रविवार, ३१ मे, २०१५

गावाकडची दुपार ....


गावाकडे उन्हाळ्यातली रणरणती दुपार झाली की घरोघरी फक्त अशी वृद्ध माणसेच असतात. घरातली गडी माणसे अन धडधाकट बाया बापड्या पोटापाण्यासाठी घराबाहेर असतात. स्वतःचे शेत शिवार आणि तिथं पिकपाणी असलं तरच लोक तिथं जातात, नाहीतर दुसरयाच्या वावरात रोजानं कामाला जातात. पाण्याची ओरड सगळीकडेच वाढलेली असेल तर सरकारी कामावर जातात, नाहीतर पंचक्रोशीत आसपासच्या शेतशिवारात जातात.


घर कसलंही असो जोत्याचं वा कुडाचं उन्हामुळे जीवाची काहिली होते. थकलेली, कुठेही जाऊ न शकणारी म्हातारी माणसे या कष्टकरी लोकांची वाट बघत उंबरठ्याकडे डोळे लावून बसतात. रांगणारी, आईच्या पोटाला बिलगून असणारी तान्हुली ज्याच्यात्याच्या आईसंगट जातात अन पोरसवदा असणारी चिल्लर पोरे गावातच घरी असतात. घरातली पिकली पानं या नव्या अंकुरांकडे लक्ष पुरवतात. लाल केशरी, विटकरी, हिरवी पिवळी, नारिंगी, जांभळी विविध रंगातली चेहरयावर सुरकुत्यांचे मखमली जाळी असणारी ही वृद्ध फुलं मला कधी म्लान वा कोमेजलेली वाटत नाहीत, त्यांच्यात विश्वनिहंत्याने स्वतःचेच प्राण फुंकलेले आहेत त्यामुळे त्यांचे तेज काही औरच आहे ...

डोळ्यात निमालेला संघर्षाचा विस्तव अन कपाळावरच्या रेषांमध्ये लिहिलेले कष्टाचे गीत यामुळे यांचे चेहेरे तेजस्वी दिसतात. अंगावरचे कपडे कधी गंजी केलेले नसले तरी त्यातली स्वच्छता अद्भुत असतेया लोकांना नुसते बघितले तरी आपलेचे पडलेले चेहरे प्रसन्न होऊन जातात. काबाडकष्ट करून हाडाची काडे झालेली अन अंगांचे चिपाड ! हातापायाला भेगांचे जाळे अन रापलेल्या ओठाआडचे अर्धे मुर्धे दात मला कधीच विजोड वाटत नाहीत. कंबरेत वाकलेले असले तरी यांचा कणा मात्र ताठ असतो त्यासाठी त्यांना कुणी लढ म्हणायची सुद्धा गरज नसते कारण जन्मल्या दिवसापासून ते जीवनाची लढाईच लढत असतात ....

थोडे ऊनथोडी सावलीथोडी शिरवळथोडी शांत हवा तर थोड्या उन्हाच्या झळा सोसत प्रत्येक दुपार अग्निपरीक्षा घेत राहते अन विझलेल्या चुलीत्यापुढचा राखंचा उदासवाणा ढीग अन खोल गेलेले रांजणांचे तळ याचे मूक साक्षीदार बनून राहतात.

दारापुढून ओरडत गेलेले एखादे अवखळ पोर किंवा गप्पा मारायला घरात आलेली जीवाभावापेक्षा जास्त असणारी शेजारची एखादी वृद्धा इतकेच काय ते ओळखीचे आवाज असतात. पूर्वी सुयाबिब्बेपिनादोरे विकत फिरणाऱ्या वैदाच्या बाया यायच्या आता त्याही येत नाहीत. गारेगार विकणारा एखादा रसूलभाई मात्र बर्फ खिसत खिसत ओसाड गल्ल्या पालथ्या घालतो.

वेशीत सगळी रिकामटेकडी मंडळी गोळा होऊन चकाट्या पिटत बसतात नाही तर एखाद्या दिवशी पत्त्यांचा डाव रंगतो. एखाद्या दुपारी कुणाच्या तरी भांडणांचा डोंब उठतोअन सगळा रिकामटेकडा गाव त्यांच्या दारात येतो नाहीतर घरातली ती भांडणे वेशीत येतात. या भांडणातली मजा ओसरली की जो तो पुन्हा आपल्या बिनकामाच्या गुताड्यात गुंतून जातो.

चावडीत निराळीच चर्चा चालू असते. तंबाखू मळत मळत कुणाच्या घरी काय चालले आहे अन कुणाच्या फडात काय शिजतंय याचा सगळा चाखाचोळा दबत्या आवाजात तिथे चालू असतो. मध्येच एखादी मेख हाती लागली की 'दे टाळीम्हणून मोठा गलका होत राहतो. पुन्हा आवाज बारीक होत राहतो अन पान सुपारीची चंची हलकी होऊन जाते.

देवळाजवळ काही म्हातारी माणसे बसलेली असतात. तिथल्या लिंबाच्या पिंपळाच्या सावलीत बसून गळणारी पाने निरखीत राहतातगावातला पार चवचाल असतो तर चावडी शिंदळकी असते अन देवळाची ओसरी आयुष्याची सोबती असते. तिथे इतर सर्व ठिकाणांपेक्षा जास्त शांतता असते. आत पाकोळ्यांनी भिरभिर थांबवलेली असते अन एका कोनाड्यात त्या शांत निजलेल्या असतात. एखादे पोर आजी आजोबाच्या मागे हट्ट करून देवळात आलेलं असते तेही अगदी बिनसुध झोपी गेलेलं असतं. झाडांवरची पाखरेही चिडीचूप होऊन गेलेली असतात. गाभारयात सकाळी लावलेल्या उदबत्तीचा मातकट ओलसर दर्प आणि सुकून गेलेल्या फुलांचा वेगळाच गंध यांचे तरंग अधून मधून देवळाबाहेरून चालत जाणारया माणसालाही भुलवतात. तिथून चालत जाणारा एखादा अनामिक या वासासरशी पायातल्या वहाणा बाजूला काढतोउभ्या उभ्या हात जोडतो आणि हळूच काही क्षणासाठी का होईना तिथे आपले बुड टेकतो.

बघता बघता सावल्या लांब तिरक्या होत जातातअन निरस दुपार सरल्याची पहिली खुण पाखरांच्या गलबलाटाने सगळ्यांच्या चेहरयावर स्मितहास्याने उमटवते. सगळं चराचर अंग झटकून जागं होतं अन चुलीच्या पोटातल्या काटक्या पेटून उठतातमातीने सारवलेल्या जर्मनच्या भांड्यात बघताबघता चहाचे आधण चढते अन दुपार संपल्याचे जणू सगळीकडे जाहीर होते. जिकडे तिकडे नुसती एकच लगबग होतेमावळतीचा सूर्य मिश्किलपणे हसत हसत आपल्या डोळ्यात कललेल्या सांजेचे उधाणलेले रंग साठवत अस्ताकडे जाऊ लागतो...

समीर गायकवाड .           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा