शनिवार, २३ मे, २०२६

ट्रेन, टागोर आणि एका वेश्येचा आत्मशोध!


26 डिसेंबर 1977 च्या दिवशी तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांच्या हस्ते मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे आताचे सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवून गीतांजली एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आलं. मुंबई ते हावडा असा तिचा रूट होता. महान कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या 'गीतांजली' या जगप्रसिद्ध पुस्तकाचे नाव ह्या ट्रेनला देण्यात आलं होतं. 'गीतांजली' म्हणजे 'गाण्यांची भेट'.

ही ट्रेन सुरू झाली, तेव्हा ती भारतातील पहिली क्लासलेस ट्रेन म्हणून ओळखली जात होती, म्हणजेच, सर्व वर्गांमध्ये समान सुविधा असलेली आणि वातानुकूलित डबे नसलेली ट्रेन असं तिचं स्वरूप होतं. हुगळी नदीच्या काठी असलेल्या हावडा शहरातलं हे स्टेशन, भारतातलं सर्वात मोठं आणि सर्वात व्यस्त, तसेच सर्वात जुन्या जंक्शनपैकी एक रेल्वे जंक्शन आणि मुंबईचं व्हीटी त्याच्या तोडीस तोड!

हुगळी नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले हावडा हे बंगालमधलं महत्त्वाचं औद्योगिक आणि वाहतूकीचं केंद्र असणारं शहर. हुगळी नदीच्या विरुद्ध दिशेला कोलकता आहे! कोलकात्याला जाण्यासाठी हावडा ब्रिजचं प्रवेशद्वार खूप फेमस आहे.

सियालदा, संत्रागाची, शालीमार, डंकुनी, कोलकाता आणि हावडा ही कोलकाता महानगराला सेवा देणारी प्रमुख आंतर-शहरी रेल्वे होत. अनेक भल्या बुऱ्या गोष्टींनी इथे जन्म घेतलाय. अनेक आख्यायिकांचे हे आगार आहे! डंकुनीची कथा तर अगदी विस्मयकारक आहे!

हिंगेर कोचोरी, कोरा पाकेर संदेश, मोघलाई पराठा, दम आलू, फिश करी, मटण करी ह्या हावडा स्टेशनच्या स्पेशल डिशेस. भेटकी माशाची फिश करी अजूनही लोकप्रिय आहे, स्थानिक बंगाली ह्याला बारामुंडी मासा म्हणतात. इथला लज्जतदार चहा विसरता येत नाही!

गीतांजली एक्सप्रेस पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ़ आणि महाराष्ट्र ह्या पाच राज्यातून धावते. दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिकरोड पर्यंत ह्या गाडीत एका विशिष्ट क्लासचं पब्लिक येतं. जळगाव, भुसावळ, वडनेरा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या भागातून प्रवास करताना राज्यातला असमतोल प्रवासातही जाणवू लागतो.

राज नंदगाव, दुर्ग, रायपूर, बिलासपूर क्रॉस करताना छत्तीसगढच्या आदिवासी भागाचा प्रत्यय त्या त्या स्थानकावर येतो. झारसागुडा, राउरकेला स्टेशन्सचा आगाज घामेजल्या देहाच्या प्रवाशांनी होतो. ट्रेन ओडीशा क्रॉस करून झारखंडमध्ये शिरते. ट्रेन छत्तीसगढमधून जाताना काही स्थानिक विक्रेते 'डुबकी कढी' घेऊन येतात, त्याचा अद्भुत दरवळ जाता जात नाही. उडीद डाळीचे मुटके असलेली कढी असं याचं वर्णन आपण करू शकतो. हरभरा डाळीपासून बनवलेल्या बफौरीची चव कुणीही विसरू शकत नाही.

चना पोडा, गरम वडा, खाजा आणि दालमा यांचे गंध आले की समजायचे की आपण ओडीशामधून जात आहोत! लिट्टी चोखा, झालमुरी, गव्हाच्या पिठापासून बनवलेले गोडसर ठेकूआ यांचा स्वाद झारखंडच्या स्टेशन्सवरून आपल्या डब्यात प्रसवू लागतो! खास करून चक्रधपूर आणि टाटानगर स्टेशन्सवर हा अनुभव येतोच! खरगपूर स्टेशन आलं की, आपण बंगालमध्ये आल्याची वर्दी मिळते. वाफाळता चहा आणि तेलीभाजा यांची एकत्र टेस्ट जिभेला खवळून जाते! शिणलेल्या अंगाने आपण हावडा स्टेशनला उतरतो तेव्हा मुंबईत असल्याचा फील येतो कारण, तिथला गोंगाट आणि घामेजलेपण!

ह्या सर्व प्रवासात साईड विंडो असणारा स्लीपर बर्थ मिळाला तर तो आनंद द्विगुणित होतो! कारण प्रत्येक शहरागणिक इथला निसर्ग कूस बदलतो, खाद्य पदार्थ आपली जिव्हा अधिकाधिक समृद्ध करत जातात! ह्या सर्व प्रवासात आपण जर रवींद्र संगीत ऐकले वा रवींद्रनाथांच्या कविता वाचल्या तर ह्या प्रवासाचे मर्म उलगडते! ट्रेनमधल्या माणसांचे पोत बदलत जातात आणि आपण कितीही धनाढ्य असलो तरी आपली असलियत आपल्या समोर उभी ठाकते! हा एकत्रित परिणाम असतो त्या सकल घटकांचा जे आपल्या सोबत प्रवासात येत जात राहतात!

ज्या हुगळी नदीच्या काठी हावडा शहर वसलेय त्या नदीला, तिच्यावरच्या प्रसिद्ध हावडा ब्रिजला आपण अनेक सिनेमांत पाहिलंय. वहिदा रेहमान, राजेश खन्ना, धर्मेंद्र अभिनित 'खामोशी'मधलं 'वो श्याम कुछ अजीब थी' हे गाणं इथल्या हावडा ब्रिजखाली शूट झालेलं. 'दो बिघा जमीन' पासून ते 'भूल भुलैय्या पार्ट थ्री' पर्यंत हा ब्रिज हिंदी सिनेमाचा घटक झालाय. 'राम तेरी गंगा मैली' मधला मणीलाल, आरके'ला ह्याच हावडा स्टेशनवर भेटलेला. इथेच त्याने आपल्या पापाची कबुली दिली आणि त्याच्या हातून अब्रूचे धिंडवडे निघालेल्या पहाडी मुलीची कहाणी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली. हावडा ब्रिज ह्या नावाने ज्यावर सिनेमा बनवला गेला त्या पुलाचे खरे नाव रवींद्र सेतू असेच होते; मात्र हे नाव फारसे प्रचलित झाले नाही. ही बाब देखील मधू दंडवते यांच्या पर्यंत पोहोचली असेल! असो!

जे दुःख गंगेच्या वाट्याला आले तेच हुगळीलाही सोसावे लागले. हुगळी ही गंगा नदीची सर्वात पश्चिमेकडील उपनदी. तिच्या वरच्या भागात, ती भागीरथी म्हणून ओळखली जाते. ती पुढे जाऊन फरक्काच्या प्रवाहात मिसळते, परिणामी तिचा वेग आणि जलसाठा लक्षणीयरीत्या वाढतो. नवोद्वीपजवळ जलंगी नदीशी तिचा संगम होतो आणि अखेरीस ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. अजय, दामोदर, रूपनारायण आणि हळदी ह्या तिच्या उपनद्या. ह्या प्रत्येकीची कथा वेगळी आहे!

नवोद्वीप आणि ईस्कॉनचे, चैतन्य महाप्रभू यांचे नाते सर्वश्रुत आहेच! वासनेतून सुरु झालेला प्रवास आत्म्याच्या शोधात संपतो, गंगेच्या ह्या प्रवाहाला हेच तर सुचवायचे नसेल? ही पोस्ट देखील याच कारणाने लिहिलीय. पद्मा मंडल आणि निशा दास ह्या दोन बंगाली बायकांमुळे ह्या बाबीचा विचार अशा पद्धतीने करण्याची दृष्टी मिळाली. पहिल्या काही भेटीत पद्मा मंडल, मला फारशी जिज्ञासू तल्लख वाटली नव्हती. मात्र तो गैरसमज होता हे लवकरच लक्षात आले. एक वेश्या असूनही तिला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कविता लक्षात होत्या. काही कविता तर तिने मुंबईला आल्यानंतर हेतुतः तोंडपाठ केल्या होत्या, त्याचे मूळ होते 'गीतांजली एक्सप्रेस'मध्ये!

कोलकत्याहुन मुंबईला येणाऱ्या बऱ्याच ट्रेन्स आहेत, त्यांच्या अनेक कहाण्या आहेत, त्यातलीच गीतांजली एक्सप्रेसची ही एक हटके नोंद. मुंबईत बंगाली वेश्यांची संख्या का वाढत राहिली आणि ह्या बायकांना बंगालमधून मुंबईत कसे आणले जायचे यावर खरेतर विस्तृत अभ्यास व्हायला हवा. आजघडीला वयाची साठी पार केलेल्या बायका कामाठीपुऱ्यात, बुधवार पेठेत अथवा गंगा जमुनामध्ये किंवा कबाडी बाजारमध्येही दृष्टीस पडत नाहीत. त्या कुठे गेल्या असतील हा सवाल वाजिब नाही, त्यामुळे मी तो विचारत नाही!

मात्र साधारणत: दशकापूर्वी ह्या बायका नजरेस पडायच्या. त्यातील काहींना बोलतं केल्यावर त्या सांगायच्या की, 'बंगालमधल्या कोणकोणत्या भागातून त्यांना कोलकत्यात कसे आणले गेले आणि अखेरीस रेल्वेद्वारे त्यांची रवानगी मुंबईत कशी झाली!' त्यांचा हा सफर दर्दनाक होता आणि त्या आठवणींना पुन्हा पुन्हा टोकरायचं म्हणजे त्यांना त्या जखमा पुन्हा बहाल करण्यासारखं होय.

ह्या बायका जेव्हा पौगंडावस्थेत होत्या तेव्हा त्यांना इथं आणलेलं. क्वचितच काहींना प्रौढ अवस्थेत आणलेलं, बाकी सगळ्या जणींना ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आणलेलं. इथे आल्यावर सुरुवातीला त्यांनी विरोध केला मात्र आपलं भाग्य बदलता येत नाही, हे वास्तव त्यांनी जेव्हा स्वीकारलं तेव्हा त्यांनी स्वतःला 'रंडी'च्या साच्यात उतरवलं! एकेक करून त्या ह्यात मुरत गेल्या, झिजत गेल्या, कुढत करपत गेल्या आणि अखेरीस लयास गेल्या!

