मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

साडी मनामनातली आणि अंधाराच्या सांदीतली...



हरेकाच्या घरात एखादी तरी जुनी साडी असतेच जी गतपिढीतील कुणीतरी नव्या पिढीच्या वारसदारांसाठी जपून ठेवलेली असते.
साडी नेसणारी स्त्री अनंताच्या प्रवासाला गेल्यावर तिच्या साड्यांचे काय करायचे हे त्या त्या घरातले लोक ठरवतात. कुणी आठवण म्हणून नातलगांत वाटून टाकतात तर कुणी कुलूपबंद अलमारीत घड्या घालून ठेवतात.
अलमारी खोलली की त्या साड्या समोर दिसतात, त्यांच्यावर त्या स्त्रीने किती प्रेमाने हात फिरवलेला असेल नाही का ! किती आनंदाने तिने त्या साड्या नेसलेल्या असतात, किती मिरवलेले असते त्यात !
त्यांच्यावरून हात फिरवला की तिच्या स्पर्शाची अनुभूती मिळते.

माझ्यापुरते बोलायचे झाल्यास जेंव्हा कधी खूप अस्वस्थ वाटतं तेंव्हा कपाटात घडी घालून ठेवलेली आईची साडी पांघरून झोपी जातो ; 
सारी दुःखे हलकी होतात, सल मिटतात आणि आईच्या कुशीत झोपल्याचे समाधान मिळते !

जगण्याचे पसायदान



शास्त्र इतकं पुढे चाललंय की गांडुळालाही फणा लावता येईल. पण त्याने काय साध्य होईल ? डंख मारण्याची प्रवृत्ती उपजतच असावी लागते. ती कुठून पैदा करणार ?
प्रत्येक जीवाला, प्रत्येक वस्तूला एक प्रवृत्ती असते. ती कळायला हवी त्यातून जग कळण्यास मदत होते.

मोगऱ्याच्या कळ्यांनी बिछाना सजवता येईल, सखीच्या केसात गजरे माळता येतील, मनगटावर लफ्फे बांधता येतील, शृंगाराच्या प्रत्येक पायरीवर मोगरा चुरगळता येईल. तिथं तुळशीच्या मंजुळा कधीच कामी येणार नाहीत !
मात्र ईश्वरासाठी हार विणताना मोगऱ्याचा विचार कमी होईल आणि मंजुळा जास्ती कामी येतील !

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

ऑनर किलिंग- खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी..

ऑनर किलिंग-  खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी.. #समीरगायकवाड #समीरबापू #sameergaikwad
ऑनर किलिंग-  खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी - पूर्वप्रसिद्धी दैनिक सामना 

ऑनर किलिंगच्या घटना आपल्या देशात मागील दोन दशकांपासून घडताहेत. सुरुवातीला त्याविरोधात देशभरात आक्रोश दिसायचा. आता केवळ हतबलता दिसते आणि धक्का बसलेला जाणवतो. समाज पुन्हा आपल्या दिनचर्येत गढून जातो. मागील दशकांत घडलेल्या बहुतांश घटनांत घरच्या मंडळींचा विरोध पत्करून परधर्मीय वा परजातीय जोडीदाराशी विवाह केलेल्या युगुलासच याला सामोरे जावे लागले होते. मात्र अलीकडील दोन वर्षांत सजातीय विवाह करून देखील केवळ आर्थिक विषमतेपायी जीवे मारण्याचा अमानुष नीचपणा दिसून येतोय. समाजात विषमतेचा, जातीयतेचा, अस्मितेचा नि अभिनिवेशाचा अभिमान अहंकार आता किळसवाण्या विखारात बदलत चाललाय ज्यामुळे सामाजिक समतेची मुळे अधिकाधिक कमकुवत होताहेत. इथे वानगीदाखल मागच्या पंधरवाड्यात घडलेल्या दोन गोष्टींचा ओघवता परामर्श घेतलाय.

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

निस्सीम प्रेमाची अमरकथा.. रवींद्रनाथ ठाकूर आणि नलिनी !




प्रेम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मनात बऱ्याचदा प्रेमाचे काही आदर्श असतातच. जे की त्याने वाचलेले, ऐकलेले वा पाहिलेले असतात. लैलामजनू, हिर रांझा, रोमिओ ज्युलियेट ही यातली जुनी नावे. फिल्मी जोड्या आणि त्यांच्या भूमिकांची नावे जसे की वासू सपना, वीर झारा यांचाही प्रभाव असतो. याहून भिन्न प्रकृतीचाही एक महत्वाचा घटक असतो ज्याचा प्रेमी युगुलांवर प्रभाव जाणवतो तो म्हणजे साहित्य. त्यातही प्रेमकवितांचा ठसा अधिक. यात पुन्हा व्यक्तीसापेक्ष कवितांची नि कवीची नामावली वेगळीच समोर येते. त्यातही रवींद्रनाथ ठाकूर यांचे नाव बहुश्रुत असेच आहे. त्याचे कारण त्यांच्या काव्यरचनेच्या वैशिष्ट्यांत आणि त्यामागच्या पार्श्वभूमीमध्ये आहे.

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

सुलोचना, मीना आणि काळजावरचे भळभळते घाव..



काही घाव कधीच भरून येत नाहीत...
मीनाच्या मध्यस्थीतून सुलोचनाने भेटीसाठी निरोप दिलेला असल्याने तिला भेटायचे होते मात्र लॉकडाऊनच्या काळात तिला भेटता आलं नाही.
२००६ मध्ये तिच्यावर बलात्कार झालेला. आरोपी पकडले गेले. खटला भरला गेला आणि त्यांना चौदा वर्षांची सक्तमजूरीची सजा लागली.
बलात्कार झाल्यानंतर पती अरुणचं तिच्यासोबतच वर्तन हळूहळू बदलत गेलं.
सुरुवातीला लढा, संघर्ष इत्यादी शब्दांनी तिला खूप भारी वाटायचं, मात्र नंतर आपल्या अरुणचं बदलतं स्वरूप पाहून ती घाबरून गेली.

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

एड्स, निरोध, वेश्या आणि अशोक अलेक्झांडर..

भारतातील कोविड विषाणूच्या साथीसंदर्भात डब्ल्यूएचओच्या विविध इशाऱ्यांनी एक प्रकारचा धुमाकूळ घातल्याचे दिसून येते, अजूनही याची मोठी दहशत आढळते. WHOने याहून भयानक इशारे भारतातील एड्सच्या प्रादुर्भावासंदर्भात दिलेले होते. 2002 साली दिलेल्या इशाऱ्यात म्हटलं होतं की साल 2010 पर्यंत भारतातील एड्सबाधितांची संख्या अडीच कोटी इतकी असेल. प्रतिदिन तब्बल हजार लोकांना एड्सची बाधा होईल असंही म्हटलं होतं. भारत हा एड्स कॅपिटल बनून जाईल अशी भीती व्यक्तवण्यात आली होती. मात्र साल 2010 येऊन गेले, डब्ल्यूएचओने सांगितल्यासारखी भयानक स्थिती देशभरात झाली नाही. पोलिओ निर्मूलनासाठी भारताने राबवलेल्या धोरणांचा, आराखड्याचा नेहमीच जगभरात गौरव होत राहिला. मात्र एड्सच्या महाभयानक संसर्गजन्य एपिडेमिकवर भारताने मिळवलेल्या विजयावर अगदी किरकोळ लेखउल्लेख समोर आले. हा भेदभाव का झाला याचं उत्तर आपल्या मानसिकतेत आहे. खरं तर हा आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा सर्वात मोठा विजय होता, कोविडच्या साथीवरून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेलच की आपली सार्वजनिक व खाजगी आरोग्य व्यवस्था अगदीच बेताची आणि पुरती सक्षम नाही. मग दोन दशकापूर्वी जेंव्हा एड्सच्या संसर्गाचे इशारे दिले जात होते तेंव्हा तर अगदीच प्राथमिक अवस्थेत आपली आरोग्य व्यवस्था होती. असं असूनही आपण हे करू शकलो. हे सगळं कुणामुळे शक्य झालं त्यांना श्रेय नको का द्यायला ? आपण यात कोतेपणा दाखवला मात्र जगभरातील काही एनजीओंनी यासाठी मुक्त कंठाने आपल्याकडील सेक्सवर्कर्सची तारीफ केली. या महिलांसोबतच आणखी एक नाव महत्वाचं होतं ते म्हणजे अशोक अलेक्झांडर !