
शब्दाचे रुपांतर अणकुचीदार बाणात आणि आशयाचे रुपांतर ज्वालामुखीच्या उद्रेकात झाले तर निर्माण होणारे काव्य कोणत्या प्रकारचे असेल असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचे निसंशय उत्तर दलित साहित्य असेच असेल ! त्यातही नेमके पृथक्करण करायचे झाले तर विद्रोही दलित कवितांचे नाव घ्यावे लागेल.
‘एक दिवस मी परमेश्वगराला
आईवरून शिवी दिली :
तो लेकाचा फक्कन हसला.
शेजारचा जन्मजात बोरुबहाद्दर उगीचच हिरमुसला,
एरंडेली चेहरा करून मला म्हणाला :
"तु असा रे कसा, त्या निर्गुण निराकार
अनाथ जगन्नाथाला काहीतरीच बोलतोस ?
शब्दांच्या फासात त्याचा धर्मफणा धरतोस ?"
पुन्हा एकदा मी कचकून शिवी दिली,
विद्यापीठाची इमारत कमरेपर्यंत खचली,
माणसाला राग का येतो या विषयावर
आता तेथे संशोधन सुरु आहे,
उदबत्तीच्या घमघमाटात भरल्या पोटाने
भावविव्हळ चर्चा झाली,
माझ्या वाढदिवशी मी परमेश्वराला शिवी दिली..
शिवी दिली,शिव्या दिल्या, लाटांसारखे
शब्दाचे फटकारे मारीत मी म्हटले,
‘साल्या! तुकडाभर भाकरीसाठी
गाडीभर लाकडं फोडशील काय?
चिंधुक नेसल्या आईच्या पटकुराने
घामेजले हाडके शरीर पुसशील काय?
बापाच्या बिडीकाडीसाठी
भावाबहिणीची हाडके झिजवशील ?
त्याच्या दारूसाठी भडवेगिरी करशील ?
बाप्पा रे,देवबाप्पा रे ! तुला हे जमणार नाही,
त्यासाठी पाहिजे अपमानित
मातीत राबणारी,
प्रेम करणारी मायमाऊली.......'
एक दिवस मी परमेश्वराला आईवरून शिवी दिली.