शुक्रवार, १३ मे, २०१६

वढू तुळापूरची गाथा .....



राजे, इथल्या पाण्यात अजूनही तुमचे प्रतिबिंब दिसते,
हताश झालेला औरंग्या दिसतो, त्या दिवशी अबोल झालेली इथली सृष्टी अजूनही तशीच थबकून आहे !
राजे इथे तुमच्या किंकाळ्या कुठेच ऐकायला येत नाहीत वा ना हुंदके ऐकायला येतात !
कवीराज कलश यांचे थोडेसे उमाळे मात्र इथल्या हवेत अजूनही ऐकता येतात ! ज्यांनी तुमचा छळ केला ते रात्र रात्र झोपू शकत नसत त्यांच्या कन्हण्याचा आवाज मात्र इथल्या मातीला कान लावला की ऐकायला येतो !
राजे तुमची जिव्हा जेंव्हा कापली त्या दिवशीपासून इंद्रायणी जी अबोल झाली ती आजतागायत मूक बनून राहिलीय !

मुघलपूर्व भारत अन हिंदूंचे पतन ....एक वेध इतिहासाचा... -



मुघलपूर्व भारतीय उपखंडाचा इतिहास अभ्यासल्यावर असे दिसून येते की इस ५०० पर्यंत गांधार, हुण -श्वेतहुंण (आताच्या अफगाणीस्तानातील कंदहार), तक्षशीला - सिंध, मुलतान (आताच्या पाकिस्तानातील ताक्सिला ), आताच्या ब्रम्हदेश - बांगलादेश पर्यंत असणारे पाटलीपुत्रचे विशाल साम्राज्य, दक्षिणेकडे पांड्य,चोल आणि थेट आताच्या श्रीलंकेत असणारे ताम्रपर्णी साम्राज्य असे चौफेर विविध राजवटी आणि राज्यांचा विस्तार होता. हिंदुस्तान वा भारत नावाचा सलग भूप्रदेश जरी तेंव्हा अस्तित्वात नव्हता तरी सर्व राज्ये - राजवटी गैरमुस्लीम आणि हिंदूबहुल होती. मात्र जसजशी शतके उलटत गेली तसतसे मुसलमानी आक्रमक सत्ताविस्तार, भूविस्तार, लूटमारी आणि धर्मप्रसार यासाठी आक्रमण करत गेले आणि इथले शासक बनून गेले. हा सर्व इतिहास इस ६१५ ते इस १७००च्या दरम्यानचा आहे. इस्लामी आक्रमकांनी इथल्या राजवटी कशा ताब्यात घेतल्या आणि तेंव्हाचा हिंदूशासित प्रदेश इस्लामी राज्यकर्त्यांचा कसा अंकित होत गेला यावर प्रकाश टाकणे हा या लेखाचा हेतू आहे.

गुरुवार, १२ मे, २०१६

अल्लाउद्दिन खिलजी ते शिवछत्रपती .....

 

एक काळ होता जेंव्हा खरोखरच महाराष्ट्रावर वर्षांतील बाराही पौर्णिमा सुखाचे चांदणे शिंपीत होत्या. अन् शेकडो वर्षांपूर्वी मोठा घात झाला. चंद्राला अकस्मात खळे पडले. कसे पडले, केव्हा पडले ते कुणाला समजलेच नाही. विंध्याचलाच्या मागून धुळीचे लोट उठले. आठ हजार घोडय़ांच्या बत्तीस हजार टापा वाढत्या वेगाने आणि आवेशाने खडाडत महाराष्ट्रावर चालून आल्या. त्यांचा आवेश कत्तलबाजांचा होता..
त्यांचा म्होरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी पठाण. त्याचा युद्धपुकार अस्मान फाडीत होता. ती पठाणी फौज नर्मदा ओलांडून सातपुडय़ाच्या माथ्यावर चढली. पठाणांची पहिली झडप पडली एलिचपुरावर. हंबरडे आणि किंकाळ्या फुटल्या. परचक्र आले. महाराष्ट्रावर परचक्र आले. थोडे दिवसच आधी महाराष्ट्रातील संतांची दिंडी उत्तर हिंदुस्थानात यात्रांना जाऊन आली होती. त्यांनी सुलतानांची सत्ता पाहिली, काही कठोर कडवट अनुभव घेतले. लोकांना सांगितले होते. तरीही राजा आणि राज्य गाफील होते..

