मंगळवार, २५ जून, २०१९

झोएशा इराणी ते केतकी चितळे : ट्रोलच्या बळी


काळ मोठा महान असतो तो सर्वांना पुरून उरतो. तो कोणाला कसा सामोरा येईल हे कुणी सांगू शकत नाही. आपल्या कर्मानुरूप त्याचं प्रत्यंतर येत राहतं. आपण जे पेरतो तेच उगवत जातं हे सूत्र सर्वंकष लागू पडतं आणि ते ही सर्व बाबतीत ! अगदी सोशल मीडियावरच्या ट्रोलराक्षसाच्या बाबतीतही ! मुद्दा ट्रोलचा आहे म्हटल्यावर कालपरवा घडलेली एक महत्वाची घटना चक्षुसमोर येणं साहजिक आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी इन्स्टाग्रामवर टाकत असलेल्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांना भाजपच्या रणरागिणी असंही म्हटलं जातं. विरोधी पक्षाचा हल्ला आक्रमकपणे परतावून लावण्यात त्यांचं विशेष कसब आहे. सोशल मीडियावर त्या बऱ्यापैकी सक्रीय असतात. अनेक नेत्यांसोबत झडलेली ट्विटरवॉर्स विशेष स्मरणीय आहेत. फाडून काढणे किंवा धूळ चाटायला लावणे यासाठी त्यांची खासियत आहे. त्यांनी केलेल्या पोस्टच्या वा प्रत्युत्तराच्या समर्थनार्थ आयटी सेलची भली मोठी फौज काम करत असते. आयटीसेलचे नेटकरी म्हटले की त्यात ट्रोल आलेच. ट्रोल म्हटलं की जे जे वाईट आणि अश्लाघ्य आहे ते ते सर्व आलेच. पण 'छु' म्हणून दुसऱ्याच्या अंगावर सोडलेलं श्वान कधी कधी आपल्याही अंगावर येऊ शकतं. याचं प्रत्यंतर बऱ्याच जणांना येऊ लागलंय, राहिलेल्या उत्साही आणि उतलेल्या नेटकऱ्यांनाही येईलच. कारण ती निसर्ग नियमानुसारची बात आहे.

झालं असं की स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवरती त्यांची कन्या जोइश इराणी हिच्यासोबतचा एक सेल्फी पोस्ट केला होता. तसं तर कामकाजाव्यतिरिक्त त्या विरंगुळयाच्या बऱ्याच पोस्ट शेअर करत असतात. आपल्या कुटुंबीयांसोबतचे क्षण, फुरसतीतले क्षण यांचं ते स्मरणरंजन ठरतं. खेरीज फिरकी घेणाऱ्या काही गमतीशीर फोटोंचीही पोस्ट करतात. असंच शेअरिंग त्यांनी आपल्या कन्येसोबत केलं होतं. आपल्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून स्मृती इराणी यांनी आपल्या मुलीबरोबर- झोइश इराणीसोबत वेळ घालवलाय. आईच्या ममतेनंच मुलीसोबतच्या फोटोखाली त्यांनी कॅप्शन लिहिली - ' ही मुलं अशीच नाटकं करत असतात पण आपण काहीच करू शकत नाही...फक्त हसतो. ' या फोटोला त्यांनी #siyapa आणि #teenagetantrums असे हॅशटॅगही वापरले. या फोटोला हजारो लाइक्स मिळाले. स्मृती इराणींच्या फॉलोअर्सना हा फोटो खूप आवडला. इतक्या व्यस्ततेतून मुलीसाठी वेळ दिल्यानं फॅन्सही खूश होते. पण ट्रोल्सनी मामला बिघडवला.

त्यांच्या त्या पोस्टवरून त्यांची कन्या जोइश हिला तिच्या सहाध्यायी मित्रांनी आणि परिचितांनीच ट्रोल करण्यास सुरुवात केली. फोटोमधील तिचे लुक्स कसे आहेत यावरून शेरेबाजी झाली. फोटोमध्ये तिची हेअरस्टाइल अतिशय वाईट असल्याचं सांगून तिला ट्रोल केलं गेलं. इतकेच नव्हे तर एका मित्राने पुढचं पाऊल टाकत जोइशला डिवचण्यासाठी अन्य मित्रांनीही एकत्रित रित्या पुढं यावं असं आवाहनही केलं. यामुळं जोइशला तिचे वर्गमित्र चिडवू लागले. तिला वाईट वाटलं. तिनं ती पोस्ट डिलीट करण्याची विनंती आई स्मृती इराणी यांना केली. आपल्या मुलीला दुःख झालं आणि तिच्या डोळ्यात अश्रू येतील की काय या भावनेतून स्मृती यांनी ती पोस्ट इन्स्टावरून नुकतीच हटवली. त्यानंतर त्यांनी ट्रोलर्ससाठी एक पोस्ट केली. आपल्या लेकीला ट्रोल करणाऱ्यांना दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झालं. लेकीच्या सांगण्यावरुन तो फोटो डिलीट करणाऱ्या स्मृती यांनी या खेपेस दुसरा फोटो अपलोड केला. या फोटोसोबतही त्यांनी कॅप्शन लिहिलं. ज्याद्वारे ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच उत्तर दिलं. त्या लिहितात - “माझ्या मुलीसोबतचा सेल्फी मी डिलीट केला होता. त्याचं कारण म्हणजे काही आगाऊ मुलं तिला तिच्या लूकवरुन चिडवत होते. इतकंच नाही तर आपल्या आईसोबतच्या सेल्फीत ती कशी दिसते हे सर्वांनी बघा असं सांगत सुटले होते. माझ्या मुलीने मला तो फोटो हटवण्यास सांगितला. मी फोटो डिलीट केला कारण मी तिला रडताना पाहू शकत नाही. नंतर मला जाणीव झाली की मी फोटो डिलीट करुन मी त्या मुलांना प्रोत्साहनच देत आहे. मिस्टर झा (कमेंट करणारा मुलगा), माझी मुलगी स्पोर्टपर्सन आहे. तिच्या विक्रमाची लिमका बूकमध्ये नोंद आहे. शिवाय कराटेमध्ये तिने ब्लॅक बेल्ट मिळवला असून, वर्ल्ड चॅम्पियन्सशीपमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. ती खूपच प्रेमळ आणि सुंदर आहे. तुम्ही कितीही त्रास द्या, ती सक्षमपणे सामना करेल, तिच्याबद्दल जे बोलायचं आहे ते बोला, ती पुन्हा लढेल, ती जोईश इराणी आहे आणि मला गर्व आहे की मी तिची आई आहे”.. स्मृती इराणी यांच्या या पोस्टलाही सोशल मीडियावर लाईक मिळताहेत. अनेकांनी स्मृती इराणींनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करत आहेत आणि करायलाही हवं, कारण कुणाच्याही मुलीला असं ट्रोल केलेलं कुणालाही आवडणार नाही. आपल्या मुलीच्या स्वाभिमानास ठेच पोहोचवणाऱ्या आणि तिला दुखावणाऱ्या प्रतिक्रिया कुणालाही नको असतात. त्यामुळं भारतासारख्या खंडप्राय देशाच्या महत्वाच्या केंद्रीय मंत्रीपदी असणाऱ्या स्मृती इराणी यांनी ज्या खंबीरतेने मुलीची पाठराखण केली त्याचं कौतुकच व्हायला हवं. खेरीज ज्या टवाळखोरांनी त्यांच्या मुलीस दुखावलं त्यांना अद्दलही घडायला हवी याबाबत कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. ही झाली एक बाब.

याच संदर्भात या आठवड्यात घडलेली आणखी एक घटना म्हणजे मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला केलं गेलेलं अश्लील आणि अर्वाच्च्य भाषेतलं ट्रोलिंग ! केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. त्या व्हिडिओत तिने आपले सर्व फॉलोअर्स हे मराठी नसून हिंदी इंग्लिश देखील आहेत असे सांगत व्हिडिओमध्ये हिंदीत बोलणार असल्याचे सांगितले आणि ती हिंदीत बोलत असल्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर करून तिला मराठीची लाज वाटत असल्याची टीका करून तिला ट्रोल केले. इतकेच नाही तर अनेकांनी अतिशय वाईट पद्धतीने तिच्यावर टीका केली. तिच्यावर केलेल्या टीकेला तिने नुकतेच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. तिने टीका करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. इतकेच नाही तर मराठीची शाळा देखील घेतली. 'तुमची मराठी भाषा इतकी कमकुवत आहे का, की माझा रेप केल्याशिवाय तिला तिचे सुवर्ण दिवस लाभणार नाही आहेत ?' असा सवाल केतकीनं व्हिडिओत केला.

केतकीच्या ज्या व्हिडीओमुळे ती ट्रोल झाली त्यात तिने मराठी भाषिकांना अप्रत्यक्षपणे उचकवले होते त्यामुळे मराठी अस्मितेचे 'झेंडे' फडकावणाऱ्या पक्षांनी आणि विचारधारांनी तिला जाहीर विरोध केला होता. याचं प्रतिबिंब कमेंटसमध्ये आणि केतकीच्या प्रत्युत्तरातही उमटलं होतं. __aayuushh__ (आयुष ठाकुर) या युजरची कमेंट अशी आहे - "इतरांच्या चुका काढत बसू नकोस, नीट सांगितलं अस्त आधीच्या व्हिडिओ मध्ये तरी चाललं अस्त की, उगीच कशाला झेंडे फडफडाऊ नका आणि बाकीचं आवरायचं. तू ऍक्टर आहेस, सामान्य लोकांचे *critics* येणारच आहेत. तू सांगायचं नाही आम्ही झेंडे फडफडवयचे की नाही ते. ते आम्ही आमचं बघून घेऊ, आणि कोण बोललं अस्त तुला तर त्यानंतर बोलायचं होतं ना. आम्हाला आहे अभिमान आमच्या मातृ भाषेचा. तू खूप बॉलिवूड ची हेरॉईन आहेस ना. मराठीच वाणी मुले पुढे आलीयेस, तुझ्या काढणं असं बोलणं अपेक्षित नाही... "

ट्रोल झालेल्या केतकीने त्याच भाषेत उत्तर दिल्यानंतर अशा ट्रोलर्सना शिक्षा मिळावी याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून संबंधितांवर आवश्यक कारवाई करण्याची विनंती केली. केतकीसोबत अभिनेता दिगंबर नाईक, सुशांत शेलार आणि शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हेदेखील उपस्थित होत्या. तिच्या भेटीनंतर लगेच सक्रीय होत फडणवीस यांनी सोशल मीडियावरून अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना अटक करण्याची सूचना गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकाऱ्यांना केली. आयटी ऍक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केतकीने दिलेल्या निवेदनामध्ये होती. विशेष बाब म्हणजे केतकीने नंतर कृष्णकुंजवरतीही धाव घेतली. तिथून सावध प्रतिक्रिया आली. केतकीवर ट्रोल करताना जी भाषा वापरली त्याला मनसेचा विरोध आहे मात्र तिने व्हिडीओतून मराठी हिंदी विषयी व्यक्त केलेल्या मतांशी कदापिही सहमती नाही अशी भूमिका घेतली गेली. यावरचं मातोश्रीचं मौन सूचक होतं.

मुळात केतकीला ज्यांनी ट्रोल केलं ते महाराष्ट्र माझा या बाण्याचे आणि मराठीच्या वापराचा आग्रह धरणाऱ्या विचारधारेतले लोक होते. यात तथाकथित सुशिक्षित मोठ्या प्रमाणात होते. त्यांनी केतकीसाठी वापरलेली भाषा कोणताही सभ्य सुजाण माणूस कधीही कुठंही वापरू शकणार नाही इतकी दर्जाहीन होती. 'ट्रोल' या शब्दाचा ऑक्सफोर्ड डिक्शनरीतला अर्थ प्रमाणे दिलेला आहे - "someone who leaves an intentionally annoying message on the internet, in order to get attention or cause trouble. a message that someone leaves on the internet that is intended to annoy people: A well-constructed troll will provoke irate or confused responses from flamers and newbies. " इंटरनेटवरती एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक दिलेला असा मेसेज की ज्या द्वारे लक्ष वेधून घेता येतं आणि इच्छित व्यक्तीस त्रासही देता येतो. व्यवस्थितरित्या उभारणी केलेल्या ट्रोल्सद्वारे एखाद्यास नामोहरम करता येतं वा गोंधळात टाकता येतं.

आपल्या मतांच्या पुष्ट्यर्थ काहीच द्यायचे नाही व आपल्या विरोधी विचारांच्या लोकांच्या पोस्टवर जाऊन त्यांना आडवं लावायचं, मुद्द्यापासून पोस्ट भरकटवायची, पोस्टकर्त्यावर हीन दर्जाची टीकाटिप्पणी करायची, कॉमेंट करणारया लोकांशी अकारण वाद घालायचा या प्रवृत्तीला ऊत आलाय. असे उद्योग करणारे लोक सोशल मिडीयात ‘ट्रोल’ म्हणून कुख्यात आहेत. कहर म्हणजे जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी, नेत्यांनी आयटी सेलच्या गोंडस नावाखाली पगारी (पेड) ट्रोल आता आपल्या पदरी बाळगलेत. अगदी राष्ट्रीय पक्षांपासून ते किरकोळ प्रादेशिक पक्षांपर्यंत सगळे या चिखलात रुतलेले आहेत. भाजपचा आयटीसेल इतरांच्या तुलनेत अधिक मोठा आणि अधिक सक्षम, सक्रीय आहे. संघटीत आणि सुनियोजित पद्धतीने ट्रोल्स हाताळले जात असल्याने दिवसेंदिवस याला अधिक बीभत्स, ओंगळवाणे, हिंस्त्र स्वरूप येतेय. वाईट बाब अशी की ट्रोल्सना आवर घालून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम कोणताही राजकारणी मनापासून करताना दिसत नाहीत, यात कुणी अपवादही नाही ही शरमेची बाब आहे. कट्टर, कडवट, हेकट विचारसरणीच्या लोकांना ट्रोल अस्त्र अधिक उपयोगी पडते कारण सार्वजनिक जीवनात वावरताना सभ्यतेचा मुखवटा घालून फिरावं लागलं तरी सोशल मीडियाच्या आभासी जगात हा मुखवटा फेकून देत आपला हिंस्त्र चेहरा त्यांना जोपासता येतो.

आपले पंतप्रधान मोदी ज्यांना फॉलो करतात त्यात भाजपच्या राज्य शाखा, केंद्रीय मंत्री, मंत्रालये, काही राज्यांचे मुख्यमंत्री, कलावंत, विधिज्ञ, शास्त्रज्ञ, जागतिक पातळीवरील व्यक्ती असे विविध लोक आहेत. या व्यतिरिक्त एक मोठी ट्रोल्सची टोळी आहे जिला मोदी फॉलो करतात. ज्या लोकांचे सामाजिक योगदान शून्य आहे, ज्यांची विध्वंसक धर्मद्वेष्टि वृत्ती आहे, ज्यांची भाषा आक्षेपार्ह आहे अशांनाही मोदी फॉलो करतात. जर पंतप्रधानांना यात वावगे वाटत नसेल तर त्यांच्या नेत्यांना, समर्थकांना त्यात वावगे कसे वाटेल. निखील दधीच नावाच्या माथेफिरू विकृताने पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ‘एक कुतिया क्या मर गयी सारे पिल्ले बिलबिला उठे’ असं घृणास्पद ट्विट केलं होतं. बरखादत्त, राणा अय्युब, सागरिका घोष, शेहला रशीद, नेहा दीक्षित, मुग्धा कर्णिक, गुरमेहर कौर या महिलांना या लोकांनी लांच्छनास्पदरित्या टार्गेट केलं होतं. राहुल कौशिक या व्यक्तीने माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याबद्दल अत्यंत शिवराळ भाषा वापरली होती. निकुंज साहू या पोराने केजरीवालांवर असभ्य टिप्पणी केली होती. ‘नमोमॅनिया’ या नावाने महावीर ही व्यक्ती अकाउंट चालवत होती त्यावरील शिवीगाळ शब्दातीत आहे, हे हॅण्डल ट्विटरने सस्पेंड केल्यावर भाजप नेते गिरीराजसिंह यांनी ट्विटरविरुद्धच मोहीम छेडली होती.

सेक्स ऍब्युजिव्ह भाषा वापरणारया, अफवा– द्वेष पसरवणाऱ्या या लोकांना मोदींनी अनफॉलो करावं म्हणून मोहिमा राबवून झाल्या पण मोदीजी बधले नाहीत. डॉ.ज्वाला गुरुनाथ या महिलेला पूर्वी मोदी फॉलो करत होते, भाजपचे प्रवक्ते तेजिंदर बग्गा यांच्याशी तिचे वाद झाले. त्याचे पडसाद मिडीयात उमटले. या महिलेने बग्गा यांच्याविषयी तक्रार केली, बग्गांना काही झाले नाही पण मोदींनी तिला अनफॉलो केले. न्याय मागणाऱ्या महिलेला मोदी अनफॉलो करू शकतात तर महिलांना अर्वाच्च शिव्या देणाऱ्या, दमदाटीची भाषा वापरणाऱ्या, द्वेष पसरवणाऱ्या अन सामाजिक मूल्यहीन लोकांना ते का अनफॉलो करत नाहीत ? मोदी ज्यांना फॉलो करतात त्यांनी काय लिहिलं याबद्दल मोदींना दोषी मानता येणार नाही हे नक्की. मात्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत ते कुणा एका धर्माचे, पंथाचे, पक्षाचे, विचारधारेचे वा अश्लाघ्य टोळीचे पंतप्रधान नाहीत. या लोकांना फॉलो करण्यासाठी त्यांची निवड त्यांनी स्वतःच केली आहे. त्यामुळे त्यांना अनफॉलो करून उचित आदर्श घालून देणे हे त्यांचेच काम आहे. जनतेचा भरभरून कौल लाभलेल्या पंतप्रधानपदावरील व्यक्तीने ‘ट्रोलभैरवां’चे फॉलोअर होणे नैतिकतेच्या कोणत्या चौकटीत बसते याचा विचार होणे गरजेचे आहे. सबका साथ सोबत आता सबका विश्वास जोडलं गेल्याने आगामी काळात या दृष्टीने पावले पडतील अशी आशा आहे.

