प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्पार्किंग पॉईंट येतो जिथे त्याचे आयुष्य बदलते. तुलसीदास रामभक्त होते मात्र त्यांनी आपले जीवन रामाला समर्पित केलेले नव्हते. मात्र त्यांच्या आयुष्यात एक प्रसंग असा घडला की, त्यांच्या मनात थेट वैराग्य भावनाच जागृत झाली आणि त्यांनी आपले जीवन प्रभू रामचंद्रांना समर्पित केले.
रत्नावली ही तुलसीदासांची पत्नी. अतिशय रूपवान आणि बुद्धिमान स्त्री! तुलसीदास आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करत. एकदा रत्नावली आपल्या भावासोबत माहेरी गेली. तुलसीदास पत्नीच्या विरहाने व्याकुळ झाले. ते भर पावसात, रात्रीच्या वेळी, उफाणणाऱ्या यमुना नदीला ओलांडून गेले. नदी ओलांडण्यासाठी त्यांनी नदीत सोडलेल्या एका प्रेताचा वापर लाकूड म्हणून केला. त्यावर बसून हातांनी पाणी वल्हवत ते सासरी पोहोचले.

