अल्लाउद्दीनचे हे वादळी आक्रमण राजा रामदेवराव यादवाला उशिरा कळले. स्वराज्यात तो कमीतकमी शंभर कोस (म्हणजे सव्वाशे किलोमीटर) घुसला तरी त्याला कुणीच अडवले नाही? मग आमचे सैन्य होते कुठे? आमचा राजा बेसावध होता. पण सेनापती काय करत होता? सेनापती होता राजा रामदेवाचा युवराजच. त्याचे नाव शंकरदेव ऊर्फ सिंघणदेव. तो आपल्या सैन्यासह दूर कोठेतरी गेला होता. यात्रेला गेला होता म्हणे. अल्लाउद्दीनची फौज देवगिरीच्या रोखाने दौडत येत होती. रामदेवरावाला आपले भयंकर भविष्य दिसू लागले.

शिंदेशाहीचा देदिप्यमान इतिहास .....


शिवकालानंतर मराठ्यांच्या इतिहासातली रणांगणावरची सर्वोच्च पराक्रमाची शर्थ म्हणून पानिपताकडे पाहिले जाते. या सर्व धामधुमीच्या कालखंडात ज्या मराठा सरदारांनी आपल्या शौर्याची शिकस्त केली त्यात शिंदे घराणे अग्रस्थानी होते आणि पानिपतात गेलेली पत परत आणण्याचे महत्कार्य करणारे शिंदे होळकर यांचा इतिहास हा भव्य आणि उत्तुंग आहे. यातही शिंदे घराण्यातल्या महादजी शिंद्यांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी व पराक्रम अलौकिक असा आहे. महादजी शिंद्यांनी उत्तर हिंदुस्थान आपल्या कब्जात घेतला होता. मध्यंतरी ज्या गोवध हत्या बंदीवरून आपल्या देशात गदारोळ माजला होता ती बंदी महादजींनी १७८५ मध्ये शहाआलम या मुघल बादशहाला आपली कठपुतळी बनवून अंमलात आणली होती. मुघल बादशहा सत्तेत असूनही हा फतवा त्यांनी अमलात आणला होता यावरून महादजींचे दिल्लीवरील वर्चस्व लक्षात यावे. उत्तर भारताचा प्राण असणारा मध्य - पूर्वेचा भाग आपल्या टापाखाली ठेवणारे धोरणी राणोजी, सर्वांग जखमांनी भरलेले असतानाही बचेंगे तो और लढेंगे असं म्हणण्याची जिगर ठेवणारे दत्ताजी, वयाच्या १६ व्या वर्षी नजिबाच्या गुरुचे कुतुबशहाचे मुंडके जमदाडाच्या एका वारात तोडणारे अन पुढे पानिपतावर हौतात्म्य पत्करणारे जनकोजी, काळाची पावले ओळखून आपला विकास साधून घेणारे जयाजी व माधवराव, स्वातंत्रोत्तर काळात राजकारणात आपली पत राखणाऱ्या  विजयाराजे अन त्यांचे पुत्र माधवराव, अन आताच्या काँग्रेसमधील एक आशास्थान असलेले ज्योतिरादित्य शिंदे असा यांचा छोटेखानी परिचय देता येईल. ग्वाल्हेरचे संस्थानिक म्हणून ओळखले जात असलेल्या शिंदे घराण्याचा इतिहास सुरु होतो राणोजी शिंदयांपासून.....

बुधवार, ११ मे, २०१६

गोब्राम्हण - जुन्या वादाला नवी फोडणी !



"आजवर शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. ज्ञान देण्याची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे असल्याने त्यांना अभिप्रेत असलेला इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी होते, अशी प्रतिमा तयार करण्यात आली. आजही विशिष्ट भूमिका समाजासमोर मांडण्याचे आणि तरुणाईच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना मिळणारे यश अस्वस्थ करते", अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली आणि राज्यात एकच धुरळा उडाला.

मंगळवार, १० मे, २०१६

मराठ्यांच्या इतिहासातील भाऊबंदकी ... कोल्हापूर - सातारा गादी !


#१२जानेवारीचे दोन संदर्भ - एक अतिव सुखाचा तर एक भाऊबंदकीचा...
१२ जानेवारी हा जिजाऊ मांसाहेबांचा जन्मदिवस, ज्या जिजाऊनी शिवराय घडवले, स्वराज्याची आस जागवली अन एक भव्य दिव्य स्वप्न नुसते पाहिलेच नाही तर प्रत्यक्षात आणले त्यांचा जन्मदिवस म्हणजे तमाम मराठी माणसांचा आनंदोत्सव !! हा खरा सण, ज्यांनी आपल्या सर्वांचे स्वराज्य निर्मिले त्यांचा हा जन्मदिन !! त्यामुळे आजच्या या १२ जानेवारीचे महात्म्य कैक पटीने वाढले ! १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा (आजच्या बुलढाणा जिल्ह्यातले) इथे लखुजी जाधवरावांच्या घरी त्यांचा जन्म झाला अन सह्याद्रीपासून ते भीमा-गोदाच्या प्रवाहावर आनंदाचा रोमांच आला. जिजाऊ मांसाहेबांच्या जन्मामुळे १२ जानेवारीचा संदर्भ आत्यंतिक आनंदाचा होऊन गेला आहे. पण ज्या जिजाऊनी मराठ्यांच्या शौर्याचे बीज रोवले, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले ज्यांनी स्वराज्यनिर्मितीसाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या जन्मदिनाच्याच तारखेला ११० वर्षांनी मराठी स्वराज्यात दुही माजली, भाऊबंदकी झाली ! या दिवशी झालेल्या घटनेतून बोध घेऊन प्रत्येक मराठी माणसाने आपसातले वाद नक्कीच टाळले पाहिजेत नाहीतर १२ जानेवारीचा हा दुसरा संदर्भ आपल्याला आयुष्यभर अणकुचीदार दुहीचे भाले टोचवत राहतील....
काय झाले होते १२ जानेवारी १७०८ ला ? ह्याची माहिती घ्यायला आपल्याला इतिहासात जावे लागेल. पण नुसते मागे जाऊन चालणार नाही तर त्यातून आपण धडा घेतला पाहिजे तरच भाऊबंदकीचा लकडा आपला पिच्छा सोडेल ..

स्त्रीत्वाची कोंडी - 'आई' ! प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' पुस्तकाचा रसास्वाद ...



"जायची चार वाजताची वेळ होत आली. ती हट्टानं अधिकच बेभान झाली. मी जाणार नाही हं !- तिचा पक्का निश्चय. तिच्या लक्षात आलं, बाळाला हे सोडून मला नेणार. तिला तिचा कुक व 'तो' दोघांनी दोन्ही बखोट धरून बेडरूमच्या दारापर्यंत खेचून आणलं. तिने दोन्ही पायाचे पंजे उंबरयाला घट्ट टेकवून दोन्ही हात दाराच्या चौकटीला दाबून धरले. "मला बाळाला टाकून नाही जायचं...मी नाही जाणार." दोघांनी सारी त्यांची ताकद पणाला लावली.तिला बाहेर काढली अन अक्षरशः फरफटत ओढीत बाहेरच्या दारापर्यंत आणली. ते सारं पाहून मी जमिनीवर कोसळलेच. तिची गाडी जसलोकच्या गेटपर्यत पोहोचली अन ती कोमात गेली ती अखेरपर्यंत. तिला कृत्रिम लंग्जवर ठेवून, १३ तारीख उलटली आणी बाळाच्या बारश्यापासूनची त्याची स्वप्नं पाहणारी एक बाळवेडी 'आई' त्याला सोडून कायमची निघून गेली. दुःखाचा डोंगर कोसळला, बाळाला क्षणभरही पापणीआड न करणारी. आईपणाला अखंड आसुसलेली ही थोर आई तिच्या बाळासाठी फक्त एक स्वप्न बनून राहिली.....

सोमवार, ९ मे, २०१६

शहीद भगतसिंह आणि हिंदुत्व - एक विरोधाभास ...

"एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल,
भगतसिंह 
एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणार्‍या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे की ज्याक्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.

मंगळवार, ३ मे, २०१६

प्रेमस्वरूप आई - माधव ज्युलियन


प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.
चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

ही भूक पोरक्याची होई न शांत आई,
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही.
वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे,
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परि हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?
घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !

कंदहार - हिंदूकुश पर्वतरांगा . एक रोचक शोध - इतिहास ...


क़ीमत, क़ुरबानी हे जसे खालच्या बिंदूचे उर्दू उच्चारण असलेले उर्दू शब्द आहेत तसाच क़ंदहार हा शब्द देखील आहे. आपले काही इतिहास अभ्यासक आणि संशोधक कंदहार शहर - प्रांत म्हणजे आपल्या ग्रंथ पुराणात उल्लेख असलेले काही हजार वर्षापूर्वीचे गांधार हे राज्य समजतात. तसेच उर्दू - पर्शियन इतिहास अभ्यासक या शहराला सिकंदरने (द ग्रेट वॉरियर) स्थापन केलेले सिकंदरिया हे शहर मानतात. आजच्या घडीला हे शहर तालिबानी कट्टरवाद्यांचे प्रमुख आश्रयस्थान आहे. अफगाणीस्तानच्या दक्षिणेकडील हा सर्वात अस्थिर प्रांतापैकी एक आहे, याची दक्षिणेकडील सीमा पाकिस्तानच्या उत्तरेस लागून आहे. पश्तून ही इथली मुख्य भाषा आहे. कंदहार येथील उत्खननात सापडलेल्या चीजवस्तूंना मोठे ऐतिहासिक मुल्य आहे कारण त्याचा कालखंड !