बंगालमधील वीरभूम, मेदिनीपूर, बांकुरा, मालदा, मुर्शिदाबाद, साऊथ चोबीस परगणा ह्या जिल्ह्यातल्या बायका ह्या धंद्यात अधिक दिसतात कारण ह्या सर्व जिल्ह्यात मागास बहुल जातींची लोकसंख्या अधिक आहे. अशा बायकांपैकीच, विनिता दास आणि पद्मा मंडल दोघीही एकाच शहरातल्या, कूच बिहार हे त्यांचं शहर! त्या दोघींना इथं का यावं लागलं हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे, मात्र ज्या रेल्वेमधून त्यांना आणलं गेलं ती गीतांजली एक्सप्रेस होती! ही ट्रेन अतिशय वेगवान असल्याने त्यांची नेआण करण्यासाठी तिचा वापर करणे दलालांना सोयीस्कर ठरलं होतं.

विनिता आणि पद्मा दोघींनाही तो दिवस टक्क लक्षात होता ज्या दिवशी त्यांना गीतांजली एक्सप्रेसमधून इथं आणलं होतं. रेल्वेमधल्या सुविधांनी त्या हरखून गेल्या होत्या. मुंबईत आणल्यानंतर त्यांनी अनेक दिवस यातना सोसल्या मात्र काही केल्या गीतांजली एक्स्प्रेसमधील सुख त्या विसरू शकल्या नाहीत. त्यांच्या आयुष्यातले ते सर्वोच्च सुख होते.

दशकानंतर त्या कूचबिहारला आपल्या नातलगांना भेटायला गेल्या तेव्हा गीतांजलीनेच त्यांनी प्रवास केल्या मात्र आधीचा तो आनंद त्यांना लाभला नाही. पुन्हा कधीही त्यांनी गीतांजलीने प्रवास केला नाही. किंबहुना त्यानंतर फक्त एकदाच त्या बंगालला गेल्या. वृद्धत्वाकडे झुकल्यावर त्या कुठे गेल्या याचा कुणीही शोध घेतला नाही. मुळात हा देहभोगाचा परीघ आपल्या सभ्य पांढरपेशी जीवनाच्या परिघात अंतर्भूत होत नाही. असो.

निशा, पद्मा, रितू, नीलम ह्यांच्यासारख्या जितक्या म्हणून बायका बंगालमधून मुंबईला आणल्या जातात, त्या काही काळासाठी जर आपल्या गावी शहरी गेल्या तर त्यांची प्रथम पसंती गीतांजलीला असते! आताशा तिकीटांचे दर खूप वाढल्याने ह्यांचा वावर स्लीपर कोचमध्येच दिसतो. त्यांना जो फील येतो त्याची तुलना कशाशीही करता येत नाही आणि त्याची अनुभूती बाकी लोकांना कधीही येऊ शकत नाही!

मुंबई भेटीत पद्मा मंडलने 'गीतांजली'मधल्या एका कवितेचा अर्थ सांगितला होता - ही जपमाळ, भजन आणि माळ ओढणे सोडून दे! मंदिराच्या या बंद दारांच्या एकाकी, अंधाऱ्या कोपऱ्यात तू कोणाची उपासना करतोस? तुझे डोळे उघड आणि बघ, तुझा देव तुझ्यासमोर नाही!

जिथे शेतकरी मुरमाड जमीन नांगरतो आणि रस्ता तयार ककरण्यासाठीचा दगड फोडतो, तेथे ईश्वर असतो. तो उन्हात, पावसात, वाऱ्या वावदानांत त्यांच्यासोबत असतो आणि त्याचे दिव्य वस्त्र धुळीने माखलेले असते. तू देखील तुझे स्वच्छ वस्त्र उतरव आणि त्याच्याप्रमाणेच धुळीच्या भूमीवर उतर!

मुक्ती? ही मुक्ती कुठे मिळणार? आपल्या निर्मिकाने स्वत: होऊन आनंदाने सृष्टीचे बंधन स्वीकारले आहे; तो आपल्या सर्वांशी कायमचा बांधला गेला आहे. तेव्हा आपल्या ध्यानातून तू बाहेर ये; फुले व धूप बाजूला ठेव! तुझे कपडे फाटले आणि डागळले तर त्यात काय बिघडले? त्याला भेट आणि कष्टाने व घामाने त्याच्या पाठीशी उभा राहा...

नेमकी हीच कविता का सांगावीशी वाटली, याचे उत्तर देताना पद्माचे डोळे पाणावले होते. तिच्या नरम मृदू गुलाबी ओठांना कंप सुटला होता. पदराला चाळा करत ती उत्तरली - 'इथे मुंबईत आले तेव्हा ईश्वराची खूप आराधना करत असे. पण मी इथे का आले आणि ह्याच अवस्थेत किती दिवस असेन, याचे उत्तर ईश्वरपाशीही नव्हते! मग मी ठरवले की, आधी त्यालाच शोधेन मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते ठरवेन!'

आता, पद्माला ईश्वराचा अर्थ गवसलाय, तिने त्याचा शोध थांबवलाय. ज्यांनी तिला ह्या दलदलीत लोटले त्यांना तिने माफ केलेय. ती रूढार्थाने ज्ञानी नसली तरी तिचे ज्ञान एखाद्या तपस्वी योगी पुरुषाहूनअधिक वाटते. तिच्या जाणिवा आता समृद्ध झाल्यात. स्वतःच्या पेशाकडे पाहताना तिला आता शरम वाटत नाही की, किळसही वाटत नाही. अतिशय तटस्थपणे ती ह्या देहव्यापाराकडे पाहते! मला तर ती एखाद्या योगिनीसारखी वाटते!

काळेभोर लांबलचक मुलायम केस मोकळे सोडून, शून्यात नजर लावून बसलेल्या पद्माकडे पाहिले की रवींद्रनाथ आठवत; आता मात्र त्यांच्या कविता आठवतात! गुरुदेव आज हयात असते तर त्यांनी तिच्यावर कविता लिहिली असती. कधीकधी वाटते की, ह्या सर्व बायका म्हणजे गुरुदेवांच्या गीतांजलीच होत, समाजाने त्यांचा कणकण ओरबाडून घेतला तरीही त्या समाधानी आहेत, त्यांची स्वतःविषयी तक्रार नाही आणि ज्यांनी त्यांना हे करण्यास भाग पाडले आहे त्यांना तर, त्यांनी कधीच माफ केलं आहे!

गीतांजली एक्सप्रेसने प्रवास करताना ह्या बायकांना नजरेपुढे आणलं तर त्यांची घालमेल अंशतः तरी अनुभवता येते! स्त्रीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काही अंशी तरी बदलतो. हुगळीच्या काठावर बसून रवींद्रनाथांना वाचताना ह्यांची तडफड मनात तरळून गेली तर आपल्यात नक्कीच काही बदल जाणवतात! ह्या सकल अनुभूतीला आणखी एक कारण आहे, रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ टागोर यांच्या मालकीचे पन्नासहून अधिक वेश्यांचे कोठे होते!

वारसा हक्क आणि जमीनदारी ह्यातून रग्गड पैसा मिळूनही ऐशआरामाच्या ओढीने त्यांनी कोठ्यांची मालकी विकत घेतली. त्यातून त्यांना किती पैसा मिळाला हे कळायला मार्ग नाही. मात्र काही काळानंतर त्यांची संपत्ती लयास गेली. रवींद्रनाथांना हे सर्व आवडत नव्हते, त्यांनी त्यांची बरीचशी कागदपत्रे जाळून टाकली. त्यावर त्यांनी कधीही खुलून लिहिलं नाही. मात्र त्यांनी शब्दबद्ध केलेल्या विनोदिनी आणि श्यामा सारख्या पात्रांचा बारकाईने अभ्यास केला तर काही शोकात्म कयास नक्की लावता येतील!

व्यक्तिशः मला तरी पद्मा, निशा, रितू ह्या सगळ्याजणी रवींद्रनाथांच्या कविता वाटतात! एकांतात कधी त्यांना वाचायचा प्रयत्न केला तर अपराध भावनेने हृदय भरून येते आणि मन स्वार होते गीतांजली एक्सप्रेसमध्ये नि त्यांच्या गावी जाऊन पोहोचते, जिथे अजूनही त्या शोधत असतात त्यांचं निरागस अल्लड बालपण, त्यांचं भूतकाळातलं सुखी जीवन!

मानवी जीवनाचा खरा अर्थ शोधण्याची प्रक्रिया निरंतर जारी राहते. दरम्यान आयुष्याचा प्रवासही सुरु राहतो. गीतांजली एक्सप्रेसने प्रवास करण्याचा योग आला तर ह्या गोष्टींचे स्मरण काही काळ तरी आत्मचिंतनास प्रवृत्त करते.

- समीर गायकवाड

गुरुवार, २१ मे, २०२६

प्रियंकांचे 'राजीव' संस्कार!


21 मे 1991 रोजी रात्रीच्या अकराच्या सुमारास, तमिळनाडूमधील श्रीपेरंबुदूर येथे राजीव गांधींना जो हार घातला होता त्यातील स्फोटकांचा आणि थनू ह्या आत्मघाती स्त्रीने स्वतःभोवती लपेटलेल्या बॉम्बचा स्फोट झाला, त्या क्षणी संपूर्ण भारताला हादरा बसला! अनेकांचे काळीज विदीर्ण झाले. राजीव गांधी यांच्यासह १४ लोकांचा मृत्यू झाला, ४३ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. देशभरात संताप आणि दुःखाची लाट पसरली!

त्या हत्याकांडात सहभागी असलेल्या LTTE च्या सदस्यांपैकी नलिनी श्रीहरन ही एक मुख्य आरोपी होती. आधी तिला मृत्युदंडाची शिक्षा झाली. मात्र, वर्षानुवर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर, 2008 मध्ये एक अत्यंत भावनिक आणि वादग्रस्त घटना घडली.

रविवार, ३ मे, २०२६

निषेधाची अगरबत्ती!


बुवा बाबा बलात्कार करतो, तेव्हा समाजातला एक घटक लगेच त्याची बाजू घेऊन पोकळ युक्तिवाद करतो. म्हणजेच धार्मिक शेड्स असणाऱ्या कोणत्याही धर्माच्या नीच इसमाच्या मागे त्या समाजातला एक तरी हिस्सा कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने उभा असतो.बलात्काराचा गुन्हा शाबित होऊन सजा भोगून बाहेर आलेल्या अधम पुरूषांचा सत्कार एका विशिष्ट विचारसरणीचे, पक्षाचे लोक करताना दिसतात. विशेष म्हणजे याच्या निषेधार्थ त्या विचारांच्या, त्या पक्षाच्या एकाही माणसाला यावर ब्र शब्द उच्चारावा असे वाटत नाही. ही नैतिकता हेच त्यांचे खरे चरित्र असते!

आमदारासारखे लोकप्रतिनिधी सामान्य माणसाला धमकावतात की तुझ्या आईला झ**, तुझ्या बहिणीला *वतो, बायकोचा फो** फाडतो.. तेव्हा पोलिस सांगतात की हा अदखलपात्र गुन्हा आहे. म्हणजेच सार्वजनिक रित्या बलात्कार करण्याची धमकी देणं गंभीर नाही, त्याने कुणाची आयमाय एक केली तरच कायद्याचे स्तंभन होणार! एरव्ही आरोपी गबरगंड असला की पोलिसांचे वीर्यपतन ठरलेलं असतं.

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

आयटी सेलचे - सोशल लिंचिंग


मुंबईमध्ये भाजपने आयोजित केलेल्या मोर्चात वाहतुकीची कोंडी झाल्यावर संतापलेल्या महिलेने आयोजक मोर्चेकरी आणि पोलिसांना धारेवर धरले. अनेकांनी त्या महिलेला समर्थन दिले तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती की या महिलेचे सोशल लिंचिंग होणार! आणि झालेही तसेच!

ही बाई घाण आहे, ही रांड आहे, ही वेश्या आहे, ही तर धंदेवाली छिनाल आहे अशा पोस्टचा रतीब घातला गेला! या पोस्ट टाकणारे लोक आणि यामुळे उत्तेजित होऊन त्यावर कमेंट करणारे, लाइक करणारे लोक जेमतेम आठवड्यापूर्वी नारी सन्मान, नारी वंदन, महिला हक्क इत्यादि गोष्टींवर रान हाणत होते! यांच्या मनात विद्रोही स्त्रियांबद्दल केवळ आणि केवळ गरळ साठली आहे हे नित्य अधोरेखित होत असतं. ही घटनाही त्याला अपवाद ठरली नाही.

मराठा बंधू आणि भगिनींना खुले पत्र..


हे पत्र, मी मराठा आहे म्हणून लिहिलेलं नसून एक सच्चा शिवभक्त म्हणून लिहिलं आहे हे आधी स्पष्ट करू इच्छितो. या पत्राचे प्रयॊजन आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याविषयीचे आहे.

बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजा हे स्वराज्यप्रेरिका, राजमाता जिजाऊ मां साहेबांचे जन्मस्थान. रयतेच्या माता असणाऱ्या जिजाऊंच्या जन्माने पावन झालेल्या बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या बुलढाणा शहरापासून, सिंदखेड राजा 80 किमी अंतरावर वसले आहे. जिजाऊंनी शिवबांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले, चारही पातशाहयांच्या विरोधात विद्रोह करण्याचे धडे दिले, अतुल्य पराक्रम, साहस, द्रष्टेपण, मुत्सद्दीपणा आणि रयतेच्या प्रेमाच्या बळावर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी स्वराज्य उभे केले. जगाच्या पाठीवर शिवरायांसारखा राजा आढळत नाही. शिवबांच्या अंगी सदगुणांची खाण होती त्यातलाच एक मुख्य म्हणजे स्त्रियांचा आदर सन्मान होय! 'परस्त्री मातेसमान' हे पुस्तकी वाक्य त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरलं होतं!

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

मटक्याची दुनियादारी!



नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन आणि संयुक्त निर्मिती असलेली 'मटका किंग' सिरिज पाहिली, मनात अनेक गोष्टींचे मोहोळ जागे झाले. त्या अनेक टपऱ्या आठवल्या आणि त्यांच्या नादाला लागून उध्वस्त झालेले संसार आठवले. मटक्याचे रकाने, काही खास दैनिकात येणारे आकड्यांचे अंदाज, फुल स्केप पेपरचे बरोबर बारा तुकडे करून त्या मध्ये कार्बन पेपर ठेवून दिली जाणारी टीप आठवली. सकाळ संध्याकाळच्या खास नेमक्या वेळी कासावीस होऊन आशाळभुतागत मटका टपरीवर जाऊन ओपन काय आले आहे आणि क्लोज काय आले आहे याचे अदमास घेणारे भुकेच्या डोहात बुडालेले चेहरे आठवले. मटका लागल्यावर ऐश करून पैसे उडवले जायचे आणि मोठी रक्कम हारली की देशी दारूचा गुत्ता जवळ केला जायचा. हारलेला माणूस पुन्हा पुन्हा पैसे लावत राहायचा. कधी तरी एकदा जिंकायचा मात्र बहुतांश वेळी तो गर्तेत जायचा. असं करत करत घरेच्या घरे मटक्याने गिळंकृत केली. पण जे मटका घेत होते त्यांचे काय झाले?

बऱ्याचदा मटका घेणारी माणसं तिशीतली चाळीशीतली असायची. रापलेल्या चेहऱ्याने विस्कटलेल्या केसांची ही माणसं मळकट बिन इस्त्रीच्या कपड्यांवर असायची. टपरीत दोन तीन देवी देवतांची चित्रे असत. साल संपून गेलेले कॅलेंडर असे. शाळेची काळी पाटी एका तारेला अडकवली जायची. पाटीच्या खाली कागदाच्या सुरळ्या असत. कोपऱ्यात कुठे तरी दोन तीन वह्या असत ज्यांची पाने भरलेली असत. सतरंजी अंथरूण त्यावर हा सदगृहस्थ बसलेला असे. गुटखा सुरु होण्याच्या आधीच्या काळात मावा नाहीतर तंबाखू जर्दा यांची गोळी जबड्यात दाबून ठेवलेल्या अवस्थेत तोंडातला तोबरा तसाच धरून ही माणसं येणाऱ्या जाणाऱ्यांचे निरीक्षण करत असत.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

जगण्याची आणि मोक्षाची, संगीतमय कश्मकश!


माणसाला त्याच्या मृत्यूची, मोक्षाची चाहूल लागत असेल का! काही दिवसांपूर्वी निवर्तलेल्या आशा भोसले यांना त्यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जे काही लिहिलं आहे, ते याकडेच निर्देश करते. आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये आशाताई, इंटरनॅशनल बँड 'गोरिल्लाज' सोबत दिसल्यात. पोस्टमधील फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये भारतीय वस्त्या, हत्ती आणि जीर्ण झालेल्या वस्तूंची दृष्टीस पडतात. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय -"The Shadowy Light' या गाण्याचा माझ्यासाठी अत्यंत सखोल अर्थ आहे. वाराणसीला भेट देऊन आणि पवित्र गंगा नदीच्या काठानं प्रवास करून, तसेच तिथे मला जे काही दिसलं, त्याचं बारकाईनं निरीक्षण करून आणि ते समजून घेऊन, मला जीवनाचा खरा अर्थ उमजला, मी कोण आहे आणि या पृथ्वीवर माझे काय प्रयोजन आहे. 'द शॅडोई लाइट' (The Shadowy Light) मध्ये, या खोल नदीचा पैलतीर गाठणं हे माझ्या जीवनप्रवासाचं प्रतीक आहे, माझा जन्म, माझे नातेसंबंध, संगीताप्रतीची माझी निष्ठा, माझी कर्तृत्व आणि एक कन्या, माता, भगिनी, पत्नी आणि एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्य. या प्रवासात, 'संगीत' हाच माझा नावाडी आहे, तो मार्गदर्शक, जो मला या जीवननदीच्या पैलतीरी घेऊन जातो. जेव्हा मी त्या पैलतीरावर पोहोचेन, तेव्हा माझा हा प्रवास पूर्ण होईल. तेव्हा मला 'मोक्ष' प्राप्त होईल, आपल्या सभोवताली सतत तरंगणाऱ्या अगणित नादांमध्ये मी विलीन होईन. जेव्हा त्यातील काही नाद एकत्र गुंफले जातात, तेव्हा त्यातून एक सुंदर सुरावट निर्माण होते. त्याचप्रमाणे, मी देखील त्या नादांपैकीच एक नाद बनेन, असा नाद, जो अंतिमतः एका सुंदर गीतातील सुराचं रूप धारण करेल. असं गीत, जे पिढ्यानपिढ्या, हजारो वर्षे सातत्यानं ऐकलं जात राहील. हेच स्वातंत्र्य, निसर्गाशी एकरूप होण्याचं स्वातंत्र्य, नदीच्या पलीकडील तीरावर माझी वाट पाहत आहे..."

बुधवार, ८ एप्रिल, २०२६

ऑर्केस्ट्रामधल्या डान्सर्सचा मागोवा!


हे थोडेसे गंभीर आणि महत्वाचे आहे.

बिहार निवडणुकांत प्रचार सुरू असताना मतदानापूर्वीच्या दिवसांत मी एक लेख लिहिला होता, जो सारन जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा डान्सर मुलींविषयीचा होता. बिहार, बंगाल, झारखंड या तीन राज्यांमधून मुली एस्कॉर्ट केल्या जातात आणि त्यांना एकतर जबरदस्तीने नाचवले जाते नाहीतर लालूच दाखवली जाते.

एकदा का शीलभ्रष्ट(!) झाले अथवा पैशाची चटक लागली की या मुली यातून बाहेर पडत नाहीत हे वास्तव आहे. या संपूर्ण धंद्याची सूत्रे सारन जिल्ह्यातील छपरा शहरामधून हलवली जातात. यात महिन्याकाठी कोट्यवधीचे व्यवहार होतात.

शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

सलाम बॉम्बे - प्रेमाचे उदास क्षण...



‘सलाम बॅांम्बे'मध्ये पंधरा सोळा वर्षांची एक विलक्षण कोवळी मुलगी लाईनमध्ये आणलेली असते. तिला या विश्वातलं खाण्यापिण्याचं, नटण्यामुरडण्याचं सुखही लोभसवाणं वाटतं. तिची नथ उतरवण्याच्या वेळेस तिचा सौदा होतो.

कृष्णा हा त्याच एरियात चहा नाश्ता पोहोचवण्याचं काम करणारा अनाथ पोर. तिथलं बदमाश पब्लिक त्याला चायपाव म्हणूनच हाक मारतं. ते त्याचं टोपणनाव.

चौदा पंधरा वर्षांचा हा चुणचुणीत पोरगा त्या मुलीवर जीव लावून बसतो! त्या मुलीची तिथली पहचान ‘सोला साल‘ या नावाची!

या कोवळ्या मुलीला ‘बाबा‘चं आकर्षण असतं. बाबा (नाना पाटेकर) हा तिथला नामचीन दलाल. त्याचं रफटफ वागणं, त्याचं व्यसनी असणं आणि त्याचा अय्याशी रूबाब तिला खुणावतो.

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

गोष्ट सिडनी शेल्डनची!

 


ही गोष्ट अशा लेखकाची आहे, ज्यांची पुस्तके जगातल्या कोणत्याही देशातील कोणत्याही मोठ्या शहरातील बुक स्टॉलवर विक्रीस उपलब्ध आहेत! ज्यांच्या  पुस्तकांच्या वाचनाचा आनंद आजही नव्या पिढीसह जुने वाचकही घेतात! मात्र या लेखकाचे आयुष्य साधे सरळ नव्हते, त्यांच्या आयुष्यात अनेक उतार चढाव येऊन गेले. ज्यांना लेखनासाठी शेरेबाजीही ऐकून घ्यावी लागली!
तुम्ही अमुक वयातच लिहू शकता किंवा तुम्हाला कादंबरी कधीच लिहिता येणार नाही अशा अर्थाची वाक्ये अनेक जण अधून मधून फेकत असतात. मात्र हे सदासर्वकाळ सत्यच असेल असे काही नाही. जगातली सर्वाधिक खपाची पुस्तके लिहिणाऱ्या आणि साहित्यातील महत्वाचे पुरस्कार मिळवणाऱ्या वैश्विक कीर्तीच्या एका लेखकांनी वयाच्या अठराव्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यांची पहिली कादंबरी वयाच्या 53 व्या वर्षी लिहिली होती!

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

बदलता सिनेमा आणि ‘एआय’चे युग!


देशात स्वातंत्र्याचा लढा जोरात होता तेव्हा भारतीय सिनेमा मुख्यत्वे मायथॉलॉजिकल पौराणिक विषयांवर आधारित असायचा.


पन्नासच्या दशकात हिंदी सिनेमात आदर्शवाद हा मुख्य विषय असायचा. नायक शिक्षक, मजूर, शेतकरी असत; क्वचित डॉक्टर, वकील देखील असत, आणि शहरातल्या / गावातल्या अविवेकी व्यक्तीविरोधात त्याचा संघर्ष असे.

साठच्या दशकात आदर्शवादाला रोमँटीसिझमची जोड मिळाली आणि आदर्श प्रेमी युगुल सिनेमाच्या केंद्रस्थानी दिसू लागलं. त्यांच्या प्रेमात अडथळे आणणाऱ्या गोष्टी आताच्या काळात आपल्याला चौकटबंद वाटत असतील मात्र त्या काळात नैतिकता, विवेक, आदर्शवाद, त्याग, करुणा आस्था यांना जे महत्व होतं ते पाहू जाता त्या चौकटी कालानुरूपच होत्या असे म्हणावे लागेल.

सत्तरच्या दशकात सिनेमामध्ये आर्थिक सामाजिक विषमता हळूहळू समोर येऊ लागली. नायक नायिका यांच्यातील कुणीतरी गरीब असायचं आणि तरीही ते एकमेकावर प्रेम करायचे. सोन्याची बिस्किटे आणि घड्याळे यांची स्मगलिंग करणारे स्मग्लर्स या काळात हिंदी सिनेमाच्या खलनायकीत रुजले होते. झाडाआड लपून प्रेम करणारे कपल असायचे आणि फुलाला फुल बिलगल्याचे दाखवले जायचे.

बुधवार, २८ जानेवारी, २०२६

अजितदादा पवार: जननायक कर्मयोद्धा!


महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात एक चमकदार तारा काल निखळला. काल बारामती विमानतळाजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी ते महाराष्ट्रातील जनतेस पोरके सोडून गेले! त्यांच्या आठवणी, त्यांचे भाषण, सभा आणि जनसेवेचा वारसा कायम राहील. 'दादा' म्हणून ओळखले जाणारे अजित पवार केवळ यशस्वी राजकारणी नव्हते, तर एक कर्तबगार प्रशासक, शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मित्र आणि कुटुंबवत्सल मायाळू व्यक्ती होते. ते जितके मृदु मुलायम होते तितकेच वज्रनिश्चयी आणि प्रसंगी कठोर वाटावे अशा व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुन्न झाला आहे, आणि त्यांच्या स्मृतींचे आभाळ पुन्हा पुन्हा भरून येत आहे. त्यांची अनेक भाषणे, त्यांची देहबोली, त्यांचं वागणं, त्यांचं कार्यमग्न असणं, त्यांच्या वैयक्तिक आठवणी आणि लाडक्या जनतेप्रती त्यांचं समर्पित असणं आदी गोष्टींद्वारे त्यांची उणीव अधिक गहिरी होतेय! लोकाभिमुख कामे करणाऱ्या अजितदादांची प्रतिमा 'टग्या' अशी का निर्माण केली असेल हा प्रश्न राहून राहून पडतो! कदाचित राजकीय डावपेचातून हे घडले असावे! असो. वास्तवात त्यांची भाषणे आणि त्यांची कामाची शैली तसेच त्यांच्याकडे कामे घेऊन जाणाऱ्या माणसांचे अनुभव पाहू जाता त्यांची प्रतिमा 'कामाचा माणूस' अशीच असायला हवी होती!

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

फायर ऑफ लव्ह - निसर्ग आणि मानवाच्या प्रेमाचे महाकाव्य!




सारा डोस दिग्दर्शित 'फायर ऑफ लव्ह' ही डॉक्युमेंटरी म्हणजे केवळ दोन ज्वालामुखी तज्ज्ञांच्या कार्याचा आलेख नाही, तर तो निसर्ग, विज्ञान आणि प्रेम यांच्या अद्वैताचा एक नितांत सुंदर आविष्कार आहे. कात्या आणि मॉरिस क्राफ्ट या फ्रेंच दाम्पत्याच्या आयुष्यावर आधारित हा माहितीपट प्रेक्षकांना एका अशा जगात घेऊन जातो, जिथे मृत्यूच्या सावलीतही जीवनाचे विलोभनीय संगीत ऐकू येते. कात्या आणि मॉरिस या दोघांचेही ज्वालामुखीवर असलेले प्रेम हे त्यांच्या वैयक्तिक प्रेमापेक्षाही अधिक उत्कट होते की काय, असा प्रश्न ही डॉक्युमेंटरी पाहताना पडतो. ही केवळ दोन भिन्नलिंगी शास्त्रज्ञांची कथा नसून 'निसर्गाच्या काळजाचे ठोके' ऐकणाऱ्या दोन वेड्या निसर्गप्रवाशांची गाथा आहे. 1970 आणि 80 च्या दशकात त्यांनी टिपलेले ज्वालामुखीचे थरारक चित्रीकरण हा या डॉक्युमेंटरीचा मुख्य कणा आहे. 'लाल ज्वालामुखी' (Red Volcanoes) आणि 'राखाडी ज्वालामुखी' (Grey Volcanoes) यांच्यातील भेद स्पष्ट करतानाच, मानवी अस्तित्वाची क्षणभंगुरता यात प्रभावीपणे मांडली आहे. क्राफ्ट दाम्पत्याने ज्वालामुखी विज्ञानात (Volcanology) मोलाची भर घातली आहे. त्यांच्या संशोधनाचे दोन मुख्य भाग पडतात - लाल ज्वालामुखी हे प्रामुख्याने हवाई किंवा आइसलँडमधील ज्वालामुखी होते. यात लाव्हा संथपणे वाहतो. कात्या आणि मॉरिस यांनी या लाव्हाच्या प्रवाहाचा वेग, त्याचे तापमान (जे अनेकदा 1000 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते) आणि त्यातील वायूंचे उत्सर्जन यांचा सखोल अभ्यास केला. राखाडी ज्वालामुखी हे सर्वात धोकादायक ज्वालामुखी मानले जातात. 1980 मधील 'माउंट सेंट हेलेन्स'च्या उद्रेकानंतर क्राफ्ट दांपत्याने आपला मोर्चा या राखाडी ज्वालामुखींकडे वळवला.

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

सुगंधा!


काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मंडईलगतच्या रस्त्याच्या कडेला एक अंध चिमुरडी उभी असायची.

तो रस्ता तिच्या परिचयाचा असावा
तिचे अंध वडील तिथेच कुठेतरी आसपास असायचे, तिच्या हाती अंध व्यक्तींची छोटी काठी दिसे.

तिचा चेहरा वाहतुकीच्या सन्मुख असे, रोज सकाळी ठराविक वेळी ती कुणाची तरी वाट पाहत उभी असे.
दरम्यान त्याच वेळी एक हार गजरे विकणारा
वृध्द इसम तिथे येई
बहुतेक त्यांची ओळख असावी.

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

गोष्ट एका मायाळू घोडीची!



थोरले आजोबा हमालीचे काम करायचे, त्यांच्याकडे एक बैलगाडी होती. छकडाही होता. त्यावर पोती लादून ती पोच करायचे,ट्रक ट्रॉलीमध्ये चढवायचे काम ते करायचे. त्यांच्या चुलत भावाकडे एक टांगा होता आणि दोन घोडे होते. पडीक रान होतं, ज्यात धान्य भाजीपाला पिकवावा म्हटलं तर पाणी नव्हतं. आजोबांच्या घरालगत बरीचशी मुस्लिम वस्ती होती. जवळच्या दर्ग्याला लागून सारी घरं वसली होती. दर्गा ओलांडला की काही अंतरावर हमरस्ता होता. सकाळीच ताज्या दूध भाकरीची न्याहरी करून आज्जा हमालीसाठी घराबाहेर पडायचा. आज्जा बाहेर पडताच टांगा घेऊन त्यांचा चुलत भाऊ देखील बाहेर पडायचा. टांग्याला जुंपलेल्या घोड्याचे नाव होतं शेरा! खास हौस म्हणून ठेवलेल्या दुसऱ्या दोन घोड्यांना रपेटीसाठी वापरले जायचे. त्यात एक नर होता आणि एक मादी. हिरा आणि राणी ही त्यांची नावं.