गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

रेड लाईट डायरीज - सेक्सवर्कर्सचे रॅकेट...


वेश्याव्यवसाय हा जगभरात चालणारा व्यवसाय आहे. त्याचे जागतिक स्वरूपदेखील प्राचीन पार्श्वभूमीचे आहे, त्याला प्रदीर्घ इतिहास आहे. आपल्या देशातील सर्व राज्यात हा व्यवसाय आढळतो. पूर्वीच्या काळी मेट्रो सिटीजसह केवळ मोठ्या शहरांत एका वस्तीत, वसाहतीत वा इमारतीत वेश्याव्यवसाय चाले. हे लोण नंतर सर्वत्र पसरत गेले. महानगरे जसजशी मोठी होऊ लागली त्यांचा पसारा वाढू लागला तसतसे यांचे स्थित्यंतर होऊ लागले. आजघडीला देशातील महानगरांना जोडणाऱ्या हायवेंवर याचा मोठा प्रसार आढळतो. ढाबे, हॉटेल्स, लॉजेस, पत्र्याची शेड्स यात हे लोक आसरा घेतात. सर्व मोठ्या शहरांत एखाद्या गल्लीत, तालुक्यांच्या ठिकाणी एखाद्या इमारतीत, पंचक्रोशीतल्या एखाद्या तालेवार गावात एखाद्या खोपटात हा व्यवसाय चालतो. ट्रकचालकासारख्या वाहत्या ग्राहकांसोबत फिरता व्यवसाय करण्याचा प्रवाहही आजकाल आढळून येतोय. पूर्वी एखाद्या वस्तीत मर्यादित असणाऱ्या या लोकांकडून छोट्यामोठ्या शहरात एखाद्या अपार्टमेंटमध्ये एक दोन सदनिका भाड्याने घेऊन त्यात कुंटणखाना चालवण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले आहे. गर्दीची सार्वजनिक ठिकाणे एसटी स्थानक, बस स्थानक, रेल्वे स्थानक, सिनेमा थियेटर्स, बागा, अद्ययावत हॉटेल्सचे पार्कींग स्लॉटस अशा ठिकाणी हे मुक्त वा छुप्या पद्धतीने वावरत असतात. स्पा, मसाज सेंटर्सच्या नावाखालीही हा व्यवसाय करण्याचे प्रमाण जाणवण्याइतके वाढलेले आहे. तसेच ग्रामीण भागातही छुप्या पद्धतीने याला उधाण आलेले आहे. एका आकडेवारीनुसार देशभरात उघड पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या सेक्सवर्कर्सची संख्या पन्नास लाखाइतकी आहे, आणि छुप्या पद्धतीने काम करणाऱ्यांची संख्या याहून अधिक आहे. या व्यवसायासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात मुली, बायका कोण आणि कुठून पुरवतं याची माहिती वेधक वाटू शकते पण ती खऱ्या अर्थाने धक्कादायक असूनही त्याची तीळमात्र दखल घेतली जात नाही.

वेश्याव्यवसायात येणारया स्त्रियांची विभागणी प्रामुख्याने दोन गटात होते, एक म्हणजे स्वेछेने यात सामील होणाऱ्या स्त्रिया आणि दुसरे म्हणजे बळजबरीने ढकलल्या जाणाऱ्या स्त्रिया. एकूण संख्यासूत्रात जवळपास ९५ % इतक्या मोठ्या प्रमाणात अनिच्छेने यात ओढल्या गेलेल्या महिला असतात तर केवळ ५ % महिला स्वेच्छेने यात आलेल्या असतात. स्वेच्छेने आलेल्या महिलांपैकी ९० % महिला त्यांचे जगण्याचे सर्व मार्ग खुंटल्यावर हा मार्ग स्वीकारतात तर केवळ इझी मनी या हेतूने आलेल्या पाच टक्के प्रमाणात असतात. स्वेच्छेने आलेल्या महिलांपैकी साठ ते सत्तर टक्के महिलांना जेमेतेम पाचेक वर्षात या व्यवसायातून बाहेर पडावेसे वाटते पण दुर्दैवाने त्यांचे बाहेर पडण्याचे दरवाजे त्यांनीच बंद केलेले असतात त्यामुळे नंतर हतबलता म्हणून त्या या व्यवसायात राहतात. इझीमनी म्हणून यात आलेल्या महिलांचे तारुण्य ओसरल्यानंतरचे दिवस इतर वेश्यांच्या मानाने अतिशय हलाखीचे जातात असं अनुभव सांगतो. केवळ पैसा हे उद्दिष्ट ठेवल्याने त्यांच्या संकटसमयी इथली अन्य स्त्री त्यांना कधीच मदतीचा हात देत नाही. त्यांचे ग्राहक देखील त्यांच्या पैसाप्रेमी स्वभावाने बेजार होऊन जातात. ज्या स्त्रिया बळजोरीने आलेल्या असतात त्या एकमेकींच्या आधाराने जगतात, एकमेकासाठी त्या देवाचे रूप असतात. कुंटणखान्यातील भिंतीवरल्या देवांच्या तसबिरी त्यांना कधी आपल्याशा वाटत नाहीत मात्र आपल्या घासातला घास देणारी वेळप्रसंगी दवादारूला मदत करणारी सख्खी शेजारीणच त्यांची देवता असते.

वेश्याव्यवसायात दाखल होण्याचेही काही ठराविक वय असते. चाळीशीनंतर कुणी बाई यात येत नाही आणि जरी कुणी आलीच तरी ती टिकत नाही, तिच्या अंगांचे पोपडे उडून गेले तरी तिच्या कातड्याचे बोचकारे सरत नाहीत कारण इथल्या रितीभातीपासून ती अनभिज्ञ असते. मागील दोन दशकाआधी नुकत्याच वयात आलेल्या किंवा येऊ घातलेल्या मुली यात आणायच्या म्हणजे मोठी रिस्क समजली जायची कारण बालअत्याचार प्रतिबंधक कायद्याची भीती असायची. त्यामानाने सोळा अठरा वर्षाच्या पुढील वयोगटातील मुली आणण्याकडे जास्ती कल असे. साधारण चौदा ते अठरा वर्षे, एकोणीस ते चोवीस वर्षे, पंचवीस ते तीस वर्षे आणि तीस ते छत्तीस वर्षे अशा चार वयोगटातील स्त्रिया असत. एकोणीस ते चोवीस या वयोगटासाठी डिमांड जास्त राही. त्या खालोखाल चौदा ते अठरा, नि त्या नंतर पंचवीस ते तीस वयोगटाला भाव असे.

वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या ठिकाणांना प्रत्येक राज्यात वेगवेगळे शब्द आहेत, आपल्याकडे त्याला कुंटणखाना असे संबोधले जाते. हा कुंटणखाना बहुतांश करून एखादी स्त्रीच चालवत असते. तिचा एक रखेल पुरुष असतो जो धंद्यात लक्ष घालून असतो. कुंटणखान्यात सर्व वयोगटाच्या बायका मागणीनुसार अव्हेलेबल असाव्यात याकडे तिचे लक्ष असते. एका अड्ड्यातून दुसऱ्या अड्ड्यात बायकांची फिरवाफिरवी वा बदली करून देणारे दलाल या बायकांच्या संपर्कात असतात. एकच बाई एका कुंटणखान्यात वर्षानुवर्षे ठेवली जात नाही. तिची मागणी कमी झाली वा तिच्याकडे आकृष्ठ होण्याचे प्रमाण घटले की तिला तिथून उचलून दुसरीकडे नेले जाते. बऱ्याचदा हा मामला त्या शहरातच वा आसपासच्या परिसरात आटोपला जातो. तिथूनही काही काळानंतर शहर बदलून तर कधी कधी राज्य बदलून या बायका पोहोच केल्या जातात. हे काम योजनाबद्ध पद्धतीने चालते. बऱ्याचदा दहा किंवा त्याहून अधिक बायकांची अदलाबदली होते, खाजगी वाहनातून हे स्थलांतर पार पाडले जाते. जी बाई नेली आणली जाते त्या बाईकडून, तसेच जिथून तिला आणले जाते त्या कुंटणखान्याच्या मालकिणीकडून व जिथे तिला पोहोच केले जाते तिथल्या कुंटणखान्याच्या मालकिणीकडूनही या दलालांना पैसे भेटतात. पण ही रक्कम फार मोठी नसते. सर्वसाधारणपणे प्रवासाचे अंतर, नेण्याआणण्याचा खर्च, जेवण याची सरासरी काढून त्या रकमेची विभागणी करून प्रत्येक बाईपोटी त्या दलालास हजारएक रुपये मिळतात. हे काम आजकाल बायकांमार्फतही केले जाते. धंद्यातील जुनी स्त्री यातल्या सर्व खाचाखोचा जाणून घेऊन हा उद्योग चालू ठेवते. या दलालांच्या वर्तुळाहून मोठे वर्तुळ असते ते मुली पुरवणाऱ्या दलालांचे.

ग्रामीण आणि शहरी भागातून आणलेल्या मुलींची वर्गवारी वेगवेगळी असते. त्यासाठीचे कष्ट आणि अडचणीही वेगवेगळ्या असतात. ग्रामीण भागातल्या मुली आणणारी यंत्रणा तीन स्तरांवर काम करते. यातला पहिला स्तर असतो तो स्थानिक लोकांचा. या लोकांत वयाने ज्येष्ठ असणारे लोक जास्ती असतात कारण त्यांच्या बोलण्याला समोरचा माणूस वयाच्या वजनाने दबून जात भुलून जातो. गावातल्या यात्रा जत्रात, उरुसात, मोठाल्या लग्नसमारंभात, सणवारात, उत्सवात हे लोक ‘लक्ष्या’वर ध्यान ठेवून असतात. गावातील गरीब घरे, एकाच घरात अनेक अपत्ये असलेली कुटुंबे, उदरनिर्वाह नसल्यामुळे उपासमार होणारी कुटुंबे यांच्या रडारवर असतात. तारुण्यसुलभ भावनांच्या अनिवारतेमुळे पाऊल वाकडे पडल्याने बदनाम झालेल्या मुलींची घरे, लग्न न जमणाऱ्या मुलींची कुटुंबे, एखादी अत्यंत उफाडयाच्या अंगांची ठेवण असणारी मुलगी ज्यांच्या घरी आहे अशी घरे, पतीचे वा घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने रस्त्यावर आलेले कुटुंब, व्यसनाधीन कुटुंबातील कलहसमस्यांना त्रासलेली कुटुंबे यावर त्यांचे विशेष लक्ष असते. आर्थिक आमिष दाखवून, नोकरीचे वा लग्नाचे आमिष दाखवून अत्यंत नगण्य रकमेत या मुलींच्या घराच्या लोकांना पटवले जाते. आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या लोकांना हे यमदूत चक्क देवदूत वाटतात ! बऱ्याचदा नातलगही अशा लोकांच्या संपर्कात असतात. सावत्र आई,सावत्र वडील, सावत्र मामा किंवा सांभाळ करणारे दूरचे नातलग यांचा यात भरणा होतो.

