शनिवार, २३ मे, २०२६

ट्रेन, टागोर आणि एका वेश्येचा आत्मशोध!


26 डिसेंबर 1977 च्या दिवशी तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांच्या हस्ते मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे आताचे सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवून गीतांजली एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आलं. मुंबई ते हावडा असा तिचा रूट होता. महान कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या 'गीतांजली' या जगप्रसिद्ध पुस्तकाचे नाव ह्या ट्रेनला देण्यात आलं होतं. 'गीतांजली' म्हणजे 'गाण्यांची भेट'.

ही ट्रेन सुरू झाली, तेव्हा ती भारतातील पहिली क्लासलेस ट्रेन म्हणून ओळखली जात होती, म्हणजेच, सर्व वर्गांमध्ये समान सुविधा असलेली आणि वातानुकूलित डबे नसलेली ट्रेन असं तिचं स्वरूप होतं. हुगळी नदीच्या काठी असलेल्या हावडा शहरातलं हे स्टेशन, भारतातलं सर्वात मोठं आणि सर्वात व्यस्त, तसेच सर्वात जुन्या जंक्शनपैकी एक रेल्वे जंक्शन आणि मुंबईचं व्हीटी त्याच्या तोडीस तोड!

हुगळी नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले हावडा हे बंगालमधलं महत्त्वाचं औद्योगिक आणि वाहतूकीचं केंद्र असणारं शहर. हुगळी नदीच्या विरुद्ध दिशेला कोलकता आहे! कोलकात्याला जाण्यासाठी हावडा ब्रिजचं प्रवेशद्वार खूप फेमस आहे.

सियालदा, संत्रागाची, शालीमार, डंकुनी, कोलकाता आणि हावडा ही कोलकाता महानगराला सेवा देणारी प्रमुख आंतर-शहरी रेल्वे होत. अनेक भल्या बुऱ्या गोष्टींनी इथे जन्म घेतलाय. अनेक आख्यायिकांचे हे आगार आहे! डंकुनीची कथा तर अगदी विस्मयकारक आहे!

हिंगेर कोचोरी, कोरा पाकेर संदेश, मोघलाई पराठा, दम आलू, फिश करी, मटण करी ह्या हावडा स्टेशनच्या स्पेशल डिशेस. भेटकी माशाची फिश करी अजूनही लोकप्रिय आहे, स्थानिक बंगाली ह्याला बारामुंडी मासा म्हणतात. इथला लज्जतदार चहा विसरता येत नाही!

गीतांजली एक्सप्रेस पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ़ आणि महाराष्ट्र ह्या पाच राज्यातून धावते. दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिकरोड पर्यंत ह्या गाडीत एका विशिष्ट क्लासचं पब्लिक येतं. जळगाव, भुसावळ, वडनेरा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या भागातून प्रवास करताना राज्यातला असमतोल प्रवासातही जाणवू लागतो.

राज नंदगाव, दुर्ग, रायपूर, बिलासपूर क्रॉस करताना छत्तीसगढच्या आदिवासी भागाचा प्रत्यय त्या त्या स्थानकावर येतो. झारसागुडा, राउरकेला स्टेशन्सचा आगाज घामेजल्या देहाच्या प्रवाशांनी होतो. ट्रेन ओडीशा क्रॉस करून झारखंडमध्ये शिरते. ट्रेन छत्तीसगढमधून जाताना काही स्थानिक विक्रेते 'डुबकी कढी' घेऊन येतात, त्याचा अद्भुत दरवळ जाता जात नाही. उडीद डाळीचे मुटके असलेली कढी असं याचं वर्णन आपण करू शकतो. हरभरा डाळीपासून बनवलेल्या बफौरीची चव कुणीही विसरू शकत नाही.

चना पोडा, गरम वडा, खाजा आणि दालमा यांचे गंध आले की समजायचे की आपण ओडीशामधून जात आहोत! लिट्टी चोखा, झालमुरी, गव्हाच्या पिठापासून बनवलेले गोडसर ठेकूआ यांचा स्वाद झारखंडच्या स्टेशन्सवरून आपल्या डब्यात प्रसवू लागतो! खास करून चक्रधपूर आणि टाटानगर स्टेशन्सवर हा अनुभव येतोच! खरगपूर स्टेशन आलं की, आपण बंगालमध्ये आल्याची वर्दी मिळते. वाफाळता चहा आणि तेलीभाजा यांची एकत्र टेस्ट जिभेला खवळून जाते! शिणलेल्या अंगाने आपण हावडा स्टेशनला उतरतो तेव्हा मुंबईत असल्याचा फील येतो कारण, तिथला गोंगाट आणि घामेजलेपण!

ह्या सर्व प्रवासात साईड विंडो असणारा स्लीपर बर्थ मिळाला तर तो आनंद द्विगुणित होतो! कारण प्रत्येक शहरागणिक इथला निसर्ग कूस बदलतो, खाद्य पदार्थ आपली जिव्हा अधिकाधिक समृद्ध करत जातात! ह्या सर्व प्रवासात आपण जर रवींद्र संगीत ऐकले वा रवींद्रनाथांच्या कविता वाचल्या तर ह्या प्रवासाचे मर्म उलगडते! ट्रेनमधल्या माणसांचे पोत बदलत जातात आणि आपण कितीही धनाढ्य असलो तरी आपली असलियत आपल्या समोर उभी ठाकते! हा एकत्रित परिणाम असतो त्या सकल घटकांचा जे आपल्या सोबत प्रवासात येत जात राहतात!

ज्या हुगळी नदीच्या काठी हावडा शहर वसलेय त्या नदीला, तिच्यावरच्या प्रसिद्ध हावडा ब्रिजला आपण अनेक सिनेमांत पाहिलंय. वहिदा रेहमान, राजेश खन्ना, धर्मेंद्र अभिनित 'खामोशी'मधलं 'वो श्याम कुछ अजीब थी' हे गाणं इथल्या हावडा ब्रिजखाली शूट झालेलं. 'दो बिघा जमीन' पासून ते 'भूल भुलैय्या पार्ट थ्री' पर्यंत हा ब्रिज हिंदी सिनेमाचा घटक झालाय. 'राम तेरी गंगा मैली' मधला मणीलाल, आरके'ला ह्याच हावडा स्टेशनवर भेटलेला. इथेच त्याने आपल्या पापाची कबुली दिली आणि त्याच्या हातून अब्रूचे धिंडवडे निघालेल्या पहाडी मुलीची कहाणी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली. हावडा ब्रिज ह्या नावाने ज्यावर सिनेमा बनवला गेला त्या पुलाचे खरे नाव रवींद्र सेतू असेच होते; मात्र हे नाव फारसे प्रचलित झाले नाही. ही बाब देखील मधू दंडवते यांच्या पर्यंत पोहोचली असेल! असो!

जे दुःख गंगेच्या वाट्याला आले तेच हुगळीलाही सोसावे लागले. हुगळी ही गंगा नदीची सर्वात पश्चिमेकडील उपनदी. तिच्या वरच्या भागात, ती भागीरथी म्हणून ओळखली जाते. ती पुढे जाऊन फरक्काच्या प्रवाहात मिसळते, परिणामी तिचा वेग आणि जलसाठा लक्षणीयरीत्या वाढतो. नवोद्वीपजवळ जलंगी नदीशी तिचा संगम होतो आणि अखेरीस ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. अजय, दामोदर, रूपनारायण आणि हळदी ह्या तिच्या उपनद्या. ह्या प्रत्येकीची कथा वेगळी आहे!

नवोद्वीप आणि ईस्कॉनचे, चैतन्य महाप्रभू यांचे नाते सर्वश्रुत आहेच! वासनेतून सुरु झालेला प्रवास आत्म्याच्या शोधात संपतो, गंगेच्या ह्या प्रवाहाला हेच तर सुचवायचे नसेल? ही पोस्ट देखील याच कारणाने लिहिलीय. पद्मा मंडल आणि निशा दास ह्या दोन बंगाली बायकांमुळे ह्या बाबीचा विचार अशा पद्धतीने करण्याची दृष्टी मिळाली. पहिल्या काही भेटीत पद्मा मंडल, मला फारशी जिज्ञासू तल्लख वाटली नव्हती. मात्र तो गैरसमज होता हे लवकरच लक्षात आले. एक वेश्या असूनही तिला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कविता लक्षात होत्या. काही कविता तर तिने मुंबईला आल्यानंतर हेतुतः तोंडपाठ केल्या होत्या, त्याचे मूळ होते 'गीतांजली एक्सप्रेस'मध्ये!

कोलकत्याहुन मुंबईला येणाऱ्या बऱ्याच ट्रेन्स आहेत, त्यांच्या अनेक कहाण्या आहेत, त्यातलीच गीतांजली एक्सप्रेसची ही एक हटके नोंद. मुंबईत बंगाली वेश्यांची संख्या का वाढत राहिली आणि ह्या बायकांना बंगालमधून मुंबईत कसे आणले जायचे यावर खरेतर विस्तृत अभ्यास व्हायला हवा. आजघडीला वयाची साठी पार केलेल्या बायका कामाठीपुऱ्यात, बुधवार पेठेत अथवा गंगा जमुनामध्ये किंवा कबाडी बाजारमध्येही दृष्टीस पडत नाहीत. त्या कुठे गेल्या असतील हा सवाल वाजिब नाही, त्यामुळे मी तो विचारत नाही!

मात्र साधारणत: दशकापूर्वी ह्या बायका नजरेस पडायच्या. त्यातील काहींना बोलतं केल्यावर त्या सांगायच्या की, 'बंगालमधल्या कोणकोणत्या भागातून त्यांना कोलकत्यात कसे आणले गेले आणि अखेरीस रेल्वेद्वारे त्यांची रवानगी मुंबईत कशी झाली!' त्यांचा हा सफर दर्दनाक होता आणि त्या आठवणींना पुन्हा पुन्हा टोकरायचं म्हणजे त्यांना त्या जखमा पुन्हा बहाल करण्यासारखं होय.

ह्या बायका जेव्हा पौगंडावस्थेत होत्या तेव्हा त्यांना इथं आणलेलं. क्वचितच काहींना प्रौढ अवस्थेत आणलेलं, बाकी सगळ्या जणींना ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आणलेलं. इथे आल्यावर सुरुवातीला त्यांनी विरोध केला मात्र आपलं भाग्य बदलता येत नाही, हे वास्तव त्यांनी जेव्हा स्वीकारलं तेव्हा त्यांनी स्वतःला 'रंडी'च्या साच्यात उतरवलं! एकेक करून त्या ह्यात मुरत गेल्या, झिजत गेल्या, कुढत करपत गेल्या आणि अखेरीस लयास गेल्या!

बंगालमधील वीरभूम, मेदिनीपूर, बांकुरा, मालदा, मुर्शिदाबाद, साऊथ चोबीस परगणा ह्या जिल्ह्यातल्या बायका ह्या धंद्यात अधिक दिसतात कारण ह्या सर्व जिल्ह्यात मागास बहुल जातींची लोकसंख्या अधिक आहे. अशा बायकांपैकीच, विनिता दास आणि पद्मा मंडल दोघीही एकाच शहरातल्या, कूच बिहार हे त्यांचं शहर! त्या दोघींना इथं का यावं लागलं हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे, मात्र ज्या रेल्वेमधून त्यांना आणलं गेलं ती गीतांजली एक्सप्रेस होती! ही ट्रेन अतिशय वेगवान असल्याने त्यांची नेआण करण्यासाठी तिचा वापर करणे दलालांना सोयीस्कर ठरलं होतं.

विनिता आणि पद्मा दोघींनाही तो दिवस टक्क लक्षात होता ज्या दिवशी त्यांना गीतांजली एक्सप्रेसमधून इथं आणलं होतं. रेल्वेमधल्या सुविधांनी त्या हरखून गेल्या होत्या. मुंबईत आणल्यानंतर त्यांनी अनेक दिवस यातना सोसल्या मात्र काही केल्या गीतांजली एक्स्प्रेसमधील सुख त्या विसरू शकल्या नाहीत. त्यांच्या आयुष्यातले ते सर्वोच्च सुख होते.

दशकानंतर त्या कूचबिहारला आपल्या नातलगांना भेटायला गेल्या तेव्हा गीतांजलीनेच त्यांनी प्रवास केल्या मात्र आधीचा तो आनंद त्यांना लाभला नाही. पुन्हा कधीही त्यांनी गीतांजलीने प्रवास केला नाही. किंबहुना त्यानंतर फक्त एकदाच त्या बंगालला गेल्या. वृद्धत्वाकडे झुकल्यावर त्या कुठे गेल्या याचा कुणीही शोध घेतला नाही. मुळात हा देहभोगाचा परीघ आपल्या सभ्य पांढरपेशी जीवनाच्या परिघात अंतर्भूत होत नाही. असो.

निशा, पद्मा, रितू, नीलम ह्यांच्यासारख्या जितक्या म्हणून बायका बंगालमधून मुंबईला आणल्या जातात, त्या काही काळासाठी जर आपल्या गावी शहरी गेल्या तर त्यांची प्रथम पसंती गीतांजलीला असते! आताशा तिकीटांचे दर खूप वाढल्याने ह्यांचा वावर स्लीपर कोचमध्येच दिसतो. त्यांना जो फील येतो त्याची तुलना कशाशीही करता येत नाही आणि त्याची अनुभूती बाकी लोकांना कधीही येऊ शकत नाही!

मुंबई भेटीत पद्मा मंडलने 'गीतांजली'मधल्या एका कवितेचा अर्थ सांगितला होता - ही जपमाळ, भजन आणि माळ ओढणे सोडून दे! मंदिराच्या या बंद दारांच्या एकाकी, अंधाऱ्या कोपऱ्यात तू कोणाची उपासना करतोस? तुझे डोळे उघड आणि बघ, तुझा देव तुझ्यासमोर नाही!

जिथे शेतकरी मुरमाड जमीन नांगरतो आणि रस्ता तयार ककरण्यासाठीचा दगड फोडतो, तेथे ईश्वर असतो. तो उन्हात, पावसात, वाऱ्या वावदानांत त्यांच्यासोबत असतो आणि त्याचे दिव्य वस्त्र धुळीने माखलेले असते. तू देखील तुझे स्वच्छ वस्त्र उतरव आणि त्याच्याप्रमाणेच धुळीच्या भूमीवर उतर!

मुक्ती? ही मुक्ती कुठे मिळणार? आपल्या निर्मिकाने स्वत: होऊन आनंदाने सृष्टीचे बंधन स्वीकारले आहे; तो आपल्या सर्वांशी कायमचा बांधला गेला आहे. तेव्हा आपल्या ध्यानातून तू बाहेर ये; फुले व धूप बाजूला ठेव! तुझे कपडे फाटले आणि डागळले तर त्यात काय बिघडले? त्याला भेट आणि कष्टाने व घामाने त्याच्या पाठीशी उभा राहा...

नेमकी हीच कविता का सांगावीशी वाटली, याचे उत्तर देताना पद्माचे डोळे पाणावले होते. तिच्या नरम मृदू गुलाबी ओठांना कंप सुटला होता. पदराला चाळा करत ती उत्तरली - 'इथे मुंबईत आले तेव्हा ईश्वराची खूप आराधना करत असे. पण मी इथे का आले आणि ह्याच अवस्थेत किती दिवस असेन, याचे उत्तर ईश्वरपाशीही नव्हते! मग मी ठरवले की, आधी त्यालाच शोधेन मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते ठरवेन!'

आता, पद्माला ईश्वराचा अर्थ गवसलाय, तिने त्याचा शोध थांबवलाय. ज्यांनी तिला ह्या दलदलीत लोटले त्यांना तिने माफ केलेय. ती रूढार्थाने ज्ञानी नसली तरी तिचे ज्ञान एखाद्या तपस्वी योगी पुरुषाहूनअधिक वाटते. तिच्या जाणिवा आता समृद्ध झाल्यात. स्वतःच्या पेशाकडे पाहताना तिला आता शरम वाटत नाही की, किळसही वाटत नाही. अतिशय तटस्थपणे ती ह्या देहव्यापाराकडे पाहते! मला तर ती एखाद्या योगिनीसारखी वाटते!

काळेभोर लांबलचक मुलायम केस मोकळे सोडून, शून्यात नजर लावून बसलेल्या पद्माकडे पाहिले की रवींद्रनाथ आठवत; आता मात्र त्यांच्या कविता आठवतात! गुरुदेव आज हयात असते तर त्यांनी तिच्यावर कविता लिहिली असती. कधीकधी वाटते की, ह्या सर्व बायका म्हणजे गुरुदेवांच्या गीतांजलीच होत, समाजाने त्यांचा कणकण ओरबाडून घेतला तरीही त्या समाधानी आहेत, त्यांची स्वतःविषयी तक्रार नाही आणि ज्यांनी त्यांना हे करण्यास भाग पाडले आहे त्यांना तर, त्यांनी कधीच माफ केलं आहे!

गीतांजली एक्सप्रेसने प्रवास करताना ह्या बायकांना नजरेपुढे आणलं तर त्यांची घालमेल अंशतः तरी अनुभवता येते! स्त्रीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काही अंशी तरी बदलतो. हुगळीच्या काठावर बसून रवींद्रनाथांना वाचताना ह्यांची तडफड मनात तरळून गेली तर आपल्यात नक्कीच काही बदल जाणवतात! ह्या सकल अनुभूतीला आणखी एक कारण आहे, रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ टागोर यांच्या मालकीचे पन्नासहून अधिक वेश्यांचे कोठे होते!

वारसा हक्क आणि जमीनदारी ह्यातून रग्गड पैसा मिळूनही ऐशआरामाच्या ओढीने त्यांनी कोठ्यांची मालकी विकत घेतली. त्यातून त्यांना किती पैसा मिळाला हे कळायला मार्ग नाही. मात्र काही काळानंतर त्यांची संपत्ती लयास गेली. रवींद्रनाथांना हे सर्व आवडत नव्हते, त्यांनी त्यांची बरीचशी कागदपत्रे जाळून टाकली. त्यावर त्यांनी कधीही खुलून लिहिलं नाही. मात्र त्यांनी शब्दबद्ध केलेल्या विनोदिनी आणि श्यामा सारख्या पात्रांचा बारकाईने अभ्यास केला तर काही शोकात्म कयास नक्की लावता येतील!

व्यक्तिशः मला तरी पद्मा, निशा, रितू ह्या सगळ्याजणी रवींद्रनाथांच्या कविता वाटतात! एकांतात कधी त्यांना वाचायचा प्रयत्न केला तर अपराध भावनेने हृदय भरून येते आणि मन स्वार होते गीतांजली एक्सप्रेसमध्ये नि त्यांच्या गावी जाऊन पोहोचते, जिथे अजूनही त्या शोधत असतात त्यांचं निरागस अल्लड बालपण, त्यांचं भूतकाळातलं सुखी जीवन!

मानवी जीवनाचा खरा अर्थ शोधण्याची प्रक्रिया निरंतर जारी राहते. दरम्यान आयुष्याचा प्रवासही सुरु राहतो. गीतांजली एक्सप्रेसने प्रवास करण्याचा योग आला तर ह्या गोष्टींचे स्मरण काही काळ तरी आत्मचिंतनास प्रवृत्त करते.

- समीर गायकवाड