सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

दाभोलकरांच्या पश्चातची चार वर्षे....



२० ऑगस्ट २०१३ ला पुण्यात नरेंद्र दाभोलकरांच्या रूपाने महाराष्ट्राच्या विवेकवादाची दिवसाढवळ्या निर्घृणहत्या करण्यात आली. त्या घटनेला आज चार वर्षे पूर्ण झाली. अत्यंत भ्याड हल्ला करून या दिवशी त्यागवादी सजगतेवर नियोजनपूर्वक घाला घातला गेला. नरेंद्र दाभोलकरांची हत्या सनातनी विचारांना वंदनीय मानणाऱ्यांनीच केल्याचा कयास त्या दिवसापासूनच उभ्या महाराष्ट्राने व्यक्त केलाय. ही हत्या म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या वसनांवरचा रक्तरंजित डाग आहे ज्याचे सद्य स्थितीत तर कोणत्याच राजकीय पक्षाला कसलेच सोयरसुतक दिसून येत नाही.गांधीवादी विचारांवर श्रद्धा ठेवून आपली चळवळ शांततेच्या मार्गाने पुढे नेणाऱ्या, वृद्धत्वाकडे झुकलेल्या एका निशस्त्र व्यक्तीस मारलं गेलं तेंव्हा राज्यभर नव्हे तर देशभर त्याबद्दल निषेध व्यक्त केला गेला,सर्वत्र एकच कोलाहल माजला तरी तपास यंत्रणांच्या कानात जू रेंगली नाही की कोणा राजकारण्याला याचा खंतखेद वाटला नाही. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी, तपास जलदगतीने व्हावा म्हणून राज्यातील विरोधी पक्ष लाजेकाजेने का होईना अधूनमधूनक्षीण आवाज उठवताना दिसतात. त्यांचा आवाज असा क्षीण का आहे याला विविध कारणांची 'भगवी','हिरवी', 'निळी' झालर आहे.

बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

रेड लाईट डायरीज - स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव...




देशाला स्वातंत्र्य मिळाले पण देशातील सर्व घटकांना स्वातंत्र्य मिळाले का याचे उत्तर नकारार्थी येते. आपल्या देशात आजही अनेक प्रकारचे वंचित, पीडित, शोषित आहेत, त्यातलेच काही वर्ग आजही खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेले नाहीत. यातीलच एक घटक म्हणजे अलीकडच्या सभ्य जगाच्या ढोंगी शब्दात सेक्सवर्कर वा देशी भाषेत वेश्या होत. त्यांच्या जीवनातील स्वातंत्र्याची ‘खरी’ सकाळ कधी उगवेल की नाही हे नेमके कोणी सांगू शकत नाही. अशाच एका दुर्दैवी मुलीची ही एक करुण कथा.

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

'आई'ची कविता आणि महाकवी नामदेव ढसाळ....



आई गेली याचं दुःख नाही प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते. दुःख याचं आहे की, अज्ञानाच्या घोषा आड  तिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या, गाव सोडताना ती तिथेच ठेऊन आली मरीआईचा गाडा. विस्थापित होऊन बाप आगोदरच धडकला होता शहरात आई शहरात आली देहाचं झाडवान घेऊन ; कष्ट, खस्ता उपसल्या भोगल्या तिने तरीही तिचा अद्भुताचा शोध चालूच होता तिच्या देहातली वाद्य अशी झंकारत रहायची बाप तसा खाटीकखान्यातला कसाईच होता प्रत्येक रात्री जनावरांचे सोललेले देह वहायचा ,रक्तबंबाळ व्हायचा चिक्कार पाहिलं भोगलं आईनेही शहरातही तिने तवली मध्ये अन्न शिजवलं पैठणीचे रंग न्याहाळता न्याहाळता जुनेराला ठिगळ लावलं बापाआधी मरून तिने असं अहेवपण जिंकलं बाप अजूनही खुरडत खुरडत मरणाची वाट पाहतो आहे आई आगोदर बाप मेला असता, तरी मला त्याचं काही वाटलं नसतं दुःख याचं आहे, तोही तिच्या करारात सामील होता दोघांनीही दारिद्र्याचे पाय झाकले लक्ष्मी पूजनाला दारिद्र्य पूजलं प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशी एक एक पणती विझवत गेली स्वतःच्या छोट्या विश्वाचा उलगडा झाला नाही आईला आभाळाकडे हात करून ती म्हणायची, त्याच्याशिवाय साधं झाडाचं पानही हलत नाही...

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

वृत्तवाहिन्यातील पत्रकारिता - अस्तंगत होत चाललेले सत्यतत्व.


'हाऊ सेन्सॉरशिप वर्क्स इन ब्लादीमीर पुतीन्स रशिया' या मथळ्याची बातमी अमेरिकेतील सर्वोच्च खपाचे दैनिक असणाऱ्या 'द वॉशिंग्टन टाईम्स'ने ९ फेब्रुवारी २०१६ च्या अंकात छापली होती तेंव्हा रशियन प्रशासनाला त्याच्या फार मिरच्या झोंबल्या होत्या, अमेरिकन मिडीयाने वाकुल्या दाखवत याचा आनंद घेतला पण तो फार काळ टिकला नाही जेमतेम वर्षातच अमेरिकेतच याहून वाईट परिस्थिती आली. डोनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच त्यांनी नावडत्या प्रसारमाध्यमांना व्हाईटहाऊसची दारे बंद केली. जी प्रसारमाध्यमे आपल्यावर आपल्या धोरणावर टीका करतात ती ‘अमेरीकाविरोधी’ असल्याचा कांगावा त्यांनी सुरु केला. टीका कारणाऱ्या प्रसारमाध्यमांना त्यांनी 'अपोझिशन पार्टी' असं हिणवून पाहिलं. यामुळे या माध्यमांच्या नाकात वेसण घातली गेली, काही माध्यमे झुकली तर काही आपल्या तत्वांवर टिकून राहिली. यातून ज्यांनी ट्रम्प प्रशासनापुढे आधीच पायघड्या अंथरल्या होत्या त्यांची मात्र चंगळ झाली. फ्रीलान्स पत्रकार डेरेक थॉम्पसन यांनी 'द अटलांटीक' मध्ये काही दिवसापूर्वी रंजक आढावा घेतला आहे त्यात काही महत्वाची तथ्ये समोर आलीत. ट्रम्प प्रशासन सत्तेत आल्यापासून फॉक्स न्यूज, एमएसएनबीसी आणि सीएनएन यांची किती चंगळ सुरु झाली आहे हे त्यांनी आकडेवारी सहित दिले आहे. त्याच बरोबर प्रिंट मिडीयात आपल्या आवडत्या समूहाला त्यांनी जाहिरातीचा मलिदा कसा वाटला गेला याची रोचक माहिती त्यात आहे. जगभरातील मिडीयाचा आढावा घेताना 'द गार्डियन' या कुरापतखोर दैनिकाने २४ मार्च २०१७च्या अंकात ब्लादिमीर पुतीन त्यांना न आवडणाऱ्या मिडिया समूहाशी कसे वागतात आणि त्यांची पत्रकारीतेबद्दलची भूमिका काय आहे हे खोचक पद्धतीने मांडले आहे.

मंगळवार, २५ जुलै, २०१७

परंपरांचे गळके सण...



आखाडात मरीआई आणि म्हसोबाचा रुबाब असतो.
तोंडाला शेंदूर फासून अभ्राणात मिरवणाऱ्या पोतराजालाही भाव चढतो.
सतराशेसाठ रूढी परंपराच्या डबक्यात लोळणाऱ्या सकल समाजाला आखाड ही पर्वणी असते.
ग्रामीण भागात याच्या जोडीला आणखी एक पात्र जोमात असते ते म्हणजे 'साती आसरा'.
हे पात्र जरा हॉरर कॅटेगरी मोडणारे आहे.
याची खानेसुमारी स्त्री पिशाच्चात (?) केली गेलीय.
आत्म्याला आणि भूताला लिंग असते का असा खोचक सवाल आपल्या लोकांना पडत नाही. साती आसरा या अप्सरारुपी हडळीच आहेत असं अजूनही अज्ञानात खोल बुडालेल्या समाजाला वाटते.
स्त्री पिशाच्च प्रकारामध्ये हडळ या नावातच एक जरब आहे नुसत्या उच्चारानेही काही भोंगळ लोकांना कापरे भरते.
जिथे जिथे जलाशय असतात, तिथे तिथे साती आसरा (जलदेवता/ अप्सरा/ हडळी) असतात, अशी लोकधारणा आहे...

शनिवार, २२ जुलै, २०१७

गुन्हेगारांचे जातीय उदात्तीकरण..


राजकारण्यांचे गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांचे राजनीतीकरण आपल्या देशाला अलीकडे सवयीचे झाले आहे त्याचे फारसे वैषम्य कुणालाच वाटत नाही. हा मुद्दा आता नागरीक, प्रशासन आणि सरकार या तिन्ही प्रमुख घटकांच्या अंगवळणी पडला आहे. सर्व वर्गातील गुन्हेगार राजकारण्यांच्या संपर्कात असतात हे आजवर अनेकदा सिद्ध झालेलं आहे. जनतेने, मिडीयाने त्यावर वेळोवेळी टीकाही केली आहे. पण मागील काही दशकात याचा एक वेगळा ट्रेंड तयार होताना दिसतो आहे त्याचा थेट परिणामही आता दिसून येऊ लागला आहे.  स्वातंत्र्याआधीही आपल्या देशात अनेक गुन्हेगार होऊन गेलेत. पण त्यांची कधीच व कुणीच भलावण केली नव्हती. स्वातंत्र्योत्तर काळात या दृष्टीकोनात झपाट्याने बदल घडत गेले. गुन्हेगारी जगतात शिरताना काही लोकांनी आपल्यावरील अन्यायासाठी बंदूक हाती घेतली, अपराधाचा रक्तरंजित इतिहास लिहिला. त्या व्यक्तीशी निगडीत काही वर्गातील विशिष्ट लोकांनाच या बद्दल थोडीफार सहानुभूती असल्याचंही दिसून आलं. फुलनदेवी हे याचं सर्वात बोलकं उदाहारण ठरावं. फुलनचे समर्थन करणारे एका विशिष्ट भूभागापुरतेच मर्यादित होते. तिच्यावरील अन्यायाचे कोणीही समर्थन करायला नको होते पण एका ठराविक वर्गाने तेही केलं तेंव्हा त्यांच्या अरेला कारेचा आवाज आपसूक आलाच. हीच अवस्था विविध राज्यात थोड्याफार प्रमाणात वेगवेगळ्या रुपात आढळून येऊ लागली आणि राजकारण्यांना यातील व्हॅल्यू पॉईंट ध्यानी आले. त्यांनी खतपाणी घालायला सुरुवात केली आणि असे लोक सर्वच राज्यातील विधीमंडळातच नव्हे तर संसदेतही दिसू लागले. 

शुक्रवार, ३० जून, २०१७

अनुवादित कविता - रफिक अहमद : मल्याळी कविता

ज्या रात्री वहिदा मरून गेली होती
तिची विधवा आई आस्मा बाहेर एकाकी उभी होती.
 
एकेक करून सगळे नातलग निघून गेले तेंव्हा
अंगणात कुणीच राहिले नव्हते..

भाड्याने आणलेल्या खुर्च्या परत देतानाच
गॅसबत्ती आणि चटयाही देऊन टाकल्या होत्या.
 
वहिदाने कधी काळी लावलेल्या प्राजक्ताच्या
चिमुकल्या फांद्यांवर अंधार रात्र चांगलीच सुस्तावली होती.
 
जीर्ण चिमणीचा मंद पिवळा उजेड
दीनवाणा होऊन जणू अश्रू ढाळत होता.
 
उदास मखमली पट्टेरी मांजरी तिथेच होती उभी,
वहिदाच्या गुळगुळीत स्लीपरवर हळुवार नाक घुसळत.
 
काही वेळापूर्वीच जणू
मनमुराद खेळून येऊनी तिने सोडल्या होत्या त्या
दगडांच्या ओबड धोबड पायऱ्यांवर.
 
झोपडीच्या दक्षिणेस कपडयांच्या तारेवरती
वहिदाचा फ्रॉक झिरलेला वाळत घातलेला, अजुनी होता लटकत.
 
जवळून जाणाऱ्या उनाड वाऱ्याने एका लाटेत त्याला उडवले,
जणू वहिदालाच जागे करायचे होते त्याला. 
शेजारच्या झाडावरील घरट्यावरती उडुनी तो पडला.
 
ज्या रात्री वहिदा मरून गेली होती
तिची विधवा आई आस्मा बाहेर एकाकी उभी होती......

पाऊस वादळी अकस्मात दाखल झाला तिथे.
आस्मा घरात धावली, परतली अन निमिषार्धात
ठिपक्यांची शुभ्र छत्री हाती घेऊनि

याच छत्रीसाठी वहिदाची तक्रार असे की 
चक्र तिचे तुटके आहे अन दुरुस्तीच्या पलीकडची गत आहे.
 
दफनभूमीतल्या ताजी माती अंथरलेल्या जागेवरती धाव आस्माने घेतली
मातीच्या आडोशाला छत्री धरली, माती घेतली कवेशी,
जमेल तितकं ती झाकत होती.

पाऊस संततधार कोसळतच होता, आस्मा मातीवर आडवी पडून होती.
मातीच्या कुशीतली वाहिदा तिला घट्ट चिकटली होती.
 
पावसात भिजणं आवडणाऱ्या वहिदाच्या देहावरील मातीत आस्माचे अश्रू मिसळत होते.
वहिदा मरून गेलेल्या रात्री पाऊस संततधार कोसळतच होता....
~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, २८ जून, २०१७

दाग देहलवी - आईच्या अधुऱ्या प्रेमाची गझल.....

daag dehlavi


एखाद्याची कविता वा शायरी खूप टोकदार असली की ओळखून घ्यावं की त्यानं खूप कठीण काळ पाहिलेला आहे, अशांच्या आयुष्यात डोकवलं की अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. जगात अशीही माणसं जन्माला येतात की त्यांना नको ती दुःखे अनुभवावी लागतात, नको ती दृश्ये पाहावी लागतात, बदनामीचा डाग नाहक आयुष्यभर माथ्यावर मिरवावा लागतो. त्यातही हा सल आपल्या सर्वात जवळच्या म्हणजे आईच्या नात्याचा असला की जगणं असह्य होऊन जातं आणि उरतो तो अथांग वेदनांचा काळाकभिन्न भवसागर. 
ही दास्तान एका विख्यात शायराची आहे. आयुष्यभर त्याला आपल्या जन्मदात्या आईची अखंड फरफट पहावी लागली. कळत्या वयापासून त्याच्या आईला जगाने दिलेली दुषणे त्याने काळजात दफन करून ठेवली होती, ज्याच्या जखमांचे नासूर होत गेले आणि त्यातून शायरी प्रसवली.

शनिवार, २४ जून, २०१७

माहेरची पाखरे .....

सोबतच्या छायाचित्रातल्या या सर्व जणी कोण आहेत ? मैत्रिणी ? भिशीग्रुपच्या महिला मेम्बर्स ? कुठल्या संस्थेतील स्टाफ कुलिग्ज ? की शेजारणी ? ..... काही अंदाज लावता येतो का ?
हरलात ना !
मीच सांगतो .... या सर्वजणी माझ्या बहिणी आहेत !!!! तब्बल वीस बहिणी !
यातली कुणी वयाची सत्तरी जवळ आलेली तर कुणी पस्तिशीच्या उंबरठयावर पोहोचलेली ! इतका मोठा जनरेशन गॅप असलेल्या तरीही एकमेकांची मने ओळखणाऱ्या अशा प्रेमळ, सोज्वळ आणि नितांत लडिवाळ मायाळू स्वभावाच्या माझ्या या बहिणी .... यांच्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे...


शनिवार, १७ जून, २०१७

'आनंदयात्री' कवी बा.भ. बोरकर ....



‘स्नेहगाथा’ या पुस्तकामधून बा. भ. बोरकर वेगळ्याच स्वरुपात वाचकांसमोर आले होते. त्यास अनुसरून कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्याशी अनौपचारिक गप्पाष्टक साकारताना बोरकरांनी आपल्या लेखन प्रयोजनाबद्दल आणि लेखनप्रकृतीबद्दल भाष्य केलं होतं. अगदी तरल मनमोकळ्या शब्दांत ते व्यक्त झाले होते. बोरकर म्हणतात की, "त्याकाळी स्वत:च्या पत्नीशी आणि स्वत:च्या घरातदेखील पांढरपेशा माणसाला मनमोकळेपणानं शृंगार करता येत नसे. एवढंच काय, आपल्या मुलाचा मुकाही वडील माणसांसमोर घेता येत नसे. त्यामुळं या समाजाचा सारा शृंगार चोरूनच व्हायचा. शृंगार- मग तो घरातला असो की घराबाहेरचा असो, त्याबद्दल उघडपणं बोलणं हे अशिष्ट समजलं जात होतं. जो खालचा समाज म्हणून गणला गेलेला होता त्याचं जगणं-वागणं आमच्यासारखं दांभिक नीतीनं ग्रासलेलं नव्हतं. आमच्या मानानं तो समाज कितीतरी मोकळा आणि म्हणूनच धीटही होता. त्यामुळं त्यांच्या लावणी वाङ्मयातला जातिवंत जिवंतपणा आपणाला जिव्या सुपारीसारखा झोंबतो. आमची सुपारी वाळलेली आणि पुटं चढवून मऊ केलेली. त्यामुळं त्यावेळचा आमचा प्रेमकवी राधाकृष्णाचा आडोसा तरी घ्यायचा किंवा प्रेमाच्या शिष्टमान्य कल्पनांचा आपल्या खर्‍या भावनेवर साज चढवून तिचा तोंडवळा कवितेत लपवून टाकायचा. माझ्या विधानाची सत्यता तुम्हाला पडताळून पाहावयाची असेल तर आपल्यातील चांगल्या कवींनी आपल्या पत्नीवर जी मनापासून कवनं लिहिली, ती त्यामानानं किती खरी वाटतात पाहा.
मी फार काळ वाट चुकलो नाही, याला माझ्या मते दोन कारणं घडली. विसाव्या वर्षी माझं लग्न झालं. त्यामुळं प्रणयाचा प्रत्यक्ष अनुभव मिळून माझा संकोच बराचसा चेपला गेला. दुसरं- त्या कालावधीत ख्रिस्ती समाजातलं माझं दळणवळण वाढलं. गोव्यातला ख्रिस्ती समाज बव्हंशी लॅटिन संस्कृतीत वाढलेला असल्यामुळं शृंगाराच्या बाबतीत तो अधिक प्रांजल, सौंदर्यासक्त आणि प्रीतीतल्या धिटाईचं कौतुक करणारा आहे. स्त्रीच्या सहवासात योग्य वेळी चातुर्यानं तिला उद्देशून समुचित Gallantry फेकणं हे त्यांच्यात सुसंस्कृतपणाचं लक्षण समजलं जातं. त्या समाजात वावरल्यामुळं माझी भीड चेपली आणि प्रेमभावना खरी असेल तर तिचा विमुक्त आविष्कार करण्यात कसलाच कमीपणा नसून, उलट पुरुषार्थच आहे असं मला वाटू लागलं. ‘प्रतिभा’ आणि ‘जीवनसंगीत’ यांच्या मधल्या काळातले माझे दोन छोटे हस्तलिखित कवितासंग्रह मी माझ्या गलथान व्यवहारात हरवून बसलो. ते आज हाताशी असते तर त्या काळात माझ्यात घडलेल्या या पालटाची काही प्रभावी प्रात्यक्षिकं तुम्हाला पाहायला सापडली असती."

गुरुवार, १५ जून, २०१७

नक्षत्रांचे देणे - आरती प्रभू




आरती प्रभू हे सुप्रसिद्ध लेखक चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव. आरती प्रभूंची म्हणजे खानोलकरांची काव्यसंपदा त्यांच्या कादंबरी, कथा, नाटक या साहित्य प्रकारांइतकी विशाल विस्तृत नसली तरी तिची नोंद घेतल्याशिवाय मराठी कवितेच्या अभ्यासाची इतिश्री होऊ शकत नाही. ८ मार्च १९३० रोजी वेंगुर्ला तालुक्यातील बागलांची राई या छोट्याशा गावी चिं. त्र्य. खानोलकर यांचा जन्म झाला. वडिलांचे छत्र बालपणीच हरपल्यावर आई हेच त्यांचे सर्वस्व झाले होते. वडिलांच्या मागे किशोरवयीन चिंतामणच्या मातोश्री खानावळ चालवत. त्यातून त्यांचा कसाबसा उदरनिर्वाह होत असे. खानोलकरांचे शिक्षण त्यामुळे फारसे होऊ शकले नव्हते. लहानपणी अंगी असणारी बेफिकिरी आणि त्या छोट्याशा व्यवसायातही असलेली स्पर्धा यामुळे त्यांच्या खानावळीचे बस्तान लवकरच उठले. व्यवसाय मंदावला. धनकोंच्या चकरा सुरु झाल्या, देणी वाढत गेली. घरातील चीजवस्तुंना हात लावायची वेळ आली.अशा रीतीने आयुष्य जगून चालणार नाही हे ते जाणून होते, नोकरी करावी म्हटलं तर शिक्षण खूप काही झालेले नाही. परिणामी इच्छा नसूनही घरातील वस्तू विकून दिवस काढायची वेळ त्यांच्यावर आली. जेंव्हा आर्थिक ओढाताण असह्य झाली तेंव्हा त्यांनी आपली वस्तुस्थिती मधू मंगेश कर्णिकांना कळवली. अशाच एका उनाड दिवशी ते अनाहुतासारखे मुंबईत येऊन धडकले.

शनिवार, १० जून, २०१७

शेतकरी आंदोलनाचे जागतिक दुखणे...


आपल्या देशाला शेतकरी आंदोलने नवी नाहीत. त्याची मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशभरात अनेक ठिकाणी अनेक वेळा विविध नेत्यांच्या नेतृत्वाखालीविविध पक्ष वा संघटनांच्या बॅनरखाली ही आंदोलने झालीत. देशातील शेतकरी आंदोलने तीन टप्प्यात विभागता येतीलएक म्हणजे आणीबाणीपूर्व काळ ज्यात पूर्णतः काँग्रेसशासित राजवट होती. दुसरा टप्पा म्हणजे आणीबाणी पश्चातचा काळ ते जागतिकीकरणादरम्यानचा काळतिसरा टप्पा म्हणजे जागतिकीकरणानंतरची कृषी आंदोलने. या तीनही टप्प्यात थोडं साम्य आहे. एक म्हणजे यात काही मागण्या सातत्याने नेहमी समोर येत राहिल्या तरीही त्यांचे पूर्ण निराकरण केले गेले नाही. या साठी तत्कालीन सत्ताधीशांबरोबरच विरोधी पक्षही काही अंशी जबाबदार ठरतात कारण त्यांनी एकी दाखवून या मागण्या कधीही पदरात पाडून घेतल्या नाहीत. दुसरे म्हणजे या तीनही टप्प्यात शेतकरयांसाठी एकछत्री देशव्यापी संघटना उभी राहू शकली नाही व देशव्यापी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्वही पुढे आले नाही. देशात व्यापारीउद्योजकनोकरदार यांचे अनेकपदरी देशव्यापी संघटन उभे राहिले. सरकारवर दडपण आणणारे त्यांचे दबाव गट निर्माण झाले मात्र शेतकरयांच्या आघाडीवर याचा सदासर्वदा दुष्काळ राहिला.

मंगळवार, ६ जून, २०१७

'जंगलाचा आलेख' - धर्मराज निमसरकर




दलितांचे तथाकथित नेते आणि त्यांच्यासाठी झटत असल्याचा आव आणणाऱ्या दलितेतर राजकारण्यावर विचार करण्याजोग्या संदर्भाची जुळवाजुळव करताना निमसरकरांच्या एका कवितेची प्रकर्षाने आठवण येते. या कवितेचा संयमी अर्थपूर्ण सवाल आणि अत्यंत टोकदार पद्धतीने मांडलेला आशय सध्याच्या काही प्रश्नावर मार्मिक भाष्य करू शकतो.....

'त्याने जंगलाच्या संदर्भाचा नवा आलेख
उसवून द्विधा झालेल्या झुडुपांसमोर सादर केला
तो त्यांचेसाठीच होता असा त्याचा सूर होता.
पण उपस्थितांमध्ये फक्त रंगविलेले एक
चिनार झाडच होते,
तेव्हढ्यामध्येही त्याला बरंच समाधान झालं.
नाहीतरी आलेख तयार करत असताना
त्याला असंच वाटायचं....आपला आलेख
समजून घेण्याची पात्रता फक्त चिनार झाडामध्ये आहे.
पण, झुडुपाबाद्द्ल स्तोत्र आहे
हेही त्याला सांगायचं होतं ;
म्हणजे चिनार झाडांचीही मेहेरनजर
अटळ राहील आणि झुडुपामाध्येही
भरभक्कम पत अबाधित राहील.
यामध्ये आपण काही बनवाबनवीचा प्रकार करतो आहो
असे त्याचे गावीही नव्हते,

रविवार, ४ जून, २०१७

ताईच्या (हरवलेल्या) बांगड्या ......



समोर बसलेल्या आपल्या मायभगिनींच्या वा पोरीबाळींच्या हाती विविध रंगी बांगड्या अलगद चढवणारे कासार आणि त्यांच्या पुढ्यात हात करून बसलेल्या स्त्रिया हे दृश्य कशाची आठवण करून देते ? अर्थातच नागपंचमी जवळ आल्याची !
नागपंचमी आणि बांगडया यांचे नाते म्हणजे आई आणि मुलीच्या नात्यासारखे !
मुलगी आईजवळ असली की उजळून निघते, तिला लकाकी चढते.
लेक आईपाशी आली की आईचा जीव आभाळाएव्हढा होतो. तसंच या बांगड्या आणि स्त्रीच्या नात्याचं तत्व आहे ! नागपंचमीला हात बांगडयांनी मढून निघाले की त्या बांगड्यांना निराळेच चैतन्य लाभते.

अन बांगड्या हाती चढल्या की त्या परिधान करणाऱ्या स्त्रीला मुठभर मांस अंगावर चढल्यासारखे वाटते अन तृप्तीची लकेर तिच्या स्मितहास्यात चमकून जाते.

अलीकडे शहरात मोठाले वासे आणून झोके बांधले जातात अन स्त्रिया त्यावर उंच उंच झोके घेतात अन झोके घेतानाच हलकेच आपल्या माहेरच्या नागपंचमीच्या आठवणीत दंग होऊन जातात.

ओलाव्यातले जळते ठसे – केशव मेश्राम



शब्दाचे रुपांतर अणकुचीदार बाणात आणि आशयाचे रुपांतर ज्वालामुखीच्या उद्रेकात झाले तर निर्माण होणारे काव्य कोणत्या प्रकारचे असेल असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचे निसंशय उत्तर दलित साहित्य असेच असेल ! त्यातही नेमके पृथक्करण करायचे झाले तर विद्रोही दलित कवितांचे नाव घ्यावे लागेल.

‘एक दिवस मी परमेश्वगराला
आईवरून शिवी दिली :
तो लेकाचा फक्कन हसला.
शेजारचा जन्मजात बोरुबहाद्दर उगीचच हिरमुसला,
एरंडेली चेहरा करून मला म्हणाला :
"तु असा रे कसा, त्या निर्गुण निराकार
अनाथ जगन्नाथाला काहीतरीच बोलतोस ?
शब्दांच्या फासात त्याचा धर्मफणा धरतोस ?"
पुन्हा एकदा मी कचकून शिवी दिली,
विद्यापीठाची इमारत कमरेपर्यंत खचली,
माणसाला राग का येतो या विषयावर
आता तेथे संशोधन सुरु आहे,
उदबत्तीच्या घमघमाटात भरल्या पोटाने
भावविव्हळ चर्चा झाली,
माझ्या वाढदिवशी मी परमेश्वराला शिवी दिली..

शिवी दिली,शिव्या दिल्या, लाटांसारखे
शब्दाचे फटकारे मारीत मी म्हटले,
‘साल्या! तुकडाभर भाकरीसाठी
गाडीभर लाकडं फोडशील काय?
चिंधुक नेसल्या आईच्या पटकुराने
घामेजले हाडके शरीर पुसशील काय?
बापाच्या बिडीकाडीसाठी
भावाबहिणीची हाडके झिजवशील ?
त्याच्या दारूसाठी भडवेगिरी करशील ?
बाप्पा रे,देवबाप्पा रे ! तुला हे जमणार नाही,
त्यासाठी पाहिजे अपमानित
मातीत राबणारी,
प्रेम करणारी मायमाऊली.......'
एक दिवस मी परमेश्वराला आईवरून शिवी दिली.

शुक्रवार, २ जून, २०१७

बहिणाई चौधरी ......मायमराठीची तेजस्वी लेक ...



‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणारी एक कवयित्री माय मराठीत होऊन गेली जिचे ऋण व्यक्त करण्यास शब्द कमी पडतात. त्या महान कवयित्री म्हणजे बहिणाई चौधरी. छोट्याशा शब्दात आभाळभर उंची गाठणारी त्यांची शब्दरचना अद्भुत आणि अद्वितीय अशी होती, मराठी साहित्यात तिची सर कधी कुणाला भरून काढता आली नाही.

‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’या पंक्तीचा विस्तार एका कथेत आहे. एका खेडेगावात एक साधू भिक्षा मागत फिरत होता. काही घरी त्याला भिक्षा मिळत होती तर काही घरी त्याला भिक्षा द्यायला कुणी नव्हतं. जी ती माणसं शेतशिवारात कामाला गेलेली होती. भटकंती करत ते साधू शेतांमधून फिरू लागले. एका वस्तीवरील घरातल्या तरुण स्त्रीने त्यांची विचारपूस केली. गूळाचा खडा, पाणी दिलं. इकडची तिकडची माहिती विचारत त्यांना भिक्षा दिली, जेवण दिलं.

मंगळवार, ३० मे, २०१७

गाय, गोमांस आणि इतिहास



एके काळी भारतातील खेड्यांत स्थायी जमातीचे लोक व वाताहत झालेले लोक राहत होते. पहिले गावकुसाच्या आत आणि दुसरे गावकुसाच्या बाहेर असे परस्परांपासून वेगवेगळे राहत असले तरी त्या दोन्ही वर्गातील लोकांत आपसात सामाजिक व्यवहारावर कसलीही सामाजिक बंधने नव्हती. 'हु आर शूद्राज'मधे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, 'जेंव्हा गाय पवित्र बनली आणि गोमांस भक्षण निषिद्ध ठरले तेंव्हा समाजाचे विभाजन दोन वर्गामध्ये झाले.' भारतीय समाजात अस्पृश्यता किंवा प्रखर सामाजिक भेद करणारा जातीभेद/ वर्णभेद पूर्वापार अनेक सह्स्त्रकांपासून कधीच नव्हता. एका विशिष्ट कालखंडापासून अस्पृश्यता रूढ झाली असे नव्हे तर चढत्या कमानीत वाढत राहिली. समाजात अस्पृश्यता रूढ होण्याच्या कालावधीवरून गाय पवित्र कधी मानली जाऊ लागली याचा अंदाज काढणे सोपे जाते. या साठी दोन घटक विचारात घ्यावे लागतील ते म्हणजे किमान व कमाल कोणकोणत्या काळापासून गाय पवित्र मानणे सुरु झाले तो कालखंड हा अस्पृश्यता दृढ होण्याचा कालावधी होय.

सोमवार, २९ मे, २०१७

देशप्रेमाचा हंगाम .....


"हा भाकरीचा जाहीरनामा
हा संसदेचा रंडीखाना
ही देश नावाची आई
राजरोस निजते कुबेराच्या सोबत...."
नामदेव ढसाळांची ही कविता मागच्या दोन आठवडयात कानात तापलेलं शिसं घुसावी तशी मेंदूत रुतून बसली आहे....

मंगळवार, २३ मे, २०१७

ओसरीवरची माणसं ......



ओसरीवर नाहीतर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात.

आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे . गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे. कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कमरेला आलेला बाक. नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. डोईवर पांढरी टोपी.

शुक्रवार, १९ मे, २०१७

अंघोळाख्यान ...



बाळ जन्मल्यानंतर त्याला अंघोळ घालून स्वच्छ केले जाते आणि मग आईकडे त्याला सुपूर्द केले जाते. तेच मूल मोठे होते. बाल्य, कुमार, तारुण्य, प्रौढ अवस्थेनंतर वृद्धावस्था पार केल्यानंतर एका दुर्दैवी दिवशी त्याचा मृत्यू होतो आणि त्याचे अंतिम संस्कार करण्याआधी त्याला अंघोळ घातली जाते. व्यक्ती कोणत्याही जातधर्माचा असो त्याच्या आयुष्यात आरंभ, अंताच्या या बाबी घडतातच. एक जितेपणी तर एक मृत्यूनंतर ! अशा रीतीने आपल्या जीवनाचा अंघोळीशी अत्यंत जवळचा संबंध येतो ! अंघोळ ही कोणत्याही व्यक्तीच्या दिनक्रमात नित्यनेमाचे स्थान असणारी बाब आहे. तरीही काही आळसप्रेमींना अंघोळ नकोशी वाटते. 'अंघोळीची एखादी गोळी असती तर किती बरे झाले असते' अशी हुरहूर त्यांना वाटते. पण अशी सोय अजून तरी झालेली नाही त्यामुळे जन्मल्यावर सुरु होणारी अंघोळ श्वास थांबल्यावरही एकदा 'अंगावर' येतेच, मग कुठे त्यातून सुटका होते.