शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

तुलसीदासांचे श्रीराम..



प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्पार्किंग पॉईंट येतो जिथे त्याचे आयुष्य बदलते. तुलसीदास रामभक्त होते मात्र त्यांनी आपले जीवन रामाला समर्पित केलेले नव्हते. मात्र त्यांच्या आयुष्यात एक प्रसंग असा घडला की, त्यांच्या मनात थेट वैराग्य भावनाच जागृत झाली आणि त्यांनी आपले जीवन प्रभू रामचंद्रांना समर्पित केले. 

रत्नावली ही तुलसीदासांची पत्नी. अतिशय रूपवान आणि बुद्धिमान स्त्री! तुलसीदास आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करत. एकदा रत्नावली आपल्या भावासोबत माहेरी गेली. तुलसीदास पत्नीच्या विरहाने व्याकुळ झाले. ते भर पावसात, रात्रीच्या वेळी, उफाणणाऱ्या यमुना नदीला ओलांडून गेले. नदी ओलांडण्यासाठी त्यांनी नदीत सोडलेल्या एका प्रेताचा वापर लाकूड म्हणून केला. त्यावर बसून हातांनी पाणी वल्हवत ते सासरी पोहोचले.

गुरुवार, ३० जुलै, २०२६

इंगमार बर्गमनचा 'द सर्पंट्स एग'


विल्यम शेक्सपिअरच्या, 'ज्युलिअस सीझर' नाटकात सापाच्या अंड्याचे एक प्रतीक आहे. सापाचे अंडे बाहेरून निरुपद्रवी दिसते; परंतु त्याच्या कवचातून आरपार पाहिले तर आत वाढणाऱ्या जीवाची चाहूल लागते. वेळेत ते अंडे नष्ट केले नाही, तर पुढे तो सर्प संपूर्ण समाजाला दंश करू शकतो, असे ते रूपक.
माणसं जी दुष्कृत्ये करतात ती त्यांच्या मृत्यूनंतरही टिकून राहतात; मात्र त्यांची सत्कृत्ये अनेकदा त्यांच्या अस्थींसोबतच गाडली जातात... म्हणूनच, त्याला सापाच्या अंड्यासारखे समजले पाहिजे; कारण ते अंडे उबल्यावर त्यातून बाहेर पडणारा जीव त्याच्या जातीप्रमाणेच अपायकारक ठरतो. हे यामागचे लॉजिक!

बुधवार, १५ जुलै, २०२६

नाळ तुटलेली नाती..


चिंधी आरती नावाची एक तरुणी होती, जी धंदा करायची. पुणे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये तिचे नाव सापडेल, हौशी माणसं त्याचा शोध घेऊ शकतात. नाव ऐकून कुणाला वाटेल की, हिला चिंधी का म्हटले जात असेल, याची कारणे काय असतील! ह्या बाबतीत लोक काहीही सांगायचे. ती चिंधीवर बसते, चिंधी नेसते इथंपासून ती चिंधी खाते इथंपर्यंतचे प्रवाद होते. वास्तवात तिचे नावच चिंधी होते, तिला लाईनमध्ये आणलं तेव्हा तिच्या मालकिणीने तिला आरती हे नाव दिलं. ते नाव तिला आवडलं नाही. कस्टमरने नाव विचारलं तर ती आपलं नाव चिंधी असंच सांगे. बाकी बायका मात्र तिला आरती म्हणत! अखेरीस ती चिंधी आरती झाली.

मंगळवार, १४ जुलै, २०२६

परिकथेमागचे दुःख - हॅन्स अँडरसनचा संघर्ष!



विलक्षण आनंद देणाऱ्या, मनाला उभारी देणाऱ्या, नैतिकतेची पायाभरणी करणाऱ्या आणि जगभरात गाजलेल्या कथांचे लेखन करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात आनंदाचे अगदी मोजके क्षण यावेत ही अतिव दुःखद गोष्ट! जन्मापासून मरणापर्यंत दुःखाने ज्याचा पाठलाग केला अशा माणसाने आनंद, प्रेम, तृप्तता, प्रेरणा यांनी भारलेल्या कथा कशा लिहिल्या असतील याचे कोडे उमगत नाही. कारण माणूस जे जगतो तेच त्याच्या लेखनात येते असं म्हटलं जातं. एखाद्याने कल्पनाविलास करून लेखन केले असेल तरीही त्याचे वैयक्तिक आयुष्य थोडे का होईना पण लेखनात डोकावत असतेच! मात्र लाखात एखादा अपवाद असतो जो ह्या गृहितकाच्या छातीवर बसून त्याला खोटं ठरवतो! हॅन्स अँडरसन त्यापैकीच एक होता.

गुरुवार, २ जुलै, २०२६



एक नोंद पाकिस्तानच्या विख्यात गायिका फ़रीदा ख़ानम ह्यांच्याविषयीची. सोबतचा फोटो त्यांचाच आहे. त्याच त्या, - "आज जाने की जिद न करो..." फेमवाल्या, एक महान चितचोर नार !नव्वदच्या दशकात विख्यात शायर मुनीर नियाजी यांनी, 'हमेशा देर कर देता हूँ..' ही त्यांची बेमिसाल नज्म ऐकवली होती तेव्हा श्रोत्यांमध्ये बसलेल्या फ़रीदा ख़ानमना अश्रू अनावर झाले आणि नकळत त्या रडू लागल्या. त्यांना दिवंगत बहिणीची आठवण झाली होती!

त्यांची बहीण मुख्तार बेगम एकाएकी आजारी पडली आणि तिचा आजार बळावत गेला. विविध ठिकाणी म्युझिक टूरवर गेलेल्या फ़रीदा वेळेवर आपल्या आजारी बहिणीकडे पोहोचू शकल्या नाहीत. त्यांच्या बहिणीचा इंतकाल झाल्यावरच त्या पोहोचल्या. एकुलत्या बहिणीच्या शेवटच्या क्षणी आपण हजर राहू शकलो नाही ह्या गोष्टीची त्यांना कायमची खंत राहिली.

फ़रीदा ख़ानम ह्यांचा संसार सुखाचा होता. गायन हा त्यांचा प्राण! पतीच्या निधनानंतर त्यांनी गायन सोडलं होतं मात्र केवळ चाहत्यांच्या प्रेमाने त्यांना पुन्हा माईकपुढे उभं केलं. 2015 साली पाकिस्तानस्थित कोक स्टुडिओमध्ये त्यांनी, 'आज जाने की जिद ना करो..' ही नज्म अशी काही गायली की, आताची पिढी देखील त्यांची आशिक झाली.

बुधवार, १ जुलै, २०२६

विजया मेहता – काही नोंदी.

  


विजयाबाई काल गेल्या. त्यांच्याविषयी अनेकांनी भरभरून लिहिलंय, यावरून त्यांच्या समृद्धीची, त्यांच्या योगदानाची प्रचीती यावी. त्यांच्याविषयी काही नोंदी.

अनिल बर्वे यांच्या ‘हमीदाबाई की कोठी‘ या नाटकाचे दिग्दर्शन करताना विजयाबाईंना हमीदाबाई या वृद्ध तवायफेच्या शरीर-भाव-चाल-बोली यांचा खरा आत्मा कसा असेल, याची कल्पना येत नव्हती. त्यांच्या सासूबाई दुर्गा खोटे यांनी सल्ला दिला: “एका खऱ्याखुऱ्या कोठीवालीकडे जा.” हा सल्ला मिळताच त्या तडक निघाल्या. त्या काळात ही गोष्ट किती धाडसी होती याची तुम्हाला कल्पना असेलच!

त्या काळात मुंबईत नेहल मंजिलमध्ये राहणारी एक वृद्ध तवायफ नीलम बाई यांच्याकडे विजयाबाई गेल्या. नीलम बाईंनी त्यांना आपले जीवन, सौंदर्य, वृद्धत्व, एकटेपण आणि त्या जगाचे सूक्ष्म बारकावे सांगितले.

हा अनुभव इतका संवेदनशील होता की, विजयाबाईंना हमीदाबाईची भूमिका आणि संपूर्ण नाटकाची दृष्टी मिळाली. ही भूमिका त्यांनी स्वतः केली होती, यावरून नाटकाकडे आणि नाटकातील पात्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी लक्षात यावी.