शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

मुल्क राज आनंद - भूमिका घेऊन जगलेला लेखक!


"आजही लिखाण माझ्यासाठी एक प्रकारची थेरपी आहे. दररोज लिहिल्याशिवाय मला राहवत नाही. खरं तर 1927 मध्ये मला पहिल्यांदा मानसिक ताणामुळे खचायला झालं तेव्हा व्हिएन्नामध्ये सिग्मंड फ्रॉइड यांची भेट घेतली. पुढे जाऊन आमच्या भेटींचा सिलसिला जारी राहिला.

त्यांच्यासोबतच्या प्रत्येक भेटीने मला मोठा दिलासा मिळाला. पण नंतरच्या काळात आलेल्या मानसिक ताणांच्या दोन धक्क्यांवर मात करण्याची ताकद मात्र फक्त लिखाणातूनच मिळाली. या प्रत्येक आघात समयी मी एक कादंबरी लिहिली, परिणामी कमकुवत झालेली मनोवस्था पुन्हा सावरली.

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

द राँग ट्रेन थिअरी - स्वतःच्या शोधाची गोष्ट!

‘द राँग ट्रेन थिअरी‘ नावाचे एक गृहीतक जपानमध्ये प्रसिद्ध आहे. कधीकधी चुकीचे लोक आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातात मात्र तो प्रवास सहनशीलतेचा अंत पाहतो! ‘द राँग ट्रेन थिअरी‘मध्ये एक सुंदर आणि तितकीच दुःखद गोष्ट आहे.
 
कधीकधी आपण चुकीचा मार्ग स्वीकारतो, चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा चुकीच्या जागी खूप वेळ थांबून राहतो. चुकीचे करिअर निवडतो, चुकीच्या गावी स्थलांतरित होतो, चुकीच्या नात्यात - भावनांत गुंतून पडतो, चुकीच्या कल्पनांना आपलं विश्व मानतो, चुकीच्या शब्दांना भुलतो - बळी पडतो, असं बरंच काही चुकीचं आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात स्वीकारलेलं असतं.

हे आपल्यासोबतच का घडतं? खरे तर आपण जेव्हा या निर्णयाचा स्वीकार केलेला असतो तेव्हा सुरुवातीला हे सगळं आपल्याला खूप भारी वाटत असतं. हे सर्व आपल्या मनासारखं घडतंय या आनंदात आपण मग्न होतो.

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

स्त्रियांचे जगातले पहिले मतदान आणि भारत -


  
संपूर्ण देशभरातील स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणारा जगातला पहिला देश न्यूझीलँड आहे. आजच्या तारखेस 132 वर्षांपूर्वी संपूर्ण न्यूझीलँडमधील महिलांनी मतदान केले होते. 19 सप्टेंबर 1893 रोजी हा कायदा तिथे संमत झाला आणि त्याच वर्षी 28 नोव्हेंबरला पार पडलेल्या निवडणुकीत किवी महिलांनी मतदान केले. खरेतर याही आधी अमेरिकेच्या वायोमिंग आणि यूटा या राज्यात स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला होता मात्र उर्वरित अमेरिकन राज्यात त्यांना मताधिकार नव्हता. म्हणूनच अशी समानता राबवणारा न्यूझीलँड हा पहिला देश ठरला. तिथे महिलांना मतदानाचा हक्क मिळण्यामागे दारूचा वाढता प्रभाव, पुरुषांमधली वाढती व्यसनाधिनता कारणीभूत होती हे सांगूनही खरे वाटणार नाही, मात्र वास्तव हेच होते.

मागील काही वर्षांत न्यूझीलँडमधल्या माओरी आदिवासी स्त्रियांचे आणि त्यांच्या परंपरिक 'हाका'चे रिल्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, याला कारण होते माओरी आदिवासींची व्यक्त होण्याची अनोखी 'हाका' शैली, माओरी जनतेचे त्यांच्या मातृभाषेवरचे असीम प्रेम! माओरी स्त्रीपुरुष दोघेही लढवय्ये आहेत हे एव्हाना जगातील सर्व देशांना कळून चुकलेय. सतराव्या शतकात हा देश ब्रिटिश अंमलाखाली होता. 1841 साली न्यूझीलँडला स्वयंशासित कारभाराची परवानगी मिळाली. मात्र पूर्ण स्वातंत्र्य आपल्याप्रमाणेच 1947 मध्ये मिळालं.

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

गोष्ट वीज कोसळण्याच्या योगायोगाची आणि झांबळमधल्या कथेची!


एका विलक्षण योगायोगाची वा कदाचित अज्ञात ऊर्जेची ही पोस्ट. 4 जून 1737 ची घटना. कॅलेब पिकमन हा बावीस वर्षांचा तरुण त्याच्या आईला भेटायला घरी आला होता. कॅलेब हा सागरी कप्तान होता. सागरी मोहिमा पूर्ण झाल्या की सहा महिन्यांनी तो घरी यायचा. घटनेच्या दिवशीही तो समुद्री सफर पूर्ण करून घरी आला होता. तो पावसाचा दिवस होता, किंचित भिजलेल्या कॅलेबने दरवाजाबाहेर अडकवलेली धातूपट्टी ओढून डोअरबेल वाजवली, त्याच्या आईने आतून हाक मारल्यावर आपण दाराबाहेर उभं असल्याचं त्यानं सांगितलं. त्याची वयस्क आई दारापाशी येऊन दरवाजा उघडेपर्यंत आकाशात विजेचा कडकडाट झाला. कॅलेबच्या आईने दार उघडून पाहिलं तर तिचा मुलगा दाराबाहेर मृतावस्थेत पडला होता. वीज कोसळून अवघ्या निमिषार्धात त्याचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील सालेम या समुद्रकिनारी असलेल्या शहरात ही घटना घडली.

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

मेडीटेशन आणि रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस!


माणूस इकडे तिकडे शांतता शोधत असतो मात्र खरी शांतता त्याच्या हृदयात असते. अर्थात या गोष्टीचा थांग तेव्हाच लागतो जेव्हा मन अशांत होते! शांततेचा शोध शांत भोवतालात अथवा सुख समृद्धीत आकंठ बुडालेल्या अवस्थेत असताना कुणीच घेत नाही! जगभरात बुद्धासारखे एखादे अपवाद असतील मात्र बाकी विश्व शांतता कधी शोधते याचे उत्तर एकसमान येते.

आज जगभरात मेडीटेशनचा बोलबाला आहे, आपल्याकडे तर मेडीटेशन्सवरच्या रिल्स, पोस्ट्स, पॉडकास्ट लाखोंच्या संख्येत रतीब घालताना दिसतात. आपल्यापैकी अनेक जण विविध प्रकारचे मेडिटेशन करताना दिसतात. मनःशांतीचा सोपा नी सहज सुलभ मार्ग म्हणून याकडे पाहिले जाते! मात्र मेडिटेशन कुणी लिहिलं याचा शोध घेतला की विस्मयकारक नाव आणि माहिती समोर येते!

आपल्यापैकी अनेकांनी 'ग्लॅडिएटर' हा सिनेमा पाहिला असेल. अभिनेता रसेल क्रो याने साकारलेला मॅक्सिमस, कमांडर ऑफ द आर्मीज ऑफ नॉर्थ, विसरणे शक्य नाही. वास्तवात हे पात्र काल्पनिक होते तरीही जगभरातील सिनेरसिकांना याची भुरळ पडली कारण, मॅक्सिमसची पार्श्वभूमी! आपला वृद्ध राजा मार्कस ऑरेलियस याच्याशी एकनिष्ठ असणारा सेनापती असणारा मॅक्सिमस आपलं सर्वस्व गमावूनही राजावर झालेल्या अन्यायासाठी प्राणांची बाजी लावतो. मार्कसचा क्रूर मुलगा सम्राट कमोडस याची तो हत्या करतो अशा मांडणीची ती काल्पनिक कहाणी होती.

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

कविता - जिचे मरण स्वस्त झाले!


ही ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे कारण अतिशय वेदनादायी आहे. अगदी खात्रीशीर माहिती स्त्रोताच्या आधारे सांगावे लागतेय की, महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने एड्स, एचआयव्ही बाधित रुग्णांना मदत, उपचार देणाऱ्या अनेक केंद्रांचा, स्वयंसेवी संस्थांचा निधी मागील तीन महिन्यापासून थांबवला आहे. सरकार कुठे कुठे कसे कसे पैसे खर्च करतेय हे आपण सारेच पाहत आहोत!

या जीवघेण्या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण घटले असले तरी संपलेले नाही, निर्मूलन झालेले नाही हे सत्य आहे! अजूनही शेकडो रुग्ण प्रत्येक केंद्रात उपचार घेतात. या बायका लाडक्या नाहीत का? यांना उपचार मिळावेत असे वाटत नाही का?

दोन हजारात त्यांची महिन्याची औषधे येत नाहीत हे या क्षेत्रात काम करणारा कोणताही माणूस सांगेल! कवितासारख्या कित्येक बायकांना नवजीवनाची संजीवनी देण्यापासून आपण मागे हटू शकत नाही! हे पाप आहे, हा कोतेपणा आहे, हे मानवतेला धरून नाही!

सरकारने रोखून धरलेली मदत पुन्हा पूर्ववत करावी आणि गांजलेल्या, नाडलेल्या अभागी महिलांचा दुवा घ्यावा! कल्याणकारी राज्यात ही गोष्ट होणं अनिवार्य आहे. ही फार मोठ्या रकमेची बाब नाही. अवघ्या काही कोटींची ही समस्या आहे, सरकार यावर विचार करेल काय? असो.

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

पंडित नेहरूंना मंटोंचे पत्र.


जागतिक किर्तीचे, विख्यात लेखक सआदत मंटो हे फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झाले. याआधी ते मुंबईत राहत होते आणि चित्रपटांसाठी लिहित होते. त्यांच्या कथांवर अश्लीलतेचे आरोप झाले होते आणि त्यांच्यावर खटलेही दाखल झाले होते.आपल्या मृत्यूच्या चार महिने बावीस दिवस आधी, ऑगस्ट 1954 मध्ये मंटोंनी नेहरुंना एक पत्र लिहिलं होतं. ‘बगैर उनवान के’ (उनवान म्हणजे शीर्षक) या लघुकथा संग्रहात मंटोंनी नेहरूंना लिहिलेले पत्र प्रस्तावनेत सामील केले गेले. त्या पत्राचा हा स्वैर मराठी अनुवाद!
___________________

अस्सलाम अलैकुम, पंडितजी

तुम्हाला लिहिलेलं हे माझं पहिलं पत्र आहे. माशाअल्लाह, तुमचं नाव पाश्चात्य समाजातही रूपवान आणि विद्वान म्हणून घेतलं जातं. पण मीही काही फार मागे नाही असं मला वाटतं. जर नशिबाने मला अमेरिकेपर्यंत पोचवलं असतं, तर कदाचित सौंदर्याच्या मोजपट्टीवर मीही काही कमी ठरलो नसतो. पण तुम्ही आहात भारताचे प्रधानमंत्री, आणि मी पाकिस्तानचा कथाकार! या दोन भूमिकांमध्ये खूप अंतर आहे. तरीही एक धागा आहे जो आपल्याला जोडतो, तो म्हणजे कश्मीर! तुम्ही नेहरू आहात, मी मंटो. आणि कश्मीरी असण्याचा दुसरा अर्थच आहे सौंदर्य, जे मी अजून डोळ्यांनी पाहिलेलं नाही, पण जाणवतं मात्र खोलवर.

मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

जॉन मिल्टन - अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भोक्ता असलेला द्रष्टा कवी!


'वास्तवाला न भिडलेले, मानवतेच्या कसोटीत अपात्र ठरलेले सद्गुण मी स्तुतीस पात्र मानत नाही!' - स्वतःला जनतेचा तारणहार, सदगुणांचा पुतळा आणि देवतासमान समजणाऱ्या एका उद्दाम राजाला उद्देशून केलेले, हे बाणेदार उद्गार एका प्रतिभाशाली कवीचे होते! तो राजा होता, ग्रेट ब्रिटनचा राजा चार्ल्स पहिला आणि ते कवी होते, जॉन मिल्टन!

1608 साली लंडनला जन्मलेले, जागतिक कीर्तीचे कवी, लेखक जॉन मिल्टन यांनी 1644 साली ब्रिटिश राजसत्ता आणि संसद या दोहोंना उद्देशून, राजकीय सेन्सॉरशिपच्या विरोधात एक पुस्तिका लिहिली होती, एरीओपॅजिटिका हे तिचे नाव.

त्यांच्याच काही भाषणांचे आणि उताऱ्यांचे एकत्रित संपादन करुन त्यांनी स्वतः हे पुस्तक प्रकाशित केले होते, या पुस्तकाने ब्रिटिश राजसत्तेच्या तोंडचे पाणी पळालं होतं!

हे पुस्तक म्हणजे जॉन मिल्टन यांचं सर्वात प्रसिद्ध राजकीय-पत्रात्मक भाषण होय. ते केवळ विचारांचं पुस्तक नसून व्यक्तिगत आयुष्यात त्यांना सोसाव्या लागलेल्या घावांमधून जन्माला आलेली साहित्यकृती होती.

कीर्तनकारांच्या मुखी घोडे लावण्याची भाषा शोभते का? – इंदुरीकरांच्या दुटप्पीपणाची नोंद!

 A person with orange turban

AI-generated content may be incorrect.


इंदुरीकर फेमस झाले ते त्यांच्या कीर्तनाच्या शैलीने!

त्यांच्या आधीच्या कीर्तनकारांनी त्यांच्यासारख्या शैलीत कीर्तन केले नव्हते. कॉमेडी कीर्तन हा वाह्यात शब्द त्यांच्यामुळे रूढ झाला. त्यांनी महिलांविषयी केलेल्या अनेक टिप्पण्या नि:संशय खालच्या दर्जाच्या आणि हीन मानसिकतेच्याच होत्या. व्यसनाविषयी आणि भरकटलेल्या तरुणांना ते झोडपून काढत हे योग्यच होते, वरवर त्यांचा आव आधुनिक कीर्तनाचा असला तरी काही बाबतीत ते मध्ययुगीन मानसिकतेचेच पुरस्कर्ते होते हे स्पष्ट जाणवत असे. असो. पोस्टचा मुद्दा तो नाहीये.

नुकताच त्यांनी त्रागा करत आपण इथून पुढे कीर्तन करणार नसल्याचे, जाहीर केलेय. त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे, आपण त्याविषयी हक्काने सांगू शकत नाही. मात्र कीर्तन बंद करण्यासाठी त्यांनी जी सबब पुढे केलीय ती अयोग्य आहे! ते म्हणतात की लोकांनी त्यांना घोडे लावलेत! (किती ओजस्वी भाषा आहे ही!)

पोरींनी लग्नात गॉगल घालून नाचू नये, गालांना मेकअप करू नये, डोळ्याखाली खाचात रंग भरू नये, लिपस्टिक लावू नये, वरात काढू नये आणि काढलीच तर त्यात नाचू नये अशा शंभर गोष्टी ते खिदळत, उड्या हाणत सांगत असत! लोकही बारुळ्यागत टाळ्या वाजवत!

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

एकमेव तत्वज्ञ सम्राट आणि मेडिटेशन!


अभिनेता रसेल क्रो याने साकारलेला 'ग्लॅडिएटर'मधला मॅक्सिमस, कमांडर ऑफ द आर्मीज ऑफ नॉर्थ, सहज विसरणे शक्य नाही. वास्तवात हे पात्र काल्पनिक होते तरीही जगभरातील सिनेरसिकांना याची भुरळ पडली याचे कारण, मॅक्सिमसची पार्श्वभूमी! प्रजेचा लाडका राजा मार्कस ऑरेलियसशी एकनिष्ठ असणारा सेनापती मॅक्सिमस आपलं सर्वस्व गमावूनही राजावर झालेल्या अन्यायासाठी प्राणांची बाजी लावतो. क्लायमॅक्सला, मार्कसचा क्रूर मुलगा सम्राट कमोडस याची तो हत्या करतो अशा मांडणीची ती काल्पनिक कहाणी होती. असो. पोस्टचा विषय तो नाहीये! पोस्ट मार्कस ऑरेलियस या अद्वितीय रोमन सम्राटाची आणि त्याने लिहिलेल्या दिव्य साहित्यकृती विषयी आहे! मेडीटेशनविषयी आहे!

आज जगभरात मेडीटेशनचा बोलबाला आहे. 'मेडिटेशन' कुणी लिहिलं याचा शोध घेतला की विस्मयकारक नाव आणि माहिती समोर येते! त्याचे मूळ रोमन साम्राज्यात पोहोचते!

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

नदीत लुप्त झालेल्या जिवांच्या शोधातला मनाचा डोह!

A person swimming in the water

AI-generated content may be incorrect.


बंगालमधली एक जुनी क्लिप पाहण्यात आली, त्यात साठीच्या आसपास वय असणाऱ्या वृद्धेविषयीची माहिती होती. तिचे घर पंधरा वर्षांपूर्वी नदीच्या पुरात वाहून गेलेलं. घरातल्या सगळ्या चीजवस्तुही वाहून गेल्या. पती निवर्तल्यापासून ती एकटीच राहायची, तिच्या हटवादी स्वभावामुळे दोन्ही मुले तिला सोडून गेली. 2010 मध्ये तिची एकुलती मुलगी बाळंतपणाला माहेरी आली होती. रात्रीतून दामोदर नदीचे पाणी वाढले आणि त्यात तिचे घर वाहून गेले, तिच्या मुलीचे शव काही दिवसा नंतर मिळाले.

त्या घटनेनंतर तिच्या मनावर खोल आघात झाला. सरकारने तिला नवे घर दिले, भांडीकुंडी घेण्यासाठी मदतही केली. अनेक विणवण्या केल्यानंतर तिने स्थलांतर केले. लोक तिला विसरून गेले. मात्र चार वर्षांनी फार मोठा पूर आला तेव्हा ती पुन्हा तिथे परतली. पूरग्रस्तांसोबत राहू लागली. सरकारी अधिकारी पुराची पाहणी करण्यास आले की ती हमखास समोर असे.

बुद्ध, मोक्ष आणि किसा गोतमी - एक अद्भुत सत्वकथा!


थेरीगाथावरील भाष्यग्रंथ असणाऱ्या अट्ठकथा या ग्रंथामध्ये किसा गोतमी नावाच्या बौद्ध भिक्खुणीची कथा आहे. किसा गोतमी हिचे तान्हे मूल आजारी पडून एकाएकी निवर्तते. आपल्यासोबत असे कसे झाले, हा प्रश्न तिला भंडावून सोडतो.

पुत्रशोकाने वेडीपिशी झालेली किसा गोतमी भगवान बुध्दांकडे याचक म्हणून येते आणि ती तथागतांना विनंती करते की, "माझ्या पुत्रावर माझे अतिव प्रेम आहे, त्याच्या शिवाय मी जगू शकणार नाही. तेव्हा हे भगवान मला मझ्या पुत्राचा जीव परत मिळवून द्या. तुमच्या शक्तींचा वापर करून हा चमत्कार करा, माझा पुत्र माझ्या पदरात टाका."

यावर भगवान बुध्दांनी तिला सांगितले की, "ठीक आहे, मी तुझे काम करेन, मात्र त्यासाठी तुला एक काम करावे लागेल. मृत्यूची गाठभेट न झालेल्या कुटुंबातून चिमुटभर मोहरी मागून आणशील तरच हा चमत्कार होऊ शकेल."

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

धर्मेंद्र - जट यमला पगला!


त्याचे श्वास अजून जारी आहेत, त्याच्या सिनेमाविषयी वा त्याच्या करिअरविषयी खूपजण खूप काही सांगतील; मला थोडेसे वेगळे सांगायचेय.. 

धरमची गोष्ट सुरु होते 1935 मध्ये. 8 डिसेंबरला पंजाबच्या साहनेवाल गावात जन्मलेला हा एक साधा जाट मुलगा. धर्म सिंह देओल त्याचं नाव. जग त्याला 'धर्मेंद्र' म्हणून ओळखते, त्याच्या आयुष्याची कहाणी, केवळ चित्रपटांच्या यशाची नाही, तर अंतर्मनातील एकाकीपणाची, प्रेमातील द्वंद्वाची आणि संघर्षातील जयपराजयाची आहे. त्याने बॉलीवूडला 'ही-मॅन' दिला, त्याच्या जीवनात असे अनेक क्षण येऊन गेलेत जेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले, हृदयात अपराधीपणाची जखम खोलवर रुजली आणि एकाकी एकांताने त्याला शांत केलं.

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

जोहरान म्हणजे आकाशातला पहिला तारा!


जोहरान ममदानी यांचा जन्म पूर्व आफ्रिकन देश युगांडाची राजधानी कंपाला इथला. त्यांना जाणून घेण्यासाठी त्यांचे वडील मोहमद ममदानी यांची माहिती घेणे अनिवार्य आहे, कारण त्याशिवाय जोहरान यांची जडणघडण आकळू शकत नाही. मोहमद ममदानी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतात मुंबईत जन्मलेले. ते दोन वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबासोबत टांझानियाला गेले आणि तिथून पुढे नजीकच्या युगांडात गेले. त्यांचे कुटुंब तिथेच स्थायिक झाले. आफ्रिकेमधल्या टॉपच्या युनिव्हर्सिटीत त्यांनी अध्यापकाचे काम केले, खेरीज ते एक उत्तम आर्थिक राजकीय तज्ज्ञ होते. इदी अमीन सत्तेत येईपर्यंत तिथल्या सर्व स्थलांतरित लोकांचे समुदाय सुखात होते, मात्र तो सत्तेत येताच त्यांना देश सोडून जावे लागले!

ड्रॅक्युला - सैतानी दुनियेच्या अनभिषिक्त सम्राटाची जन्मकथा!


हॉरर, थ्रिलर सिनेमे पाहाणाऱ्या दर्दी रसिकास 'ड्रॅक्युला' माहिती नसावा असे होत नाही! ब्रॅम स्टोकरने ज्या काळात ड्रॅक्युला ही कादंबरी लिहिली तो व्हिक्टोरियन एरा होता. या कालखंडात प्रामुख्याने चार वर्ग होते - उच्च, मध्यम, श्रमिक आणि तळाशी असणारा निम्नवर्ग. या चारही वर्गांची विभागणी केवळ सामाजिक स्तरावर नसून आर्थिक स्तरदेखील त्यात अंतर्भूत होता. या वर्गवारीचे युरोपमध्ये बऱ्यापैकी सक्त आणि कठोर विधीसंकेत होते. व्यक्तीचा आर्थिक स्तर, त्याचा हुद्दा, शिक्षण यावरून त्याचा वर्ग ठरे. यामुळे सामाजिक देवाणघेवाण अगदी कमी होई, असे असले तरी पुरुष हवे तिथे तोंड मारत आणि स्त्रियांची कुचंबणा ठरलेली असे, मग ती कोणत्याही वर्गातली असली तरीही! एखाद्या उमरावाच्या पत्नीचे जीवन भलेही ऐश आरामात, आनंदात जात असले तरी व्यक्तीस्वातंत्र्याच्या बाबतीत तिचा आणि तळाच्या स्त्रीचा स्तर जवळपास समान असे. बाहेरख्याली पुरुषांना आपल्या अवतीभवती पाहून, त्या स्त्रियांच्या मनात कोणते विचार येत असतील यावर विपुल लेखन झालेय, मात्र त्यांच्या लैंगिक शोषणाविषयी बोलताना त्यांच्या लैंगिक गरजांविषयी तुलनेने कमी लिहिले गेलेय. ब्रॅम स्टोकरने हा मुद्दा बरोबर पकडला आणि त्याच्या मनात घोळत असलेल्या गोष्टी त्यात बेमालूम मिसळल्या.

गोष्ट सुटकेसमध्ये ठेवलेल्या मृतदेहाची!


बेनाव्हिडेस हा मध्यमवयीन पुरुष. भरकटलेला आणि जगण्याच्या विविध समस्यांनी हैराण झालेला माणूस. एके दिवशी त्याच्या संयमाचा विस्फोट होतो, तो अत्यंत विचलित होतो. संतापाच्या भरात, तिशीच्या वयातल्या पत्नीची हत्या करतो. तिची हत्या केल्यानंतर काही वेळाने तो भानावर येतो. रागाच्या भरात आपण हे काय करून बसलो याचे त्याला शल्य वाटू लागते. तो गोंधळून जातो, आता काय करावे, हे काही केल्या त्याला सुचत नाही.  पत्नीचा मृतदेह तो एका मोठ्या सुटकेसमध्ये भरतो. खरेतर आपण ही सुटकेस घेऊन पोलिसांकडे गेले पाहिजे असं त्याचं एक मन सांगत असतं तर त्याचं दुसरं मन त्याला सांगतं की कदाचित डॉक्टर आपल्या पत्नीचे काय करायचे ते सांगू शकतील! द्विधा मनस्थितीत तो घराबाहेर पडतो.

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

औरते – रमाशंकर यादव विद्रोही..

A close-up of a person crying

AI-generated content may be incorrect.


काही स्त्रियांनी
स्वेच्छेने विहिरीत उडी मारून जीव दिलाय
असं पोलिसांच्या नोंदींमध्ये लिहिलंय.

आणि काही स्त्रिया
चितेवर जळून मरण पावल्या —
असं धर्मग्रंथांमध्ये लिहिलंय.

मी कवी आहे,
कर्ता आहे,
घाई कशाची?

एके दिवशी मी पोलीस आणि पुरोहित
दोघांनाही एकाचवेळी
स्त्रियांच्या न्यायालयात उभं करेन,

जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याविषयीची एक नोंद..


जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं बालपण आयर्लंडमध्ये पांढरपेशी गरिबीत गेलं. त्यांचे वडील पेशाने कारकून होते, मद्याचा अंमल चढला की त्यांना आवरणे कठीण जाई. खेरीज ते काहीसे उदासीन स्वभावाचे होते. घरात रोज भांडणं होत, भांड्यांची आदळआपट चाले. नीरव शांततेच्या जागी किंकाळ्यांचा आवाज भरलेला असे.
या वातावरणातही शॉची आई, ल्युसिंडा गार्नी शॉ हिने आपला छंद लुप्त होऊ दिला नव्हता. ती अत्यंत प्रतिभावान गायिका होती. तिचा आवाज लोकांना भावविभोर करायचा. पण तिचं आयुष्य एका अपयशी लग्नाच्या सावटाखाली हळूहळू कोमेजत चाललं होतं आणि याचं तिला शल्य होतं.

दरम्यानच्या काळात त्यांच्या घरात एक संगीत शिक्षक येत असत; जॉर्ज वँडेल ली हे त्याचे नाव. हळूहळू शॉची आई त्याच्याकडे आकर्षित झाली. दोघांमध्ये आत्मिक जवळीक वाढली. जॉर्जच्या घरी शिसवी पियानो होता. आईची बोटे पियानोच्या कळांवरुन फिरू लागली की त्याचे मन भरुन येई. त्याला विलक्षण आनंद होई.

रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

हे चाहूर आहे तरी काय?


साठच्या दशकात आईने नर्सची नोकरी प्रामाणिकपणे आणि विलक्षण संवेदनशील पद्धतीने केली. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील दहागाव या छोट्याशा खेड्यात आरोग्य केंद्रात ती रुजू झाली होती. हा भाग अजूनही निबिड अरण्यासारखा आणि अडगळीचा आहे, साठ वर्षापूर्वी तर हा भाग एखाद्या आदिम मानवी वसाहतीसारखा होता! आई अहमदनगरची, तिने कधी समुद्र पाहिलेला नव्हता, थेट कोकणात तिने काही वर्षे काढली. स्वतःला जुळवून घेण्यासाठी तिला झगडावे लागले!

अतिशय खडतर परिस्थितीतून तिने स्वतःला उभं केलं आणि कमालीच्या सहनशील, संयमी, जिद्दी वृत्तीने पुढचे आयुष्यही कष्टात काढले. विपरीत परिस्थितीतही तिने चारही अपत्ये घडवली! आम्हा चारही भावंडांना शिक्षणाची गोडी लावण्यात आणि लेखन वाचनाची ओढ निर्माण करण्यास सर्वस्वी तिच कारणीभूत होती. ती होती, म्हणून आम्ही सर्व घडलो. माझी भावंडे जितक्या चांगल्या पद्धतीने आईवडिलांच्या कसोटीस उतरली त्या मानाने मी खूपच कमी पडलो आणि नंतरही निखारु शकलो नाही, हे वास्तव मी लिहिले पाहिजे.

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

ब्लड रिव्हर - टिम बुचर यांची अद्भुत कादंबरी!


नुकतेच आपल्या देशाच्या राजधानीत यमुना नदीच्या अस्वच्छतेवरून मोठा तमाशा झाला, छट पूजेसाठी खोट्या स्वच्छ पाण्याची नौटंकीही करुन झाली. बेसिकली आपल्याकडे, नद्यांना आपण नावाला पवित्र मानतो, त्यापलीकडे आपली त्यांच्याप्रती आस्था नाही हे आपण खुल्या मनाने मान्य केले पाहिजे. अमुक एक नदी पुराणात आहे, तमुक एक नदी इतिहासात आहे, अलाण्या नदीचे पाणी पवित्र आणि फलाण्या नदीचे पाणी मोक्ष देते इत्यादी कल्पनात आपण, आपल्याच स्वार्थासाठी गुंतून पडलो आहोत. जसे की आपले दुष्कर्म कमी व्हावे, आपली पापे कमी व्हावीत, आपल्याला आशीर्वाद लाभावेत, आपलं कल्याण व्हावं, वगैरे वगैरे! म्हणजे आपण नदीला काही देणार नाही, नदीसाठी आपण काही करणार नाही आणि त्या बदल्यात तिच्याकडून आपल्याच कथित भल्याच्या कपोलकल्पित गोष्टी मागणार, पुण्य वाढवून मिळावे म्हणून डुबकी मारणार! आणि नदीला आपण काय देणार, तर ड्रेनेजचे पाणी, गटार नाल्यांचे पाणी, रासायनिक कारखान्यांचे दूषित पाणी आणि आपणच टाकलेला गावभराचा कचरा! नदी गढूळ विषारी घाण होऊन जाते, तरीही आपण तिच्यासाठी झिजत नाही की तिच्यासाठी आपला जीव तीळतीळ तुटत नाही! नद्या आपल्या जीवनदायिन्या आहेत वगैरे ज्ञानकण फुंकायला मोकळे होतो. सरकारेही आपल्यासारखीच कागदावर अब्जावधी रुपयांच्या योजना आणतात, काही कोटी खर्च होतात, नदी कणभरच बदलते पण मणभर पैसा इकडे तिकडे फिरतो! घाण गलिच्छ अवतारात नदी वाहत राहते! नदीविषयी आपल्यात अनास्था आहे हे कटूसत्य आहे.