शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

बिनकामाचे शहाणे...



पेशवाईत साडेतीन शहाणे होते. त्यातला एक 'पूर्ण शहाणा' माणूस इतका पाताळयंत्री आणि छद्मी होता की कुणी त्याला मारूही शकले नाही अन टाळूही शकले नाही. काही माणसं असून अडचण नसून खोळंबा असतात. तर काहींची नुसती अडचण असते असे नव्हे तर त्यांचा प्रचंड उपद्व्यापही असूनही त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येत नाही. पेशवाईत असाच एक मुत्सद्दी होऊन गेला, सखाराम बापू बोकील त्यांचं नाव. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांपासून ते माधवराव अन अखेरीस नारायणराव पेशवे या सर्वांच्या काळात खऱ्या अर्थाने खलपुरुष जर कोण असतील तर ते सखाराम बापू होत. रामायणात जी भूमिका मंथरेने निभावली तशा आशयाची भूमिका सखारामबापूंनी पेशवाईत बजावली.
एक उचापतखोर, कुरापतखोर, कपट कारस्थानी आणि भ्रष्ट माणूस अशी त्यांची इतिहासात प्रतिमा आहेच पण या जोडीला असणारी पराकोटीची छद्म बुद्धी, कुशाग्र कूटनीती आणि तल्लख बुद्धिमत्ता ही त्यांची गुणवैशिष्टये होती. त्यांचे पूर्ण नांव सखाराम भगवंत बोकील. हे हिंवर्‍याचा कुलकर्णी होते. त्यांचे पूर्वज पणतोजी गोपीनाथ कुलकर्णी यांना १६५९ मध्ये शिवरायांकडून हिंवरें गांव इनाम मिळालेले होते.

सखारामबापू आरंभी महादाजीपंत पुरंदरे यांच्या पदरी कारकून होते. इसवी सन १७४६ सालीं बाळाजी बाजीराव पेशव्यांनी त्यांना सदाशिवरावभाऊच्या बरोबर देऊन, कर्नाटकच्या स्वारीबिनकामाचे शहाणे... त पाठविले. इसवीसन १७५४ मध्ये सखारामबापू राघोबादादा बरोबर गुजराथच्या स्वारीत गेला होते. पुढे दोन वर्षांनीं बापूंची राघोबादादाच्या दिवाणगिरीच्या जागेवर योजना करुन, पेशव्यांनीं त्याला आपल्या बंधूबरोबर उत्तर हिंदुस्थानात पाठविले. थोरल्या माधवरावाच्या कारकीर्दीच्या सुरुवातीस राघोबादादा राज्यकारभार पाहत असतांना, जेव्हां माधवरावांनी राज्यकशट चालविण्याच्या कामांत भाग घेण्याचा आग्रह धरला, तेव्हां सखारामबापूंनी कारभार्‍याच्या जागेचा राजीनामा दिला. १७६२ मध्ये मोगलांच्या मदतीने पुतण्याच्या फौजेचा मोड करुन पुण्यास आल्यावर, राघोबांनी सखारामबापूस आपला कारभारी करुन त्यास ९ लाखांची जहागीर दिली होती. इसवीसन १७६४ मध्ये सखारामबापूंनी आग्रह धरून हैदरअलीवरील पहिल्या स्वारीचें आधिपत्य राघोबादादाकडून माधवराव पेशव्यांकडे देवविले. या स्वारीत पेशव्यांनी सखारामबापूस आपल्याबरोबर घेतले होते, व ते युद्धच्या हालचालीसंबंधांत त्यांचाच सल्ला घेऊन त्याप्रमाणे मजल दरमजल करत होते.

