गुरुवार, ९ जून, २०१६

अजुनी रुसून आहेचे अक्षय भावगीत ... कवी अनिल .


साल होते १९१९. विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर या अगदी छोट्याशा शहरातुन शिक्षणाच्या निमित्ताने अठरा वर्षे वयाचा एक हळव्या मनाचा उमदा तरुण पुण्यात आला. शालेय शिक्षण गावाकडे पूर्ण केल्यानंतर त्याने पुण्यात येऊन थेट फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. किंचित अबोल स्वभावाच्या या तरुणाला तिथे जमवून घेणे थोडे कठीण जात होते. असेच दिवस पुढे जात राहिले आणि त्याच दरम्यान पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत मॅट्रिकला असणाऱ्या तरुणीशी ओळख झाली. दोघात काही विलक्षण साम्य होते. दोघेही हळवे आणि कवी मनाचे होते. दोघेही विदर्भातले. तो अकोला जिल्ह्यातला तर ती अमरावतीची. तो मॅट्रिकपर्यंत मुर्तीजापुंरात तर तिचे प्राथमिक शिक्षण अमरावतीत झालेले. पुढे तो पुण्यात आलेला तर ती मॅट्रिक व कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पुण्यातच होती. दोघांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.अगदी सच्चे आणि गहिरे प्रेम दोघामध्ये होते. पुढे ती नागपूरास गेली, तो पुण्यातच राहिला. अधून मधून भेटीगाठी होत राहिल्या, पण मनातले बोल जास्त करून पत्रांतून व्यक्त व्हायचे. पत्रे इकडून तिकडून जात राहिली, इतकी की त्यावर नंतर सुंदर पुस्तक निर्मिले गेले. दोघेही कलाशाखेतून पदवीधर झाले. तिला नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत सुवर्णपदक मिळाले, आणि मध्य प्रांत-विदर्भ सरकारची विशेष शिष्यवृत्ती मिळवून ती इंग्लंडला गेली. पुढे इंग्रजी साहित्यातली लंडन विद्यापीठाची पदवी मिळवून ती १९२९ला भारतात परतली. तोवर हा तरुण कला शाखेची पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे गेलेला. भौगोलिक अंतर वाढलेले पण दोघांमधले प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. दोघेही एकमेकाची प्रतीक्षा करत होते. अखेरीस १९२९ ला त्यांचा विवाह झाला. त्याने पुढे विधीशाखेची पदवी घेतली अनेक मोठ्या हुद्द्यांवर नोकरी केली. दोघांचा स्वभाव हळवा आणि कवीमनाचा असल्याने दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करत करत लेखन करत राहिले. तो कवितेवर जीव लावून होता, तर कथा हा तिचा आवडता पिंड होता. सुखाचा संसार होत गेला. लग्नाला आता चांगली ३२ वर्षे झाली होती आणि प्रेमाची चाळीशी पार झाली होती. तिने तर भीमपराक्रम केला, १९६१ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ती पहिली महिला अध्यक्ष झाली अन त्याला हाच मान १९५८ मध्ये मिळाला होता. प्रेमाने ओथंबलेल्या या दोघांनी आपल्या आयुष्यातली हे सर्वोच्च शिखर सर केले होते. आयुष्य आनंदाने व्यतित होत होते....

१७ नोव्हेंबर १९६१. एक हळुवार वाऱ्याची झुळूक आली आणि तिची प्राणज्योत मालवून गेली. आयुष्यभराची सांगाती अशी अचानक निघून गेली, त्यांना हा धक्का कसा सहन झाला असेल ? त्यांच्या मनात काय विचार आले असतील ? त्यावर त्यांनी 'सांगावा' ही अप्रतिम कविता लिहिली असा प्रवाद होता मात्र तो चुकीचा आहे...(याबद्दल एक महत्वाचा मतभेद आहे तो लेखाच्या अखेरीस विस्तृत टिपेमध्ये दिला आहे.) 
“अजुनी रुसून आहे,... 
खुलता कळी खुले ना...
मिटले तसेच ओठ, 
की पाकळी हले ना !” 
हळव्या मनाचा ते कवी म्हणजे कवी अनिल होत. आत्माराम रावजी देशपांडे उर्फ अनिल. आणि त्या  म्हणजे कुसुमावती देशपांडे. पूर्वाश्रमीच्या कुसुम रामकृष्ण जयवंत. 

अनिल विचार करतात ही अशी का रुसून गेली आहे ? हा असला कसला रुसवा ? तिचा चेहरा असा का म्लान झाला आहे ? तिच्या चेहऱ्यावर नेहमीची ती दिलखुलास कळी खुलत नाहीये. ओठांच्या हळुवार पाकळ्या मिटून गेल्या आहेत अन त्या खुलता खुलेनात ! काय झालेय तिला ? 
पुढच्या पंक्तीत तर ते आणखी भावविभोर होऊन जातात. मी समजूत करावी म्हणून तु रुसायचीस. मी हास म्हणताच रडता रडताही तु हसायचीस हा आपल्या रुसव्याफुगव्याचा प्रेमाचा शिरस्ता होता. पण आज तसं काही होत नाहीये. माझं समजावणं तुला आज पटत नाहीये. आज तु असा काही अबोला धरलायस की तुझ्याच्याने काहीच कसे बोलवेना !! 

नंतरच्या पंक्ती त्या दोघांमधील अत्यंत उत्कट, निरागस, गहिऱ्या अन हळव्या प्रेमाच्या अल्वार श्रावणझडीचा प्रत्यय आपल्या डोळ्यात नकळत अश्रू उभ्या करून देतात. अश्रूंचा बांध डोळ्यात फुटला आहे पण हे अश्रू देखील आता अनंताच्या सागरात कुठे तरी विरणार आहेत म्हणूनच का पापण्याचा आडोसा घेऊन तू दूर आहेस ? जीवाची अक्षरशः तगमग होतेय, मनाची तडफड होतेय. काही चुकले असेल का आणि त्याची काही अढी तर राहिली नसेल ना याचे अटीतटीने पोटतिडकीने द्वंद्व मनात चालू आहे. यावर आता उत्तर काहीही येवो पण आपल्या दोहोंमध्ये हे जे काही अंतर नियतीने पाडले आहे ते अंतर मिटविल अशी मिठी काही मला मारता येईना ! हे नियती मी किती दुर्दैवी आणि हतबल आहे की, मी इतकेही करू शकत नाही.... 

शेवटी ते परमेश्वरालाच विचारतात की हा तुझा तर काही गूढ डाव नाही ना ? ज्यामध्ये तु हे रुसव्याचे दृश्यभास माझ्यापुढे उभे करत आहेस. माझ्या काळजाचा ठाव घेण्यासाठी, माझ्या अंतरंगात डोकावून माझ्या प्रेमाची एखादी कसोटी तर तु घेत नाहीयेस ना ? अंतिम पंक्तीत ते पुन्हा तिला विचारतात, हा असा कसा रुसवा धरला आहेस, हा कसला अबोला आहे की ज्यात तुला आपले कोण कळेना ( तु त्या विश्वनिहंत्याच्या नादाला लागू नकोस, तु रुसवा सोड परत ये, तुझा आपलं माणूस मी आहे. तो नाही. तुला आपलं माणूस कळायला पाहिजे) तेंव्हा तु हा रुसवा सोड. उसने अवसान आणून मी हे म्हणतोय खरे पण तु अजुनी रुसून आहेस अन तुझी कळी काही केल्या काही खुलत नाहीये..... 

प्रत्येक शब्द काळजाचा ठाव घेऊन जातो, अथांग प्रेमाची शांत शीतल अनुभूती देऊन जातो. कसलाही आक्रस्ताळेपणा नाही. ना कुठले अवडंबर ना शब्दांचे आकांडतांडव. जीवनातल्या अंतिम सत्याचे इतके मुग्ध शब्दांकन करून अंतर्यामातून भिजवून टाकणारे हे काव्य म्हणजे प्रेमकवितेतल्या भावभावनांचे सकळ आणि निर्मळ प्रकटीकरण आहे. नकळत डोळे कधी पाणावतात उमगत नाही. आपणही कुठे तरी स्वतःला हरवून जातो.

कवी अनिल यांच्या ‘सांगाती’ला रसिक वाचकांनी डोक्यावर घेतले. त्यातही रुसवा या कवितेला लोकांनी अगदी आपल्या हृदयाच्या कप्प्यात हळुवारपणे आजही जतन करून ठेवलेले आढळते. या नितांतसुंदर कवितेला भावगीतात प्रस्तुत करण्याविषयीच्या चर्चा सुरु झाल्यावर आनिलांनी अक्षरशः हट्ट धरला की पंडित कुमार गंधर्वच हे गातील अन्यथा विषय बाजूला राहू दया. पंडितजींनी होकार दिला, गाणे गायलेसुद्धा आणि स्वतःच त्याला संगीत दिले. अशा रीतीने मराठी भावगीतांच्या माळेत गुलबकावलीचे हे भावगंधित सुमन गुंफले गेले..... 

रुसवा ...... 
अजुनी रुसून आहे,... खुलता कळी खुले ना... 
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना.. 

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे 
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे, 
ते आज का नसावे, समजावणी पटे ना 
धरीला असा अबोला, की बोल बोलवेना । 

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे, 
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ? 
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना, 
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना । 

की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग, 
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ? 
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ? 
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना । 

कवी अनिल यांनी लिहिलेल्या अनेक कविता ह्या जणू शब्दगाभाऱ्यातल्या शीतल ज्योती आहेत ज्यात त्यांच्या हळव्या मनाचे अन भावोत्कटतेचे शीतल दर्शन होत राहते. 

