बॉलीवूड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बॉलीवूड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

धर्मेंद्र - जट यमला पगला!


त्याचे श्वास अजून जारी आहेत, त्याच्या सिनेमाविषयी वा त्याच्या करिअरविषयी खूपजण खूप काही सांगतील; मला थोडेसे वेगळे सांगायचेय.. 

धरमची गोष्ट सुरु होते 1935 मध्ये. 8 डिसेंबरला पंजाबच्या साहनेवाल गावात जन्मलेला हा एक साधा जाट मुलगा. धर्म सिंह देओल त्याचं नाव. जग त्याला 'धर्मेंद्र' म्हणून ओळखते, त्याच्या आयुष्याची कहाणी, केवळ चित्रपटांच्या यशाची नाही, तर अंतर्मनातील एकाकीपणाची, प्रेमातील द्वंद्वाची आणि संघर्षातील जयपराजयाची आहे. त्याने बॉलीवूडला 'ही-मॅन' दिला, त्याच्या जीवनात असे अनेक क्षण येऊन गेलेत जेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले, हृदयात अपराधीपणाची जखम खोलवर रुजली आणि एकाकी एकांताने त्याला शांत केलं.

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

सरस्वती चंद्र - एक हळवी व्यथा!


प्रेम जरी अपूर्ण राहिले, तरी ते आत्म्याला पूर्णत्व देऊन जाते हा अभूतपूर्व संदेश ‘सरस्वतीचंद्र‘ कादंबरीमध्ये होता; यातली नायिका शेवटी म्हणते की, 'विरहच खरेतर आत्म्याच्या मुक्तीचा आरंभ असतो.'एखाद्या व्यक्तीने कुणावर प्रेम केले असेल मात्र तिच्यासोबत विवाह झाला नसेल तर त्या व्यक्तीच्या मनात नेमकी कोणती तगमग होते?
जिच्याबरोबर प्रेम केले तिच्यासोबत विवाह होऊ न शकलेल्या व्यक्तीला त्या विवाहित प्रेयसीच्या घरात व्यवसायात रोज आपलं तोंड दाखवावं लागेल अशी परिस्थिती उद्भवली तर कशी मनोवस्था होईल?

प्रेम केले म्हणजे सर्वस्व अर्पण केले पाहिजे असे काही नाही, मात्र आपण एकमेकांवर निस्सीम निरपेक्ष प्रेम करत होतो ही गोष्ट तरी त्या दोन प्रेमी जीवांनी जाणून घेतली पाहिजे!

नूतनची मुख्य भूमिका असणारा ‘सरस्वतीचंद्र‘ हा याच नावाच्या गुजराती कादंबरीवर आधारित होता. गोवर्धन त्रिपाठी यांनी लिहिलेल्या या कादंबरीची कथा दोन गुजराती ब्राह्मण कुटुंबांवर केंद्रित आहे. लक्ष्मीनंदनचे कुटुंब मुंबईत स्थायिक आहे, त्यांचा व्यवसाय भरभराटीस आलेला आणि ते खूप श्रीमंत! सरस्वतीचंद्र हा लक्ष्मीनंदन आणि चंद्रलक्ष्मी यांचा पुत्र. तो एक उच्च बुद्धिमत्ता असणारा विद्वान, हुशार वकील आणि संस्कृत, इंग्रजी साहित्याचा स्कॉलर अभ्यासक. वडिलांच्या व्यवसायातही तो यशस्वीरित्या योगदानही देतो. त्याचे भविष्य उज्ज्वल असते.

बुधवार, ३० एप्रिल, २०२५

ले के पहला पहला प्यार..

देव आनंद आणि सुरैय्या... राजहंसाची एक जोडी जिचे मिलन झाले नाही!   

विख्यात गायिका शमशाद बेगम यांनी गणपत लाल बट्टो यांच्याशी प्रेमविवाह केला होता. शमशाद बेगम 14 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या ठीक दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये जन्मलेल्या मात्र त्यांचं बालपण लाहोरमध्ये गेलं. त्यांचं कुटुंब तिथं स्थायिक झालेलं! पंजाबी मुस्लिम कुटुंबात जन्मलेली शमशाद अगदी गोड गळ्याची मुलगी होती. दहा अकरा वर्षांची असताना ती लग्न समारंभात गाऊ लागली तेव्हा त्यांच्या बिरादरीत गहजब उडाला. तेरा वर्षांची असताना उस्ताद गुलाम हैदर यांच्यासोबत तिचं गाणं रेकॉर्ड झालं, मग मात्र तिचे वडील हुसेन बक्ष तिच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी तिला पाठिंबा दिला.

शमशादचे धाडस वाढले, ती स्टेजवर गाऊ लागली. या दरम्यान तिची ओळख गणपत लाल बट्टोशी झाली. तेव्हा शमशादचे वय फक्त चौदा वर्षांचे होते तर गणपत वयाने बराच मोठा होता, त्याचे घर तिच्या शेजारीच होते. ओळख जुनी होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं. दोघांनी लग्न करायचे ठरवले. 1935 साली त्यांचे लग्न झाले. शमशाद तेव्हा फक्त पंधरा वर्षांची होती! 

