शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

इर्शाद आणि विषाद ..




सभी के दीप सुंदर हैं हमारे क्या तुम्हारे क्या
उजाला हर तरफ़ है इस किनारे उस किनारे क्या..

इर्शादवरून जो गोंधळ माजवायचा होता तो माजवून झालाय. त्यातले काही बारकावे आपण समजून घेतले पाहिजेत.
जे विरोध करत होते त्यांची मुख्य भूमिका अशी होती की दिवाळी हा सण हिंदूधर्मीयांचा आहे तेंव्हा या निमित्ताने ठेवलेल्या गझल गीत गायन कार्यक्रमाचे शीर्षक फारसी उर्दू तत्सम भाषेत नको. यामुळे सांस्कृतिक आक्रमण होते आणि हिंदूंच्या अस्मितांना किंमत दिली जात नाही.
विरोध करणारी काही मंडळी म्हणत होती की दिवाळी पहाट, दिवाळी प्रभात दिवाळी काव्यमाला असे शीर्षक का दिले गेले नाही.
सण हिंदूंचा आहे तेंव्हा फारसी उर्दू भाषिक शीर्षक नको असा आग्रह ही मंडळी करत होती.
विरोधाचा यापेक्षा वेगळा युक्तिवाद माझ्या वाचनात आला नाही.

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

प्रेमिस्ते...


विख्यात तमिळ चित्रपट दिग्दर्शक एस. शंकर हे एकदा रेल्वेतून चेन्नैला प्रवास करत होते तेंव्हा एक विलक्षण घटना घडलेली. त्यांच्या कंपार्टमेंटमधील एका प्रवाशाला दुसऱ्या सहप्रवाशाकडून कळले की आपल्या बोगीमध्ये आपल्या सोबत एस. शंकर हे प्रवास करताहेत. काही क्षण त्या प्रवाशाने विचार केला, मग मनोनिश्चय करून तो शंकर यांच्या पुढ्यात जाऊन बसला. त्याने आधी समोरील व्यक्ती शंकर असल्याची खात्री करून घेतली नि  पुढच्याच क्षणाला त्याने शंकर यांचे हात आपल्या हाती घेतले. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याने शंकरना विनवणीच्या स्वरात एक प्रश्न केला, "सर मी एक कथा सांगतो तुम्ही त्यावर सिनेमा बनवाल का ?" शंकर बुचकळ्यात पडले. त्यांची द्विधा मनस्थिती त्या प्रवाशाने ओळखली आणि तो बोलता झाला, "ही काही काल्पनिक कथा नाहीये, ही माझ्या जीवनात घडलेली सत्यकथा आहे." त्याच्या उद्गारासरशी शंकरनी मान डोलावली. काही क्षण तो व्यक्ती गप्प झाला, शून्यात नजर लावून थिजून बसला. नंतर तो बोलत राहिला. कथा संपली तेंव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू काही केल्या थांबत नव्हते. त्या कथेने शंकर स्तब्ध सद्गदित झाले. तो प्रवासी पन्नाशीच्या आसपासचा होता, त्याने सांगितलेली जीवनकथा त्याच्या मुलीच्या बाबतीतली होती. त्या व्यक्तीला आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करायचे होते आणि आपण केलेली चूक दुसऱ्या कुणी व्यक्तीने करू नये म्हणून त्यावर सिनेमा निर्मिती व्हावी अशी त्याची मनोमन इच्छा होती. शंकरनि त्याला शब्द दिला आणि त्यावर २००४ साली सिनेमा बनवला. 'काधल' हे त्याचे नाव. काधल म्हणजे प्रेम. सिनेमाने तिकीटबारीवर अक्षरशः टांकसाळ खोलली. अगदी लोबजेट सिनेमा होता तो, त्याच्या यशाने भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली. याच सिनेमाचा २००५ मध्ये तेलुगुमध्ये रिमेक झाला, त्याचे नाव होते 'प्रेमिस्ते' !

गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

नथीचा दुखरा कोपरा...

सामान्य स्त्रीच्या जीवनात नथीला खूप महत्व आहे. मात्र सभ्य स्त्रीच्या जगापलीकडे एक जग आहे जे पांढरपेशी विश्वाशी फारकत घेऊन आहे. या जगात देखण्या बायकांची भेसूर दुःखे आहेत. या दुःखांचा परमकाल या नथीशी संबधित आहे म्हणूनच यावर विचार झाला पाहिजे.

स्त्री काही दागिने परंपरा रिवाज म्हणून घालते तर काही दागिने हौस म्हणून तर काही दागिने शृंगारासाठी घातले जातात. यातील काही दागिने स्त्रीच्या शरीर सौष्ठवात भर घालतात तर काहींनी तिचे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. माथ्यावरच्या बिंदी, भांगसरने सुरुवात होते आणि पैंजण जोड्व्याने इतिश्री होते.

अग्रफूल, गोंडे, केकत (केवडा), बेसर, मुरकी, मोहनमाळ, बोरमाळ, डोरलं, खोड, बाजूबंद, मणदोरा (कंबरपट्टा), कोल्हापुरी साज, अंगठी, छल्ला, पैंजण, अनवट, जोडवी असे एक ना अनेक दागिने आहेत तरीही नथीला महत्व आहे. याचं कारण काय असावं ?

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

माणसांचं स्क्रोलिंग आणि टॉलस्टॉयची गोष्ट ...

सोशल मीडियापासून दूर असलेली माणसं अलीकडील काळात दृष्टीपथात नाहीत. अगदी खेडोपाडी देखील याचा बोलबाला आहे. पूर्वीच्या काळातला आर्थिक वर्गवारीचा भेद देखील याला अडवू शकला नाही. जाती, धर्म, वर्ण, वय, लिंग, भाषा, प्रांत, उत्पन्न इत्यादी सर्व बंधने यास रोखू शकली नाहीत हे सत्य आता सर्वमान्य झालेय. दिड जीबीचा डाटा हा आता विनोदाचा आणि मिम्सचा विषय होय पाहतोय. लोकांकडे फोन्स कुठून आले, रिचार्ज कसे परवडते किंवा हे सर्व पेलवते कसे हे सगळे विविध शास्त्रांचे विषय आहेत. खरा प्रश्न हा पडतो की माणूस सोशल मीडिया वापरतोय की सोशल मीडिया माणसाला वापरतोय ? हा प्रश्न म्हणजे निव्वळ शब्दच्छल नाहीये किंवा विभ्रमनिर्मितीचा मुद्दा नाहीये. हा एक महत्वाचा प्रश्न आहे जो पुढे जाऊन मानवी समुदायाला एका गंभीर नि धोकादायक वळणावर नेऊ शकतो. थोडंसं सुलभ करूया म्हणजे सहज मतितार्थ उमगेल. 

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

वेश्यांच्या जागांवर कुणाचा डोळा ?..

हजारो किमी अंतरावरील अफगाणी महिलांचा आपल्या लोकांना कळवळा आलाय यात वाईट नाहीये मात्र आपल्या बुडाखाली काय होतेय याचीही जरा माहिती ठेवायला हवी. राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपूर शहरातील 'गंगा जमुना' या रेड लाईट एरियात कर्फ्यू लावलेल्या घटनेस आता आठवडा होईल.
इथल्या बायकांचा आक्रोश कुणाच्या कानी पडत नाहीये कारण हा मुद्दा चलनात आल्याने कुणाचीच पोळी भाजली जाणार नाहीये.
उलटपक्षी या बायका देशोधडीला लागल्या तर लाखो कोटीहून अधिक किंमतीच्या जागा हडपण्याचे पुण्यकाम आपसात वाटून घेऊन करता येतं हे आपल्या लोकांना पक्कं ठाऊक आहे .

पोलिसांचे म्हणणे आहे की या भागात कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जातंय. गुन्हेगारांचा वावरही आहे. काही दलाल अल्पवयीन मुलींवर देहविक्रीसाठी जबरदस्ती करत आहेत. अवैध धंदे, गांजा-ड्रग्सची विक्रीही होत आहे, अशी तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली. परिसरातील नगरसेवक आणि संबंधितांनी गंगाजमनामुळे होणार्‍या त्रासाबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी गत बुधवारी रात्री गंगा-जमुना सील केली. गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्यानं ही कारवाई करण्यात आली असं पोलीस सांगतात.

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

मैत्रीची अनोखी दास्तान : मार्टिना - ख्रिस



आपल्यापैकी किती जण टेनिसचे चाहते आहेत ठाऊक नाही आणि कितीजण या दोघींना ओळखतात याची कल्पना नाही. मात्र जे ह्या दोघींबद्दल जाणतात त्यांच्या लेखी या दोघीजणी म्हणजे टेनिसकोर्टवरच्या सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी होत. या दोघींनी तब्बल सोळा वर्षे नेटच्या दोन्ही बाजूंनी लढत टेनिसचं युद्ध खेळलं. त्या इतक्या त्वेषाने लढायच्या की प्रेक्षकांना स्फुरण यायचं. विशेषतः अंतिम सामन्यात या आमने सामने आल्या की क्रिडारसिकांना मेजवानी लाभे. त्या अक्षरशः तुटून पडत. दोघींना अफाट पाठीराखे लाभले होते. दोघींनाही मोठ्या संख्येत प्रेक्षक चिअरअप करायचे.
महिला टेनिसचा तो खऱ्या अर्थाने सोनेरी काळ होता असे म्हटले जाते कारण पुरुषांच्या सामन्यांहून अधिक लोकप्रियता या दोघींच्या सामन्यास लाभे. चुरशीच्या द्वंद्वावरून यांच्यातलं नातं सहज सुलभतेचे नसेल असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. या दोघी बेस्ट फ्रेंड्स होत्या ! आणि आजही त्यांच्यातल्या मैत्रीचा गंध सीमापार दरवळतो आहे.

शनिवार, २४ जुलै, २०२१

पाऊस कुठे चुकलाय ?


लोक म्हणताहेत पाऊस कोपलाय.. वर्षाची सरासरी अवघ्या काही दिवसांत गाठत तो वेड्यासारखा कोसळतोय. असं काही नाही. त्याचं कुठं काय चुकलंय ? पूर्वी तो वेळेवर न चुकता जूनच्या पहिल्या आठवड्यात यायचा आणि सप्टेबरअखेर पर्यंत दमादमाने आस्ते कदम बरसत राहायचा. शाळेच्या सुरुवातीला पोराठोरांसंगे दंगा करायचा,
ज्येष्ठात तांबड्या मातीतल्या भातशेतीतून लोळण घेत शिवारभर फिरून दमल्यावर कौलारू घरांवरून घसरगुंडी खेळायचा. आषाढात वारकऱ्यांच्या पायात घुटमळत दिवेघाटातून दरवळत भवतालात घुमायचा,
काळ्या मातीत पेरलेल्या बीजांना गोंजारायचा. आभाळमाया करायचा,
सह्यकड्यापासून सातपुड्यापर्यंत डोंगररांगांवर अभिषेक करायचा, वसिष्ठीला वंदन करुन तापीच्या पायावर लीन व्हायचा,
त्याचा हा प्रवास ठरलेला असायचा...

बुधवार, ७ जुलै, २०२१

'सुहाना सफर' दिलीपसाब आणि सायराचा !....




अखेर आज त्याचे श्वास थांबले...
 
ओढ ज्याची त्याची असते, ज्याला त्याला ती कळत असते मात्र त्याच्याशी एकरूप झालेल्या जीवाला ती अधिक कळते .....

तो 'अखेरचा रोमन' आता जवळ जवळ गलितगात्र होऊन गेला होता अन ती 'हिमगौरी' आता थकून गेली होती....
पण त्यांनी अजून हार मानली नव्हती, त्याची स्वप्ने त्याचा पिच्छा सोडत नव्हती
अन ती त्याची सेवाशुश्रूषा थांबवत नव्हती..
त्याचा श्वास हाच जणू तिचा ध्यास झाला होता...
त्याचे श्वास अलीकडे मंद होत होते..
त्याच्या डोक्याखाली तिने आपल्या हाताचीच उशी केली होती.

तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे आता अधिक गडद होत होती अन त्याच्या देखण्या चेहऱ्यावरचे सुरकुत्यांचे जाळे अधिक दाट होत चालले होते..

शुक्रवार, २ जुलै, २०२१

मला दिसलेला श्रीमंत माणूस ...

घराकडे जायच्या रस्त्याला जुना पुणे नाक्याच्या वळणाच्या पुढे काही भणंग भटके नेहमी नजरेस पडतात. गर्दीत त्यांचे अस्तित्व नगण्य असते तरी रोज एकदा तरी त्यांच्याशी दृष्टादृष्ट होतेच. त्यांचा ठिय्याच आहे तो. असो. आजचीच एक घटना आहे.. 

चार वाजण्याआधी घाईने दुपारी घराकडे जाताना समोरून एक टू व्हिलरवाला पोरगा अगदी वेगाने जवळून निघून गेला. रस्ता अगदी मोकळा होता तरीही त्याचं बेदरकार बाईक राइडिंग जाणवलं.

मी माझ्या तंद्रीत पुढे सरकलो. काही क्षणांनी एक क्षीण आवाज जाणवला, फट्ट ! काही तरी फुटलं असावं असं त्यातून जाणवलं.

आरशातून मागे पाहिलं तर बाईकस्वार पुढे निघून गेला होता मात्र रस्त्यावर कुत्री गोळा झाली होती, ती भुंकत नव्हती. एका विशिष्ट स्वरात कुळकुळत होती.

मंगळवार, ४ मे, २०२१

मासूम - दो नैना एक कहानी...


आज ‘मासूम’विषयी ! पण त्याही आधी या सिनेमाच्या क्लासविषयी. यातील स्टारकास्ट आणि त्या काळातील समांतर सिनेमाची लाट यामुळे या सिनेमासाठीचा प्रेक्षकवर्ग कथित पांढरपेशी उच्च अभिरुचीचा आणि मध्यमवर्गीय असाच असेल असे आडाखे होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवस चित्र असेच होते नंतर मात्र चित्र बदलले आणि कॉमन पब्लिक देखील थियेटरमध्ये येऊ लागलं. तरीदेखील तद्दन पिटातले म्हणून ज्यांना हिणवले जाते तो प्रेक्षकवर्ग याला फार लाभला नाही. हे लिहिण्याचे कारण म्हणजे आपल्या सोलापुरातील प्रेक्षकवर्गाची वर्गवारी आणि जडणघडण होय. कधीकाळी सोलापूर हे एक अत्यंत साधंसुधं गिरणगाव होतं. आजही इथे श्रमिकवर्ग मोठ्या प्रमाणात आढळतो. चतुर्थ- तृतीय श्रेणी कामगार खूप आहेत. विविध भाषीय लोक मुबलक संख्येत आहेत. लोकांचे दरडोई उत्पन्न बरेच कमी आहे, चैन करण्याकडे आणि पैसे खर्च करण्याकडे इथल्या लोकांचा ओढा नाही. आहे त्यात समाधान मानून जगणारा अल्पसंतुष्ट आणि विकासाची ओढ नसणारा काहीसा सुस्त उदासीन असा इथला जनसमुदाय आहे. अशा लोकांची क्लास आणि मास अशी विभागणी केली तर क्लास अगदी अल्प आणि मास अफाट प्रमाणात आढळतो. त्यामुळेच ‘मासूम’ काहीशा उशिराने जेंव्हा सोलापुरात प्रदर्शित झाला तेंव्हा त्याची व्ह्यूअर्स काऊंटची अपेक्षा जेमतेमच होती, किंबहुना यामुळेच आसनसंख्या कमी असलेल्या छायामंदिरमध्ये याची वर्णी लागली. पहिल्या दोनेक आठवड्यात पब्लिक कमी होतं नंतर मात्र थियेटर खचाखच भरू लागलं. बिड्या वळणाऱ्या दमलेल्या वयस्क हातापासून ते गल्लीच्या कोपऱ्यावर पडीक असणाऱ्या तंबाखू मळणाऱ्या बेफिकीर तरुण हातापर्यंतचं बहुवर्गीय पब्लिक त्यात सामील होतं. ‘मासूम’ला लोकांनी नितळ निखळ प्रेम दिलं, सिनेमा हिट झाला. गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. १९८३ मध्ये आला होता 'मासुम'. शेखर कपूरने दिग्दर्शित केलेला पहिलाच पण अप्रतिम सिनेमा. तेंव्हा मी किशोरवयीन असेन. माझ्या आईवडिलांसमवेत सिनेमा पाहिलेला. आता तिथे निर्जीव मल्टीप्लेक्स आहे, त्यातल्या बेचव कॉर्नप्लेक्ससारखे वाटते ते ! ‘मासूम’ पाहताना एकदोन प्रसंगाच्या वेळेस शेजारी बसलेल्या आईच्या कुशीत तोंड लपवून रडल्याचे आठवतेय. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे 'दो नैना एक कहानी' ह्या गाण्याचा हे मात्र नक्की.