मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

झुलवा - अंधार वेगाने वाढतो आहे...



सुली, दत्त्या, राम्या आणि काशिनाथ या चौकडीचं नशीब अगदी भुस्नाळ होतं. सशानं बिळातनं बाहेर यावं नि नेमकं त्याच वक्ताला शिकारी कुत्र्यानं हगवणीसाठी पाय आखडून घ्यावं तसं त्यांचं भाग्य !
सुलीचं पूर्ण नाव मला अजूनही ठाऊक नाही. थोराड बाया तिला सुली म्हणतात तर कुणी समवयीन तिला सुलू म्हणतात. पुरुष मात्र लोचना नाहीतर सुलोचना या नावांनीच तिला पुकारतात. सुलीच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सुख नवरात्र होय ! तिला नेहमी वाटतं की नवरात्र कधीच संपू नये. सालभर नवरात्र असावी असंच तिला वाटतं. अश्विन पौर्णिमा सरली की दमून गेलेली सुली अगदी निपचित होई. हे चौघेही दुसऱ्या दिवशी दुपारून धुम्मस मारून तानीबाईच्या खोपटात बसत. माणिकरावच्या अड्ड्यावरून दत्त्या देशी थर्रा घेऊन येई. तानी स्वतःच्या हाताने वाडगं भरून थोडं लालभडक रश्श्याचं आणि थोडं सुकं मटन करायची. राम्या खिमा उंडे नि तिखट बुंदी घेऊन यायचा. काशिनाथची बायको त्याला चपात्याची चळत देई. सुली पिताना बडबडत नाही. शून्यात नजर लावून बसते. तिचं गुमान राहणं हेच तिचं बोलणं हे बाकीच्यांना माहिती होतं. स्टीलच्या ताटांनी मटन, खिमा वाढून झाला की तानीचं काम संपे. मग ती प्यायला सुरुवात करे. जाम बरळायची ती. दत्त्या एकदम हरामी. किती जरी ढोसली तरी त्याला फरक पडत नसे.