साहित्य रसास्वाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
साहित्य रसास्वाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

मुल्क राज आनंद - भूमिका घेऊन जगलेला लेखक!


"आजही लिखाण माझ्यासाठी एक प्रकारची थेरपी आहे. दररोज लिहिल्याशिवाय मला राहवत नाही. खरं तर 1927 मध्ये मला पहिल्यांदा मानसिक ताणामुळे खचायला झालं तेव्हा व्हिएन्नामध्ये सिग्मंड फ्रॉइड यांची भेट घेतली. पुढे जाऊन आमच्या भेटींचा सिलसिला जारी राहिला.

त्यांच्यासोबतच्या प्रत्येक भेटीने मला मोठा दिलासा मिळाला. पण नंतरच्या काळात आलेल्या मानसिक ताणांच्या दोन धक्क्यांवर मात करण्याची ताकद मात्र फक्त लिखाणातूनच मिळाली. या प्रत्येक आघात समयी मी एक कादंबरी लिहिली, परिणामी कमकुवत झालेली मनोवस्था पुन्हा सावरली.

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

पंडित नेहरूंना मंटोंचे पत्र.


जागतिक किर्तीचे, विख्यात लेखक सआदत मंटो हे फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झाले. याआधी ते मुंबईत राहत होते आणि चित्रपटांसाठी लिहित होते. त्यांच्या कथांवर अश्लीलतेचे आरोप झाले होते आणि त्यांच्यावर खटलेही दाखल झाले होते.आपल्या मृत्यूच्या चार महिने बावीस दिवस आधी, ऑगस्ट 1954 मध्ये मंटोंनी नेहरुंना एक पत्र लिहिलं होतं. ‘बगैर उनवान के’ (उनवान म्हणजे शीर्षक) या लघुकथा संग्रहात मंटोंनी नेहरूंना लिहिलेले पत्र प्रस्तावनेत सामील केले गेले. त्या पत्राचा हा स्वैर मराठी अनुवाद!
___________________

अस्सलाम अलैकुम, पंडितजी

तुम्हाला लिहिलेलं हे माझं पहिलं पत्र आहे. माशाअल्लाह, तुमचं नाव पाश्चात्य समाजातही रूपवान आणि विद्वान म्हणून घेतलं जातं. पण मीही काही फार मागे नाही असं मला वाटतं. जर नशिबाने मला अमेरिकेपर्यंत पोचवलं असतं, तर कदाचित सौंदर्याच्या मोजपट्टीवर मीही काही कमी ठरलो नसतो. पण तुम्ही आहात भारताचे प्रधानमंत्री, आणि मी पाकिस्तानचा कथाकार! या दोन भूमिकांमध्ये खूप अंतर आहे. तरीही एक धागा आहे जो आपल्याला जोडतो, तो म्हणजे कश्मीर! तुम्ही नेहरू आहात, मी मंटो. आणि कश्मीरी असण्याचा दुसरा अर्थच आहे सौंदर्य, जे मी अजून डोळ्यांनी पाहिलेलं नाही, पण जाणवतं मात्र खोलवर.

मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

जॉन मिल्टन - अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भोक्ता असलेला द्रष्टा कवी!


'वास्तवाला न भिडलेले, मानवतेच्या कसोटीत अपात्र ठरलेले सद्गुण मी स्तुतीस पात्र मानत नाही!' - स्वतःला जनतेचा तारणहार, सदगुणांचा पुतळा आणि देवतासमान समजणाऱ्या एका उद्दाम राजाला उद्देशून केलेले, हे बाणेदार उद्गार एका प्रतिभाशाली कवीचे होते! तो राजा होता, ग्रेट ब्रिटनचा राजा चार्ल्स पहिला आणि ते कवी होते, जॉन मिल्टन!

1608 साली लंडनला जन्मलेले, जागतिक कीर्तीचे कवी, लेखक जॉन मिल्टन यांनी 1644 साली ब्रिटिश राजसत्ता आणि संसद या दोहोंना उद्देशून, राजकीय सेन्सॉरशिपच्या विरोधात एक पुस्तिका लिहिली होती, एरीओपॅजिटिका हे तिचे नाव.

त्यांच्याच काही भाषणांचे आणि उताऱ्यांचे एकत्रित संपादन करुन त्यांनी स्वतः हे पुस्तक प्रकाशित केले होते, या पुस्तकाने ब्रिटिश राजसत्तेच्या तोंडचे पाणी पळालं होतं!

हे पुस्तक म्हणजे जॉन मिल्टन यांचं सर्वात प्रसिद्ध राजकीय-पत्रात्मक भाषण होय. ते केवळ विचारांचं पुस्तक नसून व्यक्तिगत आयुष्यात त्यांना सोसाव्या लागलेल्या घावांमधून जन्माला आलेली साहित्यकृती होती.

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

एकमेव तत्वज्ञ सम्राट आणि मेडिटेशन!


अभिनेता रसेल क्रो याने साकारलेला 'ग्लॅडिएटर'मधला मॅक्सिमस, कमांडर ऑफ द आर्मीज ऑफ नॉर्थ, सहज विसरणे शक्य नाही. वास्तवात हे पात्र काल्पनिक होते तरीही जगभरातील सिनेरसिकांना याची भुरळ पडली याचे कारण, मॅक्सिमसची पार्श्वभूमी! प्रजेचा लाडका राजा मार्कस ऑरेलियसशी एकनिष्ठ असणारा सेनापती मॅक्सिमस आपलं सर्वस्व गमावूनही राजावर झालेल्या अन्यायासाठी प्राणांची बाजी लावतो. क्लायमॅक्सला, मार्कसचा क्रूर मुलगा सम्राट कमोडस याची तो हत्या करतो अशा मांडणीची ती काल्पनिक कहाणी होती. असो. पोस्टचा विषय तो नाहीये! पोस्ट मार्कस ऑरेलियस या अद्वितीय रोमन सम्राटाची आणि त्याने लिहिलेल्या दिव्य साहित्यकृती विषयी आहे! मेडीटेशनविषयी आहे!

आज जगभरात मेडीटेशनचा बोलबाला आहे. 'मेडिटेशन' कुणी लिहिलं याचा शोध घेतला की विस्मयकारक नाव आणि माहिती समोर येते! त्याचे मूळ रोमन साम्राज्यात पोहोचते!

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

ड्रॅक्युला - सैतानी दुनियेच्या अनभिषिक्त सम्राटाची जन्मकथा!


हॉरर, थ्रिलर सिनेमे पाहाणाऱ्या दर्दी रसिकास 'ड्रॅक्युला' माहिती नसावा असे होत नाही! ब्रॅम स्टोकरने ज्या काळात ड्रॅक्युला ही कादंबरी लिहिली तो व्हिक्टोरियन एरा होता. या कालखंडात प्रामुख्याने चार वर्ग होते - उच्च, मध्यम, श्रमिक आणि तळाशी असणारा निम्नवर्ग. या चारही वर्गांची विभागणी केवळ सामाजिक स्तरावर नसून आर्थिक स्तरदेखील त्यात अंतर्भूत होता. या वर्गवारीचे युरोपमध्ये बऱ्यापैकी सक्त आणि कठोर विधीसंकेत होते. व्यक्तीचा आर्थिक स्तर, त्याचा हुद्दा, शिक्षण यावरून त्याचा वर्ग ठरे. यामुळे सामाजिक देवाणघेवाण अगदी कमी होई, असे असले तरी पुरुष हवे तिथे तोंड मारत आणि स्त्रियांची कुचंबणा ठरलेली असे, मग ती कोणत्याही वर्गातली असली तरीही! एखाद्या उमरावाच्या पत्नीचे जीवन भलेही ऐश आरामात, आनंदात जात असले तरी व्यक्तीस्वातंत्र्याच्या बाबतीत तिचा आणि तळाच्या स्त्रीचा स्तर जवळपास समान असे. बाहेरख्याली पुरुषांना आपल्या अवतीभवती पाहून, त्या स्त्रियांच्या मनात कोणते विचार येत असतील यावर विपुल लेखन झालेय, मात्र त्यांच्या लैंगिक शोषणाविषयी बोलताना त्यांच्या लैंगिक गरजांविषयी तुलनेने कमी लिहिले गेलेय. ब्रॅम स्टोकरने हा मुद्दा बरोबर पकडला आणि त्याच्या मनात घोळत असलेल्या गोष्टी त्यात बेमालूम मिसळल्या.

