मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे
काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे
हा स्नेह वंचना की काहीच आकळेना?
आयुष्य ओघळोनी मी रिक्त-हस्त आहे..'
कवयित्री शांता शेळके यांची ही कविता म्हणजे जगण्याचा अर्थ सांगणारी एक कैफियतच आहे. मनातले भाव आणि मनोमीत व्यक्त करण्याची संधी जगात खूप कमी लोकांना मिळते. आपण म्हणू तसे फासे जीवनाच्या सारीपाटावर कधीच पडत नसतात हे जवळपास साऱ्यांना आयुष्याच्या एका वळणावर कळून चुकते. आपल्या मनातलं ओठावर येत नाही. जे घडत राहतं ते आपल्याला उमगत नाही. जरी उमगलं तरी ते आपल्याला पटत नाही. अशीच प्रत्येकाची जीवनाविषयी तक्रार असते. पण साऱ्यांच्या बाबतीत असं घडत नाही. शांताबाई लिहितात की, 'कुणाच्याही पायी काटा रुतला तर त्यामुळे साहजिकच त्याचे आक्रंदन असणार आहे, मात्र माझ्या वाट्यास काटे न येता फुले आली. असे असूनही इतरांना जसे काटे रुततात तशी मला फुले रुतली !' हा एक अजब दैवयोग आहे अशी पुस्तीही त्या जोडतात.