आखाडात मरीआई आणि म्हसोबाचा
रुबाब असतो. पोतराजालाही
भाव चढतो. सतराशेसाठ
रूढी परंपराच्या डबक्यात
लोळणारया सकल समाजाला आखाड ही पर्वणी
असते. ग्रामीण भागात याच्या जोडीला आणखी एक पात्र
जोमात असते ते म्हणजे
साती आसरा. हे पात्र
जरा हॉरर कॅटेगरी
मोडणारे आहे. याची खानेसुमारी
स्त्री पिशाच्चात केली गेलीय.
आत्म्याला आणि भूताला
लिंग असते का असा खोचक सवाल त्यांना
पडत नाही. साती आसरा या अप्सरारुपी
हडळीच असं अजूनही
अज्ञानात खोल बुडालेल्या
समाजाला वाटते. स्त्री
पिशाच्च प्रकारामध्ये हडळ या नावातच
एक जरब आहे नुसत्या
उच्चारानेही काही भोंगळ
लोकांना कापरे भरते. जेथे जेथे जलाशय
असतात,
तेथे तेथे साती आसरा (सात जलदेवता)
असतात,
अशी लोकधारणा असते.
एखादा पडका वाडा, नदी, डोह, ओढा, विहीर, तळी यासारख्या
पाण्याच्या ठिकाणी हिचे वास्तव्य
असते. बांगड्यांचा आवाज, बाळ रडण्याचा
आवाज येणे असे भास या लोकांना
होतात. काहींना बऱ्याच
वेळा केस जळल्याचा
वास येतो. आसरा हा शब्द अप्सरा
या शब्दापासूनच झाला आहे. या आसरांना
दृश्यमान होण्याची हौस नसते. फक्त झपाटणे
हा प्रकार दिसतो.
निपुत्रिक स्त्री, जिवंतपणी जेवण न मिळाल्याने
उपाशी राहणाऱ्या स्त्रिया, जेवणाची
प्रचंड आस असणाऱ्या
स्त्रिया यांची या प्रकारात
लोक गणना करतात.
साती आसराचं पुजारीपण
मिरवणाऱ्या व्यक्तीस आणखी माहिती
विचारली तर तो माझ्या
तोंडाकडे आ वासून
बघत राहिला. एक चपटी दिल्यावर
त्याने काही दिव्य
माहिती दिली ती अशी - "हि योनी प्राप्त
झाल्यानंतर त्याच घरात त्रास
देणे हा प्रकार
लोकांना आढळतो. हा प्रकार
पवित्र आहे त्यामुळे
यांना फक्त झपाटणे
इतकेच माहित आहे. हा प्रकार
झाल्यानंतर स्नान करून येताच
डोळे लाल भडक होणे, जबर विस्मरण
होणे असे प्रकार
होतात याची संख्या
सत आहे असे म्हणतात
म्हणून यांना सती आसरा म्हटले
जाते. त्यांना एक भाऊ असतो. त्याचे
नाव झोटिंग असे असते. स्त्री
पिशाचामध्ये यक्षिणी यांची
नोंद या प्रकारात
आणि शाकिनी, डाकिनी या प्रकारात
एकसारखी स्थिती असते. प्रसुतीनंतर
लगेच मृत्यू पावलेल्या
स्त्रिया,
रजस्वला,
विधवा स्त्रिया यांना ही योनी प्राप्त
होते."
खरं तर अशा समजानेच
अनेक म्रुत्यू समाजात
ओढावतात. विहिरीत एक तर रात्री
इको साऊंड येतो, विहीर
जितकी खोल तितका
आवाज जास्त घुमत जातो. विहिरींच्या
काठाशी लगत लिंब, जांभूळ, वड, पिंपळ, अशोक अशी झाडे हटकून
असतात. वारं बेफाम
वाहीलं की पानातून
तऱ्हेतऱ्हेचे आवाज येतात
हेच आवाजात विहिरीच्या
खोलगटपणामुळे वेगळ्या परीमाणात
ऐकू येतात. याच दरम्यान
विहिरीजवळून रात्रीच्या वेळी कोणी आगंतुक
जात असेल तर त्याच्या
डोक्यात आधीच भीतीचा
पगडा बसलेला असतो तो किंचाळतच
सुटतो. मग प्रत्येक
जण आपापल्या परीने
त्यात तिखटमीठ लावून
भर घालून सांगून
लागतो आणि त्या विहिरीत
साती आसरा असल्याचा
शोध लागतो.
अगदी या दशकापर्यंत
सासूरवाशीण स्त्रियांना विहिरीत
आडात ढकलून मारण्याचे
प्रमाण मोठ्या आकडेवारीत
होते. याशिवाय असाध्य
रोगाने ग्रासलेल्या स्त्रिया
त्यांचा दवाखाना नीट न केल्यामुळे
विहिरी जवळ कारायच्या
ते वेगळंच. एखादी
आई आपल्या पोराबाळांना
घेऊन जीव द्यायची
त्याची तऱ्हा अजून वेगळी
आहे. विहिरीत कुण्या
बाप्याने जीव दिल्याचे
क्वचित समोर येते. जुन्या
काळी आडरस्त्यात अशा विहिरीत
अनेक बायकांचे बळी गेले. मग त्यांचे
मुडदे तरंगून वर येऊन कुणाच्या
नजरेस पडू नयेत यासाठीही
साती आसराची भीती खूप कामी यायची.
दळणवळणाची साधने शून्य
आणि लोकांच्या मनातल्या
भीतीने अशा विहिरीकडे
कोणी फिरकत नसे त्यामुळे
मृतदेह पार फाटून
तुटून गेल्यावर तो प्रकार
ध्यानी येई. कोणाची
कोण त्यात मेली उमजत नसे. मग आतल्या
बाईची जरब आणखी वाढे. विहीर
बाया ओढती असे सांगायला
बापे मोकळे... साती आसरा विहिरीत
नसून पुरुषी समाज रचनेच्या
उतरंडीत दडून बसल्या
आहेत ...
साती आसराची पूजा डोळे दिपवणारी असते. त्यासाठी बऱ्यापैकी पैसा, वेळ आणि श्रम खर्च होतात. घरातल्या बाईचा नैवेद्य करून पिट्टा पडतो. खादाडीच्या सोयीनुसार काही भागात मांसाहारी नैवेद्यही केला जातो. आधी भीतीचे दुकान मांडायचे आणि नंतर त्यातून स्त्रियांची पिळवणूक करायची हा यातला ठळक मुद्दा. जनतेच्या मनातील भीतीचा फायदा
घेऊन लोक एखाद्या
चांगल्या स्त्रीला भूत पिशाच्च
ठरवून वा जादूटोणा
करणारी ठरवून मरेपर्यंत
मारतात. एखादी मानसिक
संतुलन बिघडलेली मुलगीसुद्धा
याची बळी ठरते. विशेष
बाब म्हणजे आषाढ सरला की उकिरडयाजवळचे
म्हसोबा आणि मरीआई
अपूजनीय होतात. त्यांना
नैवेद्य घेऊन येणारे
रोडावत जातात. कुत्री
देखील तिथे पाय वर करून जातात
तर साती आसरा वर्षभर
आराम करतात. इकडे पोतराज
मंडळी अन्नाला महाग होतात.
गळक्या परंपरांचे मडके डोक्यावर वाहणारा आपला समाज कधी शहाणा होणार ?
- समीर गायकवाड.