एकदा का बायका पक्क्या झाल्या की दुसऱ्या स्तरांतील दलालास त्याची माहिती दिली जाते. हे काम करणाऱ्यात दुर्दैवाने स्त्रिया पुरुषांच्या इतक्या समप्रमाणात आढळून येतात. वाईट चालीची बाई, स्वतः असा व्यवसाय करणारी स्त्री किंवा केवळ पैशाच्या लोभाने हे काम करणारी बाई यात गुंतलेल्या दिसतात. हे काम करणारे पुरुष मोस्टली मध्यमवयीन वा तरुण असतात. कोणकोणत्या गावातून किती सावज हाती लागतील याचे तेज आडाखे यांच्याकडे असतात, तसेच खालच्या स्थानिक दलालास किती हिस्सा द्यायचा याचे मार्मिक गणित यांना पक्के जमते. आपल्याला किती दलाली ठेवून मुली किती रकमेस पुढे सारायच्या याचे त्यांना नेमके ज्ञान असते. हे दलाल चलाखीने स्वतःची आपल्या खालच्या स्थानिक दलालांची सेफ्टी राखतात, एखाद्या रेडमध्ये सेक्सवर्कर्सचे रॅकेट पकडले गेले तरी या टप्प्यातले लोक सहसा हाती लागत नाहीत. आपण गोळा केलेल्या मुली कुठे पोहोच केल्या म्हणजे आपल्याला जोखीम येणार नाही आणि पैसाही मुबलक येईल याचा अंदाज बांधून ते सप्लायवाल्या मुख्य दलालांना संपर्क करतात. मुलींच्या रॅकेटमधला हा सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक. हे लोक एखाद्या चेनसारखे काम करतात. यांना डिमांड माहिती असते आणि सप्लाय कुठून येणार आणि कसा येणार याची नेमकी माहिती असते. एक प्रकारचे हे प्लेसमेंट सेंटर हे लोक चालवतात. ‘कोऱ्या माला’ची बोली ठरवण्यात यांचा हातखंडा कुणी धरत नाही. प्रौढत्वाकडे झुकलेल्या बाईला कुठे पैसे येऊ शकतात याच्या परफेक्ट टिप्स यांच्याकडे असतात. त्या त्या शहरातील स्थानिक राजकारणी आणि पोलीस यांच्याशी यांचे लागेबांधे असतातच.

गावातून निघालेल्या मुली सहसा एकल वाहनातून कधीच आणल्या जात नाहीत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच जास्त सोयीस्कर आणि उपयुक्त ठरते. या मुली आणताना त्यांच्यासोबत एक तरुण आणि किमान एक प्रौढ पुरुष हा असतोच. मागील काही वर्षात मात्र एस्कॉर्टचे काम करणाऱ्यात स्त्रियाही आढळत आहेत. वाटेत त्या मुलींवर देखरेख ठेवून त्यांना खाऊपिऊ घालून कपडालत्ता देऊन त्यांना इच्छित स्थळी आणले जाते. इथे आणल्यानंतर त्यांनी गोंधळ घालू नये म्हणून व बिंग फुटू नये म्हणून काही खास लोक काम करत असतात. त्या नंतर त्या मुलींचा ठरलेला सौदा रोखीने पार पडतो. कोणतीही मुलगी पोहोच होण्याआधी निम्मी रक्कम पहिल्या दलालाला खालच्या दलालास द्यावी लागते. तिथून ती स्थानिक दलालाकडे जाते त्यातलाच काही हिस्सा मुलीच्या नातलगांना दिला जातो. मुली आणल्या की त्यांना कसे धंद्याला लावायचे याची तिथल्या बायकांना चांगली समज असते.

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातून वेश्याव्यवसायात मुली आणणं त्या मानाने रिस्की असते. या मुलीना गळाला लावणेही कठीण असते. आर्थिक दृष्ट्या नाडलेल्या मुली शोधत फिरावे लागते. प्रामुख्याने बकाल वस्त्या, अक्राळ विक्राळ झोपडपट्ट्या, गलिच्छ वस्त्या यावर नजर ठेवली जाते. अशा ठिकाणच्या लोकवस्तीत आई वडीलांपैकी कुणी मरण पावलेले असल्यास त्या घरातली मुलगी सावज म्हणून हेरली जाते. नोकरी सुटलेले, कर्जबाजारी झालेले, व्यवसायात तोटा झालेले – दिवाळखोरीत गेलेले लोक घरचे मुख्य पुरुष असतील आणि घरात खाणारी तोंडे जास्त असतील, घरात सावत्र नाती असतील तर तिथली मुलगी लवकर निशाण्यावर येते. अशा मुलींच्या पालकांना दलाल बरोबर गाठतात, त्यांना बरोबर पट्टी पाडतात. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी ती मुलगी जाणीवपूर्वक हरवली जाते आणि दलालांच्या सेफ हातात ती अलगद पडते. मग दाम चुकते केले जातात. दलाल आपले दाम कुंटणखान्याच्या मालकिणीकडून वसूल करून घेतात. या मुली सुरुवातीला राज्य बदलून ठेवल्या जातात. म्हणजे दक्षिणेकडील राज्यातील मुली मध्य व पश्चिम भारतात तर उत्तरपूर्वेकडील मुली उत्तरेत पाठवल्या जातात, उत्तरेकडच्या मुली दक्षिण व मध्य पश्चिम भारतात पाठवल्या जातात. शक्यतो त्या मुलीची मातृभाषा असणाऱ्या राज्यात तिला ठेवलं जात नाही. पण एकदा का धंदा अंगवळणी पडला की त्यांना कुठल्याही राज्यात अदलाबदलीद्वारे किंवा पुन्हा एकदा विकलं जातं. कधी कधी पैसे वसूल करून देणाऱ्या मुली आपल्या मर्जीने हव्या त्या शहरात हव्या त्या गुत्त्यात जातात.

नातलगांच्या मार्फत धंद्यात आणल्या जाणारया या शहरी मुलींना आणखी वेगवेगळ्या पद्धतीने जाळ्यात ओढलं जातं. घरातून पळून आलेल्या मुलींना अलगद पकडून त्यांना वाममार्गी लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काही प्रकरणात तर हे दलाल लोकं निम्न मध्यमवर्गीय वा कनिष्ट वर्गीय वस्तीतल्या व खालच्या स्तराचा शैक्षणिक दर्जा असणाऱ्या शाळांपर्यंत आपलं जाळं विणतात. अस्थिर चंचल, मिरवून घेण्याची हौस असणाऱ्या, अभ्यासाचा कंटाळा असणाऱ्या, घरातल्या लोकांचं न ऐकणाऱ्या, बेफिकीरपणा अंगी भिनलेल्या मुलींची माहिती काढली जाते. शाळेतील शिपाई वा तत्सम चाकरमान्या माणूस ही माहिती देण्यासाठी पुरेसा असतो. अवघ्या काहीशे रुपयात हे काम होतं. या मुलींना मैत्रिणींसह पळून जाण्यासाठी फूस लावली जाते. चार ते दहा असा मुलींचा गट करून त्यांना बरोबर रगडलं जातं. आपल्याला फसवले गेलेय हे लक्षात आल्यावर यातल्या काही मुली अर्ध्यातून परत फिरून आपली सुटकाही करून घेतात पण हे प्रमाण कमी आहे. रेल्वेस्थानके, बसस्थानके, सार्वजनिक इस्पितळे, भाजी मंडया, बाजारपेठा अशा ठिकाणी रस्ते चुकलेल्या लहान मुलीदेखील या लोकांच्या हातून सुटत नाहीत. लहान मुलींची नथ उतरलेली नसल्याने अलीकडच्या काळात तरुण मुलींच्या इतकाच मोबदला दिला जातो. सार्वजनिक उत्सव, मिरवणुका, सणांचे सोहळे या कालावधीत ही देवाण घेवाण मोठ्या प्रमाणावर होते. अल्पशिक्षित मुली नव्या जागेत लगेच ध्यानी येतात त्यांना नानाविध आमिषे दाखवून एकदा पंजात चिणले की त्यांचे पुढचे सगळे रस्ते बंद होतात.

हे रॅकेट चालवणारे दलाल त्या त्या भागातील बोलीभाषा बोलण्यात प्रवीण असतात. दिसायला बरे व्यक्तीमत्व असणारे आणि समोरच्या मुलींच्या गरजा ओळखून त्या प्रमाणे फासे फेकण्यात ते पटाईत असतात. ग्रामीण मुलींची वाहतूक ज्या प्रमाणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून केली जाते तसे या मुलींचे नसते. हे दलाल स्वतंत्र वाहन व्यवस्था करून ने आण करतात. मुलींना खाण्यातून गुंगी येणारे खाद्यपदार्थ देणं हा यांचा हुकमी फंडा असतो. क्वचित प्रसंगी त्यांना भीती दाखवली जाते. पण सावज पूर्ण कब्जात येईपर्यंत धाकधपडशा टाळला जातो. या रॅकेटमधला स्त्रियांचा सहभाग की रोलचे काम करतो. मुलींना विश्वासात घेण्याचे अवघड काम त्या लीलया पार पाडतात. अगदीच नगण्य उत्पन असणाऱ्या मुलींच्या बाबतीत आणखी एक चाल खेळली जाते. मुली धंद्यात आणल्यापासून काही दिवसात त्यांच्या पालकांना धंद्याच्या ठिकाणी बोलवून त्यांची गाठभेट घालून दिली जाते, यावेळी पैशाचे लालूच दाखवले जाते. ती मुलगी घरादारासाठी आयुष्यभर जळायला तयार होते. सख्खे सावत्र आईवडील वा जे कोणी नातलग असतील ते आधी तिचे पाय धरतात. पण जसजशी ती मुलगी धंद्यात मुरत जाते तिला सगळ्यांचा उबग येऊ लागतो. ती पैसे पाठवत राहते पण रक्ताच्या नातलगांना आपली दारं कायमची बंद करते. या स्टेजला आलेल्या मुलीचे मतपरिवर्तन करणं खूप कठीण जातं. या मुली धंदा सोडायला नकार देतात, नंतर त्या व्यसनाधीन होतात. स्वतःच्या आयुष्याचं वाटोळे करताना देहाची धूळधाण करून घेतात. या मुलींचा हा रीजीड दृष्टीकोन स्वतःवर आणि जगावर सूड उगवण्याच्या हेतूतून स्फुरलेला असतो.

शहरी वातावरणात वाढलेली मुलगी वयाच्या कोणत्या टप्प्यावर वेश्याव्यवसायात धंद्यात येते त्यावर तिचे भवितव्य ठरते. नव्वदच्या दशकानंतर बालवयातील मुली धंद्यात आणण्याचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढलेले आहे कारण त्यांना मोबदला कमी द्यावा लागतो पण त्यांच्यावर पैसा भरपूर मिळतो. बालपणी धंद्यात आलेल्या मुली बऱ्याच वर्षे धंदा करत राहतात त्यामुळे त्यांच्यापासून जास्ती फायदा होतो. शिवाय मोबाईलचा आणि पॉर्नचा अतिरेक वाढल्यापासून लहान मुलींसोबत सेक्स करण्याचे प्रमाण आश्चर्यकारक रित्या वाढत चालले आहे. एक काळ होता जेंव्हा प्रत्येक लहान मुलीला लोक आपली मुलगी समजत आणि प्रत्येक वयस्क स्त्रीमध्ये आपल्या आईस शोधत. आता तो काळ इतिहासजमा झाला आहे. आता सहा महिन्याच्या चिमूरडीपासून ते सत्तर वर्षाच्या आजीपर्यंतच्या स्त्रीवर लोकं बळजोरी करताना सर्रास आढळून येताहेत. हे वेगाने बदलत चाललेल्या विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. त्याचे प्रतिबिंब या धंद्यात न पडते तर नवल ठरते. उमर ढळलेल्या स्त्रियांना जशी इथे किंमत नसते तशीच दलालांच्या बाजारात तिशीच्या पुढच्या महिलेची मुल्यावस्था असते. चाळीशी पार केलेल्या बायकांसाठी एकाच जागी राहिल्यास एकदोन गिऱ्हाईक तरी त्यांचे कायमचे पक्के आशिक होतात हा एकच सकारात्मक बिंदू ठरतो. पण असं कुणी नशिबी लाभलं नाही तर या बायका अक्षरशः दलालांच्या हातापाया पडून सातत्याने जागा बदलत राहतात आणि नवनवीन जागी नवनवे गिऱ्हाईक जाळ्यात येते का याचा वेध घेत राहतात.

या मुलींच्या पलीकडचा गट म्हणजे विदेशी मुली. आपल्या देशात प्रामुख्याने बांग्लादेशी आणि नेपाळी मुली धंद्यात आढळतात. दक्षिणेकडील राज्यात अलीकडच्या काळात श्रीलंकन मुली दिसू लागल्यात तर कधी कधी सीमावर्ती उत्तर पश्चिम भारतात पाकिस्तानी मुली दिसतात. या व्यतिरिक्त देशातील सर्व मेट्रो शहरात युरोपियन, आफ्रिकन, दक्षिण अमेरिकन देशांतील मुलींसह मोठ्या संख्येने बाल्टिक नेशन्समधील मुली आढळून येतात. कझाकिस्तान, आर्मेनिया, झेक, अझरबैजान इथल्या मुली यात प्रामुख्याने आढळतात. कृष्णवर्णीय म्हणून गणल्या गेलेल्या नायजेरिया आणि केनिया या देशातील महिला देखील आपल्याकडे या व्यवसाय करताना आढळून येतात. काही महिन्याच्या टुरीस्ट व्हिसावर येऊन केवळ आपल्या तुकतुकीत चामडयाच्या जीवावर त्या लाखो रुपये कमावून आपल्या देशाला रवाना होतात. तर काही मुली चक्क स्टुडंट व्हिसावर आलेल्या असतात. चित्रपटसृष्टीमध्ये कोरस ग्रुप डान्ससाठी लागणाऱ्या विदेशी डान्सगर्ल्सदेखील यात सापडल्या आहेत. यांच्या दलालांचे रॅकेट अंतरराष्ट्रीय असते. मोठ्या शहरातील पंचतारांकित हॉटेलात हा गोरखधंदा अगदी जोमात चालत असतो. हॉटेल मालक यात सामील असतात पण वरकरणी ते तसं दाखवत नाहीत. वेबसाईट्स वा सोशल मिडीयाच्या सिक्रेट कोडमेसेजेसद्वारे ‘दर्दी’ लोकांपर्यंत नव्या दाखल होणाऱ्या मुलींची माहिती वेळोवेळी पुरवली जाते. विदेशी मुलींच्या धंद्यात कुंटणखाना हा प्रकार फक्त दिल्ली आणि कोलकत्यात चालतो. दिल्लीच्या जीबी रोडवरील कोठ्यात आणि कोलकात्याच्या सोनागाछीत यांचे वेगळे ठीय्ये आहेत. अन्य शहरात मात्र विदेशी महिलांचा धंदा पूर्णतः दलाल सांभाळत असतात. उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यात आजकाल पैसा पुरवण्याबरोबरच स्कीन करन्सी सप्लाय करण्याचा ट्रेंड खूप जोरात आहे. मोठ्या दिमतीचे राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटीज आणि मोकार पैशामुळे बिघडलेली मुले ही यांची गिऱ्हाईके असतात. व्यक्ती जितका उच्चपदस्थ तितका त्याला पुरवलेला ‘माल’ हाय लेव्हलचा असतो. यांचे पेमेंट दलालांना देशी चलनात केले जाते पण दलाल त्या मुलींना त्यांच्या देशातील चलन पुरवतात. यावरून लक्षात यावे की बेकायदेशीर विदेशी चलनाचे रॅकेट चालवणारे लोकही यात अप्रत्यक्षपणे सामील असतात.

शहरी मुलींना वा महिलांना या जाळ्यात ओढण्यासाठी अनेकदा प्रेम केल्याचे, लग्न करणार असल्याचे भासवले जाते. कधी कधी खोटे नाटे लग्नही लावले जाते. मुलीला काही दिवस इकडे तिकडे फिरवून आणून तिचा उपभोग घेऊन झाला की तिच्या नकळत तिचा सौदा केला जातो. मोबाईलवरून काढलेल्या क्लिप्सद्वारे ब्लॅकमेल करून त्यांना अनैतिक व्यवसाय करण्यास भाग पाडण्याचे प्रकार अलीकडच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात दिसुन आलेत. अश्लील क्लिप्सचा प्रकार घडला की मुली / महिला घरी सांगण्यास कचरतात याचा फायदा हे लोक उचलत असतात. यातून नैराश्य येऊन अनेकजणी आपला जीव देऊन बसतात पण हा मार्ग नव्हे. क्लिप्स काढून छळणाऱ्या लोकांची नावे मुलींनी आपल्या पालकांना विश्वासात घेऊन सांगितली तर पोलीस यंत्रणा त्यांना पकडू शकते आणि आणखी काही मुलींचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचू शकते. अशा घटनांत पोलीस यंत्रणेची ढिलाई संतापजनक असते हे ही नमूद करावेसे वाटते.

मूळ जागेवरून सावज गाठून आणणारे दलाल हे प्राथमिक दलाल असतात. हे क्वचित शेवटच्या स्पॉटपर्यंत जातात. यांच्याकडून मधल्या हस्तांतरण करणाऱ्या दलालाकडे मुली सोपवल्या जातात. बहुतांशी तोच त्यांना इच्छित स्थळी पोहोचवतो. कधी कधी तो त्यांना इच्छित शहरापर्यंत आणतो आणि कुठल्या बाईकडे कुणाला द्यायचे याची परफेक्ट टीप देणारे दलाल वेगळे असतात. हे तिसऱ्या टप्प्यातले दलाल असतात. जिथे धंदा चालतो थेट तिथेच यांचा वावर असतो. एखाद्याने बाई ठेवावी तसे यांना एखाद्या कुंटणखान्याच्या मालकिणीने ठेवलेले असते. कधी कधी त्यांचे नातेसंबंधही असतात. हे सगळे दलाल कायम सक्रिय असतात, वरवर ते स्लीपिंग मोडमध्ये वाटत असतात. यांच्या नजरेतून सावज सुटणे मुश्कील असते. कुंटणखाना चालवणारे लोक त्याकरिता सर्वात ताजा, टंच माल पुरवणाऱ्या दलालाला मोठा मोबदला देऊन संपर्कात राहतात. धंद्याच्या जागी येऊन काही महिने / वर्षे झाल्यावर तिची मागणी कमी होऊ लागते. अंगावरचे पैसे फिटलेले असले की या टप्प्यावरच्या बऱ्याच स्त्रिया धंदा सोडू इच्छितात. त्यातल्या काही जणी सोडतात देखील. तर काही जणी त्या लढाईत हरतात. मग अशा बायका नव्या ठिकाणी नेण्याचे किंवा त्यांच्या 'मालाला' नेमकी कुठे किंमत येईल याची टीप देण्याचे काम तिसऱ्या टप्प्यातले दलाल करत असतात.

या रॅकेटमधला अंतिम भाग असतो तो पाळलेल्या मवाल्यांचा. नवी मुलगी धंद्याला लावल्यावर ती सहजासहजी तयार होत नाही. पण साम, दाम, दंड भेद इथेही लागू होतो. काही जिद्दी मुली यालाही बधत नाहीत. तेंव्हा हे टगे मवाली गुंड कामी येतात. मुलींवर अनन्वित अत्याचार करून त्यांना धंदा करायला भाग पाडणे हे त्यांचे काम असते. विवस्त्रावस्थेत ठेवणे, उपासमार करणे, मारहाण करणे, चटके देणे, धुरी देणे, बांधून ठेवणे, एकाच वेळी अनेकांनी बळजोरी करणे असे प्रकार सर्रास चालतात. थकल्या भागल्या मुली शेवटी हार मानतात. दारूमटण आणि अवघ्या काही रुपयात हे काम करणारे मवाली प्रत्येक रेड लाईट एरियात सापडतात. तपास यंत्रणेस नव्या मुलीची टीप हवी मिळवायची असल्यास हे लोक फार कामी येतात. वेश्यांवर टाकलेल्या धाडीत दलाल पकडले जाण्याचे प्रमाण अत्यल्प असते पण हे मवाली पकडले जाण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते.
- समीर गायकवाड.

(क्रमशः)

( या व्यवसायात काम करणाऱ्या स्त्रियांची शारीरिक, मानसिक, सामाजिक परिस्थिती सर्वसामान्य माणसांना उमजावी व हा उपेक्षित घटक नेमका का व कसे जगतो याची त्रोटक माहिती लोकांना व्हावी हा या लेखमालेमागील हेतू आहे. समाजातील एक घटक एकीकडे यांचे शोषण करतो तर दुसरा मोठा घटक यांची उपेक्षा करत यांचा तिरस्कार करतो, यांची घृणा केली करतो याला अल्पसा तरी आळा बसावा हे लेखनप्रयोजन आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा