शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

बाळासाहेब आणि पवार साहेब - एक दिलदार यारीदुष्मनी !



बाळासाहेबांचे आणि पवारसाहेबांचे आपसातील नातेच वेगळे होते. वैयक्तिक जीवनात मैत्री आणि  राजकारणात वैमनस्य असं असूनही त्यांनी आपसातले संबंध तुटूपर्यंत कधीच ताणले नाहीत. 'मैद्याचे पोते' म्हणून बाळासाहेब ज्यांची टिंगल करायचे ते शरद पवार हे त्यांचे पाच दशकाचे सोबती आणि मैत्र होते. 'ज्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीवर उगवतात की मातीखाली उगवतात हे  माहिती नाही त्यांनी माझ्याबद्दल बोलू नये' अशा शब्दात पवारसाहेबदेखील त्यांच्यावर सभांमधून बोलायचे. सभा - भाषणे यातून दोघे जरी एकमेकावर राळ उडवत असले तरी त्यांनी त्यांच्यात आपसात असलेले एक ट्युनिंग कधी बिघडू दिले नाही अन ते दोघे कधी एकही झाले नाहीत अन आपसातल्या मैत्रीतून विभक्तही झाले नाहीत. ही दोन ब्रम्हफुले महाराष्ट्राच्या एकाच वेलीवर फुलली असल्याने त्यांची आपसातील वीण घट्ट होती याचे दार्शनिक असणारे अनेक किस्से गेल्या साठ वर्षात घडले. त्यापैकीच एक किस्सा शरद पवारांनी २०१७ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. डॉ.जनार्दन वाघमारे, कवी फ. मुं. शिंदे व ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी त्यांना बोलते केले होते, या मुलाखतीत त्यांनी अनेक मजेशीर गोष्टी प्रकाशात आणल्या. त्यातली एक गोष्ट बाळासाहेब आणि पवारांनी एकत्र येऊन काढलेल्या मासिकाच्या जन्मकथेची होती….

शनिवार, १६ जानेवारी, २०१६

दत्ता सामंत - झुंझार पण हटवादी संघर्षाचा करुण अंत !


'सिंहासन'मध्ये सीएमपदावर डोळा असणारे मंत्री विश्वासराव दाभाडे हे उद्योगपती व कामगारांचे समर्थन एकाच वेळी मिळवण्यासाठी कामगार पुढारी डिकास्टाला (सतीश दुभाषी) चर्चेला बोलावतात. अस्थिर औद्योगिक वातावरण, टाळेबंदी, संप इ. जर नियंत्रणात आणलं तर पक्षश्रेष्ठी आपल्याला सीएमपदी बसवतील हा अंदाज यामागे असतो. भीडभाड न बाळगणाऱ्या तोंडाळ डिकास्टाला विकतही घेण्याचा प्रयत्न असतो. पण प्रत्यक्षात होते उलटेच "आपल्या मागण्या लेखी असू शकत नाहीत म्हणून जर त्या पुर्‍या झाल्या नाहीत, तर नव्या मुख्यमंत्र्याला मी सचिवालयासमोर जोड्यानं मारेन" अशी धमकी त्यांना ऐकून घ्यावी लागते. ही बैठक निष्फळ होते. दाभाडेंना शब्दात अडकवण्याची डिकास्टा अचूक संधी साधतो. नंतर सीएमसोबतच्या चर्चेतही तो बाजी मारतो.

बुधवार, १३ जानेवारी, २०१६

सोलापूरची गड्डा यात्रा - नऊशे वर्षापासूनच्या एका अनोख्या यात्रेची गाथा....



तथाकथित मोठ्या शहरातले सृजन माझ्या सोलापूरला बरयाचदा नाके मुरडतात, टवाळकी करतात. कधीकधी काही क्षणासाठी मी ही वैतागतो पण पुढच्याच क्षणाला मातीवरचे प्रेम उफाळून येते. काहीजण तर सोलापूरला एक मोठ्ठं खेडं म्हणून हिणवतात ! एका अर्थाने हे त्यांचा हा टोमणा बरोबर देखील आहे कारण यात्रा, जत्रा, उरूस हे आता मोठ्या शहरांचे घटक राहिले नाहीत. उलट खेड्यातून देखील ते हद्दपार होतील की काय अशी स्थिती झालीय. माझ्या सोलापूरमध्ये मात्र एक यात्रा दर वर्षी साजरी होत्येय ! ती ही तब्बल सातशे वर्षापासून. याचा सगळ्या सोलापूरकरांना सार्थ अभिमान आहे. म्हणूनच आम्हाला कुणी डिवचलं की मी आवर्जून उत्तरतो, "ठीक आहे ! खेडं तर खेडं ! 
सिद्धेश्वर देवस्थान 
खेड्यात काय माणसे राहत नाहीत का ? खेड्यातल्या माणसाला आपण गावंढळ वा खेडूत म्हणतो. त्या नुसार आम्ही खेडवळ माणसं ! त्यात काय वाईट ? आम्हा सोलापूरकरांचा आमच्या मातीवर, इथल्या माणसांवर, सणावारांवर फार फार जीव ! इथे मोहरमचे पंजे अंगावर घेऊन नाचणारे, अंगावर पट्टे ओढून मोहरमचे वाघ झालेले अन पवित्र रोजे धरणारे हिंदू दिसतील. गड्डा यात्रेत मोठ्या संख्येने सामील होणारे मुस्लिम बांधव दिसतील, चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवासोबत अन्यधर्मीयही नक्कीच भेटतील. सर्व जयंत्या, उत्सव अन सर्व जातींचे सणवार सगळे मिळून साजरे करणारे आमचे हे मायेच्या माणसाचे तरीही थोडेसे उग्र बोलीभाषेचे सगळ्यांच्या मनामनातले गाव, सोलापूर !!! अशा या मुलुखावेगळ्या गावाची दर वर्षी भरणारी हौसेची - नवलाची यात्रा म्हणजे 'गड्डा यात्रा' !! सिद्धेश्वर महाराजांचा अड्ड (पालखी) यात्रा महोत्सव म्हणजेच गड्डा यात्रा !