शनिवार, २३ मे, २०२६

ट्रेन, टागोर आणि एका वेश्येचा आत्मशोध!


26 डिसेंबर 1977 च्या दिवशी तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांच्या हस्ते मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे आताचे सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवून गीतांजली एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आलं. मुंबई ते हावडा असा तिचा रूट होता. महान कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या 'गीतांजली' या जगप्रसिद्ध पुस्तकाचे नाव ह्या ट्रेनला देण्यात आलं होतं. 'गीतांजली' म्हणजे 'गाण्यांची भेट'.

ही ट्रेन सुरू झाली, तेव्हा ती भारतातील पहिली क्लासलेस ट्रेन म्हणून ओळखली जात होती, म्हणजेच, सर्व वर्गांमध्ये समान सुविधा असलेली आणि वातानुकूलित डबे नसलेली ट्रेन असं तिचं स्वरूप होतं. हुगळी नदीच्या काठी असलेल्या हावडा शहरातलं हे स्टेशन, भारतातलं सर्वात मोठं आणि सर्वात व्यस्त, तसेच सर्वात जुन्या जंक्शनपैकी एक रेल्वे जंक्शन आणि मुंबईचं व्हीटी त्याच्या तोडीस तोड!

हुगळी नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले हावडा हे बंगालमधलं महत्त्वाचं औद्योगिक आणि वाहतूकीचं केंद्र असणारं शहर. हुगळी नदीच्या विरुद्ध दिशेला कोलकता आहे! कोलकात्याला जाण्यासाठी हावडा ब्रिजचं प्रवेशद्वार खूप फेमस आहे.

सियालदा, संत्रागाची, शालीमार, डंकुनी, कोलकाता आणि हावडा ही कोलकाता महानगराला सेवा देणारी प्रमुख आंतर-शहरी रेल्वे होत. अनेक भल्या बुऱ्या गोष्टींनी इथे जन्म घेतलाय. अनेक आख्यायिकांचे हे आगार आहे! डंकुनीची कथा तर अगदी विस्मयकारक आहे!

हिंगेर कोचोरी, कोरा पाकेर संदेश, मोघलाई पराठा, दम आलू, फिश करी, मटण करी ह्या हावडा स्टेशनच्या स्पेशल डिशेस. भेटकी माशाची फिश करी अजूनही लोकप्रिय आहे, स्थानिक बंगाली ह्याला बारामुंडी मासा म्हणतात. इथला लज्जतदार चहा विसरता येत नाही!

गीतांजली एक्सप्रेस पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ़ आणि महाराष्ट्र ह्या पाच राज्यातून धावते. दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिकरोड पर्यंत ह्या गाडीत एका विशिष्ट क्लासचं पब्लिक येतं. जळगाव, भुसावळ, वडनेरा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या भागातून प्रवास करताना राज्यातला असमतोल प्रवासातही जाणवू लागतो.

राज नंदगाव, दुर्ग, रायपूर, बिलासपूर क्रॉस करताना छत्तीसगढच्या आदिवासी भागाचा प्रत्यय त्या त्या स्थानकावर येतो. झारसागुडा, राउरकेला स्टेशन्सचा आगाज घामेजल्या देहाच्या प्रवाशांनी होतो. ट्रेन ओडीशा क्रॉस करून झारखंडमध्ये शिरते. ट्रेन छत्तीसगढमधून जाताना काही स्थानिक विक्रेते 'डुबकी कढी' घेऊन येतात, त्याचा अद्भुत दरवळ जाता जात नाही. उडीद डाळीचे मुटके असलेली कढी असं याचं वर्णन आपण करू शकतो. हरभरा डाळीपासून बनवलेल्या बफौरीची चव कुणीही विसरू शकत नाही.

चना पोडा, गरम वडा, खाजा आणि दालमा यांचे गंध आले की समजायचे की आपण ओडीशामधून जात आहोत! लिट्टी चोखा, झालमुरी, गव्हाच्या पिठापासून बनवलेले गोडसर ठेकूआ यांचा स्वाद झारखंडच्या स्टेशन्सवरून आपल्या डब्यात प्रसवू लागतो! खास करून चक्रधपूर आणि टाटानगर स्टेशन्सवर हा अनुभव येतोच! खरगपूर स्टेशन आलं की, आपण बंगालमध्ये आल्याची वर्दी मिळते. वाफाळता चहा आणि तेलीभाजा यांची एकत्र टेस्ट जिभेला खवळून जाते! शिणलेल्या अंगाने आपण हावडा स्टेशनला उतरतो तेव्हा मुंबईत असल्याचा फील येतो कारण, तिथला गोंगाट आणि घामेजलेपण!

ह्या सर्व प्रवासात साईड विंडो असणारा स्लीपर बर्थ मिळाला तर तो आनंद द्विगुणित होतो! कारण प्रत्येक शहरागणिक इथला निसर्ग कूस बदलतो, खाद्य पदार्थ आपली जिव्हा अधिकाधिक समृद्ध करत जातात! ह्या सर्व प्रवासात आपण जर रवींद्र संगीत ऐकले वा रवींद्रनाथांच्या कविता वाचल्या तर ह्या प्रवासाचे मर्म उलगडते! ट्रेनमधल्या माणसांचे पोत बदलत जातात आणि आपण कितीही धनाढ्य असलो तरी आपली असलियत आपल्या समोर उभी ठाकते! हा एकत्रित परिणाम असतो त्या सकल घटकांचा जे आपल्या सोबत प्रवासात येत जात राहतात!

ज्या हुगळी नदीच्या काठी हावडा शहर वसलेय त्या नदीला, तिच्यावरच्या प्रसिद्ध हावडा ब्रिजला आपण अनेक सिनेमांत पाहिलंय. वहिदा रेहमान, राजेश खन्ना, धर्मेंद्र अभिनित 'खामोशी'मधलं 'वो श्याम कुछ अजीब थी' हे गाणं इथल्या हावडा ब्रिजखाली शूट झालेलं. 'दो बिघा जमीन' पासून ते 'भूल भुलैय्या पार्ट थ्री' पर्यंत हा ब्रिज हिंदी सिनेमाचा घटक झालाय. 'राम तेरी गंगा मैली' मधला मणीलाल, आरके'ला ह्याच हावडा स्टेशनवर भेटलेला. इथेच त्याने आपल्या पापाची कबुली दिली आणि त्याच्या हातून अब्रूचे धिंडवडे निघालेल्या पहाडी मुलीची कहाणी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली. हावडा ब्रिज ह्या नावाने ज्यावर सिनेमा बनवला गेला त्या पुलाचे खरे नाव रवींद्र सेतू असेच होते; मात्र हे नाव फारसे प्रचलित झाले नाही. ही बाब देखील मधू दंडवते यांच्या पर्यंत पोहोचली असेल! असो!

जे दुःख गंगेच्या वाट्याला आले तेच हुगळीलाही सोसावे लागले. हुगळी ही गंगा नदीची सर्वात पश्चिमेकडील उपनदी. तिच्या वरच्या भागात, ती भागीरथी म्हणून ओळखली जाते. ती पुढे जाऊन फरक्काच्या प्रवाहात मिसळते, परिणामी तिचा वेग आणि जलसाठा लक्षणीयरीत्या वाढतो. नवोद्वीपजवळ जलंगी नदीशी तिचा संगम होतो आणि अखेरीस ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. अजय, दामोदर, रूपनारायण आणि हळदी ह्या तिच्या उपनद्या. ह्या प्रत्येकीची कथा वेगळी आहे!

नवोद्वीप आणि ईस्कॉनचे, चैतन्य महाप्रभू यांचे नाते सर्वश्रुत आहेच! वासनेतून सुरु झालेला प्रवास आत्म्याच्या शोधात संपतो, गंगेच्या ह्या प्रवाहाला हेच तर सुचवायचे नसेल? ही पोस्ट देखील याच कारणाने लिहिलीय. पद्मा मंडल आणि निशा दास ह्या दोन बंगाली बायकांमुळे ह्या बाबीचा विचार अशा पद्धतीने करण्याची दृष्टी मिळाली. पहिल्या काही भेटीत पद्मा मंडल, मला फारशी जिज्ञासू तल्लख वाटली नव्हती. मात्र तो गैरसमज होता हे लवकरच लक्षात आले. एक वेश्या असूनही तिला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कविता लक्षात होत्या. काही कविता तर तिने मुंबईला आल्यानंतर हेतुतः तोंडपाठ केल्या होत्या, त्याचे मूळ होते 'गीतांजली एक्सप्रेस'मध्ये!

कोलकत्याहुन मुंबईला येणाऱ्या बऱ्याच ट्रेन्स आहेत, त्यांच्या अनेक कहाण्या आहेत, त्यातलीच गीतांजली एक्सप्रेसची ही एक हटके नोंद. मुंबईत बंगाली वेश्यांची संख्या का वाढत राहिली आणि ह्या बायकांना बंगालमधून मुंबईत कसे आणले जायचे यावर खरेतर विस्तृत अभ्यास व्हायला हवा. आजघडीला वयाची साठी पार केलेल्या बायका कामाठीपुऱ्यात, बुधवार पेठेत अथवा गंगा जमुनामध्ये किंवा कबाडी बाजारमध्येही दृष्टीस पडत नाहीत. त्या कुठे गेल्या असतील हा सवाल वाजिब नाही, त्यामुळे मी तो विचारत नाही!

मात्र साधारणत: दशकापूर्वी ह्या बायका नजरेस पडायच्या. त्यातील काहींना बोलतं केल्यावर त्या सांगायच्या की, 'बंगालमधल्या कोणकोणत्या भागातून त्यांना कोलकत्यात कसे आणले गेले आणि अखेरीस रेल्वेद्वारे त्यांची रवानगी मुंबईत कशी झाली!' त्यांचा हा सफर दर्दनाक होता आणि त्या आठवणींना पुन्हा पुन्हा टोकरायचं म्हणजे त्यांना त्या जखमा पुन्हा बहाल करण्यासारखं होय.

ह्या बायका जेव्हा पौगंडावस्थेत होत्या तेव्हा त्यांना इथं आणलेलं. क्वचितच काहींना प्रौढ अवस्थेत आणलेलं, बाकी सगळ्या जणींना ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आणलेलं. इथे आल्यावर सुरुवातीला त्यांनी विरोध केला मात्र आपलं भाग्य बदलता येत नाही, हे वास्तव त्यांनी जेव्हा स्वीकारलं तेव्हा त्यांनी स्वतःला 'रंडी'च्या साच्यात उतरवलं! एकेक करून त्या ह्यात मुरत गेल्या, झिजत गेल्या, कुढत करपत गेल्या आणि अखेरीस लयास गेल्या!

बंगालमधील वीरभूम, मेदिनीपूर, बांकुरा, मालदा, मुर्शिदाबाद, साऊथ चोबीस परगणा ह्या जिल्ह्यातल्या बायका ह्या धंद्यात अधिक दिसतात कारण ह्या सर्व जिल्ह्यात मागास बहुल जातींची लोकसंख्या अधिक आहे. अशा बायकांपैकीच, विनिता दास आणि पद्मा मंडल दोघीही एकाच शहरातल्या, कूच बिहार हे त्यांचं शहर! त्या दोघींना इथं का यावं लागलं हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे, मात्र ज्या रेल्वेमधून त्यांना आणलं गेलं ती गीतांजली एक्सप्रेस होती! ही ट्रेन अतिशय वेगवान असल्याने त्यांची नेआण करण्यासाठी तिचा वापर करणे दलालांना सोयीस्कर ठरलं होतं.

विनिता आणि पद्मा दोघींनाही तो दिवस टक्क लक्षात होता ज्या दिवशी त्यांना गीतांजली एक्सप्रेसमधून इथं आणलं होतं. रेल्वेमधल्या सुविधांनी त्या हरखून गेल्या होत्या. मुंबईत आणल्यानंतर त्यांनी अनेक दिवस यातना सोसल्या मात्र काही केल्या गीतांजली एक्स्प्रेसमधील सुख त्या विसरू शकल्या नाहीत. त्यांच्या आयुष्यातले ते सर्वोच्च सुख होते.

दशकानंतर त्या कूचबिहारला आपल्या नातलगांना भेटायला गेल्या तेव्हा गीतांजलीनेच त्यांनी प्रवास केल्या मात्र आधीचा तो आनंद त्यांना लाभला नाही. पुन्हा कधीही त्यांनी गीतांजलीने प्रवास केला नाही. किंबहुना त्यानंतर फक्त एकदाच त्या बंगालला गेल्या. वृद्धत्वाकडे झुकल्यावर त्या कुठे गेल्या याचा कुणीही शोध घेतला नाही. मुळात हा देहभोगाचा परीघ आपल्या सभ्य पांढरपेशी जीवनाच्या परिघात अंतर्भूत होत नाही. असो.

निशा, पद्मा, रितू, नीलम ह्यांच्यासारख्या जितक्या म्हणून बायका बंगालमधून मुंबईला आणल्या जातात, त्या काही काळासाठी जर आपल्या गावी शहरी गेल्या तर त्यांची प्रथम पसंती गीतांजलीला असते! आताशा तिकीटांचे दर खूप वाढल्याने ह्यांचा वावर स्लीपर कोचमध्येच दिसतो. त्यांना जो फील येतो त्याची तुलना कशाशीही करता येत नाही आणि त्याची अनुभूती बाकी लोकांना कधीही येऊ शकत नाही!

मुंबई भेटीत पद्मा मंडलने 'गीतांजली'मधल्या एका कवितेचा अर्थ सांगितला होता - ही जपमाळ, भजन आणि माळ ओढणे सोडून दे! मंदिराच्या या बंद दारांच्या एकाकी, अंधाऱ्या कोपऱ्यात तू कोणाची उपासना करतोस? तुझे डोळे उघड आणि बघ, तुझा देव तुझ्यासमोर नाही!

जिथे शेतकरी मुरमाड जमीन नांगरतो आणि रस्ता तयार ककरण्यासाठीचा दगड फोडतो, तेथे ईश्वर असतो. तो उन्हात, पावसात, वाऱ्या वावदानांत त्यांच्यासोबत असतो आणि त्याचे दिव्य वस्त्र धुळीने माखलेले असते. तू देखील तुझे स्वच्छ वस्त्र उतरव आणि त्याच्याप्रमाणेच धुळीच्या भूमीवर उतर!

मुक्ती? ही मुक्ती कुठे मिळणार? आपल्या निर्मिकाने स्वत: होऊन आनंदाने सृष्टीचे बंधन स्वीकारले आहे; तो आपल्या सर्वांशी कायमचा बांधला गेला आहे. तेव्हा आपल्या ध्यानातून तू बाहेर ये; फुले व धूप बाजूला ठेव! तुझे कपडे फाटले आणि डागळले तर त्यात काय बिघडले? त्याला भेट आणि कष्टाने व घामाने त्याच्या पाठीशी उभा राहा...

नेमकी हीच कविता का सांगावीशी वाटली, याचे उत्तर देताना पद्माचे डोळे पाणावले होते. तिच्या नरम मृदू गुलाबी ओठांना कंप सुटला होता. पदराला चाळा करत ती उत्तरली - 'इथे मुंबईत आले तेव्हा ईश्वराची खूप आराधना करत असे. पण मी इथे का आले आणि ह्याच अवस्थेत किती दिवस असेन, याचे उत्तर ईश्वरपाशीही नव्हते! मग मी ठरवले की, आधी त्यालाच शोधेन मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते ठरवेन!'

आता, पद्माला ईश्वराचा अर्थ गवसलाय, तिने त्याचा शोध थांबवलाय. ज्यांनी तिला ह्या दलदलीत लोटले त्यांना तिने माफ केलेय. ती रूढार्थाने ज्ञानी नसली तरी तिचे ज्ञान एखाद्या तपस्वी योगी पुरुषाहूनअधिक वाटते. तिच्या जाणिवा आता समृद्ध झाल्यात. स्वतःच्या पेशाकडे पाहताना तिला आता शरम वाटत नाही की, किळसही वाटत नाही. अतिशय तटस्थपणे ती ह्या देहव्यापाराकडे पाहते! मला तर ती एखाद्या योगिनीसारखी वाटते!

काळेभोर लांबलचक मुलायम केस मोकळे सोडून, शून्यात नजर लावून बसलेल्या पद्माकडे पाहिले की रवींद्रनाथ आठवत; आता मात्र त्यांच्या कविता आठवतात! गुरुदेव आज हयात असते तर त्यांनी तिच्यावर कविता लिहिली असती. कधीकधी वाटते की, ह्या सर्व बायका म्हणजे गुरुदेवांच्या गीतांजलीच होत, समाजाने त्यांचा कणकण ओरबाडून घेतला तरीही त्या समाधानी आहेत, त्यांची स्वतःविषयी तक्रार नाही आणि ज्यांनी त्यांना हे करण्यास भाग पाडले आहे त्यांना तर, त्यांनी कधीच माफ केलं आहे!

गीतांजली एक्सप्रेसने प्रवास करताना ह्या बायकांना नजरेपुढे आणलं तर त्यांची घालमेल अंशतः तरी अनुभवता येते! स्त्रीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काही अंशी तरी बदलतो. हुगळीच्या काठावर बसून रवींद्रनाथांना वाचताना ह्यांची तडफड मनात तरळून गेली तर आपल्यात नक्कीच काही बदल जाणवतात! ह्या सकल अनुभूतीला आणखी एक कारण आहे, रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ टागोर यांच्या मालकीचे पन्नासहून अधिक वेश्यांचे कोठे होते!

वारसा हक्क आणि जमीनदारी ह्यातून रग्गड पैसा मिळूनही ऐशआरामाच्या ओढीने त्यांनी कोठ्यांची मालकी विकत घेतली. त्यातून त्यांना किती पैसा मिळाला हे कळायला मार्ग नाही. मात्र काही काळानंतर त्यांची संपत्ती लयास गेली. रवींद्रनाथांना हे सर्व आवडत नव्हते, त्यांनी त्यांची बरीचशी कागदपत्रे जाळून टाकली. त्यावर त्यांनी कधीही खुलून लिहिलं नाही. मात्र त्यांनी शब्दबद्ध केलेल्या विनोदिनी आणि श्यामा सारख्या पात्रांचा बारकाईने अभ्यास केला तर काही शोकात्म कयास नक्की लावता येतील!

व्यक्तिशः मला तरी पद्मा, निशा, रितू ह्या सगळ्याजणी रवींद्रनाथांच्या कविता वाटतात! एकांतात कधी त्यांना वाचायचा प्रयत्न केला तर अपराध भावनेने हृदय भरून येते आणि मन स्वार होते गीतांजली एक्सप्रेसमध्ये नि त्यांच्या गावी जाऊन पोहोचते, जिथे अजूनही त्या शोधत असतात त्यांचं निरागस अल्लड बालपण, त्यांचं भूतकाळातलं सुखी जीवन!

मानवी जीवनाचा खरा अर्थ शोधण्याची प्रक्रिया निरंतर जारी राहते. दरम्यान आयुष्याचा प्रवासही सुरु राहतो. गीतांजली एक्सप्रेसने प्रवास करण्याचा योग आला तर ह्या गोष्टींचे स्मरण काही काळ तरी आत्मचिंतनास प्रवृत्त करते.

- समीर गायकवाड

गुरुवार, २१ मे, २०२६

प्रियंकांचे 'राजीव' संस्कार!


21 मे 1991 रोजी रात्रीच्या अकराच्या सुमारास, तमिळनाडूमधील श्रीपेरंबुदूर येथे राजीव गांधींना जो हार घातला होता त्यातील स्फोटकांचा आणि थनू ह्या आत्मघाती स्त्रीने स्वतःभोवती लपेटलेल्या बॉम्बचा स्फोट झाला, त्या क्षणी संपूर्ण भारताला हादरा बसला! अनेकांचे काळीज विदीर्ण झाले. राजीव गांधी यांच्यासह १४ लोकांचा मृत्यू झाला, ४३ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. देशभरात संताप आणि दुःखाची लाट पसरली!

त्या हत्याकांडात सहभागी असलेल्या LTTE च्या सदस्यांपैकी नलिनी श्रीहरन ही एक मुख्य आरोपी होती. आधी तिला मृत्युदंडाची शिक्षा झाली. मात्र, वर्षानुवर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर, 2008 मध्ये एक अत्यंत भावनिक आणि वादग्रस्त घटना घडली.

रविवार, ३ मे, २०२६

निषेधाची अगरबत्ती!


बुवा बाबा बलात्कार करतो, तेव्हा समाजातला एक घटक लगेच त्याची बाजू घेऊन पोकळ युक्तिवाद करतो. म्हणजेच धार्मिक शेड्स असणाऱ्या कोणत्याही धर्माच्या नीच इसमाच्या मागे त्या समाजातला एक तरी हिस्सा कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने उभा असतो.बलात्काराचा गुन्हा शाबित होऊन सजा भोगून बाहेर आलेल्या अधम पुरूषांचा सत्कार एका विशिष्ट विचारसरणीचे, पक्षाचे लोक करताना दिसतात. विशेष म्हणजे याच्या निषेधार्थ त्या विचारांच्या, त्या पक्षाच्या एकाही माणसाला यावर ब्र शब्द उच्चारावा असे वाटत नाही. ही नैतिकता हेच त्यांचे खरे चरित्र असते!

आमदारासारखे लोकप्रतिनिधी सामान्य माणसाला धमकावतात की तुझ्या आईला झ**, तुझ्या बहिणीला *वतो, बायकोचा फो** फाडतो.. तेव्हा पोलिस सांगतात की हा अदखलपात्र गुन्हा आहे. म्हणजेच सार्वजनिक रित्या बलात्कार करण्याची धमकी देणं गंभीर नाही, त्याने कुणाची आयमाय एक केली तरच कायद्याचे स्तंभन होणार! एरव्ही आरोपी गबरगंड असला की पोलिसांचे वीर्यपतन ठरलेलं असतं.

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

आयटी सेलचे - सोशल लिंचिंग


मुंबईमध्ये भाजपने आयोजित केलेल्या मोर्चात वाहतुकीची कोंडी झाल्यावर संतापलेल्या महिलेने आयोजक मोर्चेकरी आणि पोलिसांना धारेवर धरले. अनेकांनी त्या महिलेला समर्थन दिले तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती की या महिलेचे सोशल लिंचिंग होणार! आणि झालेही तसेच!

ही बाई घाण आहे, ही रांड आहे, ही वेश्या आहे, ही तर धंदेवाली छिनाल आहे अशा पोस्टचा रतीब घातला गेला! या पोस्ट टाकणारे लोक आणि यामुळे उत्तेजित होऊन त्यावर कमेंट करणारे, लाइक करणारे लोक जेमतेम आठवड्यापूर्वी नारी सन्मान, नारी वंदन, महिला हक्क इत्यादि गोष्टींवर रान हाणत होते! यांच्या मनात विद्रोही स्त्रियांबद्दल केवळ आणि केवळ गरळ साठली आहे हे नित्य अधोरेखित होत असतं. ही घटनाही त्याला अपवाद ठरली नाही.

मराठा बंधू आणि भगिनींना खुले पत्र..


हे पत्र, मी मराठा आहे म्हणून लिहिलेलं नसून एक सच्चा शिवभक्त म्हणून लिहिलं आहे हे आधी स्पष्ट करू इच्छितो. या पत्राचे प्रयॊजन आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याविषयीचे आहे.

बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजा हे स्वराज्यप्रेरिका, राजमाता जिजाऊ मां साहेबांचे जन्मस्थान. रयतेच्या माता असणाऱ्या जिजाऊंच्या जन्माने पावन झालेल्या बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या बुलढाणा शहरापासून, सिंदखेड राजा 80 किमी अंतरावर वसले आहे. जिजाऊंनी शिवबांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले, चारही पातशाहयांच्या विरोधात विद्रोह करण्याचे धडे दिले, अतुल्य पराक्रम, साहस, द्रष्टेपण, मुत्सद्दीपणा आणि रयतेच्या प्रेमाच्या बळावर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी स्वराज्य उभे केले. जगाच्या पाठीवर शिवरायांसारखा राजा आढळत नाही. शिवबांच्या अंगी सदगुणांची खाण होती त्यातलाच एक मुख्य म्हणजे स्त्रियांचा आदर सन्मान होय! 'परस्त्री मातेसमान' हे पुस्तकी वाक्य त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरलं होतं!

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

मटक्याची दुनियादारी!



नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन आणि संयुक्त निर्मिती असलेली 'मटका किंग' सिरिज पाहिली, मनात अनेक गोष्टींचे मोहोळ जागे झाले. त्या अनेक टपऱ्या आठवल्या आणि त्यांच्या नादाला लागून उध्वस्त झालेले संसार आठवले. मटक्याचे रकाने, काही खास दैनिकात येणारे आकड्यांचे अंदाज, फुल स्केप पेपरचे बरोबर बारा तुकडे करून त्या मध्ये कार्बन पेपर ठेवून दिली जाणारी टीप आठवली. सकाळ संध्याकाळच्या खास नेमक्या वेळी कासावीस होऊन आशाळभुतागत मटका टपरीवर जाऊन ओपन काय आले आहे आणि क्लोज काय आले आहे याचे अदमास घेणारे भुकेच्या डोहात बुडालेले चेहरे आठवले. मटका लागल्यावर ऐश करून पैसे उडवले जायचे आणि मोठी रक्कम हारली की देशी दारूचा गुत्ता जवळ केला जायचा. हारलेला माणूस पुन्हा पुन्हा पैसे लावत राहायचा. कधी तरी एकदा जिंकायचा मात्र बहुतांश वेळी तो गर्तेत जायचा. असं करत करत घरेच्या घरे मटक्याने गिळंकृत केली. पण जे मटका घेत होते त्यांचे काय झाले?

बऱ्याचदा मटका घेणारी माणसं तिशीतली चाळीशीतली असायची. रापलेल्या चेहऱ्याने विस्कटलेल्या केसांची ही माणसं मळकट बिन इस्त्रीच्या कपड्यांवर असायची. टपरीत दोन तीन देवी देवतांची चित्रे असत. साल संपून गेलेले कॅलेंडर असे. शाळेची काळी पाटी एका तारेला अडकवली जायची. पाटीच्या खाली कागदाच्या सुरळ्या असत. कोपऱ्यात कुठे तरी दोन तीन वह्या असत ज्यांची पाने भरलेली असत. सतरंजी अंथरूण त्यावर हा सदगृहस्थ बसलेला असे. गुटखा सुरु होण्याच्या आधीच्या काळात मावा नाहीतर तंबाखू जर्दा यांची गोळी जबड्यात दाबून ठेवलेल्या अवस्थेत तोंडातला तोबरा तसाच धरून ही माणसं येणाऱ्या जाणाऱ्यांचे निरीक्षण करत असत.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

जगण्याची आणि मोक्षाची, संगीतमय कश्मकश!


माणसाला त्याच्या मृत्यूची, मोक्षाची चाहूल लागत असेल का! काही दिवसांपूर्वी निवर्तलेल्या आशा भोसले यांना त्यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जे काही लिहिलं आहे, ते याकडेच निर्देश करते. आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये आशाताई, इंटरनॅशनल बँड 'गोरिल्लाज' सोबत दिसल्यात. पोस्टमधील फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये भारतीय वस्त्या, हत्ती आणि जीर्ण झालेल्या वस्तूंची दृष्टीस पडतात. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय -"The Shadowy Light' या गाण्याचा माझ्यासाठी अत्यंत सखोल अर्थ आहे. वाराणसीला भेट देऊन आणि पवित्र गंगा नदीच्या काठानं प्रवास करून, तसेच तिथे मला जे काही दिसलं, त्याचं बारकाईनं निरीक्षण करून आणि ते समजून घेऊन, मला जीवनाचा खरा अर्थ उमजला, मी कोण आहे आणि या पृथ्वीवर माझे काय प्रयोजन आहे. 'द शॅडोई लाइट' (The Shadowy Light) मध्ये, या खोल नदीचा पैलतीर गाठणं हे माझ्या जीवनप्रवासाचं प्रतीक आहे, माझा जन्म, माझे नातेसंबंध, संगीताप्रतीची माझी निष्ठा, माझी कर्तृत्व आणि एक कन्या, माता, भगिनी, पत्नी आणि एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्य. या प्रवासात, 'संगीत' हाच माझा नावाडी आहे, तो मार्गदर्शक, जो मला या जीवननदीच्या पैलतीरी घेऊन जातो. जेव्हा मी त्या पैलतीरावर पोहोचेन, तेव्हा माझा हा प्रवास पूर्ण होईल. तेव्हा मला 'मोक्ष' प्राप्त होईल, आपल्या सभोवताली सतत तरंगणाऱ्या अगणित नादांमध्ये मी विलीन होईन. जेव्हा त्यातील काही नाद एकत्र गुंफले जातात, तेव्हा त्यातून एक सुंदर सुरावट निर्माण होते. त्याचप्रमाणे, मी देखील त्या नादांपैकीच एक नाद बनेन, असा नाद, जो अंतिमतः एका सुंदर गीतातील सुराचं रूप धारण करेल. असं गीत, जे पिढ्यानपिढ्या, हजारो वर्षे सातत्यानं ऐकलं जात राहील. हेच स्वातंत्र्य, निसर्गाशी एकरूप होण्याचं स्वातंत्र्य, नदीच्या पलीकडील तीरावर माझी वाट पाहत आहे..."

बुधवार, ८ एप्रिल, २०२६

ऑर्केस्ट्रामधल्या डान्सर्सचा मागोवा!


हे थोडेसे गंभीर आणि महत्वाचे आहे.

बिहार निवडणुकांत प्रचार सुरू असताना मतदानापूर्वीच्या दिवसांत मी एक लेख लिहिला होता, जो सारन जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा डान्सर मुलींविषयीचा होता. बिहार, बंगाल, झारखंड या तीन राज्यांमधून मुली एस्कॉर्ट केल्या जातात आणि त्यांना एकतर जबरदस्तीने नाचवले जाते नाहीतर लालूच दाखवली जाते.

एकदा का शीलभ्रष्ट(!) झाले अथवा पैशाची चटक लागली की या मुली यातून बाहेर पडत नाहीत हे वास्तव आहे. या संपूर्ण धंद्याची सूत्रे सारन जिल्ह्यातील छपरा शहरामधून हलवली जातात. यात महिन्याकाठी कोट्यवधीचे व्यवहार होतात.

शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

सलाम बॉम्बे - प्रेमाचे उदास क्षण...



‘सलाम बॅांम्बे'मध्ये पंधरा सोळा वर्षांची एक विलक्षण कोवळी मुलगी लाईनमध्ये आणलेली असते. तिला या विश्वातलं खाण्यापिण्याचं, नटण्यामुरडण्याचं सुखही लोभसवाणं वाटतं. तिची नथ उतरवण्याच्या वेळेस तिचा सौदा होतो.

कृष्णा हा त्याच एरियात चहा नाश्ता पोहोचवण्याचं काम करणारा अनाथ पोर. तिथलं बदमाश पब्लिक त्याला चायपाव म्हणूनच हाक मारतं. ते त्याचं टोपणनाव.

चौदा पंधरा वर्षांचा हा चुणचुणीत पोरगा त्या मुलीवर जीव लावून बसतो! त्या मुलीची तिथली पहचान ‘सोला साल‘ या नावाची!

या कोवळ्या मुलीला ‘बाबा‘चं आकर्षण असतं. बाबा (नाना पाटेकर) हा तिथला नामचीन दलाल. त्याचं रफटफ वागणं, त्याचं व्यसनी असणं आणि त्याचा अय्याशी रूबाब तिला खुणावतो.

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

गोष्ट सिडनी शेल्डनची!

 


ही गोष्ट अशा लेखकाची आहे, ज्यांची पुस्तके जगातल्या कोणत्याही देशातील कोणत्याही मोठ्या शहरातील बुक स्टॉलवर विक्रीस उपलब्ध आहेत! ज्यांच्या  पुस्तकांच्या वाचनाचा आनंद आजही नव्या पिढीसह जुने वाचकही घेतात! मात्र या लेखकाचे आयुष्य साधे सरळ नव्हते, त्यांच्या आयुष्यात अनेक उतार चढाव येऊन गेले. ज्यांना लेखनासाठी शेरेबाजीही ऐकून घ्यावी लागली!
तुम्ही अमुक वयातच लिहू शकता किंवा तुम्हाला कादंबरी कधीच लिहिता येणार नाही अशा अर्थाची वाक्ये अनेक जण अधून मधून फेकत असतात. मात्र हे सदासर्वकाळ सत्यच असेल असे काही नाही. जगातली सर्वाधिक खपाची पुस्तके लिहिणाऱ्या आणि साहित्यातील महत्वाचे पुरस्कार मिळवणाऱ्या वैश्विक कीर्तीच्या एका लेखकांनी वयाच्या अठराव्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यांची पहिली कादंबरी वयाच्या 53 व्या वर्षी लिहिली होती!

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

बदलता सिनेमा आणि ‘एआय’चे युग!


देशात स्वातंत्र्याचा लढा जोरात होता तेव्हा भारतीय सिनेमा मुख्यत्वे मायथॉलॉजिकल पौराणिक विषयांवर आधारित असायचा.


पन्नासच्या दशकात हिंदी सिनेमात आदर्शवाद हा मुख्य विषय असायचा. नायक शिक्षक, मजूर, शेतकरी असत; क्वचित डॉक्टर, वकील देखील असत, आणि शहरातल्या / गावातल्या अविवेकी व्यक्तीविरोधात त्याचा संघर्ष असे.

साठच्या दशकात आदर्शवादाला रोमँटीसिझमची जोड मिळाली आणि आदर्श प्रेमी युगुल सिनेमाच्या केंद्रस्थानी दिसू लागलं. त्यांच्या प्रेमात अडथळे आणणाऱ्या गोष्टी आताच्या काळात आपल्याला चौकटबंद वाटत असतील मात्र त्या काळात नैतिकता, विवेक, आदर्शवाद, त्याग, करुणा आस्था यांना जे महत्व होतं ते पाहू जाता त्या चौकटी कालानुरूपच होत्या असे म्हणावे लागेल.

सत्तरच्या दशकात सिनेमामध्ये आर्थिक सामाजिक विषमता हळूहळू समोर येऊ लागली. नायक नायिका यांच्यातील कुणीतरी गरीब असायचं आणि तरीही ते एकमेकावर प्रेम करायचे. सोन्याची बिस्किटे आणि घड्याळे यांची स्मगलिंग करणारे स्मग्लर्स या काळात हिंदी सिनेमाच्या खलनायकीत रुजले होते. झाडाआड लपून प्रेम करणारे कपल असायचे आणि फुलाला फुल बिलगल्याचे दाखवले जायचे.

बुधवार, २८ जानेवारी, २०२६

अजितदादा पवार: जननायक कर्मयोद्धा!


महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात एक चमकदार तारा काल निखळला. काल बारामती विमानतळाजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी ते महाराष्ट्रातील जनतेस पोरके सोडून गेले! त्यांच्या आठवणी, त्यांचे भाषण, सभा आणि जनसेवेचा वारसा कायम राहील. 'दादा' म्हणून ओळखले जाणारे अजित पवार केवळ यशस्वी राजकारणी नव्हते, तर एक कर्तबगार प्रशासक, शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मित्र आणि कुटुंबवत्सल मायाळू व्यक्ती होते. ते जितके मृदु मुलायम होते तितकेच वज्रनिश्चयी आणि प्रसंगी कठोर वाटावे अशा व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुन्न झाला आहे, आणि त्यांच्या स्मृतींचे आभाळ पुन्हा पुन्हा भरून येत आहे. त्यांची अनेक भाषणे, त्यांची देहबोली, त्यांचं वागणं, त्यांचं कार्यमग्न असणं, त्यांच्या वैयक्तिक आठवणी आणि लाडक्या जनतेप्रती त्यांचं समर्पित असणं आदी गोष्टींद्वारे त्यांची उणीव अधिक गहिरी होतेय! लोकाभिमुख कामे करणाऱ्या अजितदादांची प्रतिमा 'टग्या' अशी का निर्माण केली असेल हा प्रश्न राहून राहून पडतो! कदाचित राजकीय डावपेचातून हे घडले असावे! असो. वास्तवात त्यांची भाषणे आणि त्यांची कामाची शैली तसेच त्यांच्याकडे कामे घेऊन जाणाऱ्या माणसांचे अनुभव पाहू जाता त्यांची प्रतिमा 'कामाचा माणूस' अशीच असायला हवी होती!

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

फायर ऑफ लव्ह - निसर्ग आणि मानवाच्या प्रेमाचे महाकाव्य!




सारा डोस दिग्दर्शित 'फायर ऑफ लव्ह' ही डॉक्युमेंटरी म्हणजे केवळ दोन ज्वालामुखी तज्ज्ञांच्या कार्याचा आलेख नाही, तर तो निसर्ग, विज्ञान आणि प्रेम यांच्या अद्वैताचा एक नितांत सुंदर आविष्कार आहे. कात्या आणि मॉरिस क्राफ्ट या फ्रेंच दाम्पत्याच्या आयुष्यावर आधारित हा माहितीपट प्रेक्षकांना एका अशा जगात घेऊन जातो, जिथे मृत्यूच्या सावलीतही जीवनाचे विलोभनीय संगीत ऐकू येते. कात्या आणि मॉरिस या दोघांचेही ज्वालामुखीवर असलेले प्रेम हे त्यांच्या वैयक्तिक प्रेमापेक्षाही अधिक उत्कट होते की काय, असा प्रश्न ही डॉक्युमेंटरी पाहताना पडतो. ही केवळ दोन भिन्नलिंगी शास्त्रज्ञांची कथा नसून 'निसर्गाच्या काळजाचे ठोके' ऐकणाऱ्या दोन वेड्या निसर्गप्रवाशांची गाथा आहे. 1970 आणि 80 च्या दशकात त्यांनी टिपलेले ज्वालामुखीचे थरारक चित्रीकरण हा या डॉक्युमेंटरीचा मुख्य कणा आहे. 'लाल ज्वालामुखी' (Red Volcanoes) आणि 'राखाडी ज्वालामुखी' (Grey Volcanoes) यांच्यातील भेद स्पष्ट करतानाच, मानवी अस्तित्वाची क्षणभंगुरता यात प्रभावीपणे मांडली आहे. क्राफ्ट दाम्पत्याने ज्वालामुखी विज्ञानात (Volcanology) मोलाची भर घातली आहे. त्यांच्या संशोधनाचे दोन मुख्य भाग पडतात - लाल ज्वालामुखी हे प्रामुख्याने हवाई किंवा आइसलँडमधील ज्वालामुखी होते. यात लाव्हा संथपणे वाहतो. कात्या आणि मॉरिस यांनी या लाव्हाच्या प्रवाहाचा वेग, त्याचे तापमान (जे अनेकदा 1000 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते) आणि त्यातील वायूंचे उत्सर्जन यांचा सखोल अभ्यास केला. राखाडी ज्वालामुखी हे सर्वात धोकादायक ज्वालामुखी मानले जातात. 1980 मधील 'माउंट सेंट हेलेन्स'च्या उद्रेकानंतर क्राफ्ट दांपत्याने आपला मोर्चा या राखाडी ज्वालामुखींकडे वळवला.

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

सुगंधा!


काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मंडईलगतच्या रस्त्याच्या कडेला एक अंध चिमुरडी उभी असायची.

तो रस्ता तिच्या परिचयाचा असावा
तिचे अंध वडील तिथेच कुठेतरी आसपास असायचे, तिच्या हाती अंध व्यक्तींची छोटी काठी दिसे.

तिचा चेहरा वाहतुकीच्या सन्मुख असे, रोज सकाळी ठराविक वेळी ती कुणाची तरी वाट पाहत उभी असे.
दरम्यान त्याच वेळी एक हार गजरे विकणारा
वृध्द इसम तिथे येई
बहुतेक त्यांची ओळख असावी.

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

गोष्ट एका मायाळू घोडीची!



थोरले आजोबा हमालीचे काम करायचे, त्यांच्याकडे एक बैलगाडी होती. छकडाही होता. त्यावर पोती लादून ती पोच करायचे,ट्रक ट्रॉलीमध्ये चढवायचे काम ते करायचे. त्यांच्या चुलत भावाकडे एक टांगा होता आणि दोन घोडे होते. पडीक रान होतं, ज्यात धान्य भाजीपाला पिकवावा म्हटलं तर पाणी नव्हतं. आजोबांच्या घरालगत बरीचशी मुस्लिम वस्ती होती. जवळच्या दर्ग्याला लागून सारी घरं वसली होती. दर्गा ओलांडला की काही अंतरावर हमरस्ता होता. सकाळीच ताज्या दूध भाकरीची न्याहरी करून आज्जा हमालीसाठी घराबाहेर पडायचा. आज्जा बाहेर पडताच टांगा घेऊन त्यांचा चुलत भाऊ देखील बाहेर पडायचा. टांग्याला जुंपलेल्या घोड्याचे नाव होतं शेरा! खास हौस म्हणून ठेवलेल्या दुसऱ्या दोन घोड्यांना रपेटीसाठी वापरले जायचे. त्यात एक नर होता आणि एक मादी. हिरा आणि राणी ही त्यांची नावं.

सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

ब्रिजित बार्डो - विचारांची दोन टोके गाठणारी सेक्स सिंबॉल!


एके काळची सेक्स सिंबॉल असणारी आणि मॉडेलिंग तसेच अभिनयाच्या क्षेत्रात आपला वादग्रस्त ठसा उमटवणारी फ्रेंच वोक लेडी, ब्रिजित बार्डो हिचे आज निधन झाले. एखाद्या व्यक्तीची मते, विचारधारा या टोकाकडून त्या टोकाकडे कशी जातात याचे ती उत्तम उदाहरण ठरावी.

मृत्यू समयी ती 91 वर्षांची होती, तिच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात तिच्याविषयीची चर्चा तिच्या सेक्सी असण्याबद्दल आणि हॉट दिसण्याबद्दलची असायची. ती जगभरात चर्चेत होती ते दशक साठ आणि सत्तरचे होते, माझ्यासह अनेकांचा जन्मही झालेला नव्हता अशा काळातील ही बिनधास्त बाई, तिच्या आयुष्याच्या अखेरच्या तीन दशकात एकशे ऐंशी अंशातून बदलली!

खरे तर ती कधीही फक्त एक लैंगिक प्रतीक नव्हती, लोकांच्या मते मात्र ती सदैव टूपीस बिकिनी घातलेली मोलोटॉव कॉकटेल होती! ती ओरिजिनल "इट गर्ल" होती जिने, महायुद्धोत्तर युरोपातील लैंगिक नीतीमत्तेच्या विचारधारांचा  अक्षरश: पालापाचोळा केला होता! आणि त्या बदल्यात तिला वैयक्तिक जीवनात त्याची क्रूर किंमत मोजावी लागलेली.

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

बेपत्ता होणाऱ्या जिवांचे व्याकुळविश्व!


मागील काही दिवसांपासून राज्यांतील बेपत्ता व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बातम्यांची संख्या वाढलेली दिसतेय. खरेतर ही वाढ केवळ राज्य पातळीवर नसून देश पातळीवर, जागतिक पातळीवरही दिसते आहे. ही वाढ मागील काही दशकांच्या तुलनेत अधिक आहे. मुंबई आणि उपनगरात जून ते डिसेंबरमध्ये 93 मुलींसह 145 जण बेपत्ता झाल्याची माहिती मध्यंतरी फोकसमध्ये आली होती, नंतर काही दिवसात तिचे बातमीमूल्य शून्य झाले. महाराष्ट्रातील मुले आणि मुली बेपत्ता होण्याबाबतची 2024 -2025 या काळातील अधिकृत आकडेवारी भीषण आहे. एका आकडेवारीनुसार वर्षभरात राज्यात एकूण 37695 मुली आणि महिला बेपत्ता झाल्यात, त्यातील 4096 मुली अल्पवयीन आहेत तर सज्ञान महिलांची संख्या 33599 आहे. या काळातली मुंबई आणि इतर शहरांमधील आकडेवारी अधिक चिंताजनक आहे. एकट्या मुंबईमध्ये 1 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या अवघ्या छत्तीस दिवसांत मुंबईतून 82 मुले बेपत्ता झाली. यापैकी 60 महिला/मुली होत्या. जून ते डिसेंबर या सहा महिन्यात एकूण 134अल्पवयीन मुले बेपत्ता झाली, ज्यामध्ये 86 मुलींचा समावेश होता. नवी मुंबईमध्ये जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान 499 मुले बेपत्ता/अपहरण झाल्याची नोंद झाली, त्यापैकी 458 मुले शोधण्यात पोलिसांना यश आले असून 41 मुले (34 मुली आणि 7 मुले) अजूनही बेपत्ता आहेत. नागपूर शहरात जानेवारी 2024 ते मे 2025 या काळात 5897 बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारी आल्या, ज्यामध्ये 776 मुले होती. महाराष्ट्रात, देशांत मुलं मुली बेपत्ता होण्यामागे विविध कारणे आहेत. मानवी तस्करी (Human Trafficking), बालविवाह (Child Marriage), पळून जाणे (Elopement), लैंगिक शोषण (Sexual Exploitation), कामासाठी शोषण (Labour Exploitation), आणि कौटुंबिक समस्या (Family Issues), प्रेमसंबंध किंवा सामाजिक माध्यमांवरील फसवणूक (Social media enfluence) इत्यादींचा समावेश होतो; यांतील काही घटनांमध्ये कधी फसवून नेले जाते तर कधी मुलं मुली स्वतःच काही कारणास्तव घर सोडून जातात, आणि अनेकदा पोलिसात तक्रार दाखल होण्यास उशीर होतो किंवा प्रतिष्ठेचा विषय समजून प्रकरणे दाबून टाकली जातात, ज्यामुळे ही समस्या गंभीर बनते.

शनिवार, २० डिसेंबर, २०२५

एपस्टीन फाइल्स! - वासना विकृतीच्या दलदलीची साक्ष



आपल्या देशातील राजकीय वर्तुळात एपस्टीन फाइल्स हे शब्द मागील काही दिवसापासून चर्चेत आहेत. तसे तर याची चर्चा जगभरात आहे, खास करुन अमेरिकेत तर मागील कित्येक महिन्यांपासून आहे.

आपल्याकडे काहींना वाटते की, या फाइल्सचे तपशील अमेरिकन संसदेत सार्वजनिक केल्यानंतर राजकीय घडामोडींना उत येईल.

असे काही होईल की नाही हे काही तासांनी कळेलच. तूर्त एपस्टीन फाइल्सची आणि या मागच्या विकृत वासना कांडांची माहिती.

एपस्टीन स्वतः सेक्स हाउंड होता, विकृत होता. त्याने केवळ बाललैंगिक शोषण केले अशातली बाब नव्हती त्याने जगभरातील धनाढ्य धेंडांना लहान मुली पुरवल्या. त्या मुलींचे एकदा नव्हे तर अनेकदा शोषण केले.

दोन दशकं तो हा उद्योग करत होता. त्याचे स्वतःच्या मालकीचे एक बेट होते. तिथे तो या ओंगळवाण्या श्रीमंतीच्या चिखलात बुडालेल्या गलिच्छ लोकांना बोलवायचा, त्यांच्या विकृत वासनांना तो आकार द्यायचा.

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

मुल्क राज आनंद - भूमिका घेऊन जगलेला लेखक!


"आजही लिखाण माझ्यासाठी एक प्रकारची थेरपी आहे. दररोज लिहिल्याशिवाय मला राहवत नाही. खरं तर 1927 मध्ये मला पहिल्यांदा मानसिक ताणामुळे खचायला झालं तेव्हा व्हिएन्नामध्ये सिग्मंड फ्रॉइड यांची भेट घेतली. पुढे जाऊन आमच्या भेटींचा सिलसिला जारी राहिला.

त्यांच्यासोबतच्या प्रत्येक भेटीने मला मोठा दिलासा मिळाला. पण नंतरच्या काळात आलेल्या मानसिक ताणांच्या दोन धक्क्यांवर मात करण्याची ताकद मात्र फक्त लिखाणातूनच मिळाली. या प्रत्येक आघात समयी मी एक कादंबरी लिहिली, परिणामी कमकुवत झालेली मनोवस्था पुन्हा सावरली.

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

द राँग ट्रेन थिअरी - स्वतःच्या शोधाची गोष्ट!

‘द राँग ट्रेन थिअरी‘ नावाचे एक गृहीतक जपानमध्ये प्रसिद्ध आहे. कधीकधी चुकीचे लोक आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातात मात्र तो प्रवास सहनशीलतेचा अंत पाहतो! ‘द राँग ट्रेन थिअरी‘मध्ये एक सुंदर आणि तितकीच दुःखद गोष्ट आहे.
 
कधीकधी आपण चुकीचा मार्ग स्वीकारतो, चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा चुकीच्या जागी खूप वेळ थांबून राहतो. चुकीचे करिअर निवडतो, चुकीच्या गावी स्थलांतरित होतो, चुकीच्या नात्यात - भावनांत गुंतून पडतो, चुकीच्या कल्पनांना आपलं विश्व मानतो, चुकीच्या शब्दांना भुलतो - बळी पडतो, असं बरंच काही चुकीचं आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात स्वीकारलेलं असतं.

हे आपल्यासोबतच का घडतं? खरे तर आपण जेव्हा या निर्णयाचा स्वीकार केलेला असतो तेव्हा सुरुवातीला हे सगळं आपल्याला खूप भारी वाटत असतं. हे सर्व आपल्या मनासारखं घडतंय या आनंदात आपण मग्न होतो.

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

स्त्रियांचे जगातले पहिले मतदान आणि भारत -


  
संपूर्ण देशभरातील स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणारा जगातला पहिला देश न्यूझीलँड आहे. आजच्या तारखेस 132 वर्षांपूर्वी संपूर्ण न्यूझीलँडमधील महिलांनी मतदान केले होते. 19 सप्टेंबर 1893 रोजी हा कायदा तिथे संमत झाला आणि त्याच वर्षी 28 नोव्हेंबरला पार पडलेल्या निवडणुकीत किवी महिलांनी मतदान केले. खरेतर याही आधी अमेरिकेच्या वायोमिंग आणि यूटा या राज्यात स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला होता मात्र उर्वरित अमेरिकन राज्यात त्यांना मताधिकार नव्हता. म्हणूनच अशी समानता राबवणारा न्यूझीलँड हा पहिला देश ठरला. तिथे महिलांना मतदानाचा हक्क मिळण्यामागे दारूचा वाढता प्रभाव, पुरुषांमधली वाढती व्यसनाधिनता कारणीभूत होती हे सांगूनही खरे वाटणार नाही, मात्र वास्तव हेच होते.

मागील काही वर्षांत न्यूझीलँडमधल्या माओरी आदिवासी स्त्रियांचे आणि त्यांच्या परंपरिक 'हाका'चे रिल्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, याला कारण होते माओरी आदिवासींची व्यक्त होण्याची अनोखी 'हाका' शैली, माओरी जनतेचे त्यांच्या मातृभाषेवरचे असीम प्रेम! माओरी स्त्रीपुरुष दोघेही लढवय्ये आहेत हे एव्हाना जगातील सर्व देशांना कळून चुकलेय. सतराव्या शतकात हा देश ब्रिटिश अंमलाखाली होता. 1841 साली न्यूझीलँडला स्वयंशासित कारभाराची परवानगी मिळाली. मात्र पूर्ण स्वातंत्र्य आपल्याप्रमाणेच 1947 मध्ये मिळालं.

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

गोष्ट वीज कोसळण्याच्या योगायोगाची आणि झांबळमधल्या कथेची!


एका विलक्षण योगायोगाची वा कदाचित अज्ञात ऊर्जेची ही पोस्ट. 4 जून 1737 ची घटना. कॅलेब पिकमन हा बावीस वर्षांचा तरुण त्याच्या आईला भेटायला घरी आला होता. कॅलेब हा सागरी कप्तान होता. सागरी मोहिमा पूर्ण झाल्या की सहा महिन्यांनी तो घरी यायचा. घटनेच्या दिवशीही तो समुद्री सफर पूर्ण करून घरी आला होता. तो पावसाचा दिवस होता, किंचित भिजलेल्या कॅलेबने दरवाजाबाहेर अडकवलेली धातूपट्टी ओढून डोअरबेल वाजवली, त्याच्या आईने आतून हाक मारल्यावर आपण दाराबाहेर उभं असल्याचं त्यानं सांगितलं. त्याची वयस्क आई दारापाशी येऊन दरवाजा उघडेपर्यंत आकाशात विजेचा कडकडाट झाला. कॅलेबच्या आईने दार उघडून पाहिलं तर तिचा मुलगा दाराबाहेर मृतावस्थेत पडला होता. वीज कोसळून अवघ्या निमिषार्धात त्याचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील सालेम या समुद्रकिनारी असलेल्या शहरात ही घटना घडली.

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

मेडीटेशन आणि रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस!


माणूस इकडे तिकडे शांतता शोधत असतो मात्र खरी शांतता त्याच्या हृदयात असते. अर्थात या गोष्टीचा थांग तेव्हाच लागतो जेव्हा मन अशांत होते! शांततेचा शोध शांत भोवतालात अथवा सुख समृद्धीत आकंठ बुडालेल्या अवस्थेत असताना कुणीच घेत नाही! जगभरात बुद्धासारखे एखादे अपवाद असतील मात्र बाकी विश्व शांतता कधी शोधते याचे उत्तर एकसमान येते.

आज जगभरात मेडीटेशनचा बोलबाला आहे, आपल्याकडे तर मेडीटेशन्सवरच्या रिल्स, पोस्ट्स, पॉडकास्ट लाखोंच्या संख्येत रतीब घालताना दिसतात. आपल्यापैकी अनेक जण विविध प्रकारचे मेडिटेशन करताना दिसतात. मनःशांतीचा सोपा नी सहज सुलभ मार्ग म्हणून याकडे पाहिले जाते! मात्र मेडिटेशन कुणी लिहिलं याचा शोध घेतला की विस्मयकारक नाव आणि माहिती समोर येते!

आपल्यापैकी अनेकांनी 'ग्लॅडिएटर' हा सिनेमा पाहिला असेल. अभिनेता रसेल क्रो याने साकारलेला मॅक्सिमस, कमांडर ऑफ द आर्मीज ऑफ नॉर्थ, विसरणे शक्य नाही. वास्तवात हे पात्र काल्पनिक होते तरीही जगभरातील सिनेरसिकांना याची भुरळ पडली कारण, मॅक्सिमसची पार्श्वभूमी! आपला वृद्ध राजा मार्कस ऑरेलियस याच्याशी एकनिष्ठ असणारा सेनापती असणारा मॅक्सिमस आपलं सर्वस्व गमावूनही राजावर झालेल्या अन्यायासाठी प्राणांची बाजी लावतो. मार्कसचा क्रूर मुलगा सम्राट कमोडस याची तो हत्या करतो अशा मांडणीची ती काल्पनिक कहाणी होती.

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

कविता - जिचे मरण स्वस्त झाले!


ही ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे कारण अतिशय वेदनादायी आहे. अगदी खात्रीशीर माहिती स्त्रोताच्या आधारे सांगावे लागतेय की, महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने एड्स, एचआयव्ही बाधित रुग्णांना मदत, उपचार देणाऱ्या अनेक केंद्रांचा, स्वयंसेवी संस्थांचा निधी मागील तीन महिन्यापासून थांबवला आहे. सरकार कुठे कुठे कसे कसे पैसे खर्च करतेय हे आपण सारेच पाहत आहोत!

या जीवघेण्या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण घटले असले तरी संपलेले नाही, निर्मूलन झालेले नाही हे सत्य आहे! अजूनही शेकडो रुग्ण प्रत्येक केंद्रात उपचार घेतात. या बायका लाडक्या नाहीत का? यांना उपचार मिळावेत असे वाटत नाही का?

दोन हजारात त्यांची महिन्याची औषधे येत नाहीत हे या क्षेत्रात काम करणारा कोणताही माणूस सांगेल! कवितासारख्या कित्येक बायकांना नवजीवनाची संजीवनी देण्यापासून आपण मागे हटू शकत नाही! हे पाप आहे, हा कोतेपणा आहे, हे मानवतेला धरून नाही!

सरकारने रोखून धरलेली मदत पुन्हा पूर्ववत करावी आणि गांजलेल्या, नाडलेल्या अभागी महिलांचा दुवा घ्यावा! कल्याणकारी राज्यात ही गोष्ट होणं अनिवार्य आहे. ही फार मोठ्या रकमेची बाब नाही. अवघ्या काही कोटींची ही समस्या आहे, सरकार यावर विचार करेल काय? असो.

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

पंडित नेहरूंना मंटोंचे पत्र.


जागतिक किर्तीचे, विख्यात लेखक सआदत मंटो हे फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झाले. याआधी ते मुंबईत राहत होते आणि चित्रपटांसाठी लिहित होते. त्यांच्या कथांवर अश्लीलतेचे आरोप झाले होते आणि त्यांच्यावर खटलेही दाखल झाले होते.आपल्या मृत्यूच्या चार महिने बावीस दिवस आधी, ऑगस्ट 1954 मध्ये मंटोंनी नेहरुंना एक पत्र लिहिलं होतं. ‘बगैर उनवान के’ (उनवान म्हणजे शीर्षक) या लघुकथा संग्रहात मंटोंनी नेहरूंना लिहिलेले पत्र प्रस्तावनेत सामील केले गेले. त्या पत्राचा हा स्वैर मराठी अनुवाद!
___________________

अस्सलाम अलैकुम, पंडितजी

तुम्हाला लिहिलेलं हे माझं पहिलं पत्र आहे. माशाअल्लाह, तुमचं नाव पाश्चात्य समाजातही रूपवान आणि विद्वान म्हणून घेतलं जातं. पण मीही काही फार मागे नाही असं मला वाटतं. जर नशिबाने मला अमेरिकेपर्यंत पोचवलं असतं, तर कदाचित सौंदर्याच्या मोजपट्टीवर मीही काही कमी ठरलो नसतो. पण तुम्ही आहात भारताचे प्रधानमंत्री, आणि मी पाकिस्तानचा कथाकार! या दोन भूमिकांमध्ये खूप अंतर आहे. तरीही एक धागा आहे जो आपल्याला जोडतो, तो म्हणजे कश्मीर! तुम्ही नेहरू आहात, मी मंटो. आणि कश्मीरी असण्याचा दुसरा अर्थच आहे सौंदर्य, जे मी अजून डोळ्यांनी पाहिलेलं नाही, पण जाणवतं मात्र खोलवर.

मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

जॉन मिल्टन - अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भोक्ता असलेला द्रष्टा कवी!


'वास्तवाला न भिडलेले, मानवतेच्या कसोटीत अपात्र ठरलेले सद्गुण मी स्तुतीस पात्र मानत नाही!' - स्वतःला जनतेचा तारणहार, सदगुणांचा पुतळा आणि देवतासमान समजणाऱ्या एका उद्दाम राजाला उद्देशून केलेले, हे बाणेदार उद्गार एका प्रतिभाशाली कवीचे होते! तो राजा होता, ग्रेट ब्रिटनचा राजा चार्ल्स पहिला आणि ते कवी होते, जॉन मिल्टन!

1608 साली लंडनला जन्मलेले, जागतिक कीर्तीचे कवी, लेखक जॉन मिल्टन यांनी 1644 साली ब्रिटिश राजसत्ता आणि संसद या दोहोंना उद्देशून, राजकीय सेन्सॉरशिपच्या विरोधात एक पुस्तिका लिहिली होती, एरीओपॅजिटिका हे तिचे नाव.

त्यांच्याच काही भाषणांचे आणि उताऱ्यांचे एकत्रित संपादन करुन त्यांनी स्वतः हे पुस्तक प्रकाशित केले होते, या पुस्तकाने ब्रिटिश राजसत्तेच्या तोंडचे पाणी पळालं होतं!

हे पुस्तक म्हणजे जॉन मिल्टन यांचं सर्वात प्रसिद्ध राजकीय-पत्रात्मक भाषण होय. ते केवळ विचारांचं पुस्तक नसून व्यक्तिगत आयुष्यात त्यांना सोसाव्या लागलेल्या घावांमधून जन्माला आलेली साहित्यकृती होती.

घोडे लावण्याची भाषा कीर्तनकारांना शोभते का?

 A person with orange turban

AI-generated content may be incorrect.


इंदुरीकर फेमस झाले ते त्यांच्या कीर्तनाच्या शैलीने!

त्यांच्या आधीच्या कीर्तनकारांनी त्यांच्यासारख्या शैलीत कीर्तन केले नव्हते. कॉमेडी कीर्तन हा वाह्यात शब्द त्यांच्यामुळे रूढ झाला. त्यांनी महिलांविषयी केलेल्या अनेक टिप्पण्या नि:संशय खालच्या दर्जाच्या आणि हीन मानसिकतेच्याच होत्या. व्यसनाविषयी आणि भरकटलेल्या तरुणांना ते झोडपून काढत हे योग्यच होते, वरवर त्यांचा आव आधुनिक कीर्तनाचा असला तरी काही बाबतीत ते मध्ययुगीन मानसिकतेचेच पुरस्कर्ते होते हे स्पष्ट जाणवत असे. असो. पोस्टचा मुद्दा तो नाहीये.

नुकताच त्यांनी त्रागा करत आपण इथून पुढे कीर्तन करणार नसल्याचे, जाहीर केलेय. त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे, आपण त्याविषयी हक्काने सांगू शकत नाही. मात्र कीर्तन बंद करण्यासाठी त्यांनी जी सबब पुढे केलीय ती अयोग्य आहे! ते म्हणतात की लोकांनी त्यांना घोडे लावलेत! (किती ओजस्वी भाषा आहे ही!)

पोरींनी लग्नात गॉगल घालून नाचू नये, गालांना मेकअप करू नये, डोळ्याखाली खाचात रंग भरू नये, लिपस्टिक लावू नये, वरात काढू नये आणि काढलीच तर त्यात नाचू नये अशा शंभर गोष्टी ते खिदळत, उड्या हाणत सांगत असत! लोकही बारुळ्यागत टाळ्या वाजवत!

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

एकमेव तत्वज्ञ सम्राट आणि मेडिटेशन!


अभिनेता रसेल क्रो याने साकारलेला 'ग्लॅडिएटर'मधला मॅक्सिमस, कमांडर ऑफ द आर्मीज ऑफ नॉर्थ, सहज विसरणे शक्य नाही. वास्तवात हे पात्र काल्पनिक होते तरीही जगभरातील सिनेरसिकांना याची भुरळ पडली याचे कारण, मॅक्सिमसची पार्श्वभूमी! प्रजेचा लाडका राजा मार्कस ऑरेलियसशी एकनिष्ठ असणारा सेनापती मॅक्सिमस आपलं सर्वस्व गमावूनही राजावर झालेल्या अन्यायासाठी प्राणांची बाजी लावतो. क्लायमॅक्सला, मार्कसचा क्रूर मुलगा सम्राट कमोडस याची तो हत्या करतो अशा मांडणीची ती काल्पनिक कहाणी होती. असो. पोस्टचा विषय तो नाहीये! पोस्ट मार्कस ऑरेलियस या अद्वितीय रोमन सम्राटाची आणि त्याने लिहिलेल्या दिव्य साहित्यकृती विषयी आहे! मेडीटेशनविषयी आहे!

आज जगभरात मेडीटेशनचा बोलबाला आहे. 'मेडिटेशन' कुणी लिहिलं याचा शोध घेतला की विस्मयकारक नाव आणि माहिती समोर येते! त्याचे मूळ रोमन साम्राज्यात पोहोचते!

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

शोधाचा एंडलेस डोह!

A person swimming in the water

AI-generated content may be incorrect.


बंगालमधली एक जुनी क्लिप पाहण्यात आली, त्यात साठीच्या आसपास वय असणाऱ्या वृद्धेविषयीची माहिती होती. तिचे घर पंधरा वर्षांपूर्वी नदीच्या पुरात वाहून गेलेलं. घरातल्या सगळ्या चीजवस्तुही वाहून गेल्या. पती निवर्तल्यापासून ती एकटीच राहायची, तिच्या हटवादी स्वभावामुळे दोन्ही मुले तिला सोडून गेली. 2010 मध्ये तिची एकुलती मुलगी बाळंतपणाला माहेरी आली होती. रात्रीतून दामोदर नदीचे पाणी वाढले आणि त्यात तिचे घर वाहून गेले, तिच्या मुलीचे शव काही दिवसा नंतर मिळाले.

त्या घटनेनंतर तिच्या मनावर खोल आघात झाला. सरकारने तिला नवे घर दिले, भांडीकुंडी घेण्यासाठी मदतही केली. अनेक विणवण्या केल्यानंतर तिने स्थलांतर केले. लोक तिला विसरून गेले. मात्र चार वर्षांनी फार मोठा पूर आला तेव्हा ती पुन्हा तिथे परतली. पूरग्रस्तांसोबत राहू लागली. सरकारी अधिकारी पुराची पाहणी करण्यास आले की ती हमखास समोर असे.

बुद्ध, मोक्ष आणि किसा गोतमी - एक अद्भुत सत्वकथा!


थेरीगाथावरील भाष्यग्रंथ असणाऱ्या अट्ठकथा या ग्रंथामध्ये किसा गोतमी नावाच्या बौद्ध भिक्खुणीची कथा आहे. किसा गोतमी हिचे तान्हे मूल आजारी पडून एकाएकी निवर्तते. आपल्यासोबत असे कसे झाले, हा प्रश्न तिला भंडावून सोडतो.

पुत्रशोकाने वेडीपिशी झालेली किसा गोतमी भगवान बुध्दांकडे याचक म्हणून येते आणि ती तथागतांना विनंती करते की, "माझ्या पुत्रावर माझे अतिव प्रेम आहे, त्याच्या शिवाय मी जगू शकणार नाही. तेव्हा हे भगवान मला मझ्या पुत्राचा जीव परत मिळवून द्या. तुमच्या शक्तींचा वापर करून हा चमत्कार करा, माझा पुत्र माझ्या पदरात टाका."

यावर भगवान बुध्दांनी तिला सांगितले की, "ठीक आहे, मी तुझे काम करेन, मात्र त्यासाठी तुला एक काम करावे लागेल. मृत्यूची गाठभेट न झालेल्या कुटुंबातून चिमुटभर मोहरी मागून आणशील तरच हा चमत्कार होऊ शकेल."

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

धर्मेंद्र - जट यमला पगला!


त्याचे श्वास अजून जारी आहेत, त्याच्या सिनेमाविषयी वा त्याच्या करिअरविषयी खूपजण खूप काही सांगतील; मला थोडेसे वेगळे सांगायचेय.. 

धरमची गोष्ट सुरु होते 1935 मध्ये. 8 डिसेंबरला पंजाबच्या साहनेवाल गावात जन्मलेला हा एक साधा जाट मुलगा. धर्म सिंह देओल त्याचं नाव. जग त्याला 'धर्मेंद्र' म्हणून ओळखते, त्याच्या आयुष्याची कहाणी, केवळ चित्रपटांच्या यशाची नाही, तर अंतर्मनातील एकाकीपणाची, प्रेमातील द्वंद्वाची आणि संघर्षातील जयपराजयाची आहे. त्याने बॉलीवूडला 'ही-मॅन' दिला, त्याच्या जीवनात असे अनेक क्षण येऊन गेलेत जेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले, हृदयात अपराधीपणाची जखम खोलवर रुजली आणि एकाकी एकांताने त्याला शांत केलं.

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

जोहरान म्हणजे आकाशातला पहिला तारा!


जोहरान ममदानी यांचा जन्म पूर्व आफ्रिकन देश युगांडाची राजधानी कंपाला इथला. त्यांना जाणून घेण्यासाठी त्यांचे वडील मोहमद ममदानी यांची माहिती घेणे अनिवार्य आहे, कारण त्याशिवाय जोहरान यांची जडणघडण आकळू शकत नाही. मोहमद ममदानी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतात मुंबईत जन्मलेले. ते दोन वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबासोबत टांझानियाला गेले आणि तिथून पुढे नजीकच्या युगांडात गेले. त्यांचे कुटुंब तिथेच स्थायिक झाले. आफ्रिकेमधल्या टॉपच्या युनिव्हर्सिटीत त्यांनी अध्यापकाचे काम केले, खेरीज ते एक उत्तम आर्थिक राजकीय तज्ज्ञ होते. इदी अमीन सत्तेत येईपर्यंत तिथल्या सर्व स्थलांतरित लोकांचे समुदाय सुखात होते, मात्र तो सत्तेत येताच त्यांना देश सोडून जावे लागले!

ड्रॅक्युला - सैतानी दुनियेच्या अनभिषिक्त सम्राटाची जन्मकथा!


हॉरर, थ्रिलर सिनेमे पाहाणाऱ्या दर्दी रसिकास 'ड्रॅक्युला' माहिती नसावा असे होत नाही! ब्रॅम स्टोकरने ज्या काळात ड्रॅक्युला ही कादंबरी लिहिली तो व्हिक्टोरियन एरा होता. या कालखंडात प्रामुख्याने चार वर्ग होते - उच्च, मध्यम, श्रमिक आणि तळाशी असणारा निम्नवर्ग. या चारही वर्गांची विभागणी केवळ सामाजिक स्तरावर नसून आर्थिक स्तरदेखील त्यात अंतर्भूत होता. या वर्गवारीचे युरोपमध्ये बऱ्यापैकी सक्त आणि कठोर विधीसंकेत होते. व्यक्तीचा आर्थिक स्तर, त्याचा हुद्दा, शिक्षण यावरून त्याचा वर्ग ठरे. यामुळे सामाजिक देवाणघेवाण अगदी कमी होई, असे असले तरी पुरुष हवे तिथे तोंड मारत आणि स्त्रियांची कुचंबणा ठरलेली असे, मग ती कोणत्याही वर्गातली असली तरीही! एखाद्या उमरावाच्या पत्नीचे जीवन भलेही ऐश आरामात, आनंदात जात असले तरी व्यक्तीस्वातंत्र्याच्या बाबतीत तिचा आणि तळाच्या स्त्रीचा स्तर जवळपास समान असे. बाहेरख्याली पुरुषांना आपल्या अवतीभवती पाहून, त्या स्त्रियांच्या मनात कोणते विचार येत असतील यावर विपुल लेखन झालेय, मात्र त्यांच्या लैंगिक शोषणाविषयी बोलताना त्यांच्या लैंगिक गरजांविषयी तुलनेने कमी लिहिले गेलेय. ब्रॅम स्टोकरने हा मुद्दा बरोबर पकडला आणि त्याच्या मनात घोळत असलेल्या गोष्टी त्यात बेमालूम मिसळल्या.

गोष्ट सुटकेसमध्ये ठेवलेल्या मृतदेहाची!


बेनाव्हिडेस हा मध्यमवयीन पुरुष. भरकटलेला आणि जगण्याच्या विविध समस्यांनी हैराण झालेला माणूस. एके दिवशी त्याच्या संयमाचा विस्फोट होतो, तो अत्यंत विचलित होतो. संतापाच्या भरात, तिशीच्या वयातल्या पत्नीची हत्या करतो. तिची हत्या केल्यानंतर काही वेळाने तो भानावर येतो. रागाच्या भरात आपण हे काय करून बसलो याचे त्याला शल्य वाटू लागते. तो गोंधळून जातो, आता काय करावे, हे काही केल्या त्याला सुचत नाही.  पत्नीचा मृतदेह तो एका मोठ्या सुटकेसमध्ये भरतो. खरेतर आपण ही सुटकेस घेऊन पोलिसांकडे गेले पाहिजे असं त्याचं एक मन सांगत असतं तर त्याचं दुसरं मन त्याला सांगतं की कदाचित डॉक्टर आपल्या पत्नीचे काय करायचे ते सांगू शकतील! द्विधा मनस्थितीत तो घराबाहेर पडतो.

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

औरते – रमाशंकर यादव विद्रोही..

A close-up of a person crying

AI-generated content may be incorrect.


काही स्त्रियांनी
स्वेच्छेने विहिरीत उडी मारून जीव दिलाय
असं पोलिसांच्या नोंदींमध्ये लिहिलंय.

आणि काही स्त्रिया
चितेवर जळून मरण पावल्या —
असं धर्मग्रंथांमध्ये लिहिलंय.

मी कवी आहे,
कर्ता आहे,
घाई कशाची?

एके दिवशी मी पोलीस आणि पुरोहित
दोघांनाही एकाचवेळी
स्त्रियांच्या न्यायालयात उभं करेन,

जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याविषयीची एक नोंद..


जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं बालपण आयर्लंडमध्ये पांढरपेशी गरिबीत गेलं. त्यांचे वडील पेशाने कारकून होते, मद्याचा अंमल चढला की त्यांना आवरणे कठीण जाई. खेरीज ते काहीसे उदासीन स्वभावाचे होते. घरात रोज भांडणं होत, भांड्यांची आदळआपट चाले. नीरव शांततेच्या जागी किंकाळ्यांचा आवाज भरलेला असे.
या वातावरणातही शॉची आई, ल्युसिंडा गार्नी शॉ हिने आपला छंद लुप्त होऊ दिला नव्हता. ती अत्यंत प्रतिभावान गायिका होती. तिचा आवाज लोकांना भावविभोर करायचा. पण तिचं आयुष्य एका अपयशी लग्नाच्या सावटाखाली हळूहळू कोमेजत चाललं होतं आणि याचं तिला शल्य होतं.

दरम्यानच्या काळात त्यांच्या घरात एक संगीत शिक्षक येत असत; जॉर्ज वँडेल ली हे त्याचे नाव. हळूहळू शॉची आई त्याच्याकडे आकर्षित झाली. दोघांमध्ये आत्मिक जवळीक वाढली. जॉर्जच्या घरी शिसवी पियानो होता. आईची बोटे पियानोच्या कळांवरुन फिरू लागली की त्याचे मन भरुन येई. त्याला विलक्षण आनंद होई.

रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

हे चाहूर आहे तरी काय?


साठच्या दशकात आईने नर्सची नोकरी प्रामाणिकपणे आणि विलक्षण संवेदनशील पद्धतीने केली. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील दहागाव या छोट्याशा खेड्यात आरोग्य केंद्रात ती रुजू झाली होती. हा भाग अजूनही निबिड अरण्यासारखा आणि अडगळीचा आहे, साठ वर्षापूर्वी तर हा भाग एखाद्या आदिम मानवी वसाहतीसारखा होता! आई अहमदनगरची, तिने कधी समुद्र पाहिलेला नव्हता, थेट कोकणात तिने काही वर्षे काढली. स्वतःला जुळवून घेण्यासाठी तिला झगडावे लागले!

अतिशय खडतर परिस्थितीतून तिने स्वतःला उभं केलं आणि कमालीच्या सहनशील, संयमी, जिद्दी वृत्तीने पुढचे आयुष्यही कष्टात काढले. विपरीत परिस्थितीतही तिने चारही अपत्ये घडवली! आम्हा चारही भावंडांना शिक्षणाची गोडी लावण्यात आणि लेखन वाचनाची ओढ निर्माण करण्यास सर्वस्वी तिच कारणीभूत होती. ती होती, म्हणून आम्ही सर्व घडलो. माझी भावंडे जितक्या चांगल्या पद्धतीने आईवडिलांच्या कसोटीस उतरली त्या मानाने मी खूपच कमी पडलो आणि नंतरही निखारु शकलो नाही, हे वास्तव मी लिहिले पाहिजे.

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

दिवाळीतल्या गवळणी!


दिवाळीमध्ये अंगणात शेणापासून केल्या जाणाऱ्या ‘गवळणीं’ची प्रथा इतर अनेक प्रथांप्रमाणे हळूहळू लोप पावतेय. महाराष्ट्राच्या ग्रामजीवनाचं आणि गतकालीन ग्रामीण स्त्रियांचं भावविश्व उलगडणाऱ्या या गवळणी आता इतिहासजमा होत आहेत. आता तर दारात गायीगुरंच नसल्याने शेणही मिळत नाही आणि नव्या पिढीची मंडळी शेणात हात घालायला तयार होत नाहीत (यामागची त्यांची कारणे पटण्याजोगी आहेत हे मान्य करावे लागेल). यामुळे लोकसंस्कृतीचा हा ठेवा नष्ट होतोय, अर्थात काळाच्या प्रभावानुसार अशा गोष्टी घडत असतातच हेही स्वीकारले पाहिजे!

दिवाळी हा कृषीजीवनावर आधारीत सण. गावांत शहरांत प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कृषी संस्कृतीवर आधारीत विविध प्रथा आणि परंपरा साजऱ्या होतात. समृध्द लोकजीवनाचे दर्शन त्यातून घडतं. वेगवेगळ्या प्रांतात दिवाळी विविध पध्दतीने साजरी होते. त्यातून लोकजीवनाचं दर्शन प्रकर्षाने होते.

ब्लड रिव्हर - टिम बुचर यांची अद्भुत कादंबरी!


नुकतेच आपल्या देशाच्या राजधानीत यमुना नदीच्या अस्वच्छतेवरून मोठा तमाशा झाला, छट पूजेसाठी खोट्या स्वच्छ पाण्याची नौटंकीही करुन झाली. बेसिकली आपल्याकडे, नद्यांना आपण नावाला पवित्र मानतो, त्यापलीकडे आपली त्यांच्याप्रती आस्था नाही हे आपण खुल्या मनाने मान्य केले पाहिजे. अमुक एक नदी पुराणात आहे, तमुक एक नदी इतिहासात आहे, अलाण्या नदीचे पाणी पवित्र आणि फलाण्या नदीचे पाणी मोक्ष देते इत्यादी कल्पनात आपण, आपल्याच स्वार्थासाठी गुंतून पडलो आहोत. जसे की आपले दुष्कर्म कमी व्हावे, आपली पापे कमी व्हावीत, आपल्याला आशीर्वाद लाभावेत, आपलं कल्याण व्हावं, वगैरे वगैरे! म्हणजे आपण नदीला काही देणार नाही, नदीसाठी आपण काही करणार नाही आणि त्या बदल्यात तिच्याकडून आपल्याच कथित भल्याच्या कपोलकल्पित गोष्टी मागणार, पुण्य वाढवून मिळावे म्हणून डुबकी मारणार! आणि नदीला आपण काय देणार, तर ड्रेनेजचे पाणी, गटार नाल्यांचे पाणी, रासायनिक कारखान्यांचे दूषित पाणी आणि आपणच टाकलेला गावभराचा कचरा! नदी गढूळ विषारी घाण होऊन जाते, तरीही आपण तिच्यासाठी झिजत नाही की तिच्यासाठी आपला जीव तीळतीळ तुटत नाही! नद्या आपल्या जीवनदायिन्या आहेत वगैरे ज्ञानकण फुंकायला मोकळे होतो. सरकारेही आपल्यासारखीच कागदावर अब्जावधी रुपयांच्या योजना आणतात, काही कोटी खर्च होतात, नदी कणभरच बदलते पण मणभर पैसा इकडे तिकडे फिरतो! घाण गलिच्छ अवतारात नदी वाहत राहते! नदीविषयी आपल्यात अनास्था आहे हे कटूसत्य आहे.

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

सरस्वती चंद्र - एक हळवी व्यथा!


प्रेम जरी अपूर्ण राहिले, तरी ते आत्म्याला पूर्णत्व देऊन जाते हा अभूतपूर्व संदेश ‘सरस्वतीचंद्र‘ कादंबरीमध्ये होता; यातली नायिका शेवटी म्हणते की, 'विरहच खरेतर आत्म्याच्या मुक्तीचा आरंभ असतो.'एखाद्या व्यक्तीने कुणावर प्रेम केले असेल मात्र तिच्यासोबत विवाह झाला नसेल तर त्या व्यक्तीच्या मनात नेमकी कोणती तगमग होते?
जिच्याबरोबर प्रेम केले तिच्यासोबत विवाह होऊ न शकलेल्या व्यक्तीला त्या विवाहित प्रेयसीच्या घरात व्यवसायात रोज आपलं तोंड दाखवावं लागेल अशी परिस्थिती उद्भवली तर कशी मनोवस्था होईल?

प्रेम केले म्हणजे सर्वस्व अर्पण केले पाहिजे असे काही नाही, मात्र आपण एकमेकांवर निस्सीम निरपेक्ष प्रेम करत होतो ही गोष्ट तरी त्या दोन प्रेमी जीवांनी जाणून घेतली पाहिजे!

नूतनची मुख्य भूमिका असणारा ‘सरस्वतीचंद्र‘ हा याच नावाच्या गुजराती कादंबरीवर आधारित होता. गोवर्धन त्रिपाठी यांनी लिहिलेल्या या कादंबरीची कथा दोन गुजराती ब्राह्मण कुटुंबांवर केंद्रित आहे. लक्ष्मीनंदनचे कुटुंब मुंबईत स्थायिक आहे, त्यांचा व्यवसाय भरभराटीस आलेला आणि ते खूप श्रीमंत! सरस्वतीचंद्र हा लक्ष्मीनंदन आणि चंद्रलक्ष्मी यांचा पुत्र. तो एक उच्च बुद्धिमत्ता असणारा विद्वान, हुशार वकील आणि संस्कृत, इंग्रजी साहित्याचा स्कॉलर अभ्यासक. वडिलांच्या व्यवसायातही तो यशस्वीरित्या योगदानही देतो. त्याचे भविष्य उज्ज्वल असते.

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

इदी अमीन - स्वप्नाळू राष्ट्रवादाचा दमनकारी सत्ताधीश!


विदेशात राहणाऱ्या काही अगोचर आणि मूर्ख भारतीयांच्या आततायी वर्तनामुळे जगभरात भारतीय लोकांविरोधात आवाज उठवला जातोय हे आता लपून राहिलेले नाही, अलीकडील दोनेक वर्षात तर या गोष्टी वेगळ्याच स्तरावर पोहोचल्यात. नेमक्या याच काळात जागतिक कीर्तीच्या द इकॉनॉमिस्ट या नियतकालिकात युगांडाचा हुकूमशहा, इदी अमीन या क्रूरकर्म्याविषयीचा लेख ठळक पब्लिश झालाय. युगांडामधील परकीय नागरिकांना खास करून भारतीय नागरिकांना, त्याने अत्यंत क्रूरपणे देशातून पलायन करण्यास भाग पाडलं होतं.

1976 साली लंडनमधील मॅडम तुसॉ या मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयाने आपल्या भेट देणाऱ्यांना विचारलं की, “संग्रहालयातील सर्वात नावडती व्यक्ती कोण?” त्या मतदानात युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन दुसऱ्या क्रमांकावर आला होता, अर्थातच पहिला क्रमांक होता अडॉल्फ हिटलरचा! (आपल्याकडील काहींना याची मोठी भुरळ पडलेली असते! असो) त्या काळात ब्रिटनमधील वृत्तपत्रांत अमीनच्या क्रूर कृत्यांच्या कथांचे रकाने गच्च भरलेले असत. त्यातील काही गोष्टी खर्‍या होत्या, जसे की तो खरंच हजारो लोकांचा खुनी होता. पण काही वदंता होत्या जसे की, त्याने आपल्या फ्रीजमध्ये शत्रूंची मानवी डोकी ठेवली होती, काहींच्या मते ही गोष्ट खरी होती. तो नरभक्षक होता. कोवळी मुले आणि शत्रू त्याचे भक्ष असत. तो भोगी होता आणि अय्याश होता!

शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

शिऊलीची फुलं - अलंकृताची लोभस नोंद!

काही माणसं अगदी लोभस वर्णन करतात, केवळ एका ओळीतच ते अफाट काही सांगून जातात. कोलकत्यात फिरताना अलंकृता दासच्या घरी गेलो होतो. सोबत अबीर होता, निहायत बडबड्या स्वभावाचा हुशार तरुण! माझ्या येण्याचे प्रयोजन सांगताच अलंकृताच्या जास्वंदी चेहऱ्यावर तृप्ततेची फुले उमल्ली! माझ्या नि अबीरच्या प्रश्नांवर ती भरभरून बोलत होती.

आमच्याशी बोलत असताना पांढऱ्या शुभ्र साडीच्या पदराच्या टोकाशी तिच्या हातांचा चाळा सुरू होता तो एकाएकी थांबला आणि थांबा, तुम्हाला काहीतरी तजेलदार प्यायला देते असं म्हणत ती आत गेली.

दोनच खोल्यांचे तिचे घर अगदी नीटस होतं, अतिशय देखणं होतं! घरात श्रीमंती कुठेच डोकावत नव्हती मात्र एका कलावंत रसिक व्यक्तीचे ते घर आहे हे पाहता क्षणी लक्षात येत होतं.

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

स्वामी दयानंद सरस्वती - एक नोंद ..


ते 1867 चे साल होते. हरिद्वारच्या कुंभमेळ्यात स्वामी दयानंद सरस्वती धर्मप्रचाराच्या उद्देशाने आले होते. या मेळ्यात लाखो हिंदू स्त्री-पुरुष आणि साधू एकत्र येतात, त्यांच्याशी संवाद साधता येईल असा त्यांचा हेतू होता. कुंभमेळ्याच्या वेळी गंगेत स्नान केल्याने पाप धुतले जाते आणि मनुष्याला दुःखांपासून तसेच जन्म-मरणाच्या फेर्‍यातून मुक्ती मिळते ही श्रद्धा तेव्हाही जनमानसात रूढ होती, त्याविषयी दयानंदांना बोलायचे होते.
हरिद्वारमध्ये आल्यावर स्वामीजींनी पाहिले की, साधू आणि पंडे धर्माचा खरा उपदेश न करता लोकांना पाखंड शिकवून फसवत होते. समाज सत्य धर्माच्या मार्गावर चालण्याऐवजी अज्ञानाच्या खोल खाईत पडत चालला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कुंभ मेळ्यातील दृश्यांनी त्यांना अंतर्मनातून खोल वेदना झाल्या. त्यांनी जाणले की, लोक दुःखातून मुक्त होण्याऐवजी अशा कृत्यांमुळे दुःखाच्या भवसागरात बुडून जाताहेत.

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

बशीर बद्र - खामोशी एका शायराची..

बशीर बद्र सरांना त्यांचा ख़ुदा आता नक्कीच दिसत असेल..


विख्यात शायर, कवी बशीर बद्र आजारी असल्याचं ऐकून वाचून होतो. मध्यंतरी काही नतद्रष्ट लोकांनी त्यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल केली होती, वास्तवात ते गंभीर आजारी आहेत.

नुकताच त्यांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला, ज्यात बद्र सरांच्या पत्नी राहत बद्र, त्यांची शुश्रूषा करताना दिसल्या, बशीर सरांची यारदाश्त चांगली राहावी म्हणून त्यांच्या शेरो शायरीबद्दल बोलताना दिसल्या, बद्र सरांना डिमेन्शिया आणि अल्झायमरने ग्रासलेय.

त्यांचा भूतकाळ ते हळूहळू विसरत चाललेत, त्यांच्या माणसांची त्यांना ओळख लागेनाशी झालीय. त्यांचं स्वतःचं अस्तित्वही ते काही काळात विसरतील. त्यांचा जीव की प्राण असणारी शायरीदेखील त्यांच्या स्मरणनोंदीतून लुप्त होईल.

ते ब्लँक होतील. उरेल केवळ, त्यांची मंद गतीतली धडधडती नब्ज!

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

इतिहास बदनाम वस्तीचा - मीरतच्या कबाडी बाजारचा!



उत्तर प्रदेशच्या मीरतमधील कबाडीबाजार भागातील एका पियक्कड थोराड बाईने एका भेटीत 'ओल्ड मंक' पिणाऱ्या तरूण, प्रौढ आणि वयस्कर पुरूषांची गुणलक्षणे आणि सवयी सांगितल्या होत्या!विशेष म्हणजे तिन्ही वर्गवारीतील पुरुषांच्या त्या गोष्टी आणि त्यांची प्यायची पद्धत यांच्यात एक परस्पर सूत्र होतं, जे अफाट होतं! तेव्हापासून ओल्ड मंक पिणाऱ्या ओळखीच्या इसमांना ते वर्णन फिट बसतंय का हे चेक केल्यानंतर अक्षरश: अवाक होण्याची वेळ आली!

रेड लाइट डायरीज सिरिजमधील माझ्या आगामी पुस्तकातील मदिराक्षीच्या प्रकरणात विविध रंजक संदर्भ आणि नोंदी आहेत, त्यातच ही नोंद समाविष्ट आहे.

कबाडी बाजारची ही बदनाम वस्ती मुघल काळापासूनची आहे. 2019 मध्ये इथला हा व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासनाने जंग जंग पछाडले. धंदा पूर्ण बंद झाल्याचे जाहीरही केले पण याचवर्षी सप्टेंबरमध्ये एका रेडद्वारे वीस जणींची सुटका करण्यात आलीय, यावरून काय ते कळावे.

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

थिरुनल्लूर करुणाकरण यांच्या कविता आणि अष्टमुडी तलाव!..


अष्टमुडी तलाव हा केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील एक नयनरम्य नि महत्त्वाचा तलाव, अद्भुत नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध. 'केरळचे प्रवेशद्वार' या नावाने ख्यातनाम! बालकवींच्या कवितेत जसा विशिष्ट भूप्रदेश सातत्याने डोकावतो तद्वत हा अष्टमुडी तलाव थिरुनल्लूर करुणाकरण या विख्यात मल्याळम कवीच्या कवितेत अनेकदा नजरेस पडतो.

बालकवींच्या औदुंबर कवितेत तलावाकाठचे नितळ औदासिन्य आहे, अगदी तसेच नसले तरीही त्याच्याशी आपली जातकुळी सांगणारी एक कविता थिरुनल्लू र करूणाकरण यांनी लिहिली आहे. 'निळासांवळा झरा
वाहतो बेटाबेटातुन, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे. हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे. ... पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर..' या पंक्ती बालकवींच्या कवितेतल्या.

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

भीमेचे अश्रू..


7 मार्च 1966. आमच्या सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या भीमेच्या (चंद्रभागा) पात्रावरील उजनी धरण प्रकल्पाचं भूमिपूजन सुरु होतं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. नाईक यांनी नारळ वाढवला आणि यशवंतराव चव्हाण कुदळ मारण्यासाठी पुढे झाले अन त्यांच्या डोळ्यात पाणी आले. धोतराचा सोगा डाव्या हाताने उचलून धरत त्यांनी कुदळ खाली टाकली. थोडेसे पुढे सरसावले. नदीपात्राच्या दिशेने दोन्ही हात जोडून ते उभे राहिले. गदगदलेल्या आवाजात ते बोलले, "विठ्ठला मला माफ कर बाबा, मी औचित्यभंग करतोय. तुझी चंद्रभागा मी अडवलीय मला पदरात घे!".. कार्यक्रमाच्या भाषणात देखील त्यांनी हा सल बोलून दाखवला. आज या भीमेने आणि तिच्या उपनद्यांनी रौद्र रूप धारण केलेय! काय झालेय नेमके?