यक्तिगत जीवनमूल्यं, निष्ठा जपण्याचाही ती प्रयत्न करत असते. गणपतीच्या आरतीला सखारामाचा मित्र असलेला दाऊद तिला नको असतो. हे सारं सखारामाच्या जगण्याला, दृष्टिकोनाला छेद देणारं आहे. सखाराम तिच्यात गुंततो आहे, असं वाटत असतानाच तो तिला हाकलून देतो. लक्ष्मी आपल्या पुतण्याकडे राहायला जाते. मात्र चंपा सखारामच्या घरी येताच तीही तिथं परतते.  

सखारामाच्या घरी परतल्यावर लक्ष्मीला आधी चंपाचा सामना करावा लागतो. 
'चंपा सखारामाच्या शारीरिक मागण्या पुर्‍या करत राहील आणि लक्ष्मी घरातली पडतील ती कामं विनातक्रार करेल', या अटीवर चंपा लक्ष्मीला निवारा देते. 
खरं तर दोघींचे हितसंबंध परस्परविरोधी आहेत. बर्‍यावाईटाच्या दोघींच्या व्याख्याही अगदीच विरुद्ध आहेत. चंपाला सखारामबद्दल अजिबात प्रेम नाही. त्याच्याशी शरीरसंबंधही ती दारू प्यायल्यावरच ठेवू शकते. तिला सखारामाचा केवळ आसरा हवा आहे. लक्ष्मी मात्र सखारामबद्दल सकारात्मक  आहे. पण तरीही चंपा लक्ष्मीचा स्वीकार करून तिला घरात घेते.
लक्ष्मीनं घरात राहणं सखारामाला अजिबात मंजूर नाही. पण चंपापुढे त्याचं काही चालत नाही. लक्ष्मीच्या येण्यानं सखारामामध्ये हळूहळू बदल होत जातो. 
तिला, तिच्या देवांना तो घाबरू लागतो. चंपाशी संबंध ठेवण्यासही तो घाबरू लागतो. चंपा दाऊदशी संधान बांधते. चंपाचे हे बाह्यसंबंधच तिच्या जीवावर येतात. लक्ष्मी सखारामला सावध करू पाहते पण यातच तिच्या हातून चंपाचा खून होतो.    

प्रेमळ असणारी लक्ष्मी शेवटी चंपाचा आपल्या हातून झालेला खून थंडपणे पाहते. चंपा मेल्यावर तिला आनंद होतो. तिचं प्रेत पुरायला ती लगेच जमीन खणू लागते. इतकी क्रूरता तिच्या अंगी कुठून येते? 
लक्ष्मी अशिक्षित आहे. कर्मठ, सनातनी आहे. पहिल्या नवर्‍यानं घरातून हाकलून दिल्यावर सखाराम हाच लक्ष्मीच्या दृष्टीनं तिचा पती. तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि अशा आपल्या नवर्‍याच्या घरात आपलं स्थान बळकावून आलेली चंपा, दाऊदासारख्या ’मुसलमाना’बरोबर अनैतिक संबंध ठेवते? 
प्रत्यक्ष देवाशी बेईमानी! 
चंपाच्या या कृत्याला लक्ष्मीच्या जगात क्षमा नाही. 
लक्ष्मी धूर्त आहे. असुरक्षिततेचा भयगंड तिला ग्रासतो आहेच. अशा तणावाच्या अवस्थेत ती ते गुपित सखारामाला सांगते. स्वत:च्या बचावासाठी पशू असाच प्राणांतिक झुंज देतो. 
चंपाचा खून झाल्यावर तिची प्रतिक्रिया : "नाही तरी पापीच होती ती, नरकात जाईल'. तिच्या हिशेबी या बेईमानीला हीच शिक्षा." 
आता पोलादी, कणखर सखाराम हातून पाप घडल्याची जाणीव झाल्यावर संपतो. पार निर्जीव होतो. आणि आतापर्यंत मार खाऊन निर्जीव झालेली लक्ष्मी आपल्या कुंकवाच्या रक्षणासाठी चंपाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी प्रचंड ताकदीने, धैर्याने उभी राहते.

नाटकाच्या शेवटी सखाराम पूर्णपणे पराभूत होतो. मात्र चंपाला मारून मिळवलं काय? रागाच्या भरात चंपाचा खून होतो खरा पण चंपाच्या खुनानंतर लक्ष्मी त्याचा ताबा घेते आणि मनानं, शरीरानं तो सपशेल खचून जातो. 
कावळ्याशी, मुंगळ्याशी बोलणारी लक्ष्मी, त्याची मारझोड सहन करणारी लक्ष्मी आता त्याचा खरडून खरडून होणारा अंत शांतपणे बघते. आपली चूक झाल्याची त्याला कल्पना येते पण आता हताश होण्यापलीकडे त्याच्या हाती काहीच नाहीये.  

'बाईंडर'मधली सखारामची भुमिका जितकी महत्वाची आहे तितकीच महत्वाची भूमिका चंपाची आहे. या भूमिकेच्या मागणीनुसार त्यासाठी लालन सारंगना गावरान अन्‌ शिवराळ भाषा शिकावी लागली. अशा प्रकारची भूमिका यापूर्वी त्यांनी कधीच केली नसूनही ही भूमिका त्या अक्षरशः जगल्या. 

नाटकाचे जेव्हा राज्यभरात प्रयोग सुरु झाले तेंव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला अन तितकेच तथाकथित संस्कृतीरक्षकांचे अरण्य रुदन वाढू लागले. कल्याणच्या साहित्य संमेलनात रणजित देसाईंनी या नाटकावर बहिष्काराचा ठराव मांडला. प्रस्तावावर एका शब्दाची चर्चा न होता केवळ आवाजी मतदानाने या नाटकावर बंदी घालण्याची मागणी मराठीतील थोर साहित्यिकांनी केली. मजा म्हणजे त्यांपैकी अनेकांनी हे नाटक बघितलंच नव्हतं. नाटकाचे तेरा प्रयोग झाल्यानंतर सेन्सॉरने या नाटकावर बंदी आणली. 
ज्या काळात रंगभूमीला अतिशय पवित्र मानलं जायचं त्या काळात अखेर पडती भूमिका घेऊन सेन्सॉरला हे नाटक बंद करणं भाग केलं गेलं. 
अर्थातच हे आंदोलन शिवसेनेनं  केलं होतं. 
राज्यभरात अनेक वाद झाले, न्यायालयात खटले दाखल केले गेले. तेव्हा लालन सारंग यांचे पती कमलाकर सारंग जे या नाटकाचे दिग्दर्शकदेखील होते त्यांनी न्यायालयीन लढा दिला. हा लढा सहा महिने सुरू होता. 
त्याच दरम्यान इतर नाटके 'बाईंडर'पायी सोडून दिल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती गुंतागुंतीची झाली असूनही लालन 'बाईंडर' मधून बाहेर पडल्या नाहीत हे विशेष.मात्र या लन्यायालयीन लढ्याला यश आलं. 'सखाराम बाइंडर'चे प्रयोग पूर्ववत सुरू झाले असे वाटत असतानाच, शिवसेनेने झुंडशाहीच्या जोरावर काही प्रयोग बंद पाडले. 
शेवटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हे नाटक 'संमत'(!) करून घेतल्यावरच पुढचे प्रयोग होऊ शकले. हा सगळा त्रास सहन केल्यानंतरच त्यातून धडा घेत लालन सारंग व कमलाकर सारंग यांनी मिळून ‘कलारंग’ ही संस्था स्थापन केली. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकं रंगभूमीवर आणली. अनेक नाटकं गाजलीही. त्यात ‘बेबी’, ‘कमला’, ‘पोलिसनामा’, ‘जंगली कबुतर’ यांसह अनेक नाटकांचा समावेश होतो. 
'बाईंडर'मधल्या कुठल्याच कलावंताने पैसा हे कधीच इप्सित मानले नाही त्यामुळेच की काय बाईंडरमधल्या कुठल्याच कलावंताला कधी कामाची ददात पडली नाही. या नाटकाचा हा सर्व भन्नाट प्रवास कमलाकर सारंग यांनी 'बाईंडरचे दिवस' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.

तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’ आणि ‘सखाराम बाईंडर’ नी मराठी मध्यमवर्गीय माणसाची मूल्यचौकटच मोडून टाकली. त्यांनी ‘लग्न’ या सामाजिक संस्थेलाच प्रश्नांकित केले. सखाराम बाईंडरचे तत्त्वज्ञान हे ‘लग्न’ या संस्थेसंबंधी चिरकालीनत्वाच्या सामाजिक समजाला छेद देणारे तत्त्वज्ञान आहे. मध्यमवर्गीय माणसाच्या आवाक्यापलीकडचं जग तेंडुलकरांनी या नाटकाच्या निमित्तानं मध्यमवर्गीय माणसाच्या जाणिवेत आणून सोडले. मराठी नाट्यपरंपरेला अपरिचित असलेलं जग तेंडुलकरांनी मराठी रसिकाच्या जाणीवेत आणले याला त्यांची प्रायोगिकता म्हणता येईलच, परंतु परंपरेला माहीत असलेला ऐवजही तेंडुलकरांनी प्रायोगिक केला. ज्या नाटकाने तेंडुलकरांना भारतीय स्तरावर नाटककार म्हणून मान्यता मिळवून दिली, ते नाटक म्हणजे ‘घाशीराम कोतवाल’. मराठी रंगभूमीच्या इतिहासाला वळण देणारे हे अनैतिहासिक नाटक होते. लोकसंगीत हा ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा आत्मा आहे. कीर्तन, तमाशा, लावणी, मुजरा आदी लोककलांच्या वापरातून या नाटकाने हे दर्शवून दिले की, लोकनाट्य आणि वास्तववादी नाटकाच्या सरमिसळीतून समकालीन नाट्य घाटाची निर्मिती होऊ शकते. या नाटकाने हे देखील दर्शवून दिले की, ऐतिहासिक ऐवजातून अनैतिहासिक नाटक घडविता येते. या नाटकातून उपहास, विनोद, हिंसा आणि करुणा यांचा एकत्रित प्रत्यय येतो. लोकरंगभूमीच्या वैशिष्ट्यांचा प्रभावी वापर करणारे ते आधुनिक संवेदनांचे नाटक आहे. लोकरंंगभूमीवरील लवचिकता, ऊर्जा आणि कल्पकता यांचा वापर करून आधुनिक आशय मांडण्यात हे नाटक यशस्वी ठरले आहे. म्हणून हे नाटक मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेे. घाशीरामने पुण्यातील ब्राम्हणी संस्कृतीवर हल्ला केला असे ब्राम्हणांचे म्हणणे तर सखारामने नवी नैतिक अधोगतीची पातळी (हिला खालची सीमा नसते बहुतेक, कारण कितीही पडली तरीही तिला परत अजून खाली पडायला जागा उरलेली असते) गाठली असे काहींचे म्हणणे. दोन्हीही नाटकात स्त्रीपात्रे अगदी पॉवरफुल होती आणि माणसाच्या (पुरुषांच्या?) कामुकतेचे बहुतेक सर्वांना पटणारे दर्शन त्यात होते.  घाशीराम मधली गौरी आणि बाईंडर मधल्या लक्ष्मी आणि चंपी, त्याचप्रमाणे बाईंडरची कामुकता बेडरपणा, आणि नाना फडणविसाचे "ते तुम्ही म्हणजे आम्हाला दुसऱ्याच्या मुलींसारख्या" उद्गार अगदी अंगावर काटा आणतात आणि विचार करायला लावतात, की माझ्यात पण एक बाईंडर आणि नाना आहे का? 
मी असा विचार करू आणि वागू शकतो का? 
कामुकता आणि हिंसाचार अंगावर सर्र्कन्न काटा आणणारा आणि वाचल्यानंतर/ नाटक बघून महिने झाले तरी चटका लावणारे. हे असले लिखाण सोपे नाही किंबहुना अशक्यच आहे. अनंत वेलणकरची तो भीषण मानसिक कुतरओढ, तो त्याचा जमादार बाप आणि शेट्टी आणि त्याचे हसणे. हे राम! 

अर्थात बाईंडर गाजले ते लालन सारंग कशी स्टेजवर लुगडे बदलते, आणि सखारामच्या शिव्या आणि त्याच्या मित्र्याशी "पक्षी" ह्या अर्थाने बायकांचा उल्लेख करून केलेली चर्चा ह्या असल्या गोष्टींमुळे गाजला. 
तर घाशीराम त्यात ब्राह्मणांवर टीका आहे त्यामुळे जास्त वादग्रस्त ठरला, नाना फडणवीस हे असे  नव्हतेच असा प्रतिवाद केला गेला. 
असल्या टीकेमुळे आणि दोन्ही नाटकांवरच्या बंदीमुळे गाजली. सध्याच्या काळात चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मुद्दाम कॉंट्रोव्हर्शीयल गोष्टी आणि रिएलिटीमधला विटून गेलेला मसाला घातलेला असतो. विविध खानांच्या माकडचाळयांपेक्षा अन चिंधीभर कपडे अंगावर घालून पडद्यावर मिरवणाऱ्या  बाजारू अभिनेत्र्यांच्या हिडीसपणापेक्षा तो काळ कलात्मकदृष्ट्या निश्चितच उजवा होता. मात्र दुर्दैव असं की अशा नाटकांना रंगभूमीवरचं आगमन सुसह्य व्हावं म्हणून स्थापन झालेली 'थियेटर अकेडमी' पुढे जाऊन बंद पडली, काही लोकांनी त्यात बराच आर्थिक तोटा सोसला. त्यापैकीच एक धगधगत्या प्रतिभेचे ज्वालाग्राही लेखन करणारे तेंडुलकर होते. पुढील काळात त्यांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय लोकमान्यता मिळाली. महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून काढून, देशाच्या रंगभूमी आणि कला ह्या प्रांतात मराठी कलेला अटकेपार घेऊन जाण्याचे काम या दोन्ही तेंडुलकरी नाटकानीच केलं होतं.

मराठी रंगभूमीवर प्रायोगिकतेचे पितृत्व विजय तेंडुलकरांना सार्थपणे बहाल केले जाते. त्यांनी मराठी रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी मराठी रंगभूमीवर एक नवी रंग-परंपरा निर्माण केली. समाजातील सुप्त स्वरूपाची हिंसा आणि लैंगिकता त्यांनी रंगभूमीच्या चव्हाट्यावर मांडली. त्यांना विरोध पत्करावा लागला. अपमान सहन करावे लागले. त्यांच्या नाटकांनी अनेक विवाद निर्माण केले. परंपरावाद्यांनी तेंडुलकरांना नेहमीच असहिष्णूपणे वागवले. पण ते डगमगले नाहीत. त्यांनी व्यवस्थेसमोर शरणागती पत्करली नाही. त्यांच्या वृत्तीप्रवृत्तीला मानवेल तेच आणि तसेच ते लिहीत राहिलेत. नभोनाट्य, एकांकिका, निमव्यावसायिक नाटक आणि काही प्रमाणात व्यावसायिक नाटक असा तेंडुलकरांच्या नाट्यलेखनाचा जवळ जवळ पाच दशकांचा कालखंड आहे. परंतु नाटक कुठल्याही वर्गातले असले तरी प्रत्येक नाटकातून तेंडुलकरांची प्रायोगिकताच प्रकर्षाने जाणवली. पारंपरिकरीत्या जे मराठी रंगभूमीवर दाखवले जात होते ते सारेच त्यांनी नाकारले. त्यांनी नव्यानव्या विषयांना हात घातला आणि नाटकासारखे कृतिप्रधान माध्यम आशयगर्भ केले.

कमीत कमी शब्द, कोर्‍या जागा, टिंबांचा विपुल वापर आणि विरामचिन्हें यातून तेंडुलकरांनी एका वेगळ्याच रंगभाषेची निर्मिती केली. त्यांनी नाटकातून कधीच गोष्ट सांगितली नाही. त्यांच्या नाटकांनी नेहमीच अंतर्मुख करणारा नाट्यानुभव दिला. ते आरंभापासूनच प्रयोगशील राहिले. मध्यमवर्गीय जीवनातील वासनेची, हिंसाचाराची, त्यातून येणार्‍या उद्ध्वस्ततेची गाज त्यांच्या नाटकांतून ऐकू येत राहिली. माणसाला येणार्‍या एकाकीपणाचे भकास-विदीर्ण अनुभव त्यांच्या नाटकांतून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होत राहिले. पन्नास वर्षे ते सातत्याने नाटकाच्या रचनेत विविधांगी प्रयोग करीत राहिले. त्यांच्या नाटकांची सर्व भारतीय भाषांत भाषांतरे झालीत. देशभरात त्यांच्या विविध नाटकांचे प्रयोग सातत्याने झालेत. देशातील महत्त्वाच्या रंगकर्मींना तेंडुलकरी नाटक नेहमीच मोह घालीत राहिले. ते केवळ मराठी रंगभूमीवरचे महत्त्वाचे नाटककार नाहीत, तर भारतीय रंगभूमीवरचे अतिशय महत्वाचे नाटककार आहेत. माणसाच्या मनातील आदिम भाव-भावनांचा शोध तेंडुलकरी नाटक सातत्याने आणि अथकपणे पन्नास वर्षे घेत राहिले. त्यांच्या नाटकातील अनुभवांच्या पृथगात्मतेमुळेच त्यांना मळलेली वाट नाकारावी लागली. परंतु त्यामुळे मराठी रंगभूमीवर एक वेगळी वाट निर्माण झाली. याच वाटेवर तेंडुलकरोत्तरी प्रायोगिक नाटक निर्माण झाले आणि बहरलेही.

