गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

आयटी सेलचे - सोशल लिंचिंग


मुंबईमध्ये भाजपने आयोजित केलेल्या मोर्चात वाहतुकीची कोंडी झाल्यावर संतापलेल्या महिलेने आयोजक मोर्चेकरी आणि पोलिसांना धारेवर धरले. अनेकांनी त्या महिलेला समर्थन दिले तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती की या महिलेचे सोशल लिंचिंग होणार! आणि झालेही तसेच!

ही बाई घाण आहे, ही रांड आहे, ही वेश्या आहे, ही तर धंदेवाली छिनाल आहे अशा पोस्टचा रतीब घातला गेला! या पोस्ट टाकणारे लोक आणि यामुळे उत्तेजित होऊन त्यावर कमेंट करणारे, लाइक करणारे लोक जेमतेम आठवड्यापूर्वी नारी सन्मान, नारी वंदन, महिला हक्क इत्यादि गोष्टींवर रान हाणत होते! यांच्या मनात विद्रोही स्त्रियांबद्दल केवळ आणि केवळ गरळ साठली आहे हे नित्य अधोरेखित होत असतं. ही घटनाही त्याला अपवाद ठरली नाही.

मराठा बंधू आणि भगिनींना खुले पत्र..


हे पत्र, मी मराठा आहे म्हणून लिहिलेलं नसून एक सच्चा शिवभक्त म्हणून लिहिलं आहे हे आधी स्पष्ट करू इच्छितो. या पत्राचे प्रयॊजन आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याविषयीचे आहे.

बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजा हे स्वराज्यप्रेरिका, राजमाता जिजाऊ मां साहेबांचे जन्मस्थान. रयतेच्या माता असणाऱ्या जिजाऊंच्या जन्माने पावन झालेल्या बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या बुलढाणा शहरापासून, सिंदखेड राजा 80 किमी अंतरावर वसले आहे. जिजाऊंनी शिवबांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले, चारही पातशाहयांच्या विरोधात विद्रोह करण्याचे धडे दिले, अतुल्य पराक्रम, साहस, द्रष्टेपण, मुत्सद्दीपणा आणि रयतेच्या प्रेमाच्या बळावर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी स्वराज्य उभे केले. जगाच्या पाठीवर शिवरायांसारखा राजा आढळत नाही. शिवबांच्या अंगी सदगुणांची खाण होती त्यातलाच एक मुख्य म्हणजे स्त्रियांचा आदर सन्मान होय! 'परस्त्री मातेसमान' हे पुस्तकी वाक्य त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरलं होतं!

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

मटक्याची दुनियादारी!



नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन आणि संयुक्त निर्मिती असलेली 'मटका किंग' सिरिज पाहिली, मनात अनेक गोष्टींचे मोहोळ जागे झाले. त्या अनेक टपऱ्या आठवल्या आणि त्यांच्या नादाला लागून उध्वस्त झालेले संसार आठवले. मटक्याचे रकाने, काही खास दैनिकात येणारे आकड्यांचे अंदाज, फुल स्केप पेपरचे बरोबर बारा तुकडे करून त्या मध्ये कार्बन पेपर ठेवून दिली जाणारी टीप आठवली. सकाळ संध्याकाळच्या खास नेमक्या वेळी कासावीस होऊन आशाळभुतागत मटका टपरीवर जाऊन ओपन काय आले आहे आणि क्लोज काय आले आहे याचे अदमास घेणारे भुकेच्या डोहात बुडालेले चेहरे आठवले. मटका लागल्यावर ऐश करून पैसे उडवले जायचे आणि मोठी रक्कम हारली की देशी दारूचा गुत्ता जवळ केला जायचा. हारलेला माणूस पुन्हा पुन्हा पैसे लावत राहायचा. कधी तरी एकदा जिंकायचा मात्र बहुतांश वेळी तो गर्तेत जायचा. असं करत करत घरेच्या घरे मटक्याने गिळंकृत केली. पण जे मटका घेत होते त्यांचे काय झाले?

बऱ्याचदा मटका घेणारी माणसं तिशीतली चाळीशीतली असायची. रापलेल्या चेहऱ्याने विस्कटलेल्या केसांची ही माणसं मळकट बिन इस्त्रीच्या कपड्यांवर असायची. टपरीत दोन तीन देवी देवतांची चित्रे असत. साल संपून गेलेले कॅलेंडर असे. शाळेची काळी पाटी एका तारेला अडकवली जायची. पाटीच्या खाली कागदाच्या सुरळ्या असत. कोपऱ्यात कुठे तरी दोन तीन वह्या असत ज्यांची पाने भरलेली असत. सतरंजी अंथरूण त्यावर हा सदगृहस्थ बसलेला असे. गुटखा सुरु होण्याच्या आधीच्या काळात मावा नाहीतर तंबाखू जर्दा यांची गोळी जबड्यात दाबून ठेवलेल्या अवस्थेत तोंडातला तोबरा तसाच धरून ही माणसं येणाऱ्या जाणाऱ्यांचे निरीक्षण करत असत.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

जगण्याची आणि मोक्षाची, संगीतमय कश्मकश!


माणसाला त्याच्या मृत्यूची, मोक्षाची चाहूल लागत असेल का! काही दिवसांपूर्वी निवर्तलेल्या आशा भोसले यांना त्यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जे काही लिहिलं आहे, ते याकडेच निर्देश करते. आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये आशाताई, इंटरनॅशनल बँड 'गोरिल्लाज' सोबत दिसल्यात. पोस्टमधील फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये भारतीय वस्त्या, हत्ती आणि जीर्ण झालेल्या वस्तूंची दृष्टीस पडतात. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय -"The Shadowy Light' या गाण्याचा माझ्यासाठी अत्यंत सखोल अर्थ आहे. वाराणसीला भेट देऊन आणि पवित्र गंगा नदीच्या काठानं प्रवास करून, तसेच तिथे मला जे काही दिसलं, त्याचं बारकाईनं निरीक्षण करून आणि ते समजून घेऊन, मला जीवनाचा खरा अर्थ उमजला, मी कोण आहे आणि या पृथ्वीवर माझे काय प्रयोजन आहे. 'द शॅडोई लाइट' (The Shadowy Light) मध्ये, या खोल नदीचा पैलतीर गाठणं हे माझ्या जीवनप्रवासाचं प्रतीक आहे, माझा जन्म, माझे नातेसंबंध, संगीताप्रतीची माझी निष्ठा, माझी कर्तृत्व आणि एक कन्या, माता, भगिनी, पत्नी आणि एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्य. या प्रवासात, 'संगीत' हाच माझा नावाडी आहे, तो मार्गदर्शक, जो मला या जीवननदीच्या पैलतीरी घेऊन जातो. जेव्हा मी त्या पैलतीरावर पोहोचेन, तेव्हा माझा हा प्रवास पूर्ण होईल. तेव्हा मला 'मोक्ष' प्राप्त होईल, आपल्या सभोवताली सतत तरंगणाऱ्या अगणित नादांमध्ये मी विलीन होईन. जेव्हा त्यातील काही नाद एकत्र गुंफले जातात, तेव्हा त्यातून एक सुंदर सुरावट निर्माण होते. त्याचप्रमाणे, मी देखील त्या नादांपैकीच एक नाद बनेन, असा नाद, जो अंतिमतः एका सुंदर गीतातील सुराचं रूप धारण करेल. असं गीत, जे पिढ्यानपिढ्या, हजारो वर्षे सातत्यानं ऐकलं जात राहील. हेच स्वातंत्र्य, निसर्गाशी एकरूप होण्याचं स्वातंत्र्य, नदीच्या पलीकडील तीरावर माझी वाट पाहत आहे..."

बुधवार, ८ एप्रिल, २०२६

ऑर्केस्ट्रामधल्या डान्सर्सचा मागोवा!


हे थोडेसे गंभीर आणि महत्वाचे आहे.

बिहार निवडणुकांत प्रचार सुरू असताना मतदानापूर्वीच्या दिवसांत मी एक लेख लिहिला होता, जो सारन जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा डान्सर मुलींविषयीचा होता. बिहार, बंगाल, झारखंड या तीन राज्यांमधून मुली एस्कॉर्ट केल्या जातात आणि त्यांना एकतर जबरदस्तीने नाचवले जाते नाहीतर लालूच दाखवली जाते.

एकदा का शीलभ्रष्ट(!) झाले अथवा पैशाची चटक लागली की या मुली यातून बाहेर पडत नाहीत हे वास्तव आहे. या संपूर्ण धंद्याची सूत्रे सारन जिल्ह्यातील छपरा शहरामधून हलवली जातात. यात महिन्याकाठी कोट्यवधीचे व्यवहार होतात.