क्रिस्टल क्लिअर स्क्रीनप्ले आणि लोकेशन्सची नेटकी निवड असली की सिनेमाला भाषेची गरज लागत नाही. पडदा बोलू लागतो आणि कॅमेऱ्याची भाषा आपल्याला सहज कळू लागते... नेहमीच तिच्या अंगावर प्लेन सिंगल कलर्ड लेहंगा चोळी आहे, तर त्याचे सर्व शर्ट नक्षीदार आहेत. तिचे कलर्स मंद फिकट आहेत तर त्याच्या शर्ट्सचे कलर काहीसे भडक आहेत. त्यानं शर्टला कॉन्ट्रास्ट पॅन्ट घातलीय तर तिच्या आवळ ब्लाऊजला मॅच होणारा दुपट्टा तिला शोभून दिसतो. कधी ती एक वेणी घालते जणू नागीण सळसळते ! तर कधी दोन वेण्या तर कधी अंबाडा बांधते. मात्र तिच्या केसांतला गजरादेखील आकार बदलतो. कधी तो दुपेडी आहे तर कधी सरळ वेणीला पिळे घेणारा आहे तर कधी अर्धवर्तुळाकार आहे. तिच्या गजऱ्यातल्या मोगरकळ्या तिच्यासारख्याच टवटवीत तजेलदार आहेत. तिच्या चेहऱ्यावर रंगरंगोटी दिसत नाही. या बाबतीत त्याचा तर प्रश्नच नाही. दोघानांही रूढार्थाने फेस व्हॅल्यू नाही. कथित देखणेपणाच्या चौकटबद्ध फिल्मी व्याख्येत ते चपखल बसत नाहीत. नायकाला असतो तसा सिक्स पॅक ऍब्जवाला स्टायलिश देखणा लूक त्याच्या तर गावीही नाही. नायिकेसाठी आवश्यक असणारी कोणतीच गणिते तिच्या अंगी नाहीत. तरी देखील ती दोघं आपल्याला खुपत नाहीत ! असं का ? याचं उत्तर प्रेझेंटेशनमध्ये आहे !
'शोले'
जेंव्हा जेंव्हा पाहतो तेंव्हा तेंव्हा काही तरी नवीन गवसते. 'शोले'च्या
क्लायमॅक्सला गब्बरच्या गोळीबारात एकट्याने खिंड लढवत असलेला जय घायाळ होऊन
पडतो तो सीन खूप काही शिकवून जातो. जखमांनी विद्ध झालेला जय रक्तबंबाळ
झालेल्या अवस्थेत एका मोठ्या शिळेला टेकून बसलेला आहे. त्याचे श्वास वेगाने
होताहेत, त्याला बोलण्यात प्राणांतिक कष्ट होताहेत, तो अगदी कासावीस होऊन
गेलेला आहे जणू त्याचे प्राण अक्षरशः कंठाशी आलेले आहेत. त्याचा मित्र वीरू
त्याच्या शेजारी बसून त्याला धीर देतोय, "तू मुझे छोड के नही जा सकता .."
असं सांगताना त्याचं उसनं अवसान स्पष्ट जाणवतं. आता काहीच क्षण उरलेले आहेत
हे त्याने ताडलेले आहे पण आपला जिवलग दोस्त आपल्याला सोडून जाणार ही
कल्पना त्याला सहन होत नाहीये. दरम्यान जयच्या गंभीर जखमी होण्याची खबर
ठाकूर बलदेवसिंगच्या हवेलीपर्यंत गेलेली असते. तो सारा लवाजमा घेऊन
गब्बरच्या अड्ड्याकडे जाणाऱ्या लाकडी पूलाच्या रस्त्याजवळ येतो. वीरूने आता
आपल्या मित्राचा लहूलुहान देह आपल्या कुशीत घेतलेला आहे, त्याच्या समोरच
ठाकूर दाखल होतो.
पोस्ट वाचण्याआधी एक सवाल प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावा. आपल्याकडील किती महिला आपली इच्छा नसताना देखील आपल्या पार्टनरसोबत सेक्स करतात आणि त्यांची इच्छा असताना पार्टनरने सेक्स न केल्यावर त्याला त्याची जाणीव करून देतात ? किती पुरुष फक्त आपल्या इच्छेनुसारच सेक्स करतात का कधी पार्टनरच्या इच्छेनुसारही सेक्स करतात ? यावरच्या तिच्या प्रतिक्रिया त्यांनी कधी जाणून घेतल्यात का आणि त्याचा विचार कधी केलाय का ? याची बहुतांश उत्तरे नकारार्थीच येतील. ही पोस्ट अशा विचारांवर प्रकाश टाकणाऱ्या सिनेमावर आहे. असो. आपल्याकडच्च्या काही लोकांना आपला नसलेला संस्कारीपणा दाखवायची खोड असते, सोबत आपण किती सभ्य आहोत आणि आदर्श समाजविचारांचे प्रणेते आहोत हे दाखवण्याची केविलवाणी धडपड असते. आपले सेन्सॉर बोर्ड यात आघाडीवर आहे. २६ ऑक्टोबर २०१६ ला वर्ल्ड रिलीज झालेल्या 'लिपस्टीक अंडर माय बुरखा'ला आपल्या देशात सेन्सॉरने रिलीज होऊ देण्यास नकार दिला होता. याची कारणे होती - चित्रपटात सेक्सुअल सीन्स आहेत, शिव्यांचा भडीमार आहे, संवादात अश्लीलता व अर्वाच्चता आहे.
१९८० च्या सुमारास अरुण गवळी सुरुवातीच्या काळात रमा नाईकच्या टोळीत सक्रीय होता ज्यायोगे तो दाऊदच्या कन्साईनमेंटला प्रोटेक्शन देई. खटाव मिल्सच्या वांद्यात त्याने हे काम सोडले आणि अमर नाईकची टोळी जॉईन केली. या दरम्यान दाऊदसाठी काम करणारे कोब्रा गॅंगचे म्होरके पारसनाथ पांडे आणि शशी रेशम यांच्या हत्येप्रकरणी त्याला पहिल्यांदा अटक झाली होती. पुढे जोगेश्वरीतील जमिनीच्या वादातून दाऊद आणि रमा नाईक यांच्यात टोळीयुद्धाचा भडका उडाला. यात रमा नाईक मारला गेला आणि अरुण गवळीने त्याचा वसा आपल्या खांद्यावर घेतला. यामुळे चिडलेल्या दाऊदच्या माणसांनी गवळीचा भाऊ पापा(उर्फ किशोर) गवळी याची निर्घृण हत्या केली. गवळीचा जीव तळमळला. याचा सूड घेण्यासाठी त्याने मोठी गेम 'ठोकण्याचा' निर्धार केला आणि अंमलात आणला देखील.
खांद्याला शबनमची झोळी, डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा, किंचित वाढलेलं दाढीचे खुंट अन मळकट सैल सदरा अशा वेशात संपूर्ण चित्रपटात आपला मुक्त वावर असणारा पत्रकार दिगू टिपणीस(निळू फुले) भल्या सकाळी घरातल्या लाकडी खुर्चीत अंगाचे मुटकुळे करून बसलाय. काही वेळापूर्वी त्याला दस्तुरखुद्द 'सीएम'चा फोन येऊन गेलेला आहे. तो अजूनही त्याच फोनच्या विचारात आहे. इतक्यात डोअरबेल वाजते. सिगारेट शिलगावत रेडिओ सुरु करून तो दरवाजा उघडतो, बाहेर त्याची तरुण मोलकरीण छातीवरच्या पदराचे नेहमीप्रमाणे भान नसल्यागत उभी! तिच्याकडे एक विलक्षण जहरी कटाक्ष टाकत दिगू बाजूला होतो.
ती आत येते. रेडिओवर मंद स्वरात गाणे सुरु असतं - 'झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं, हुळहुळतो तुळशीचा अजुन देह सारा गं, अजुन तुझे हळदीचे अंगअंग पिवळे… ' दिगू परत खुर्चीवर येऊन बसतो. बाई आत जाते अन फरशी पुसण्यासाठी पाण्याची बादली घेऊन बाहेर येते. दिगूची सिगारेट पेटलेली आहे अन डोक्यात विचारांचे मोहोळ उठलेले आहे. त्याचं सारं ध्यान तिच्याकडे आहे अन इतक्यात टेबलावरच्या फोनची रिंग वाजते. पलीकडून संवाद सुरु होतो - "श्रीमंतांचा फोन आला होता वाटतं? काय म्हणत होते श्रीमंत?" दिगू उत्तरतो, "काही नाही, त्यांची तब्येत नरम आहे म्हणत होते, दुष्काळाचं विचारत होते…" पलीकडून प्रतिप्रश्न येतो "पण असं झालं काय अचानक. मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडायला?" बोलत बोलत आलखनपालखन मांडी घालून खुर्चीवर बसलेला दिगू तीक्ष्ण नजरेने फरशी पुसणाऱ्या पाठमोऱ्या असलेल्या कामवाल्या बाईच्या पुठ्ठयाला निर्लज्जपणे न्याहळत खवचटपणे छद्मीपणे हसत उत्तरतो, "काही नाही, खाऊ नये ते खाल्लं असेल !"........
ज्या देशात आईने बाळाला दुध पाजताना कोण्या पुरुषाने तिच्या त्या मातृवत्सल स्तनाकडे पाहिल्यावर त्याची वासना जागृत होते याची घृणास्पद भीती बाळगून तिच्यासाठी बंदिस्त जागा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आटापिटा केला जातो आणि मूळ पुरुषी वासनाउत्पत्तीच्या किड्याची लोभस रुपात जोपासना केली जाते तिथे 'बेगमजान'ला 'फक्त प्रौढासाठी'चे ए प्रमाणपत्र मिळणे साहजिक होते. हे कमी होते की काय म्हणून कित्येक क्रिटीक्सने देखील हा सिनेमा एकत्र कुटुंबासाठी नाहीये अशी मल्लीनाथी केली आहे. यातील अनेक दृश्ये आणि द्विअर्थी संवाद सेन्सॉरने कट केले आहेत, तरीही क्रिटीक्सना असे वाटावे याचे आश्चर्य वाटते. अशा समीक्षकांना कामाठीपुऱ्यात नेऊन तिथे किती वर्षाची मुलगी धंदा करते आणि येणाऱ्याचे वय किती मोठया अंतरात डिव्हाईड झाले आहे याची आकडेवारी तोंडावर फेकावी वाटते. किती दिवस काय काय झाकून ठेवणार आहोत आपण आणि कशासाठी ही झाकाझाकी ?..... असो... विषय 'बेगमजान'चा आहे...
'सूर्यवंशम' सेट मॅक्सवर किती वेळा लागला ह्यावर खूप कॉमेंटस आणि विनोद तुम्ही सर्वांनी वाचले असतील. त्याच 'सूर्यवंशम' मधील एका सीनची ही गोष्ट. हिरा हा ठाकूर भानूप्रताप यांचा मुलगा. त्याची गौरीशी लहानपणापासून मैत्री असते. तिच्या मैत्रीपायी त्याची शाळा सुटते, अभ्यासात ढ असणारा हिरा अधिकच बदनाम होतो. मैत्रीचे रुपांतर एकतर्फी प्रेमात होते. तारुण्यात पदार्पण केल्यावर गौरीशी लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या हिराला मोठा धक्का बसतो. त्याचे वडील त्याच्यावर अजूनच नाराज होतात. लग्न ठरवल्यावर ऐन वेळेस गौरी लग्नास नकार देते. हिरावर पुन्हा अपयशाचे शिक्के बसतात. मात्र साध्या भोळ्या हिरावर राधाचे प्रेम बसते. राधाच्या आईची इच्छा असते की राधाचे लग्न ठाकूर देशराजच्या मुलाशी व्हावे. हिरा राधाच्या प्रेमाचा स्वीकार करतो. भर मांडवातून तिला उचलून नेतो. तिच्याशी विवाह करतो. हिराची आई ठाकूर भानूप्रतापला खूप काही सुनावते. चिडलेला भानूप्रताप त्या दोघांना घरात न घेता संतापाच्या भरात वाट्टेल ते बोलतो. हिरा आणि राधा भानूप्रतापचा आशीर्वाद न मिळाल्याने निराश होऊन परततात. ते एका लहानशा घरात साधेपणाने गरिबीच्या कठीण दिवसांत आपला संसार सुरु करतात. बेरोजगार असणारा हिरा राधाला स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास सांगतो आणि स्वतःला मिळेल त्या कामाला जुंपून घेतो. एकदा राधाकडे तिचे वडील येतात त्या सीनची ही पोस्ट..
'आगे भी जाने ना तू ..' हे गाणं होतं बी. आर. चोप्रा निर्मित आणि यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’मध्ये. साठीच्या दशकात आलेला वक्त अनेकार्थाने महत्त्वपूर्ण चित्रपट होता. व्यवसायाच्या दृष्टीने तर तो खूप यशस्वी ठरलाच; पण सुनील दत्त, शशी कपूर, राजकुमार, बलराज सहानी, साधना, शर्मिला टागोर, अचला सचदेव अशी मोठी नावे असलेल्या वक्तने मल्टीस्टार चित्रपटांचा ट्रेंडही स्थिर केला. शिवाय काळाच्या तडाख्याने कुटुंबाची ताटातूट होणे आणि त्याच काळाच्या कृपेने कुटुंब पुन्हा एकत्र येणो या जुन्याच फॉर्म्युल्याचेही पुनरुज्जीवन केले. पुढे अनेक वर्षे त्यावर अनेक बरेवाईट चित्रपट येत गेले. पण 'वक्त'चे वेगळेपण तेवढय़ापुरतेच मर्यादित नाही. नेहरूप्रणीत आधुनिक, समाजवादी आणि उपभोगविरोधी विचारांच्या पार्श्वभूमीवर 'वक्त'ने नशिबाला मुख्य भूमिका देणारे आणि भोगविलासाला अपराधगंड न बाळगता स्वीकारणारे श्रीमंती नाटय़ मांडले. असे चित्रपट यापूर्वी येतच नव्हते असे नाही. पण 'वक्त'ने त्याला मल्टीस्टार प्रतिष्ठा दिली, यश दिले.
७०-८० चे दशक हे अमिताभचे एकहाती दशक होते, वनमॅन इंडस्ट्रीचा अनुभव बॉलीवूड घेत होते. अमिताभच्या आधीचा सुपरस्टार राजेशखन्ना बरयापैकी पिछाडीवर पडला होता. त्याला इंडस्ट्रीत अस्तित्व टिकवण्यासाठी एका हिट सिनेमाची प्रचंड गरज होती पण त्याचे सिनेमे त्याला साथ देत नव्हते. महबूबा, त्याग, पलकों की छाँव में, नौकरी, जनता हवलदार, चक्रव्यूह,बंडलबाज असे अनेक सिनेमे दणकून आपटले होते, नाही म्हणायला ७९मध्ये आलेल्या अमरदिपने थोडाफार व्यवसाय केला होता. पण त्याची धडपड सफल झाली आणि १९८१ मध्ये चेतन आनंदने दिग्दर्शित केलेल्या 'कुदरत'ने त्याला तारले व पुढे काकाने अनेक बरयापैकी हिट सिनेमे देऊन आपली पत शाबूत राखली...
इसवीसन ७९ मध्ये 'पॉम्पे' या देखण्या रोमन शहराचा माउंट व्हेसूव्हियसच्या ज्वालामुखीच्या उद्रेकात विनाश झाला. आताच्या इटलीत असणारया या शहराचे अस्तित्व एका दिवसात होत्याचे नव्हते झाले. या पॉम्पेचा विनाश दाखवणारी एक सुंदर प्रेमकथा याच नावाच्या सिनेमातून २०१४ मध्ये आली होती. ज्या प्रमाणे 'टायटॅनिक'च्या प्रेमकथेचा आत्मा तिच्या विनाशात दडला आहे तसेच 'पॉम्पे'चे होते आणि तसेच 'मोहेंजो दारो'चे आहे. पण जेम्स केमेरून, पॉल अँडरसन आणि गोवारीकर यांची तुलना कशी होऊ शकते ? असो.....
तू प्यार का सागर है या गीताच्या रसग्रहणाच्या निमित्ताने मी तुम्हाला नेतोय थेट एकसष्ट वर्षे मागे ... येणार का माझ्या बरोबर या अर्थपूर्ण गाण्याची कथा ऐकायला ? चला तर मग .....
कृष्णधवल हिंदी सिनेमांच्या सुवर्ण इतिहासातले रुपेरी नाव म्हणजे 'सीमा'. माझा जेंव्हा जन्मही झाला नव्हता, तेंव्हाचा हा सिनेमा..१९५५चा हा सिनेमा मी आवर्जून डीव्हीडी आणून घरी पाहिला, कारण यातील 'तु प्यार का सागर है' हे अजरामर गाणे. हे गाणे मी यु ट्यूब वर बरयाच वेळा पाहीले, ऐकले अन दरवेळेस अनामिक शांतता मनाला मिळत गेली. बालपणी फाटक्या कपड्यात शेजारयांच्या घरी जाऊन हा सिनेमा एका रविवारच्या सांजेस दूरदर्शनवर पाहिल्याचे आठवत होते. पण सिनेमा कथानकासह आठवत नव्हता.... आज पाहू, उद्या पाहू करत करत बराच काळ निघून गेला अन मागच्या आठवड्यात जावेद अख्तर यांच्या तोंडून 'सीमा' बद्दल काही फिल्मी किस्से ऐकले आणि जिज्ञासा अधिक चाळवली. परवाच्या रविवारी अगदी आवर्जून 'सीमा' पाहिला.
काळोख्या रात्री हेलकावे खात चाललेली नाव. नावेवर प्रत्येक क्षणाला आदळणाऱ्या लाटा आणि त्यांचा सपासप आवाज. नावेच्या पुढच्या टोकाला धूसर दिसणारा नावाडी आहे जो एका संथ लयीत वल्ही मारतोय. नावेवरच्या शाकारलेल्या झोपडीत पाठमोरी बसलेली आहे, ती पुष्पा ! डोईजवळच्या हलत्या कंदीलाच्या फिकट पिवळसर उजेडात ती अगदी दिलखुलास सुरेख दिसतेय, अगदी मन लट्टू व्हावे अशी दिसत्येय ती. आनंदी रंगाची निळ्या झाकेतली साडी तिला खूपच खुलून दिसत्येय. फिकट निळ्या रंगाचे किंचित आवळ पोलके घालून बसलेल्या पुष्पाने हातात गच्च भरलेल्या जर्दनिळ्या बांगड्या, गळ्यात सोन्याचे सर आणि कानात हलणारे गोलाकार झुबे घातलेत ! कपाळावर ठळक मोठा गोलाकार गंध. नाकात सोन्याची लखलखती मोरणी...खरे तर तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्यांनीच माणूस घायाळ व्हावा आणि तिच्या मासोळी डोळ्यात सदा पाझरणारे स्नेहाचे भाव बघून पुन्हा जीवित व्हावा !...
'वो शाम कुछ अजीब थी' हे अवीट गोडीचं गाणं होतं गुलजारच्या 'खामोशी'मधलं. पुन्हा पुन्हा पहावा आणि स्वतःशीच पडताळून घ्यावा असा सिनेमा म्हणजे 'खामोशी'. मागे एका प्रसिद्ध क्रिटीक्सने लिहिलं होतं की मरण्याआधी पुन्हा एकदा 'खामोशी' बघेन आणि मग प्राण सोडेन. इतकं काय होतं त्या सिनेमात ? आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती दुसऱ्यावर प्रेम करते हे कळले की कोणतीही संवदेनशील स्त्री उन्मळून पडते. त्यातून सावरण्यासाठी एका समदुखी जीवाला अशाच वेदनेतून बाहेर पडण्यास मदत करते. तिला वाटते की तो आता आपल्यावर प्रेम करू लागलाय. प्रत्यक्षात त्याच्या मानसिक आजारातून बाहेर पडावा यासाठीची ती एक क्रिया होती. हे कळल्यावर तिचं भावविश्व हरवून बसते. तिने बऱ्या केलेल्या प्रेमवेडयाला आता तिच्या बरया होण्याची आस लागून राहते.
हडकुळा, घामटलेला, करपलेल्या चेहऱ्याचा 'तो' रात्र रस्त्यात वितळताच गुहेतून श्वापद बाहेर पडावा तसा पडतो. 'तो' हिशोबात कमजोर आहे, त्याचे हिशोब वेगळे आहेत. मात्र त्याची नजर एकाच वेळी दया यावी अन् भीतीही वाटावी अशी आहे. तो देवाशी बोलतो, कुत्र्यांच्या अंगावर धावून जातो, भिंतींवर ओरखडे काढतो, खिडकीच्या गजांत डोळे भिनवतो, वटवाघळासारखा झोंबाडत राहतो. त्याला चालताना सगळीकडे बुद्धीबळातले पट अंथरावे तसे दोनच रंग दिसतात. काळा आणि पांढरा रंग.
त्याला जमीन, रस्ते सारं काही ह्या काळ्या रंगातच दिसतात. तो यातल्या फक्त काळ्या चौकोनांवरून चालतो ! त्याला वाटते की पांढऱ्यावरून चाललो की आपण आऊट ! मात्र या काळ्या पटातून चालताना मध्ये कुणी आडवा आला तर ? मग मात्र तो त्याचा अडथळा संपवतो पण काही केल्या पांढऱ्यात पाय ठेवत नाही. तो स्वतःला कधी रमण म्हणवतो तर कधी सिंधी दलवाई ! त्याचं रक्त आणि मेंदू कमालीचे थंड आहेत. लोक त्याला मानसिक संतुलन गमावलेला दुर्दैवी माणूस म्हणून बघतात अन् तो लोकांच्या आतड्या कातड्यात आरपार उतरत राहतो, खोल उतरत जातो, काळ्या पांढऱ्याचा खेळ खेळत राहतो. आड येणाऱ्या लोकांना थंड डोक्याने संपवत जातो. तो कुणालाही कसंही मारतो, त्याला त्याची ना खंत ना खेद. तो हे खून का करतो, हे देखील त्याला ठावूक नाही. त्याने सख्ख्या बहिणीवर देखील अत्याचार केलाय. तिचा सारा परिवार खलास केलाय.
एखाद्या घरंदाज, देखण्या, खानदानी स्त्रीला जर आपला पती दुसऱ्या स्त्रीकडे शौक पुरे करायला जातो हे कळले तर तिला काय वाटेल? ती याला कसे हाताळते याला जास्त महत्व आहे. त्याच्यात ती बदल घडवू शकते का? आपला नवरा सुधारावा म्हणून ती काय करू शकते? या प्रश्नाचे व्यक्तिपरत्वे वेगळे उत्तर येईल. याचा धांडोळा घेताना गुरुदत्तने रुपेरी पडद्यावर एक नितांत सुंदर पोट्रेट रेखाटले होते. त्याचे नाव होते, 'साहिब, बिवी और गुलाम'. त्यात त्याने मीनाकुमारीला असे काही चितारले होते की एकाच वेळी बेफाम नशाही यावी अन निमिषार्धात ती नशा खाडकन उतरावीही. मीनाकुमारी परफेक्ट ट्रॅजेडीक्वीन होती, तिने हे आव्हान लीलया पेलले! आपला 'साहिब' आपल्याचपाशी रहावा यासाठी सिनेमातली 'छोटी बहू' दारू पिण्यापासून ते गाणं बजावणं करून त्याचं मन रिझवण्यासाठी सारं काही करायला सिद्ध होते. मात्र तिचीही एक अट असते - 'त्याने हे सर्व शौक घरीच पूर्ण करायचे, बाहेर जायचे नाही.' यात तिचीच दुर्दशा होते, त्याला फरक पडत नाही.
बर्लिन एअरलिफ्टची दुसरया महायुद्धाअखेरची गाथा इतिहासाच्या सर्व अभ्यासकांना माहिती आहे पण आपल्या सेनादलाने त्यातही विशेषतः हवाई दलाने पार पाडलेले 'एअरलिफ्ट'चे ऑपरेशन जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाले आहे. आपल्या हवाईदलांनी पार पाडलेले एअरलिफ्टचे हे ऑपरेशन इतके विशाल होते की गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झाली आणि मानवी इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे मानवी रेस्क्यू ऑपरेशन असे बिरूद या मोहिमेला मिळाले.. याच मोहिमेवर आधारित अक्षय कुमार आणि निमरीत कौर यांचा बहुचर्चित एअरलिफ्ट हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी राबवण्यात आलेल्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेस्क्यू ऑपरेशवर हा चित्रपट आधारित आहे. अमेरिका आणि कुवैत यांच्यात झालेल्या आखाती युद्धात अडकलेल्या भारतीयांना अगदी सुखरुप घरी परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांचे रुपेरी पडद्यावरील चित्रण अगदी वेधक आणि अंगावर काटे असणारे असे आहे असं खुद्द अक्षयनेच ट्विट करून सांगितले आहे.
जमिनीच्या उदराखाली भली मोठी खाण अजगरासारखी सुस्त पडली आहे अन वर लख्ख उन्हात वेगळाच डाव चालू आहे..अपंग मनमोहन कृष्णचे चहाचे छोटेसे टपरीवजा छप्पर आहे, तिथे बाहेर एक लाकडी फळकुटाचे टेबल आहे. त्याच्या आजूबाजूला दोन मरतुकडे बाकडे टाकलेले आहेत. या टपरीच्या बाजूला कोळशाचे ट्रक उभे आहेत. कळकटलेले कामगार डोक्याला पांढरे हेल्मेट घालून येजा करताहेत. सगळे कसे यंत्रवत चाललेले आहे, या टेबलावर काळपट चॉकलेटी रंगाच्या चहाचे काचेचे ग्लास आहेत, पांढुरक्या रंगाच्या टवके उडालेल्या बशीत मातकट फरसाण पडलेलं आहे अन पत्त्याचा डाव रंगात आलेला आहे. राणा (मॅकमोहन) त्याच्या मित्रांबरोबर तीन पत्तीचा डाव लावून बसलेलाय. 'एक चाल मेरी भी, एक और मेरी, एक और सही आणि शो ..' असे त्यांचे जुगारी डावपेच चालू आहेत. मागे पार्श्वसंगीतात गीता दत्तच्या आवाजातलं 'तदबीर से बिगड़ी हुई तक़दीर बना ले, तक़दीर बना ले अपने पे भरोसा है तो ये दांव लगा ले….' मंद ट्युनिंगमध्ये चालू आहे.. बेगम,गुलाम आणि देहला असे बिनीचे पत्ते दाखवून राणा डाव जिंकतो, समोरचा हारलेला ओशाळवाणा होऊन, 'धत तेरे की,सब पैसे हार गया … ' असं पुटपुटू लागतो… त्या टेबलाला रेलून उभा असलेला, कंबरेचा जाड पिवळ्या हुकचा पट्टा गळ्यात अडकवलेला, मळकट खाकी कपड्यातला मंगल सिंह (शत्रुघ्न सिन्हा ) पत्त्याचा हा डाव बेरकीपणाने बघतोय, त्याला राणाचा डाव बघून चेव येतो अन तो त्याला विचारतो,"क्यों राजा नल हमसेभी एक हाथ खेलोगे ?" राणा उत्तरतो, "क्यो नही ?"
"संध्याकाळी देव्हाऱ्यात लावल्या जाणाऱ्या समईचे पावित्र्य या सिनेमात असायचे, सकाळची सडारांगोळी करून तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा घालतानाची प्रसन्नता त्यात होती. दुपारच्या शीतल वामकुक्षीचा निवांतपणा त्यात असायचा. शहर झोपी गेल्यानंतर उत्तररात्री खिडकीतून येणारा गार वारा शृंगाराचे हळुवार गुंजन जोडप्यांच्या कानात करायचा तो शृंगार या सिनेमात होता. सप्तरसाचे मर्यादित पण उत्फुल्ल रसरशीत अविष्कार या सिनेमात होते म्हणून ते अधिक जवळचे आणि अधिक सच्चे वाटायचे…………"
सिनेमा, गाणी आणि नाटक यांचे वेड असलेल्या भारतीय माणसाला व्हेनिस या शहराबद्दल विचारले तर तो लगेच दोन उत्तरे देईल एक म्हणजे शेक्सपिअरचे 'मर्चंट ऑफ व्हेनिस' आणि दुसरे आपले आवडते 'दो लफ़्ज़ों की है दिल की कहानी' हे गाणे ! ४० वर्षांपूर्वी द ग्रेट गॅम्बलर (१९७६) हा सिनेमा मी आमच्या सोलापुरातील भागवत चित्रमंदिरमध्ये पाहिला होता. तेंव्हा यल्ला दासी नावाचे एक जबरदस्त चित्रकारद्वय सोलापुरात होते, ते कोणत्याही सिनेमाचे असे काही पोस्टर्स बनवायचे की नुसते पाहत राहावे असे वाटायचे. मला आठवते की माझे सिनेमा पाहणे कमी होते पण केवळ त्या पोस्टर्सपायी चित्रपट गृहाबाहेर रेंगाळणे जास्त असायचे. आजच्या सारखी रेडीमेड डिजिटल पोस्टर्स तेंव्हा नव्हती पण त्या पोस्टरमध्ये जो जिवंतपणा आणि रसरशीतपणा होता ती बात या छापील पोस्टर्समध्ये नाही. या द ग्रेट गॅम्बलरचे त्यांनी बनवलेले 'दो लफ्जोंकी...' चे पोस्टर आजही डोळ्यापुढे येते. खरे तर महानायक अमिताभचा 'द ग्रेट गॅम्बलर' हा सिनेमा एक तद्दन गल्लाभरू चित्रपट होता. पण शोलेपासून या माणसाने बॉक्स ऑफिसचा एकहाती कचरा केला होता त्याला तोड नाही.त्यामुळे हा सिनेमाही यशस्वी झाला.
'मेरा साया' १९६६ मधला सिनेमा. माझा जन्मही झालेला नव्हता तेंव्हा. पण हा सिनेमा मी बऱ्याचदा पाहिलाय, त्यातल्या 'नयनो मे बदरा' या गाण्यासाठी आणि अर्थातच साधनासाठी. मदनमोहनजींचे सुमधुर संगीत या सिनेमाला होते. साधना ही साठच्या दशकात इतकी प्रसिद्ध अभिनेत्री होती की तिची हेअरस्टाईल तेंव्हा मुलींमध्ये साधना कट म्हणून प्रसिद्ध होती. 'मेरा साया' मध्ये सुनील दत्त ठाकुर राकेश सिंहच्या भूमिकेत होते. त्यांचे गाजलेले जे सिनेमे आहेत त्यापैकीच हा एक होय.
साधनाची दुहेरी भूमिका यात आहे. के.एन.सिंह यात सरकारी वकीलाच्या भूमिकेत आहेत. त्यांचे ते भुवई उंचावून बोलणे आणि पॉज घेऊन छद्मीपणाने हसत बोलणे सिनेरसिक कधीच विसरणार नाहीत. अन्वर हुसैन, रत्नमाला, मुक्री, मनमोहन, धुमाळ आणि प्रेम चोपड़ा यांच्या सहायक भूमिका या सिनेमात होत्या.