झाली सव सांज दिवा लावू कुठं कुठं
चिरेबंदी गोठयात नंदी आलेत मोठं मोठं..
या ओवीमध्ये खूप सुंदर भाव व्यक्त केले गेलेत. गावाकडच्या या सांजेची इतकी सवय होऊन गेलेली असते की संध्याकाळ होताच घरातल्या कर्त्या सुनेची, मुलीची पावलं देवघराकडे वळत. देवाला नमस्कार करून दिवाबत्ती लावली जाई. देवघरात निरंजन, समईच्या ज्योती लावून होताच घरातले कंदील लावले जात. मग दिवा लावण्यासाठी बाकीच्या ठिकाणांची पाळी असे. हे क्रम अगदी ठरलेले असत. सवयीने ती गृहलक्ष्मी दिवा घेऊन तुळशीपाशी जायची, मग पडवीमध्ये नि गोठ्याकडे जायची! गोठ्यात दिवा लावणे हे दिवाबत्तीचे शेवटचे टोक असे. त्या काळी गुरे मोठ्या प्रमाणात असत, खंडीभर धान्याची कणगी असे नी डझनावारी गाई म्हशी असत, दावण गच्च भरलेली असे. दहा घमेले भरून शेणकुट पडत असे! काहींचे गोठे तर अगदी भक्कम दगडी चिरेबंदी असत. खाली शेणाने सारवलेली जमीन असे, छत वाशाच्या सांगाड्यांवर झावळ्या टाकून शाकारलेले असे नाहीतर धाब्याचे भक्कम छत असे. काहींच्या इथे फरसबंदी असे. अशा भक्कम गोठ्यांत गुरेदेखील तशी धष्टपुष्ट असत, अगदी बलशाली सशक्त जनावरे असत. ओवीमध्ये बैलांचे वर्णन नंदी या शब्दांत केलेय. महादेवाचा नंदी हा सर्वात धष्टपुष्ट आणि बलशाली होय. ओवीमधली स्त्री म्हणते की सांज झालीय आणि सवयीने मी वेगवेगळ्या ठिकाणी दिवे लावू लागलेय, मला आधी गोठ्यात गेलं पाहिजे कारण आपलं खरं पशूधन म्हणजे आपले बैल जे शंकराचे नंदी म्हणून आपल्याला ज्ञात आहेत ते आता गोठ्यात आले असतील! या ओवीमधून त्या स्त्रीची गुरांविषयीची कृतज्ञतेची आणि आदराची भावना दिसून येते. आताशा अशी आस्था माणसांविषयी देखील दिसून येत नाही हे वास्तव आहे! जिथे माणसांनाच किंमत उरली नाही तिथे मुक्या जित्राबांचे काय घेऊन बसलायसा! तो काळ खऱ्या अर्थाने अमृतकाळ होता. तेव्हा मानवी जीवनात माणसांना, नात्यांना आणि शब्दांना विलक्षण स्थान होते. लोक या तीन गोष्टींची कदर करत असत. इतकेच नव्हे तर ज्या मातीतून आपण धान्य पिकवतो तिला ते काळी आई मानत असत आणि जी गुरे ढोरे त्यांच्या गोठ्यात असत त्यांनाही कुटुंबातल्या सदस्यांचे स्थान असे! आता सारेच लोप पावलेय, आता चिरेबंदी गोठे इतिहासजमा झालेत आणि गावोगावचे बैल लोप पावत चाललेत, जिकडे तिकडे यांत्रिक मदत घेतली जाते! मुळात लोकांच्या मनात पहिल्यासारखी गुरांविषयीची आस्था राहिली नाही हे वास्तव आहे! लोकांना आता, फक्त आणि फक्त आपल्या मतलाबाशी, पैशाशी काम असते! मतलब संपला की बात खतम असे आताचे सूत्र आहे! अर्थात यालाही काही माणसं अपवाद असतात आणि अशी अपवाद असलेली माणसं जोवर पृथ्वीतळावर असतील तोवर तरी जग नीट चालेल, त्यांच्या पाठीमागे चांगले काहीच उरणार नाही ही नक्की!
- समीर गायकवाड
akdam mastach lihalay.gele te divas
उत्तर द्याहटवा