गोष्ट सुटकेसमध्ये ठेवलेल्या मृतदेहाची!


बेनाव्हिडेस हा मध्यमवयीन पुरुष. भरकटलेला आणि जगण्याच्या विविध समस्यांनी हैराण झालेला माणूस. एके दिवशी त्याच्या संयमाचा विस्फोट होतो, तो अत्यंत विचलित होतो. संतापाच्या भरात, तिशीच्या वयातल्या पत्नीची हत्या करतो. तिची हत्या केल्यानंतर काही वेळाने तो भानावर येतो. रागाच्या भरात आपण हे काय करून बसलो याचे त्याला शल्य वाटू लागते. तो गोंधळून जातो, आता काय करावे, हे काही केल्या त्याला सुचत नाही.  पत्नीचा मृतदेह तो एका मोठ्या सुटकेसमध्ये भरतो. खरेतर आपण ही सुटकेस घेऊन पोलिसांकडे गेले पाहिजे असं त्याचं एक मन सांगत असतं तर त्याचं दुसरं मन त्याला सांगतं की कदाचित डॉक्टर आपल्या पत्नीचे काय करायचे ते सांगू शकतील! द्विधा मनस्थितीत तो घराबाहेर पडतो.

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याविषयीची एक नोंद..


जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं बालपण आयर्लंडमध्ये पांढरपेशी गरिबीत गेलं. त्यांचे वडील पेशाने कारकून होते, मद्याचा अंमल चढला की त्यांना आवरणे कठीण जाई. खेरीज ते काहीसे उदासीन स्वभावाचे होते. घरात रोज भांडणं होत, भांड्यांची आदळआपट चाले. नीरव शांततेच्या जागी किंकाळ्यांचा आवाज भरलेला असे.
या वातावरणातही शॉची आई, ल्युसिंडा गार्नी शॉ हिने आपला छंद लुप्त होऊ दिला नव्हता. ती अत्यंत प्रतिभावान गायिका होती. तिचा आवाज लोकांना भावविभोर करायचा. पण तिचं आयुष्य एका अपयशी लग्नाच्या सावटाखाली हळूहळू कोमेजत चाललं होतं आणि याचं तिला शल्य होतं.

दरम्यानच्या काळात त्यांच्या घरात एक संगीत शिक्षक येत असत; जॉर्ज वँडेल ली हे त्याचे नाव. हळूहळू शॉची आई त्याच्याकडे आकर्षित झाली. दोघांमध्ये आत्मिक जवळीक वाढली. जॉर्जच्या घरी शिसवी पियानो होता. आईची बोटे पियानोच्या कळांवरुन फिरू लागली की त्याचे मन भरुन येई. त्याला विलक्षण आनंद होई.

रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

हे चाहूर आहे तरी काय?


साठच्या दशकात आईने नर्सची नोकरी प्रामाणिकपणे आणि विलक्षण संवेदनशील पद्धतीने केली. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील दहागाव या छोट्याशा खेड्यात आरोग्य केंद्रात ती रुजू झाली होती. हा भाग अजूनही निबिड अरण्यासारखा आणि अडगळीचा आहे, साठ वर्षापूर्वी तर हा भाग एखाद्या आदिम मानवी वसाहतीसारखा होता! आई अहमदनगरची, तिने कधी समुद्र पाहिलेला नव्हता, थेट कोकणात तिने काही वर्षे काढली. स्वतःला जुळवून घेण्यासाठी तिला झगडावे लागले!

अतिशय खडतर परिस्थितीतून तिने स्वतःला उभं केलं आणि कमालीच्या सहनशील, संयमी, जिद्दी वृत्तीने पुढचे आयुष्यही कष्टात काढले. विपरीत परिस्थितीतही तिने चारही अपत्ये घडवली! आम्हा चारही भावंडांना शिक्षणाची गोडी लावण्यात आणि लेखन वाचनाची ओढ निर्माण करण्यास सर्वस्वी तिच कारणीभूत होती. ती होती, म्हणून आम्ही सर्व घडलो. माझी भावंडे जितक्या चांगल्या पद्धतीने आईवडिलांच्या कसोटीस उतरली त्या मानाने मी खूपच कमी पडलो आणि नंतरही निखारु शकलो नाही, हे वास्तव मी लिहिले पाहिजे.

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

ब्लड रिव्हर - टिम बुचर यांची अद्भुत कादंबरी!


नुकतेच आपल्या देशाच्या राजधानीत यमुना नदीच्या अस्वच्छतेवरून मोठा तमाशा झाला, छट पूजेसाठी खोट्या स्वच्छ पाण्याची नौटंकीही करुन झाली. बेसिकली आपल्याकडे, नद्यांना आपण नावाला पवित्र मानतो, त्यापलीकडे आपली त्यांच्याप्रती आस्था नाही हे आपण खुल्या मनाने मान्य केले पाहिजे. अमुक एक नदी पुराणात आहे, तमुक एक नदी इतिहासात आहे, अलाण्या नदीचे पाणी पवित्र आणि फलाण्या नदीचे पाणी मोक्ष देते इत्यादी कल्पनात आपण, आपल्याच स्वार्थासाठी गुंतून पडलो आहोत. जसे की आपले दुष्कर्म कमी व्हावे, आपली पापे कमी व्हावीत, आपल्याला आशीर्वाद लाभावेत, आपलं कल्याण व्हावं, वगैरे वगैरे! म्हणजे आपण नदीला काही देणार नाही, नदीसाठी आपण काही करणार नाही आणि त्या बदल्यात तिच्याकडून आपल्याच कथित भल्याच्या कपोलकल्पित गोष्टी मागणार, पुण्य वाढवून मिळावे म्हणून डुबकी मारणार! आणि नदीला आपण काय देणार, तर ड्रेनेजचे पाणी, गटार नाल्यांचे पाणी, रासायनिक कारखान्यांचे दूषित पाणी आणि आपणच टाकलेला गावभराचा कचरा! नदी गढूळ विषारी घाण होऊन जाते, तरीही आपण तिच्यासाठी झिजत नाही की तिच्यासाठी आपला जीव तीळतीळ तुटत नाही! नद्या आपल्या जीवनदायिन्या आहेत वगैरे ज्ञानकण फुंकायला मोकळे होतो. सरकारेही आपल्यासारखीच कागदावर अब्जावधी रुपयांच्या योजना आणतात, काही कोटी खर्च होतात, नदी कणभरच बदलते पण मणभर पैसा इकडे तिकडे फिरतो! घाण गलिच्छ अवतारात नदी वाहत राहते! नदीविषयी आपल्यात अनास्था आहे हे कटूसत्य आहे.

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

सरस्वती चंद्र - एक हळवी व्यथा!


प्रेम जरी अपूर्ण राहिले, तरी ते आत्म्याला पूर्णत्व देऊन जाते हा अभूतपूर्व संदेश ‘सरस्वतीचंद्र‘ कादंबरीमध्ये होता; यातली नायिका शेवटी म्हणते की, 'विरहच खरेतर आत्म्याच्या मुक्तीचा आरंभ असतो.'एखाद्या व्यक्तीने कुणावर प्रेम केले असेल मात्र तिच्यासोबत विवाह झाला नसेल तर त्या व्यक्तीच्या मनात नेमकी कोणती तगमग होते?
जिच्याबरोबर प्रेम केले तिच्यासोबत विवाह होऊ न शकलेल्या व्यक्तीला त्या विवाहित प्रेयसीच्या घरात व्यवसायात रोज आपलं तोंड दाखवावं लागेल अशी परिस्थिती उद्भवली तर कशी मनोवस्था होईल?

प्रेम केले म्हणजे सर्वस्व अर्पण केले पाहिजे असे काही नाही, मात्र आपण एकमेकांवर निस्सीम निरपेक्ष प्रेम करत होतो ही गोष्ट तरी त्या दोन प्रेमी जीवांनी जाणून घेतली पाहिजे!

नूतनची मुख्य भूमिका असणारा ‘सरस्वतीचंद्र‘ हा याच नावाच्या गुजराती कादंबरीवर आधारित होता. गोवर्धन त्रिपाठी यांनी लिहिलेल्या या कादंबरीची कथा दोन गुजराती ब्राह्मण कुटुंबांवर केंद्रित आहे. लक्ष्मीनंदनचे कुटुंब मुंबईत स्थायिक आहे, त्यांचा व्यवसाय भरभराटीस आलेला आणि ते खूप श्रीमंत! सरस्वतीचंद्र हा लक्ष्मीनंदन आणि चंद्रलक्ष्मी यांचा पुत्र. तो एक उच्च बुद्धिमत्ता असणारा विद्वान, हुशार वकील आणि संस्कृत, इंग्रजी साहित्याचा स्कॉलर अभ्यासक. वडिलांच्या व्यवसायातही तो यशस्वीरित्या योगदानही देतो. त्याचे भविष्य उज्ज्वल असते.

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

इदी अमीन - स्वप्नाळू राष्ट्रवादाचा दमनकारी सत्ताधीश!


विदेशात राहणाऱ्या काही अगोचर आणि मूर्ख भारतीयांच्या आततायी वर्तनामुळे जगभरात भारतीय लोकांविरोधात आवाज उठवला जातोय हे आता लपून राहिलेले नाही, अलीकडील दोनेक वर्षात तर या गोष्टी वेगळ्याच स्तरावर पोहोचल्यात. नेमक्या याच काळात जागतिक कीर्तीच्या द इकॉनॉमिस्ट या नियतकालिकात युगांडाचा हुकूमशहा, इदी अमीन या क्रूरकर्म्याविषयीचा लेख ठळक पब्लिश झालाय. युगांडामधील परकीय नागरिकांना खास करून भारतीय नागरिकांना, त्याने अत्यंत क्रूरपणे देशातून पलायन करण्यास भाग पाडलं होतं.

1976 साली लंडनमधील मॅडम तुसॉ या मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयाने आपल्या भेट देणाऱ्यांना विचारलं की, “संग्रहालयातील सर्वात नावडती व्यक्ती कोण?” त्या मतदानात युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन दुसऱ्या क्रमांकावर आला होता, अर्थातच पहिला क्रमांक होता अडॉल्फ हिटलरचा! (आपल्याकडील काहींना याची मोठी भुरळ पडलेली असते! असो) त्या काळात ब्रिटनमधील वृत्तपत्रांत अमीनच्या क्रूर कृत्यांच्या कथांचे रकाने गच्च भरलेले असत. त्यातील काही गोष्टी खर्‍या होत्या, जसे की तो खरंच हजारो लोकांचा खुनी होता. पण काही वदंता होत्या जसे की, त्याने आपल्या फ्रीजमध्ये शत्रूंची मानवी डोकी ठेवली होती, काहींच्या मते ही गोष्ट खरी होती. तो नरभक्षक होता. कोवळी मुले आणि शत्रू त्याचे भक्ष असत. तो भोगी होता आणि अय्याश होता!

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

थिरुनल्लूर करुणाकरण यांच्या कविता आणि अष्टमुडी तलाव!..


अष्टमुडी तलाव हा केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील एक नयनरम्य नि महत्त्वाचा तलाव, अद्भुत नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध. 'केरळचे प्रवेशद्वार' या नावाने ख्यातनाम! बालकवींच्या कवितेत जसा विशिष्ट भूप्रदेश सातत्याने डोकावतो तद्वत हा अष्टमुडी तलाव थिरुनल्लूर करुणाकरण या विख्यात मल्याळम कवीच्या कवितेत अनेकदा नजरेस पडतो.

बालकवींच्या औदुंबर कवितेत तलावाकाठचे नितळ औदासिन्य आहे, अगदी तसेच नसले तरीही त्याच्याशी आपली जातकुळी सांगणारी एक कविता थिरुनल्लू र करूणाकरण यांनी लिहिली आहे. 'निळासांवळा झरा
वाहतो बेटाबेटातुन, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे. हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे. ... पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर..' या पंक्ती बालकवींच्या कवितेतल्या.

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

मिगेल टोर्ग - देशोदेशीचे मोर्गाडो!


मिगेल टोर्ग हे पोर्तुगाल मधले महत्वाचे आणि जागतिक ख्यातीचे लेखक. त्यांचं साहित्य जगभरात वाचलं जातं. 1940 साली प्रकाशित झालेला बिशोस (Bichos) हा त्यांचा गाजलेला लघुकथासंग्रह. यात वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या चौदा कथा आहेत.

या सर्व कथा प्राणीविश्वाशी निगडित आहेत. प्राण्यांचे सहजीवन आणि त्यांच्या वाट्याला आलेले मनुष्य अशी मांडणी काही कथांत आहे. 'मोर्गाडो' ही कथा यापैकीच एक आहे. ही एका खेचराची काहीशी करुण आणि नर्मविनोदी कथा आहे.

मोर्गाडो हा, घोडा आणि गाढव यांच्या संकरापासून तयार झालेला खेचर. पोर्तुगालच्या ट्रास-ओस-मॉंटेसमधील एका श्रीमंत शेतकऱ्याच्या घरी तो वाढलाय. त्याच्या प्रथमपुरुषी निवेदनातून कथा समोर येते, ज्यात तो आपल्या जीवनाचा अर्थ, मालकाशी असलेले नाते आणि निष्ठुर मृत्यूची अटळ गोष्ट यांचा विचार मांडतो.

गुरुवार, १० जुलै, २०२५

पिंजरा आणि बाईच्या कथा


गणेश मुळे यांनी लिहिलेल्या 'पिंजरा आणि बाईच्या' कथा हा कथासंग्रह वाचला.
या संदर्भात काही निरीक्षणे नोंदवावी वाटली.

आधी नकारात्मक बाबी -
यात सहा कथा आहेत. पहिल्या तीन कथा अर्धवट वाटतात. उर्वरित तीन कथांची बांधणी गोटीबंद साच्यातली नाहीये त्यामुळे त्या पकड घेत नाहीत.

लेखकाला काय सांगायचे आहे हेच नेमके स्पष्ट होत नाही त्यामुळे वाचक संभ्रमात पडू शकतो.

सर्व कथांमध्ये काही साम्यस्थळे आहेत - लैंगिक उपासमार झालेल्या स्त्रियांची पात्रे आहेत. नवऱ्याला सोडून देणाऱ्या स्त्रिया आहेत. घटस्फोटीत स्त्रियांच्या कथा आहेत. पुरुषाच्या तालावर नाचण्याची इच्छा नसलेल्या स्त्रिया सर्व कथांमध्ये आहेत. मात्र या पात्रांची उभारणी संतोषजनक नाही. अशा स्त्रिया कमालीच्या कणखर असतात, टक्कर देण्यास सज्ज असतात तो निश्चयी निर्धार बाणा अभावाने दिसतो.
स्त्रियांची मुख्य पात्रे गोंधळलेली वाटतात.

मंगळवार, ८ जुलै, २०२५

बदनाम गल्ल्यातले सच्चेपण – सैली 13 सप्टेंबर!



श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेला 'सैली 13' सप्टेंबर हे आत्मकथनपर कथासंग्रह त्या काळातला आहे ज्या काळामध्ये मराठी जनमानसात सोवळे ओवळे पाळले जात होते इतकेच नव्हे तर साहित्य प्रवाहात देखील अशा प्रकारचे अंडर करंट अस्तित्वात होते. अपवाद दलित साहित्याचा! मराठी साहित्यातील शहरी / नागर आणि ग्रामीण या वर्गवारीपैकी कथित शहरी साहित्यामध्ये जे विविध आशय विषय हाताळले गेलेत त्यातही काही घटक बऱ्यापैकी अस्पृश्यच राहिलेत. अर्थात यातही काही तुरळक सन्माननीय अपवाद होते. मराठी साहित्यामध्ये ज्याप्रमाणे विज्ञान कथा, मनोविश्लेषणात्मक कथा, निढळ लैंगिक कथा, वैश्विक वैचारिक समाजपट असणारे वाङ्मय तुलनेने कमी निर्मिले गेलेय, त्याचप्रमाणे काही विशिष्ठ वंचित शोषित घटकांचा अंतर्भाव असणारे सामाजिक साहित्यही कमी लिहिले गेलेय. त्यातलाच एक घटक वेश्या होय. वेश्या आणि वेश्यावस्ती यावर ज्ञात मराठी साहित्यातले आजवरचे सर्वाधिक भेदक, परिणामकारक लेखन नामदेव ढसाळांनी केलेय हे सर्वश्रुत आहे. अन्य काहींच्या लेखनामध्ये याविषयी कधी तुरळक तर कधी दीर्घ उल्लेख आहेत. देहविक्री करणाऱ्या पुरुषांचा कथावकाश मराठी साहित्यात येण्यासाठी तर 2019 चे साल उजाडावे लागलेय. डॉ. माधवी खरात यांच्या 'जिगोलो' या कादंबरीने ती उणीव भरुन काढली.

बुधवार, ११ जून, २०२५

कलावंतांच्या गहिऱ्या प्रेमाचे सच्चे उदाहरण!


काही गोष्टी हिंदी सिनेमांतच शोभून दिसतात मात्र काही खऱ्याखुऱ्या गोष्टी अशाही असतात की सिनेमाने देखील तोंडात बोटे घालावीत. ही गोष्ट अशाच एका युगुलाची. आपल्याकडे कला क्षेत्रातील प्रेमाचे दाखले देताना नेहमीच अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या प्लेटॉनिक नात्याचा उल्लेख केला जातो. कदाचित हिंदी आणि पंजाबीचे उत्तरेकडील वर्चस्व याला कारणीभूत असावे. खरेतर असेच एक उदाहरण आसामी कलाक्षेत्रातलेही आहे, मात्र त्याचा फारसा उल्लेख कुठे आढळत नाही. गोष्ट आहे एका ख्यातनाम चित्रकाराची आणि एका विलक्षण गोड गळ्याच्या गायिकेची. नील पवन बरुआ हा एका युगाचा कुंचल्याचा श्रेष्ठ जादूगार आणि दीपाली बोरठाकूर, ही आसामची गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध!

शुक्रवार, १६ मे, २०२५

लेट नाइट मुंबई ..

'लेट नाइट मुंबई'चे मुखपृष्ठ 

लेखक प्रवीण धोपट यांच्या 'लेट नाइट मुंबई' या देखण्या आणि आगळ्यावेगळ्या विषयाच्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाही नेमकी आहे - "सूर्य मावळल्यानंतर ज्यांचा दिवस उजाडतो त्या प्रत्येकाला...."
या देखण्या पुस्तकातले हरेक पान याला अनुसरूनच आहे हे विशेष होय! मुंबई शहराविषयी आजवर विविध भाषांमधून पुष्कळ लेखन केलं गेलंय, मुंबईच्या भौगोलिक महत्वापासून ते इतिहासापर्यंत आणि राजकीय वजनापासून ते मायानगरीपर्यंत भिन्न बिंदूंना केंद्रस्थानी ठेवून हे लेखन संपन्न झालेय. मुंबईविषयी एक आकर्षण देशभरातील सर्व लोकांना आहे, इथल्या माणसांची ओळख बनून राहिलेल्या मुंबईकर स्पिरीटवर सारेच फिदा असतात. मुंबईची आपली एक बंबईया भाषा आहे जी मराठी तर आहेच आहे मात्र हिंग्लिशदेखील आहे! मुंबईच्या बॉलीवूडी स्टारडमपासून ते धारावीच्या विशालकाय बकालतेविषयी सर्वांना जिज्ञासा असते. इथल्या डब्यावाल्यांपासून ते अब्जाधिश अंबानींच्या अँटॅलिया निवासस्थानापर्यंत अनेक गोष्टींचे लोकांना कुतूहल असते. स्वप्ननगरीचा स्वॅग असो की मंत्रालयाचा दबदबा, दलालस्ट्रीटची पॉवर असो की गेट वे ऑफ इंडियाचा भारदस्त लुक चर्चा तर होतच राहणार! अशा सहस्रावधी अंगांनी सजलेल्या, नटलेल्या मुंबईच्या रात्रींची शब्दचित्रे प्रवीण धोपट यांनी चितारलीत. यात रात्रीची मुंबई कैद झालीय असे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटेल मात्र वास्तव काहीसे तसेच आहे. फुटपाथच्या कडेला तसेच फ्लायओव्हरखालच्या अंधारल्या जागी पडून असणारी जिवंत कलेवरे यात आहेत आणि लखलखीत उजेडात न्हाऊन निघालेलं नाइट लाईफही यात आहे. मुंबईवर प्रेम असणाऱ्यांना हे आवडेल आणि ज्यांना रात्रीच्या मुंबईचं रूप ठाऊक नाही त्यांनाही हे पुस्तक आवडेल.

गुरुवार, १५ मे, २०२५

गुलमोहर आणि डियर बाओबाब – वेध एका रंजक गोष्टीचा!

डियर बाओबाबचे मुखपृष्ठ   

आईवडिलांपासून, मायभूमीपासून दुरावलेल्या एका मुलाची आणि एका निहायत देखण्या झाडाची ही गोष्ट..
गुलमोहराला बंगाली, आसामीमध्ये कृष्णचुर म्हटले जाते! कृष्णाच्या मस्तकावरचा मुकुट या अर्थाने हे नाव आहे. तर उडीयामध्ये नयनबाण असं नाव आहे. इंग्लिशमध्ये याची पुष्कळ नावे आहेत, त्यातले mayflower नाव सार्थ आहे. तीव्र उन्हाने बाकी सगळी फुले अवघ्या काही दिवसांत तासांत कोमेजून जात असताना ऐन वैशाखात, लालबुंद गुलमोहोर अक्षरशः दहा दिशांनी बहरून येतो!

बुधवार, ७ मे, २०२५

'बांगलादेश ए ब्रूटल बर्थ' आणि व्हायरल फोटोचे सत्य!

हेच ते छायाचित्र ज्याच्या आधारे खोटी द्वेषमूलक माहिती पसरवली जात आहे.

सोबतच्या छायाचित्राचा वापर अत्यंत बेमालूमपणे द्वेष पसरवण्यासाठी होत असल्याने त्यातले सत्य समोर आणण्यासाठीची ही ब्लॉगपोस्ट!

याची सत्यता जाणून घेण्यासाठी थोडी पार्श्वभूमी जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. हे छायाचित्र ज्यांनी काढले आहे ते किशोर पारेख हे भारतीय छायाचित्रकार होते. त्यांचा जन्म गुजरातमधील भावनगरचा. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी चित्रपट निर्मिती आणि माहितीपट छायाचित्रणाचे शिक्षण घेतलेलं. विद्यार्थीदशेत केलेल्या प्रोजेक्टमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 1960 ला ते भारतात परतले आणि हिंदुस्तान टाईम्सचे मुख्य छायाचित्रकार बनले. तिथं काम करताना त्यांनी 1962 च्या भारत-चीन युद्धाचे आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान संघर्षाचे वार्तांकन केले. युद्धाच्या समाप्तीच्या वेळी झालेल्या ताश्कंद शिखर परिषदेच्या वार्तांकनासाठी त्यांना तत्कालीन सोव्हिएत लँडने सुवर्णपदक प्रदान केले. त्यांनी 1966 - 1967 च्या बिहारमधील दुष्काळाचे टोकदार कव्हरेज केले. या विषयावरील त्यांच्या छायाचित्रांचे अमेरिकेत प्रदर्शन भरवण्यात आलेलं.

सोमवार, ५ मे, २०२५

गुनाहों का देवता – त्यागाच्या मर्यादा सांगणारी गोष्ट..




त्याग करावा, मात्र त्याचा अतिरेक करू नये. काहींचा त्याग इतका मोठा असतो की त्यांचे अस्तित्व मिटून जाते. त्या त्यागाचीही किंमत राहत नाही आणि त्यांचे मूल्य तर त्यांनी स्वतःच गमावलेले असते. परिचयातील एका महिलेचे काही दिवसांपूर्वी युपीमधील वृंदावन इथे निधन झाल्याचं तिच्या घरच्या लोकांना आठवड्यापूर्वी कळलं. मला मात्र आज समजलं. तिच्या घरी तिची आठवण काढणारं मायेचं माणूस देवाघरी जाऊन तीन दशके लोटलीत. तिच्या असण्या नसण्याने कुणालाच काही फरक पडला नाही हे वास्तव आहे. त्यामुळे, ती गेली इतकाच त्रोटक निरोप मिळाला. एकांतातलं अतिशय रुक्ष मरण तिच्या वाट्याला आलं आणि तिच्या जाण्याचा तितकाच रुक्ष निरोप मिळाला. जीव हळहळला. तिच्या जाण्याने मला चंदर आठवला.