लाहोरच्या हिरा मंडीची समृद्धी...
एकविसाव्या
शतकात आपल्या देशभरात मुजरानृत्य क्षेत्रातल्या मुली डान्सबार कल्चरमध्ये गेल्या.
डान्सबार बंद झाल्यानंतर त्यांचे शोषणच झाले. मुंबईच्या ग्रांट रोडवरील केनेडी
ब्रिजजवळील जुन्या काँग्रेस हाऊसमध्ये अनेकांनी आपला बाजार मांडला. आजघडीला
आपल्या देशात फक्त आग्रा शहरातच मुजरा शिकवला जातो. मात्र इस २००० पर्यंत आताच्या
बंगालमध्ये बनारसी तवायफ आपलं अस्तित्व टिकवून होत्या. आता चोबीस परगणा, बार्दवान,
बांकुरा, वीरभूम या जिल्ह्यात पेरिफेरल भागात काही कोठे अजूनही अस्तित्वात आहेत. इतरत्र
सांगायचे झाल्यास बनारसच्या शिवदासपूरमध्ये त्यांचे अस्तित्व आहे. अन्यत्र त्यांची
संख्या नगण्य आहे. अलीकडे हिंदी सिनेमातही मुजरानृत्ये घटत चालली आहेत. कदाचित
लोकांना त्यात पूर्वीसारखी रुची राहिली नसावी. डिजिटल युगात करमणुकीच्या व्याख्या
वेगाने बदलत चालल्याचा हा परिणाम असू शकतो. एका अर्थाने हे बरे आहे कारण यातून
स्त्रियांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि शारीरिक शोषणही व्हायचे, तसेच याच्या
आहारी गेलेल्या अनेकांचे संसारही उद्धवस्त झाले. ज्या मुजरा नार्तिकांकडे अन्य
काही कौशल्य नव्हते त्यांच्यावर मात्र या मरगळीपायी कुऱ्हाड कोसळली. पैकी
उपजीविकेचे साधन नसल्याने त्यातल्या अनेकींनी देहविक्रयाचा मार्ग नाईलाजाने
निवडला. अलीकडील काळात इंटरनेटसह अन्य अनेक कारणामुळे व मनोरंजनाच्या बदलत्या
व्याख्यांमुळे आपल्याकडे तमाशा कलावंतांची जशी उपासमार होऊ लागलीय आणि
त्यांच्याकडे छुप्या देहविक्रयाच्या वासनेने पाहिले जाऊ लागलेय तसेच काहीसे मुजरा
कलावंतांच्या अखेरीस घडले होते.
मुजरा
नर्तिका, गायिका यांचा जगातला सर्वात मोठा बाजार लाहौर मधील 'हिरा-मंडी' मध्ये
भरतो. आपल्या नारायणगावला जशी तमाशापंढरी म्हणतात तसे हिरा मंडी ही मुजऱ्याची काशी
पंढरी होय. आपल्या अनेक साहित्य व कलाकृतींचा विषय ठरलेल्या मुजरा नर्तिका
असलेल्या अनारकलीचे मूळ लाहौरमध्येच सापडते. 'अकबरनामा' आणि 'तुझुक -ए- जहांगिरी'
अर्थात 'जहांगीरनामा' या दोहोतही अनारकलीचा उल्लेख नाही पण ईस्ट इंडिया कंपनीच्या
नीळाच्या व्यापारासाठी भारतात आलेला विल्यम फिंच १६११ मध्ये लाहौर येथे पोहोचला
तेंव्हा त्याला अनारकली विषयी माहिती मिळाली असे त्याने नमूद केले आहे.
अनारकलीच्या निधनानंतरच्या सहा वर्षे पश्चातचा हा कालावधी असल्याचे तो म्हणतो.
विल्यम फिंचच्या काही वर्षानंतर भारतात आलेल्या एडवर्ड टेरी या ब्रिटीश
प्रवाशानेही अनारकलीचे उल्लेख केले आहेत. इतिहासात तिच्या अस्तित्वाबद्दल एकमत
नाही मात्र तत्कालीन मुजरा संस्कृती आणि गुलाम महिलांचे शोषण यावर सहमती आहे.
लाहौरच्या मुजरा इतिहासाची सुरुवात अशा प्रकारे चारशेहून अधिक वर्षाची आहे.
मुजरा
नृत्य करणाऱ्या स्त्रियांबद्दल अनेक लोकोपवाद होते आणि आजही आहेत. खरेतर यातल्या
बहुतांश स्त्रिया खूप प्रेमळ, लाघवी असतात, त्या सच्च्या प्रेमाच्या भुकेल्या
असतात. यातल्या काहींचा रोख त्यांच्या ग्राहकांच्या पैशावर, संपत्तीवर जरुर असतो
हे देखील येथे नमूद करावेच लागेल अन्यथा लेख संतुलित होणार नाही. जिथं सामान्य
माणसांच्या मनात खोट असू शकते तिथे यांच्या मनात का असू नये ? आपल्यातल्या कुणालाच
'आनंदबाबू' बनायचे नाही पण तरीही जर कधी कुठल्या मुजरावालीशी वा कोठेवालीशी सामना
झाला तर तिच्यात वेश्या पहायची की पुष्पाला शोधायचं हे आपल्या संस्कारावर अवलंबून
आहे. त्याच बरोबर बदलत्या काळात श्रीमंती, अय्याशी आणि ऐशारामाच्या नव्या
संदर्भानुसार या दशकात काही ठिकाणी विवाह सोहळ्यात नाचण्याच्या निमित्ताने पुन्हा
एकदा मुजरा कलावंताचे पुनरुज्जीवन होऊ लागलेय. मात्र त्यांच्या या स्वरूपास समाज
कोणत्या नजरेने पाहतो हे काळच सांगेल.
'मुक्कद्दर
का सिकंदर'मध्ये जोहराबाई सिकंदरला म्हणते की, "एक तवायफ की जिंदगी कोठे से
शुरू होती हैं और कोठे पे खतम होती है.." आता कोठे उरले नाहीत आणि मुजरा
नर्तिकाही इतिहासजमा झाल्यात. उरल्यात त्या केवळ त्यांच्या पाऊलखुणा. त्याचबरोबर
अलीकडील काळात मुजरा नृत्याच्या नावाखाली बीभत्स आणि हिडीस नृत्य करणाऱ्या तोकड्या
कपड्यातील नार्तिकांचा (?) धांगडधिंगा घालनाऱ्यांबद्दल लिहावं वाटत नाही. मुजरा
नृत्य आणि नर्तिकांच्याबद्दल मानवी मनात प्रेम, वासना, रसिकता, सौंदर्यासक्ती,
आकर्षण अशा विविध भावना असू शकतात त्याचे उदात्तीकरण करणे वा त्याचा धिक्कार करणे
हा स्वतंत्र लेखाचा विषय असू शकतो. या भावनांचे स्वरूप काहीही असले तरी
मुजऱ्याच्या या पाऊलखुणा अत्यंत वेधक आणि देखण्या होत्या हे नक्की. आयुष्यात
जेंव्हा कधी पाकिस्तानला जायचा योग येईल तेंव्हा लाहौरच्या 'हिरा मंडी'ला नक्की
भेट देऊन माझ्या पोतडीत काही नवी चीजा सामील करून घेईन. तिथल्या स्त्रिया
संपन्नावस्थेत नसल्या तरी त्यांच्यामुळे अनेकांची आयुष्ये समृद्ध झाली असतील हे
नक्की.
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा