ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

द राँग ट्रेन थिअरी - स्वतःच्या शोधाची गोष्ट!

‘द राँग ट्रेन थिअरी‘ नावाचे एक गृहीतक जपानमध्ये प्रसिद्ध आहे. कधीकधी चुकीचे लोक आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातात मात्र तो प्रवास सहनशीलतेचा अंत पाहतो! ‘द राँग ट्रेन थिअरी‘मध्ये एक सुंदर आणि तितकीच दुःखद गोष्ट आहे.
 
कधीकधी आपण चुकीचा मार्ग स्वीकारतो, चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा चुकीच्या जागी खूप वेळ थांबून राहतो. चुकीचे करिअर निवडतो, चुकीच्या गावी स्थलांतरित होतो, चुकीच्या नात्यात - भावनांत गुंतून पडतो, चुकीच्या कल्पनांना आपलं विश्व मानतो, चुकीच्या शब्दांना भुलतो - बळी पडतो, असं बरंच काही चुकीचं आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात स्वीकारलेलं असतं.

हे आपल्यासोबतच का घडतं? खरे तर आपण जेव्हा या निर्णयाचा स्वीकार केलेला असतो तेव्हा सुरुवातीला हे सगळं आपल्याला खूप भारी वाटत असतं. हे सर्व आपल्या मनासारखं घडतंय या आनंदात आपण मग्न होतो.

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

गोष्ट वीज कोसळण्याच्या योगायोगाची आणि झांबळमधल्या कथेची!


एका विलक्षण योगायोगाची वा कदाचित अज्ञात ऊर्जेची ही पोस्ट. 4 जून 1737 ची घटना. कॅलेब पिकमन हा बावीस वर्षांचा तरुण त्याच्या आईला भेटायला घरी आला होता. कॅलेब हा सागरी कप्तान होता. सागरी मोहिमा पूर्ण झाल्या की सहा महिन्यांनी तो घरी यायचा. घटनेच्या दिवशीही तो समुद्री सफर पूर्ण करून घरी आला होता. तो पावसाचा दिवस होता, किंचित भिजलेल्या कॅलेबने दरवाजाबाहेर अडकवलेली धातूपट्टी ओढून डोअरबेल वाजवली, त्याच्या आईने आतून हाक मारल्यावर आपण दाराबाहेर उभं असल्याचं त्यानं सांगितलं. त्याची वयस्क आई दारापाशी येऊन दरवाजा उघडेपर्यंत आकाशात विजेचा कडकडाट झाला. कॅलेबच्या आईने दार उघडून पाहिलं तर तिचा मुलगा दाराबाहेर मृतावस्थेत पडला होता. वीज कोसळून अवघ्या निमिषार्धात त्याचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील सालेम या समुद्रकिनारी असलेल्या शहरात ही घटना घडली.

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

नदीत लुप्त झालेल्या जिवांच्या शोधातला मनाचा डोह!

A person swimming in the water

AI-generated content may be incorrect.


बंगालमधली एक जुनी क्लिप पाहण्यात आली, त्यात साठीच्या आसपास वय असणाऱ्या वृद्धेविषयीची माहिती होती. तिचे घर पंधरा वर्षांपूर्वी नदीच्या पुरात वाहून गेलेलं. घरातल्या सगळ्या चीजवस्तुही वाहून गेल्या. पती निवर्तल्यापासून ती एकटीच राहायची, तिच्या हटवादी स्वभावामुळे दोन्ही मुले तिला सोडून गेली. 2010 मध्ये तिची एकुलती मुलगी बाळंतपणाला माहेरी आली होती. रात्रीतून दामोदर नदीचे पाणी वाढले आणि त्यात तिचे घर वाहून गेले, तिच्या मुलीचे शव काही दिवसा नंतर मिळाले.

त्या घटनेनंतर तिच्या मनावर खोल आघात झाला. सरकारने तिला नवे घर दिले, भांडीकुंडी घेण्यासाठी मदतही केली. अनेक विणवण्या केल्यानंतर तिने स्थलांतर केले. लोक तिला विसरून गेले. मात्र चार वर्षांनी फार मोठा पूर आला तेव्हा ती पुन्हा तिथे परतली. पूरग्रस्तांसोबत राहू लागली. सरकारी अधिकारी पुराची पाहणी करण्यास आले की ती हमखास समोर असे.

शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

शिऊलीची फुलं - अलंकृताची लोभस नोंद!

काही माणसं अगदी लोभस वर्णन करतात, केवळ एका ओळीतच ते अफाट काही सांगून जातात. कोलकत्यात फिरताना अलंकृता दासच्या घरी गेलो होतो. सोबत अबीर होता, निहायत बडबड्या स्वभावाचा हुशार तरुण! माझ्या येण्याचे प्रयोजन सांगताच अलंकृताच्या जास्वंदी चेहऱ्यावर तृप्ततेची फुले उमल्ली! माझ्या नि अबीरच्या प्रश्नांवर ती भरभरून बोलत होती.

आमच्याशी बोलत असताना पांढऱ्या शुभ्र साडीच्या पदराच्या टोकाशी तिच्या हातांचा चाळा सुरू होता तो एकाएकी थांबला आणि थांबा, तुम्हाला काहीतरी तजेलदार प्यायला देते असं म्हणत ती आत गेली.

दोनच खोल्यांचे तिचे घर अगदी नीटस होतं, अतिशय देखणं होतं! घरात श्रीमंती कुठेच डोकावत नव्हती मात्र एका कलावंत रसिक व्यक्तीचे ते घर आहे हे पाहता क्षणी लक्षात येत होतं.

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

बशीर बद्र - खामोशी एका शायराची..

बशीर बद्र सरांना त्यांचा ख़ुदा आता नक्कीच दिसत असेल..


विख्यात शायर, कवी बशीर बद्र आजारी असल्याचं ऐकून वाचून होतो. मध्यंतरी काही नतद्रष्ट लोकांनी त्यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल केली होती, वास्तवात ते गंभीर आजारी आहेत.

नुकताच त्यांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला, ज्यात बद्र सरांच्या पत्नी राहत बद्र, त्यांची शुश्रूषा करताना दिसल्या, बशीर सरांची यारदाश्त चांगली राहावी म्हणून त्यांच्या शेरो शायरीबद्दल बोलताना दिसल्या, बद्र सरांना डिमेन्शिया आणि अल्झायमरने ग्रासलेय.

त्यांचा भूतकाळ ते हळूहळू विसरत चाललेत, त्यांच्या माणसांची त्यांना ओळख लागेनाशी झालीय. त्यांचं स्वतःचं अस्तित्वही ते काही काळात विसरतील. त्यांचा जीव की प्राण असणारी शायरीदेखील त्यांच्या स्मरणनोंदीतून लुप्त होईल.

ते ब्लँक होतील. उरेल केवळ, त्यांची मंद गतीतली धडधडती नब्ज!

सोमवार, १९ मे, २०२५

गोष्ट, सरहद्दीची सीमा नसणाऱ्या नद्यांची आणि स्त्रियांची!


हा फोटो आज रात्रीचा आहे, बांगलादेशातील मित्राने पाठवला आहे. भारतीय सीमेलगतच्या बांगलादेशमधील 'राजशाही' या शहरालगत पद्मा नदी वाहते. फोटोमध्ये हिरव्या रंगात दिसणारे राजशाही शहर आहे, त्याच्या पुढे काळसर करडे दिसणारे पद्मा नदीचे विशाल पात्र आहे आणि नदी पात्रापलीकडे एका रेषेत दिसत असलेले फ्लड लाइट्स असलेला भाग म्हणजे भारतीय हद्दीचा भूभाग आहे. राजशाहीच्या टेकडीवरून हा फोटो घेतलाय आणि भारतीय हद्दीत चमकत असणाऱ्या वीजा त्यात कैद झाल्या आहेत.

मंगळवार, ६ मे, २०२५

तू रूह है तो मैं काया बनूँ..

तू रूह है तो मैं काया बनूँ

प्रियदर्शिनी अकॅडमीच्या कार्यक्रमासाठी ट्रेनने मुंबईला गेलो होतो. ट्रेन पुण्यात थांबल्यानंतर एक अत्यंत तरुण उमदं कोवळं पोरगं ट्रेनमध्ये चढलेलं. त्याचं नेमकं माझ्या समोरचं बुकिंग होतं. रात्रीची वेळ होती. काही वेळात ट्रेन निघाली. त्याचे डबडबलेले डोळे एसी कोचच्या फिकट निळ्या उजेडात स्पष्ट दिसत होते. मधूनच तो ग्लासविंडो मधून बाहेर पाहत माझी नजर चुकवण्याचा प्रयत्न करत होता. थोड्या वेळाने मीच नजर हटवली. त्याच्या मोबाईलवर एकच गाणं शफल मोडमध्ये प्ले होत होतं.

बुधवार, ३० एप्रिल, २०२५

अक्षय तृतीया - शेतकरी ते बांके बिहारी!


अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा असे मेसेज आजच्या दिवशी अनेक जण पाठवतात मात्र अक्षय तृतीया म्हणजे काय, या दिवसाचे नेमके महत्व काय हे अनेकांना सांगता येत नाही. भारत पूर्वापार कृषक देश आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेला इथला चरितार्थाचा व्यवसाय म्हणजे शेती. शेतीचा आणि अक्षय तृतीयेचाही संबंध आहे. गुढीपाडव्याला शेतीमधील कामांची मशागत सुरू होते. गुढीपाडवा चैत्र प्रतिपदेस असतो, यादिवशी नांगरटीची सुरुवात होते. मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे मराठी ऋतूचक्रातले अखेरचे चार महीने. या चार महिन्यातले ऊन आणि अक्षय तृतीयेचे ऊन यांचे एक गणित असते.

सोमवार, २८ एप्रिल, २०२५

द्रौपदीची थाळी

 द्रौपदीची थाळी..


वृद्धाश्रमाचे प्रातिनिधिक चित्र   


परवा दिवशीचे मदतीचे आवाहन वाचून वृद्धाश्रमातील 77 वर्षांच्या आज्जीनी काल फोन केला होता आणि विचारणा केली की, "थोडीशीच रक्कम आहे, तेव्हढी रक्कम चालेल का?"

बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता.
रिकाम्या वेळी मेणबत्त्या, खडू तयार करून त्यांनी जमा केलेली ती रक्कम होती.

मागे काही वेळा मी त्यांना भेटलोय. त्यांच्याविषयी पोस्टही केली होती.
त्यांच्या केअरटेकर फेसबुक वापरतात. माझी पोस्ट त्यांना वाचून दाखवतात.

मदतीची 'ती' पोस्ट वाचून त्यांचे मन राहवले नाही. त्यांनी हट्ट धरला की समीरला फोन लावून द्या, थोडे पैसे साठले आहेत, त्याला देऊन टाकते.

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

गावाकडचे उन्हाळ्यातले दिवस..


आमच्या भागात उन्हाळा संपेपर्यंत पारा आता चाळीस डिग्रीहून खाली येत नाही. आणखी अडीच महीने सूर्य आग ओकत राहतो. दुपारी रस्ते ओस पडतात. गावाकडे शेतशिवारं रखरखीत वाटू लागतात. ज्यांची बागायत असते तेही घायकुतीला येतात, काही तालेवार यातही हात मारतात! जिरायतवाल्यांच्या तोंडाचे पाणी पळते. रान भुसभुशीत होऊन जातं. खुरटी झुडपंही मान टाकतात. दूरवरच्या माळांनी सगळं गवत शुष्क पिवळं करडं होऊन जात. बांधावरच्या बोरी बाभळी मौन होतात. शेतांच्या कडेने असणाऱ्या वडाच्या झाडांपाशी सावल्यांची झिल्मील अव्याहत जारी राहते.

मंगळवार, २५ मार्च, २०२५

माती आठवणींच्या थडग्याची!


लिंगायत समाजाचा मित्र आहे. त्याच्या आईचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. विधिवत घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. मल्लिकार्जुन मंदिराला वळसा घालून अंतिम दर्शन घेऊन लिंगायत स्मशानभूमीत दाखल झाली. तिथं आधीच निर्धारीत केलेल्या जागी खड्डा खोदून ठेवला होता. अखेरचे विधी सुरु झाले नि मित्र कासावीस झाला. त्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडिलांच्या अपरोक्ष आईने लहानाचे मोठे केले होते. तिच्या परीने तिने सर्वोच्च योगदान दिले होते. तिचे आता कुठे सुखाचे दिवस आले होते नि ती चटका लावून निघून गेली. उमेदीच्या काळात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मित्राचं लग्नही उशिरा झालं नि अपत्य व्हायलाही बराच वेळ लागला. परिणामी अंगणात सानुली पाऊलं खेळण्याची त्या वृद्ध माऊलीची इच्छाही विलक्षण लांबली. मित्राची मुलगी जस्ट पाच वर्षांची. तिची आणि आज्जीची दोस्ती जिवाशिवासारखी! आज्जी गेली नि ती पोरगी पार हबकून गेली. स्मशानभूमीत ती टक लावून म्हाताऱ्या शेवरीला पाहत होती! मांडी घालून बसलेल्या अवस्थेत त्यांना माती देण्यात आली. दफनविधी पूर्ण झाल्यानंतर सारे आप्त स्नेही पुन्हा कोपऱ्यातल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोळा झाले. तिथे महंत गुरव लोकांची काही बोलणी झाली. काहींनी श्रद्धांजली वाहिली. हे सर्व होत असताना त्या चिमुरड्या मुलीचे लक्ष आज्जीला जिथे दफन केलं होतं त्याच जागेकडे होते. खरेतर बहुतांश मंडळी इथे लहान मुलांना आणत नाहीत मात्र मित्राचं म्हणणं असं आलं की मुलीच्या मनात आज्जीच्या अंतिम स्मृती खोट्या वा लपवलेल्या स्थितीतल्या नसलेल्या बऱ्या, तिच्या आज्जीचा एकेकाळी शेतीवाडीवर फार जीव होता अखेर ती मातीतच विलीन झाली हे तिला कधीतरी योग्य पद्धतीने आकळण्यासाठी तिला तो तिथे घेऊन आला होता. आता आणखी काही वर्षे तरी ही जागा आणि ही वेळ त्या मुलीच्या विस्मरणात जाणं शक्य नाही. मात्र कधी कधी या गोष्टींचा त्रासही होतो. 

गुरुवार, २० मार्च, २०२५

होळी, प्रेमाला आसुसलेल्या जिवांची!

 

   

काल धुलिवंदनानिमित्त शहराबाहेरच्या एका वृद्धाश्रमातील कार्यक्रमास गेलो होतो. बऱ्याच मोठ्या संख्येत वयोवृद्ध तिथे वास्तव्यास आहेत. तिथल्या काहींची देहबोली अगदी हतबलतेची तर काही चेहरे पूर्णतः निर्विकार, टोटल ब्लॅंक! तर काही चेहऱ्यांवरती उसन्या अवसानाची ग्वाही देणारं केविलवाणं हास्य तर काही मात्र रसरशीत वार्धक्यास संघर्षासह सामोरे जाणारे नितांत प्रसन्न चेहरे! तरीही एकुणात ते सारे ओकेबोकेसे लोक ज्यांना त्यांच्याच कुणीतरी जिवलगाने तिथं भरती केलेलं कधी काळी. कुठल्या तरी दिवशी आणून सोडलं असेल.

साऱ्यांच्या चेहऱ्यांवर सुरकुत्यांची नक्षी होती, भाळीच्या आठ्यांचं जाळे कोरीव झालेलं. काहींच्या डोईची चांदी विरळ होऊ लागलेली तर काहींची नजर क्षीण झालेली तर काहींची नजर पैलतीरी लागलेली स्पष्ट दिसत होती. तर काहींची देहबोली अजूनही आव्हानांना छातीवर झेलणारी! काही कंबरेत वाकलेले तर काहींना पाठीवर पोक आलेला! अंगी जुनेच तरीही स्वच्छ कपडे. परिसरातही काटेकोर स्वच्छता आणि सेवाभावी कर्मचारी वर्ग.

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

आठवणींची फुलवात ..


ओळखीच्या कुटुंबातील प्रौढ मतिमंद मुलाचे नुकतेच निधन झाले. चाळीशी पार वय होते त्याचे. त्याला दोन भावंडे होती जी नॉर्मल होती.
हा धाकटा होता. याचे वडील काही वर्षांपूर्वी निर्वतलेले. याची दोन्ही भावंडे लग्न होऊन संसाराला लागलेली. त्यांच्या बायकांना दाढीमिशा आलेला, कथित बेढब दिसणारा वयस्कर प्रौढ दीर सांभाळणे जिकिरीचे आणि काही प्रमाणात अवघडणारे लाजेचे वाटत असावे. अथवा आणखीही काही पारिवारीक वा व्यावहारिक कारण असावे.

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

सुखाचे घर!



सोलापुरात आमचे घर ज्या परिसरात आहे तिथे वेगाने नवनवी बांधकामे होताहेत. गेल्या दशकापासून या भागाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. वीस वर्षांपूर्वी इथे घासगवताने वेढलेला इलाखा होता. आता मात्र मोकळी जमीन नजरेसही पडत नाही. इथे बांधकामावरचे मजूर नित्य नजरेस पडतात. या संपूर्ण भागात बांधकामांवर सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवण्यासाठी काही माणसं नेमली जातात. रामय्या आणि त्याची बायको भारती हे इथे दोन दशकापासून याच कामावर आहेत. अनेक प्रोजेक्टवर त्यांनी हे काम इमाने इतबारे केलेय. बांधकाम साहित्याची राखण केली आहे.

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

स्वर्गसुखाच्या भेटीगाठी!


दिवाळसण सरताच आपलं घर मागं टाकून अनेक बिनचेहऱ्याची माणसं आपापल्या घाण्याला जुंपून घेण्यासाठी वेगवेगळ्या इप्सित शहरांकडे रवाना झाली होती. दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरणारी मंडळी आणि उदास देहबोलीने कामावर रुजू होण्यासाठी निघालेली माणसं एकाच बसमधून प्रवास करत होती. असो. आज सकाळच्या प्रवासात माझ्या शेजारी एक बऱ्यापैकी वयस्क विधवा महिला बसून होती.

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

हिरवाई..

समीरगायकवाड
हिरवाई 


आज पुष्कळ हिरवाई दिसतेय. त्याविषयी काही अवांतर. गावाकडं एखादा पिकल्या केसांचा वा अर्धवट वयाचा डंगरा इसम बाईलवेडा झाल्यागत वागू लागतो तेव्हा 'गडी लई हिरवट' असल्याचा शेरा मारला जातो.
'पिकल्या पानाचा देठ की ओ हिरवा..' ही संकल्पना यातूनच उगम पावलेली!

'पांढरे केस, हिरवी मने' या नावाचे वि. द. घाटे यांचे पुस्तक जीवनासक्त व्यक्तींच्या आयुष्याचा धांडोळा घेणारे आहे. ते 'कथित' हिरवट नाहीये. असो.

शांता शेळके यांची 'पाकोळी' ही कविता सुप्रसिद्ध आहे. कवितेची सुरुवातच हिरवी 'झाडी या शब्दांनी केलीय.
हिरवी झाडी, पिवळा डोंगर, निळी-सावळी दरी,
बेट बांबुचे त्यातुन वाजे, वार्‍याची पावरी.
कभिन्न काळ्या खडकांमधुनी, फुटति दुधाचे झरे.
संथपणे गिरक्या घेती, शुभ्र शुभ्र पाखरे!.. '

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

आईच्या आठवणींचा पाऊस!


पावसाळ्यात वेगवेगळ्या वस्तू सादळून जातात, वातड होतात. त्यांची चव बदलते. आई होती तेव्हा घरात बहुतेक जर्मन पितळाचे डबे होते. त्यातल्या बहुतांश डब्यांची झाकणे बिघडलेली असत, सांदीतून फटीतून हवा आत जाऊन आपलं काम चोखपणे पार पाडे. आई यावर शक्कल लढवत असे, जुनेर साड्यांचे तुकडे डब्याच्या तोंडावर लावून मग झाकण लावत असे. आतल्या वस्तू सादळत नसत. जुनेर साड्या नसल्या की वर्तमानपत्रांची पाने त्यांची कसर भरून काढत. आईचा कल मात्र साड्यांच्या तुकड्यांकडे असे.

डब्यात ठेवलेल्या वाळवणाच्या वस्तू पावसाळी हवेत तळून, भाजून खाताना त्याला निराळाच स्वाद येई. डबा उघडताच आईच्या साडीचा तो स्निग्ध मायागंध दरवळे! आता एअरटाईट कंटेनर असतात, वस्तू सादळत नाहीत मूळ चव शाबित राहते मात्र त्यात तो मायेचा स्निग्ध परिमळ दरवळत नाही! कालपरवा जुन्या बोहारीण मावशी घरी आल्या होत्या, घर हुडकत हुडकत आल्या होत्या. आसपास बांधकामे पुष्कळ झाल्याने घर लवकर सापडले नाही म्हणून हैराण झाल्या होत्या. ‘घरात जुने काही कपडे असतील तर दे बाबा’, असं म्हणत हेका लावून बसल्या होत्या. अलीकडे अपवाद वगळता घरोघरी रोजच्याला कुणी साडी नेसत नाही याची त्यांना खंत होती. एक्स्टर्नल कॉलेज करत असणाऱ्या त्यांच्या तरुण सुनेला घेऊन आल्या होत्या! 

मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

किस ऑफ लाइफ आणि आत्महत्या!


घटना १९६७ सालची आहे. १७ जुलै १९६७,अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील जॅक्सनविले शहर. एका ओव्हरहेड वायरमधून स्पार्किंग होत असल्याने विजेची समस्या उद्भवली तेंव्हा शहराच्या देखभाल विभागाद्वारे दोन लाईनमन्सवर दुरुस्तीची जबाबदारी सोपवली गेली. निरोप मिळताच भर दुपारी त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. वेळेत काम केले नाही तर नागरिकांना त्रास सोसावा लागेल याची त्यांना जाणीव होती त्यामुळे एक क्षणही न दवडता त्यांनी अत्यंत नेटाने कामावर फोकस ठेवला. काही तासांतच त्यांचं काम जवळपास उरकत आलं होतं आणि तेव्हढ्यात घात झाला.

रॅन्डल चॅम्पियन ह्या तरुण लाईनमनकडून अनवधानाने दुसऱ्या एका उच्च दाबाच्या वायरला अवघ्या काही क्षणांसाठीच स्पर्श झाला. त्या उच्च दाबाच्या वायरला स्पर्श करताच त्याला जोराचा झटका बसला. खरे तर तत्क्षणीच त्याचा मृत्यू झाला असता. मात्र त्याचं प्राक्तन तसं नव्हतं. झटका बसताच तो काहीसा मागे रेटला गेला नि त्यावेळी तो वायरवरील सपोर्टवर बसून असल्याने जागीच उलटा लटकला गेला. जिथे लाइन फॉल्ट होती तिथे एकूण चार ओव्हरहेड वायर्स होत्या, पैकी मधल्या वायरला त्याचा स्पर्श झाला होता, दरम्यान एकदम वरच्या वायरच्या दुरुस्तीचे कामही त्याच वेळी सुरू होते. त्याच पोलवर त्याचा सहकारी जे. डी. थॉमसनकडे या कामाची जबाबदारी होती. आपला सहकारी रॅन्डल याला उच्च दाबाच्या वायरमधून जोरदार शॉक बसला असल्याचे निमिषार्धात त्याच्या लक्षात आले, पोलवर पाय ओणवे करून उभं राहत त्यानं त्याला कवेत घेतलं आणि ताबडतोब त्याला तोंडावाटे श्वास देणं सुरू केलं.

मंगळवार, ९ जुलै, २०२४

येऊ दे बरकत या पेरणीला!

#sameerbapu

यंदाचा उन्हाळा अत्यंत प्रखर उन्हांचा होता. उकाड्याने जिवाची घालमेल होत होती, दिवसा घराबाहेर फिरणे असह्य झाले होते. ग्रामीण भाग असो की शहरी भाग सर्वत्र उन्हाचा तडाखा होता. नद्यांचे प्रवाह कोरडे पडले, कित्येक धरणं रिकामी होण्याच्या स्थितीत आली, तप्त कोरड्या हवेची दुपार असे नि धग टिकून असणारी संध्याकाळ अंधार उरात घेऊन येई. किमान सकाळच्या वेळेस तरी थोडी शीतलता असावी असं राहून राहून वाटायचं मात्र ते सुखही नशिबी नव्हतं. केवळ मध्यरात्रीचे काही तास वगळता दिवसभर उष्म्याची काहिली होती. निव्वळ मनुष्यप्राण्यास याची झळ बसली असेही काही नव्हते. अख्खे चराचरच जणू होरपळून निघाले होते. धुळीत माखलेली झाडे माना तुकवून निश्चलपणे उन्हे सोसत मुकाट उभी असत, ना कुठली पानांची सळसळ नि ना कुठली वाऱ्याची आल्हाददायक झळक! गावाकडच्या गाडीवाटा, पाऊलवाटा असोत की शहरातल्या डांबरी सडका असोत दुपारच्या प्रहरात सारे सुनसान पडलेले असे. भर दुपारी रणरणत्या उन्हात गावे ओस पडलेली असत, केवळ वयस्क माणसं नि पोरंबाळंच गावात असत. कामाची वा वर्दळीची ठिकाणंही ओस पडलेली असत. आकाशात पक्षी दिसत नसत, कष्टकरी जिवांना कामावर जाण्याशिवाय पर्याय नसे तसं या पक्षांचं नव्हतं परिणामी दुपारी आकाश रिते वाटे! निळे निरभ्र आकाश आणि पूर्ण ताकदीने आग ओकणारा सूर्य हे समीकरण गेले तीन महिने देशभरात जारी होते. या उन्हाळ्यातली धग काहीशी वेगळीच होती, माणसं म्हणत की यंदाचा उन्हाळा काही वेगळाच आहे, थोडं जरी उन्हांत गेलं तरी पोळून निघतंय! असं असलं तरी एव्हढीच धग आपल्या देशात नव्हती, आणखी एक हिट आपल्याकडे कार्यरत होती! ती म्हणजे निवडणुकांच्या धामधूमीची धग! गेले अडीच महिने आपल्या देशात निवणुकांचा धुरळा उडाला होता. सभा, बैठका, पत्रकार परिषदा, वाद प्रतिवाद, आश्वासने नि त्यांची पोलखोल, वृत्तवाहिन्यांवरची भांडणे नि जिकडे तिकडे सुरु असलेल्या राजकारणाच्या गप्पा यामुळे साऱ्या वातावरणात निवडणुकीचा ज्वर व्यापून होता. बाहेर निसर्गाच्या तप्त झळा आणि अंतर्बाह्य शेकून काढणारा निवडणुकीचा मोसम असा एक वेगळाच सिलसिला साऱ्या देशाने या निमित्ताने अनुभवला!

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

आयुष्याची लढाई!

जगण्याची लढाई आयुष्य कामगार श्रमिक


संध्याकाळी बागेजवळ एका टोपल्यामध्ये खापराच्या मटक्यात कोळशाचे निखारे ठेवून गरम शेंगा विकणाऱ्या माणसाच्या सर्वच शेंगा विकल्या गेल्या तरी त्यातून त्याला किती रुपये मिळत असतील या प्रश्नाने नेहमीच पिच्छा केलाय!याच्या जोडीने आणखी नोंदी मागोमाग येतात.
गर्दीच्या ठिकाणी दिवसभर फिरस्ती करुन खेळणी विकणाऱ्याचं पोर घरी खेळणीसाठी रडत असतं,
बांधकाम मजूरास पत्र्याच्या वा तत्सम घरात राहावं लागतं,
लोकांची घरे रंगवणाऱ्या रंगाऱ्याच्या घराचे पोपडे उडालेले असतात,
हमाली करणाऱ्याचं ओझं कुणीच उचलत नसतं,
जगाच्या चपला शिवून देणाऱ्याच्या पायतल्या वाहणा झिजलेल्या असतात,
कापडाच्या दुकानात कामास असलेला कामगार कॉलरजवळ विरलेले शर्ट नि कंबरेत अल्टर केलेली विजार वापरतो,
मिठाईच्या दुकानातल्या सप्लायवाल्याच्या घरी वर्षाला देखील नीट गोडधोड होत नसतं,
हॉटेलमधल्या वेटरचा आपलं कुटुंब घेऊन हॉटेलात जेवायला जाण्याचा बेत कधीच तडीस जात नाही,
दिवसभर बाजारात उभं राहून गजरे विकणाऱ्या फुलवाल्याची बायको मोगऱ्याविनाच असते,
वखारीत काम करणाऱ्याच्या घरी सैपाकासाठी इंधन नसतं,
आडत बाजारात शेकडो पोती धान्य वाहून नेणाऱ्याच्या घरी धान्याची भांडी भरलेली नसतात,
चार घरची कामे करणाऱ्या मोलकरणीला आपल्या घरची धुणीभांडी करताना लाख आवंढे गुमान गिळावे लागतात...
या नोंदी काही केल्या संपत नाहीत.