बुधवार, २८ जानेवारी, २०२६

अजितदादा पवार: जननायक कर्मयोद्धा!


महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात एक चमकदार तारा काल निखळला. काल बारामती विमानतळाजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी ते महाराष्ट्रातील जनतेस पोरके सोडून गेले! त्यांच्या आठवणी, त्यांचे भाषण, सभा आणि जनसेवेचा वारसा कायम राहील. 'दादा' म्हणून ओळखले जाणारे अजित पवार केवळ यशस्वी राजकारणी नव्हते, तर एक कर्तबगार प्रशासक, शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मित्र आणि कुटुंबवत्सल मायाळू व्यक्ती होते. ते जितके मृदु मुलायम होते तितकेच वज्रनिश्चयी आणि प्रसंगी कठोर वाटावे अशा व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुन्न झाला आहे, आणि त्यांच्या स्मृतींचे आभाळ पुन्हा पुन्हा भरून येत आहे. त्यांची अनेक भाषणे, त्यांची देहबोली, त्यांचं वागणं, त्यांचं कार्यमग्न असणं, त्यांच्या वैयक्तिक आठवणी आणि लाडक्या जनतेप्रती त्यांचं समर्पित असणं आदी गोष्टींद्वारे त्यांची उणीव अधिक गहिरी होतेय! लोकाभिमुख कामे करणाऱ्या अजितदादांची प्रतिमा 'टग्या' अशी का निर्माण केली असेल हा प्रश्न राहून राहून पडतो! कदाचित राजकीय डावपेचातून हे घडले असावे! असो. वास्तवात त्यांची भाषणे आणि त्यांची कामाची शैली तसेच त्यांच्याकडे कामे घेऊन जाणाऱ्या माणसांचे अनुभव पाहू जाता त्यांची प्रतिमा 'कामाचा माणूस' अशीच असायला हवी होती!

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

फायर ऑफ लव्ह - निसर्ग आणि मानवाच्या प्रेमाचे महाकाव्य!




सारा डोस दिग्दर्शित 'फायर ऑफ लव्ह' ही डॉक्युमेंटरी म्हणजे केवळ दोन ज्वालामुखी तज्ज्ञांच्या कार्याचा आलेख नाही, तर तो निसर्ग, विज्ञान आणि प्रेम यांच्या अद्वैताचा एक नितांत सुंदर आविष्कार आहे. कात्या आणि मॉरिस क्राफ्ट या फ्रेंच दाम्पत्याच्या आयुष्यावर आधारित हा माहितीपट प्रेक्षकांना एका अशा जगात घेऊन जातो, जिथे मृत्यूच्या सावलीतही जीवनाचे विलोभनीय संगीत ऐकू येते. कात्या आणि मॉरिस या दोघांचेही ज्वालामुखीवर असलेले प्रेम हे त्यांच्या वैयक्तिक प्रेमापेक्षाही अधिक उत्कट होते की काय, असा प्रश्न ही डॉक्युमेंटरी पाहताना पडतो. ही केवळ दोन भिन्नलिंगी शास्त्रज्ञांची कथा नसून 'निसर्गाच्या काळजाचे ठोके' ऐकणाऱ्या दोन वेड्या निसर्गप्रवाशांची गाथा आहे. 1970 आणि 80 च्या दशकात त्यांनी टिपलेले ज्वालामुखीचे थरारक चित्रीकरण हा या डॉक्युमेंटरीचा मुख्य कणा आहे. 'लाल ज्वालामुखी' (Red Volcanoes) आणि 'राखाडी ज्वालामुखी' (Grey Volcanoes) यांच्यातील भेद स्पष्ट करतानाच, मानवी अस्तित्वाची क्षणभंगुरता यात प्रभावीपणे मांडली आहे. क्राफ्ट दाम्पत्याने ज्वालामुखी विज्ञानात (Volcanology) मोलाची भर घातली आहे. त्यांच्या संशोधनाचे दोन मुख्य भाग पडतात - लाल ज्वालामुखी हे प्रामुख्याने हवाई किंवा आइसलँडमधील ज्वालामुखी होते. यात लाव्हा संथपणे वाहतो. कात्या आणि मॉरिस यांनी या लाव्हाच्या प्रवाहाचा वेग, त्याचे तापमान (जे अनेकदा 1000 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते) आणि त्यातील वायूंचे उत्सर्जन यांचा सखोल अभ्यास केला. राखाडी ज्वालामुखी हे सर्वात धोकादायक ज्वालामुखी मानले जातात. 1980 मधील 'माउंट सेंट हेलेन्स'च्या उद्रेकानंतर क्राफ्ट दांपत्याने आपला मोर्चा या राखाडी ज्वालामुखींकडे वळवला.

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

सुगंधा!


काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मंडईलगतच्या रस्त्याच्या कडेला एक अंध चिमुरडी उभी असायची.

तो रस्ता तिच्या परिचयाचा असावा
तिचे अंध वडील तिथेच कुठेतरी आसपास असायचे, तिच्या हाती अंध व्यक्तींची छोटी काठी दिसे.

तिचा चेहरा वाहतुकीच्या सन्मुख असे, रोज सकाळी ठराविक वेळी ती कुणाची तरी वाट पाहत उभी असे.
दरम्यान त्याच वेळी एक हार गजरे विकणारा
वृध्द इसम तिथे येई
बहुतेक त्यांची ओळख असावी.

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

गोष्ट एका मायाळू घोडीची!



थोरले आजोबा हमालीचे काम करायचे, त्यांच्याकडे एक बैलगाडी होती. छकडाही होता. त्यावर पोती लादून ती पोच करायचे,ट्रक ट्रॉलीमध्ये चढवायचे काम ते करायचे. त्यांच्या चुलत भावाकडे एक टांगा होता आणि दोन घोडे होते. पडीक रान होतं, ज्यात धान्य भाजीपाला पिकवावा म्हटलं तर पाणी नव्हतं. आजोबांच्या घरालगत बरीचशी मुस्लिम वस्ती होती. जवळच्या दर्ग्याला लागून सारी घरं वसली होती. दर्गा ओलांडला की काही अंतरावर हमरस्ता होता. सकाळीच ताज्या दूध भाकरीची न्याहरी करून आज्जा हमालीसाठी घराबाहेर पडायचा. आज्जा बाहेर पडताच टांगा घेऊन त्यांचा चुलत भाऊ देखील बाहेर पडायचा. टांग्याला जुंपलेल्या घोड्याचे नाव होतं शेरा! खास हौस म्हणून ठेवलेल्या दुसऱ्या दोन घोड्यांना रपेटीसाठी वापरले जायचे. त्यात एक नर होता आणि एक मादी. हिरा आणि राणी ही त्यांची नावं.

सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

ब्रिजित बार्डो - विचारांची दोन टोके गाठणारी सेक्स सिंबॉल!


एके काळची सेक्स सिंबॉल असणारी आणि मॉडेलिंग तसेच अभिनयाच्या क्षेत्रात आपला वादग्रस्त ठसा उमटवणारी फ्रेंच वोक लेडी, ब्रिजित बार्डो हिचे आज निधन झाले. एखाद्या व्यक्तीची मते, विचारधारा या टोकाकडून त्या टोकाकडे कशी जातात याचे ती उत्तम उदाहरण ठरावी.

मृत्यू समयी ती 91 वर्षांची होती, तिच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात तिच्याविषयीची चर्चा तिच्या सेक्सी असण्याबद्दल आणि हॉट दिसण्याबद्दलची असायची. ती जगभरात चर्चेत होती ते दशक साठ आणि सत्तरचे होते, माझ्यासह अनेकांचा जन्मही झालेला नव्हता अशा काळातील ही बिनधास्त बाई, तिच्या आयुष्याच्या अखेरच्या तीन दशकात एकशे ऐंशी अंशातून बदलली!

खरे तर ती कधीही फक्त एक लैंगिक प्रतीक नव्हती, लोकांच्या मते मात्र ती सदैव टूपीस बिकिनी घातलेली मोलोटॉव कॉकटेल होती! ती ओरिजिनल "इट गर्ल" होती जिने, महायुद्धोत्तर युरोपातील लैंगिक नीतीमत्तेच्या विचारधारांचा  अक्षरश: पालापाचोळा केला होता! आणि त्या बदल्यात तिला वैयक्तिक जीवनात त्याची क्रूर किंमत मोजावी लागलेली.

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

बेपत्ता होणाऱ्या जिवांचे व्याकुळविश्व!


मागील काही दिवसांपासून राज्यांतील बेपत्ता व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बातम्यांची संख्या वाढलेली दिसतेय. खरेतर ही वाढ केवळ राज्य पातळीवर नसून देश पातळीवर, जागतिक पातळीवरही दिसते आहे. ही वाढ मागील काही दशकांच्या तुलनेत अधिक आहे. मुंबई आणि उपनगरात जून ते डिसेंबरमध्ये 93 मुलींसह 145 जण बेपत्ता झाल्याची माहिती मध्यंतरी फोकसमध्ये आली होती, नंतर काही दिवसात तिचे बातमीमूल्य शून्य झाले. महाराष्ट्रातील मुले आणि मुली बेपत्ता होण्याबाबतची 2024 -2025 या काळातील अधिकृत आकडेवारी भीषण आहे. एका आकडेवारीनुसार वर्षभरात राज्यात एकूण 37695 मुली आणि महिला बेपत्ता झाल्यात, त्यातील 4096 मुली अल्पवयीन आहेत तर सज्ञान महिलांची संख्या 33599 आहे. या काळातली मुंबई आणि इतर शहरांमधील आकडेवारी अधिक चिंताजनक आहे. एकट्या मुंबईमध्ये 1 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या अवघ्या छत्तीस दिवसांत मुंबईतून 82 मुले बेपत्ता झाली. यापैकी 60 महिला/मुली होत्या. जून ते डिसेंबर या सहा महिन्यात एकूण 134अल्पवयीन मुले बेपत्ता झाली, ज्यामध्ये 86 मुलींचा समावेश होता. नवी मुंबईमध्ये जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान 499 मुले बेपत्ता/अपहरण झाल्याची नोंद झाली, त्यापैकी 458 मुले शोधण्यात पोलिसांना यश आले असून 41 मुले (34 मुली आणि 7 मुले) अजूनही बेपत्ता आहेत. नागपूर शहरात जानेवारी 2024 ते मे 2025 या काळात 5897 बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारी आल्या, ज्यामध्ये 776 मुले होती. महाराष्ट्रात, देशांत मुलं मुली बेपत्ता होण्यामागे विविध कारणे आहेत. मानवी तस्करी (Human Trafficking), बालविवाह (Child Marriage), पळून जाणे (Elopement), लैंगिक शोषण (Sexual Exploitation), कामासाठी शोषण (Labour Exploitation), आणि कौटुंबिक समस्या (Family Issues), प्रेमसंबंध किंवा सामाजिक माध्यमांवरील फसवणूक (Social media enfluence) इत्यादींचा समावेश होतो; यांतील काही घटनांमध्ये कधी फसवून नेले जाते तर कधी मुलं मुली स्वतःच काही कारणास्तव घर सोडून जातात, आणि अनेकदा पोलिसात तक्रार दाखल होण्यास उशीर होतो किंवा प्रतिष्ठेचा विषय समजून प्रकरणे दाबून टाकली जातात, ज्यामुळे ही समस्या गंभीर बनते.

शनिवार, २० डिसेंबर, २०२५

एपस्टीन फाइल्स! - वासना विकृतीच्या दलदलीची साक्ष



आपल्या देशातील राजकीय वर्तुळात एपस्टीन फाइल्स हे शब्द मागील काही दिवसापासून चर्चेत आहेत. तसे तर याची चर्चा जगभरात आहे, खास करुन अमेरिकेत तर मागील कित्येक महिन्यांपासून आहे.

आपल्याकडे काहींना वाटते की, या फाइल्सचे तपशील अमेरिकन संसदेत सार्वजनिक केल्यानंतर राजकीय घडामोडींना उत येईल.

असे काही होईल की नाही हे काही तासांनी कळेलच. तूर्त एपस्टीन फाइल्सची आणि या मागच्या विकृत वासना कांडांची माहिती.

एपस्टीन स्वतः सेक्स हाउंड होता, विकृत होता. त्याने केवळ बाललैंगिक शोषण केले अशातली बाब नव्हती त्याने जगभरातील धनाढ्य धेंडांना लहान मुली पुरवल्या. त्या मुलींचे एकदा नव्हे तर अनेकदा शोषण केले.

दोन दशकं तो हा उद्योग करत होता. त्याचे स्वतःच्या मालकीचे एक बेट होते. तिथे तो या ओंगळवाण्या श्रीमंतीच्या चिखलात बुडालेल्या गलिच्छ लोकांना बोलवायचा, त्यांच्या विकृत वासनांना तो आकार द्यायचा.

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

मुल्क राज आनंद - भूमिका घेऊन जगलेला लेखक!


"आजही लिखाण माझ्यासाठी एक प्रकारची थेरपी आहे. दररोज लिहिल्याशिवाय मला राहवत नाही. खरं तर 1927 मध्ये मला पहिल्यांदा मानसिक ताणामुळे खचायला झालं तेव्हा व्हिएन्नामध्ये सिग्मंड फ्रॉइड यांची भेट घेतली. पुढे जाऊन आमच्या भेटींचा सिलसिला जारी राहिला.

त्यांच्यासोबतच्या प्रत्येक भेटीने मला मोठा दिलासा मिळाला. पण नंतरच्या काळात आलेल्या मानसिक ताणांच्या दोन धक्क्यांवर मात करण्याची ताकद मात्र फक्त लिखाणातूनच मिळाली. या प्रत्येक आघात समयी मी एक कादंबरी लिहिली, परिणामी कमकुवत झालेली मनोवस्था पुन्हा सावरली.

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

द राँग ट्रेन थिअरी - स्वतःच्या शोधाची गोष्ट!

‘द राँग ट्रेन थिअरी‘ नावाचे एक गृहीतक जपानमध्ये प्रसिद्ध आहे. कधीकधी चुकीचे लोक आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातात मात्र तो प्रवास सहनशीलतेचा अंत पाहतो! ‘द राँग ट्रेन थिअरी‘मध्ये एक सुंदर आणि तितकीच दुःखद गोष्ट आहे.
 
कधीकधी आपण चुकीचा मार्ग स्वीकारतो, चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा चुकीच्या जागी खूप वेळ थांबून राहतो. चुकीचे करिअर निवडतो, चुकीच्या गावी स्थलांतरित होतो, चुकीच्या नात्यात - भावनांत गुंतून पडतो, चुकीच्या कल्पनांना आपलं विश्व मानतो, चुकीच्या शब्दांना भुलतो - बळी पडतो, असं बरंच काही चुकीचं आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात स्वीकारलेलं असतं.

हे आपल्यासोबतच का घडतं? खरे तर आपण जेव्हा या निर्णयाचा स्वीकार केलेला असतो तेव्हा सुरुवातीला हे सगळं आपल्याला खूप भारी वाटत असतं. हे सर्व आपल्या मनासारखं घडतंय या आनंदात आपण मग्न होतो.

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

स्त्रियांचे जगातले पहिले मतदान आणि भारत -


  
संपूर्ण देशभरातील स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणारा जगातला पहिला देश न्यूझीलँड आहे. आजच्या तारखेस 132 वर्षांपूर्वी संपूर्ण न्यूझीलँडमधील महिलांनी मतदान केले होते. 19 सप्टेंबर 1893 रोजी हा कायदा तिथे संमत झाला आणि त्याच वर्षी 28 नोव्हेंबरला पार पडलेल्या निवडणुकीत किवी महिलांनी मतदान केले. खरेतर याही आधी अमेरिकेच्या वायोमिंग आणि यूटा या राज्यात स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला होता मात्र उर्वरित अमेरिकन राज्यात त्यांना मताधिकार नव्हता. म्हणूनच अशी समानता राबवणारा न्यूझीलँड हा पहिला देश ठरला. तिथे महिलांना मतदानाचा हक्क मिळण्यामागे दारूचा वाढता प्रभाव, पुरुषांमधली वाढती व्यसनाधिनता कारणीभूत होती हे सांगूनही खरे वाटणार नाही, मात्र वास्तव हेच होते.

मागील काही वर्षांत न्यूझीलँडमधल्या माओरी आदिवासी स्त्रियांचे आणि त्यांच्या परंपरिक 'हाका'चे रिल्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, याला कारण होते माओरी आदिवासींची व्यक्त होण्याची अनोखी 'हाका' शैली, माओरी जनतेचे त्यांच्या मातृभाषेवरचे असीम प्रेम! माओरी स्त्रीपुरुष दोघेही लढवय्ये आहेत हे एव्हाना जगातील सर्व देशांना कळून चुकलेय. सतराव्या शतकात हा देश ब्रिटिश अंमलाखाली होता. 1841 साली न्यूझीलँडला स्वयंशासित कारभाराची परवानगी मिळाली. मात्र पूर्ण स्वातंत्र्य आपल्याप्रमाणेच 1947 मध्ये मिळालं.

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

गोष्ट वीज कोसळण्याच्या योगायोगाची आणि झांबळमधल्या कथेची!


एका विलक्षण योगायोगाची वा कदाचित अज्ञात ऊर्जेची ही पोस्ट. 4 जून 1737 ची घटना. कॅलेब पिकमन हा बावीस वर्षांचा तरुण त्याच्या आईला भेटायला घरी आला होता. कॅलेब हा सागरी कप्तान होता. सागरी मोहिमा पूर्ण झाल्या की सहा महिन्यांनी तो घरी यायचा. घटनेच्या दिवशीही तो समुद्री सफर पूर्ण करून घरी आला होता. तो पावसाचा दिवस होता, किंचित भिजलेल्या कॅलेबने दरवाजाबाहेर अडकवलेली धातूपट्टी ओढून डोअरबेल वाजवली, त्याच्या आईने आतून हाक मारल्यावर आपण दाराबाहेर उभं असल्याचं त्यानं सांगितलं. त्याची वयस्क आई दारापाशी येऊन दरवाजा उघडेपर्यंत आकाशात विजेचा कडकडाट झाला. कॅलेबच्या आईने दार उघडून पाहिलं तर तिचा मुलगा दाराबाहेर मृतावस्थेत पडला होता. वीज कोसळून अवघ्या निमिषार्धात त्याचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील सालेम या समुद्रकिनारी असलेल्या शहरात ही घटना घडली.

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

मेडीटेशन आणि रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस!


माणूस इकडे तिकडे शांतता शोधत असतो मात्र खरी शांतता त्याच्या हृदयात असते. अर्थात या गोष्टीचा थांग तेव्हाच लागतो जेव्हा मन अशांत होते! शांततेचा शोध शांत भोवतालात अथवा सुख समृद्धीत आकंठ बुडालेल्या अवस्थेत असताना कुणीच घेत नाही! जगभरात बुद्धासारखे एखादे अपवाद असतील मात्र बाकी विश्व शांतता कधी शोधते याचे उत्तर एकसमान येते.

आज जगभरात मेडीटेशनचा बोलबाला आहे, आपल्याकडे तर मेडीटेशन्सवरच्या रिल्स, पोस्ट्स, पॉडकास्ट लाखोंच्या संख्येत रतीब घालताना दिसतात. आपल्यापैकी अनेक जण विविध प्रकारचे मेडिटेशन करताना दिसतात. मनःशांतीचा सोपा नी सहज सुलभ मार्ग म्हणून याकडे पाहिले जाते! मात्र मेडिटेशन कुणी लिहिलं याचा शोध घेतला की विस्मयकारक नाव आणि माहिती समोर येते!

आपल्यापैकी अनेकांनी 'ग्लॅडिएटर' हा सिनेमा पाहिला असेल. अभिनेता रसेल क्रो याने साकारलेला मॅक्सिमस, कमांडर ऑफ द आर्मीज ऑफ नॉर्थ, विसरणे शक्य नाही. वास्तवात हे पात्र काल्पनिक होते तरीही जगभरातील सिनेरसिकांना याची भुरळ पडली कारण, मॅक्सिमसची पार्श्वभूमी! आपला वृद्ध राजा मार्कस ऑरेलियस याच्याशी एकनिष्ठ असणारा सेनापती असणारा मॅक्सिमस आपलं सर्वस्व गमावूनही राजावर झालेल्या अन्यायासाठी प्राणांची बाजी लावतो. मार्कसचा क्रूर मुलगा सम्राट कमोडस याची तो हत्या करतो अशा मांडणीची ती काल्पनिक कहाणी होती.

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

कविता - जिचे मरण स्वस्त झाले!


ही ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे कारण अतिशय वेदनादायी आहे. अगदी खात्रीशीर माहिती स्त्रोताच्या आधारे सांगावे लागतेय की, महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने एड्स, एचआयव्ही बाधित रुग्णांना मदत, उपचार देणाऱ्या अनेक केंद्रांचा, स्वयंसेवी संस्थांचा निधी मागील तीन महिन्यापासून थांबवला आहे. सरकार कुठे कुठे कसे कसे पैसे खर्च करतेय हे आपण सारेच पाहत आहोत!

या जीवघेण्या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण घटले असले तरी संपलेले नाही, निर्मूलन झालेले नाही हे सत्य आहे! अजूनही शेकडो रुग्ण प्रत्येक केंद्रात उपचार घेतात. या बायका लाडक्या नाहीत का? यांना उपचार मिळावेत असे वाटत नाही का?

दोन हजारात त्यांची महिन्याची औषधे येत नाहीत हे या क्षेत्रात काम करणारा कोणताही माणूस सांगेल! कवितासारख्या कित्येक बायकांना नवजीवनाची संजीवनी देण्यापासून आपण मागे हटू शकत नाही! हे पाप आहे, हा कोतेपणा आहे, हे मानवतेला धरून नाही!

सरकारने रोखून धरलेली मदत पुन्हा पूर्ववत करावी आणि गांजलेल्या, नाडलेल्या अभागी महिलांचा दुवा घ्यावा! कल्याणकारी राज्यात ही गोष्ट होणं अनिवार्य आहे. ही फार मोठ्या रकमेची बाब नाही. अवघ्या काही कोटींची ही समस्या आहे, सरकार यावर विचार करेल काय? असो.

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

पंडित नेहरूंना मंटोंचे पत्र.


जागतिक किर्तीचे, विख्यात लेखक सआदत मंटो हे फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झाले. याआधी ते मुंबईत राहत होते आणि चित्रपटांसाठी लिहित होते. त्यांच्या कथांवर अश्लीलतेचे आरोप झाले होते आणि त्यांच्यावर खटलेही दाखल झाले होते.आपल्या मृत्यूच्या चार महिने बावीस दिवस आधी, ऑगस्ट 1954 मध्ये मंटोंनी नेहरुंना एक पत्र लिहिलं होतं. ‘बगैर उनवान के’ (उनवान म्हणजे शीर्षक) या लघुकथा संग्रहात मंटोंनी नेहरूंना लिहिलेले पत्र प्रस्तावनेत सामील केले गेले. त्या पत्राचा हा स्वैर मराठी अनुवाद!
___________________

अस्सलाम अलैकुम, पंडितजी

तुम्हाला लिहिलेलं हे माझं पहिलं पत्र आहे. माशाअल्लाह, तुमचं नाव पाश्चात्य समाजातही रूपवान आणि विद्वान म्हणून घेतलं जातं. पण मीही काही फार मागे नाही असं मला वाटतं. जर नशिबाने मला अमेरिकेपर्यंत पोचवलं असतं, तर कदाचित सौंदर्याच्या मोजपट्टीवर मीही काही कमी ठरलो नसतो. पण तुम्ही आहात भारताचे प्रधानमंत्री, आणि मी पाकिस्तानचा कथाकार! या दोन भूमिकांमध्ये खूप अंतर आहे. तरीही एक धागा आहे जो आपल्याला जोडतो, तो म्हणजे कश्मीर! तुम्ही नेहरू आहात, मी मंटो. आणि कश्मीरी असण्याचा दुसरा अर्थच आहे सौंदर्य, जे मी अजून डोळ्यांनी पाहिलेलं नाही, पण जाणवतं मात्र खोलवर.

मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

जॉन मिल्टन - अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भोक्ता असलेला द्रष्टा कवी!


'वास्तवाला न भिडलेले, मानवतेच्या कसोटीत अपात्र ठरलेले सद्गुण मी स्तुतीस पात्र मानत नाही!' - स्वतःला जनतेचा तारणहार, सदगुणांचा पुतळा आणि देवतासमान समजणाऱ्या एका उद्दाम राजाला उद्देशून केलेले, हे बाणेदार उद्गार एका प्रतिभाशाली कवीचे होते! तो राजा होता, ग्रेट ब्रिटनचा राजा चार्ल्स पहिला आणि ते कवी होते, जॉन मिल्टन!

1608 साली लंडनला जन्मलेले, जागतिक कीर्तीचे कवी, लेखक जॉन मिल्टन यांनी 1644 साली ब्रिटिश राजसत्ता आणि संसद या दोहोंना उद्देशून, राजकीय सेन्सॉरशिपच्या विरोधात एक पुस्तिका लिहिली होती, एरीओपॅजिटिका हे तिचे नाव.

त्यांच्याच काही भाषणांचे आणि उताऱ्यांचे एकत्रित संपादन करुन त्यांनी स्वतः हे पुस्तक प्रकाशित केले होते, या पुस्तकाने ब्रिटिश राजसत्तेच्या तोंडचे पाणी पळालं होतं!

हे पुस्तक म्हणजे जॉन मिल्टन यांचं सर्वात प्रसिद्ध राजकीय-पत्रात्मक भाषण होय. ते केवळ विचारांचं पुस्तक नसून व्यक्तिगत आयुष्यात त्यांना सोसाव्या लागलेल्या घावांमधून जन्माला आलेली साहित्यकृती होती.

घोडे लावण्याची भाषा कीर्तनकारांना शोभते का?

 A person with orange turban

AI-generated content may be incorrect.


इंदुरीकर फेमस झाले ते त्यांच्या कीर्तनाच्या शैलीने!

त्यांच्या आधीच्या कीर्तनकारांनी त्यांच्यासारख्या शैलीत कीर्तन केले नव्हते. कॉमेडी कीर्तन हा वाह्यात शब्द त्यांच्यामुळे रूढ झाला. त्यांनी महिलांविषयी केलेल्या अनेक टिप्पण्या नि:संशय खालच्या दर्जाच्या आणि हीन मानसिकतेच्याच होत्या. व्यसनाविषयी आणि भरकटलेल्या तरुणांना ते झोडपून काढत हे योग्यच होते, वरवर त्यांचा आव आधुनिक कीर्तनाचा असला तरी काही बाबतीत ते मध्ययुगीन मानसिकतेचेच पुरस्कर्ते होते हे स्पष्ट जाणवत असे. असो. पोस्टचा मुद्दा तो नाहीये.

नुकताच त्यांनी त्रागा करत आपण इथून पुढे कीर्तन करणार नसल्याचे, जाहीर केलेय. त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे, आपण त्याविषयी हक्काने सांगू शकत नाही. मात्र कीर्तन बंद करण्यासाठी त्यांनी जी सबब पुढे केलीय ती अयोग्य आहे! ते म्हणतात की लोकांनी त्यांना घोडे लावलेत! (किती ओजस्वी भाषा आहे ही!)

पोरींनी लग्नात गॉगल घालून नाचू नये, गालांना मेकअप करू नये, डोळ्याखाली खाचात रंग भरू नये, लिपस्टिक लावू नये, वरात काढू नये आणि काढलीच तर त्यात नाचू नये अशा शंभर गोष्टी ते खिदळत, उड्या हाणत सांगत असत! लोकही बारुळ्यागत टाळ्या वाजवत!

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

एकमेव तत्वज्ञ सम्राट आणि मेडिटेशन!


अभिनेता रसेल क्रो याने साकारलेला 'ग्लॅडिएटर'मधला मॅक्सिमस, कमांडर ऑफ द आर्मीज ऑफ नॉर्थ, सहज विसरणे शक्य नाही. वास्तवात हे पात्र काल्पनिक होते तरीही जगभरातील सिनेरसिकांना याची भुरळ पडली याचे कारण, मॅक्सिमसची पार्श्वभूमी! प्रजेचा लाडका राजा मार्कस ऑरेलियसशी एकनिष्ठ असणारा सेनापती मॅक्सिमस आपलं सर्वस्व गमावूनही राजावर झालेल्या अन्यायासाठी प्राणांची बाजी लावतो. क्लायमॅक्सला, मार्कसचा क्रूर मुलगा सम्राट कमोडस याची तो हत्या करतो अशा मांडणीची ती काल्पनिक कहाणी होती. असो. पोस्टचा विषय तो नाहीये! पोस्ट मार्कस ऑरेलियस या अद्वितीय रोमन सम्राटाची आणि त्याने लिहिलेल्या दिव्य साहित्यकृती विषयी आहे! मेडीटेशनविषयी आहे!

आज जगभरात मेडीटेशनचा बोलबाला आहे. 'मेडिटेशन' कुणी लिहिलं याचा शोध घेतला की विस्मयकारक नाव आणि माहिती समोर येते! त्याचे मूळ रोमन साम्राज्यात पोहोचते!

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

शोधाचा एंडलेस डोह!

A person swimming in the water

AI-generated content may be incorrect.


बंगालमधली एक जुनी क्लिप पाहण्यात आली, त्यात साठीच्या आसपास वय असणाऱ्या वृद्धेविषयीची माहिती होती. तिचे घर पंधरा वर्षांपूर्वी नदीच्या पुरात वाहून गेलेलं. घरातल्या सगळ्या चीजवस्तुही वाहून गेल्या. पती निवर्तल्यापासून ती एकटीच राहायची, तिच्या हटवादी स्वभावामुळे दोन्ही मुले तिला सोडून गेली. 2010 मध्ये तिची एकुलती मुलगी बाळंतपणाला माहेरी आली होती. रात्रीतून दामोदर नदीचे पाणी वाढले आणि त्यात तिचे घर वाहून गेले, तिच्या मुलीचे शव काही दिवसा नंतर मिळाले.

त्या घटनेनंतर तिच्या मनावर खोल आघात झाला. सरकारने तिला नवे घर दिले, भांडीकुंडी घेण्यासाठी मदतही केली. अनेक विणवण्या केल्यानंतर तिने स्थलांतर केले. लोक तिला विसरून गेले. मात्र चार वर्षांनी फार मोठा पूर आला तेव्हा ती पुन्हा तिथे परतली. पूरग्रस्तांसोबत राहू लागली. सरकारी अधिकारी पुराची पाहणी करण्यास आले की ती हमखास समोर असे.

बुद्ध, मोक्ष आणि किसा गोतमी - एक अद्भुत सत्वकथा!


थेरीगाथावरील भाष्यग्रंथ असणाऱ्या अट्ठकथा या ग्रंथामध्ये किसा गोतमी नावाच्या बौद्ध भिक्खुणीची कथा आहे. किसा गोतमी हिचे तान्हे मूल आजारी पडून एकाएकी निवर्तते. आपल्यासोबत असे कसे झाले, हा प्रश्न तिला भंडावून सोडतो.

पुत्रशोकाने वेडीपिशी झालेली किसा गोतमी भगवान बुध्दांकडे याचक म्हणून येते आणि ती तथागतांना विनंती करते की, "माझ्या पुत्रावर माझे अतिव प्रेम आहे, त्याच्या शिवाय मी जगू शकणार नाही. तेव्हा हे भगवान मला मझ्या पुत्राचा जीव परत मिळवून द्या. तुमच्या शक्तींचा वापर करून हा चमत्कार करा, माझा पुत्र माझ्या पदरात टाका."

यावर भगवान बुध्दांनी तिला सांगितले की, "ठीक आहे, मी तुझे काम करेन, मात्र त्यासाठी तुला एक काम करावे लागेल. मृत्यूची गाठभेट न झालेल्या कुटुंबातून चिमुटभर मोहरी मागून आणशील तरच हा चमत्कार होऊ शकेल."

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

धर्मेंद्र - जट यमला पगला!


त्याचे श्वास अजून जारी आहेत, त्याच्या सिनेमाविषयी वा त्याच्या करिअरविषयी खूपजण खूप काही सांगतील; मला थोडेसे वेगळे सांगायचेय.. 

धरमची गोष्ट सुरु होते 1935 मध्ये. 8 डिसेंबरला पंजाबच्या साहनेवाल गावात जन्मलेला हा एक साधा जाट मुलगा. धर्म सिंह देओल त्याचं नाव. जग त्याला 'धर्मेंद्र' म्हणून ओळखते, त्याच्या आयुष्याची कहाणी, केवळ चित्रपटांच्या यशाची नाही, तर अंतर्मनातील एकाकीपणाची, प्रेमातील द्वंद्वाची आणि संघर्षातील जयपराजयाची आहे. त्याने बॉलीवूडला 'ही-मॅन' दिला, त्याच्या जीवनात असे अनेक क्षण येऊन गेलेत जेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले, हृदयात अपराधीपणाची जखम खोलवर रुजली आणि एकाकी एकांताने त्याला शांत केलं.