सखारामबापूंचे वजन व लांच घेण्याची त्यास जडलेली खोड या दोन गोष्टीमुळे माधवराव पेशव्यांना आपल्या मनाप्रमाणें राज्य करण्यास पदोपदी हरकत येऊ लागली. म्हणून इसवीसन १७६८ मध्यें राघोबादादांना अटकेत ठेवल्यावर त्यांनी बापूस कारभार्‍याच्या जागेवरून दूर केले. परंतु त्यांची जहागीर मात्र पूर्ववत त्याजकडेच चालू ठेवली. पण आपल्या मरणापूर्वी पेशव्यांनी १७७२ मध्ये सखारामबापूंना पुन्हा कारभार्‍याच्या जागी नेमून त्यांच्या समक्ष राघोबास आपल्या भावाचा सांभाळ करण्यास सांगितले. (आपल्या अपरोक्ष बापूंचा त्रास नारायणरावांना होऊ नये हा हेतू यामागे असू शकतो यावरून बापूंच्या काटशहाच्या राजनीतीची कल्पना यावी) नारायणरावाच्या कारकीर्दीत सर्व राज्यकारभार बापूच पाहू लागले. नारायणरावांच्या निधनानंतर राघोबादादांनी स्वतःला पेशवे घोषित केलं तेंव्हा बापूंना एकीकडे आनंदही झाला होता आणि एकीकडे राघोबादादांच्या विरुद्ध एकवटणाऱ्या सरदारांची, कारभाऱ्यांची भीतीही वाटत होती. अखेर त्यांनी राघोबादादांची साथही सोडली ! पण बारभाईकडे आपले वजन टाकताना त्यांनी आपली किंमत अचूक वसूल केली !!१७७४ मध्ये सखाराम बापू राघोबादादांरोबर निजामावरील स्वारीत गेले होते, परंतु कांही तरी निमित्ताने ते स्वारीतून निघाले व बारभाईच्या कारस्थानांत सामील झाले. बापूंचे दरबारांतील वजन जाणून नानाफडणविसांनी राज्यकारभाराचे मुख्य अधिकार त्यांच्याकडेच सोंपविले होते.

नारायणराव पेशव्याचा खून करविण्यांत असे बापूंच्या मनात नव्हते तरी नारायणास गारद्यांकडून कैद करविण्याचे जे राघोबादादांनी कारस्थान रचिले त्यांत ते सामील होतेच. गंगाबाईच्या मृत्यूनंतर त्यांना नाना फडणविसांविषयी मत्सर वाटू लागला व म्हणून राघोबादादांना घेऊन येण्याविषयी जी विनंती मोरोबादादा फडणविसाने इंग्रजांस केली होती तिला आंतून त्यांची संमती होती. सन १७७८ मध्ये इंग्रजांशीं युद्ध सुरु होण्याचा जेव्हां रंग दिसूं लागला, तेव्हां बापूंच्याकडून आपल्या मसलतींत अडथळा होऊं नये म्हणून, नाना फडणविसांनी उतारवय झाले असल्याच्या सबबीवर त्यांना अगोदर घरी बसावयास लावले होते, तथापि नाना व महादजी मधून मधून त्यांच्या घरी जाऊन यास मोठेपणा देऊन राजकारणांत त्यांची सल्ला मसलत विचारीत होते. परंतु पुढे इंग्रजांचे सैन्य पुण्यावर चालून येऊ लागले तेव्हां, पुरंदरच्या तहावर ज्या कारभार्‍यांनी सह्या केल्या होत्या त्यांत सखाराम बापू हेच मुख्य असल्या कारणाने, १७७८ मध्ये निदान वरकरणी तरी त्यास पुन्हां कारभारी करण्यांत आलें. यावरून सखाराम बापूंच्या तीक्ष्ण डावपेचांची व छद्मनीतीची कल्पना यावी.

वडगांवच्या तहानंतर १७७९ मध्ये नाना फडणविसांनी अखेर सखारामबापूस कैद करून सिंहगडावर पाठविले. येथून त्यांची पुढे उचलबांगडी होऊन त्यांना प्रतापगडावर नेण्यांत आले. तिथून त्यांनी पळून जाऊ नये किंवा बंड करू नये म्हणून त्याची अटकेची जागा याप्रमाणें वेळोवेळी बदलण्यात येत होती. शेवटी रायगड किल्ल्यावर अटकेत असताना सखाराम बापूंचे देहावसान झालें. एका छद्मी मुत्सद्द्याची अखेर बंदीवासात झाली. आपली तेजतर्रार बुद्धी सखारामबापूंनी पेशवाईच्या आणि रयतेच्या हितासाठी वापरली असती तर ते कित्येकांच्या गळ्यातील तारणहार ठरले असते. केवळ प्रखर बुद्धीमत्ता असून उपयोग नाही तर तिचा योग्य वापर होणं त्याहून अधिक गरजेचे आहे अन्यथा 'पंडित भये मूढ मलीन उजागर' अशी त्याची अवस्था होते. कालच्या तारखेस (२ ऑगस्ट १७८१) त्यांचे देहावसान झाले त्यानिमित्ताने त्यांच्या छद्मनीतीचा हा धांडोळा. यावरून लक्षात येते की माणसाने नुसते शहाणे असून उपयोग नाही तर त्याच्या शहाणपणाचा योग्य वापर व्हायला हवा नाहीतर जग त्यांना 'बिनकामाचे शहाणे' म्हणते...

- समीर गायकवाड.
 
(टीप - लेखातील घटना संदर्भ सनावळी महाराष्ट्रीय ज्ञानकोशमधून व माहिती संदर्भ जालावरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा