मंगळवार, २२ जुलै, २०२५

चिरेबंदी गोठ्यातले नंदी!


एक काळ होता जेव्हा प्रत्येक गावातील बहुतांश शेतकऱ्यांकडे गुरे ढोरे असत. ज्याचं शेतशिवार मोठं असे त्याच्या रानात मजबूत गोठा असे. बऱ्यापैकी संख्येत शेळ्या मेंढरं असत, कोंबड्यांची खुराडी असत! रानात हिरवीगार कंच पिकं डोलत असत. पाना फुलांनी डवरलेली चॉकलेटी हिरवी झाडं माना तुकवून उभी असत. रानात कडब्याची भली मोठी गंज असे. झालंच तर गुरांना खायला हिरवंगार कडवळ नाहीतर मकवन तरी असेच, बळीराजाची लईच अडचण असली तर मागून आणलेलं हिरवं वाडं तरी असतंच. एव्हढे करूनही खेरीज जमलं तर अमुन्याची पाटी रोज संध्याकाळी गोठ्यातल्या गुरांसमोर ठेवली जायची. कडबाकुट्टी करून झाली की दावणीत त्याची लगड टाकली जाई. गुरं वळायला गुराखी पोरं असत. सकाळच्या धारा काढून झाल्यावर दिवस डोक्यावर यायच्या आधी गुरं चरायला माळावर नाहीतर गावच्या शीवेच्या हद्दीत नेली जात. हे दृश्य एके काळी खेड्यात दररोज संध्याकाळी सार्वत्रिक असे. विशेषतः गेलेली गुरे सांजेस परत येत तेव्हा हे श्यामल सुंदर दृश्य हमखास नजरेस पडे. गोठ्याकडे परतणाऱ्या लेकुरवाळ्या गायी-म्हशींच्या गळ्यातील घंटांचा आवाज ऐकून गोठ्यात दावणीला बांधून ठेवलेली त्यांची वासरे ताडकन उठून उभी राहत. कान ताठ करून आवाजाकडे कानोसा देऊ लागत, आनंदाने आपले सर्वांग थरथरवू लागत, घंटांचा आवाज जसजसा जवळ येईल तशी वासरे हंबरू लागत अन् आपल्या वासरांच्या हंबरण्याच्या आवाजाने त्या गोमाता अवखळपणे धावू लागत. धावणाऱ्या जनावरांच्या खुरांनी धुळीचे मंद लोट हवेत उडत, या गायी धावतच गोठ्यात आल्या की त्यांचे तटतटलेले पान्हे वाहू लागत. वासरांचे तोंड त्यांच्या कासेला जाऊन भिडले की, गायी आपल्या वासरांना मायेने चाटू लागत. हे मनोरम दृश्य बघून कुणाच्याही ठायी असलेला थकवा कुठच्या कुठे पळून जायचा. पाहणाऱ्याच्या प्रसन्न चेहऱ्यावर एक निरागस हसू उमटत असे. त्यांनाही आपल्या आईची आठवण येई आणि नकळत त्यांचेही मन आपापल्या माऊलीच्या ओढीने धाव घेत असे! हे दृश्य आता फारसे दिसत नाही. मात्र ज्या काळात जात्यावरच्या ओव्या अस्तित्वात होत्या, त्या काळात मात्र याचे मोठे प्रस्थ होते, त्यामुळे साहजिकच याचे प्रतिबिंब ओव्यांमध्ये पडलेले दिसते.

बुधवार, ९ जुलै, २०२५

ब्लॅक बॉक्स डायरीज – एकाकी स्त्रीच्या संघर्षनोंदी


'ब्लॅक बॉक्स डायरीज' ही 2024 मध्ये प्रदर्शित झालेली एक शक्तिशाली आणि एका पीडित महिलेच्या वैयक्तिक नोंदीविषयीची डॉक्युमेंट्री आहे, जी जपानी पत्रकार शिओरी इतो यांची निर्मिती आहे. सिनेमॅ व्हेरिटे शैलीत याची निर्मिती केली गेलीय, ज्यामध्ये शिओरी यांच्या वैयक्तिक व्हिडिओ डायरीज, कोर्टरूम फुटेज आणि गुप्त रेकॉर्डिंग्ज यांचा समावेश आहे. त्यायोगे प्रेक्षकांना एक थरारक, भावनिक अनुभव मिळतो, जो शिओरी यांच्या संघर्षाची आणि धैर्याची जाणीव करून देतो. ही त्यांची पहिली पूर्ण-लांबीची डॉक्युमेंट्री, जी त्यांनी स्वतःच्या लैंगिक अत्याचाराच्या अनुभवावर निर्मिलेली. यात शिओरी इतो स्वतःच्या केसचा तपास करतात आणि एका प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध न्याय मिळवण्यासाठीचा त्यांचा लढा दाखवतात. हा लढा जपानमधील तत्कालीन #MeToo चळवळीचा एक महत्त्वाचा भाग बनला होता आणि त्याने जपानच्या कालबाह्य कायदेशीर आणि सामाजिक व्यवस्थांवर प्रकाश टाकलेला.

मंगळवार, ८ जुलै, २०२५

बदनाम गल्ल्यातले सच्चेपण – सैली 13 सप्टेंबर!



श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेला 'सैली 13' सप्टेंबर हे आत्मकथनपर कथासंग्रह त्या काळातला आहे ज्या काळामध्ये मराठी जनमानसात सोवळे ओवळे पाळले जात होते इतकेच नव्हे तर साहित्य प्रवाहात देखील अशा प्रकारचे अंडर करंट अस्तित्वात होते. अपवाद दलित साहित्याचा! मराठी साहित्यातील शहरी / नागर आणि ग्रामीण या वर्गवारीपैकी कथित शहरी साहित्यामध्ये जे विविध आशय विषय हाताळले गेलेत त्यातही काही घटक बऱ्यापैकी अस्पृश्यच राहिलेत. अर्थात यातही काही तुरळक सन्माननीय अपवाद होते. मराठी साहित्यामध्ये ज्याप्रमाणे विज्ञान कथा, मनोविश्लेषणात्मक कथा, निढळ लैंगिक कथा, वैश्विक वैचारिक समाजपट असणारे वाङ्मय तुलनेने कमी निर्मिले गेलेय, त्याचप्रमाणे काही विशिष्ठ वंचित शोषित घटकांचा अंतर्भाव असणारे सामाजिक साहित्यही कमी लिहिले गेलेय. त्यातलाच एक घटक वेश्या होय. वेश्या आणि वेश्यावस्ती यावर ज्ञात मराठी साहित्यातले आजवरचे सर्वाधिक भेदक, परिणामकारक लेखन नामदेव ढसाळांनी केलेय हे सर्वश्रुत आहे. अन्य काहींच्या लेखनामध्ये याविषयी कधी तुरळक तर कधी दीर्घ उल्लेख आहेत. देहविक्री करणाऱ्या पुरुषांचा कथावकाश मराठी साहित्यात येण्यासाठी तर 2019 चे साल उजाडावे लागलेय. डॉ. माधवी खरात यांच्या 'जिगोलो' या कादंबरीने ती उणीव भरुन काढली.

गुरुवार, ३ जुलै, २०२५

टायटन – एका डिझास्टरची दुःखद गोष्ट!




'टायटन द ओशियनगेट सबमरीन डिझास्टर' ही 2025 मध्ये रिलीज झालेली 'नेटफ्लिक्स'वरील डॉक्युमेंटरी आहे, जी 18 जून 2023 रोजी टायटॅनिकच्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या ओशियनगेट कंपनीच्या टायटन सबमर्सिबलच्या अंतर्गत स्फोटाने झालेल्या दुर्घटनेला केंद्रस्थानी ठेवते. ही दुर्घटना जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली होती, कारण यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन मार्क मुनरो यांनी केले आहे आणि ती या घटनेच्या मुळाशी असलेल्या कारणांचा, तांत्रिक त्रुटींचा आणि मानवी चुका यांचा सखोल अभ्यास करते.

गुरुवार, १९ जून, २०२५

अभिनिवेषातून प्रसवणारी प्रेमाची, विवाहसंस्थेची हत्या!


कुटुंबाच्या संमतीची पर्वा न करता प्रेमविवाह करणाऱ्या वर वधूची हत्या करण्याचे प्रमाण आणि समाजाचा विवाह सोहळ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांचा परस्पर संबंध आहे. देशातील प्रत्येक राज्यात याचे स्वरूप भिन्न असले तरी निष्कर्ष मात्र सारखाच येतो. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास कथित उच्चवर्णीयांमध्ये याची अधिक बाधा जाणवते.

'लग्नांच्या बाबतीत गाव काय म्हणेल ?' या प्रश्नाने खेड्यातल्या मराठ्यांना इतके ग्रासलेले असते की त्यापुढे त्यांच्या जीवनातल्या सर्व समस्या त्यापुढे फालतू ठराव्यात.
लग्न थाटातच झालं पाहिजे. मानपान झाला पाहिजे. पाचपंचवीस भिकारचोट पुढारी लग्नात आले पाहिजेत. जेवणावळी झाल्या पाहिजेत. गावजेवणे झाली पाहिजेत आणि वाजतगाजत वरात निघाली पाहिजे.
एकंदर गावात हवा झाली पाहिजे, चर्चा तर झालीच पाहिजे असा सगळा माहौल असतो.

शुक्रवार, १३ जून, २०२५

एअर इंडिया फ्लाइट क्रॅश - वेटिंग फॉर फायनल कॉल..

प्रतिकात्मक फोटो 

सर्वात वाईट असतं निरोप न घेता कायमचं निघून जाणं...

कालच्या विमान अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या करुण कहाण्या एकेक करून समोर येताहेत. त्यातली अत्यंत दुःखद दास्तान पायलट सुमित सभरवाल यांची आहे. ते अविवाहित होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांचे वडील 88 वर्षांचे असून ते बेडरिडन आहेत. सुमित आपल्या वडिलांना अधिक वेळ देऊ इच्छित होते. मात्र त्यांची एक्झिट अनेकांना चुटपुट लावून गेली.

एखादा माणूस अकस्मात आजारी पडला वा त्याचा अपघात होऊन त्याची अवस्था गंभीर झाली तर निदान त्याला पाहता येतं. स्पर्श करता येतं. त्याच्याशी एकतर्फी का होईना पण संवाद साधता येतो. तो बोलण्याच्या अवस्थेत असेल तर अखेरचे दोन शब्द बोलू शकतो.
संबंधित व्यक्तीचे देहावसान झाल्यावर त्या दोन शब्दांचा आधार आयुष्यभर साथ देतो.

जाणाऱ्यालाही कदाचित काही अंशी समाधान लाभत असेल की, आपल्या अंतिम समयी आपल्या प्रियजनांना पाहू शकलो, स्पर्श करू शकलो, एखादा दुसरा शब्द बोलू शकलो! त्या जिवाची तगमग कणभर का होईना पण कमी होत असेल!

मात्र निरवानिरवीची भाषा न करता, अंतिम विदाईचा निरोप न घेता कुणी कायमचं निघून गेलं तर मागे राहिलेल्या आप्तजनांना विरहाची तळमळ आमरण सोसावी लागते. मोठे वेदनादायी नि क्लेशदायक जगणे वाट्याला येते. काहींच्या बाबतीत काळ, जखमा भरून काढतो तर काहींना त्या वेदनेसह जगावे लागते.

बुधवार, ११ जून, २०२५

कलावंतांच्या गहिऱ्या प्रेमाचे सच्चे उदाहरण!


काही गोष्टी हिंदी सिनेमांतच शोभून दिसतात मात्र काही खऱ्याखुऱ्या गोष्टी अशाही असतात की सिनेमाने देखील तोंडात बोटे घालावीत. ही गोष्ट अशाच एका युगुलाची. आपल्याकडे कला क्षेत्रातील प्रेमाचे दाखले देताना नेहमीच अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या प्लेटॉनिक नात्याचा उल्लेख केला जातो. कदाचित हिंदी आणि पंजाबीचे उत्तरेकडील वर्चस्व याला कारणीभूत असावे. खरेतर असेच एक उदाहरण आसामी कलाक्षेत्रातलेही आहे, मात्र त्याचा फारसा उल्लेख कुठे आढळत नाही. गोष्ट आहे एका ख्यातनाम चित्रकाराची आणि एका विलक्षण गोड गळ्याच्या गायिकेची. नील पवन बरुआ हा एका युगाचा कुंचल्याचा श्रेष्ठ जादूगार आणि दीपाली बोरठाकूर, ही आसामची गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध!

शनिवार, ३१ मे, २०२५

एकमेवाद्वितीय - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर!

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  

महाराणी महान रयतप्रेमी होत्या. रयतेचे हालहवाल जाणून घेण्यासाठी त्यांचे गुप्तहेर रयतेत फिरत असत. एकदा एका हेराने खबर आणिली की, लक्ष्मीबाई नामे एका विधवा वृद्धेची सकल संपत्ती ऐवज रुपये पंधरा हजार तिच्या मुलाने जबरदस्तीने काढून घेऊन पत्नीच्या स्वाधीन केली असे. ही माहिती ऐकताच राणीबाईंना संताप अनावर झाला. त्यांनी तत्काळ त्या वृद्धेच्या सुनेला एक खलिता धाडला आणि विधवा सासूचे पैसे परत करण्याकरिता बजावले. त्यांनी नुसता आदेश दिला नाही तर सज्जड दम दिला. सुनेने रक्कम परत केली राणीबाईंनी ती रक्कम त्या अभागी सासूला परत केली. या प्रसंगी धाडलेल्या खलित्याचा तजुर्मा - 
'चिरंजीव साळूबाई वाघ यासी अहिल्याबाई होळकर यांचा आशीर्वाद. गंगाजळ निर्मळ लक्ष्मीबाई वाघ यांजकडून चिरंजीव अमृतवराव वाघ याने अमर्याद करून ऐवज पंधरा हजार घेऊन तुम्हापासी ठेविले. ते हुजुरी आणले पाहिजेत. यास्तव सरकारातून पागेचे स्वारासमागमे हे पत्र तुम्हास लिहिले आहे. तरी एक घडीचा विलंब न करता रुपये पंधरा हजार स्वारासमागमे पाठवावे. ढील केल्यास परिच्छन्न उपयोगी पडणार नाही. जाणिजे.'

शनिवार, २४ मे, २०२५

परंपरेच्या आडून भरणारा वासनांचा बाजार!


ही गोष्ट आहे एका लिलाववजा बाजाराची जिथे वयात आलेल्या मुलीची, तरुण स्त्रीची आणि पोक्त महिलेची बोली लावली जाते. इथे बायकांचा बाजार भरवला जातो. सोबतच्या फोटोतली निळ्या लहंग्यामधली मुलगी कंवरबाई आहे. तिचं मुळचं नाव अनिता. ती मध्यप्रदेशातील शिवपूरीची. बंचरा या भटक्या जमातीत तिचा जन्म झालेला. या जातीत एक प्रथा पाळली जाते, घरातील थोरल्या स्त्रीने घर नीट चालावे म्हणून बाहेरख्याली व्हायचं. त्यासाठी या बायकांचा रीतसर बाजार भरतो. बंचरा समाजाच्या तरुण पिढीच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. परंपरेच्या नावाखाली आपल्या मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावावे असे आजही अनेक पुरुषांना वाटते. एकेकाळी या जमातीमधील कर्त्या पुरुषांनी आपल्या मुली स्थानिक सरदारांना देण्यासाठी गरीब समाजबांधवांवर दडपण आणलं. पुढे जाऊन याचीही परंपरा तयार झाली. आपल्या मुलींची बिनपैशाची सोय लागते या नीच स्वार्थी हेतूने हा रिवाज कधीच बंद झाला नाही!

सोमवार, १९ मे, २०२५

गोष्ट, सरहद्दीची सीमा नसणाऱ्या नद्यांची आणि स्त्रियांची!


हा फोटो आज रात्रीचा आहे, बांगलादेशातील मित्राने पाठवला आहे. भारतीय सीमेलगतच्या बांगलादेशमधील 'राजशाही' या शहरालगत पद्मा नदी वाहते. फोटोमध्ये हिरव्या रंगात दिसणारे राजशाही शहर आहे, त्याच्या पुढे काळसर करडे दिसणारे पद्मा नदीचे विशाल पात्र आहे आणि नदी पात्रापलीकडे एका रेषेत दिसत असलेले फ्लड लाइट्स असलेला भाग म्हणजे भारतीय हद्दीचा भूभाग आहे. राजशाहीच्या टेकडीवरून हा फोटो घेतलाय आणि भारतीय हद्दीत चमकत असणाऱ्या वीजा त्यात कैद झाल्या आहेत.

शुक्रवार, १६ मे, २०२५

लेट नाइट मुंबई ..

'लेट नाइट मुंबई'चे मुखपृष्ठ 

लेखक प्रवीण धोपट यांच्या 'लेट नाइट मुंबई' या देखण्या आणि आगळ्यावेगळ्या विषयाच्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाही नेमकी आहे - "सूर्य मावळल्यानंतर ज्यांचा दिवस उजाडतो त्या प्रत्येकाला...."
या देखण्या पुस्तकातले हरेक पान याला अनुसरूनच आहे हे विशेष होय! मुंबई शहराविषयी आजवर विविध भाषांमधून पुष्कळ लेखन केलं गेलंय, मुंबईच्या भौगोलिक महत्वापासून ते इतिहासापर्यंत आणि राजकीय वजनापासून ते मायानगरीपर्यंत भिन्न बिंदूंना केंद्रस्थानी ठेवून हे लेखन संपन्न झालेय. मुंबईविषयी एक आकर्षण देशभरातील सर्व लोकांना आहे, इथल्या माणसांची ओळख बनून राहिलेल्या मुंबईकर स्पिरीटवर सारेच फिदा असतात. मुंबईची आपली एक बंबईया भाषा आहे जी मराठी तर आहेच आहे मात्र हिंग्लिशदेखील आहे! मुंबईच्या बॉलीवूडी स्टारडमपासून ते धारावीच्या विशालकाय बकालतेविषयी सर्वांना जिज्ञासा असते. इथल्या डब्यावाल्यांपासून ते अब्जाधिश अंबानींच्या अँटॅलिया निवासस्थानापर्यंत अनेक गोष्टींचे लोकांना कुतूहल असते. स्वप्ननगरीचा स्वॅग असो की मंत्रालयाचा दबदबा, दलालस्ट्रीटची पॉवर असो की गेट वे ऑफ इंडियाचा भारदस्त लुक चर्चा तर होतच राहणार! अशा सहस्रावधी अंगांनी सजलेल्या, नटलेल्या मुंबईच्या रात्रींची शब्दचित्रे प्रवीण धोपट यांनी चितारलीत. यात रात्रीची मुंबई कैद झालीय असे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटेल मात्र वास्तव काहीसे तसेच आहे. फुटपाथच्या कडेला तसेच फ्लायओव्हरखालच्या अंधारल्या जागी पडून असणारी जिवंत कलेवरे यात आहेत आणि लखलखीत उजेडात न्हाऊन निघालेलं नाइट लाईफही यात आहे. मुंबईवर प्रेम असणाऱ्यांना हे आवडेल आणि ज्यांना रात्रीच्या मुंबईचं रूप ठाऊक नाही त्यांनाही हे पुस्तक आवडेल.

गुरुवार, १५ मे, २०२५

खडीच्या चोळीवर ..

खडीच्या चोळीवर 

जात्यावर दळण दळताना या स्त्रियांच्या मनात जे जे काही चालले असेल त्याला त्या शब्दबद्ध करत असत. कोणताही विषय त्यांनी वर्ज्य ठेवला नव्हता. अगदी बाहेरख्याली संबंध असो वा अन्य कुठले झेंगट असो त्यावरही या स्त्रिया व्यक्त होत असत. मग एकीने जात्याची पाळी नीट करत करत हा विषय छेडला की तिच्या पुढची जी असे ती याला जोडूनच दुसरी ओवी गाई. हा सिलसिला दळण संपेपर्यंत जारी राही. तोवर अनेकींची मने मोकळी होऊन गेलेली असत. कुणा एकीच्या मनात बऱ्याच दिवसापासून साठून असलेले मळभ रिते झालेले असे. या ओव्या अगदी थेट टीका करणाऱ्या नसत, त्यात प्रतिके असत. अशा गोष्टींची थेट वाच्यता होत नसे आणि तशी ती केलीही जात नसे. कारण तो समाज काही मर्यादा बाळगून होता. आतासारख्या सगळ्या गोष्टींचा चोथा केला जात नसे आणि कुणाचीही इज्जत सार्वजनिक रित्या उधळली जात नसे. तरीदेखील हा घाव वर्मी बसेल अशी त्यातली शब्दरचना असे.

गुलमोहर आणि डियर बाओबाब – वेध एका रंजक गोष्टीचा!

डियर बाओबाबचे मुखपृष्ठ   

आईवडिलांपासून, मायभूमीपासून दुरावलेल्या एका मुलाची आणि एका निहायत देखण्या झाडाची ही गोष्ट..
गुलमोहराला बंगाली, आसामीमध्ये कृष्णचुर म्हटले जाते! कृष्णाच्या मस्तकावरचा मुकुट या अर्थाने हे नाव आहे. तर उडीयामध्ये नयनबाण असं नाव आहे. इंग्लिशमध्ये याची पुष्कळ नावे आहेत, त्यातले mayflower नाव सार्थ आहे. तीव्र उन्हाने बाकी सगळी फुले अवघ्या काही दिवसांत तासांत कोमेजून जात असताना ऐन वैशाखात, लालबुंद गुलमोहोर अक्षरशः दहा दिशांनी बहरून येतो!

गुलमोहरावर बंगाली, आसामी भाषेत काही देखण्या कविता केल्या गेल्यात. त्याला राधा आणि कृष्णाचे संदर्भ आहेत.