केवळ भाजपकडूनच हे होतेय असं काही नाही. सर्वच पक्ष यात कमीजास्त प्रमाणात सामील आहेत. सत्तेत असल्याने भाजपची जबाबदारी अधिक आहे आणि त्यांच्या आयटीसेलचा आवाकाही अजस्त्र आहे त्यामुळे इथे त्यांचे उल्लेख केले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष व त्यांचे नेते साळसूद आहेत असं मानायचं कारण नाही. काही प्रमाणात त्यांची आक्रमकता कमी असेल व मृदुताही असेल पण त्यांना ट्रोलिंग वर्ज्य नाही हे नक्की. पूर्वी उन्मादाने ट्रोल वापरणाऱ्यांना हे अस्त्र आपल्यावरही उलटेल याची कधी कल्पना केली नसेल. पण तसंही घडू लागलं. ही बाब अधोरेखित करणारा एक किस्सा सुषमा स्वराज यांचा आहे. एका मुस्लीम पुरुषाशी विवाह केलेल्या लखनौमधील हिंदू महिलेच्या पासपोर्टवरून मध्यंतरी गदारोळ झाला होता. या दांपत्याचे म्हणणे होते की, पासपोर्ट कार्यालयात धार्मिक कारणामुळे त्यांच्यावर शेरेबाजी झाली. त्यामुळे त्यांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे न्याय मागितला. स्वराज यांनी तक्रारीची दखल घेताच या दांपत्याला लगेच पासपोर्ट देण्यात आला. स्वराज यांनी त्या स्त्रीस मदत करताच ज्यांच्या डोक्यात 'लव्ह जिहाद'चा किडा वळवळत होता त्यांनी स्वराज यांच्यावर अत्यंत वाईट शब्दांत विखार ओकला. इंद्रा वाजपेयी या ट्विटर हॅंडलवरून एका व्यक्तीनं केलेली टीका उदाहरण म्हणून देता येईल, "लाज बाळगा मॅडम. हा तुमच्या मुस्लीम किडनीचा परिणाम आहे का?" काही दिवसांपूर्वी स्वराज यांच्यावर किडनीरोपणाची शस्त्रक्रिया झाली त्याचा नीच संदर्भ या व्यक्तीने वापरला होता. या ट्रोलपैकी बहुतांश ट्रोलर्स भाजपचे समर्थक होते, स्वराज यांनाही ते फॉलो करायचे. दरम्यान विदेश दौऱ्यावर असलेल्या स्वराज भारतात परतल्यावर त्यांनी ट्विट करत युजर्सना प्रश्न उपस्थित विचारला होता की, 'अशाप्रकारे ट्रोल करणे योग्य आहे का ?' तर वाईट गोष्ट अशी होती की सोशल मीडियावर तब्बल ४३ टक्के लोकांनी ट्रोलिंगला बरोबर ठरवले होते. गौरी लंकेश यांच्या हत्ये समयीच्या ट्रोलिंगवर तमाशा बघत बसलेल्या भाजप नेत्यांना या घटनेत नेमकी काय भूमिका घ्यावी हे देखील उमजले नाही. काही दिवसांनी अखेर एकटे नितीन गडकरी स्वराज यांच्या बाजूने उभे राहिले, मग राजनाथ सिंग यांनी देखील ट्रोल्सवर आपण कारवाई करणार असल्याचे सूतोवाच केले. पण बारीक सारीक घटनेवर बोलणारे पंतप्रधान मोदी हे या घटनेवर मौन राहिले हे खूप बोलके होते.

सोशल मीडियातून जे पेरले तेच आता उगवत आहे. आधी बेगुमान वापरलेलं हे हत्यार आता कुणाच्याच नियंत्रणात नाही. पराकोटीचा द्वेष, हिंसा यांनी आता सामान्य लोकांनाही ग्रासले आहे, वाईट बाब अशी की जे सुशिक्षित आहेत, माध्यमप्रवण आहेत तेच लोक असे खोटे व्हिडीओ, फोटो वापरून लोकांना हिंसक बनवत आहेत. स्मृती इराणी यांना आपल्या मुलीला झालेल्या वेदना निश्चित जाणवल्या असतील. ट्रोल्सकडून सर्रास महिलांना लक्ष्य करताना जी अभद्र भाषा वापरली जाते त्यावरही त्या चिंतन करतील काय ? ट्रोल्सना पोसणाऱ्या राजकीय नेत्यांना, पक्षांना त्या सुनावतील काय याचे उत्तर काळच देईल. हे झाले सोशल मीडियाचे, पण वास्तव जगातही आता ट्रोल्स दिसू लागलेत. भारत पाकिस्तान क्रिकेट सामना भारताने जिंकला त्या दिवशी ऐन मध्यरात्रीस उन्मत्त झालेल्या टोळक्यांनी असा काही हैदोस घातला की सार्वजनिक शांतता, रहदारीचे अडथळे, गोंगाट यांचं काहीच भान त्यांना उरलं नव्हतं. भारतीय संघाने जिंकलेल्या प्रत्येक सामन्याचा हरेक भारतीयास अभिमान असायलाच हवा पण आनंदावर विरजण पडेल असं लोक वागू लागतात तेंव्हा तेही एक सार्वजनिक ट्रोलिंगच असते. याचाही एक दिवस विचार करावा लागणार आहे. तोवर ट्रोलचा भस्मासूर जे काही गुण उधळेल ते मुकाट पाहावे लागेलच !

- समीर गायकवाड

#द वायर #ट्रोल #झोएशा_इराणी_ते_केतकी_चितळे_:_ट्रोलच्या_बळी
#समीर_गायकवाड #ट्रोलींग

'द वायर' मधील लेखाची लिंक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा