शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

सलाम बॉम्बे - प्रेमाचे उदास क्षण...



‘सलाम बॅांम्बे'मध्ये पंधरा सोळा वर्षांची एक विलक्षण कोवळी मुलगी लाईनमध्ये आणलेली असते. तिला या विश्वातलं खाण्यापिण्याचं, नटण्यामुरडण्याचं सुखही लोभसवाणं वाटतं. तिची नथ उतरवण्याच्या वेळेस तिचा सौदा होतो.

कृष्णा हा त्याच एरियात चहा नाश्ता पोहोचवण्याचं काम करणारा अनाथ पोर. तिथलं बदमाश पब्लिक त्याला चायपाव म्हणूनच हाक मारतं. ते त्याचं टोपणनाव.

चौदा पंधरा वर्षांचा हा चुणचुणीत पोरगा त्या मुलीवर जीव लावून बसतो! त्या मुलीची तिथली पहचान ‘सोला साल‘ या नावाची!

या कोवळ्या मुलीला ‘बाबा‘चं आकर्षण असतं. बाबा (नाना पाटेकर) हा तिथला नामचीन दलाल. त्याचं रफटफ वागणं, त्याचं व्यसनी असणं आणि त्याचा अय्याशी रूबाब तिला खुणावतो.

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

बदलता सिनेमा आणि ‘एआय’चे युग!


देशात स्वातंत्र्याचा लढा जोरात होता तेव्हा भारतीय सिनेमा मुख्यत्वे मायथॉलॉजिकल पौराणिक विषयांवर आधारित असायचा.


पन्नासच्या दशकात हिंदी सिनेमात आदर्शवाद हा मुख्य विषय असायचा. नायक शिक्षक, मजूर, शेतकरी असत; क्वचित डॉक्टर, वकील देखील असत, आणि शहरातल्या / गावातल्या अविवेकी व्यक्तीविरोधात त्याचा संघर्ष असे.

साठच्या दशकात आदर्शवादाला रोमँटीसिझमची जोड मिळाली आणि आदर्श प्रेमी युगुल सिनेमाच्या केंद्रस्थानी दिसू लागलं. त्यांच्या प्रेमात अडथळे आणणाऱ्या गोष्टी आताच्या काळात आपल्याला चौकटबंद वाटत असतील मात्र त्या काळात नैतिकता, विवेक, आदर्शवाद, त्याग, करुणा आस्था यांना जे महत्व होतं ते पाहू जाता त्या चौकटी कालानुरूपच होत्या असे म्हणावे लागेल.

सत्तरच्या दशकात सिनेमामध्ये आर्थिक सामाजिक विषमता हळूहळू समोर येऊ लागली. नायक नायिका यांच्यातील कुणीतरी गरीब असायचं आणि तरीही ते एकमेकावर प्रेम करायचे. सोन्याची बिस्किटे आणि घड्याळे यांची स्मगलिंग करणारे स्मग्लर्स या काळात हिंदी सिनेमाच्या खलनायकीत रुजले होते. झाडाआड लपून प्रेम करणारे कपल असायचे आणि फुलाला फुल बिलगल्याचे दाखवले जायचे.

बुधवार, २८ जानेवारी, २०२६

अजितदादा पवार: जननायक कर्मयोद्धा!


महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात एक चमकदार तारा काल निखळला. काल बारामती विमानतळाजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी ते महाराष्ट्रातील जनतेस पोरके सोडून गेले! त्यांच्या आठवणी, त्यांचे भाषण, सभा आणि जनसेवेचा वारसा कायम राहील. 'दादा' म्हणून ओळखले जाणारे अजित पवार केवळ यशस्वी राजकारणी नव्हते, तर एक कर्तबगार प्रशासक, शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मित्र आणि कुटुंबवत्सल मायाळू व्यक्ती होते. ते जितके मृदु मुलायम होते तितकेच वज्रनिश्चयी आणि प्रसंगी कठोर वाटावे अशा व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुन्न झाला आहे, आणि त्यांच्या स्मृतींचे आभाळ पुन्हा पुन्हा भरून येत आहे. त्यांची अनेक भाषणे, त्यांची देहबोली, त्यांचं वागणं, त्यांचं कार्यमग्न असणं, त्यांच्या वैयक्तिक आठवणी आणि लाडक्या जनतेप्रती त्यांचं समर्पित असणं आदी गोष्टींद्वारे त्यांची उणीव अधिक गहिरी होतेय! लोकाभिमुख कामे करणाऱ्या अजितदादांची प्रतिमा 'टग्या' अशी का निर्माण केली असेल हा प्रश्न राहून राहून पडतो! कदाचित राजकीय डावपेचातून हे घडले असावे! असो. वास्तवात त्यांची भाषणे आणि त्यांची कामाची शैली तसेच त्यांच्याकडे कामे घेऊन जाणाऱ्या माणसांचे अनुभव पाहू जाता त्यांची प्रतिमा 'कामाचा माणूस' अशीच असायला हवी होती!

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

फायर ऑफ लव्ह - निसर्ग आणि मानवाच्या प्रेमाचे महाकाव्य!




सारा डोस दिग्दर्शित 'फायर ऑफ लव्ह' ही डॉक्युमेंटरी म्हणजे केवळ दोन ज्वालामुखी तज्ज्ञांच्या कार्याचा आलेख नाही, तर तो निसर्ग, विज्ञान आणि प्रेम यांच्या अद्वैताचा एक नितांत सुंदर आविष्कार आहे. कात्या आणि मॉरिस क्राफ्ट या फ्रेंच दाम्पत्याच्या आयुष्यावर आधारित हा माहितीपट प्रेक्षकांना एका अशा जगात घेऊन जातो, जिथे मृत्यूच्या सावलीतही जीवनाचे विलोभनीय संगीत ऐकू येते. कात्या आणि मॉरिस या दोघांचेही ज्वालामुखीवर असलेले प्रेम हे त्यांच्या वैयक्तिक प्रेमापेक्षाही अधिक उत्कट होते की काय, असा प्रश्न ही डॉक्युमेंटरी पाहताना पडतो. ही केवळ दोन भिन्नलिंगी शास्त्रज्ञांची कथा नसून 'निसर्गाच्या काळजाचे ठोके' ऐकणाऱ्या दोन वेड्या निसर्गप्रवाशांची गाथा आहे. 1970 आणि 80 च्या दशकात त्यांनी टिपलेले ज्वालामुखीचे थरारक चित्रीकरण हा या डॉक्युमेंटरीचा मुख्य कणा आहे. 'लाल ज्वालामुखी' (Red Volcanoes) आणि 'राखाडी ज्वालामुखी' (Grey Volcanoes) यांच्यातील भेद स्पष्ट करतानाच, मानवी अस्तित्वाची क्षणभंगुरता यात प्रभावीपणे मांडली आहे. क्राफ्ट दाम्पत्याने ज्वालामुखी विज्ञानात (Volcanology) मोलाची भर घातली आहे. त्यांच्या संशोधनाचे दोन मुख्य भाग पडतात - लाल ज्वालामुखी हे प्रामुख्याने हवाई किंवा आइसलँडमधील ज्वालामुखी होते. यात लाव्हा संथपणे वाहतो. कात्या आणि मॉरिस यांनी या लाव्हाच्या प्रवाहाचा वेग, त्याचे तापमान (जे अनेकदा 1000 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते) आणि त्यातील वायूंचे उत्सर्जन यांचा सखोल अभ्यास केला. राखाडी ज्वालामुखी हे सर्वात धोकादायक ज्वालामुखी मानले जातात. 1980 मधील 'माउंट सेंट हेलेन्स'च्या उद्रेकानंतर क्राफ्ट दांपत्याने आपला मोर्चा या राखाडी ज्वालामुखींकडे वळवला.

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

सुगंधा!


काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मंडईलगतच्या रस्त्याच्या कडेला एक अंध चिमुरडी उभी असायची.

तो रस्ता तिच्या परिचयाचा असावा
तिचे अंध वडील तिथेच कुठेतरी आसपास असायचे, तिच्या हाती अंध व्यक्तींची छोटी काठी दिसे.

तिचा चेहरा वाहतुकीच्या सन्मुख असे, रोज सकाळी ठराविक वेळी ती कुणाची तरी वाट पाहत उभी असे.
दरम्यान त्याच वेळी एक हार गजरे विकणारा
वृध्द इसम तिथे येई
बहुतेक त्यांची ओळख असावी.

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

गोष्ट एका मायाळू घोडीची!



थोरले आजोबा हमालीचे काम करायचे, त्यांच्याकडे एक बैलगाडी होती. छकडाही होता. त्यावर पोती लादून ती पोच करायचे,ट्रक ट्रॉलीमध्ये चढवायचे काम ते करायचे. त्यांच्या चुलत भावाकडे एक टांगा होता आणि दोन घोडे होते. पडीक रान होतं, ज्यात धान्य भाजीपाला पिकवावा म्हटलं तर पाणी नव्हतं. आजोबांच्या घरालगत बरीचशी मुस्लिम वस्ती होती. जवळच्या दर्ग्याला लागून सारी घरं वसली होती. दर्गा ओलांडला की काही अंतरावर हमरस्ता होता. सकाळीच ताज्या दूध भाकरीची न्याहरी करून आज्जा हमालीसाठी घराबाहेर पडायचा. आज्जा बाहेर पडताच टांगा घेऊन त्यांचा चुलत भाऊ देखील बाहेर पडायचा. टांग्याला जुंपलेल्या घोड्याचे नाव होतं शेरा! खास हौस म्हणून ठेवलेल्या दुसऱ्या दोन घोड्यांना रपेटीसाठी वापरले जायचे. त्यात एक नर होता आणि एक मादी. हिरा आणि राणी ही त्यांची नावं.

सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

ब्रिजित बार्डो - विचारांची दोन टोके गाठणारी सेक्स सिंबॉल!


एके काळची सेक्स सिंबॉल असणारी आणि मॉडेलिंग तसेच अभिनयाच्या क्षेत्रात आपला वादग्रस्त ठसा उमटवणारी फ्रेंच वोक लेडी, ब्रिजित बार्डो हिचे आज निधन झाले. एखाद्या व्यक्तीची मते, विचारधारा या टोकाकडून त्या टोकाकडे कशी जातात याचे ती उत्तम उदाहरण ठरावी.

मृत्यू समयी ती 91 वर्षांची होती, तिच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात तिच्याविषयीची चर्चा तिच्या सेक्सी असण्याबद्दल आणि हॉट दिसण्याबद्दलची असायची. ती जगभरात चर्चेत होती ते दशक साठ आणि सत्तरचे होते, माझ्यासह अनेकांचा जन्मही झालेला नव्हता अशा काळातील ही बिनधास्त बाई, तिच्या आयुष्याच्या अखेरच्या तीन दशकात एकशे ऐंशी अंशातून बदलली!

खरे तर ती कधीही फक्त एक लैंगिक प्रतीक नव्हती, लोकांच्या मते मात्र ती सदैव टूपीस बिकिनी घातलेली मोलोटॉव कॉकटेल होती! ती ओरिजिनल "इट गर्ल" होती जिने, महायुद्धोत्तर युरोपातील लैंगिक नीतीमत्तेच्या विचारधारांचा  अक्षरश: पालापाचोळा केला होता! आणि त्या बदल्यात तिला वैयक्तिक जीवनात त्याची क्रूर किंमत मोजावी लागलेली.

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

बेपत्ता होणाऱ्या जिवांचे व्याकुळविश्व!


मागील काही दिवसांपासून राज्यांतील बेपत्ता व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बातम्यांची संख्या वाढलेली दिसतेय. खरेतर ही वाढ केवळ राज्य पातळीवर नसून देश पातळीवर, जागतिक पातळीवरही दिसते आहे. ही वाढ मागील काही दशकांच्या तुलनेत अधिक आहे. मुंबई आणि उपनगरात जून ते डिसेंबरमध्ये 93 मुलींसह 145 जण बेपत्ता झाल्याची माहिती मध्यंतरी फोकसमध्ये आली होती, नंतर काही दिवसात तिचे बातमीमूल्य शून्य झाले. महाराष्ट्रातील मुले आणि मुली बेपत्ता होण्याबाबतची 2024 -2025 या काळातील अधिकृत आकडेवारी भीषण आहे. एका आकडेवारीनुसार वर्षभरात राज्यात एकूण 37695 मुली आणि महिला बेपत्ता झाल्यात, त्यातील 4096 मुली अल्पवयीन आहेत तर सज्ञान महिलांची संख्या 33599 आहे. या काळातली मुंबई आणि इतर शहरांमधील आकडेवारी अधिक चिंताजनक आहे. एकट्या मुंबईमध्ये 1 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या अवघ्या छत्तीस दिवसांत मुंबईतून 82 मुले बेपत्ता झाली. यापैकी 60 महिला/मुली होत्या. जून ते डिसेंबर या सहा महिन्यात एकूण 134अल्पवयीन मुले बेपत्ता झाली, ज्यामध्ये 86 मुलींचा समावेश होता. नवी मुंबईमध्ये जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान 499 मुले बेपत्ता/अपहरण झाल्याची नोंद झाली, त्यापैकी 458 मुले शोधण्यात पोलिसांना यश आले असून 41 मुले (34 मुली आणि 7 मुले) अजूनही बेपत्ता आहेत. नागपूर शहरात जानेवारी 2024 ते मे 2025 या काळात 5897 बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारी आल्या, ज्यामध्ये 776 मुले होती. महाराष्ट्रात, देशांत मुलं मुली बेपत्ता होण्यामागे विविध कारणे आहेत. मानवी तस्करी (Human Trafficking), बालविवाह (Child Marriage), पळून जाणे (Elopement), लैंगिक शोषण (Sexual Exploitation), कामासाठी शोषण (Labour Exploitation), आणि कौटुंबिक समस्या (Family Issues), प्रेमसंबंध किंवा सामाजिक माध्यमांवरील फसवणूक (Social media enfluence) इत्यादींचा समावेश होतो; यांतील काही घटनांमध्ये कधी फसवून नेले जाते तर कधी मुलं मुली स्वतःच काही कारणास्तव घर सोडून जातात, आणि अनेकदा पोलिसात तक्रार दाखल होण्यास उशीर होतो किंवा प्रतिष्ठेचा विषय समजून प्रकरणे दाबून टाकली जातात, ज्यामुळे ही समस्या गंभीर बनते.

शनिवार, २० डिसेंबर, २०२५

एपस्टीन फाइल्स! - वासना विकृतीच्या दलदलीची साक्ष



आपल्या देशातील राजकीय वर्तुळात एपस्टीन फाइल्स हे शब्द मागील काही दिवसापासून चर्चेत आहेत. तसे तर याची चर्चा जगभरात आहे, खास करुन अमेरिकेत तर मागील कित्येक महिन्यांपासून आहे.

आपल्याकडे काहींना वाटते की, या फाइल्सचे तपशील अमेरिकन संसदेत सार्वजनिक केल्यानंतर राजकीय घडामोडींना उत येईल.

असे काही होईल की नाही हे काही तासांनी कळेलच. तूर्त एपस्टीन फाइल्सची आणि या मागच्या विकृत वासना कांडांची माहिती.

एपस्टीन स्वतः सेक्स हाउंड होता, विकृत होता. त्याने केवळ बाललैंगिक शोषण केले अशातली बाब नव्हती त्याने जगभरातील धनाढ्य धेंडांना लहान मुली पुरवल्या. त्या मुलींचे एकदा नव्हे तर अनेकदा शोषण केले.

दोन दशकं तो हा उद्योग करत होता. त्याचे स्वतःच्या मालकीचे एक बेट होते. तिथे तो या ओंगळवाण्या श्रीमंतीच्या चिखलात बुडालेल्या गलिच्छ लोकांना बोलवायचा, त्यांच्या विकृत वासनांना तो आकार द्यायचा.

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

मुल्क राज आनंद - भूमिका घेऊन जगलेला लेखक!


"आजही लिखाण माझ्यासाठी एक प्रकारची थेरपी आहे. दररोज लिहिल्याशिवाय मला राहवत नाही. खरं तर 1927 मध्ये मला पहिल्यांदा मानसिक ताणामुळे खचायला झालं तेव्हा व्हिएन्नामध्ये सिग्मंड फ्रॉइड यांची भेट घेतली. पुढे जाऊन आमच्या भेटींचा सिलसिला जारी राहिला.

त्यांच्यासोबतच्या प्रत्येक भेटीने मला मोठा दिलासा मिळाला. पण नंतरच्या काळात आलेल्या मानसिक ताणांच्या दोन धक्क्यांवर मात करण्याची ताकद मात्र फक्त लिखाणातूनच मिळाली. या प्रत्येक आघात समयी मी एक कादंबरी लिहिली, परिणामी कमकुवत झालेली मनोवस्था पुन्हा सावरली.

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

द राँग ट्रेन थिअरी - स्वतःच्या शोधाची गोष्ट!

‘द राँग ट्रेन थिअरी‘ नावाचे एक गृहीतक जपानमध्ये प्रसिद्ध आहे. कधीकधी चुकीचे लोक आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातात मात्र तो प्रवास सहनशीलतेचा अंत पाहतो! ‘द राँग ट्रेन थिअरी‘मध्ये एक सुंदर आणि तितकीच दुःखद गोष्ट आहे.
 
कधीकधी आपण चुकीचा मार्ग स्वीकारतो, चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा चुकीच्या जागी खूप वेळ थांबून राहतो. चुकीचे करिअर निवडतो, चुकीच्या गावी स्थलांतरित होतो, चुकीच्या नात्यात - भावनांत गुंतून पडतो, चुकीच्या कल्पनांना आपलं विश्व मानतो, चुकीच्या शब्दांना भुलतो - बळी पडतो, असं बरंच काही चुकीचं आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात स्वीकारलेलं असतं.

हे आपल्यासोबतच का घडतं? खरे तर आपण जेव्हा या निर्णयाचा स्वीकार केलेला असतो तेव्हा सुरुवातीला हे सगळं आपल्याला खूप भारी वाटत असतं. हे सर्व आपल्या मनासारखं घडतंय या आनंदात आपण मग्न होतो.

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

स्त्रियांचे जगातले पहिले मतदान आणि भारत -


  
संपूर्ण देशभरातील स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणारा जगातला पहिला देश न्यूझीलँड आहे. आजच्या तारखेस 132 वर्षांपूर्वी संपूर्ण न्यूझीलँडमधील महिलांनी मतदान केले होते. 19 सप्टेंबर 1893 रोजी हा कायदा तिथे संमत झाला आणि त्याच वर्षी 28 नोव्हेंबरला पार पडलेल्या निवडणुकीत किवी महिलांनी मतदान केले. खरेतर याही आधी अमेरिकेच्या वायोमिंग आणि यूटा या राज्यात स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला होता मात्र उर्वरित अमेरिकन राज्यात त्यांना मताधिकार नव्हता. म्हणूनच अशी समानता राबवणारा न्यूझीलँड हा पहिला देश ठरला. तिथे महिलांना मतदानाचा हक्क मिळण्यामागे दारूचा वाढता प्रभाव, पुरुषांमधली वाढती व्यसनाधिनता कारणीभूत होती हे सांगूनही खरे वाटणार नाही, मात्र वास्तव हेच होते.

मागील काही वर्षांत न्यूझीलँडमधल्या माओरी आदिवासी स्त्रियांचे आणि त्यांच्या परंपरिक 'हाका'चे रिल्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, याला कारण होते माओरी आदिवासींची व्यक्त होण्याची अनोखी 'हाका' शैली, माओरी जनतेचे त्यांच्या मातृभाषेवरचे असीम प्रेम! माओरी स्त्रीपुरुष दोघेही लढवय्ये आहेत हे एव्हाना जगातील सर्व देशांना कळून चुकलेय. सतराव्या शतकात हा देश ब्रिटिश अंमलाखाली होता. 1841 साली न्यूझीलँडला स्वयंशासित कारभाराची परवानगी मिळाली. मात्र पूर्ण स्वातंत्र्य आपल्याप्रमाणेच 1947 मध्ये मिळालं.

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

गोष्ट वीज कोसळण्याच्या योगायोगाची आणि झांबळमधल्या कथेची!


एका विलक्षण योगायोगाची वा कदाचित अज्ञात ऊर्जेची ही पोस्ट. 4 जून 1737 ची घटना. कॅलेब पिकमन हा बावीस वर्षांचा तरुण त्याच्या आईला भेटायला घरी आला होता. कॅलेब हा सागरी कप्तान होता. सागरी मोहिमा पूर्ण झाल्या की सहा महिन्यांनी तो घरी यायचा. घटनेच्या दिवशीही तो समुद्री सफर पूर्ण करून घरी आला होता. तो पावसाचा दिवस होता, किंचित भिजलेल्या कॅलेबने दरवाजाबाहेर अडकवलेली धातूपट्टी ओढून डोअरबेल वाजवली, त्याच्या आईने आतून हाक मारल्यावर आपण दाराबाहेर उभं असल्याचं त्यानं सांगितलं. त्याची वयस्क आई दारापाशी येऊन दरवाजा उघडेपर्यंत आकाशात विजेचा कडकडाट झाला. कॅलेबच्या आईने दार उघडून पाहिलं तर तिचा मुलगा दाराबाहेर मृतावस्थेत पडला होता. वीज कोसळून अवघ्या निमिषार्धात त्याचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील सालेम या समुद्रकिनारी असलेल्या शहरात ही घटना घडली.

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

मेडीटेशन आणि रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस!


माणूस इकडे तिकडे शांतता शोधत असतो मात्र खरी शांतता त्याच्या हृदयात असते. अर्थात या गोष्टीचा थांग तेव्हाच लागतो जेव्हा मन अशांत होते! शांततेचा शोध शांत भोवतालात अथवा सुख समृद्धीत आकंठ बुडालेल्या अवस्थेत असताना कुणीच घेत नाही! जगभरात बुद्धासारखे एखादे अपवाद असतील मात्र बाकी विश्व शांतता कधी शोधते याचे उत्तर एकसमान येते.

आज जगभरात मेडीटेशनचा बोलबाला आहे, आपल्याकडे तर मेडीटेशन्सवरच्या रिल्स, पोस्ट्स, पॉडकास्ट लाखोंच्या संख्येत रतीब घालताना दिसतात. आपल्यापैकी अनेक जण विविध प्रकारचे मेडिटेशन करताना दिसतात. मनःशांतीचा सोपा नी सहज सुलभ मार्ग म्हणून याकडे पाहिले जाते! मात्र मेडिटेशन कुणी लिहिलं याचा शोध घेतला की विस्मयकारक नाव आणि माहिती समोर येते!

आपल्यापैकी अनेकांनी 'ग्लॅडिएटर' हा सिनेमा पाहिला असेल. अभिनेता रसेल क्रो याने साकारलेला मॅक्सिमस, कमांडर ऑफ द आर्मीज ऑफ नॉर्थ, विसरणे शक्य नाही. वास्तवात हे पात्र काल्पनिक होते तरीही जगभरातील सिनेरसिकांना याची भुरळ पडली कारण, मॅक्सिमसची पार्श्वभूमी! आपला वृद्ध राजा मार्कस ऑरेलियस याच्याशी एकनिष्ठ असणारा सेनापती असणारा मॅक्सिमस आपलं सर्वस्व गमावूनही राजावर झालेल्या अन्यायासाठी प्राणांची बाजी लावतो. मार्कसचा क्रूर मुलगा सम्राट कमोडस याची तो हत्या करतो अशा मांडणीची ती काल्पनिक कहाणी होती.

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

कविता - जिचे मरण स्वस्त झाले!


ही ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे कारण अतिशय वेदनादायी आहे. अगदी खात्रीशीर माहिती स्त्रोताच्या आधारे सांगावे लागतेय की, महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने एड्स, एचआयव्ही बाधित रुग्णांना मदत, उपचार देणाऱ्या अनेक केंद्रांचा, स्वयंसेवी संस्थांचा निधी मागील तीन महिन्यापासून थांबवला आहे. सरकार कुठे कुठे कसे कसे पैसे खर्च करतेय हे आपण सारेच पाहत आहोत!

या जीवघेण्या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण घटले असले तरी संपलेले नाही, निर्मूलन झालेले नाही हे सत्य आहे! अजूनही शेकडो रुग्ण प्रत्येक केंद्रात उपचार घेतात. या बायका लाडक्या नाहीत का? यांना उपचार मिळावेत असे वाटत नाही का?

दोन हजारात त्यांची महिन्याची औषधे येत नाहीत हे या क्षेत्रात काम करणारा कोणताही माणूस सांगेल! कवितासारख्या कित्येक बायकांना नवजीवनाची संजीवनी देण्यापासून आपण मागे हटू शकत नाही! हे पाप आहे, हा कोतेपणा आहे, हे मानवतेला धरून नाही!

सरकारने रोखून धरलेली मदत पुन्हा पूर्ववत करावी आणि गांजलेल्या, नाडलेल्या अभागी महिलांचा दुवा घ्यावा! कल्याणकारी राज्यात ही गोष्ट होणं अनिवार्य आहे. ही फार मोठ्या रकमेची बाब नाही. अवघ्या काही कोटींची ही समस्या आहे, सरकार यावर विचार करेल काय? असो.

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

पंडित नेहरूंना मंटोंचे पत्र.


जागतिक किर्तीचे, विख्यात लेखक सआदत मंटो हे फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झाले. याआधी ते मुंबईत राहत होते आणि चित्रपटांसाठी लिहित होते. त्यांच्या कथांवर अश्लीलतेचे आरोप झाले होते आणि त्यांच्यावर खटलेही दाखल झाले होते.आपल्या मृत्यूच्या चार महिने बावीस दिवस आधी, ऑगस्ट 1954 मध्ये मंटोंनी नेहरुंना एक पत्र लिहिलं होतं. ‘बगैर उनवान के’ (उनवान म्हणजे शीर्षक) या लघुकथा संग्रहात मंटोंनी नेहरूंना लिहिलेले पत्र प्रस्तावनेत सामील केले गेले. त्या पत्राचा हा स्वैर मराठी अनुवाद!
___________________

अस्सलाम अलैकुम, पंडितजी

तुम्हाला लिहिलेलं हे माझं पहिलं पत्र आहे. माशाअल्लाह, तुमचं नाव पाश्चात्य समाजातही रूपवान आणि विद्वान म्हणून घेतलं जातं. पण मीही काही फार मागे नाही असं मला वाटतं. जर नशिबाने मला अमेरिकेपर्यंत पोचवलं असतं, तर कदाचित सौंदर्याच्या मोजपट्टीवर मीही काही कमी ठरलो नसतो. पण तुम्ही आहात भारताचे प्रधानमंत्री, आणि मी पाकिस्तानचा कथाकार! या दोन भूमिकांमध्ये खूप अंतर आहे. तरीही एक धागा आहे जो आपल्याला जोडतो, तो म्हणजे कश्मीर! तुम्ही नेहरू आहात, मी मंटो. आणि कश्मीरी असण्याचा दुसरा अर्थच आहे सौंदर्य, जे मी अजून डोळ्यांनी पाहिलेलं नाही, पण जाणवतं मात्र खोलवर.

मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

जॉन मिल्टन - अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भोक्ता असलेला द्रष्टा कवी!


'वास्तवाला न भिडलेले, मानवतेच्या कसोटीत अपात्र ठरलेले सद्गुण मी स्तुतीस पात्र मानत नाही!' - स्वतःला जनतेचा तारणहार, सदगुणांचा पुतळा आणि देवतासमान समजणाऱ्या एका उद्दाम राजाला उद्देशून केलेले, हे बाणेदार उद्गार एका प्रतिभाशाली कवीचे होते! तो राजा होता, ग्रेट ब्रिटनचा राजा चार्ल्स पहिला आणि ते कवी होते, जॉन मिल्टन!

1608 साली लंडनला जन्मलेले, जागतिक कीर्तीचे कवी, लेखक जॉन मिल्टन यांनी 1644 साली ब्रिटिश राजसत्ता आणि संसद या दोहोंना उद्देशून, राजकीय सेन्सॉरशिपच्या विरोधात एक पुस्तिका लिहिली होती, एरीओपॅजिटिका हे तिचे नाव.

त्यांच्याच काही भाषणांचे आणि उताऱ्यांचे एकत्रित संपादन करुन त्यांनी स्वतः हे पुस्तक प्रकाशित केले होते, या पुस्तकाने ब्रिटिश राजसत्तेच्या तोंडचे पाणी पळालं होतं!

हे पुस्तक म्हणजे जॉन मिल्टन यांचं सर्वात प्रसिद्ध राजकीय-पत्रात्मक भाषण होय. ते केवळ विचारांचं पुस्तक नसून व्यक्तिगत आयुष्यात त्यांना सोसाव्या लागलेल्या घावांमधून जन्माला आलेली साहित्यकृती होती.

घोडे लावण्याची भाषा कीर्तनकारांना शोभते का?

 A person with orange turban

AI-generated content may be incorrect.


इंदुरीकर फेमस झाले ते त्यांच्या कीर्तनाच्या शैलीने!

त्यांच्या आधीच्या कीर्तनकारांनी त्यांच्यासारख्या शैलीत कीर्तन केले नव्हते. कॉमेडी कीर्तन हा वाह्यात शब्द त्यांच्यामुळे रूढ झाला. त्यांनी महिलांविषयी केलेल्या अनेक टिप्पण्या नि:संशय खालच्या दर्जाच्या आणि हीन मानसिकतेच्याच होत्या. व्यसनाविषयी आणि भरकटलेल्या तरुणांना ते झोडपून काढत हे योग्यच होते, वरवर त्यांचा आव आधुनिक कीर्तनाचा असला तरी काही बाबतीत ते मध्ययुगीन मानसिकतेचेच पुरस्कर्ते होते हे स्पष्ट जाणवत असे. असो. पोस्टचा मुद्दा तो नाहीये.

नुकताच त्यांनी त्रागा करत आपण इथून पुढे कीर्तन करणार नसल्याचे, जाहीर केलेय. त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे, आपण त्याविषयी हक्काने सांगू शकत नाही. मात्र कीर्तन बंद करण्यासाठी त्यांनी जी सबब पुढे केलीय ती अयोग्य आहे! ते म्हणतात की लोकांनी त्यांना घोडे लावलेत! (किती ओजस्वी भाषा आहे ही!)

पोरींनी लग्नात गॉगल घालून नाचू नये, गालांना मेकअप करू नये, डोळ्याखाली खाचात रंग भरू नये, लिपस्टिक लावू नये, वरात काढू नये आणि काढलीच तर त्यात नाचू नये अशा शंभर गोष्टी ते खिदळत, उड्या हाणत सांगत असत! लोकही बारुळ्यागत टाळ्या वाजवत!

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

एकमेव तत्वज्ञ सम्राट आणि मेडिटेशन!


अभिनेता रसेल क्रो याने साकारलेला 'ग्लॅडिएटर'मधला मॅक्सिमस, कमांडर ऑफ द आर्मीज ऑफ नॉर्थ, सहज विसरणे शक्य नाही. वास्तवात हे पात्र काल्पनिक होते तरीही जगभरातील सिनेरसिकांना याची भुरळ पडली याचे कारण, मॅक्सिमसची पार्श्वभूमी! प्रजेचा लाडका राजा मार्कस ऑरेलियसशी एकनिष्ठ असणारा सेनापती मॅक्सिमस आपलं सर्वस्व गमावूनही राजावर झालेल्या अन्यायासाठी प्राणांची बाजी लावतो. क्लायमॅक्सला, मार्कसचा क्रूर मुलगा सम्राट कमोडस याची तो हत्या करतो अशा मांडणीची ती काल्पनिक कहाणी होती. असो. पोस्टचा विषय तो नाहीये! पोस्ट मार्कस ऑरेलियस या अद्वितीय रोमन सम्राटाची आणि त्याने लिहिलेल्या दिव्य साहित्यकृती विषयी आहे! मेडीटेशनविषयी आहे!

आज जगभरात मेडीटेशनचा बोलबाला आहे. 'मेडिटेशन' कुणी लिहिलं याचा शोध घेतला की विस्मयकारक नाव आणि माहिती समोर येते! त्याचे मूळ रोमन साम्राज्यात पोहोचते!

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

शोधाचा एंडलेस डोह!

A person swimming in the water

AI-generated content may be incorrect.


बंगालमधली एक जुनी क्लिप पाहण्यात आली, त्यात साठीच्या आसपास वय असणाऱ्या वृद्धेविषयीची माहिती होती. तिचे घर पंधरा वर्षांपूर्वी नदीच्या पुरात वाहून गेलेलं. घरातल्या सगळ्या चीजवस्तुही वाहून गेल्या. पती निवर्तल्यापासून ती एकटीच राहायची, तिच्या हटवादी स्वभावामुळे दोन्ही मुले तिला सोडून गेली. 2010 मध्ये तिची एकुलती मुलगी बाळंतपणाला माहेरी आली होती. रात्रीतून दामोदर नदीचे पाणी वाढले आणि त्यात तिचे घर वाहून गेले, तिच्या मुलीचे शव काही दिवसा नंतर मिळाले.

त्या घटनेनंतर तिच्या मनावर खोल आघात झाला. सरकारने तिला नवे घर दिले, भांडीकुंडी घेण्यासाठी मदतही केली. अनेक विणवण्या केल्यानंतर तिने स्थलांतर केले. लोक तिला विसरून गेले. मात्र चार वर्षांनी फार मोठा पूर आला तेव्हा ती पुन्हा तिथे परतली. पूरग्रस्तांसोबत राहू लागली. सरकारी अधिकारी पुराची पाहणी करण्यास आले की ती हमखास समोर असे.

बुद्ध, मोक्ष आणि किसा गोतमी - एक अद्भुत सत्वकथा!


थेरीगाथावरील भाष्यग्रंथ असणाऱ्या अट्ठकथा या ग्रंथामध्ये किसा गोतमी नावाच्या बौद्ध भिक्खुणीची कथा आहे. किसा गोतमी हिचे तान्हे मूल आजारी पडून एकाएकी निवर्तते. आपल्यासोबत असे कसे झाले, हा प्रश्न तिला भंडावून सोडतो.

पुत्रशोकाने वेडीपिशी झालेली किसा गोतमी भगवान बुध्दांकडे याचक म्हणून येते आणि ती तथागतांना विनंती करते की, "माझ्या पुत्रावर माझे अतिव प्रेम आहे, त्याच्या शिवाय मी जगू शकणार नाही. तेव्हा हे भगवान मला मझ्या पुत्राचा जीव परत मिळवून द्या. तुमच्या शक्तींचा वापर करून हा चमत्कार करा, माझा पुत्र माझ्या पदरात टाका."

यावर भगवान बुध्दांनी तिला सांगितले की, "ठीक आहे, मी तुझे काम करेन, मात्र त्यासाठी तुला एक काम करावे लागेल. मृत्यूची गाठभेट न झालेल्या कुटुंबातून चिमुटभर मोहरी मागून आणशील तरच हा चमत्कार होऊ शकेल."

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

धर्मेंद्र - जट यमला पगला!


त्याचे श्वास अजून जारी आहेत, त्याच्या सिनेमाविषयी वा त्याच्या करिअरविषयी खूपजण खूप काही सांगतील; मला थोडेसे वेगळे सांगायचेय.. 

धरमची गोष्ट सुरु होते 1935 मध्ये. 8 डिसेंबरला पंजाबच्या साहनेवाल गावात जन्मलेला हा एक साधा जाट मुलगा. धर्म सिंह देओल त्याचं नाव. जग त्याला 'धर्मेंद्र' म्हणून ओळखते, त्याच्या आयुष्याची कहाणी, केवळ चित्रपटांच्या यशाची नाही, तर अंतर्मनातील एकाकीपणाची, प्रेमातील द्वंद्वाची आणि संघर्षातील जयपराजयाची आहे. त्याने बॉलीवूडला 'ही-मॅन' दिला, त्याच्या जीवनात असे अनेक क्षण येऊन गेलेत जेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले, हृदयात अपराधीपणाची जखम खोलवर रुजली आणि एकाकी एकांताने त्याला शांत केलं.

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

जोहरान म्हणजे आकाशातला पहिला तारा!


जोहरान ममदानी यांचा जन्म पूर्व आफ्रिकन देश युगांडाची राजधानी कंपाला इथला. त्यांना जाणून घेण्यासाठी त्यांचे वडील मोहमद ममदानी यांची माहिती घेणे अनिवार्य आहे, कारण त्याशिवाय जोहरान यांची जडणघडण आकळू शकत नाही. मोहमद ममदानी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतात मुंबईत जन्मलेले. ते दोन वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबासोबत टांझानियाला गेले आणि तिथून पुढे नजीकच्या युगांडात गेले. त्यांचे कुटुंब तिथेच स्थायिक झाले. आफ्रिकेमधल्या टॉपच्या युनिव्हर्सिटीत त्यांनी अध्यापकाचे काम केले, खेरीज ते एक उत्तम आर्थिक राजकीय तज्ज्ञ होते. इदी अमीन सत्तेत येईपर्यंत तिथल्या सर्व स्थलांतरित लोकांचे समुदाय सुखात होते, मात्र तो सत्तेत येताच त्यांना देश सोडून जावे लागले!

ड्रॅक्युला - सैतानी दुनियेच्या अनभिषिक्त सम्राटाची जन्मकथा!


हॉरर, थ्रिलर सिनेमे पाहाणाऱ्या दर्दी रसिकास 'ड्रॅक्युला' माहिती नसावा असे होत नाही! ब्रॅम स्टोकरने ज्या काळात ड्रॅक्युला ही कादंबरी लिहिली तो व्हिक्टोरियन एरा होता. या कालखंडात प्रामुख्याने चार वर्ग होते - उच्च, मध्यम, श्रमिक आणि तळाशी असणारा निम्नवर्ग. या चारही वर्गांची विभागणी केवळ सामाजिक स्तरावर नसून आर्थिक स्तरदेखील त्यात अंतर्भूत होता. या वर्गवारीचे युरोपमध्ये बऱ्यापैकी सक्त आणि कठोर विधीसंकेत होते. व्यक्तीचा आर्थिक स्तर, त्याचा हुद्दा, शिक्षण यावरून त्याचा वर्ग ठरे. यामुळे सामाजिक देवाणघेवाण अगदी कमी होई, असे असले तरी पुरुष हवे तिथे तोंड मारत आणि स्त्रियांची कुचंबणा ठरलेली असे, मग ती कोणत्याही वर्गातली असली तरीही! एखाद्या उमरावाच्या पत्नीचे जीवन भलेही ऐश आरामात, आनंदात जात असले तरी व्यक्तीस्वातंत्र्याच्या बाबतीत तिचा आणि तळाच्या स्त्रीचा स्तर जवळपास समान असे. बाहेरख्याली पुरुषांना आपल्या अवतीभवती पाहून, त्या स्त्रियांच्या मनात कोणते विचार येत असतील यावर विपुल लेखन झालेय, मात्र त्यांच्या लैंगिक शोषणाविषयी बोलताना त्यांच्या लैंगिक गरजांविषयी तुलनेने कमी लिहिले गेलेय. ब्रॅम स्टोकरने हा मुद्दा बरोबर पकडला आणि त्याच्या मनात घोळत असलेल्या गोष्टी त्यात बेमालूम मिसळल्या.

गोष्ट सुटकेसमध्ये ठेवलेल्या मृतदेहाची!


बेनाव्हिडेस हा मध्यमवयीन पुरुष. भरकटलेला आणि जगण्याच्या विविध समस्यांनी हैराण झालेला माणूस. एके दिवशी त्याच्या संयमाचा विस्फोट होतो, तो अत्यंत विचलित होतो. संतापाच्या भरात, तिशीच्या वयातल्या पत्नीची हत्या करतो. तिची हत्या केल्यानंतर काही वेळाने तो भानावर येतो. रागाच्या भरात आपण हे काय करून बसलो याचे त्याला शल्य वाटू लागते. तो गोंधळून जातो, आता काय करावे, हे काही केल्या त्याला सुचत नाही.  पत्नीचा मृतदेह तो एका मोठ्या सुटकेसमध्ये भरतो. खरेतर आपण ही सुटकेस घेऊन पोलिसांकडे गेले पाहिजे असं त्याचं एक मन सांगत असतं तर त्याचं दुसरं मन त्याला सांगतं की कदाचित डॉक्टर आपल्या पत्नीचे काय करायचे ते सांगू शकतील! द्विधा मनस्थितीत तो घराबाहेर पडतो.

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

औरते – रमाशंकर यादव विद्रोही..

A close-up of a person crying

AI-generated content may be incorrect.


काही स्त्रियांनी
स्वेच्छेने विहिरीत उडी मारून जीव दिलाय
असं पोलिसांच्या नोंदींमध्ये लिहिलंय.

आणि काही स्त्रिया
चितेवर जळून मरण पावल्या —
असं धर्मग्रंथांमध्ये लिहिलंय.

मी कवी आहे,
कर्ता आहे,
घाई कशाची?

एके दिवशी मी पोलीस आणि पुरोहित
दोघांनाही एकाचवेळी
स्त्रियांच्या न्यायालयात उभं करेन,

जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याविषयीची एक नोंद..


जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं बालपण आयर्लंडमध्ये पांढरपेशी गरिबीत गेलं. त्यांचे वडील पेशाने कारकून होते, मद्याचा अंमल चढला की त्यांना आवरणे कठीण जाई. खेरीज ते काहीसे उदासीन स्वभावाचे होते. घरात रोज भांडणं होत, भांड्यांची आदळआपट चाले. नीरव शांततेच्या जागी किंकाळ्यांचा आवाज भरलेला असे.
या वातावरणातही शॉची आई, ल्युसिंडा गार्नी शॉ हिने आपला छंद लुप्त होऊ दिला नव्हता. ती अत्यंत प्रतिभावान गायिका होती. तिचा आवाज लोकांना भावविभोर करायचा. पण तिचं आयुष्य एका अपयशी लग्नाच्या सावटाखाली हळूहळू कोमेजत चाललं होतं आणि याचं तिला शल्य होतं.

दरम्यानच्या काळात त्यांच्या घरात एक संगीत शिक्षक येत असत; जॉर्ज वँडेल ली हे त्याचे नाव. हळूहळू शॉची आई त्याच्याकडे आकर्षित झाली. दोघांमध्ये आत्मिक जवळीक वाढली. जॉर्जच्या घरी शिसवी पियानो होता. आईची बोटे पियानोच्या कळांवरुन फिरू लागली की त्याचे मन भरुन येई. त्याला विलक्षण आनंद होई.

रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

हे चाहूर आहे तरी काय?


साठच्या दशकात आईने नर्सची नोकरी प्रामाणिकपणे आणि विलक्षण संवेदनशील पद्धतीने केली. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील दहागाव या छोट्याशा खेड्यात आरोग्य केंद्रात ती रुजू झाली होती. हा भाग अजूनही निबिड अरण्यासारखा आणि अडगळीचा आहे, साठ वर्षापूर्वी तर हा भाग एखाद्या आदिम मानवी वसाहतीसारखा होता! आई अहमदनगरची, तिने कधी समुद्र पाहिलेला नव्हता, थेट कोकणात तिने काही वर्षे काढली. स्वतःला जुळवून घेण्यासाठी तिला झगडावे लागले!

अतिशय खडतर परिस्थितीतून तिने स्वतःला उभं केलं आणि कमालीच्या सहनशील, संयमी, जिद्दी वृत्तीने पुढचे आयुष्यही कष्टात काढले. विपरीत परिस्थितीतही तिने चारही अपत्ये घडवली! आम्हा चारही भावंडांना शिक्षणाची गोडी लावण्यात आणि लेखन वाचनाची ओढ निर्माण करण्यास सर्वस्वी तिच कारणीभूत होती. ती होती, म्हणून आम्ही सर्व घडलो. माझी भावंडे जितक्या चांगल्या पद्धतीने आईवडिलांच्या कसोटीस उतरली त्या मानाने मी खूपच कमी पडलो आणि नंतरही निखारु शकलो नाही, हे वास्तव मी लिहिले पाहिजे.

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

ब्लड रिव्हर - टिम बुचर यांची अद्भुत कादंबरी!


नुकतेच आपल्या देशाच्या राजधानीत यमुना नदीच्या अस्वच्छतेवरून मोठा तमाशा झाला, छट पूजेसाठी खोट्या स्वच्छ पाण्याची नौटंकीही करुन झाली. बेसिकली आपल्याकडे, नद्यांना आपण नावाला पवित्र मानतो, त्यापलीकडे आपली त्यांच्याप्रती आस्था नाही हे आपण खुल्या मनाने मान्य केले पाहिजे. अमुक एक नदी पुराणात आहे, तमुक एक नदी इतिहासात आहे, अलाण्या नदीचे पाणी पवित्र आणि फलाण्या नदीचे पाणी मोक्ष देते इत्यादी कल्पनात आपण, आपल्याच स्वार्थासाठी गुंतून पडलो आहोत. जसे की आपले दुष्कर्म कमी व्हावे, आपली पापे कमी व्हावीत, आपल्याला आशीर्वाद लाभावेत, आपलं कल्याण व्हावं, वगैरे वगैरे! म्हणजे आपण नदीला काही देणार नाही, नदीसाठी आपण काही करणार नाही आणि त्या बदल्यात तिच्याकडून आपल्याच कथित भल्याच्या कपोलकल्पित गोष्टी मागणार, पुण्य वाढवून मिळावे म्हणून डुबकी मारणार! आणि नदीला आपण काय देणार, तर ड्रेनेजचे पाणी, गटार नाल्यांचे पाणी, रासायनिक कारखान्यांचे दूषित पाणी आणि आपणच टाकलेला गावभराचा कचरा! नदी गढूळ विषारी घाण होऊन जाते, तरीही आपण तिच्यासाठी झिजत नाही की तिच्यासाठी आपला जीव तीळतीळ तुटत नाही! नद्या आपल्या जीवनदायिन्या आहेत वगैरे ज्ञानकण फुंकायला मोकळे होतो. सरकारेही आपल्यासारखीच कागदावर अब्जावधी रुपयांच्या योजना आणतात, काही कोटी खर्च होतात, नदी कणभरच बदलते पण मणभर पैसा इकडे तिकडे फिरतो! घाण गलिच्छ अवतारात नदी वाहत राहते! नदीविषयी आपल्यात अनास्था आहे हे कटूसत्य आहे.

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

सरस्वती चंद्र - एक हळवी व्यथा!


प्रेम जरी अपूर्ण राहिले, तरी ते आत्म्याला पूर्णत्व देऊन जाते हा अभूतपूर्व संदेश ‘सरस्वतीचंद्र‘ कादंबरीमध्ये होता; यातली नायिका शेवटी म्हणते की, 'विरहच खरेतर आत्म्याच्या मुक्तीचा आरंभ असतो.'एखाद्या व्यक्तीने कुणावर प्रेम केले असेल मात्र तिच्यासोबत विवाह झाला नसेल तर त्या व्यक्तीच्या मनात नेमकी कोणती तगमग होते?
जिच्याबरोबर प्रेम केले तिच्यासोबत विवाह होऊ न शकलेल्या व्यक्तीला त्या विवाहित प्रेयसीच्या घरात व्यवसायात रोज आपलं तोंड दाखवावं लागेल अशी परिस्थिती उद्भवली तर कशी मनोवस्था होईल?

प्रेम केले म्हणजे सर्वस्व अर्पण केले पाहिजे असे काही नाही, मात्र आपण एकमेकांवर निस्सीम निरपेक्ष प्रेम करत होतो ही गोष्ट तरी त्या दोन प्रेमी जीवांनी जाणून घेतली पाहिजे!

नूतनची मुख्य भूमिका असणारा ‘सरस्वतीचंद्र‘ हा याच नावाच्या गुजराती कादंबरीवर आधारित होता. गोवर्धन त्रिपाठी यांनी लिहिलेल्या या कादंबरीची कथा दोन गुजराती ब्राह्मण कुटुंबांवर केंद्रित आहे. लक्ष्मीनंदनचे कुटुंब मुंबईत स्थायिक आहे, त्यांचा व्यवसाय भरभराटीस आलेला आणि ते खूप श्रीमंत! सरस्वतीचंद्र हा लक्ष्मीनंदन आणि चंद्रलक्ष्मी यांचा पुत्र. तो एक उच्च बुद्धिमत्ता असणारा विद्वान, हुशार वकील आणि संस्कृत, इंग्रजी साहित्याचा स्कॉलर अभ्यासक. वडिलांच्या व्यवसायातही तो यशस्वीरित्या योगदानही देतो. त्याचे भविष्य उज्ज्वल असते.

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

इदी अमीन - स्वप्नाळू राष्ट्रवादाचा दमनकारी सत्ताधीश!


विदेशात राहणाऱ्या काही अगोचर आणि मूर्ख भारतीयांच्या आततायी वर्तनामुळे जगभरात भारतीय लोकांविरोधात आवाज उठवला जातोय हे आता लपून राहिलेले नाही, अलीकडील दोनेक वर्षात तर या गोष्टी वेगळ्याच स्तरावर पोहोचल्यात. नेमक्या याच काळात जागतिक कीर्तीच्या द इकॉनॉमिस्ट या नियतकालिकात युगांडाचा हुकूमशहा, इदी अमीन या क्रूरकर्म्याविषयीचा लेख ठळक पब्लिश झालाय. युगांडामधील परकीय नागरिकांना खास करून भारतीय नागरिकांना, त्याने अत्यंत क्रूरपणे देशातून पलायन करण्यास भाग पाडलं होतं.

1976 साली लंडनमधील मॅडम तुसॉ या मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयाने आपल्या भेट देणाऱ्यांना विचारलं की, “संग्रहालयातील सर्वात नावडती व्यक्ती कोण?” त्या मतदानात युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन दुसऱ्या क्रमांकावर आला होता, अर्थातच पहिला क्रमांक होता अडॉल्फ हिटलरचा! (आपल्याकडील काहींना याची मोठी भुरळ पडलेली असते! असो) त्या काळात ब्रिटनमधील वृत्तपत्रांत अमीनच्या क्रूर कृत्यांच्या कथांचे रकाने गच्च भरलेले असत. त्यातील काही गोष्टी खर्‍या होत्या, जसे की तो खरंच हजारो लोकांचा खुनी होता. पण काही वदंता होत्या जसे की, त्याने आपल्या फ्रीजमध्ये शत्रूंची मानवी डोकी ठेवली होती, काहींच्या मते ही गोष्ट खरी होती. तो नरभक्षक होता. कोवळी मुले आणि शत्रू त्याचे भक्ष असत. तो भोगी होता आणि अय्याश होता!

शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

शिऊलीची फुलं - अलंकृताची लोभस नोंद!

काही माणसं अगदी लोभस वर्णन करतात, केवळ एका ओळीतच ते अफाट काही सांगून जातात. कोलकत्यात फिरताना अलंकृता दासच्या घरी गेलो होतो. सोबत अबीर होता, निहायत बडबड्या स्वभावाचा हुशार तरुण! माझ्या येण्याचे प्रयोजन सांगताच अलंकृताच्या जास्वंदी चेहऱ्यावर तृप्ततेची फुले उमल्ली! माझ्या नि अबीरच्या प्रश्नांवर ती भरभरून बोलत होती.

आमच्याशी बोलत असताना पांढऱ्या शुभ्र साडीच्या पदराच्या टोकाशी तिच्या हातांचा चाळा सुरू होता तो एकाएकी थांबला आणि थांबा, तुम्हाला काहीतरी तजेलदार प्यायला देते असं म्हणत ती आत गेली.

दोनच खोल्यांचे तिचे घर अगदी नीटस होतं, अतिशय देखणं होतं! घरात श्रीमंती कुठेच डोकावत नव्हती मात्र एका कलावंत रसिक व्यक्तीचे ते घर आहे हे पाहता क्षणी लक्षात येत होतं.

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

स्वामी दयानंद सरस्वती - एक नोंद ..


ते 1867 चे साल होते. हरिद्वारच्या कुंभमेळ्यात स्वामी दयानंद सरस्वती धर्मप्रचाराच्या उद्देशाने आले होते. या मेळ्यात लाखो हिंदू स्त्री-पुरुष आणि साधू एकत्र येतात, त्यांच्याशी संवाद साधता येईल असा त्यांचा हेतू होता. कुंभमेळ्याच्या वेळी गंगेत स्नान केल्याने पाप धुतले जाते आणि मनुष्याला दुःखांपासून तसेच जन्म-मरणाच्या फेर्‍यातून मुक्ती मिळते ही श्रद्धा तेव्हाही जनमानसात रूढ होती, त्याविषयी दयानंदांना बोलायचे होते.
हरिद्वारमध्ये आल्यावर स्वामीजींनी पाहिले की, साधू आणि पंडे धर्माचा खरा उपदेश न करता लोकांना पाखंड शिकवून फसवत होते. समाज सत्य धर्माच्या मार्गावर चालण्याऐवजी अज्ञानाच्या खोल खाईत पडत चालला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कुंभ मेळ्यातील दृश्यांनी त्यांना अंतर्मनातून खोल वेदना झाल्या. त्यांनी जाणले की, लोक दुःखातून मुक्त होण्याऐवजी अशा कृत्यांमुळे दुःखाच्या भवसागरात बुडून जाताहेत.

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

बशीर बद्र - खामोशी एका शायराची..

बशीर बद्र सरांना त्यांचा ख़ुदा आता नक्कीच दिसत असेल..


विख्यात शायर, कवी बशीर बद्र आजारी असल्याचं ऐकून वाचून होतो. मध्यंतरी काही नतद्रष्ट लोकांनी त्यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल केली होती, वास्तवात ते गंभीर आजारी आहेत.

नुकताच त्यांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला, ज्यात बद्र सरांच्या पत्नी राहत बद्र, त्यांची शुश्रूषा करताना दिसल्या, बशीर सरांची यारदाश्त चांगली राहावी म्हणून त्यांच्या शेरो शायरीबद्दल बोलताना दिसल्या, बद्र सरांना डिमेन्शिया आणि अल्झायमरने ग्रासलेय.

त्यांचा भूतकाळ ते हळूहळू विसरत चाललेत, त्यांच्या माणसांची त्यांना ओळख लागेनाशी झालीय. त्यांचं स्वतःचं अस्तित्वही ते काही काळात विसरतील. त्यांचा जीव की प्राण असणारी शायरीदेखील त्यांच्या स्मरणनोंदीतून लुप्त होईल.

ते ब्लँक होतील. उरेल केवळ, त्यांची मंद गतीतली धडधडती नब्ज!

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

इतिहास बदनाम वस्तीचा - मीरतच्या कबाडी बाजारचा!



उत्तर प्रदेशच्या मीरतमधील कबाडीबाजार भागातील एका पियक्कड थोराड बाईने एका भेटीत 'ओल्ड मंक' पिणाऱ्या तरूण, प्रौढ आणि वयस्कर पुरूषांची गुणलक्षणे आणि सवयी सांगितल्या होत्या!विशेष म्हणजे तिन्ही वर्गवारीतील पुरुषांच्या त्या गोष्टी आणि त्यांची प्यायची पद्धत यांच्यात एक परस्पर सूत्र होतं, जे अफाट होतं! तेव्हापासून ओल्ड मंक पिणाऱ्या ओळखीच्या इसमांना ते वर्णन फिट बसतंय का हे चेक केल्यानंतर अक्षरश: अवाक होण्याची वेळ आली!

रेड लाइट डायरीज सिरिजमधील माझ्या आगामी पुस्तकातील मदिराक्षीच्या प्रकरणात विविध रंजक संदर्भ आणि नोंदी आहेत, त्यातच ही नोंद समाविष्ट आहे.

कबाडी बाजारची ही बदनाम वस्ती मुघल काळापासूनची आहे. 2019 मध्ये इथला हा व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासनाने जंग जंग पछाडले. धंदा पूर्ण बंद झाल्याचे जाहीरही केले पण याचवर्षी सप्टेंबरमध्ये एका रेडद्वारे वीस जणींची सुटका करण्यात आलीय, यावरून काय ते कळावे.

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

थिरुनल्लूर करुणाकरण यांच्या कविता आणि अष्टमुडी तलाव!..


अष्टमुडी तलाव हा केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील एक नयनरम्य नि महत्त्वाचा तलाव, अद्भुत नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध. 'केरळचे प्रवेशद्वार' या नावाने ख्यातनाम! बालकवींच्या कवितेत जसा विशिष्ट भूप्रदेश सातत्याने डोकावतो तद्वत हा अष्टमुडी तलाव थिरुनल्लूर करुणाकरण या विख्यात मल्याळम कवीच्या कवितेत अनेकदा नजरेस पडतो.

बालकवींच्या औदुंबर कवितेत तलावाकाठचे नितळ औदासिन्य आहे, अगदी तसेच नसले तरीही त्याच्याशी आपली जातकुळी सांगणारी एक कविता थिरुनल्लू र करूणाकरण यांनी लिहिली आहे. 'निळासांवळा झरा
वाहतो बेटाबेटातुन, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे. हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे. ... पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर..' या पंक्ती बालकवींच्या कवितेतल्या.

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

भीमेचे अश्रू..


7 मार्च 1966. आमच्या सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या भीमेच्या (चंद्रभागा) पात्रावरील उजनी धरण प्रकल्पाचं भूमिपूजन सुरु होतं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. नाईक यांनी नारळ वाढवला आणि यशवंतराव चव्हाण कुदळ मारण्यासाठी पुढे झाले अन त्यांच्या डोळ्यात पाणी आले. धोतराचा सोगा डाव्या हाताने उचलून धरत त्यांनी कुदळ खाली टाकली. थोडेसे पुढे सरसावले. नदीपात्राच्या दिशेने दोन्ही हात जोडून ते उभे राहिले. गदगदलेल्या आवाजात ते बोलले, "विठ्ठला मला माफ कर बाबा, मी औचित्यभंग करतोय. तुझी चंद्रभागा मी अडवलीय मला पदरात घे!".. कार्यक्रमाच्या भाषणात देखील त्यांनी हा सल बोलून दाखवला. आज या भीमेने आणि तिच्या उपनद्यांनी रौद्र रूप धारण केलेय! काय झालेय नेमके?

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

मिगेल टोर्ग - देशोदेशीचे मोर्गाडो!


मिगेल टोर्ग हे पोर्तुगाल मधले महत्वाचे आणि जागतिक ख्यातीचे लेखक. त्यांचं साहित्य जगभरात वाचलं जातं. 1940 साली प्रकाशित झालेला बिशोस (Bichos) हा त्यांचा गाजलेला लघुकथासंग्रह. यात वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या चौदा कथा आहेत.

या सर्व कथा प्राणीविश्वाशी निगडित आहेत. प्राण्यांचे सहजीवन आणि त्यांच्या वाट्याला आलेले मनुष्य अशी मांडणी काही कथांत आहे. 'मोर्गाडो' ही कथा यापैकीच एक आहे. ही एका खेचराची काहीशी करुण आणि नर्मविनोदी कथा आहे.

मोर्गाडो हा, घोडा आणि गाढव यांच्या संकरापासून तयार झालेला खेचर. पोर्तुगालच्या ट्रास-ओस-मॉंटेसमधील एका श्रीमंत शेतकऱ्याच्या घरी तो वाढलाय. त्याच्या प्रथमपुरुषी निवेदनातून कथा समोर येते, ज्यात तो आपल्या जीवनाचा अर्थ, मालकाशी असलेले नाते आणि निष्ठुर मृत्यूची अटळ गोष्ट यांचा विचार मांडतो.

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

क्लिऑन – धूर्त कपटी रोमन नेता!


इसवीसनपूर्व पाचव्या शतकात क्लिऑन हा अथेन्समधील एक लोकप्रिय नेता (demagogue) होता, जो आपल्या आक्रमक वक्तृत्वासाठी आणि सामान्य जनतेच्या भावनांना हात घालण्यासाठी ओळखला जायचा.

क्लिऑनने पेलोपोनेसियन युद्धादरम्यान स्पार्टाविरुद्ध आक्रमक धोरणांचा पुरस्कार केला आणि सत्ताधारी वर्गाला (aristocrats) बदनाम करण्यासाठी जनतेच्या मनामध्ये आक्रोश निर्माण केला, त्याने जनतेच्या संतापाचा वापर केला.

प्रतिस्पर्ध्यांवर खोटे आरोप ठेवून किंवा त्यांच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जनतेचे लक्ष विचलित केले. उदाहरणार्थ, स्फॅक्टेरियाच्या युद्धात (Battle of Sphacteria, इ.स.पू. 425) त्याने सैन्याचे यश स्वतःच्या नावावर घेतले आणि युद्धविरोधी नेत्यांना कमजोर केले. त्याच्या या रणनीतीमुळे तो अथेन्सच्या राजकारणात प्रभावशाली नेता बनला.

मंगळवार, २९ जुलै, २०२५

साप - मनातले आणि हरवलेल्या जंगलातले!



साप हा शेतकऱ्याचा मित्रच! काही हजार वर्षापूर्वी जेव्हा आताच्या विविध धर्मातल्या देवदेवतांच्या संकल्पना रूढ नसतील तेव्हा माणूस निसर्गातील प्रतिकेच शिरी मिरवत असावा, त्यांच्यापुढेच नतमस्तक होत असावा. सूर्य, चंद्र, तारे, चांदण्या हे त्याची तत्कालीन दैवते (?) असावीत. पर्वतशिखरे, टेकड्या, नद्या, मैदाने, शेतशिवारे, जंगले यांची तो आराधना करत असावा. त्याच्यासाठी झाडे, पाने, फुलं, पाणी, पाऊस, अग्नी हे सर्व जीवश्च असणार. त्यांची आपल्यावर कृपा राहावी हा विचार त्याच्या मनात जेव्हा आला असेल वा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्याने निसर्गातल्या अशा सर्व प्रतिकांना वंदनीय स्थान दिले असणार. जेव्हापासून कृषक संस्कृती अस्तित्वात होती तेव्हापासून झाडे, पाने, फुलं, पाणी. पाऊस, साप, माती, पिके आदींना वेगळेच स्थान असावे. त्यांच्या नागपूजनाचे कारण हे असू शकते. आताच्या समाजाच्या डोक्यात नागपूजनाची ती संकल्पना अंशतःही नाही. सर्वच धर्मात अशा सर्व प्रतिकांना वेगळेच स्वरूप दिले गेल्याने यामागची मूळ भावना कधीच लोप पावली असावी. आता नारायण नागबळी या भाकड संकल्पनेपुरताच अनेकांचा नागांशी संबंध उरलाय! असो. व्ही.सुरेश या प्रसिद्ध सर्पमित्राविषयी ही पोस्ट!

मंगळवार, २२ जुलै, २०२५

चिरेबंदी गोठ्यातले नंदी!


एक काळ होता जेव्हा प्रत्येक गावातील बहुतांश शेतकऱ्यांकडे गुरे ढोरे असत. ज्याचं शेतशिवार मोठं असे त्याच्या रानात मजबूत गोठा असे. बऱ्यापैकी संख्येत शेळ्या मेंढरं असत, कोंबड्यांची खुराडी असत! रानात हिरवीगार कंच पिकं डोलत असत. पाना फुलांनी डवरलेली चॉकलेटी हिरवी झाडं माना तुकवून उभी असत. रानात कडब्याची भली मोठी गंज असे. झालंच तर गुरांना खायला हिरवंगार कडवळ नाहीतर मकवन तरी असेच, बळीराजाची लईच अडचण असली तर मागून आणलेलं हिरवं वाडं तरी असतंच. एव्हढे करूनही खेरीज जमलं तर अमुन्याची पाटी रोज संध्याकाळी गोठ्यातल्या गुरांसमोर ठेवली जायची. कडबाकुट्टी करून झाली की दावणीत त्याची लगड टाकली जाई. गुरं वळायला गुराखी पोरं असत. सकाळच्या धारा काढून झाल्यावर दिवस डोक्यावर यायच्या आधी गुरं चरायला माळावर नाहीतर गावच्या शीवेच्या हद्दीत नेली जात. हे दृश्य एके काळी खेड्यात दररोज संध्याकाळी सार्वत्रिक असे. विशेषतः गेलेली गुरे सांजेस परत येत तेव्हा हे श्यामल सुंदर दृश्य हमखास नजरेस पडे. गोठ्याकडे परतणाऱ्या लेकुरवाळ्या गायी-म्हशींच्या गळ्यातील घंटांचा आवाज ऐकून गोठ्यात दावणीला बांधून ठेवलेली त्यांची वासरे ताडकन उठून उभी राहत. कान ताठ करून आवाजाकडे कानोसा देऊ लागत, आनंदाने आपले सर्वांग थरथरवू लागत, घंटांचा आवाज जसजसा जवळ येईल तशी वासरे हंबरू लागत अन् आपल्या वासरांच्या हंबरण्याच्या आवाजाने त्या गोमाता अवखळपणे धावू लागत. धावणाऱ्या जनावरांच्या खुरांनी धुळीचे मंद लोट हवेत उडत, या गायी धावतच गोठ्यात आल्या की त्यांचे तटतटलेले पान्हे वाहू लागत. वासरांचे तोंड त्यांच्या कासेला जाऊन भिडले की, गायी आपल्या वासरांना मायेने चाटू लागत. हे मनोरम दृश्य बघून कुणाच्याही ठायी असलेला थकवा कुठच्या कुठे पळून जायचा. पाहणाऱ्याच्या प्रसन्न चेहऱ्यावर एक निरागस हसू उमटत असे. त्यांनाही आपल्या आईची आठवण येई आणि नकळत त्यांचेही मन आपापल्या माऊलीच्या ओढीने धाव घेत असे! हे दृश्य आता फारसे दिसत नाही. मात्र ज्या काळात जात्यावरच्या ओव्या अस्तित्वात होत्या, त्या काळात मात्र याचे मोठे प्रस्थ होते, त्यामुळे साहजिकच याचे प्रतिबिंब ओव्यांमध्ये पडलेले दिसते.

गुरुवार, १० जुलै, २०२५

पिंजरा आणि बाईच्या कथा


गणेश मुळे यांनी लिहिलेल्या 'पिंजरा आणि बाईच्या' कथा हा कथासंग्रह वाचला.
या संदर्भात काही निरीक्षणे नोंदवावी वाटली.

आधी नकारात्मक बाबी -
यात सहा कथा आहेत. पहिल्या तीन कथा अर्धवट वाटतात. उर्वरित तीन कथांची बांधणी गोटीबंद साच्यातली नाहीये त्यामुळे त्या पकड घेत नाहीत.

लेखकाला काय सांगायचे आहे हेच नेमके स्पष्ट होत नाही त्यामुळे वाचक संभ्रमात पडू शकतो.

सर्व कथांमध्ये काही साम्यस्थळे आहेत - लैंगिक उपासमार झालेल्या स्त्रियांची पात्रे आहेत. नवऱ्याला सोडून देणाऱ्या स्त्रिया आहेत. घटस्फोटीत स्त्रियांच्या कथा आहेत. पुरुषाच्या तालावर नाचण्याची इच्छा नसलेल्या स्त्रिया सर्व कथांमध्ये आहेत. मात्र या पात्रांची उभारणी संतोषजनक नाही. अशा स्त्रिया कमालीच्या कणखर असतात, टक्कर देण्यास सज्ज असतात तो निश्चयी निर्धार बाणा अभावाने दिसतो.
स्त्रियांची मुख्य पात्रे गोंधळलेली वाटतात.

बुधवार, ९ जुलै, २०२५

ब्लॅक बॉक्स डायरीज – एकाकी स्त्रीच्या संघर्षनोंदी


'ब्लॅक बॉक्स डायरीज' ही 2024 मध्ये प्रदर्शित झालेली एक शक्तिशाली आणि एका पीडित महिलेच्या वैयक्तिक नोंदीविषयीची डॉक्युमेंट्री आहे, जी जपानी पत्रकार शिओरी इतो यांची निर्मिती आहे. सिनेमॅ व्हेरिटे शैलीत याची निर्मिती केली गेलीय, ज्यामध्ये शिओरी यांच्या वैयक्तिक व्हिडिओ डायरीज, कोर्टरूम फुटेज आणि गुप्त रेकॉर्डिंग्ज यांचा समावेश आहे. त्यायोगे प्रेक्षकांना एक थरारक, भावनिक अनुभव मिळतो, जो शिओरी यांच्या संघर्षाची आणि धैर्याची जाणीव करून देतो. ही त्यांची पहिली पूर्ण-लांबीची डॉक्युमेंट्री, जी त्यांनी स्वतःच्या लैंगिक अत्याचाराच्या अनुभवावर निर्मिलेली. यात शिओरी इतो स्वतःच्या केसचा तपास करतात आणि एका प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध न्याय मिळवण्यासाठीचा त्यांचा लढा दाखवतात. हा लढा जपानमधील तत्कालीन #MeToo चळवळीचा एक महत्त्वाचा भाग बनला होता आणि त्याने जपानच्या कालबाह्य कायदेशीर आणि सामाजिक व्यवस्थांवर प्रकाश टाकलेला.

मंगळवार, ८ जुलै, २०२५

बदनाम गल्ल्यातले सच्चेपण – सैली 13 सप्टेंबर!



श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेला 'सैली 13' सप्टेंबर हे आत्मकथनपर कथासंग्रह त्या काळातला आहे ज्या काळामध्ये मराठी जनमानसात सोवळे ओवळे पाळले जात होते इतकेच नव्हे तर साहित्य प्रवाहात देखील अशा प्रकारचे अंडर करंट अस्तित्वात होते. अपवाद दलित साहित्याचा! मराठी साहित्यातील शहरी / नागर आणि ग्रामीण या वर्गवारीपैकी कथित शहरी साहित्यामध्ये जे विविध आशय विषय हाताळले गेलेत त्यातही काही घटक बऱ्यापैकी अस्पृश्यच राहिलेत. अर्थात यातही काही तुरळक सन्माननीय अपवाद होते. मराठी साहित्यामध्ये ज्याप्रमाणे विज्ञान कथा, मनोविश्लेषणात्मक कथा, निढळ लैंगिक कथा, वैश्विक वैचारिक समाजपट असणारे वाङ्मय तुलनेने कमी निर्मिले गेलेय, त्याचप्रमाणे काही विशिष्ठ वंचित शोषित घटकांचा अंतर्भाव असणारे सामाजिक साहित्यही कमी लिहिले गेलेय. त्यातलाच एक घटक वेश्या होय. वेश्या आणि वेश्यावस्ती यावर ज्ञात मराठी साहित्यातले आजवरचे सर्वाधिक भेदक, परिणामकारक लेखन नामदेव ढसाळांनी केलेय हे सर्वश्रुत आहे. अन्य काहींच्या लेखनामध्ये याविषयी कधी तुरळक तर कधी दीर्घ उल्लेख आहेत. देहविक्री करणाऱ्या पुरुषांचा कथावकाश मराठी साहित्यात येण्यासाठी तर 2019 चे साल उजाडावे लागलेय. डॉ. माधवी खरात यांच्या 'जिगोलो' या कादंबरीने ती उणीव भरुन काढली.

गुरुवार, ३ जुलै, २०२५

टायटन – एका डिझास्टरची दुःखद गोष्ट!




'टायटन द ओशियनगेट सबमरीन डिझास्टर' ही 2025 मध्ये रिलीज झालेली 'नेटफ्लिक्स'वरील डॉक्युमेंटरी आहे, जी 18 जून 2023 रोजी टायटॅनिकच्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या ओशियनगेट कंपनीच्या टायटन सबमर्सिबलच्या अंतर्गत स्फोटाने झालेल्या दुर्घटनेला केंद्रस्थानी ठेवते. ही दुर्घटना जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली होती, कारण यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन मार्क मुनरो यांनी केले आहे आणि ती या घटनेच्या मुळाशी असलेल्या कारणांचा, तांत्रिक त्रुटींचा आणि मानवी चुका यांचा सखोल अभ्यास करते.

गुरुवार, १९ जून, २०२५

अभिनिवेषातून प्रसवणारी प्रेमाची, विवाहसंस्थेची हत्या!


कुटुंबाच्या संमतीची पर्वा न करता प्रेमविवाह करणाऱ्या वर वधूची हत्या करण्याचे प्रमाण आणि समाजाचा विवाह सोहळ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांचा परस्पर संबंध आहे. देशातील प्रत्येक राज्यात याचे स्वरूप भिन्न असले तरी निष्कर्ष मात्र सारखाच येतो. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास कथित उच्चवर्णीयांमध्ये याची अधिक बाधा जाणवते.

'लग्नांच्या बाबतीत गाव काय म्हणेल ?' या प्रश्नाने खेड्यातल्या मराठ्यांना इतके ग्रासलेले असते की त्यापुढे त्यांच्या जीवनातल्या सर्व समस्या त्यापुढे फालतू ठराव्यात.
लग्न थाटातच झालं पाहिजे. मानपान झाला पाहिजे. पाचपंचवीस भिकारचोट पुढारी लग्नात आले पाहिजेत. जेवणावळी झाल्या पाहिजेत. गावजेवणे झाली पाहिजेत आणि वाजतगाजत वरात निघाली पाहिजे.
एकंदर गावात हवा झाली पाहिजे, चर्चा तर झालीच पाहिजे असा सगळा माहौल असतो.

शुक्रवार, १३ जून, २०२५

एअर इंडिया फ्लाइट क्रॅश - वेटिंग फॉर फायनल कॉल..

प्रतिकात्मक फोटो 

सर्वात वाईट असतं निरोप न घेता कायमचं निघून जाणं...

कालच्या विमान अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या करुण कहाण्या एकेक करून समोर येताहेत. त्यातली अत्यंत दुःखद दास्तान पायलट सुमित सभरवाल यांची आहे. ते अविवाहित होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांचे वडील 88 वर्षांचे असून ते बेडरिडन आहेत. सुमित आपल्या वडिलांना अधिक वेळ देऊ इच्छित होते. मात्र त्यांची एक्झिट अनेकांना चुटपुट लावून गेली.

एखादा माणूस अकस्मात आजारी पडला वा त्याचा अपघात होऊन त्याची अवस्था गंभीर झाली तर निदान त्याला पाहता येतं. स्पर्श करता येतं. त्याच्याशी एकतर्फी का होईना पण संवाद साधता येतो. तो बोलण्याच्या अवस्थेत असेल तर अखेरचे दोन शब्द बोलू शकतो.
संबंधित व्यक्तीचे देहावसान झाल्यावर त्या दोन शब्दांचा आधार आयुष्यभर साथ देतो.

जाणाऱ्यालाही कदाचित काही अंशी समाधान लाभत असेल की, आपल्या अंतिम समयी आपल्या प्रियजनांना पाहू शकलो, स्पर्श करू शकलो, एखादा दुसरा शब्द बोलू शकलो! त्या जिवाची तगमग कणभर का होईना पण कमी होत असेल!

मात्र निरवानिरवीची भाषा न करता, अंतिम विदाईचा निरोप न घेता कुणी कायमचं निघून गेलं तर मागे राहिलेल्या आप्तजनांना विरहाची तळमळ आमरण सोसावी लागते. मोठे वेदनादायी नि क्लेशदायक जगणे वाट्याला येते. काहींच्या बाबतीत काळ, जखमा भरून काढतो तर काहींना त्या वेदनेसह जगावे लागते.

बुधवार, ११ जून, २०२५

कलावंतांच्या गहिऱ्या प्रेमाचे सच्चे उदाहरण!


काही गोष्टी हिंदी सिनेमांतच शोभून दिसतात मात्र काही खऱ्याखुऱ्या गोष्टी अशाही असतात की सिनेमाने देखील तोंडात बोटे घालावीत. ही गोष्ट अशाच एका युगुलाची. आपल्याकडे कला क्षेत्रातील प्रेमाचे दाखले देताना नेहमीच अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या प्लेटॉनिक नात्याचा उल्लेख केला जातो. कदाचित हिंदी आणि पंजाबीचे उत्तरेकडील वर्चस्व याला कारणीभूत असावे. खरेतर असेच एक उदाहरण आसामी कलाक्षेत्रातलेही आहे, मात्र त्याचा फारसा उल्लेख कुठे आढळत नाही. गोष्ट आहे एका ख्यातनाम चित्रकाराची आणि एका विलक्षण गोड गळ्याच्या गायिकेची. नील पवन बरुआ हा एका युगाचा कुंचल्याचा श्रेष्ठ जादूगार आणि दीपाली बोरठाकूर, ही आसामची गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध!

शनिवार, ३१ मे, २०२५

एकमेवाद्वितीय - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर!

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  

महाराणी महान रयतप्रेमी होत्या. रयतेचे हालहवाल जाणून घेण्यासाठी त्यांचे गुप्तहेर रयतेत फिरत असत. एकदा एका हेराने खबर आणिली की, लक्ष्मीबाई नामे एका विधवा वृद्धेची सकल संपत्ती ऐवज रुपये पंधरा हजार तिच्या मुलाने जबरदस्तीने काढून घेऊन पत्नीच्या स्वाधीन केली असे. ही माहिती ऐकताच राणीबाईंना संताप अनावर झाला. त्यांनी तत्काळ त्या वृद्धेच्या सुनेला एक खलिता धाडला आणि विधवा सासूचे पैसे परत करण्याकरिता बजावले. त्यांनी नुसता आदेश दिला नाही तर सज्जड दम दिला. सुनेने रक्कम परत केली राणीबाईंनी ती रक्कम त्या अभागी सासूला परत केली. या प्रसंगी धाडलेल्या खलित्याचा तजुर्मा - 
'चिरंजीव साळूबाई वाघ यासी अहिल्याबाई होळकर यांचा आशीर्वाद. गंगाजळ निर्मळ लक्ष्मीबाई वाघ यांजकडून चिरंजीव अमृतवराव वाघ याने अमर्याद करून ऐवज पंधरा हजार घेऊन तुम्हापासी ठेविले. ते हुजुरी आणले पाहिजेत. यास्तव सरकारातून पागेचे स्वारासमागमे हे पत्र तुम्हास लिहिले आहे. तरी एक घडीचा विलंब न करता रुपये पंधरा हजार स्वारासमागमे पाठवावे. ढील केल्यास परिच्छन्न उपयोगी पडणार नाही. जाणिजे.'

शनिवार, २४ मे, २०२५

परंपरेच्या आडून भरणारा वासनांचा बाजार!


ही गोष्ट आहे एका लिलाववजा बाजाराची जिथे वयात आलेल्या मुलीची, तरुण स्त्रीची आणि पोक्त महिलेची बोली लावली जाते. इथे बायकांचा बाजार भरवला जातो. सोबतच्या फोटोतली निळ्या लहंग्यामधली मुलगी कंवरबाई आहे. तिचं मुळचं नाव अनिता. ती मध्यप्रदेशातील शिवपूरीची. बंचरा या भटक्या जमातीत तिचा जन्म झालेला. या जातीत एक प्रथा पाळली जाते, घरातील थोरल्या स्त्रीने घर नीट चालावे म्हणून बाहेरख्याली व्हायचं. त्यासाठी या बायकांचा रीतसर बाजार भरतो. बंचरा समाजाच्या तरुण पिढीच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. परंपरेच्या नावाखाली आपल्या मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावावे असे आजही अनेक पुरुषांना वाटते. एकेकाळी या जमातीमधील कर्त्या पुरुषांनी आपल्या मुली स्थानिक सरदारांना देण्यासाठी गरीब समाजबांधवांवर दडपण आणलं. पुढे जाऊन याचीही परंपरा तयार झाली. आपल्या मुलींची बिनपैशाची सोय लागते या नीच स्वार्थी हेतूने हा रिवाज कधीच बंद झाला नाही!

सोमवार, १९ मे, २०२५

गोष्ट, सरहद्दीची सीमा नसणाऱ्या नद्यांची आणि स्त्रियांची!


हा फोटो आज रात्रीचा आहे, बांगलादेशातील मित्राने पाठवला आहे. भारतीय सीमेलगतच्या बांगलादेशमधील 'राजशाही' या शहरालगत पद्मा नदी वाहते. फोटोमध्ये हिरव्या रंगात दिसणारे राजशाही शहर आहे, त्याच्या पुढे काळसर करडे दिसणारे पद्मा नदीचे विशाल पात्र आहे आणि नदी पात्रापलीकडे एका रेषेत दिसत असलेले फ्लड लाइट्स असलेला भाग म्हणजे भारतीय हद्दीचा भूभाग आहे. राजशाहीच्या टेकडीवरून हा फोटो घेतलाय आणि भारतीय हद्दीत चमकत असणाऱ्या वीजा त्यात कैद झाल्या आहेत.