रविवार, २२ जानेवारी, २०१७

सोशल मीडियावरील आवर्तने - डिजिटल कालपर्वातले सर्वाधिक प्रभावी हत्यार !


सोशल मिडीयाला हाडूक लागते चघळायला. एखादी घटना घडली की तिच्या अनिवार लाटा येतात आणि त्या घटनेचा बहर ओसरला की या लाटाही ओसरतात. मग नवी घटना घडते आणि तिच्या लाटा येतात. या लाटांना काहीही पुरते. अगदी 'कटप्पाने बाहूबलीला का मारले' यावरदेखील लोकांनी आपल्या भिंतींवर नक्षी करून ठेवली होती. अण्णा हजारेंनी केलेल्या रामलीला मैदानापासूनच्या ते अगदी परवाच्या कठुआ बलात्कार-खून प्रकरणाच्या लाटा देशाने पाहिल्यात, कळत नकळत यात सारेच सामील झाले. टूजी स्पेक्ट्रम, कोल ब्लॉक, कॉमनवेल्थ, रामदेव बाबाचे फसलेले आंदोलन, आसारामची अटक, निवडणूकीतले सत्तापालट, मोदींचे सत्ताग्रहण, बाळासाहेबांचे निधन, भीमा कोरेगावची दंगल, अखलाकची हत्या, गोरक्षकांचा हैदोस, केरळ-बंगालमधील राजकीय धार्मिक हत्या, विराटचं लग्न, आयपीएलचा धिंगाणा, निर्भयाचं आंदोलन आणि आता कठुआ- उन्नावची घटना. याच्या जोडीला सणवार, जयंत्या, पुण्यतिथ्या, 'डे'ज, इव्हेंट्स यांची झालर असते. अशा अनेक घटना सातत्याने घडत राहतात. या घटना घडताच ताबडतोब प्रतिक्रिया द्यायला लोक बाह्या सरसावून पुढे येतात, जणू काही आता हे बोलले नाही तर आभाळ कोसळणार ! प्रत्येकाला वाटते की आपण प्रत्येक मुद्द्यावर बोललेच पाहिजे. पण हजारो जण जरी आपलं अकाऊंट बंद करून गेले तरी सोशल मिडीयाला फरक पडत नसतो. पण जो तो आपल्या वकुबानुसारची भाषा वापरू लागतो -
काही युजर्सच्या कॉमेंटस, पोस्ट्स अगदी टोकाला गेलेल्या असतात -
"याला चौरंगा केला पाहिजे" -
अरे भावा, मग वाट कशाची बघतोस, गाडीला किक मार आणि स्वतःच्या हाताने ते पुण्यकर्म करून ये ना !
"यांची गर्दन छाटली पाहिजे" -
बाळ, ही घे तलवार आणि छाटून ये
"फोडून काढा यांना" -
तू की बोर्डवर बाळंतकळा देत बसणार आणि लोकांना सांगणार की यांना फोडून काढा ! तू का जात नाहीस बाबा !
असं जर यांना कुणी समजावत राहिलं तर लोक त्याचेच डोके खातील तर नाहीतर फोडतील तरी ! या आधीच्या काळात मात्र असे नव्हते.

लोक पूर्वीही प्रतिक्रिया द्यायचे पण त्याची माध्यमे वेगळी होती. क्वचित प्रसंगी वर्तमानपत्रात वाचकांची मते वा पत्रव्यवहार वा तत्सम नावाखाली लोक आपली प्रतिक्रिया देत. यातली भाषा सौम्य आणि शालीन होती हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही.

सोशल मीडिया नव्हता तेंव्हाचं जग सुलभ नसलं तरी अधिक वास्तववादी होतं. याचं सिंहावलोकन करताना आपल्या लक्षात येईल की आपल्या देशात जेंव्हा वर्तमानपत्रे जेंव्हा सुरु झाली तेंव्हाचा काळ आणि आताचा काळ यात इतकं मोठं अंतर पडलं आहे की त्या काळातील काही गोष्टी आता दंतकथाच वाटू लागल्यात. वर्तमानपत्राचा आरंभकाळ त्याच्या प्रकाशनासाठी जितका जिकिरीचा होता त्याहून अधिक दुर्दम्य मेहनतीचा होता. अक्षरांचे खिळे जुळवून हातपाय मारून चालणारया मुद्रणयंत्रावर त्याची छपाई केली जायची. एकेक वाक्य जुळवावे लागे मग कॉलम, मग सदर आणि मग पृष्ठरचना होई. पुढे जाऊन डीटीपी, ऑफसेट आणि आताची संपूर्णतः डिजिटल प्रिंटींग यंत्रणा आली मग मुद्रण, प्रकाशन अधिकच सुलभ झालं. याच्या जोडीला मागील दोनतीन दशकात भरमसाठ वृत्तवाहिन्या जगभरात सुरु झाल्या. वर्तमानपत्रेही देशपातळीवर एकाच वेळी प्रकाशित होऊ लागली आणि विविध भाषा, प्रांताच्या वृत्तवाहिन्याही चोवीस तास बातम्या पुरवू लागल्या. माहितीच्या भडीमारानं माणसं नुसती भंडावून गेली. सोबत एक क्रांतिकारी बदल एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी घडला तो म्हणजे इंटरनेटवरून व्यक्त होण्याचा ! पूर्वी वर्तमानपत्रातील, नियतकालिकातील घटना माणूस नुसता वाचायचा. एखादा हौशी वाचक 'वाचकांची पत्रे'मधून आपला विचार कळवायचा. पण याचं एकूणातलं प्रमाण अत्यंत नगण्य होते. विविध वृत्तवाहिन्यांवरील घडामोडी पाहिल्या जायच्या पण त्यावर आपलं मत काय आहे हे कोणालाही मांडता येत नव्हते. दरम्यान सर्व अग्रगण्य वृत्तपत्रांनी इंटरनेट आवृत्तीपासून ई-पेपरचा उपक्रम सुरु केला मग मात्र बातम्यांची लढाई हातघाईवर आली आणि लोकांना यावर व्यक्त होण्याची आत्यंतिक गरज वाटू लागली. 'गरज ही शोधाची जननी आहे आणि तिचा वेळेवर लाभ घेतला पाहिजे' हे आपल्यापेक्षा चतुर असलेल्या पाश्चात्त्यांना अधिक ठाऊक असल्याने त्यांनी जगभरातील लोकांना एकाच प्लॅटफॉर्मवर व्यक्त होता येईल अशी डिजिटल प्रसारमाध्यमं बाजारात आणली. हे माध्यम म्हणजेच सोशल मीडिया ! अगदी सुरुवातीला काही अपवाद वगळता ज्यांच्याकडे संगणक होते तेच लोक सोशल मीडिया वापरत. मात्र लवकरच हा लौकिक इतिहासजमा झाला.

जगभरात स्मार्टफोनचं प्रस्थ बोकाळल्यावर सोशल मीडिया अस्ताव्यस्त स्वरुपात सर्वत्र अक्षरशः फोफावला. एव्हाना त्यातही साठमारी सुरु झाली होती. सुरुवातीला लॉन्च झालेल्या ऍप्लिकेशन्सनी यात बाजी मारली हे जितके खरं तितकंच हेही सत्य आहे की, जी ऍप्लिकेशन्स कामचलाऊ, दिखाऊ होती ती हळूहळू मागे पडत गेली आणि त्यांची जागा परिपूर्ण व नव्या पिढीची फोटोजेनिक भाषा बोलणाऱ्या सेल्फीप्रवण ऍप्सनी घेतली. बघता बघता लहानथोरांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना याची भुरळ पडली. जिकडे तिकडे स्मार्ट फोन आणि त्यात गुंतलेली माणसं नजरेस पडू लागली. 'फेसबुक', 'व्हॉटसऍप', 'ट्विटर', 'इंस्टाग्राम', 'लिंक्डइन', 'युट्युब', 'स्काईप', 'पिंटरेस्ट' ही नावं लोकांना कधी आणि कशी पाठ झाली ते कळलं देखील नाही. आता तर अशी परिस्थिती आहे की स्मशानभूमीपासून ते मंदिरापर्यंत आणि इस्पितळापासून ते पार्कींग लॉटपर्यंत लोकं कुठेही स्क्रीनवर बोटं सरकावताना नजरेस पडतात. सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन्स, एसटी स्टॅन्ड, रोडवेज, फ्लायवेज, कॉलेजेस आदी जागांवर तर याचा अतिरेक होऊ लागल्याचं दिसून येतेय. आपल्या शेजारी बसलेला जिवंत आहे की 'गेलाय' याचेही भान न राहावे इतके लोक यात रमून गेलेले असतात. आजूबाजूच्यांशी बोलणं खुंटत चाललंय पण आभासी विश्वातील हजारो किलोमीटर अंतरावरील मित्रमैत्रिणीशी मात्र तासंतास लोक चॅटींग करताना दिसताहेत. त्यातून जशा गमतीजमती घडल्यात तशा दुर्घटनाही घडल्यात. एकाच घरातील नवरा बायको फेक आयडीवरून एकमेकाशी चॅट करताना गंडले गेलेत, लग्ने जुळण्यापासून ते घटस्फोट होण्यापर्यंत आणि जीव वाचवण्यापासून ते थेट दंगली, युद्धे भडकावण्यापर्यंतचे गुण सोशल सोशल मीडियानं उधळले आहेत. आताच्या काळात कळत नकळत सोशल मीडिया हे सर्वात घातक आणि प्रभावी अस्त्र झाले आहे हे कुणी नाकारणार नाही अशी परिस्थिती झालीय.


सोशल मीडियाप्रती लोकांचं आकर्षण का वाढलं या मुद्द्यावर केल्या गेलेल्या अभ्यासानुसार सोपं कम्युनिकेशन, सहजता या आकर्षणाबरोबरच वाढते ताणतणाव, अपेक्षा, स्वप्नांची ओढ यामुळे लोक याकडे ओढले गेले आणि नंतर मात्र आपल्या मनातलं प्रेम, माया, आस्था, स्नेह व्यक्त करता करता लोकांच्या मनातील द्वेष, मत्सर, क्रोध, मोह, वासना यांनाही व्यक्त होण्याची संधी मिळाली आणि लोक काय वाट्टेल ते शेअर करू लागले. मग जगभरात याचे कायदेकानूनही निघाले पण सोशल मीडीयावरील नेटीझन्सनी अद्याप तरी त्याला भीक घातलेली नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जगभरात उमटलेलं अक्राळ विक्राळ स्वरूप हाच सोशल मिडीयाचा आताचा चेहरा आहे. आपल्याला न पटणारया कोणत्याही धोरणाचा निषेध कॉमनमॅन आपल्या वनबीएचकेच्या फ्लॅटमध्ये बसून करु लागला. आपल्या दारातील झाडांना कधी पाणी न घालणारा जागतिक पर्यावरणावर लंबेचौडे लेक्चर झाडू लागला, पक्षांना छतावर पाणी ठेवण्यापासून ते ह्युमनबॉम्बच्या सुचनेपर्यंतच्या अवाजवी आगंतुक माहितीने उच्छाद मांडला. अध्यात्मिक बाबा, गुरुंपासून ते थेट पंतप्रधानापर्यंत सर्वांनी आपले स्टेटस अपडेट करण्याचा सपाटा लावला आणि बघता बघता असा काळ आला की रस्त्यावरला भणंग फिरस्ता देखील ही साधने हाताळू लागला !


या सगळ्या गदारोळात लहान मुलेदेखील ओढली गेली. मैदाने ओस पडू लागली, ग्रंथालयातली गर्दी कमी होऊ लागली. वृद्धांना देखील या माध्यमाचा टाईमपास म्हणून चांगला पर्याय मिळाला. दुरावलेले मित्र जसे जवळ आले तसे नवे दुश्मनही याने तयार झाले. घरात बसून असणाऱ्या बायकामुलींना याचा आधी आधार वाटला आणि पुढे त्याचे व्यसन झाले ! तरुणाई तर यात इतकी मश्गुल झाली की त्यांना खाण्यापिण्याची भ्रांतही राहिनाशी झाली. इतके सारे घडत असताना उद्योग जगतदेखील यात दाखल झाले. बिझिनेस कॉर्पोरेट्सपासून ते चपराशापर्यंत सर्वांचे प्रोफाईल बनले गेले. राजकारणी लोकांनी देखील आपल्या मतदारांपासून ते कार्यकर्त्यापर्यंत आपली सक्रियता दाखवून देण्यासाठी सोशल मिडीयाला निवडले. सोशल मीडियावर नसलेला माणूस हा आता 'मागासलेला' समजला जातो की काय अशी वेळ आता आलीय.

सोशल मीडिया हाताळण्याची प्रत्येक वयोगटाची पद्धतही अनोखी आणि वेगवेगळी आहे. वय, लिंग, उपजीविका आणि बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक जडणघडण यानुसार सोशल मीडियावर व्यक्त होण्याचं माध्यम निवडलं जातं. 'इंस्टाग्राम'बद्दल असं बोललं जातं की स्वतःच्या प्रतिमाप्रेमात पडलेली माणसं जास्ती करून या माध्यमात रमतात कारण इथे अपलोड होणारी फोटोंची संख्या ! टीन एजर्स फोटोग्राफी, सेल्फीविश्व, चित्रसृष्टीशी निगडीत लोकं या माध्यमात खूप रमतात. दिवसभर आपल्या विविध छब्या डकवून त्यावर लोकांच्या रिऍक्शन जाणून घेणं यात कोट्यावधी युजर्स गुंतून पडले आहेत. मोस्ट फोटोजेनिक ऍप म्हणून याकडे पाहिले जाते. आताच्या यंग जनरेशनपैकी अनेकांच्या पहिल्या लुक्सची सुरुवात इथून होत्येय हे विशेष ! 'इंस्टाग्राम'वर किती फॉलोअर्स आहेत यावरून एखाद्या अभिनेत्रीची क्रेझ ठरते यावरून या माध्यमाची लोकांच्या मनावर असणारी पकड ध्यानी यावी.

'लिंक्डइन'चा जास्ती वापर मिटींग्ज, डेली रुटीन शेअरींग, इन्फो मेसेजेस आणि डाटा शेअरींग सोबतच बिझिनेस कम्युनिटीसाठी होतो. त्यामुळे या माध्यमात टीन एजर्स खूप कमी आढळतात, व्यावसायिक आणि नोकरदार माणसे मात्र यात मोठ्या प्रमाणात दिसतात. याचा वापर करून अनेकांनी नवीन मोड्यूल्स तयार केली आहेत. अनेक सेवानिवृत्त लोकांना आपले अनुभव शेअर करण्यापासून ते त्याचे नवे मुल्यांकन मिळण्यापर्यंत अनेक फायदे झाले आहेत. यामुळे हे माध्यम वापरणारे काही विशिष्ट वर्गातले लोक जास्ती आढळतात. 'पिंटरेस्ट' हे माध्यम 'इंस्टाग्राम' आणि 'लिंक्डइन'चे कॉम्बिनेशन ठरावे असे आहे. यातल्या फोटो पीनचा वापर करून काहींनी आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यात यश मिळवलेय. सुरुवातीच्या काळात 'व्हॉटसऍप'कडे उपयुक्त माहितीप्रसारक माध्यम म्हणून पाहिले गेले पण आता त्याचा राक्षस झाल्याचे पाहायला मिळतेय. अफवा पसरवण्यापासून ते फोटोशॉपद्वारे लोकांना उपद्रव देण्यासाठी,ज्ञानबिडीचा धूर पसरवण्यासाठी याचा वापर होतोय. काही लोक तर चोवीस तास यावर पडीक असतात.

लहान बाळाचे बाळूते त्याची आई जशी सातत्याने तपासत राहते तसे हे लोक सतत 'व्हॉटसऍप' ओपन करून काही नवीन तर आले नाही ना याची खात्री करून घेत असतात. कमी शब्दात मनातली मळमळ. तळमळ व्यक्त करण्यासाठी आजमितीला जगभरातील सर्वच क्षेत्रातील अग्रगण्य लोकं 'ट्विटर'चा सढळ हाताने उपयोग करताना दिसतात. सर्वसामान्य माणसेही या टिवटिवाटात सामील होऊन एकमेकाची ट्विटस इकडे तिकडे फिरवत बसतात. एका ट्विटवरून आता देशभरात गहजब उडू शकतो हे अनेकांनी ओळखले आहे तर आपण ज्याचे तोंडही बघत नाही अशा माणसावर आपण तोंडसुख घेऊ शकतो याचे इंगितही याच माध्यमाने अचूक हेरले आहे. ट्विटरवरही टीन एजर्स आणि तरुणवर्ग इतरांच्या तुलनेने कमी आढळतो. फोटोजेनिक 'ट्विटस' हा फंडाही बरेचजन अवलंबतात.

आपल्यापासून दूर असलेल्या लोकांशी लाईव्ह व्यक्त होण्याची संधी 'स्काईप'ने दिलीय त्याचा फायदा तरुणाई घेताना दिसते. तर क्रूरकर्म्या अतिरेक्यापासून ते नुकत्याच प्रसूती पार पाडलेल्या मातेपासून अख्खं जग 'युट्यूब'वर ध्वनीचित्रफिती अपलोड करताना दिसतं. 'यु ट्यूब'नं जगाला इतकं जवळ आणलं की कुठं जरी खुट्ट वाजलं की त्याची चित्रफीत काही अवधीत यावर आलेली दिसते. शिवाय सिनेमावेड्या लोकांना या माध्यमाचा मोठा लाभही झाला आणि पायरसीचा ब्रम्हराक्षसदेखील इथे उभा ठाकला. 'यु ट्यूब'वर वृद्धांचा आणि प्रौढांचा वावर कमी असून तरुण आणि मध्यमवयीनांचं हे आवडतं दृकश्राव्य माध्यम आहे.

सोशल मीडियात सर्वाधिक वापरलं जाणारं आणि सामाजिक क्रांतीपासून ते तख्तापालट करण्यापर्यंतची ताकद बाळगून असलेलं माध्यम म्हणून आजही 'फेसबुक'कडं पाहिलं जातं. ‘फेबु’वर टीनएजर्स येतात पण त्यांचे विश्व मित्र, प्रेम,कुटुंब यात सीमित असते. तर तरुणाई आपलं करिअर, आपले नवजीवन, सहजीवन यावर भरभरून व्यक्त होते. गद्धेपंचविशी ओलांडलेले विवाहित मात्र सर्व विषयांचा आस्वाद घेताना दिसतात. वृद्धत्वाकडे झुकलेले लोक देखील विरंगुळा म्हणता म्हणता यात नकळत रममाण होतात, त्यांचं विश्व त्यांच्या अनुभवाबरोबरच नव्या पिढीला समजून घेणारे असते. जगभरातील विचार, लेखन, चळवळी आणि आंदोलने यांना फेसबुकने एक चेहरा दिला. अनेकांना लिहितं करणारे हे माध्यम खऱ्या अर्थाने सोशल आहे पण तितकेच त्याचे असामाजिक रंग देखील आहेत. कारण यावरही लोक आपले हेवेदावे सोडत नाहीत, आपली विखारी अभिव्यक्ती विसरत नाहीत, आपला अभिनिवेश त्यागत नाहीत. सोशल मीडियाने वर्तमानपत्रे बंद पडतील असा कयास मांडणारे मात्र तोंडावर पडले आहेत कारण आजही वर्तमानपत्रातील विश्वसनियतेची जागा सोशल मीडियाला घेता आलेली नाही. लोक सोशल मीडियाच्या व्यसनापासून मुक्त व्हावेत म्हणून त्याची व्यसनमुक्ती केंद्रे उभी राहिली आहेत इतकी भयानक वेळ येऊनही वर्तमानपत्रे टिकून आहेत ती केवळ आणि केवळ विश्वास आणि सामाजिक कल्याणकारी भूमिकांच्या जोरावरच. पण अलीकडील काळात काही वर्तमानपत्रेच या समजाला छेद देताना दिसत आहेत हा कदाचित सोशल मीडिया चा वर्तमानपत्रातला नवा मुद्राराक्षसच म्हणावा लागेल. सोशल मीडियाच्या गणितात म्हणूनच बेरीज कमी आहे आणि वजाबाकीच जास्ती आहे.

सोशल मीडियाचं मुख्य अंग असलेलं व्हॉटसऍप हे ऍप भारतात २०१० मधे आले. तर सप्टेबर २००६ ला फेसबुक तर ऑक्टोबर २०१० मध्ये इन्स्टाग्राम भारतात आले. २०१२ मध्ये ट्विटरचे केवळ पन्नासेक लाख भारतीय युजर होते ते २०१४ मध्ये दिड कोटी झाले. या सर्वांची सुरुवातीची दोनेक वर्षे स्थिरावण्यात गेली. ही ऍप्स मनमोहनसिंग सरकारच्या कारकिर्दीत रीतसर परवानगीने दाखल झाली. वास्तवात या ऍपचा काय आणि कसा उपयोग केला जाऊ शकतो हे तत्कालीन सरकारच्या ध्यानी आले नसावे वा त्यांनी याच्या खोलात जाऊन तसे प्रयत्नही केले नाहीत. परंतु विरोधी पक्षात असलेल्या भाजपने मात्र याची उपयुक्तता आणि उपद्रव क्षमता दोन्ही जोखून आपल्या पक्षाचे सोशल मीडिया सेल उभे करत याचा हवा तसा वापर करून घेतला. असे आयटी सेल नंतर सर्वच पक्षांनी स्थापन केले.

२०१२ पासून आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुकांचे वारं वाहत होतं. काँग्रेसवर होत असलेल्या भ्रष्टाचार, दहशतवाद, अनागोंदीच्या अतोनात आरोपांमुळे २०१४ ची निवडणूक जड जाणार हे नक्की होते. भाजपकडून वातावरणनिर्मिती होईपर्यंत लालकृष्ण आडवाणी यांचे नाव पुढे होते. परंतु २०१३ च्या मध्यास जसजसे नरेंद्र मोदी यांचं नाव पुढे येऊ लागले तसतसे प्रचार आणि आरोपांचे चित्र बदलू लागले. हा तोच काळ होता जेंव्हा सोशल मीडियाच्या सर्व माध्यमातून सोनिया गांधी, मनमोहनसिंग, राहुल गांधी यांच्या मॉर्फ केलेल्या प्रतिमा वापरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची चिखलफेक करण्यात येत होती. सामान्य माणूस यात गंमत आणि विनोद म्हणून सामील होत गेला. महात्मा गांधींच्या नृत्य करतानाच्या छबीच्या गैरवापराच्या पोस्टपासून ते गांधी घराणे हे आधी पक्के मुसलमान होते, पंडीत नेहरू किती अय्याश होते अशा कंड्या एकीकडे पिकवल्या जात होत्या आणि गुजरात हेच विकासाचे कसे सुपर मॉडेल आहे ; तिथे सर्वात जास्त लांबीचे कालवे, विमानतळासारखी बसस्थानके, जगात कुठेही नसणाऱ्या (?) पाईपलाईन्स, डिजिटल सरकारी कार्यालये कशी अस्तित्वात आहेत यांचं अतिरंजित वर्णन करणारया पोस्ट पेरल्या जाऊ लागल्या. (विशेष बाब म्हणजे मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून गुजरातचा गोडवा गाणाऱ्या पोस्ट जाणवेल अशा वेगाने बंद झाल्या) मागील सरकारने किती वाट्टोळे केलं हे सांगताना खोट्यानाट्या आकडेवाऱ्या दिल्या जाऊ लागल्या. हे काँग्रेसच्या लक्षात आल्यावर तेंव्हाचे माहिती प्रसारण मंत्री कपिल सिब्बल यांनी सोशल मीडियावर देखरेख ठेवून त्यावर निर्बंध लावले जातील असे सांगताच भाजपने केलेला देशव्यापी आक्रोश कुणी विसरले नसेल. मात्र सत्तेवर येताच आपल्या विरोधात सोशल मीडियावर आवाज उठायला सुरुवात झाल्यावर मोदी यांनीही तेच धोरण अवलंबण्याचा प्रयत्न केला होता हे नोंद घेण्याजोगं आहे. एकेकाळी काँग्रेस नेत्यांचे हवं तसं चारित्र्यहनन करणाऱ्या सोशल मीडियावरून भाजपविरुद्ध हलकासा आवाज उठू लागला तर तो ही त्यांना सहन होईनासा झाला. नेत्यांविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरणे हा गुन्हा ठरवला गेला. हेच नियम २०१० पासून लावले गेले असते तर निम्मा आयटी सेल तुरुंगात असला असता. दरम्यान आपसातला राजकीय विखार इतका वाढला की त्यातून सामाजिक एकतेची वीण कधी उसवू लागली हे लोकांच्या लक्षातही आले नाही. आपल्या जाहीर सभातून वा वार्तालापातून अनेक भाजप नेत्यांनी, मंत्र्यांनी दिशाभूल करणारी वक्तव्ये बऱ्याचदा केली आहेत, चुकीची माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांनी त्यातला फोलपणा समोर आणल्यावरही वक्तव्याची दुरुस्ती त्यांनी केली नाही. काँग्रेसचे काही नेतेही आपल्या भाषणातून चुकीचे संदर्भ, आकडेवारी देताना पॉइंटआऊट झाले आहेत. पण त्यांनी नंतर त्या चुका सुधारून तरी घेतल्या आहेत तसे भाजपकडून क्वचित होताना दिसले आहे. मग मुख्य नेत्यांच्या बेताल वर्तणुकीचा आदर्श त्यांच्या समर्थकांनी घेतला. खोटी माहिती देण्याचा हाच कित्ता सामान्य माणसांनी गिरवला.

कुठलेही व्हिडीओ, वेबलिंक्स, मॉर्फ इमेजेस, फेक फिगर्स वापरून हवा तो परिणाम साधणे हा व्हॉटसऍपचा केंद्रबिंदू झाला. 'मारा', 'कापा', 'चौरंगा करा', 'चिरडून टाका' हे परवलीचे शब्द बनले आणि नेत्यांची प्रक्षोभक भाषणं, बेताल वक्तव्य यांनी आगीत तेल ओतण्याचं काम केले. मनामनात हिंसा असलेल्या गर्दीचं यामुळं उग्र जमावात रुपांतर होत गेलं तर कधी एकट्याने हिंसक कारवायां होऊ लागल्या. गर्दीच्या मानसिकतेचा एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे या गर्दीचा स्वतःचा एक मेंदू. गर्दीच्या डोक्यात जे किडे वळवळत असतात त्यानुसार ती गर्दी वागत असते. कधी गोमांस बाळगल्याच्या तर कधी गोहत्या केल्याच्या संशयावरून बेभान झालेल्या गर्दीनं एकट्या दुकट्या माणसाला ठार मारायला सुरुवात केली. कधी चोरीचा आळ, छेडखानी, धार्मिक विडंबना, भावना दुखावणे, अपहरण वा नुसताच संशय- भीती अशी कोणतीही कारणे एखाद्या निरपराध निशस्त्र माणसाला ठेचून मारण्यासाठी गर्दीला पुरेशी ठरू लागली. हे ज्याला जमलं नाही तो आपल्या मनातले विकृत स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी वाट्टेल त्या अफवा पेरू लागला. एका आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षभरात देशभरात जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या १३ घटना घडल्या असून, त्यात २७ जणांची हत्या झाली आहे. यात सोशल मीडियातून पसरवल्या गेलेल्या फेक व्हिडीओ, फोटो आणि माहितीचा मोठा हात होता. असं असलं तरी सत्तेतील एक मुख्य घटक सोशल मीडिया अधिकाधिक लोकप्रतिनिधींनी वापरला पाहिजे असे सांगतानाच त्यातल्या अनेक अनिष्ट प्रथांना बळ देत होता.

सोशल मीडियाचा हा अतिरेकी आग्रह कुणाच्या फायद्यासाठी केला जातोय हे कुणीही ओळखू शकते. काही दिवसापूर्वी ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या भ्याड हत्येनंतर अत्यंत विकृत भाषेत त्यांच्याबद्दल गरळ ओकले गेलं. हे लाजिरवाणं कृत्य करणाऱ्या काही लोकांना पंतप्रधान मोदी फॉलो करतात हे माध्यमांनी लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी यावर मौन धारण केलं. कोणतीही गोष्ट बूमरँगसारखी उलटू शकते. या बाबतीतही असेच झाले. एका मुस्लीम तरुणाशी विवाह केलेल्या लखनौमधील हिंदू महिलेच्या पासपोर्टवरून नुकताच गदारोळ झाला. या दांपत्याचे म्हणणे होते की, पासपोर्ट कार्यालयात धार्मिक कारणामुळे शेरेबाजी झाली. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे त्यांनी न्याय मागितला. स्वराज यांनी तक्रारीची दखल घेताच या दांपत्याला लगेच पासपोर्ट देण्यात आला. स्वराज यांनी त्या स्त्रीस मदत करताच ज्यांच्या डोक्यात 'लव्ह जिहाद'चा किडा वळवळत होता त्यांनी स्वराज यांच्यावर अत्यंत वाईट शब्दांत विखार ओकला. इंद्रा वाजपेयी या ट्विटर हॅंडलवरून एका व्यक्तीनं केलेली टीका उदाहरण म्हणून देता येईल, "लाज बाळगा मॅडम. हा तुमच्या मुस्लीम किडनीचा परिणाम आहे का?" काही दिवसांपूर्वी स्वराज यांच्यावर किडनीरोपणाची शस्त्रक्रिया झाली त्याचा नीच संदर्भ या व्यक्तीने वापरला. या ट्रोलपैकी बहुतांश ट्रोलर्स भाजपचे समर्थक आहेत, स्वराज यांना ते फॉलोही करतात. स्वराज या १७ ते २३ जून परदेश यात्रेवर होत्या. परतल्यावर त्यांनी ट्विट करत युजर्सना प्रश्न उपस्थित विचारला की, 'अशाप्रकारे ट्रोल करणे योग्य आहे का ?' तर वाईट गोष्ट अशी होती की सोशल मीडियावर तब्बल ४३ टक्के लोकांनी त्यांच्यावरील ट्रोलिंगला बरोबर ठरवले होते. गौरी लंकेश यांच्या हत्येसमयीच्या ट्रोलिंगवर तमाशा बघत बसलेल्या भाजप नेत्यांना स्वराज यांच्यावरील ट्रोलिंग घटनेत नेमकी काय भूमिका घ्यावी हे देखील उमजलं नाही. अखेर एकटे नितीन गडकरी स्वराज यांच्या बाजूने उभे राहिले, मग राजनाथ सिंग यांनी देखील ट्रोल्सवर आपण कारवाई करणार असल्याचे सूतोवाच केले. पण बारीक सारीक घटनेवर बोलणारे पंतप्रधान या घटनेवर मौन राहिले हे खूप बोलकं होतं.


सोशल मीडियातून जे पेरलं तेच आता उगवत आहे. आधी बेगुमान वापरलेलं हे हत्यार आता कुणाच्याच नियंत्रणात नाही. पराकोटीचा द्वेष, हिंसा यांनी आता सामान्य लोकांनाही ग्रासले आहे, वाईट बाब अशी की जे सुशिक्षित आहेत, माध्यमप्रवण आहेत तेच लोक खोटे व्हिडीओ, फोटो वापरून लोकांना हिंसक बनवत आहेत. ज्यांना सोशल मीडिया कसा वापरायचा हेच माहिती नसतं, त्यातल्या तांत्रिक बाबींचं ज्ञान नसतं ते अशिक्षित अडाणी लोक हे काम करू शकणार नाहीत. म्हणूनच हे काम सुनियोजितही असू शकतं. व्हॉटसऍपवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे काही दिवसापूर्वीच्या घटनेत पुरोगामी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात भिक्षुकी करणाऱ्या भटक्या जमातीच्या पाच निरपराध लोकांना शेकडो लोकांच्या बेभान जमावाने क्रूरपणे ठेचून मारलं. यानंतर सरकारने जागं झाल्याचं सोंग केलं. यंत्रणांनी कारवाईचे देखावे सुरु केले. ४ जुलैला व्हॉट्सऍपने देखील खेद व्यक्त करण्याची औपचारिकता पार पाडत 'यावर अधिक सजगता बाळगली जाईल' अशी हवा सोडली. मुळात हा प्रश्न असा एका दिवसाचा वा एका घटनेचा नाही. याला प्रदीर्घ पूर्वनियोजित गैरवापर कारणीभूत आहे. आपल्याला पाहिजे तसा गैरवापर करताना खोटे व्हिडीओ पाठवणे, खोट्या आकडेवारीवर आधारित माहितीचा डोंगर उभा करणे, प्रतिस्पर्ध्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणं याचं या राजकारण्यांना काहीच वाटलं नाही. आधी विरंगुळा म्हणून हाती आलेला सोशल मीडिया नंतर व्यसनात रुपांतरीत झाला आणि सामान्य माणूस देखील आपली विकृती यातून खुलेआम व्यक्तवू लागला. या विकृतीला केवळ घटनासापेक्ष पाहून चालणार नाही तर याच्या मुळाशी जाणं अपेक्षित आहे.

धुळयातील मॉब लिंचिंगच्या घटनेस कारणीभूत ठरलेला व्हॉटसऍपवर व्हायरल झालेला मूळ व्हिडीओ पाकिस्तानातील एका एनजीओने लोकजागृतीसाठी बनवला होता, त्यातला अर्धाच भाग कापून त्यावर एडिटिंग करून आपल्या भागाचे उल्लेख त्यात जोडत लोकांत संभ्रम निर्माण केला गेला. लोक त्याला बळी पडत गेले. मागे पाकिस्तानात मारहाण झालेल्या चोरांचा व्हिडीओ वापरून उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूर येथे सप्टेबर २०१३ मध्ये हिंदू-मुस्लीम दंगल घडवून आणली होती. यानंतर संपूर्ण राज्यात धार्मिक ध्रुवीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झाले की पुढील निवडणुकात त्याचे प्रतिबिंब उमटले. भाजपाला प्रचंड लाभ झाला. नंतर तिथेही तपासाचे नाटक पार पडले पण जे नुकसान व्हायचं होतं ते होऊन गेलं. लोकांची मने दुभंगली गेली. आजवर अशा अनेक घटना घडल्या आहेत. यातून घडलेल्या हत्याकांडाचा तथाकथित तपास उरकला जाईल पण चांगल्या हेतूंसाठी निर्मिलेल्या सोशल मीडियाला आपल्या स्वार्थासाठी विकृत पद्धतीनं भरकटवणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं धाडस आपल्या तपास यंत्रणा करणार नाहीत हे नक्की आहे !

मुळात याबाबत सामान्य माणूस जागृत नाही. तो सोशल मीडियाचा नेटका आणि नेमका वापर करत नाही, किंबहुना त्याला यातल्या चांगल्या उपयुक्त बाबी कमी माहिती आहेत आणि अराजक माजवणाऱ्या बाबी अधिक ठाऊक आहेत. तो सोशल मीडियावर येत असलेल्या अनिवार लाटांवर कसा स्वार होतो हे त्याचे त्याला उमगत नाही इतकं हे गुंतागुंतीचं प्रकरण आहे. खरं तर सोशल मिडीयाला सातत्याने कोणत्या न कोणत्या विषयाचे हाडूक चघळायला आवडते. एखादी घटना घडली की तिच्या अनिवार लाटा येतात आणि त्या घटनेचा बहर ओसरला की या लाटाही ओसरतात. मग नवी घटना घडते आणि तिच्या लाटा येतात. या लाटांना कोणताही विषय पुरतो, अगदी 'कटप्पाने बाहूबलीला का मारले' यावरदेखील लोकांनी आपल्या भिंतींवर नक्षी करून ठेवली होती. अण्णा हजारेंनी केलेल्या रामलीला मैदानापासूनच्या ते अगदी परवाच्या कठुआ बलात्कार-खून प्रकरणाच्या मीडियाच्या लाटा देशाने पाहिल्यात, कळत नकळत यात सारेच सामील झाले. टूजी स्पेक्ट्रम, कोल ब्लॉक, कॉमनवेल्थ, रामदेव बाबाचे फसलेले आंदोलन, आसारामची अटक, निवडणूकीतले सत्तापालट, मोदींचे सत्ताग्रहण, बाळासाहेबांचे निधन, भीमा कोरेगावची दंगल, अखलाकची हत्या, गोरक्षकांचा हैदोस, केरळ-बंगालमधील राजकीय धार्मिक हत्या, निर्भयाकांड असो की कठुआ- उन्नावची घटना असो लाटा उसळणं नक्की होतं. याच्या जोडीला सणवार, जयंत्या, पुण्यतिथ्या, 'डे'ज, इव्हेंट्स यांची झालर होती. अशा अनेक घटना घडून सातत्याने घडत राहतात. या घटना घडताच ताबडतोब प्रतिक्रिया द्यायला लोक बाह्या सरसावून पुढे येतात, जणू काही आता हे बोलले नाही तर आभाळ कोसळणार !

प्रत्येकाला वाटते की आपण प्रत्येक मुद्द्यावर बोललेच पाहिजे. पण हजारो जण जरी आपलं अकाऊंट बंद करून गेले तरी सोशल मिडीयाला फरक पडत नसतो. जो तो आपल्या वकुबानुसारची भाषा वापरू लागतो, त्यातून युजर्सच्या कॉमेंटस, पोस्ट्स अगदी टोकाला गेलेल्या असतात. एखादी घटना घडल्यावर लोक पूर्वीही प्रतिक्रिया द्यायचे पण त्याची माध्यमे वेगळी होती. क्वचित प्रसंगी वर्तमानपत्रात वाचकांची मते वा पत्रव्यवहार वा तत्सम नावाखाली लोक आपली प्रतिक्रिया देत. यातली भाषा सौम्य आणि शालीन होती हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. तेंव्हाचा काळ आणि आताचा काळ यात मोठं अंतर पडलंय. पूर्वी माणसं तळमळीनं व्यक्त होत आता मजा, विकृती आणि घृणा म्हणून व्यक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कालांतराने व्यक्त होताना लोक चरित्रहनन करू लागले. ज्याची मते खोडून काढता येत नाहीत, ज्यांच्या विरुद्ध तथ्ये मांडता येत नाहीत त्यांचे चरित्रहनन करून त्यांची छबी बिघडवणे हा बुद्धीभ्रष्टतेकडे घेऊन जाणारा विकृत मार्ग सर्रास अवलंबला जाऊ लागला. मग हे शब्दयुद्ध दोन्ही बाजूंनी सुरु झालं. पूर्वी कुणी अशी बदनामी केली तर त्याला न्यायालयात खेचलं जायचं, आता सोशल मीडियाचं हत्यार इतकं धारदार झालंय आहे की त्याच्या निरर्गल प्रकटनाविरुद्ध काहीच केलं जात नाही.

याचाच परिणाम म्हणून सोशल मिडीयावर ट्रोल्स अस्तित्वात आले. एखाद्याने काही विधान केले की त्याला आडवं लावताना सर्व मर्यादा, सर्व स्तर ओलांडून हीनतेची गलिच्छ पातळी गाठत लोकांची टोळधाड त्या व्यक्तीवर येऊन आदळू लागली. परिणामी त्यातले गांभीर्य, प्रभाव कमी व्हावा आणि पोस्टकर्त्याने पुन्हा वाट्यास जाऊ नये हा यामागचा हेतू. आता तर असा काळ आलाय की अनेक राजकीय पक्ष, संघटना विविध ट्रोल्ससाठी आर्थिक प्रयोजन करून ठेवतात जेणे करून विरोधक निष्प्रभ व्हावेत. हा नैतिकतेचा दिवसाढवळ्या होणारा खून आहे ज्याला राजमान्यता मिळाली आहे. या मगजमारीमुळे सर्वसामान्य माणसांची भाषा आणि व्यक्त होण्याची पद्धतही लक्षणीय रित्या बदलू लागलीय. एखादी घटना घडली आणि तिची लाट आली की याचा प्रत्यय सोशल मिडीयाच्या सर्व साधनांवर अनुभवता येतो. अशा प्रसंगी केवळ भडकावणारे लोक जास्त सक्रीय असतात. म्हणूनच सोशल मीडिया हा वावदुक आहे, बोलभांड आहे, न दिसणारं पण अत्यंत टोकदार हत्यार आहे हे ! इथे पावलोपावली आढळतील डोकी पेटवणाऱ्या लोकांचे कंपू, जे धर्माच्या जातीच्या नावावर भडकावतात आणि स्वतः मात्र दारं खिडक्या बंद करून शब्दांचा खेळ करत राहतात. भाबडे लोक मात्र आपली मान कोणाच्याही हाती देतात. सोशल मीडियाच्या हत्यारामुळे कर्तृत्वशून्य आणि अक्कलशून्य लोकांनाही अनेकांना अक्कल शिकवण्याची नामी संधी मिळाली, तर अशा बिनडोक लोकांना भडकावत ठेवून आपली पोळी भाजत राहिलं की आपला प्रचार आपोआप सुरु होतो हे राजकारण्यांना पक्के ठाऊक असते. कुणी तरी एक बाजूची पोस्ट टाकली की त्याच्या विरोधी टोळीचे लोक हजर होतात, कॉपी पेस्टचे गाठोडे सोबत असते, शिवाय काही व्हिडीओ क्लिप्सही असतात. हे कुणी लिहिलं, कधी लिहिलं, कशासाठी लिहिलं, आपणापर्यंत कसे पोहोचलं, व्हिडीओतला माणूस कोण आहे -कुठला आहे - त्याचं नाव गाव काय, तो हे सर्व कुणासमोर आणि कधी बोललेला आहे - कुणी शूट केलंय हे सर्व - यांचे संदर्भ काय, कॉपीपेस्ट मजकूर वा व्हिडीओतल्या माहितीच्या सत्यतेची हमी कोण देणार, ही माहिती पाठवणाऱ्याच्या हेतूंचे प्रयोजन काय असे एक ना अनेक प्रश्न मनी यायला हवेत पण तसं होत नाही.

आपल्या विचारसरणीच्या एखाद्या मित्राकडून 'ते फॉरवर्ड' आलेलं असतं आपण बिनडोकसारखे ते पुढे पाठवतो. मुळात ही फॉरवर्ड करणारी जी जमात आहे तिचं त्या संबंधित विषयावरील आकलन किती आणि त्याबाबतची साधक बाधक माहिती किती याचा काहीच पत्ता नसतो. पण उकळत्या तेलात आपणही काही तरी खमंग तळलेच पाहिजे या भावनेचा मोह अनेकांना आवरत नाही. गत काही वर्षात यातूनच अनेक दुर्घटनांचा जन्म झाला. उदाहरण द्यायचे झाले तर अफराजुलच्या हत्येचं देता येईल. बंगालच्या माल्डाहून आलेल्या ४७ वर्षीय मुहम्मद अफराजुल या ठेकेदारास राजस्थानातील राजसमंद येथे आयसीसच्या हत्याऱ्याप्रमाणे आधी गळा चिरून, नंतर मारहाण करून जिवंत जाळून मारले गेले. शंभूलाल रेगर या नराधमाने ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हे निर्घृण कृत्य केले. इतके करून त्याचे समाधान झाले नाही, आपली दहशत बसावी, या घटनेमुळे मुसलमानांनी भ्यावं यासाठी त्याने या कृत्यादरम्यान याचा व्हिडीओ एका अल्पवयीन नातेवाईकास काढायला लावून तो व्हॉट्सअपवर पोस्ट केला. काही क्षणांमध्येच संपूर्ण देशभरात हा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्या व्हॉटस्अप ग्रुपवर तो पोस्ट करण्यात आला, तो भाजपाच्या नेत्याने तयार केलेला होता. त्यामुळे याचे तार भाजपाशी जोडले गेले. या घटनेनंतर भाजपच्या त्या नेत्याने 'शंभूलालशी आपला कसलाही संबंध नाही' अशी भूमिका घेतली. एप्रिल महिन्यात स्वयंघोषित गोरक्षकांनी पेहलू खान या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याची हत्या केली. ही हत्या करणाऱ्या खऱ्या मारेकऱ्यांना अजूनही अटक झालेली नाही आणि ज्या अन्य आरोपींना अटक झाली ते जामीनावर बाहेर आलेत. देशभरात धर्मद्वेषापोटी मारहाण तसेच हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच धर्तीवर केरळात संघस्वयंसेवकांवर होत असणारया हल्ल्याची दुसरी बाजूही दुर्लक्षिता येत नाही, तर याचा प्रतिवाद करताना मार्क्सिस्टांची हत्या अधिक प्रमाणात झाल्याकडे मार्क्सवादी लक्ष वेधतात.

देशभरात गायीच्या कथित कत्तलीवरून, गोमांस बाळगल्यावरून, गायीचे चामडे काढल्यावरून वा तत्सम कारणांवरून मागील काही वर्षात अनेक हत्याकांडे घडली आहेत, दंगली घडल्या आहेत, जाळपोळीचे उद्रेक घडलेत. त्याचवेळी याची हिंसक प्रतिक्रिया म्हणून काही ठिकाणी गोरक्षकांवर हल्ले केल्याच्या तुरळक घटनाही घडल्या आहेत. केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून यावर टीकेची तीव्र झोड उठल्यावर मोदींनी गायीला गोंजारावं तसं गोरक्षकांना गोंजारून पाहिलं. या मुद्द्यावर कडक कारवाईची त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून उपयोग नाही, कारण त्यांच्या सरकारची एकंदर ध्येयधोरणे आणि पंचगव्यास शिरोधार्ह मानणारी विचारधारा पाहिल्यास अशा घटनाकडे कानाडोळा करत त्यावर तोंडदेखली कारवाई केल्याचं सोंग वठवणे त्यांना भाग आहे.

याचे नकळत होणारे परिणामस्वरूप म्हणून आणि हिंसेचा लंबक देशात सगळीकडे झुलताना दिसतो. याच पार्श्वभूमीवर त्रिपुरापासून ते काश्मीरपर्यंत आणि दिल्लीपासून ते केरळपर्यंत एकट्या दुकट्या माणसाला जमावाने वा एका दोघांनी घेरून अमानुष मारहाण करत सार्वजनिक रित्या ठार मारण्याचा हा कसाई ट्रेंड आता आपल्या देशात नकळत रुजलाय. काही वर्षापूर्वी परप्रांतीय मजुरांना चोर ठरवत अमानुष जीवे मारल्याची घटना जेंव्हा मणीपूर येथे घडली होती तेंव्हा सगळ्या देशातील वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्याला मोठी स्पेस दिली होती. आता मात्र अशा हत्या ही नित्याचीच बाब होऊन बसलीय. मीडियाला यात स्वारस्य नाही अशातला भाग नाही, मेलेला कुठल्या जातीधर्माचा होता आणि मारणारे कोणत्या जातीधर्माचे आहेत यावरून अशा बातम्यांची स्पेस ठरते आणि तिला किती उचलून धरायचे हे ठरते. हे लोकशाहीसाठी जितके घातक आहे त्याहून अधिक पत्रकारीतेसाठी घातक आहे. याहून वाईट गोष्ट अशी की मारेकरी जमाव हा ज्याला मारत असतो त्याच्या जातधर्माबद्दल त्याला पराकोटीची घृणा असते. काही दशकापूर्वी एकमेकाला भाईचाऱ्याचे आदर्श देणाऱ्या लोकमानसात इतका हिंसात्मक तिरस्कार कोठून आला याचे उत्तर शोधायला आपल्याला दूर जावे लागणार नाही, आपल्या हातातील मोबाईल, चोवीस तास भडक स्वरूपाचं वार्तांकन करणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि गरळ ओकणारा सोशल मिडीया हे घटक यासाठी पायाचे दगड ठरले आहेत. गरळ ओकणे हा तर सोशल मीडियाच्या हत्याराचा गुणधर्मच बनलाय जणू !

केंद्र सरकार असो वा राज्य सरकारे असोत, धार्मिक उन्मादातून घडलेल्या घटनांवरच्या कारवाईच्या फाईली केवळ नाचवल्या जातात. महाराष्ट्रातलं दाभोलकर, पानसरे हत्याकांड असो वा कर्नाटकातील कलबुर्गी, गौरी लंकेश हत्याकांड असो यात लोकांमधली क्रूरता आणि तिरस्कार अनुभववास आला. देशभरात या हत्यांचे अराजक कमी अधिक प्रमाणात पण सर्वत्र माजलेले आहे. पंतप्रधाना अशा घटनांचा निषेध करत नाहीत. मोदी हे भाजपाचे वा केवळ एका धर्माचे पंतप्रधान नसून देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांचे नायक आहेत याचा विसर पडावा हे खेदजनक आहे. मात्र त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे काही बेलगाम कट्टरताद्यांना चेव चढतो आणि त्यातून जन्माला येतो तो धर्मविघातक अंधोन्माद. कोणत्याही धर्मातील धर्मप्रसारकांकडून याला वेसण घालण्यासाठी कोणतेही ठोस उपाय योजले जात नाहीत ही बाबही येथे दुर्लक्षित करता येत नाही. सोशल मीडियाचं हत्यार वापरणाऱ्या कट्टरतावाद्यांच्या अराजकाची ही नांदी आपल्या नेत्यांना समजत नसेल यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. आता सोशल मीडिया सरकारच्या विरोधात जातो आहे तर सरकार त्याच्या नाकात वेसण घालू पाहतेय, यावरून या हत्याराची तीव्रता आणि उपयुक्तता ध्यानी यावी. इजिप्तसारख्या अनागोंदीने ग्रासलेल्या देशात झालेली राज्यक्रांती असो वा अरब देशांत आलेली 'जस्मिन रिव्हॉल्यूशन'ची लाट असो वा डोनल्ड ट्रम्प यांच्या निवडीसाठीचा रशियन सोशल मिडीयाचा छुपा वापर असो, हे हत्यार दिवसागणिक धारदार होत चालले आहे हे सगळेच जाणून आहेत. कोणत्याही हत्याराचा सुनियोजित वापर मानवी कल्याणाच्या कामी येतो पण अनिर्बंध आणि बेगुमान वापर केवळ आणि केवळ अराजकाचे कोलाहल माजवतो. दुर्दैवाने आपल्या देशातले आताचे सत्तारूढ सरकार सत्तेत येण्यात सोशल मीडियाच्या हत्याराचा मोठा फायदा झाला पण आता परिस्थिती उलटत चालली आहे, तर या हत्याराला म्यानबंद कसं करावं याचं अचूक उत्तर सरकारकडे नाहीये. येणारा काळ सोशल मीडियाच्या अंताचा असेल की मानवी सभ्यतेच्या लोपपर्वाचा दार्शनिक असेल हे नियती दाखवून देईल. डिजिटल कालपर्वातले हे सर्वाधिक प्रभावी हत्यार सर्वसामान्य माणसाच्या हातीही आहे हे राज्यकर्त्यांनी नीट समजून घेण्याची आता निकड आहे.

सोशल मीडियावर फक्त दुषित वातावरण आहे असं काही नाही, इथं गौरवाची, कौतुकाची, नाविन्याची, प्रेमाची, स्नेहाची आणि आदराची गंधभारीत फुलंही आहेत पण लोकांचा कल फुलांकडे कमी आणि हत्याररुपाकडे जास्ती आहे. कदाचित याला कारणीभूत घटकामध्ये बदलत्या कौटुंबिक जडणघडणीपासून ते उसवत चाललेल्या भोवतालच्या बेताल सामाजिक जाणिवांचा समावेश आहे हे विसरूनही चालणार नाही. आपल्याला काय आणि का हवं आहे, तत्पश्चात काय करायचं आहे याची उत्तरे निश्चित केली तर सोशल मीडियाचं हत्यारी स्वरूप टाळून तो आपल्याला हवा तसा वापरता येतो हे मात्र खरे. अखेर निर्णय आपल्यालाच घ्यायचाय.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा