बुधवार, १५ मार्च, २०१७

आम्ही सोलापूरी ....



सोलापूरातल्या अनेक बोळ वजा गल्ल्या आणि आडव्या उभ्या चाळीमध्ये काही अभूतपूर्व वाणाची माणसे राहतात, ही म्हटली तर देवमाणसे आहेत नाहीतर सीधी-साधी महापुरुष वजा सोलापूरी माणसे ! विश्वनिहंत्याने ही माणसे घडवताना एक वेगळीच आगळ्या धाटणीची मूस वापरलेली असणार आहे, त्यामुळे यांची जडणघडण जगावेगळी अगम्य आहे. या माणसांत सोलापूरच्या लाल चटणीचे, मऊ इडलीचे, आंबुस ताडीचे, कडू बाजरीचे, गोड हुरडयाचे, उजनीच्या खारटतुरट पाण्याचे, खरमुडया वाणाचे, गोडतिखट सांबाराचे, हलवाई गल्लीतल्या घमघमाटाचे, आबे काबे म्हणणारया एकेरीपणाचे अन डोळे वटारून उग्रट वाटणारया पण हळव्या मनाच्या माणसाचे सगळे गुण अगदी ठासून भरलेले आहेत.

बुधवार, ८ मार्च, २०१७

अजरामर ग़ालिब .....



ग़ालिबच्या पत्नीने अनेक अपत्यांना जन्म दिला. मात्र त्याचं एकही अपत्य जगत नव्हतं. तेव्हा माणसाच्या काही सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत हे उमजून असलेला ग़ालिब लिहितो…'हजारों ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले…' या पातळीचं सत्य लिहिल्यानंतरही गालिब स्वतःच्या आयुष्यातून पुत्राच्या इच्छेला बाहेर काढत नाही आणि तो सतत मूल जगण्याची वाट पाहत राहतो. पाचवीला पूजलेली आर्थिक चणचण, एकही अपत्य न जगणं, प्रेयसीचं निधन अशा नैराश्याच्या फेरयात अडकलेला गालिब लिहितो …
'कैदे हयात, बन्देगम, अस्ल में दोनों एक हैं
मौत से पहले आदमी गम से नजात पाए क्यों?…'
असं जेंव्हा तो मन व्यक्तवतो तेव्हा मनातल्या भावना मांडणारे अचूक शब्द आणि त्या शब्दांत भरून राहिलेला अर्थ जाणवून ऐकणारा स्तिमित होतो.

बुधवार, १ मार्च, २०१७

रेड लाईट डायरीज - 'पवित्र' गंगा-जमुना ...



पवित्र काय आणि अपवित्र काय याच्या व्याख्या व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतात, पण रेड लाईट एरियात त्या जितक्या तीक्ष्ण आणि कटू असतात तितक्या अन्यत्र असू शकत नाहीत....

जमुनाबाईचे ओठ सदा न कदा पान खाऊन लाल झालेले असत.
वरवर साधी वाटणारी पण एकदम फाटक्या तोंडाची, पक्की जहांबाज !
तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला की भल्याभल्यांना घाम फुटे.
आवाज एकदम मधाळ, ओठातून साखरपाक ओघळावा इतका.
तारसप्तकात चढला तरी त्यातही एक गोडवा वाटे.
हापूस आंब्यासारखी रसरसलेली काया अन मुखडयावर कत्लवाली नजाकत.
एका नजरंत पुरुषाचं पाणी जोखणारी, डोक्यात त्याची कुंडली बनवणारी.
कुणाला कुठवर घोळवायचं, कुणाला खेळवायचं अन कुणापुढं नांगी टाकायची हे तिला चांगले ठाऊक.
कुठल्याही विषयावर बोलताना बागेतून फिरवून आणून अखेरीस आपल्याला हवं तसं धोपटून काढण्यात तिचा हातखंडा.
बोलताना विषय पुरत नसत. तिचे पदराचे चाळे सुरु असत. अंगठा जमिनीवर मुडपून पाय हलवत खुर्चीत रेलून बसे आणि केसांचं विस्कटणं सुरु होई.
आपण काहीही बोललो नसलो तरी ती म्हणे, “हां तो क्या कह रहा था तू ?”
तिनं टाकलेला तो फास असे, सावज त्यात अलगद अडके. मग ती त्याला आपल्या साच्यात घुसळून काढे.
जमुनाचं रसायनच वेगळं होतं, ती या लाईनमध्ये फिटही होती आणि अनफिटही होती.
एका उन्हाळ्यातल्या संध्याकाळी चाईल्डसेक्सवर्कर्सची नवी रसद आल्याचे कळल्यामुळे खबरबात मिळवण्यासाठी तिच्याकडे गेल्यावर तिने आधी हजेरी घेतली.
कदाचित त्या दिवशी माझ्या आधी कुणी तरी तिचा भेजाफ्राय करून गेलं असावं.
नया बच्ची लोग का मालुमात हैं क्या असं म्हणायचा अवकाश तिने विचारलं, “तुला कशाला हवी रे ही जानकारी ?”
तिथेच मी चुकलो, चुकून बोलून गेलो – “ये ऐसाच ग्यान बटोरने के लिये !”
झालं. उत्तर ऐकताच तिच्या डोळ्यात चमक दाटून आली.
“कसलं ग्यान ?” – हातभर पुढे सरकत जमुना बोलली.
माझी तंतरली होती, ऐन वेळेस काय बोलावं ते सुचलं नाही. गडबडीत बोलून गेलो - “तेच ज्ञान, आपलं कर्म आणि कर्माच फळ, त्या शिवाय का कुणी इथं येतं ?”
"बापू तू रंडीखान्यात गीतेचं ग्यान शोधतोस का ! पागल आदमी...
अरे, इथे चमडीचा धंदा होतो, जिस्मफरोशी ! दहा मिनिटात काम तमाम...
वाटल्यास अर्धा एक तास ज्यादा. जास्तीचा कंड असेल तर बारा घंटे नाहीतर फुल नाईट. ..

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

मराठीचं जगणं म्हणजे काय ?


मॉलमध्ये गेल्यावर 'ये कितने का है ?' किंवा 'हाऊ मच इट कॉस्ट्स ?' असं विचारणाऱ्या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा ...आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरणऱ्या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा. खरेदीस गेल्यावर मराठी दुकानदारासमोर इंग्रजीत बोलून पुन्हा आपसात मराठीत बोलणाऱ्या मराठी दांपत्यास तर अनेकोत्तम शुभेच्छा. दूरध्वनीवरचे संभाषण अकारण हिंदी इंग्रजीतून झाडणाऱ्या, आपला रुबाब वाढवण्यासाठी मराठी भाषेऐवजी इतर भाषांचा अंगीकार करणाऱ्या लोकांना त्रिवार शुभेच्छा.. फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणाऱ्या किंवा टीसी, जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणाऱ्या लोकांनाही ओढून ताणून शुभेच्छा... तसेच शब्दांचे मूळ रूप विद्रूप करून तै, बै, वेग्रे, लोक्स, कळतै, पैले असं पिळून काढलेलं स्वरूप देणाऱ्या प्रतिभावंतांनाही शुभेच्छा.. सोशल मीडियावर लेखन करताना दर वाक्यात इंग्रजी शब्द घुसडून लेखनाचे पुण्यकर्म करणाऱ्या महालेखकांनाही सकळ शुभेच्छा.

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७

सय ....



गेल्या दोन तीन रात्रीस रोजच पाऊस पडतोय. याचं वर्णन नेमकं कसं करावं बरं ? शिक्षा म्हणून आईने घराबाहेर उभे केलेल्या पोराने दारापाशी थांबून एकसुरात रडत राहावं आणि एकाच वेळी त्याच्यावरच्या प्रेमाने, संतापाने व्याकुळ झालेल्या आईने अधून मधून हळूच खिडकीतून डोकावून त्याच्याकडे पाहत राहावं तसं ह्या पावसाचं झालंय. कधीकाळी काळजावर ओरखडे ओढून हरवून गेलेली एक रात्र डोळ्यापुढून अलगद तरंगत जावी तसं ह्या पावसाचं झालंय. प्रेमात पडल्यानंतर पहिल्यांदा भांडण झाल्यावर सख्याच्या विरहात होरपळून निघणाऱ्या प्रियेने रात्रभर एका कुशीवर झोपून हलकेच आसवं गाळीत पडून राहावं तसं ह्या पावसाचं झालंय. घरापासून दूर शेकडो किलोमीटर अंतरावर एकट्याने होस्टेलवर राहतानाच्या पहिल्या रात्री आईवडिलांच्या आठवणींनी या कुशीवरून त्या कुशीवर होताना सतत स्मृतींची सय मनात दाटून येत राहावी अन अश्रुंचे पाझर लागून राहावेत तसं ह्या पावसाचं झालंय.

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

सांगावा ...



काळ्या मातीतली मऊ ढेकळे बोटांशी खेळवत रानातले तण खुरपणे म्हणजे एखाद्या चिमुरडीने तिच्या आईचे केस विंचरण्यासारखेच. आपल्या सोबतीच्या कारभारणीसोबत काम करणारया या काळ्या आईच्या लेकी वेगळ्याच धाटणीच्या असतात.एकोप्याने काम करतील. एकत्र जेऊन एकाच जागी विसावा घेऊन एकमेकीच्या सुखदुखात आत्मभान विसरून एकरूप झालेल्या असतात. आपआपल्या घरातल्या या लेकुरवाळ्या इथल्या काळ्या आईची सेवा करताना आपली पोटची लेकरे देखील कधी कधी झोळीत बांधून काम करतात तेंव्हा पांडुरंग देखील हातात खुरपे धरून ढेकळाच्या बंधनात अडकलेल्या गवताच्या पात्यांना हळुवार मोकळे करत असावा.

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

पावसाचे हितगुज .......



होय नाही म्हणत म्हणत अखेर ढगांमधले भांडण संपले. बरयाच काळापासून असलेला अबोला मिटला, अन त्यांचे काल मनोमिलन झाले. त्यांच्या मिलनासाठी आसुसलेल्या वीजांनी नेत्रदीपक रोषणाई केली. बघता बघता त्यांच्या मिलनाला धुमारे फुटले, पावसाचा जन्म झाला. पावसाचे थेंब अगदी नाचत नाचत ढगामधुन बाहेर पडले. नाचरया थेंबाना वारयाने आपल्या झोक्यावर मनमोकळे झुलवले. हवेतल्या धुलीकणांनी त्या थेंबाना मायेने ‘गंध-पावडर’ लावली. धरतीवर कासावीस झालेल्या सगळ्या भूमिपुत्रांनी आपल्या डोळ्यातल्या पाण्यात हे थेंब अलगद झेलले. त्यांच्या डोळ्यातले पाणी अधिकच खारे झाले. काल आमच्याकडे पाऊस येऊन गेला......

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

वेदाआधी तू होतास - बाबुराव बागूल


"वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास,
पंच महाभूतांचे पाहून, विराट, विक्राळ रूप
तू व्यथित, व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे ‘ऋचा’
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव, तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही, तूच आनंदाने साजरे केलेस
हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस
आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस, आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण
तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले, हे प्रतिभावान माणसा,
तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच संजीव सुंदर
झाली ही मही."

माणसाच्या अस्तित्वाचा शोध घेणारी, त्याच्या महानतेची गाथा सांगणारी ही कविता आहे बाबुराव बागूलांची. जातिव्यवस्थेला प्रखर नकार देऊन विद्रोहाचा नारा बुलंद करणारे आणि क्रांतिकारी लेखणीतून मानवी मनाचा वेध घेणारे मराठी साहित्यातील तपस्वी साहित्यिक म्हणजे बाबुराव बागूल.
बाबुराव रामजी बागूल हे कवी, कथा-कादंबरीकार, बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, दलित साहित्याचे प्रवक्ते, परिवर्तनवादी चळवळीचे खंदे कार्यकर्ते आणि एक पारदर्शी व्यक्तिमत्व म्हणून जनमानसात परिचित आहेत. गेल्या अर्धशतकभराच्या काळात वाड:मयीन क्षेत्राबरोबरच पुरोगामी चळवळीत ते कृतिप्रवण होते. तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार साध्या सोप्या प्रवाही काव्यरचनेतून मांडणारा कवी असं त्यांचं वर्णन समीक्षक करतात ते या कवितेद्वारे समर्थ वाटते.

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

अनुवादित कविता - न्युमेरी अल नैमत उर्फ अमजद नासीर : जॉर्डन , अरेबिक कविता

मी कुठेही गेलो तरी 
संध्येस त्याच खोलीत असतो 
जी माझ्या आईने अज्ञात पानाफुलांच्या सुगंधाने भरलेली असते.
हा सुगंध माझ्यासोबतच असतो जणू.
माझी आई देवाघरी गेली आणि तेंव्हापासून ही गंधभारीत खोली माझ्यासवे असते.
बालकवींच्या 'औदुंबरा'सारखा हा गंध माझा पिच्छा करतो.
खरे तर आपले आयुष्य आपण जितके उध्वस्त करू 
तितका विध्वंस आपला पाठलाग करत राहतो. 
हे तर माझ्या आजीच्या अंतहीन म्हणींसारखे घडतेय, 
जे पुन्हा पुन्हा प्रारंभाकडे खेचतेय. 
विमनस्कतेच्या या वर्तुळाला मी कसे छेदेन हे ठाऊक नाही.
शब्द, गंध आणि झेपेच्या बंधनातून मुक्त होत 
हवेहवेसे पदलालित्य मला लाभेल का 
याचेही उत्तर माझ्याकडे नाही. 
आईच्या गंधभारीत आठवणींचे कढ हेच आता जणू जीवन झालेय...

रविवार, २९ जानेवारी, २०१७

क'वीलक्षण' ...



एके काळी कवी, कवयित्री हजार माणसात देखील सहज ओळखू यायचे, त्यासाठी डोक्याला ताण द्यायची फारशी गरज पडत नसे. त्यांची लक्षणे ठरलेली असत. कलात्मकतेचा बाज दाखवणारी त्यांच्या डोक्यावरच्या केसांची अस्ताव्यस्त झुल्फे कवीच्या लेबलखाली ती मस्त खपून जायची. शिवाय कवीला इतकीही उसंत नाही असा एक समज त्यातून रूढ व्हायचा. दाढीचा किरकोळ खर्च टाळणारे प्रतिभेचे बाह्यलक्षण क्रमांक दोन म्हणजे रापलेल्या गालफडावरील हनुवटीकडे वाढलेले दाढीचे खुंट होय. कवीच्या नाकावरून घसरून खाली आलेला कधीही फ्रेम तुटायच्या बेतात असलेला त्याचा चष्मा त्याला अगदी चपखल शोभून दिसे. कवीच्या कपाळावर आठ्यांची आखीव रेखीव जाळी जळमटे असायचीच.

शनिवार, २८ जानेवारी, २०१७

धोक्याचा नवा सायरन - तमिळनाडू



टोकाचा भाषिक, प्रांतीय अस्मितावाद आणि भीषण परंपरावाद एकत्र आल्यावर त्यातून विघटनवाद जन्माला येतो, जो तमिळनाडूमध्ये आला आहे. काल तमिळनाडू विधानसभेत विरोधी पक्ष नेते एम.के. स्टॅलिन यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सरकारजवळील जी माहिती सभागृहासमोर मांडली आहे ती चक्रावून टाकणारी धोक्याचा मोठा सायरन वाजवणारी आहे. गुप्तचर यंत्रणांच्या कुंभकर्णी झोपेचा पर्दाफाश करणारी आहे. या आंदोलनात स्वतंत्र तमिळनाडू देशाची मागणी झाली आहे ! लादेनचे फोटो तिथे झळकावले गेलेत, मोदींच्या नावाने शंख झालाय, आंदोलक पेट्रोल बॉम्बने सज्ज होते, तब्बल २००० फुटीरवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यांच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकले गेले, आंदोलकांच्या नावाखाली निदर्शने करणाऱ्या अशा विघातक लोकांचे सीसीटीव्ही फुटेजही पन्नीरसेल्वम यांनी सभागृहाला दाखवले.

बुधवार, २५ जानेवारी, २०१७

'केवळ माझा सह्यकडा' - वसंत बापट


`माझीया जातीचे मज भेटो कोणी,
ही माझी पुरवून आस,
जीवीचे जिवलग असे भेटला की
दोघांचा एकच श्वास'
कवितेवर अशी जीवश्च निष्ठा असणारा कवी म्हणून वसंत बापट ओळखले जातात. बालवयापासून वसंत बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. राष्ट्रसेवादलाच्या मुशीत घडलेल्या वसंत बापट यांच्या १९५२ सालातील 'बिजली' हया पहिल्या काव्यसंग्रहावर हया संस्काराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'सेतू', 'अकरावी दिशा', 'सकीना', 'मानसी' हे त्यांनंतरचे काव्यसंग्रह होत . त्यांच्या प्रतिभेची विविध रुपे रसिकांनी वाचली अनुभविली. पुढे 'तेजसी' व 'राजसी' हे दोन काव्य संग्रह ना. ग. गोरे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. 'चंगा मंगा', 'अबडक तबडक', 'आम्ही', 'गरगर गिरकी', 'फिरकी', 'फुलराणीच्या कविता' आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. लहान मुलामध्ये मूल होऊन जगण्याची कला बापटांना नक्कीच अवगत असावी असे त्यांच्या बालकाव्यसंग्रहांच्या नावावरून वाटते. त्याच बरोबर 'बालगोविंद' हे त्यांचे बालनाट्य विख्यात आहे. पौराणिक एतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली `केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. 'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची 'सकीना' उर्दूचा खास लहेजा होऊन प्रकटली आणि, `तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा,कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा' असं व्यक्त होत त्यांच्या लेखन किमयेची कमाल सांगून गेली.

रविवार, २२ जानेवारी, २०१७

सोशल मीडियावरील आवर्तने - डिजिटल कालपर्वातले सर्वाधिक प्रभावी हत्यार !


सोशल मिडीयाला हाडूक लागते चघळायला. एखादी घटना घडली की तिच्या अनिवार लाटा येतात आणि त्या घटनेचा बहर ओसरला की या लाटाही ओसरतात. मग नवी घटना घडते आणि तिच्या लाटा येतात. या लाटांना काहीही पुरते. अगदी 'कटप्पाने बाहूबलीला का मारले' यावरदेखील लोकांनी आपल्या भिंतींवर नक्षी करून ठेवली होती. अण्णा हजारेंनी केलेल्या रामलीला मैदानापासूनच्या ते अगदी परवाच्या कठुआ बलात्कार-खून प्रकरणाच्या लाटा देशाने पाहिल्यात, कळत नकळत यात सारेच सामील झाले. टूजी स्पेक्ट्रम, कोल ब्लॉक, कॉमनवेल्थ, रामदेव बाबाचे फसलेले आंदोलन, आसारामची अटक, निवडणूकीतले सत्तापालट, मोदींचे सत्ताग्रहण, बाळासाहेबांचे निधन, भीमा कोरेगावची दंगल, अखलाकची हत्या, गोरक्षकांचा हैदोस, केरळ-बंगालमधील राजकीय धार्मिक हत्या, विराटचं लग्न, आयपीएलचा धिंगाणा, निर्भयाचं आंदोलन आणि आता कठुआ- उन्नावची घटना. याच्या जोडीला सणवार, जयंत्या, पुण्यतिथ्या, 'डे'ज, इव्हेंट्स यांची झालर असते. अशा अनेक घटना सातत्याने घडत राहतात. या घटना घडताच ताबडतोब प्रतिक्रिया द्यायला लोक बाह्या सरसावून पुढे येतात, जणू काही आता हे बोलले नाही तर आभाळ कोसळणार ! प्रत्येकाला वाटते की आपण प्रत्येक मुद्द्यावर बोललेच पाहिजे. पण हजारो जण जरी आपलं अकाऊंट बंद करून गेले तरी सोशल मिडीयाला फरक पडत नसतो. पण जो तो आपल्या वकुबानुसारची भाषा वापरू लागतो -

निद्रापुराण ....



झोप सर्वांना हवीहवीशी असते, नीटनेटकी झोप नसेल तर माणसे बेचैन होतात. डुलकी, झापड, पेंग ही सगळी झोपेची अपत्ये. 'कुंभकर्ण' हा झोपेचा देव आहे की नाही हे ज्ञात नाही पण 'निद्रा' नावाची देवी अनेकांना प्रिय असते. झोपेच्या सवयी, झोपेचे प्रकार, झोप येण्याच्या घटनास्थिती देखील व्यक्तीपरत्वे भिन्न असतात. वेगवेगळ्या ठिकाणी, विविध अवस्थेत येणाऱ्या झोपांचे एक स्वतंत्र निद्रापुराण लिहिले जाऊ शकते. झोपेत काहीजण तंबोरा लावतात, काही पिपाणी वाजवतात, काहींनी त्रिताल धरलेला असतो तर काही शेळी फुरफुरल्यागत ओठ फुरफुरवत झोपतात.

बुधवार, ११ जानेवारी, २०१७

युगप्रवर्तक कवी - केशवसुत


'शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे
पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ?..
..आम्हाला वगळा, गतप्रभी झणी होतील तारांगणे
आम्हाला वगळा, विकेल कवडीमोलावरी हे जिणे !'
असं म्हणायला दुर्दम्य आत्मविश्वास असावा लागतो, उत्तुंग आयुष्य जगावं लागतं अन कालातीत कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे लागते. कवी केशवसुत या वर्णनात चपखल बसणारे व्यक्ती होते. त्यांनी निर्मिलेले काव्य अजरामर झाले. मराठी कवितेचे दालन भरून पावले.

कृष्णाजी केशव दामले उपाख्य केशवसुत यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी रत्नागिरीजवळील मालगुंड या गावी झाला. केशवपंत दामले मूळ दापोलीचे. ते शिक्षक म्हणून मालगुंडच्या शाळेत दाखल झाले आणि फडके कुटुंबीयांच्या घरात भाडयाने वास्तव्यास राहिले. याच घरात १५ मार्च १८६६ साली केशवसुतांचा जन्म झाला. त्यांना एकूण बारा अपत्य, सहा मुले व सहा मुली. कृष्णाजी हे त्यांचे चवथे अपत्य. कोकणात खेड गावी प्रार्थमिक शिक्षण घेत असतांना कृष्णाजींना  प्राचीन साहित्य वाचण्याचा छंद लागला. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १८८४ला त्यांनी दाखल केले होते. तेव्हा देशभक्त बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर शिक्षक असलेली ही शाळा आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. मात्र देशसेवेचे बाळकडू इथेच त्यांना मिळाले. सामाजिक अन्यायावर आपल्या कवितांमधून घणाघाती प्रहार करताना त्यांच्यातील ‘आगरकरांचा शिष्य ’आपणास ठायी ठायी जाणवतो.

मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

गडकरी मास्तरांना पत्र ...


आदरणीय मास्तर... साष्टांग दंडवत ...

आजची तुमची बातमी वाचून रडलो आणि तुम्हालाच पत्र लिहून काही प्रश्न करावेसे वाटले. तुमच्या कविता आणि धडे वाचून चार अक्षरे वाचण्याच्या अन लिहिण्याच्या भानगडीत मी पडलो. पण आजची घटना पाहून तुम्हाला विचारावे वाटते की, मास्तर तुम्ही हा लेखनाचा आटापिटा का केला होता हो ? आचमने करून अन मास्तरकी करून तुम्ही सुखासमाधानात का जगला नाहीत ? चार भिंतीच्या एका खोलीत आपला फाटका संसार मांडून जगण्याच्या वंचनेत मृत्यूस कवटाळणारया एका मास्तराची इतकी का भीती वाटावी की रात्रीतूनच त्याचा पुतळा फोडावा लागतो ? आज तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल...

"मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ..."
ही कविता लिहून तुम्ही काय मिळवलंत गडकरी ?

तुमच्या नावात राम असला म्हणून काय झाले सद्यराज्यात रावण जास्त सक्रीय आहेत ... तुम्ही माणसं ओळखून लिहायला पाहिजे होतं. तुम्ही चुकलात हो !

सोमवार, २ जानेवारी, २०१७

जीवनतत्व - प्रेमाची अभिव्यक्ती


काही दिवसांपूर्वी रजनीकांतचा एक किस्सा वाचण्यात आला होता. रजनीकांत मंदिराबाहेर थांबलेला असताना एका महिलेने त्याला भिकारी समजून दहा रुपये दिले आणि त्याने ते भीक म्हणून स्वीकारले असा तो किस्सा होता. मात्र असा किस्सा अनेक महानुभावांच्या बाबतीत पूर्वी घडला आहे. यातीलच एक किस्सा लिओ टॉलस्टॉयचा आहे. टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होता. तो आपल्या काही सैनिकांची मॉस्को स्टेशनवर वाट पाहत होता. मॉस्कोत नेहमीच रक्त गोठवणारी थंडी असे त्यामुळे त्यांच्या अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच कळत नव्हतं. तेव्हढ्यात एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ हमाल आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय काही वेळ गोंधळला. पण त्याने पुढच्याच क्षणी त्या बाईचं सगळं सामान ऊतरवून दिलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना! हे सैनिक एका हमालाला का सॅल्यूट मारतायत ? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्या बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर सार्वकालीन महान कादंबरीकार उभा आहे. एवढच नाही तर त्यानं आपलं सामानही उतरवून दिलं. बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनेच त्यांचे आभार मानले, ते त्यांनी दिलेल्या कामाबद्दल. एवढच नाही तर हमालाला देणार होत्या ती रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली.

सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

महाकवी सावरकर


१३ जुलै १६६० च्या रात्री सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटून जाण्यासाठी शिवाजीराजे बाजीप्रभू, बाजींचे बंधू फुलाजीप्रभू आणि सहाशे मावळयांच्या साथीने बाहेर पडले. वीर शिवा काशिद यांनी दिलेले बलिदान बाजींनी आपल्या प्राणाची बाजी लावून व्यर्थ जाऊ दिले नाही. आपल्या रक्ताने बाजींनी घोडखिंड पावन केली आणि आपल्या राजाला या संकटातून बाहेर काढताना स्वतःचे प्राण त्यागीले. त्या अभूतपूर्व रणसंग्रामाला, बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्य रक्षणासाठी पावनखिंडीत देह ठेवला त्याला ३७० वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या ऐतिहासिक घटनेवर लिहिलेला पोवाडा १९१०च्या दशकात स्वराज्याच्या चळवळीला खूप स्फुर्तीदायी ठरला होता. आजही हा पोवाडा नुसता वाचला तरी मनगटे आवळतात, मुठी वळतात, धमन्यातले रक्त सळसळून उठते, छाती फुलून येते. स्फुल्लिंग पेटून उठतात.

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

शब्दसूर्य - नारायण सुर्वे !



‘ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती.’ फुटपाथवरच्या खुल्या आकाशाखाली जगाच्या खुल्या विद्यापीठात शिकलेल्या नारायण सुर्वेंनी झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. मागे वळून पाहताना त्याच आयुष्यावर, 'एकटाच आलो नाही, युगाची ही साथ आहे' असं रसरशीत भाष्यही केले.
नदी आणि ऋषी यांचे कुळ आणि मूळ शोधू नये असे म्हटले जाते. नारायण सुर्वे हे लाक्षणिक अर्थाने आणि आशयघन निर्मितीच्या दृष्टीने मराठी साहित्यातले कबीर होते असं म्हणणे संयुक्तिक ठरेल. कारण १९२६-२७ मध्ये मुंबईतील चिंचपोकळीमध्ये एका कापडगिरणीसमोर गंगाराम गुरुजी सुर्वे या गिरणी कामगाराने रस्त्यावरील एक अनाथ जीवास उचलून घरात आणले. त्यांची पत्नी काशीबाई सुर्वे यांनी या अश्राप जीवाला पोटच्या मुलासारखे प्रेम दिले.

सुर्वे दांपत्याने या जीवाला नुसते प्रेमच नव्हे तर आपले नावही त्याला दिले. तोच हा नारायण ! नारायण गंगाराम सुर्वे ! मराठी साहित्यात आपले स्वतंत्र स्थान संघर्षमय वाटचालीतून निर्माण करणारे आणि आशयाच्या नव्या वाटा चोखाळणारे सुर्वे मास्तर !! अक्षरवाटेवरील पांथस्थासाठी अंधाऱ्या भवतालात आपल्या आयुष्याचा दिवा करून उभे राहिलेल्या सुर्व्यांच्या आयुष्याची सुरुवातच नाट्यमय आणि संघर्षमय अशी होती. ‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. ‘सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे’ या निर्भीड वृत्तीने तब्बल सहा दशके सुर्व्यांनी मराठी सारस्वताच्या दरबारात शब्दरूपी तळपती तलवार परजत ठेवली.

मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

जयललितांचे आयुष्य - सापशिडीचा पट !



"जयांच्या आयुष्यात सातत्याने उतार चढाव येत गेले. पण त्या फिरून फिरून नशिबाची व कर्तुत्वाची साथ लाभून वर येत राहिल्या. त्यांचे आयुष्य म्हणजे जणू काही सापशिडीचा पट ! सापशिडीत देखील सुटकेच्या ९९ क्रमाकाच्या शेवटच्या घरापाशी साप असतो तसे त्या त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च स्थानी पोहोचल्या असताना मृत्यूकडून त्यांना कायमची मात खावी लागली. पण त्यातही त्यांनी ७३ दिवस झुंजार बाण्याने लढा दिला मग हार पत्करली. सावज आलं आणि सहजपणे सापाने गिळलं असं त्यांच्या आयुष्यात कुठंच घडलं नाही. खडतर बालपण, यशस्वी रुपेरी कारकीर्द, राजकारणातले शह काटशह, मुख्यमंत्री ते कैदी नंबर ७४०२ आणि पुन्हा मुख्यमंत्री असा रंजक राजकीय प्रवास अशा अनेक घटनांनी हा सापशिडीचा आयुष्यपट रंगलेला आहे......"