'बैस जवळि ये, बघ ही पश्चिमकोमल रंगी फुलली अनुपम', 'केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी', ' कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ? रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा...सांगाल का त्या कोकिळा, की झार होती वाढली आणि द्याया दाद कोणी रात्र जागुन काढली'…‘, 'पावसा पावसा थांब ना थोडा पिळून काढुन न्हालेले केस बांधु दे एकदा सैल अंबाडा'…’ ‘मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची नागमोडीची ही अलिकडची,नदीच्या थडीची…’ या व अशा अनेक कविता लिहून मराठी कवितेत आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या अनिलांची एक ओळख मुक्तछंदाचे प्रवर्तक म्हणून असली तरी त्यांनी प्रचलित केलेला 'दशपदी' हा काव्यप्रकार देखील तितकाच मनोरम्य ठरला. सुनीत ज्याप्रमाणे चौदा ओळींचे असते, तशाच धर्तीवरचे दहा काव्यपंक्तीत गुंफले गेलेले काव्य म्हणजे दशपदी ! 

मराठी साहित्यात "कुसुमानिल' हा कवी अनिल आणि कुसुमावती देशपांडे यांच्यातल्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या लग्नाच्या आधीची पत्रे यात समाविष्ट आहेत आणि १९७२ ला तो प्रकाशित झाला होता. कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांची पहिली दृष्टभेट २ जुलै १९२१ रोजी झाली आणि अनिल यांनी आपल्या प्रियेला लिहिलेल्या पहिल्या पत्राची तारीख होती- २ जुलै १९२२. आजच्या मोबाईल आणि चॅटिंगच्या जमान्यात प्रेमपत्रे किंवा चिठ्ठी याचे महत्व आजच्या पिढीला कळणार नाही. पण प्रेम भावना किती हळुवारपणे आणि नितळ शैलीत व्यक्त करता येतात याचे हे एक आदर्श उदाहरण आहे. कवी अनिल सुरुवातीस या पत्रसंग्रहाच्या प्रकाशनाच्या विरोधात होते. आपल्या प्रेमभावना सार्वजनिक व्हाव्यात हे त्यांना पटले नव्हते. प्रकाशक ह.वि. मोटे यांनी त्यांचे मन वळवले आणि मग ते राजी झाले.

कवी अनिल यांची ओळख आधुनिक मराठी कवी अशीच आहे. त्यांचे पूर्ण नाव नाव आत्माराम रावजी देशपांडे. ‘अनिल’ या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. त्यांचा जन्म मुर्तिजापूरचा. बी.ए.,एल्एल्. बी. झाल्यावर न्यायाधीश म्हणून काम केले. नंतर नागपूरला समाजशिक्षण-विभागाचे संचालक. पुढे दिल्लीला नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन सेंटरचे संचालक म्हणून नेमणूक. प्रसिद्ध मराठी लेखिका व टीकाकार कुसुमावती देशपांडे या त्यांच्या पत्नी होत. फुलवात हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह (१९३२). त्यात १९२० ते १९३१ या कालखंडातील त्यांच्या कविता आहेत. या कवितांत प्रेमजीवनातील उत्कट अनुभूतींचा गूढ व प्रतीकात्मक आविष्कार आढळतो. प्रेम आणिजीवन (१९३५), भग्नमूर्ति (१९४०) व निर्वासित चिनी मुलास (१९४३) ही त्यांची खंडकाव्ये मुक्तच्छंदातच रचिलेली आहेत. पेर्ते व्हा (१९४७) या काव्यसंग्रहात अनिलांच्या १९३२ ते १९४७ मधील स्फुट कविता आहेत. १९४७ ते १९६१ मधील कविता ‘सांगाती’ (१९६१) ह्या काव्यसंग्रहात आहेत. प्रेमजीवनाची उदात्तता, सामाजिक उद्बोधन व व्यापक मानवतावाद हे त्यांच्या आशयाचे विशेष आहेत. त्यांच्या काव्यात ‘रविकिरणमंडळा’च्या काव्यसंकेतांविरुद्ध झालेली प्रतिक्रिया आढळते आणि काव्यविचारात अशा प्रतिक्रियेबरोबर नवकाव्यातील काही प्रवृत्तींचा निषेध दिसून येतो. मुक्तच्छंद हा अनिलांच्या पुरस्काराचा, प्रयोगशीलतेच्या व जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘मुक्तछंद’, ‘मुक्तछंदः वादाचा थोडा इतिहास व विचार’ आणि ‘मुक्तछंदाची आवश्यकता’ हे त्यांचे या संदर्भातील महत्त्वाचे लेख. भग्नमूर्ति या खंडकाव्याच्या दुसऱ्या आवृत्तीत (१९६५) ‘मुक्तछंदाचे वाचन’ व ‘मुक्तछंद का म्हणून ?’ या विषयांवरील परिशिष्टे आहेत. त्यांचे समीक्षालेखन थोडे आहे व ते काही लेखांतून व भाषणांतून विखुरलेले आहे. १९६६ मधील विदर्भ साहित्य संमेलनाचे व १९५८ मधील मालवण येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६४ पासून ते साहित्य अकादेमीचे सभासद होते. या संस्थेने त्यांच्या भग्नमूर्ति या खंडकाव्याची अन्य भारतीय भाषांतील अनुवादासाठी निवड केली होती. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सभासद होते. 

एका संस्कारक्षम वयात काही वाचन होणे अनिवार्य असते, त्याशिवाय जीवनातील विविध अर्थ आणि सामाजिक जाणिवांच्या लक्षवेधी संवेदना याची खरी अनुभूती येत नाही. अशा वाचनाचा अविभाज्य अंग म्हणजे कविता. मला अशा कविता वाचायला मिळाल्या आणि त्यातून मी घडत गेलो हे माझे भाग्य समजतो. त्यांनी लिहिलं आणि पिढ्या मागून पिढ्या त्यावर वाढत गेल्या घडत गेल्या... 

‘सांगावा’ या कवितेच्या पार्श्वभूमीबद्दलची टीप - डिसेंबर १९६१ मध्ये अनिल यांचा ‘सांगाती’ हा काव्यसंग्रह मौज प्रकाशनने प्रकाशित केला. त्यामध्ये ही कविता समाविष्ट केली गेली. या कवितेचा कालखंड ऑगस्ट १९६१चा असून त्यांच्या पत्नीला उद्देशूनच मात्र त्यांच्या हयातीत ती लिहिली असल्याचेही काही जाणकार सांगतात. पण यावर एकदा दस्तुरखुद्द कुमार गंधर्वांनीच पडदा टाकल्याचे वाचल्याचे स्मरते. मात्र अलीकडेच प्रकाशित झालेल्या माहितीनुसार असा अर्थाअर्थीही संबंध नव्हता. 'सांगावा' कवितेबद्दल भिन्न मत मांडणारी माहिती ७ सप्टेबर २०१९ रोजीच्या दैनिक लोकसत्ता मध्ये प्रकाशित झाली. डॉ. गीता भागवत यांच्या या लेखात म्हटलंय की, "कुसुमावतींचं निधन झालं दिल्लीमध्ये १७ नोव्हेंबर १९६१ ला आणि अनिलांनी आपली ही ‘रुसवा’ कविता लिहिली होती यवतमाळमध्ये ५ ऑगस्ट १९४७ या दिवशी. कुसुमावतींच्या निधनापूर्वी तब्बल चौदा वर्ष आधी. कुसुमावतींच्या निधनापूर्वी काही दिवस अगोदर प्रसिद्ध झालेल्या ‘सांगाती’ या अनिलांच्या कवितासंग्रहामध्ये ती समाविष्ट आहे..... 
मग प्रत्यक्षात या कवितेचं जन्मरहस्य काय? खरंच का १९४७ च्या ऑगस्ट महिन्यात अनिलांची प्रिया, कुसुमावती, त्यांच्यावर रुसली होती आणि प्रियकराच्या समजावणीनंही तिचा राग-रुसवा विरघळत नव्हता? तसंदेखील काहीही नव्हतं. वस्तुस्थिती काय होती ते कळलं की आपल्याला आश्चर्याचा आणखी एक धक्का बसतो. काय झालं होतं नेमकं त्यावेळी? मनातील भावना कवितेत उतरवण्यासाठी नेमके शब्द सुचत नाहीयेत, जणू प्रतिभाशक्ती रुसून बसलीय अशा मनोवस्थेत त्या फुरंगटलेल्या प्रतिभाशक्तीला उद्देशून लिहिलेले शब्द आहेत का ते ? 
कवी अनिल यांच्या नातलगांनी या माहितीवर शिक्कामोर्तब केलेलं असल्याने ही माहितीच खरी मानली जावी. 


२ टिप्पण्या:

  1. 'अजुनी रुसून आहे' या कवितेच्या निर्मितीबद्दल जो दावा केला आहे तो चुकीचा असून दुरुस्त करणे.
    संदर्भ : https://www.loksatta.com/chaturang-news/atmaram-ravaji-deshpande-original-poem-abn-97-1966263/

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नमस्कार. आपण एक महत्वाची माहिती निदर्शनास आणून दिल्याबद्दल आपले आभार... लोकसत्तामधील लेखातील माहिती ब्लॉगमध्ये समाविष्ट करून घेतोय.

      हटवा