यंदाच्या दोन फेब्रुवारीला 'सखाराम बाईंडर'ची पन्नास वर्षे पूर्ण झाली . 'सखाराम...' च्या पहिल्या तीन आवृत्त्या कमलाकर सारंग यांनी १९७२ ते १९९५ पर्यंत रंगमंचावर सादर केल्या. हे नाटक पहिल्यांदा वाचल्यानंतर डॉ. श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांनी त्याचं दिग्दर्शन करण्याची इच्छा तेंडुलकरांकडे व्यक्त केली होती. कमलाकर सारंग तर ते नाटक अगदी आपल्याचसाठी असल्याचा हट्ट तेंडुलकरांकडे करून बसले होते. शेवटी तेंडुलकर, डॉं.लागू आणि देशपांडे यांना म्हणाले की, 'सारंग व्यावसायिक रंगभूमीवर नवा असला तरीही मी हे नाटक त्याला दिलं आहे. तो करणार नसेल तरच तुम्ही ते करा.' या नाटकाचा इतिहास सारंगच्या हातूनच घडावा ही निर्मिकाची इच्छा असावी. तेंडुलकर लोकनिंदेत होरपळलेले, तर लालन आणि कमलाकर सारंग मानसिक, आर्थिक त्रासाने त्रस्त होते. पण यांच्यापैकी कोणीही डगमगलं नाही आणि नाटकाचे प्रयोग अनेक अडथळे पार करत होतच राहिले. या संचांनंतरही पुढच्या दशकात प्रयोग होतच राहिले. अनेक नाट्यसंस्थांना याची भुरळ पडली. विविध संस्थांकडून प्रयोग होतच राहिले; पण त्याची दाहकता संपली होती. पहिल्या शिल्पाची दाहकता सहन करणारे जवळजवळ सगळेच आज हयात नाहीत. मात्र आजही मराठी नाट्यरसिक बाईंडरच्या आठवणीने भरून पावतो.

यातील सखाराम हा पुरुषी वासना विकृतीचं शिसारी आणणारं प्रतिक आहे, जोवर पुरुषी विकृत वासना विकार असतील तोवर सखाराम असणार आहे. आयुष्याच्या कोणत्या न कोणत्या वळणावर या वासना पुरुषाच्या मनाचा ताबा घेतातच. मध्यमवर्गी पांढरपेशी माणूस हे सत्य कधीच स्वीकारत नाही, तो दांभिकपणे तो आपला 'विश्वामित्री' पवित्रा सुरूच ठेवतो. सखारामसारखे काही पुरुष आपल्या वासना खुल्लेपणाने बायका ठेवून शमवत राहतात तर बहुतंशी पुरुष वासनेमुळे हिंसेच्या आहारी जातात. घरच्या बायकांना मारणे, कार्यालयातील सहकारी महिलेचा छळ करणे, सार्वजनिक ठिकाणी केवळ नजरेने स्त्रियांचे शोषण करणे, गरिबी आणि अडचणी याच्या दैन्यचक्रात अडकलेल्या महिला तर सर्वात सॉफ्ट टारगेट ठरतात, लहान बालिकांपासून ते जरठ वृद्धेपर्यंत यांच्या तावडीतून कुणीच सुटू शकत नाही. वासनापासून दूर पळून गेलेले देखील कुठल्या न कुठल्या मार्गे वासनांचे शमन करताना आढळतात. पुरुषांची लैंगिक अतृप्तता अन लैंगिक हिंसा जेंव्हा सर्व सीमा पार करते तेंव्हा त्या पुरुषाचा अंत समीप येतोच. मात्र हे सर्व सहन करणारी स्त्री जोवर पुरुषाला आव्हान देत नाही, त्याच्या समोर उभी ठाकत नाही तोवर ती पिचलेली राहते, तिचे स्थान दुय्यमच राहते.पुरुषी वासनांचे अंतरंग असे ढवळून काढून गेलेल्या सखाराम बाईंडरसारख्या नव्या कलाकृती जोवर लिहिल्या,वाचल्या, पाहिल्या जात नाहीत अन त्यावर साधक बाधक खुली चर्चा होऊन ह्या नागड्या गोष्टीवर मनमोकळे संवाद होत नाहीत तोवर ही पुरुषी वासनांध श्वापदे असहाय स्त्रियांचा छळ करत राहणार हे स्पष्ट आहे. कारण या पुरुषी विकार वासनांना माझ्या मते तर अंत नाही कारण त्या मानवी मनाचा एक भाग आहेत म्हणूनच सखाराम अमर आहे.....

- समीर गायकवाड.

संदर्भ - 'बाईंडरचे दिवस' : लेखन - कमलाकर सारंग