मंगळवार, १६ जून, २०१५

विस्कटलेली दुपार आणि आठवणींची साठवण ..


हातून निसटलेला पारा अस्ताव्यस्त कणा कणांत ओशाळलेल्या मुद्रेने भूमीवर निपचित पडून असतो आपण जसाच्या तसा पुन्हा त्याला गोळा करू शकत नाही...मात्र त्याच्याकडे पाहून त्याचे गतरूप आठवत राहतो...
आठवणींचा पाराही असाच असतो, मनाच्या गाभारयातल्या प्रत्येक अणुरेणूत सैरभैर मुद्रेने तो चिणलेला असतो...कधी तो अश्रूतून पाझरतो तर कधी एकट्याने बसून असताना ओठांची स्मितरेषा आखून जातो !
काही चित्रे काही प्रसंग काही माणसे या आठवणीच्या पारयात सदैव आपले प्रतिबिंब न्याहळत असतात अन स्मृतींच्या चैत्रबनात परत परत हरखून जाण्याचे अलौकिक सुख मिळवतात…

सोमवार, ८ जून, २०१५

'इजाजत' प्रेमाची आणि जगण्याची! ..



बाहेर रोमँटिक पाऊस पडतोय आणि मी जाऊन पोहोचलोय त्या रेल्वे स्टेशनवर, जिथे कधीकाळी रेखा आणि नसीरुद्दीन त्या गदगदून आलेल्या घनगर्द अंधारात दडलेल्या स्टेशनवर एक रात्र घालवण्यासाठी अकस्मात एकत्र येऊन थांबले आहेत.
एकमेकाला पाहून त्यांच्या मनात अनेक भावना दाटून आल्यात.
मागच्या जखमा ताज्या झाल्यात अन् काही खपल्या देखील निघाल्यात.

त्याच्या जीवनात आलेल्या 'दुसरी'ची आता काय अवस्था आहे हे तिला जाणायचेय अन् आपण कसे वाहवत गेलो, आपली चूक नव्हती हे त्याला सांगायचेय....

रात्रभर तो तिच्याकडे बघत बोलत राहतो मात्र ती अधून मधून नजर चुकवत राहते.
त्याला खरे तर माफी मागायचीय पण एकाच दमात सारं सांगण्याची त्याची हिंमत होत नाहीये.

तिलाही आठवत्येय की, सुरुवातीला आपण किती सुखी होतो ; मात्र त्याने आपल्याशी प्रतारणा करावी याचा धक्का कसा पचवावा, हे तिला उलगडलेले नाही.

त्यांची अबोल तगमग पाहून रात्रभर तळमळत असणारा अंधार तिच्या अंगावरच्या शालीत तिला अलगद लपेटून चिंब झालाय
अन् मंद पिवळसर उजेड त्याच्या ओलेत्या डोळ्यात झिरपतोय,

निर्मनुष्य स्थानकावरच्या प्रतिक्षागृहाच्या खडबडीत दगडी भिंती त्या दोघांना रात्रभर अनुभवून सुन्न होऊन गेल्या आहेत,
ते ज्या टेबलभोवती बसले होते तिथल्या खुर्च्या त्यांना जवळ आणण्यासाठी आसुसल्या आहेत
तर पहाटेच्या गारव्याला त्यांना एकत्रित बाहुपाशात घ्यायचे आहे.

मात्र ज्या बाकावर ते दोघे बसून आहेत त्याला मात्र त्यांचा अबोला भावतो आहे. स्थितप्रज्ञ होऊन त्या दोघांना तो आपल्या कवेत घेऊन बसला आहे.

तिथल्या हेडलॅम्पला त्या दोघांना डोळे भरून पाहायचेय तर प्लॅटफॉर्मवरील लांबसडक कॉरिडॉरला त्यांचे खाली पडणारे अश्रू झेलायचे आहेत.

गुलाबाची एकेक पाकळी हळूहळू अल्वारपणे बाजूला काढावी तशा एकेक घटना तो तरलपणे तिच्या पुढ्यात मांडतोय,
त्याचं दुखणं ऐकता ऐकता ती आतूनच धुमसून निघत्येय,
आपण कुठे कमी पडलो याचा तिचा शोध संपत नाहीये अन् रातकिड्यांची किर्रर्र देखील सरत नाहीये.

तिला जाणून घ्याययचेय ती घरात नसताना 'त्या' रात्री घरात नेमके काय झाले होते ? तो तसं का वागला होता ?
त्यालाही सत्य सांगायचेय, मात्र सत्य सांगताना त्याला तिचं मन पाकळीवरच्या दवबिंदूसारखं जपायचं आहे.
तो जीवापाड प्रयत्न करतोय,
त्या बंद खोलीची काचेची पिवळसर तावदाने डोळ्यात पाणी आणून त्याच्या चेहऱ्याकडे पाहतायत अन् शिसवी दरवाजा भिंतीत तोंड खुपसून मूक अश्रू ढाळतोय !

ती अधून मधून नाकावरचा चष्मा मागे सरकावण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे बघत्येय, त्याच्यात काय बदल झालेत याचा हळूच अंदाज घेतेय तर तिच्याकडे तिरक्या नजरेने डोळे भरून पाहत ती किती बदलली आहे याचे गणित तो करतोय.

बघता बघता पहाट सरत आलीय, आपल्या मनातलं मळभ त्यानं रितं केलंय. "झालं गेलं विसरून जा अन् माझ्याकडे परत ये इतकंच सांगायचे बाकी राहिलंय" असं सांगायचाच अवधी बाकी आहे.

दरम्यान रात्रभर झोपी गेलेल्या सभोवतालच्या झाडाच्या पालवीला आत जाग आलीय अन् वाऱ्याचा रात्रीचा सूर देखील बदललाय.

'तो' मनाचा हिय्या करून तिच्याशी आता बोलणारच आहे इतक्यात तांबड्या पिवळ्या सुर्यकिरणांना सोबत घेऊन "तोही ' तिथे येतो ! हा ‘तो’ म्हणजे तिचा सध्याचा पती !
त्याच्याकडे नजर जाताच ह्याचे शब्द गळ्यात विरतात, अश्रू डोळ्यात विझून जातात. स्तब्ध होऊन जागीच थिजून जातो.

रात्रभर दोलायमान झालेलं तिचं मन 'त्याला' पाहून किंचित खुलून उठतं.
तिचं हसू खरं की खोटं याचा अंदाज बांधत हा रडवेला होऊन जातो.

त्या दोघांना रात्रभर अनुभवणारे ते प्लॅटफॉर्म, ती खोली, त्या खिडक्या, तो दरवाजा, टांगता हेडलॅम्प, तांबडे पिवळे दिवे, तो बाक, ते टेबल, त्या खुर्च्या साऱ्यांना नियतीने चकवा दिलाय.
सारेच हिरमुसले आहेत.
मी देखील चेहरा बारीक करून तिथून निघालो आहे. पाऊस पूर्ण थांबला आहे...

बाहेर प्रसन्न सकाळ झालीय अन् आकाश निरभ्र झालेय. उंच आकाशात उडणाऱ्या बगळ्यांच्या त्रिकोणी थव्यात व्हिक्टरीचे 'व्ही' साईन शोधत मी आता शीळ घालत निघतोय....

जीवन हे असेच आहे, एका हातात काही तरी गवसलेय म्हणेपर्यन्त दुसऱ्या हातातले काही तरी गळून पडलेले असते.
साऱ्यांना सारे मिळत नसते, जो क्षण समोर आहे त्याला स्वच्छंदीपणे समोर जाताना जीवनाशी व स्वतःशी प्रामाणिक राहिले की दुःखाचा आनंदही सुखाइतकाच घेता येतो.

काळजात घर करून राहिलेल्या सिनेमांत 'इजाजत'चे स्थान फार वरचे आहे..... 'इजाजत' केवळ एक सिनेमा नाही तर जीवनातील नात्यांचा हळुवार उलगडा करून दाखवणारी हळवी कविता आहे ..

मनात खोल खोल रुतून बसणारी अन् उत्तुंग अभिनयाने सजलेली, नटमोगरी नसली तरीही सोज्वळ चाफ्यासारखी दरवळणारी प्रेमपुष्पांची नाजूक गाथा आहे...

मी जेंव्हा जेंव्हा 'इजाजत' पाहतो, तेंव्हा नात्यांचे अर्थ नव्याने शिकतो ...

जीवनातील सुखदुःखाच्या व्याख्या नित्य नव्याने सांगणार्‍या रुपेरी पडद्यास नम आँखोसे सलाम .....

- समीर गायकवाड.


गुरुवार, ४ जून, २०१५

बगळ्यांची माळ फुले - वा. रा. कांत

स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर पाच दशके इतक्या विस्तृत काळात अत्यंत देखणी, आशयसंपन्न अशी कविता ज्यांनी काव्यशारदेच्या चरणी अर्पित केली अशा कवींमध्ये कवी वा. रा. कांत यांचे नाव घेतले जाते. वा.रा. कांत एक विलक्षण प्रतिभाशाली कवी होते याचा प्रत्यय त्यांच्या काव्यात सातत्याने जाणवत राहतो. स्वतःचा मृत्यू आणि मृत्युपत्र हा कवितेचा विषय असू शकतो हे त्यांनी अत्यंत टोकदार संवेदनशील रीतीने प्रसूत केलं. एक वेगळाच विस्मयकारक अनुभव त्यांच्या  'मृत्युपत्र' कवितेत येतो.

या रचनेद्वारे आत्मसंवादी कविता लिहीत असताना कांत आपल्या आयुष्याच्या अखेरच्या कवितेतही एक हृदयस्पर्शी व्यक्तता साधतात. इस्पितळात रुग्णशय्येवर असताना कांतांनी आपल्या मुलाला ही कविता लिहायला लावली होती. ही त्यांची अखेरची कविता ठरली. मालाड येथील एव्हरशाइन नर्सिग होममध्ये रुग्णशय्येवर असताना कांतांनी त्यांच्या मुलाकडून लिहून घेतलेली ही अखेरची कविता ! या कवितेवर काही संस्कार करायचे त्यांच्याकडून राहून गेले असण्याची शक्यता आहे. परंतु अर्धागवायूच्या आजारामुळे पुढे या कवितेसंबंधी ते कोणाशीही काही बोलले नाहीत.

मंगळवार, २ जून, २०१५

सामूहिक कबर - खादीम खंजेर : इराकी कविता


ब्रेकींग न्यूज : निकटच्या अंतरावरच सामुहिक कबर सापडलीय !
कालच मी फोरेन्सिक मेडिसिन विभागात जाऊन आलो. 
त्यांनी माझ्या बोटांचे ठसे मागितलेले, डीएनए जुळतो का ते टेस्ट करण्यासाठी. 
ते सांगत होते की, त्यांना काही विजोड कुळाच्या अस्थी मिळाल्यात.
आशेच्या सुऱ्याच्या पात्यावर ठेवलेल्या संत्र्यासारखं दर टेस्टगणिक वाटत होतं. 
बंधू, मी आता घरी आलो आहे.
तुझ्या फोटो फ्रेमसमोर ठेवलेल्या कृत्रिम फुलांवरची धूळ हटवतोय अन अश्रूंनी त्यांचे सिंचन करतोय.

रविवार, ३१ मे, २०१५

अनुवादित कविता - रफिक अहमद : मल्याळी कविता

वहिदा मरून गेली त्या रात्री 
तिची विधवा आई आस्मा ही घराबाहेर एकाकी उभी होती.
एकेक करून सगळे नातलग निघून गेले तेंव्हा
अंगणात कुणीच राहिले नव्हते..

भाड्याने आणलेल्या खुर्च्या परत देतानाच
गॅसबत्ती आणि चटयाही देऊन टाकल्या होत्या.
वहिदाने कधी काळी लावलेल्या प्राजक्ताच्या
चिमुकल्या फांद्यांवर अंधार रात्र चांगलीच सुस्तावली होती.
जीर्ण चिमणीचा मंद पिवळा उजेड
दीनवाणा होऊन जणू अश्रू ढाळत होता.
उदास मखमली पट्टेरी मांजरी तिथेच होती उभी,
वहिदाच्या गुळगुळीत स्लीपरवर हळुवार नाक घुसळत.
काही वेळापूर्वीच जणू
मनमुराद खेळून येऊनी तिने सोडल्या होत्या त्या
दगडांच्या ओबड धोबड पायऱ्यांवर.
झोपडीच्या दक्षिणेस कपडयांच्या तारेवरती
वहिदाचा फ्रॉक झिरलेला वाळत घातलेला, अजुनी होता लटकत.
जवळून जाणाऱ्या उनाड वाऱ्याने एका लाटेत त्याला उडवले,
जणू वहिदालाच जागे करायचे होते त्याला.
शेजारच्या झाडावरील घरट्यावरती उडुनी तो पडला.
ज्या रात्री वहिदा मरून गेली होती
तिची विधवा आई आस्मा बाहेर एकाकी उभी होती......

पाऊस वादळी अकस्मात दाखल झाला तिथे.
आस्मा घरात धावली, परतली अन निमिषार्धात

ठिपक्यांची शुभ्र छत्री हाती घेऊनि,
याच छत्रीसाठी वहिदाची तक्रार असे,
की चक्र तिचे तुटके आहे अन दुरुस्तीच्या पलीकडची गत आहे.
दफनभूमीतल्या ताजी माती अंथरलेल्या जागेवरती धाव आस्माने घेतली
मातीच्या आडोशाला छत्री धरली, माती घेतली कवेशी,
जमेल तितकं ती झाकत होती. .
पाऊस संततधार कोसळतच होता, आस्मा मातीवर आडवी पडून होती.
मातीच्या कुशीतली वाहिदा तिला घट्ट चिकटली होती.
पावसात भिजणं आवडणाऱ्या वहिदाच्या देहावरील मातीत आस्माचे अश्रू मिसळत होते.
वहिदा मरून गेलेल्या रात्री पाऊस संततधार कोसळतच होता....
~~~~~~~~~~~~~~~~

मल्याळी कवी रफीक अहमद यांच्या 'सीझलेस रेन' या कवितेत अंशतः बदल करून केलेला हा स्वैर अनुवाद आहे.

अकाली मृत्यूमुखी पडलेली एक कोवळी मुलगी आणि तिची गांजलेली आई यांचे तरल भावविश्व कवीने अत्यंत प्रभावशाली शब्दचित्रातून रेखाटलेले आहे. मनावर खोल परिणाम साधण्यात ही कविता यशस्वी ठरते. आपण कधी न भेटलेल्या वा कधी कल्पना न केलेल्या लोकांचे दुःख आपलेसे वाटावे या भावनेपर्यंत वाचकाला घेऊन जाण्याचे सामर्थ्य या कवितेत आहे. मुलगी आणि आई यांचे भावबंध अगदी हळव्या शैलीत रेखाटताना निसर्गाचा खुबीने वापर केला आहे. कवितेत असणारी डार्क शेड बेचैन करून सोडते. आपण हतबल असण्याची भावना तीव्र करून जाते.


- समीर गायकवाड.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



The day love ceased,
I return everything, and retreat, ….
like the evensun gently retreats
its palms from the window sill ..
The greenness I took from the leaves..
the steamy friendship of the rain..
the inexpressible electric shock
as the fingers first touched…
The day love ceased,
I return everything, and retreat ….
The beautiful smile of a pale moonlight
fallen somewhere in the endless night…
The lightning darts from your eyes –
the rainbow that exhilarated my rains
The day love ceased,
I return everything , and retreat, ….
The day love ceased,
I return everything , and retreat, ….
like the waves from the deep depths
retreat, leaving the shells ashore.
WRITTEN BY RAFEEQ AHMED
ALTERNATE TRANSLATION BY ANITA VARMA BELOW,
The day love vanished
The day love vanished,
I return everything and go back..
Like your hand, warm as morning sunshine,
slowly retreating, near the casement..
The greenness taken from leaves,
Rain’s water-intense friendship..
The inexpressible electric hum that spread
when fingers touched for the first time..
The smile of a pale moonlight
That falls somewhere in the limitless night
The rainbow which darted from your eyes
And electrified my rains…
The day love vanished,
I return everything and go back..
The day love vanished,
I return everything and go back…
Like the ocean retreating
after depositing the shells culled from its depths…
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ORIGINAL
പ്രണയമില്ലാതെയായ നാള്
പ്രണയമില്ലതെയായ നാൾ സകലതും
തിരികെയേല്പ്പിച്ചു പിന്മടങ്ങുന്നു ഞാൻ…
ജനലരികില് നിന്നിളവെയില് കൈത്തലം
പതിയെ പിൻ വലിക്കുന്നതു മാതിരി…
ഇലകളില് നിന്നെടുത്തൊരു ഹരിതകം
മഴയുടെ ജലസാന്ദ്രമാം സൌഹൃദം…
വിരലിലാദ്യം തൊടുമ്പോള് പടറ്ന്നൊരു
വിവരണാതീത വൈദ്യുതീ കമ്പനം….
പ്രണയമില്ലാതെയായ നാള് സകലതും
തിരികെയേല്പ്പിച്ചു പിന്മടങ്ങുന്നു ഞാൻ…
അതിരെഴാത്ത നിശീഥത്തിലെവിടെയോ
വിളറി വീഴും നിലാവിന്റെ സുസ്മിതം…
മിഴികളില്നിന്നു മിന്നലായ് വന്നെന്റെ
മഴകളെ കുതികൊള്ളിച്ച കാറ്മ്മുകം…
പ്രണയമില്ലാതെയായനാളൾ സകലതും
തിരികെയേല്പ്പിച്ചു പിന്മടങ്ങുന്നു ഞാൻ..
പ്രണയമില്ലാതെയായനാൾ സകലതും
തിരികെയേല്പ്പിച്ചു പിന്മടങ്ങുന്നു ഞാൻ….
തിരയഗാധങ്ങളില്നിന്നു ചിപ്പികൾ
കരയിൽ വെച്ചു മടങ്ങുന്ന മാതിരി…

गावाकडची दुपार ....


गावाकडे उन्हाळ्यातली रणरणती दुपार झाली की घरोघरी फक्त अशी वृद्ध माणसेच असतात. घरातली गडी माणसे अन धडधाकट बाया बापड्या पोटापाण्यासाठी घराबाहेर असतात. स्वतःचे शेत शिवार आणि तिथं पिकपाणी असलं तरच लोक तिथं जातात, नाहीतर दुसरयाच्या वावरात रोजानं कामाला जातात. पाण्याची ओरड सगळीकडेच वाढलेली असेल तर सरकारी कामावर जातात, नाहीतर पंचक्रोशीत आसपासच्या शेतशिवारात जातात.

शनिवार, ३० मे, २०१५

पुष्प की अभिलाषा... आवर्जुन वाचावे असे.....



पुष्प की अभिलाषा... आवर्जुन वाचावे असे.....
चाह नहीं, मैं सुरबाला के गहनों में गूँथा जाऊँ,
चाह नहीं प्रेमी-माला में बिंध प्यारी को ललचाऊँ,
चाह नहीं सम्राटों के शव पर, हे हरि डाला जाऊँ,
चाह नहीं देवों के सिर पर चढूँ भाग्य पर इठलाऊँ,
मुझे तोड़ लेना बनमाली, उस पथ पर देना तुम फेंक!
मातृ-भूमि पर शीश- चढ़ाने, जिस पथ पर जावें वीर अनेक !

गुरुवार, २१ मे, २०१५

मातीचे पाईक - फ.मु.शिंदे



चंद्र थकला होता रात्रभर जागला होता,
रात्रभर एकटाच चंद्र जागला होता

मामा मामा म्हणणारे दिवस नव्हते ;
ढगात तोंड खूपसून चंद्रच रडत होता……

चंद्राचे चिमुकले गेले, मामाचे वाडे गेले,
पाटीवर लिहून काढलेले रात्रीचे पाढे गेले…

एक काळ देशभरात आढळणारी एकत्र कुटुंब पद्धती आजच्या काळात मात्र बहुतांश करून ग्रामीण भागातच अस्तित्वात आहे. त्यामानाने शहरात तिचा अस्त झाला आहे. पूर्वी प्रत्येकाला मामा, मावशी, काका, काकी ही नाती विपुल असायची. जोडीला चुलत, मावस भावंडे असायची. या नात्यांचे सुख काही और असायचे. दिवाळीच्या वा उन्हाळी सुट्टीत मुले आवर्जून मामाच्या गावाला जायची वाट बघायची. एक अनामिक प्रेमाची, मायेची ओढ त्यात असायची. नात्यांमधला आस्थेचा संस्कार घट्ट विणेचा असायचा. एखाद्या वर्षी आजोळी जाऊन मामा, मावशीला भेट झाली नाही तर जीवाची उलघाल व्हायची. आता परिस्थिती बदलली आहे. आता चंद्रच एकटा पडला आहे कारण त्याच्याकडे पाहून अंगाईगीत गाणारी आईदेखील लुप्त झाली आहे. विज्ञानाधिष्ठीत दृष्टीकोन वा मातेचा अपत्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन यामुळे हा बदल झालेला नसून परिस्थितीने काळवेळ यांच्यावर नियंत्रण मिळवून माणसाला यंत्रवत बनवले आहे. परिणामी कुणाजवळही फुरसत नाही. आईकडे बाळासाठी नाही आणि बाबांकडे तर कुणासाठीच वेळ नाही ! मग निंबोणीच्या झाडामागे चंद्र लपला गं बाई ही तर फार लांबची गोष्ट आहे.

गुरुवार, १४ मे, २०१५

ओढ आषाढीची ....


माघ वारी झाली की पंढरीकडे जाणारा ओघ कमी होत जातो, माघ असेपर्यंत हवेत थोडासा गारवा असतो मात्र फाल्गुन येतानाच उन्हाची चाहूल घेऊन येतो. पीकपाण्यातून हाती काय आले याचा हिशोब हा महीना देऊन जातो. मग हळूहळू वस्त्यांवरची कामे उरकली जातात. येणारा दिवस उन्ह वाढवतच राहतो त्याची दखल बळीराजा घेत राहतो. फाल्गुनासवे वसंताचे आगमन होते अन निसर्गाला उधाण येते, पानाफुलातील रंगांची, गंधाची उधळण मन मोहते ! फाल्गुनातल्या अमलकी एकादशीला उन्हातही बऱ्यापैकी गर्दी पंढरीत गोळा होते, तिच्यातही वसंताचे उधाण दिसते. काहीसे सुसह्य ऊन, झेपेल अशी गर्दी यातून वाट काढत ही एकादशी निघून जाते. मराठी वर्षातल्या अखेरच्या महिन्यातले सण पुढ्यात येतात, रंगपंचमी अन होळी ! हल्ली पाण्याची ओढाताण वाढल्यामुळे सर्वत्र लहान मुले वगळता मोठी माणसे अपवादानेच रंगपंचमीचा आनंद लुटतात. होळीनंतर येणारी धुळवड मात्र बेजान गावात नवा जीव ओतायचा प्रयत्न करते ! पीक हाती न आल्याचे दुःख माणसे धुळवडीच्या निमित्ताने विसरतात, विहिरी तळाकडे गाळात रुतत चालल्याचे शल्य बाजूला सारतात, मातीला पडत चाललेल्या भेगा नजरेआड करतात, कणगीतले धान्य खाली चालल्याची व्यथा आपल्या पोटात ठेवून मातीशी एकरूप होतात ! मातीने कितीही छळले, कितीही वेळा दुष्काळ आला तरीही हे भूमीपुत्र धूळवडीला मातीला अंगाखांद्यांवर खेळवून तिच्यावरचे प्रेम व्यक्त करतात. तिच्यात न्हाल्याशिवाय वर्ष संपू शकत नाही अशा भावना धुळवडीतून प्रकटतात !

मंगळवार, १२ मे, २०१५

दोस्त, बिवी और शायरी - नात्यांचे एक अनोखे सत्यकथन ....



दोन मित्रांचे त्यांच्या हयातीतच एकाच स्त्रीशी आलटून पालटून लग्न होऊ शकते का ? असे झाले तर त्यांच्यातले सामंजस्य अबाधित राहू शकते का ?
खऱ्या मैत्रीत स्त्री-संबंध कधीच दुरावा आणू शकत नाहीत याचा प्रत्यय देणारी मित्रप्रेमाची नशिल्या शायरीने सजलेली रोमांचक सत्यगाथा..

दोन जिवलग मित्र. दोघेही अप्रतिम प्रतिभावंत शायर.
त्यापैकी वयाने मोठा असणारा असगर आणि कमी वयाचा जिगर.
जिगरची आई १० व्या वर्षी वारलेली तर वडील १५ व्या वर्षी निवर्तलेले. शिवाय त्याचा निकाह जिच्यासोबत झाला होता ती देखील लवकर वारली.
वाहिदन असं त्या अभागी स्त्रीचं नाव होतं.
या नंतर तो आग्र्याच्या एका वेश्येच्या प्रेमात पडला होता, शिराज तिचं नाव. 

सोमवार, ११ मे, २०१५

माझ्या मातीच्या माय भगिनी ....



चाफा,मोगरा,जाई-जुई अन सदाफुलीने हातात हात गुंफून एकत्र बाहेर पडावे तशा या माझ्या मायभगिनी सकाळ झाली की घरातलं सगळं आवरून सावरून कामाला बाहेर पडतात. भल्या पहाटे उठून झाडलोट सारवण करून चुलीवर चहाचे आधण चढवीत न्हाणीत हजर होतात. घरातली जाणती माणसे जागी झाली की मग तान्हुले कुणी असतील तर त्यांना जागे केले जाते. काठवटीत पीठ मळून चुलीवर त्याच्या खमंग भाकऱ्या करून एखादे कालवण करून भांडी कुंडी आवरुन ह्या मोतियांच्या माळा घराबाहेर पडतात…

रविवार, १० मे, २०१५

अस्सल नटरंगाची कहाणी .....



चित्रपटात त्यांनी नाच्याचीच भूमिका केली पण जीव ओतून केली अन ती भूमिका त्यांच्या जीवनावर जणू आक्रमणच करून गेली. त्यांची मुले मोठी झाली पण त्यांच्याशी कोणी सोयरिक जुळवायला तयार नव्हते कारण 'अशा' माणसाला मुलेबाळे कशी असतील असा प्रश्न जिथे तिथे समोर येऊ लागला. अभिनयाने पदरात विशेष काही पडले नाही मात्र आयुष्य उध्वस्त होणे म्हणजे काय हे त्यांना अनुभवास आले त्या अस्सल पण अभागी नटरंगावरची ही पोस्ट...

नेटमुशाफिरीत विख्यात दिग्दर्शक रवि जाधव यांची जुनी मुलाखत वाचनात आली अन 'त्यां'च्या त्या घटनेची आठवण झाली…….
दूरदर्शनवरील ती मुलाखत काल पाहिल्यासारखी डोळ्यापुढे तरळून गेली…
त्या मुलाखतीत एक ज्येष्ठ प्रतिभावंत अभिनेते धाय मोकलून रडत होते अन मुलाखतकर्ते निवेदक स्तब्ध होऊन गेले होते. त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नांवर त्या अभिनेत्याच्या भावना अनावर झाल्या अन अश्रूंचा बांध फुटला इतकेच त्या घटनेचे महत्व नव्हते तर अभिनयाच्या तपस्येमुळे व्यक्तिगत आयुष्याची वीण कशी उसवत गेली, त्यातून एका कलाकाराची जिंदगानी कशी उध्वस्त होत गेली याचे ते टोकदार उदाहरण होते.

रविवार, ५ एप्रिल, २०१५

आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?


आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?
अरे यार, आयपीएल मध्ये कसला ड्रामा आहे त्यावरच मस्त बोलायचं का ?
फोर-जीच्या फुकट स्ट्रीमींगमध्येच रुतत जायचं का ?
पूर्वी तुला नोकरी नव्हती, महागाई वाटायची तेंव्हा तर तू रस्त्यावर यायचास ना ?
आता तुला स्वतःतून बाहेर पाहायला वेळ मिळणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली आहे. तू आंदोलनेही आता ऑनलाईनच करतोस का ?
तुला खऱ्या खोट्यातला म्हणे फरक कळत नाही कारण ते जे काही दाखवतील तेच तर तू वाचतो आहेस, पाहतो आहेस. हे खरं आहे का ?
आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?

शनिवार, ४ एप्रिल, २०१५

शेवंता.....


शेवंता म्हणजे अजब रसायन होतं. लिंबाच्या बुंध्यागत भरल्या अंगाची ठसठशीत बाई ! गाजरासारखा रंग अन नितळ काया. अंगणात बसली तर केळीच्या खोडासारख्या तिच्या तराट गोर्‍यापान पिंडर्‍याकडे जादू झाल्यागत नजर जायचीच. तटतटलेल्या पायावर रंगीत घुंगरांचे सैलसर चांदीचे पैंजण उगाच चाळा करत रहायचे अन बघणारा गपगार व्हायचा. काजळ घातलेल्या तिच्या पाणीदार मोसुळी डोळ्यात सदोदित एक आवतण असायचं. मोठ्या कपाळावर आडवी रेष अन त्यावर बारीक गोलाकार गंध असायचा. जो तिच्या उभट चेहऱ्याला फारच खुलून दिसायचा. कानातले लंबुळके झुबे सतत डुलत रहायचे. ओठाच्या पाकळ्या उघडल्या की पांढर्‍याशुभ्र मोगर्‍याच्या कळ्यासारख्या दंतपंक्ती बेचैन करत. क्वचित कधी ती मोकळया केसानिशी उभी असली की अजूनच जालीम दिसायची. बहुतकरून सैलसर अंबाडा बांधून त्यावर तिने एखादा गजरा माळलेला असायचा. गळ्यात मोहनमाळ आणि काळ्या मण्यांची सैलसर बारीक सोनेरी तारेतली सर असायची. पाठीवर लाल रेशमी गोंडा असणारी ही काळी सर तिच्या गळ्यावर अशी काही रूळायची की समोरचा सतत तिच्या भरदार छातीकडे चोरून बघायचाच. आवळ पोलके नेसल्यानं गच्च दंडावर करकचून बांधलेल्या काळ्या दोर्‍यातली बारीक काळपट पितळी पेटी अधिकच चेमटलेली वाटायची. तिच्या गुटगुटीत मनगटालाही काही दोरे गुंडाळलेले असायचे. लुसलुशीत पोटाला बांधलेली चांदीची साखळी अन दुहेरी गुंफलेला कटदोरा इतका घट्ट असायचा की कधीकधी तिच्या पोटाच्या कोपऱ्यावर लालसर वळ दिसायचे. तिचं सारं अंगांग गाभूळल्या चिंचेसारखं होतं, बघणार्‍याच्या तोंडालाच लाळ सुटायची.

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०१५

रुबाई - उमर खय्याम ते माधव ज्युलियन ..

'मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवाला,
‘किस पथ से जाऊँ?’ असमंजस में है वह भोलाभाला,
अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ -
‘राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला ।

हरिवंशराय बच्चन यांनी अनुवादित केलेली उमर खय्यामची ही एक प्रसिद्ध रुबाई आहे. उमर खय्याम फावल्या वेळात रुबाया (रुबाइयाँ) लिहीत असे. ह्या रुबायांमुळेच त्याची कीर्ती अजरामर झाली. त्याच्या रुबायांमुळे अनेक देशांत उमर खय्याम क्लब स्थापन झाले. तेथे त्याच्या रुबायांचे मोठ्या आवडीने अध्ययन अध्यापन केले जाते. जगातील अनेक भाषांत त्यांचे अनुवाद झाले. अर्थात त्यांतील उमर खय्यामच्या रुबाया किती व प्रक्षिप्त रुबाया किती हे सांगणे खरोखरीच कठीण आहे.

शुक्रवार, ३० जानेवारी, २०१५

‘गायी पाण्यावर काय म्हणून आल्या’ - कवी बी ....



गाय आणि तिचे वासरू, तिची माया, तिचं दयाळू वर्तन, तिची करुण प्रतिमा यांचा यथार्थ वापर साहित्यिकांनी गद्यपद्य या दोन्ही साहित्यप्रकारात केल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पानोपानी आढळतील. आईची माया दर्शविण्यासाठी कवितांत तर गायीची उपमा अत्यंत खुबीने वापरली गेलीय. काही कवितांनी गायीच्या ममतेवर असे काही अप्रतिम भाष्य केलं आहे की रसिक वाचकांच्या मनाचा त्यांनी अचूक ठाव घेतला आहे. ही अशीच एक कविता ..