गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

प्रिय महानोर



प्रिय महानोर, 

तुम्ही गेलात आणि शिवारं उदासली.
रानामळ्यातली हातातोंडाशी आलेली तेजतर्रार पिकं मलूल झाली.

गोठ्यातल्या गायी मौन झाल्या,
माना तुकवून उभी असलेली कुसुंबी झाडं थिजली

उजाड माळांवरुन भिरभिरणारं वारं सुन्न झालं!
हिरव्याकंच घनदाट आमराईने शांततेचं काळीज चिरणारी किंकाळी फोडली!
विहिरींच्या कडाकपारीत घुमणारे पारवे स्तब्ध झाले

गावाकडच्या वाटेवरल्या पाऊलखुणा गहिवरल्या
घरट्यांतल्या पाखरांचा किलबिलाट निमाला

उंच गगनात विहरणारे पक्षांचे थवे एकाएकी विखुरले
पाऊसओल्या मातीस गलबलून आले

तुम्ही गेलात अन् वसुंधरेची हिरवाईही रुसली
अजिंठ्यातली चित्रे गदगदली,
वेरूळच्या लेण्यांचे हुंदके दाटले
पाऊसधाराही गहिवरल्या

रविवार, ३० जुलै, २०२३

लोभ आणि धर्म - ओशोच्या गोष्टी.



एकदा मी एका छोट्याशा गावात गेलो होतो. तिथे नवीन मंदिर बांधण्यात आले होते आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा चालू होता.
शेकडो पुरोहित आणि संन्यासी जमले होते. हजारो बघ्यांची गर्दी जमली होती.
पैशाचा बिनधास्तपणे मुक्तहस्ते व्यय सुरु होता. गाव मात्र वेगळ्याच कारणाने थक्क झाले होते!
कारण ज्या व्यक्तीने मंदिर बांधले आणि या सोहळ्यात एवढा पैसा खर्च केला त्याहून अधिक कंजूष माणूस कोणी असू शकत नाही, असे त्या गावातील लोकांना वाटत असे. ती व्यक्ती कंजूषपणाची आदर्श होती.

शनिवार, २४ जून, २०२३

त्यांच्यासाठी एक खिडकी खुली राहूद्यात!

श्रद्धा वालकर या तरुणीचे दिल्लीत झालेले हत्याकांड असो वा अल्पवयीन साक्षीचे अघोरी हत्याकांड असो किंवा नुकतीच झालेली सरस्वती वैद्य या प्रौढ महिलेची निर्घृण हत्या असो. अशा हत्याकांडामधून काही गोष्टी कॉमन जाणवतात.
एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री घर सोडून निघून जाते अथवा घरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध तिच्या इच्छेने कुणासोबत तरी राहू लागते तेव्हा घरातील बहुतांश लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत, हिंसक नकारात्मक आणि विरोधाच्या असतात.
खूप कमी लोक असे असतात की जे आपल्या मुलीच्या/ बहिणीच्या किंवा घरातल्या स्त्रीच्या इच्छा आकांक्षा समजून घेतात.
बहुतेकांना मात्र आपल्याच इच्छा आपल्याच अपेक्षा तिच्यावर लादायच्या असतात.
यातून मुलगी आणि तिच्या कुटुंबियांमध्ये एक ज्वलंत संघर्ष जन्म घेतो.

आपल्या मुलीने आपल्याच मर्जीप्रमाणे राहावे, आपण सांगू तेच ऐकावे त्याचबरोबर आपण ज्याच्याशी तिचे लग्न ठरवू त्याच्यासोबतच तिने लग्न करावे यासाठी अनेक पालक हट्ट धरतात. तिच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही.
परिणामी मुलीला असे वाटते कि आपले कुणीच ऐकून घेत नाही.

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

झगमगाटाआडचा भेसूर चेहरा - सलाम बॉम्बे..



हिंदी सिनेमा पूर्णतः निव्वळ मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच गणला गेला नाही त्याला काही सिनेमे कारणीभूत आहेत. चित्रपटाकडे पाहण्याचे विविधांगी दृष्टीकोन या गृहीतकामागे आहेत, गल्लाभरु सिनेमाच्या जोडीने असेही चित्रपट निर्मिले गेलेत की ते पाहून आपण सुन्न व्हावं, आपल्यातल्या माणसाने आत्मचिंतन करावं, झालाच तर क्लेशही करावा. अशा सिनेमांच्या यादीत एक नाव 'सलाम बॉम्बे'चे आहे! या सिनेमाविषयी विस्ताराने मांडणी करण्याआधी यातल्या एका सीनचा उल्लेख करावासा वाटतो.

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

शिवबा आपल्याला खरेच कळलेत का?


शिवाजीराजे म्हणजे मराठ्यांचं काळीज असं जेंव्हा लिहितो तेंव्हा नकळत आपण आपला खुजेपणा दाखवत असतो. शिवबा सगळ्यांचेच काळीज होते !

शिवाजी महाराज कसे होते हे सांगताना जो तो व्यक्ती त्याला अभिप्रेत असलेले वा ज्या रूपांत तो राजांना पाहू इच्छितो तेच वर्णन संबंधितांकडून केले जाते.
मग सकल शिवाजी महाराज कळणार तरी कसे?
मनातले सर्व अभिनिवेश नि सर्व भावभावनांना दूर सारून राजांना पाहिलं तर हिमालयाहून उत्तुंग आणि जळाहून नितळ असे पराक्रमी, दक्ष, चाणाक्ष दूरदृष्टी असणारे द्रष्टे धोरणकर्ते, कुटुंबवत्सल, रयतप्रेमी, ज्ञानी, संयमी, शांत, विचारी अशा अनेक बहुआयामी राजांचे चित्र समोर येते.

ते क्षत्रियकुलावंतस असल्याचा अभिमान आपण मिरवतो तेंव्हा तो त्यांचा अभिमान नसून आपला वर्गीय अभिनिवेश असतो.
शिवबा राजांचं अस्तित्व सकल कुळ गोत्र जात धर्म यापलीकडचं होतं, त्याचा अभिमान असायला हवा!

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

दक्षिणेतील सिनेमांचा उत्तर-दिग्विजय!


एक काळ होता की जेंव्हा आगामी हिंदी सिनेमांची चर्चा सर्व माध्यमांत असायची. येऊ घातलेल्या सिनेमाविषयी अपार उत्कंठा असायची, त्यातली गाणी, त्यातले सीन्स, संवाद, 
ऍक्शन, तांत्रिक अंगे यांची माहिती झळकत राहायची. त्यावर गॉसिप व्हायचं. ही वातावरण निर्मिती सिनेमाच्या पथ्यावर पडायची. हा प्रकार अनेकदा आताच्या पेड मार्केटिंगच्या स्वरूपाचा असायचा, मात्र त्याचे बाह्यरुप बटबटीत नव्हते. पुष्कळदा लोकांनाही याची जिज्ञासा असायची. मुळात सिनेमाविषयी नि त्यातल्या नायक नायिकांविषयी एक कुतूहलयुक्त आदर असे. आता परिस्थिती बदललीय. माध्यमांचा सुकाळ आहे, माहितीचा भडिमार आहे तरीदेखील आगामी काळात कोणते हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता अभावानेच आढळते, उलटपक्षी दक्षिणेकडील कोणकोणते सिनेमे कधी रिलीज होणार आहेत त्यांचा यूएसपी काय आहे याविषयी लोक भरभरून बोलताना दिसतात. आता असे वातावरण झालेय की हिंदी चित्रपटसृष्टीच्या नियमित प्रेक्षकांनाही पुढचा बहुप्रतिक्षित चित्रपट कोणता पहायचा आहे हे आठवावं लागतं. कारण मोजके अपवाद सोडल्यास या वर्षात 
आतापर्यंत जे छोटे-मोठे हिंदी चित्रपट आले आहेत, त्यांचे नशीब गुणवत्तेच्या आणि कलेक्शनच्या बाबतीत सर्वश्रुत आहे. बॉलीवूडचा शेवटचा फील-गुड चित्रपट कोणता होता किंवा ज्याच्या कलेक्शनची खूप चर्चा झाली होती असा चित्रपट लक्षात ठेवणे कठीण झालेय हे वास्तव आहे. त्या तुलनेत जर दक्षिणेच्या चित्रपटांबद्दल बोललो तर लगेचच 'RRR', 'KGF 2' आणि 'पुष्पा: द राइज' ही नावे समोर येतात. या चित्रपटांना मिळालेले व्यावसायिक यश अभिनंदनपात्र का आहे याची अलिकडे सातत्याने चर्चा होतेय. सिनेसृष्टीत दक्षिणोत्तर जे  काही घडते आहे त्यावर व बॉलीवूडमधल्या त्रुटींवर फोकस केला जातोय हे उत्तमच आहे मात्र काही प्रश्न चर्चेतून गायब आहेत जसे की दक्षिणेकडील ज्या चित्रपटांनी सणकून मार खाल्ला असे चित्रपट उत्तरेकडे चांगला व्यवसाय करतील का किंवा दक्षिणेकडे अपयशी ठरलेल्या चित्रपटांचे हिंदी रिमेक्स यशस्वी होतील का? दक्षिणेकडचे सर्वच चित्रपट ब्लॉकबस्टर हिट होताहेत का? तिकडच्या फ्लॉप सिनेमांची टक्केवारी किती आहे? असे मुद्दे चर्चेत नसतात! खरे तर यांची चर्चा झाली तर नेमके चित्र समोर येऊ शकते मात्र आपली माध्यमे अशी चर्चा करण्यात निरुत्साही दिसतात. किंबहुना ही मांडणीदेखील केली जात नाही. बॉलीवूडविरोधात सातत्याने बॉयकॉट मोहिमा चालवत असताना दक्षिणेकडील केवळ छप्परफाड यशाचेच गोडवे गायचे नि तिकडच्या 
समीरबापू
अपयशाविषयी मौन राहायचे असा एक फंडा सर्वत्र दिसतोय. याला राजकीय, आर्थिक, समाजिक नि धार्मिक कंगोरे असल्याने खरे स्वरूप समोर येणे तूर्तास कठीण दिसतेय हे स्पष्ट आहे. दक्षिणेकडेही मोठ्या संख्येने सिनेमे कोसळत आहेत. तिकडच्या सिनेनिर्मात्यांनी धास्ती घेऊन मध्यंतरी थेट ओटीटीवरच प्रदर्शित करण्याचा सपाटा लावला. परिणामी थिएटर्स ओस पडली, चित्रपटसृष्टीच्या तंत्रज्ञ मंडळींनाही फटका बसला; चित्रपट निर्मितीसह वितरणव्यवस्थेतही बेफाम बदल झाले त्यामुळे अपवाद वगळता सगळ्यांचे पेकाट मोडायच्या बेतात आले. याविरोधात आंदोलन उभं राहिलं, चक्क स्टुडिओ बंद ठेवले गेले, महिनाभर चित्रपटनिर्मिती बंद पडली वा पुढे ढकलली गेली. अर्थात ज्या सिनेमांनी तिकीटबारीवर टाकसाळ खोलली होती त्याच्या निर्मात्यांनी सावध भूमिका घेतली. मग काही दिवसांनी सारं सुरळीत झाल्याचा देखावा केला गेला. चित्रपट निर्मिती पुन्हा सुरु झाली मात्र मूळ दुखणे कमीअधिक फरकाने बदललेल्या स्वरुपात तसेच राहिले. हा विषय माध्यमांत फारसा चर्चेस आलाच नाही मात्र ज्या मोजक्या सिनेमांनी अफाट यश मिळवले होते त्यांचीच चर्चा अधिक झाली. दक्षिणेकडील फ्लॉप्सची नोंद घेतली तरीही हिंदी सिनेमाच्या यशाच्या उतरत्या आलेखाची कड घेता येत नाही हे वास्तव आहे.

रविवार, १५ जानेवारी, २०२३

विहीर..

#sameerbapu
विहीर .. 

तुळसाबाई म्हणजे बज्याबाची बाईल! नांगी तुटलेल्या खेकड्यागत तिरक्या चालीची बाई. तिला काही सांगितलं तर ती वाकड्यात जायची. तांबूस गोऱ्या रंगाची बुटक्या चणीची तुळसा सदानकदा ओसरीवर नाहीतर संत्याच्या पिंपळापाशी बसून असायची. डोईच्या केसांना इतके तेल थापलेले असे की पदर तेलकट वाटायचा! बंद्या रुपयाचं कुंकू तिच्या व्हंड्या कपाळी असायचं. चाफेकळी नाक नसले तरी नाकपुड्या फार काही फेंदारलेल्या नव्हत्या. उतरत्या गालांच्या चेहऱ्याला आखूड हनुवटीची जोड होती त्यामुळे पत्त्यातल्या चौकट राणीसारखा तिचा चेहरा दिसायचा. तिचा रुबाबही राणीसारखा होता, बज्या शेळकेच्या घरी तिचा शब्द अंतिम होता. बज्या तिच्या शब्दाबाहेर नव्हता याची अनेक कारणे होती त्यातली फार थॊडीच गावाला ठाऊक होती. तुळसा अगदी तिरसट आणि तापड होती, बज्याच्या मामाची पोरगी होती ती. मामाने थाटात लग्न लावून दिलेलं, रग्गड पैसाअडका खर्च केलेला. गरीब जावयाचं बोट पिवळंधमक केलेलं, पोरीच्या अंगावर बक्कळ सोनं घातलेलं. आपली पोरगी डोक्यातून गेलेली आहे हे त्या बापाला माहिती होतं म्हणूनच त्यानं भाच्याला पोरगी देताना त्याला पुरतं मिंधं केलं होतं. बज्याचे हात त्या ओझ्याखाली अडकले होते. सासऱ्याच्या मदतीने त्यानं जमीनजुमला घेतला नि तिथून त्याचे दिवस फिरले! सारं होत्याचं नव्हतं झालं.