दोघांचे धर्म भिन्न होते आणि दोन्ही कुटुंबातून प्रचंड विरोध होऊनही हा विवाह संपन्न झाला. या दरम्यानच्या काळात फाळणीचे वारे वाहू लागले नि शमशादचा जीव पाखरासारखा झाला. कारण ती पतीसोबत अमृतसरला राहत होती आणि तिच्या आईवडिलांनी कर्मभूमी सोडण्यास नकार दिला. खेरीज त्यांना शमशाद शिवाय अन्य अपत्येही होती, जी लाहोरमध्ये स्थिरावली होती. त्यांनी काळजावर दगड ठेवून शमशादला कायमचं अलविदा म्हटलं! शमशाद बेगम उन्मळून पडल्या. मात्र पती गणपत लाल जे एक चांगले वकील होते नि हौशी फोटोग्राफरही होते, पत्नीचे मन रमावे आणि करियरही घडावे या हेतूने ते सपत्नीक मुंबईला आले! या दरम्यानच 1940 च्या सुमारास, त्यांना दिग्दर्शक मेहबूब खान आणि संगीतकार गुलाम हैदर यांनी शमशाद बेगमना मुंबईत स्थायिक होण्याचे आग्रहपूर्वक निमंत्रण दिलेलं. ते उभयतांनी स्वीकारलं! आणि हिन्दी सिनेमाच्या पहिल्या स्टार गायिकेचा उदय झाला. 

शनिवार, ५ एप्रिल, २०२५

मेरे देश की धरती ..



शुक्रवार 4 एप्रिल रोजी ज्येष्ठ दिग्गज अभिनेते मनोजकुमार यांचे निधन झाले आणि सोशल मीडियासह सर्व प्रसारमाध्यमे त्यांच्या विषयीच्या माहितीने भरून वाहू लागली. अनेकांनी शोक व्यक्त केला. जवळपास हरेक चाहत्याने त्यांच्या जुन्या फिल्मी आठवणींना उजाळा दिला. त्यांची गाणी, त्यांचे संवाद आणि त्यांची शैली याविषयी लोक भरभरून बोलले. मुळात मनोजकुमार यांची स्वतःची एक इमेज होती त्यामुळे त्यांचा स्वतःचा खास असा चाहता वर्ग होता त्याच्याखेरीज अन्य वर्गातले सिनेरसिकही त्यांच्याविषयी मनःपूर्वक व्यक्त झाले हे विशेष. कारण अलीकडील काळात एक वाईट गोष्ट हमखास दृष्टीस पडते ती म्हणजे कुणा प्रसिद्ध व्यक्तीचे वा सेलिब्रिटीचे निधन झाले की लोक त्याच्या विषयी वाईटसाईट बोलू लागतात. मृत्यूनंतरचे बदनामीचे कवित्व सुरु होते. अर्थात एखाद्या व्यक्तीने त्याच्या हयातीत काही वाईट गोष्टी केल्या असतील, त्याने केलेल्या कुकर्माविषयी कबुली दिली नसेल वा त्याबद्दल त्याच्या मनात प्रायश्चित्त भावना नसेल तर लोक त्याच्या मृत्यूपश्चात वाईट बोलत असतील तर किती जणांना आपण रोखू शकणार? कुणालाच नाही! मात्र अलीकडील काळात माणूस गेला रे गेला की त्याच्या बाजूने बोलणारे नि त्याची निंदा नालस्ती करणारे असे दोन गट पडतात. याने मन व्याकुळ होतं, अंतःकारणात विषाद दाटून येतो. श्रद्धांजली देखील द्यावीशी वाटत नाही. मात्र मनोजकुमार याला अपवाद ठरले. त्यांच्या निधनानंतर समग्र माध्यमे, सोशल मीडिया त्यांच्याविषयीने आदराने बोलत होता, लोक त्यांच्या विविध गोष्टी सांगताना आढळले. हे भाग्य अलीकडील काळात क्वचित कुणाच्या वाट्याला आले आहे. मनोज कुमार यांना मृत्यूपश्चात हे साधले कारण त्यांची भारत कुमार अर्थात भारत का नायक, भारत का बेटा या प्रतिमेने लोकांच्या मनावर फार पूर्वीपासून गारुड केलेय. शिवाय ते इंडस्ट्रीमध्ये तामझाम पासून दूर होते, त्यांचे कुणाशी वैर असायचेही कारण नव्हते. त्यांची स्वतःची एक विचारधारा होती त्याच्याशी ते आयुष्यभर प्रामाणिक राहिले त्याचेच हे फळ म्हणावे लागेल.

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

वक्त ने किया क्या हसीं सितम..

गुरुदत्तच्या 'कागज के फूल'मध्ये 'वक्त ने किया क्या हसीं सितम हम रहे ना हम...' हे निहायत देखणं अर्थपूर्ण गाणं आहे. हे लिहिलंय कैफी आजमी यांनी. हा चित्रपट 1959 मध्ये प्रदर्शित झाला होता. गुरु दत्त आणि वहिदा रेहमान यांच्या प्रमुख भूमिका यात होत्या. सिनेमा शूट झाला होता 1954 मध्ये. अप्रतिम छायाचित्रणाचे वेधक उदाहरण म्हणून या गीताकडे पाहता येईल. गुरु दत्तकडे कैफींनी गाणं दिलं तेव्हा त्यांचं वय होतं तेहतीस वर्षांचं! हे गाणं त्यांनी कागज के फूल साठी लिहिलं नव्हतं. ती त्यांची वैयक्तिक दर्दभरी कैफियत होती.

रविवार, ९ जुलै, २०२३

लखलखीत तेजाची 'चमक'!


दोन दशकांपूर्वी त्या काळातील ट्रेंडसेटर निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा टेलिफोन एक्सचेंजजवळ 'फॅक्टरी' नावाचे कार्यालय होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत आणि रात्री उशिरापर्यंत जगभरातून तरुणाईची जत्रा असायची. राम गोपाल वर्माने कारखान्यातल्या त्याच जत्रेतल्या रोहित जुगराज या मुलाला आपल्या टीममध्ये घेतलं होतं. श्रेय नामावलीत त्याचे नाव असणारे ‘जेम्स’ आणि ‘सुपरस्टार’ हे दोन्ही सिनेमे सपशेल पडले!  रोहितने पंजाबी सिनेमाचा मार्ग स्वीकारला आणि गिप्पी ग्रेवाल आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत 'जट्टा जेम्स बाँड' आणि 'सरदारजी' सारखे हिट चित्रपट केले. आता रोहित त्याची पहिली वेब सिरीज ‘चमक’ घेऊन आलाय. चमक दोन प्रकारची असते, एक जी जगभर दिसते, म्हणजेच ग्लॅमर आणि दुसरी, जी माणसाच्या आत असते, म्हणजे आत्मनिरीक्षण, आत्मज्ञान. 'चमक' ही वेबसीरिज या दोन फ्लॅशमध्ये धावणाऱ्या माणसाची कथा आहे.

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

झगमगाटाआडचा भेसूर चेहरा - सलाम बॉम्बे..



हिंदी सिनेमा पूर्णतः निव्वळ मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच गणला गेला नाही त्याला काही सिनेमे कारणीभूत आहेत. चित्रपटाकडे पाहण्याचे विविधांगी दृष्टीकोन या गृहीतकामागे आहेत, गल्लाभरु सिनेमाच्या जोडीने असेही चित्रपट निर्मिले गेलेत की ते पाहून आपण सुन्न व्हावं, आपल्यातल्या माणसाने आत्मचिंतन करावं, झालाच तर क्लेशही करावा. अशा सिनेमांच्या यादीत एक नाव 'सलाम बॉम्बे'चे आहे! या सिनेमाविषयी विस्ताराने मांडणी करण्याआधी यातल्या एका सीनचा उल्लेख करावासा वाटतो.

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

दक्षिणेतील सिनेमांचा उत्तर-दिग्विजय!


एक काळ होता की जेंव्हा आगामी हिंदी सिनेमांची चर्चा सर्व माध्यमांत असायची. येऊ घातलेल्या सिनेमाविषयी अपार उत्कंठा असायची, त्यातली गाणी, त्यातले सीन्स, संवाद, 
ऍक्शन, तांत्रिक अंगे यांची माहिती झळकत राहायची. त्यावर गॉसिप व्हायचं. ही वातावरण निर्मिती सिनेमाच्या पथ्यावर पडायची. हा प्रकार अनेकदा आताच्या पेड मार्केटिंगच्या स्वरूपाचा असायचा, मात्र त्याचे बाह्यरुप बटबटीत नव्हते. पुष्कळदा लोकांनाही याची जिज्ञासा असायची. मुळात सिनेमाविषयी नि त्यातल्या नायक नायिकांविषयी एक कुतूहलयुक्त आदर असे. आता परिस्थिती बदललीय. माध्यमांचा सुकाळ आहे, माहितीचा भडिमार आहे तरीदेखील आगामी काळात कोणते हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता अभावानेच आढळते, उलटपक्षी दक्षिणेकडील कोणकोणते सिनेमे कधी रिलीज होणार आहेत त्यांचा यूएसपी काय आहे याविषयी लोक भरभरून बोलताना दिसतात.

बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

हम भी अगर बच्चे होते!

सन ऑफ इंडिया 

हिंदी चित्रपटसृष्टीने सर्वच वयोगटातील पात्रांना ग्लॅमर दिलेय, त्यांच्या भूमिकांना स्वतंत्र स्पेस दिलीय. हरेक वयाच्या कलाकारांना किर्ती मिळवून देताना हिंदी सिनेमा नित्य नव्या उंचीवर जात राहिलाय. कलाकारांनी देखील आपल्याला 
चाची 420 
मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या वाट्याला आलेल्या कॅरेक्टर्सना न्याय दिला. नायिका, नायकापासून ते खलनायकांपर्यंतच्या आलेखाचा आढावा घेताना बालकिशोरांच जगही सिनेमाने ध्यानात घेतल्याचे दिसते. देशात बालचित्रपटांना जे स्थान मिळायला हवे होते ते मिळालेले नाही हे जरी मान्य केले तरी बालमित्रांच्या जगास बहिष्कृतही केलेलं नाही हे ही खरेय. मुलांवर बनवलेले चित्रपट कमी-अधिक प्रमाणात स्वीकारले गेलेत. इतर भारतीय भाषांपेक्षा हिंदीत बालचित्रपटांची निर्मिती जास्त झालीय. राज कपूरपासून ते आमिर खानपर्यंत निर्मात्यांनी मुलांना केंद्रस्थानी ठेवून बालचित्रपट तयार केले आहेत. हे सिनेमे केवळ मनोरंजनच करत नाहीत तर मुलांशी संबंधित समस्यांकडेही लक्ष वेधतात. 1980 मध्ये 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट एका अदृश्य माणसावर बनवला गेला होता पण त्या चित्रपटाचा केंद्रबिंदू ही मुले होती. हा सिनेमा ऐंशीच्या दशकातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक होता. 'तारे जमीन पर', 'मकडी', 'नन्हे जेसलमेर', 'इक्बाल', 'ब्लू अंब्रेला', 'जजंत्रम ममंत्रम', 'अपना आसमान', 'मेरे प्यारे प्राइम  मिनिस्टर', 'भूतनाथ', 'सिक्रेट सुपरस्टार', 'बम बम बोले' आदी बालचित्रपटांनी बालचित्रपटाची संकल्पना थोडी बदललीय. नव्या संवेदनेवर निर्मिले गेलेले हे चित्रपट शक्यअशक्यतेचा नवा पट उभा करतात. या चित्रपटांमध्ये मानवी नातेसंबंध आणि सहवास भावना, मुलांच्या समस्या मोठ्या वैविध्यपूर्ण आणि सौंदर्याने चित्रित केल्यात. बालपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडतानाच कधी त्यातली गंमत, कधी त्यांची भीती, कधी त्यांची निरागसता तर कधी त्यांची आंतरिक धडपड चित्रपटांतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही चित्रपट असेही आहेत जे विशेषतः मिलेनियल किड्सच्या आधीच्या पिढीशी बोलतात.

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

गजब माणूस - इफ़्तिख़ार


हिंदी सिनेमाच्या कथा, पटकथांमध्ये अनेक तऱ्हेची पात्रे आढळतात. नायक, नायिका, सहायक अभिनेता, सहायक अभिनेत्री, विनोदवीर, चरित्र भूमिका साकारणारे अभिनेते आणि खलनायक ही मंडळी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. यांच्या जोडीने विविध छोटयामोठ्या भूमिका कथेच्या मागणीनुसार सिनेमात दिसतात. डॉक्टर, वकील, न्यायाधीश, दुकानदार, पोलीस इन्स्पेक्टर - कमिशनर ही पात्रे बऱ्याच सिनेमात आढळतात, पैकी पोलीस इन्स्पेक्टरचे पात्र अधिक प्रमाणात आढळतं. मुदलात एकूण सिनेमाच्या दोन अडीच तासांच्या लांबीत हे रोल अवघ्या काही मिनिटांचे असतात. मात्र तरीदेखील या भूमिकांमधून आपला ठसा उमटवणारे काही अभिनेते होऊन गेले. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेले पोलिसी पात्र इतके खरेखुरे वाटायचे की हा इसम खरोखरच्या जीवनात पोलीस आहे की काय वाटावे! सत्तर एमएमच्या सिनेमास्कोप पडद्यावर अनेक अभिनेते, अभिनेत्र्या नायक नायिका म्हणून आपला ठसा उमटवू शकले नाहीत मात्र अवघ्या काही मिनिटांच्या पोलिसाच्या भूमिका करून हिंदी सिनेमाच्या इतिहासात अजरामर होण्याची जादू काहींनी साधली! हे कशामुळे शक्य झाले याचे उत्तर एकच येते ते म्हणजे या अभिनेत्यांची आपल्या कामावरची निष्ठा आणि रसिक प्रेक्षकांचे त्यांच्यावरचे अपार प्रेम! नायक नायिकांना मिळणारे ग्लोरिफिकेशन या अभिनेत्यांच्या वाट्याला आलं! कोणताही रोल छोटा नसतो आणि कोणताही अभिनेता मामुली नसतो, तो ज्या भुमिकेत प्राण फुंकतो ती भूमिका सजीव होते हे नक्की! या वर्गातली हिंदी सिनेमाच्या इतिहासातली दोन ख्यातनाम नावं म्हणजे जगदीश राज आणि इफ्तेकार! जगदीश राज यांच्यापेक्षा इफ्तेकार यांची कारकीर्द मोठी होती आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य चढउतारांनी भरलेलं होतं. आताचे साल म्हणजे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष होय!

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

शैलेंद्र - एक सुरेल शोकांतिका

एका शापित राजहंसाची दास्तान..    


शैलेंद्र म्हटलं की त्यांची अप्रतिम अर्थपूर्ण गाणी आणि चटका लावणारी अकाली एक्झिट आठवते. वरवर भरजरी वाटणाऱ्या शैलेंद्रच्या आयुष्यास एक अधीर नि अखंडित वाहणारी कारुण्यकिनार होती जी क्वचितच समोर आली. खरं तर ही माहिती कमी लोकांपर्यंत सीमित राहिल्याने भारतीय समाजमनाला केवळ गीतकार शैलेंद्रच उमजले. त्या महान गीतकाराच्या उत्तुंग प्रतिमेखाली दफन झालेला एक पिचलेला, नाकारलेला, काळीजकोवळ्या हृदयाचा माणूस जगाला फारसा दिसलाच नाही. शैलेंद्रांच्या गाण्यात इतकं आर्त कारुण्य नि टोकदार वेदना का पाझरल्यात हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या जीवनातील काहीशा अपरिचित अशा पार्श्वभूमीचा धांडोळा घेणं गरजेचं आहे, निदान त्यांच्या या जन्म शताब्दी वर्षात तरी हे केलंच पाहिजे तरच अधिकाधिक लोकांपर्यंत एका नाकारलेल्या तरीही न हरलेल्या हळव्या दिलदार माणसाची दास्तान पोहोचेल.
त्यांच्या गीतांविषयी लिहिलंच पाहिजे मात्र त्यांच्या दमलेल्या, हिणवलेल्या आयुष्याविषयीही बोललं पाहिजे. त्यांच्या कारकिर्दीविषयीचं विपुल लेखन सहजी उपलब्ध आहे मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काळीजकथा तुलनेने कमी प्रकाशात आलीय. एखाद्याच्या आयुष्यात फरफट जितकी अधिक असते तितके त्यात अतिव कारुण्य असते, वेदना व्यथांचा सल असतो. मुळात जे जगाला उमजलेले नसतं ते कवीला आकळलेलं असतं. त्यात तो होरपळून निघालेला असेल तर त्याच्या रचनांत ती धग आपसूक प्रसवते. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि विख्यात गीतकार कवी शैलेंद्र हे याचे उत्तम उदाहरण ठरावेत.

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

बॉलिवूडमधल्या देशप्रेमाची ऐंशी वर्षे!


मागील दोन वर्षांपासून आपल्या देशात काही मोहिमा राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी राबवल्या गेल्यात. त्यात छुपे अजेंडे आहेत आणि आर्थिक स्वार्थाचे गणितही आहे, वर्चस्वाच्या साठमारीतून अशा कैक मोहिमा राबवल्या गेल्यात. या मोहिमांसाठी सोशल मीडिआचा वापर शस्त्रासारखा केला गेलाय. त्यात आयटीसेलचं चाळीस पैशांवर राबणारं भाडोत्री पब्लिक मोठ्या संख्यने कामी आलंय. द्वेष, तिरस्कार पसरवणं आणि त्याआडून वर्चस्वाची खेळी खेळत सामान्यांना हिंसेच्या आगडोंबात ढकलून देणं हे यामागचं प्रयॊजन होतं नि आहे. या मोहिमांपैकीच एक मोहीम होती - '#बॉयकॉट बॉलिवूड!'

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

दिखाई दिये यूं कि बेखुद किया - 'बाजार'च्या काही नोंदी

काही इच्छा असतात अर्ध्या राहिलेल्या, काही व्यथा असतात ज्यांना कुणी जाणलेलं नसतं. काही चेहरे असतात ज्यांना कुणी वाचलेलं नसतं, काही पुस्तके अशीच मिटलेली राहून जातात ज्यांची पाने कुणी उघडलेलीच नसतात आणि काही स्वप्ने असतात आयुष्याच्या अर्ध्यामुर्ध्या टप्प्यावर अवेळी आलेल्या पावसातल्या पाण्यात कागदी नावेबरोबर सोडून दिलेली!

हरेकाच्या आयुष्यात खूप काही निसटून गेलेलं असतं, आयुष्य संपत आलं तरी जगणं खऱ्या अर्थाने बरंचसं बाकी असतं!

साधीसुधी माणसं कथाविषय होती. त्यांचे सरळसाधे गुंते होते. निरलस मने आणि नितळ संघर्ष. लेपविरहित चेहरे, ओढाळ गाणी. शांत रात्री नि बेजान दिवस यांचं कॉम्बीनेशन असणारी तरल आयुष्ये. डामडौल नसणारा भवताल आणि डोळ्यांची भाषा बोलणारी कॅरेक्टर्स, न कसला कोलाहल ना कुठला प्रबोधनाचा बाज, सरळसुबक मांडणी! यांची गुंफण असणाऱ्या निव्वळ सरस जीवनकथा! केवळ उत्तुंग हिमशिखरांना पाहूनच छाती भरून येते असं काही नसतं काही गवताची पातीही अशी टोकदार नि चिवट असतात की त्यांनीही मन भरून येतं.

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

चेहरा हरवलेल्या पिढीचा संगीतकार - बप्पी लाहिरी..


एखाद्या माणसाला एकाच फ्रेममध्ये अडकवून ठेवलं की त्याचे बाकीचे पैलू कधीच नजरेत येत नाहीत आणि ती व्यक्ती तितक्याच मर्यादित परिघात बंदिस्त होऊन जाते. बप्पीदा याचे बेस्ट एक्झाम्पल ठरावेत. बप्पीदांविषयी लिहिण्याआधी त्यांनी केलेल्या नियतीच्या पराभवाबद्दल सांगायचेय. साल होते १९८७. आपला दोस्त एका खड्ड्यातून वर यायचा प्रयत्न करतोय म्हटल्यावर त्याला हात देणाराच त्याचा मित्र असतो. राज सिप्पींनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये 'इन्कार'च्या यशातून शिरपेच खोवला. हेलेनचं 'मुंगळा मुंगळा' गाणं आणि तगडा विनोद खन्ना लोकांच्या मनात ठसले. यशाची चव चाखल्यानंतर दोनेक दशकांनी विमनस्क झालेला विनोद खन्ना आधी एकांतवासात आणि नंतर रजनीशआश्रमात गेला. राज सिप्पी दुखी झाले. त्यांनी विनोदखन्नासाठी आपल्या मनाची कवाडे खुली ठेवली ऍज लाईक बेअरर चेक ! विनोद खन्नाचे करिअर मातीत गेल्यात जमा होते. चार वर्षे ओशोंच्या आश्रमात राहून शिष्यत्व पत्करून तो परतला होता. हा माणूस आपल्याला जाम आवडतो. अनेकदा त्याची पडझड झाली, अक्षरशः मातीमोल झाला. मात्र पुन्हा पुन्हा नव्याने तो उभारी घेत राहिला. 'मेरे अपने' ते 'कुर्बानी' हा त्याचा ग्राफ भारीच होता. तगड्या देहाचा मोस्ट हॅण्डसम नायक होता तो ! त्याचं व्यक्तिगत आयुष्य दोलायमान होत राहिलं आणि त्याच्या सोबत त्याच्या अख्ख्या कुटुंबाने त्यात हेलकावे खाल्ले, मुलांचे करिअर दोलायमान झाले. आता तर त्याचा तरुण पोरगाही संन्यासाच्या वाटेवर आहे. असो..

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

प्रेमात जगणं म्हणजे काय - मस्ट सी मुव्ही - '96' !


तमिळ चित्रपट '96' मधला हा सीन 'वन ऑफ द फाइनेस्ट प्रपोज' आहे !

'आय लव्ह यू' म्हणायची गरजही बऱ्याचदा पडत नाही कारण डोळयांची भाषा प्रेमात अधिक टोकदार असते.
तरीही 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' हे सांगता येणं हे देखील जगण्यासाठी पुरेसं असतं.
अनेकांना हे सांगता येत नाही, किंबहुना कित्येकांना व्यक्त होण्याची एकही संधी मिळत नाही.
सगळ्या गोष्टी मनात राहून जातात.

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

उनको ये शिकायत हैं आणि यूं हसरतों के दाग - एक गहिरा अर्थ...



कोलकात्यातील कालीघाटापाशी अखेरच्या घटका मोजणाऱ्या एका कोठेवालीने हे गाणं ऐकवून, सिनेमा पाहायला सांगितला होता. तोपर्यंत केवळ यातली गाणीच ऐकली होती. शामश्वेत रंगछटेतला एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा ‘अदालत’ माझ्या पाहण्यात यायचा एरव्ही प्रश्नच नव्हता. वेश्यांचे आणि तवायफांचे उंबरठे झिजवताना अनेक स्त्रियांच्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकताना निशब्द झालो, अस्वस्थ झालो नि कोलमडूनही पडलो. तशीच कथा या सत्तरीपार वयातल्या कोठेवालीची होती. तिची दास्तान विचारल्यावर ती फार काही बोलली नव्हती, सोबतच्या बंगाली मित्रापाशी ती त्राग्याने मोजकेच काही पुटपुटली. तिने सांगितले होते म्हणून नंतर आवर्जून हा सिनेमा पाहिला आणि अक्षरशः बधीर होऊन गेलो होतो.

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

प्रेमिस्ते...


विख्यात तमिळ चित्रपट दिग्दर्शक एस. शंकर हे एकदा रेल्वेतून चेन्नैला प्रवास करत होते तेंव्हा एक विलक्षण घटना घडलेली. त्यांच्या कंपार्टमेंटमधील एका प्रवाशाला दुसऱ्या सहप्रवाशाकडून कळले की आपल्या बोगीमध्ये आपल्या सोबत एस. शंकर हे प्रवास करताहेत. काही क्षण त्या प्रवाशाने विचार केला, मग मनोनिश्चय करून तो शंकर यांच्या पुढ्यात जाऊन बसला. त्याने आधी समोरील व्यक्ती शंकर असल्याची खात्री करून घेतली नि  पुढच्याच क्षणाला त्याने शंकर यांचे हात आपल्या हाती घेतले. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याने शंकरना विनवणीच्या स्वरात एक प्रश्न केला, "सर मी एक कथा सांगतो तुम्ही त्यावर सिनेमा बनवाल का ?" शंकर बुचकळ्यात पडले. त्यांची द्विधा मनस्थिती त्या प्रवाशाने ओळखली आणि तो बोलता झाला, "ही काही काल्पनिक कथा नाहीये, ही माझ्या जीवनात घडलेली सत्यकथा आहे." त्याच्या उद्गारासरशी शंकरनी मान डोलावली. काही क्षण तो व्यक्ती गप्प झाला, शून्यात नजर लावून थिजून बसला. नंतर तो बोलत राहिला. कथा संपली तेंव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू काही केल्या थांबत नव्हते. त्या कथेने शंकर स्तब्ध सद्गदित झाले. तो प्रवासी पन्नाशीच्या आसपासचा होता, त्याने सांगितलेली जीवनकथा त्याच्या मुलीच्या बाबतीतली होती. त्या व्यक्तीला आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करायचे होते आणि आपण केलेली चूक दुसऱ्या कुणी व्यक्तीने करू नये म्हणून त्यावर सिनेमा निर्मिती व्हावी अशी त्याची मनोमन इच्छा होती. शंकरनि त्याला शब्द दिला आणि त्यावर २००४ साली सिनेमा बनवला. 'काधल' हे त्याचे नाव. काधल म्हणजे प्रेम. सिनेमाने तिकीटबारीवर अक्षरशः टांकसाळ खोलली. अगदी लोबजेट सिनेमा होता तो, त्याच्या यशाने भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली. याच सिनेमाचा २००५ मध्ये तेलुगुमध्ये रिमेक झाला, त्याचे नाव होते 'प्रेमिस्ते' !

बुधवार, ७ जुलै, २०२१

'सुहाना सफर' दिलीपसाब आणि सायराचा !....




अखेर आज त्याचे श्वास थांबले...
 
ओढ ज्याची त्याची असते, ज्याला त्याला ती कळत असते मात्र त्याच्याशी एकरूप झालेल्या जीवाला ती अधिक कळते .....

तो 'अखेरचा रोमन' आता जवळ जवळ गलितगात्र होऊन गेला होता अन ती 'हिमगौरी' आता थकून गेली होती....
पण त्यांनी अजून हार मानली नव्हती, त्याची स्वप्ने त्याचा पिच्छा सोडत नव्हती
अन ती त्याची सेवाशुश्रूषा थांबवत नव्हती..
त्याचा श्वास हाच जणू तिचा ध्यास झाला होता...
त्याचे श्वास अलीकडे मंद होत होते..
त्याच्या डोक्याखाली तिने आपल्या हाताचीच उशी केली होती.

तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे आता अधिक गडद होत होती अन त्याच्या देखण्या चेहऱ्यावरचे सुरकुत्यांचे जाळे अधिक दाट होत चालले होते..

मंगळवार, ४ मे, २०२१

मासूम - दो नैना एक कहानी...


आज ‘मासूम’विषयी ! पण त्याही आधी या सिनेमाच्या क्लासविषयी. यातील स्टारकास्ट आणि त्या काळातील समांतर सिनेमाची लाट यामुळे या सिनेमासाठीचा प्रेक्षकवर्ग कथित पांढरपेशी उच्च अभिरुचीचा आणि मध्यमवर्गीय असाच असेल असे आडाखे होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवस चित्र असेच होते नंतर मात्र चित्र बदलले आणि कॉमन पब्लिक देखील थियेटरमध्ये येऊ लागलं. तरीदेखील तद्दन पिटातले म्हणून ज्यांना हिणवले जाते तो प्रेक्षकवर्ग याला फार लाभला नाही. हे लिहिण्याचे कारण म्हणजे आपल्या सोलापुरातील प्रेक्षकवर्गाची वर्गवारी आणि जडणघडण होय. कधीकाळी सोलापूर हे एक अत्यंत साधंसुधं गिरणगाव होतं. आजही इथे श्रमिकवर्ग मोठ्या प्रमाणात आढळतो. चतुर्थ- तृतीय श्रेणी कामगार खूप आहेत. विविध भाषीय लोक मुबलक संख्येत आहेत. लोकांचे दरडोई उत्पन्न बरेच कमी आहे, चैन करण्याकडे आणि पैसे खर्च करण्याकडे इथल्या लोकांचा ओढा नाही. आहे त्यात समाधान मानून जगणारा अल्पसंतुष्ट आणि विकासाची ओढ नसणारा काहीसा सुस्त उदासीन असा इथला जनसमुदाय आहे. अशा लोकांची क्लास आणि मास अशी विभागणी केली तर क्लास अगदी अल्प आणि मास अफाट प्रमाणात आढळतो. त्यामुळेच ‘मासूम’ काहीशा उशिराने जेंव्हा सोलापुरात प्रदर्शित झाला तेंव्हा त्याची व्ह्यूअर्स काऊंटची अपेक्षा जेमतेमच होती, किंबहुना यामुळेच आसनसंख्या कमी असलेल्या छायामंदिरमध्ये याची वर्णी लागली. पहिल्या दोनेक आठवड्यात पब्लिक कमी होतं नंतर मात्र थियेटर खचाखच भरू लागलं. बिड्या वळणाऱ्या दमलेल्या वयस्क हातापासून ते गल्लीच्या कोपऱ्यावर पडीक असणाऱ्या तंबाखू मळणाऱ्या बेफिकीर तरुण हातापर्यंतचं बहुवर्गीय पब्लिक त्यात सामील होतं. ‘मासूम’ला लोकांनी नितळ निखळ प्रेम दिलं, सिनेमा हिट झाला. गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. १९८३ मध्ये आला होता 'मासुम'. शेखर कपूरने दिग्दर्शित केलेला पहिलाच पण अप्रतिम सिनेमा. तेंव्हा मी किशोरवयीन असेन. माझ्या आईवडिलांसमवेत सिनेमा पाहिलेला. आता तिथे निर्जीव मल्टीप्लेक्स आहे, त्यातल्या बेचव कॉर्नप्लेक्ससारखे वाटते ते ! ‘मासूम’ पाहताना एकदोन प्रसंगाच्या वेळेस शेजारी बसलेल्या आईच्या कुशीत तोंड लपवून रडल्याचे आठवतेय. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे 'दो नैना एक कहानी' ह्या गाण्याचा हे मात्र नक्की.

सोमवार, २९ मार्च, २०२१

नापसंत ठरलेली डाकूराणी - बँडिट क्वीन..


दिवाळीचा महिना तोंडावर आला होता. धड पावसाळा नाही आणि उन्हाळाही नाही अशा विचित्र पद्धतीचे हवामान होते. अंगातलं घामटं निघत होतं. नाही म्हणायला रात्र थोडीशी सरल्यावर उत्तररात्रीची सोलापूरी थंडी जाणवत होती. मीना टॉकीजची नऊच्या शोची दोन तिकिटे काढून मित्रासोबत पिक्चरला गेलो. सिनेमा काय बघितला मस्तक दोन दिवस सुन्न झालेलं. तो चित्रपट होता बँडिट क्वीन. उत्तर प्रदेशातील एका गरीब मल्लाह (कोळींशी समांतर) जातीच्या कुटुंबात फुलनचा जन्म. वसंतोत्सवात जन्मलेली म्हणून तिचे नामकरण ‘फुलन’ ! फुलनचे मायबाप अगदी दरिद्री, असहाय्य होते. वडिलांच्या तुलनेत आई स्वभावानं थोडीशी खाष्ट. फुलन तिच्या आईसारखी होती निडर आणि फाटक्या तोंडाची ! तिला चार भावंडं पैकी तीन बहिणी आणि एक भाऊ. फुलनच्या बापाची सगळी जमीन तिच्या चुलत्याने हडप केलेली. वरतून तो त्यांना छळायचा. त्यांना शेतात पायसुद्धा ठेवू देत नसे. फुलनसह चारी भावंडांना ठोकायचा. अनेकदा उपाशी राहणारी फुलन सर्व घरकामे करण्यात तरबेज होती. मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर वयाच्या ११ व्या वर्षीच फुलनचं लग्न तीस वर्षाच्या पुट्टीलाल सोबत लावून देण्यात आलं. फुलनला न्हाण येण्याआधीच तो तिला घरी घेऊन गेला. त्यानं तिच्यावर जबरदस्ती केली. चित्रपटातला हा सीन पाहताना अंगावर काटा आला. लहानग्या फुलनच्या किंकाळ्या कानातून मस्तकात खोल उतरल्या. तिचा अनन्वित छळ होतो, मारझोड होते. त्याच्या जाचाने भांबावून गेलेली फुलन दोनेकदा माहेरी पळून जाते. मात्र तिची कशीबशी समजूत घालून तिला पुन्हा त्याच्या ताब्यात दिले जाते.