शुक्रवार, ३० जानेवारी, २०१५

‘गायी पाण्यावर काय म्हणून आल्या’ - कवी बी ....



गाय आणि तिचे वासरू, तिची माया, तिचं दयाळू वर्तन, तिची करुण प्रतिमा यांचा यथार्थ वापर साहित्यिकांनी गद्यपद्य या दोन्ही साहित्यप्रकारात केल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पानोपानी आढळतील. आईची माया दर्शविण्यासाठी कवितांत तर गायीची उपमा अत्यंत खुबीने वापरली गेलीय. काही कवितांनी गायीच्या ममतेवर असे काही अप्रतिम भाष्य केलं आहे की रसिक वाचकांच्या मनाचा त्यांनी अचूक ठाव घेतला आहे. ही अशीच एक कविता ..

शास्त्रीय दृष्टीकोनातून गाय हा जरी पाळीव प्राणी म्हणून ओळखला जात असला तरी सांस्कृतिक मूल्ये वा धार्मिक आस्थेचे प्रतिक या दृष्टीनेही ती ज्ञात आहे. या बरोबरीनेच प्रेम, माया आणि वात्सल्य यांचेही प्रतिक म्हणून लोकजीवनापासून ते आधुनिक साहित्यप्रकारात गायीला स्थान आहे. मराठी कवितेत गायीचे रूपक वापरून अनेक कवींनी आपल्या प्रतिभाशक्तीच्या जोरावर प्रेम, करुणा, माया, आस्था, कोमलता व ममता या भावनांनी युक्त आशयाच्या कविता अत्यंत प्रभावीपणे रचल्या आहेत. कवी प्रा. स. ग. पाचपोळ त्यांच्या कवितेत म्हणतात की,
'हंबरून वासराले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय,
दिसती माझी माय
रे हंबरून वासराले ...................’

डोळ्यात पाणी आणणारे हे वर्णन गायीच्या रूपकातून काळजाला भिडते. मुळात गायीच्या अंगी करुणाशीलता, वात्सल्य अन मायाळूपणा हे गुण काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे आईची माया वा आईच्या प्रेमासाठी गायीची उपमा अगदी चपखल ठरते.

'आई' ही कवी फ.मु.शिंदे यांची अत्यंत गाजलेली कविता या कवितेत देखील आईचा अगाध महिमा सांगण्यासाठी कवींनी गायीच्या रूपकाचा वापर केला आहे.
फ.मु. लिहितात की,
'....याहून का निराळी असते आई?
ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी?
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते….’

युगप्रवर्तक कवी बा.सी.मर्ढेकर यांच्या ‘अभ्रांच्या या कुंद अफूने’ या कवितेत आषाढ श्रावण महिन्यात येणाऱ्या पावसाने ओल्या झालेल्या सृष्टीचे वर्णन केले आहे. पावसाची चातकासारखी वाट पहाणारे पक्षी, पाने, फुले, पाखरे यांची दखल घेत घेत पर्यावरणीय बदलावर कवी सूचक भाष्य करतानाच तत्कालीन आंतरराष्ट्रीय घटनांशी देखील तिचे तार जुळवतात.

या कवितेत गाय आणि तिच्या गळ्यातील घंटा या उपमांचा वापर चपखलपणे केलाय. किंचित गूढ वाटणारी ही कविता या शब्दप्रतिमामुळे अत्यंत देखणी झाली आहे –
'अभ्रांच्या ये कुंद अफूने.
अभ्रांच्या ये कुंद अफूने.
पानांना ह्या हिरवी गुंगी;.
वैशाखातिल फांदीवरती.
आषाढातील गाजर पुंगी.
मिटून बसली पंख पाखरे,
पर्युत्सुक नच पीसही फुलते;.
मूक गरोदर गायीची अन्.
गळ्यातली पण घंटा झुरते !.......'

'वाऱ्याने हलते रान' या कवितेत कवी ग्रेस यांनी आपल्या अर्थपूर्ण रचनेत गायीच्या डोळ्यांचा इतका सुंदर वापर केला आहे की कवितेला आपसूकच एक करुण झाक प्राप्त होते. काही समीक्षक ग्रेसांच्या कवितेवर दुर्बोधतेचा आरोप करतात मात्र त्यांच्या कवितातील आशयघनता आणि उत्कट शब्दसौंदर्याचे कमनीय मिश्रण यावर निरुत्तर होऊन जातात. अस्तित्वाच्या शोधातील ही विरह कविता तिच्या प्रत्येक पंक्तीत गहिऱ्या शब्दालंकारांनी अनोख्या पद्धतीने आणि नव्या अर्थसंदर्भाने सजली आहे.

आपल्या काव्यरचनेच्या आणि शब्दसौंदर्याच्या प्रेमात पडलेले ग्रेस या कवितेत दुर्बोध न वाटता अत्यंत हळवे वाटतात. याचे मुख्य कारण यातील उपमा होत. गहिवरणाऱ्या ह्रदयासाठी त्यांनी योजिलेल्या गायींच्या डोळ्यांना सांज निळाईची ही उपमा जोडून वापरल्याने या दोन्ही प्रतिमा चित्रमय पद्धतीने डोळ्यापुढे येतात अन काव्यार्थ अधिक रसरशीत होतो.

‘वाऱ्याने हलते रांन, तुझे सुनसान
हृदय गहिवरले,
गायीचे डोळे करुण उभे की
सांज निळाईंतले,….’

अस्सल शेतकरी कवी इंद्रजीत भालेराव हे बालपणी अनुभवलेला निसर्ग आणि प्राणी-पक्षी यांचं मानवाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं यांच्याशी एकजीव होऊन व्यक्त करतात. त्यांच्या कवितेतून ते सातत्याने जाणवत राहते. या कवितेतील गायीचे हे असे मोहक वर्णन केवळ मातीतला माणूसच करू शकतो, कारण या गोष्टी अनुभवल्या शिवाय शाईत उतरत नाहीत.

'माझी एक गाय होती तिला होते वासरू
तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू,
मीही व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ-पिऊ
दोघासाठी एक पान्हा, आम्ही भाऊ-भाऊ....'

वर उल्लेखिलेल्या सर्व कवितांपेक्षा थोडीशी वेगळी मात्र तितकीच भावपूर्ण अर्थ असणारी एक कविता कवी 'बी' यांनी लिहिली होती, जिला अफाट लोकप्रियता मिळाली. अनेकांच्या स्मृतीपटलावर ती कायमची कोरली गेली.
ती कविता म्हणजे 'गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या...'

पित्याचे दारिद्रय मुलांच्या उर्मी, अपेक्षा मूकपणे मारून टाकत असते, खरे तर कोणत्याही पित्याची आपल्या मुलाबाळांच्या अपेक्षापूर्तीसाठी अखेरपर्यंत देह झिझवण्याची तयारी असते. पण जिथे भौतिक सुखसुविधांचा प्रश्न उपस्थित होतो तिथे व्यावहारिक जगातील घटक भावभावनांपेक्षा वरचढ ठरतात. अशा वेळी सगळेच मूक दर्शक बनून राहतात, बाप मनातल्या मनात कुढत राहतो अन त्याची निष्पाप लेकरे आपल्या इच्छा आकांक्षांचा गळा घोटत राहतात. पित्याकडून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या नसल्या तरी आपल्यासाठी अहोरात्र त्याने उपसलेले काबाडकष्ट प्रत्येक अपत्याच्या मनात कुठे तरी रुतून बसलेले असतात. पित्याच्या या ऋणातून कोणीच उतराई होऊ शकत नाही मात्र त्याला समाधान तरी आपण निश्चित देऊ शकतो. अशाच स्नेह भावनेने ओथंबून गेलेल्या पित्याच्या लाडक्या लेकीची पार्श्वभूमी असलेली ही कविता.

ही 'देवाघरची फुले' आपल्या अल्प अपेक्षेने आणि त्यावरील सोप्या तरीही खोट्याच उपायाने आपल्या पित्यास हृदय पिळवटून टाकणारं समाधान देत असतात याचे प्रत्ययकारी वर्णन या कवितेत कवी बी यांनी केले आहे.

गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या ? का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला ?
 
विभा-विमला आपटे-प्रधानांच्या अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजूनि येती, रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला 'लंकेच्या पार्वती' समान पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण 'अहा ! - आली ही पहा - भिकारीण !'

पंकसंपर्के कमळ का भिकारी ? धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ? कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

लाट उसळोनी जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे, उचंबळुनी लावण्य वर वहावे !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध, सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू, विलासाची होशील मोगरी तू !

तुला घेइन पोलके मखमलीचे, कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे;
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी, परि आवरि हा प्रलय महाभारी !

प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे, कोड किंचित्‌ पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे हृदय कसे होते, नये वदतां, अनुभवी जाणती ते !

देव देतो सद्गुणी बालकांना काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली पार बदलुनी ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !

या कवितेतील गाई पाण्यावर काय म्हणून आल्या ही ओळच मुळात जादुई चित्रमय प्रभाव पाडते. यातील ‘गायी पाण्यावर’ हा शब्द रूढार्थाने पाणी पिण्यास काठावर (जलाशयाच्या) आलेल्या गायी असा नसून डोळ्यातल्या अश्रूंशी त्याचे भावबंध कवीने जोडले आहेत. गाय ही मूर्तिमंत करुणेची सात्विक प्रतिमा आहे आणि लग्न होऊन सासरी चाललेल्या मुलीच्या डोळ्यातील अश्रू हा याचा अर्थ आहे. डोळ्यात पाणी असे काही दाटून आले आहे की जणू मायेने व्याकुळ झालेल्या, प्रेमासाठी तहानलेल्या गायीने आपली तहान शमवण्यासाठी ह्रदयाच्या (पाण्याच्या) काठाशी यावे !

इथे आपली मुलगी इतर मुलींच्या तुलनेत गरीब आहे याची खंत खूप नेटक्या शब्दात कवी बी यांनी व्यक्त केली आहे. आपल्या चित्तचोरटीस, गोरटया मूर्तीसम देखण्या मुलीस कोणी टोचून बोलले की कुणासही वाईट वाटेल. इतर मुली छानछोकीत राहतात आणि आपल्या मुलीस सणवाराला देखील जुने कपडे घालावे लागतात याची खंत मनी दाटून येते. त्यातच आपल्या मुलीस कुणीतरी भिकारीण असं संबोधते तेंव्हा मन विदीर्ण होऊन जाते. म्हणून पित्याच्या भूमिकेतून कवी प्रश्न विचारतात की, चिखलाच्या स्पर्शाने कमळ अभद्र होते का ? धुळीच्या संपर्काने रत्न खराब होतात का ? हारातील धाग्यात गुंफल्याने फुले अपवित्र होतात का ? नाही ना !

मग एखाद्या गरीब बापाच्या पोटी मुलगी जन्मास आली तर ती भिकारी कशी होते ? अत्यंत मार्मिक सवाल करत कवी इथे आर्थिक विषमतेच्या वर्मावर बोट ठेवतात.

बहुतांश सर्वच स्त्रियांना त्यांच्या नैसर्गिक स्वभावानुसार दागदागिने घालून नटून थटून सजून राहायला आवडत असते. किंबहुना यामुळे त्यांचे सौंदर्य खुलते. स्त्रिया यामुळेच सौंदर्यालंकाराच्या प्रेमात पडतात.

हे सर्व ज्याच्यापाशी सहज उपलब्ध असते त्याच्यावर अगदी सहजपणे स्त्रीचे मन जडते. तद्वत प्रत्येक पिताही हे जाणून असतो म्हणून तो त्याची ऐपत नसतानाही आपल्या मुलीस सांगतो की, 'तुला मखमली पोलके घेईन, मोत्याची कुडी घेईन. इतकेच नव्हे तर तुझी सर्व हौसमौज पुरी करेन.' मात्र प्रत्यक्षात दारिद्र्याचा प्रलय या प्रेमभावनेवर कुरघोडी करतो आणि सारी शब्दवचने फुकाची ठरतात.

ज्या कन्येत आपले प्राण गुंतले आहेत तिच्या साध्यासुध्या इच्छा पुऱ्या करता येत नसतील तर त्या बापाच्या मनाच्या किती चिंधडया उडत असतील याचा अनुभव केवळ त्या पित्यालाच येऊ शकतो. याचंच प्रत्ययकारी वर्णन कवी बी करतात.

कवितेच्या शेवटी कासावीस झालेला हा बाप एक अनोखी फिर्याद मांडतो. तो म्हणतो की, 'जो आपल्या मुलीचे साधे कोडकौतुक करावयास असमर्थ आहे अशा कपाळकरंटया, दारिद्रयाने ग्रासलेल्या बापाच्या पोटी परमेश्वर इतक्या सद्गुणी मुली (ज्या एका शब्दाने तक्रार न करता सुहास्य वदनाने पित्यास सन्मुख राहतात) का जन्माला घालतो ? मी तर आता त्या विश्वनियंत्याकडे जाऊन याचा जाब विचारावा असे म्हणतो.'
कुणाही सृजनशील माणसाच्या हृदयाला पीळ पडावा अशी आर्त कैफियत या कवितेत आहे.

पाहता पाहता काळ पुढे जातो आणि एक वेळ अशी येते की कधीकाळची तान्हुली बाहुली असणारी आपली लाडकी लेक मोठी होते. विवाहाच्या वेदीवरून आपला निरोप घेते, सासरी जायला निघते. खरे तर तिची बालसृष्टी आपल्या डोळ्यादेखता कधी बदलून गेली आणि ती कधी परिपक्व झाली याचा आपल्याला अंदाज येत नाही. तिचे लाड कसे पुरवायचे याच वंचनेत आपण गुंतून असतो आणि यादरम्यानच ती उंबरठयाच्या बाहेर पाऊल टाकते. तिला काही आपण रेशमी वस्त्रे देऊ शकलो नाही मात्र सासरी जाताना ती आपला रेशमी करपाश पित्याच्या गळ्यात घालून साश्रूपूर्ण नयनांनी 'येते मी' इतकेच बोलून निरोप घेते. ती कधीच काही तक्रार न करणारी, काहीही न मागणारी, कशाचा हट्ट न धरणारी, आपल्या पित्याची गरिबी जाणून असणारी, पित्यावर अपार माया करणारी मुलगी सासरी जातानाही काहीच बोलत नाही याची त्या गरीब पित्याला इतकी खंत लागते की तो आपल्या कन्येस 'अज्ञ' संबोधतो. खरेच आहे, आजच्या भौतिक सुखांच्या व्याख्या त्या मुलीच्या गावी नसतात, तिला पैसा अडका, जमीन जुमला, हौस मौज यातलं काहीच कळलं नाही. तिला फक्त माया-प्रेम कळले, म्हणून ती एका अर्थाने व्यवहारिक रूढ जगाच्या नजरेने अज्ञच म्हणावी लागेल.

वडील आणि मुलगी यांच्या प्रेमाची वेदना कवितेत इतक्या कारुण्यात शब्दबद्ध झालीय की वाचणारा दिग्मूढ होतो. कवितेला लय आहे, नादमाधुर्य आहे. चाल लावून एकदा जरी ही कविता गायली तरी अखेरपर्यंत तिचे गारूड आपल्या मनावर राहतं.

कवी बी यांची आणखीन एक गाजलेली कविता म्हणजे 'चाफा' ही कविता होय. चाफा ही कविता एक प्रकारचे प्रतिकात्मक प्रेमगीतच आहे. विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे भोग सुखरूप भासत असले तरी दुःखमूलच होत. त्यांना उत्पत्ती व नाश असल्यामुळे ज्ञानी त्यांत रमत नाही. हा अध्यात्मविषय 'बी' यांनी आपल्या 'चाफा' या कवितेत काव्यमय केला आहे. शुध्द प्रेमानंद हा अद्वैतानंद आहे हे तत्व सूचक प्रतिकांद्वारा त्यांनी अत्यंत बहारदार रीतीने विशद केले आहे. त्यात भावनेची उत्कटता व तत्वाची उदात्तता यांची अक्षरशः परमावधी झालेली आहे.

एक जून १८७२ रोजी जन्मलेल्या नारायण मुरलीधर गुप्ते यांनी ‘कवी बी’ हे नामाभिधान धारण केलं होतं. त्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' म्हणजे कोण हेच लोकांना अनेक वर्षे ठाऊक नव्हते. ‘प्रणयपत्रिका’, ‘बकुल’, ‘माझी कन्या’, ‘चाफा’, ‘वेडगाणे’ या त्यांच्या काही विशेष उल्लेख कराव्या अश्या कविता ! यातील ‘माझी कन्या‘ ही कविता पूर्वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना अभ्यासाला असल्यामुळे अनेकांना तोंडपाठ होती. लता मंगेशकरांच्या स्वरात संगीतबद्ध झालेली ‘चाफा‘ ही कविता आजही भुरळ घालते.

'चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना

गेले 'आंब्याच्या' बनी
म्हंटली मैनांसवें गाणी

आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे
गेले केतकिच्या बनी

गंध दरवळला वनी
नागासवें गळाले देहभान रे

चल ये रे, ये रे गड्या
नाचु, उडू घालु फुगड्या

खेळु झिम्मा झिम्‌ पोरी झिम्‌ पोरी झिम्‌
हे विश्वाचे अंगण

आम्हां दिले आहे आंदण
उणे करू आपण दोघेजण रे

जन विषयाचे किडे
यांची धाव बाह्याकडे

आपण करू शुद्ध रसपान रे
चाफा फुली आला फुलून

तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी - चाफा ? कोठे दोघे जण रे ?'

______________________________________


'फुलांची ओंजळ' हा कवी बी यांच्या काव्यसंग्रहात अडोतीस कवितांचा समावेश असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे.१९११ ते १९३३ पर्यंत, म्हणजे सुमारे एक तपभरच ‘बी’ कवींची प्रतिभा फुलून आली असे म्हणता येईल. त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका‘ ही वऱ्हाडात चिखलदरा येथे दिनांक १४ सप्टेंबर १८९१ रोजी लिहिली गेली. त्यावेळी ते सुमारे १९ वर्षांचे असावेत. ही कविता त्याच वर्षी कै. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक’ पत्रात प्रसिद्ध झाली.

अनेक दिवस झाले तरी प्रियकराचे कुशल सांगणारे पत्र आले नाही म्हणून चिंताग्रस्त प्रेयसीचे आपल्या प्रियकराला लिहिलेले पत्र म्हणजे ‘प्रणय पत्रिका’ -
किति तरि दिन झाले ! भेट नाही पदांची,
करमत मज नाही; वेळ वाटे युगाची.

या ओळींवरून आपल्या पतीचा विरह सहन होत नाहीये त्या प्रेयसीला हे दिसून येते.

तरल मन नराचे राहते ऐकते मी
विसर बघुनि पावे अन्य पात्रास नामी.
कमलिनि भ्रमराला नित्य कोशात ठेवी
अविरत म्हणुनी तो पंकज प्रेम दावी.
विसर पडुनि गेला काय माझाही नाथा ?
म्हणुनिच धरिले हे वाटते मौन आता..

कवी बी यांच्या सर्वच कविता एक सुराच्या होत्या असं म्हणणाऱ्या टीकाकारांचा 'आशादेवी' या त्यांच्या कवितेने मुखभंग होतो. तेजस्वी वीररसाने भरलेले दुर्गेचे वर्णन या कवितेत आहे.
आशादेवी -
गेली माजुन मानदर्पमदिरा बेहद्द ती प्राशुन;
प्रेतांनी भरले नभातिल दरेकोरे तयांच्यावर
मांसाच्या चिखलात मुक्त फिरते ही भैरवी भेसुर.
होती पूर्व ! उषासखी, गुणवती, सत्वाढ्य, तेजोवती,........
आहे जोवरि एक तंतु उरला वीणेवरी शाबुत,
आशा अद्‍भु रम्य बोल असले राहील तो काढित;
ती होऊनि निराश, उज्ज्वल तिची स्वप्ने लया पावती
रक्षो एक तदा दया भगवती आम्हा प्रभूचीच ती !

कवी बी यांचा जन्म मलकापूरचा (जि. बुलढाणा). तर यवतमाळ व अमरावती येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले ; परिस्थितीमुळे त्यात खंड पडला; ते मॅट्रिकही होऊ शकले नाहीत. नंतर त्यांनी सरकारी नोकरी धरली. त्यांचा बहुतेक काळ विदर्भातील अकोला येथे गेला. १६ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाल्यावर एक दिवसाच्या कालफरकाने मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे ते निवर्तले.

केशवसुतांच्या परंपरेतील कवी 'बी' यांच्या कवितेचे अध्यात्म, प्रेम, कुटुंब, समाज व इतिहास हे प्रमुख विषय आहेत. अध्यात्मप्रवणता व तत्त्वज्ञानाची ओढ यामुळे त्यांच्या काव्यावर चिंतनशीलतेची छाया पसरली आहे. त्यांनी काही काव्यभाषांतरेही केली आहेत. 'बीं' च्या रचनेवर संस्कृत-इंग्रजी भाषांतील काव्ये, भारतीय तत्त्वज्ञान व संतसाहित्याचा प्र्भाव पडला आहे. कर्तव्यप्रेरक व उदात्त आशावाद, प्रखर पुरोगामित्व, प्र्वृत्तिपर अध्यात्मावर आधारलेली जीवंदृष्टी, वेचक शब्दांत व्यक्ती व प्रसंगांचे चित्रण करण्याचे कौशल्य, संस्कृतप्रचुर ओरौढ भाषेतील संयत भावनाविष्कार, पांडीत्य व रसिकता यांचा मनोज्ञ संगम, मार्मिक, सौंदर्यदृष्टी, अभिजात काव्यप्रेम आणि आधुनिक मराठी काव्याविषयी प्रकटणारा अभिमान ही 'बी' कवींच्या काव्याची ठळक वौशिष्ठ्ये आहेत.

केशवसुतांचा ‘बीं’ वरील प्रभाव विविध तऱ्हांनी जाणवतो. ‘डंका’, ‘आम्ही’, ‘भगवा झेंडा’ इ. कवितांतील जुने नष्ट करण्याची चेतना देणाऱ्या बंडखोर विचाराची वाटते;

‘वेडगाणे,’‘पिंगा’, ‘चाफा’ यांसारख्या अलौकिकाचा ध्यास व्यक्त करणाऱ्या गूढ कवितांची एक वीण दिसते तर तिसरी तऱ्हा ‘आनंदाला म्‍लानपणा नच सौदर्याला क्षय’ अशा पूर्णाकडे जग जाणार असल्याचा निर्भर आशावाद उच्चारणाऱ्या‘फुलांची ओंजळ’ सारख्या कवितांची आहे. सौंदर्यानंदाची तीच आस आणि ‘सान्त अनन्ताची मिळणी’ झाल्याचा उत्फुल्ल क्षणी होणारा साक्षात्कार, ‘बीं’चे बालकवींशी साधर्म्य दाखवतो.‘आठवण’-मधील निसर्गचित्रण काहीसे बालकवींच्या ढंगाचे आहे. ‘विचार-तरंगां’मध्ये वारंवार बालकवींच्या ‘फुलराणी’चा भास होतो.‘कमळा’ ही कथन-कविता गोविंदाग्रजांच्या इतिहासविषयक स्वच्छंदतावादी वृत्तीची आणि मधूनमधून त्यांच्या शाहिरी थाटाच्या शब्दकळेची आठवण जागी करते. पण ही साधर्म्ये कमीअधिक वरवरची. काही प्रमाणात ती एकाच युगातील समानधर्मी कवींची प्रस्फुरणे. पण ‘बीं’च्या स्वतंत्र काव्यव्यक्तित्वाला त्यांनी ढळ पोचत नाही.

‘बीं’ नी काव्यासंबंधीची आपली मते ‘कविवंदन’, ‘विचारतरंग,’ यांसारख्या कवितांत ठामपणे व्यक्त केली आहेत. छन्द – व्याकरण - रसादींची जुनी मापेकोष्टके लावून आधुनिक कवितेवर रोष धरणाऱ्या विद्वद्वर्यांचा (ते ‘विशाळ मणिगोटे’) ‘बी’ धिक्कार करतात. ‘संस्कृत-भाषानियमांची का तुजवरि बळजोरी’ असे मराठी भाषेला विचारतात; पण त्यांची स्वतःची भाषा बरीच संस्कृतप्रचुर आहे. ‘कमळा’ या कवितेत ते ‘निळ्या सारणीमध्ये वाहते मोत्याचे पाणी’ अशी नायिकेविषयी सहजसुंदर, चित्रमय, लावणी बाजाची ओळ लिहून जातात; पण तिच्यावर ‘विकासोन्मुखलावण्य शुद्धशालीन्यसुगुणशाली, ’‘तमालदल-सन्निभाभिरामा’ यांसारखी जडजंबाल विशेषणेही लादतात. संस्कृत आणि पंडिती कवितेप्रमाणे शाहिरी कविताही ‘बीं’ नी आत्मसात केली होती; पण त्या निरनिराळ्या शैलींच्या विसंवादी मिश्रणांमुळे ‘बीं’ची शब्दकळा गंगाजमनी झाली; त्याच्या तात्त्विक विचाराशी विसंगत झाली. बहिरंग हे गौण; अंतरंगातच सौंदर्य असते, ही त्यांची धारणा एका परीने खरी असली, तरी ती हा दोष पुरा झाकू शकत नाही. असे एखादे गालबोट सोडले, तर विषयाच्या अंतरंगाचा एकाग्रतेने खोलवर शोध घेणारी, भावना आणि विचार यांना एकजीव करणारी निर्भर संवेदनेची अशी कविता विरळ. समीक्षक वा अभ्यासक काहीही म्हणोत सामान्य रसिक वाचक मात्र कवी बी यांना ‘गायी पाण्यावर काय म्हणून आल्या...’ या रम्य कवितेचे भावकवी म्हणूनच त्यांना ध्यानात ठेवतो.

- समीर गायकवाड.

साभार नोंद - कवी बी यांच्या विषयीची माहिती विजया राजाध्यक्ष यांनी लिहिलेल्या मराठी विश्वकोशातील अल्प परिचयातून घेतली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा