सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

जीवनगाण्यांच्या कवयित्री - शांता शेळके.


'काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे
काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे
हा स्नेह वंचना की काहीच आकळेना?
आयुष्य ओघळोनी मी रिक्त-हस्त आहे..'
कवयित्री शांता शेळके यांची ही कविता म्हणजे जगण्याचा अर्थ सांगणारी एक कैफियतच आहे. मनातले भाव आणि मनोमीत व्यक्त करण्याची संधी जगात खूप कमी लोकांना मिळते. आपण म्हणू तसे फासे जीवनाच्या सारीपाटावर कधीच पडत नसतात हे जवळपास साऱ्यांना आयुष्याच्या एका वळणावर कळून चुकते. आपल्या मनातलं ओठावर येत नाही. जे घडत राहतं ते आपल्याला उमगत नाही. जरी उमगलं तरी ते आपल्याला पटत नाही. अशीच प्रत्येकाची जीवनाविषयी तक्रार असते. पण साऱ्यांच्या बाबतीत असं घडत नाही. शांताबाई लिहितात की, 'कुणाच्याही पायी काटा रुतला तर त्यामुळे साहजिकच त्याचे आक्रंदन असणार आहे, मात्र माझ्या वाट्यास काटे न येता फुले आली. असे असूनही इतरांना जसे काटे रुततात तशी मला फुले रुतली !' हा एक अजब दैवयोग आहे अशी पुस्तीही त्या जोडतात.

जगाच्या वाटेस काटे येतात आणि ते काटे पायी रुतल्यावर ओठातून वेदनेचे हुंकार बाहेर पडतात. अशा वेळी ज्यांच्या वाट्यात फुले असतील अशी माणसे जगाच्या नजरेत मोठी भाग्यवानच ठरतात. मात्र प्रत्यक्षात कधी कधी उलटे घडलेले असते, काळजातली वेदना अशा वेळी ओठावर आणता येत नाही. मग पायी रुतलेल्या काट्यापेक्षा खोल जखम काळजाला होऊन जाते, तिचा सलदेखील कुणाला दाखवता येत नाही ! किती कठीण आहे ही अग्निपरीक्षा ! मात्र शांताबाई पुढे लिहितात की, यात दैवाची किंवा अन्य कुणाची काहीही चूक नाही कारण दग्ध वेदनांचा हा शाप चिरंतन असून त्याची आता मी तमा बाळगत नाही.

या अमूर्त, निशब्द वेदनेवर काही उपाय करायला मी धजत नाही. कारण जगरीतीला ते धरून होणार नाही, (कारण आपल्याकडे स्त्रियांना व्यक्त होऊ देण्याची पद्धतच नाही) जरी मी असे धाडस केले तरी तो अनर्थ ठरवला जाईल आणि न केलेली चूक माझ्या माथी मारली जाईल. कारण आपल्याकडे कुणी तोंड बंद करून बुक्क्याचा मार सहन करत असेल तर सहन करणाऱ्यास आधी जाब विचारला जतो, आपल्याकडे निशब्द राहणे हा देखील गुन्हा समजला जातो. अशा वेळी मी जर माझे मन मोकळे करायचा प्रयत्न जरी केला तरी तो माझ्या अंगाशी येईलच.
शेवटी दिग्मूढ होऊन त्या विचारतात की, 'माझ्या अशा वर्तनाचे कारण आणि जगाचा माझ्या जीवनाविषयीचा दृष्टीकोन याला काय म्हणावे तेच कळत नाही. हा जगाचा स्नेह आहे की माझ्या जीवाची वंचना आहे हे सुद्धा मला कळत नाही इतकी मनाची अवस्था बिकट झाली आहे' असं त्या लिहितात.

कवितेची शेवटची ओळ म्हणजे या कवितेच्या मुकुटात रोवलेला शिरपेच आहे. जगण्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचे सार या पंक्तीत आहे. आधीच्या साऱ्या पंक्तीत उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचे सार्थ उत्तर या पंक्तीत आहे. जीवनात हा दृष्टीकोन ठेवावा अशी आदर्शवादी भूमिका त्या मांडत नाहीत तर आधी मनाची अवस्था मांडून त्यावर मार्ग म्हणून त्यांनी जीवनात काय निवडले याचा अलगद उलगडा त्या करतात, मग आपल्याला काटा आणि फुले यांचे संदर्भ अधिक स्पष्ट होतात. आयुष्यभर माझ्या वाट्यास जे जे काही आले ते मी मुक्तहस्ते जगाला देऊन टाकत आले प्रत्यक्षात ते काटेच होते ज्यांना मी फुलं समजत आले, आणि माझ्या वाटयाला जी फुले आली ती मी जगाला दिली. आणि आता ( आयुष्याच्या सांजवेळेस) मी रिक्त हस्त आहे मात्र मी त्यातच जीवनाचे सुख अनुभवून भरून पावले आहे ! 'आयुष्य ओघळोनी मी रिक्त-हस्त आहे.." या पंक्तीने शांताबाई आपल्याला अंतर्बाह्य हेलावून टाकतात आणि कवितेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.

कवयित्री शांता शेळके यांच्या कविता म्हणजे अथांग मनाचा गहिरा तळ शोधत जाणाऱ्या कवितांचा खजिनाच जणू ! नववधूच्या हळदओल्या अंगाच्या अल्वार कवितांपासून ते रणभूमीवरच्या सरदारांच्या वीररसाने ओथंबलेल्या जोशपूर्ण कवितांचा विशाल पट त्यांच्या कवितांत पाहायला मिळतो. 'माझा लवतोय डावा डोळा' अशी खट्याळ कविताही त्या सहज लिहितात. 'हा माझा मार्ग एकला' असं निर्वाणीचं भाष्य देखील तितक्याच गंभीरतेने करतात. 'ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा ?' असा हळवा प्रश्नही त्या विचारतात. 'काय बाई सांगू ? कसं ग सांगू ? मलाच माझी वाटे लाज’ असं अवखळ भावव्यक्तही होतात. 'सुकुनी गेला बाग, आठवणींच्या मुक्या पाकळ्यां पडल्या जागोजाग..' असं खिन्न मनाची उदासीनता जिवंत करणारं काव्यही त्या लिहितात. 'रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला..' अशी फक्कड लावणीही त्या लयबद्ध रचनेत गुंफतात. 'विजनामधले पडके देऊळ...' अशी चित्रमय कविता लिहिताना आठवणींच्या उदासपणा सोबतच भक्तीचा मार्ग दाखवितात. त्याचबरोबर 'गणराज रंगी नाचतो..' हे मनाला उत्फुल्ल करून जाणारे भक्तीगीतही ओघवत्या शैलीत लिहितात. 'ऋतु हिरवा ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा..' निसर्गाचं असं मनमोहक त्या करतात तर 'मी सृष्टीची सुता लाडकी मंद चमकते क्षितिजावरती ..' असं चांदणीचं गुणगान त्या गातात. मानवी मनाच्या विविध भावभावनांचे कल्लोळ अलगदपणे शब्दबद्ध करून त्यांना एकाच काव्यशेल्यात गुंफण्याचे कसब शांताबाईंना सहज अवगत होते.

'शूर आम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती ?
देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती !
जिंकावे वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं
लढुन मरावं, मरुन जगावं हेच अम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया-ममता-नाती !'
शांता शेळके यांनी लिहिलेले हे गीत शाळकरी मुलापासून ते उतारवयाकडे झुकलेल्या ज्येष्ठापर्यंत सकलांच्या अंगावर रोमांच उठवते. नसानसात जोश भरणारी ही कविता इतकी आवेशपूर्ण आहे की ऐकणाऱ्याच्या मनगटावरच्या शिरा फुगाव्यात ! 'मराठा तितुका मेळवावा' या चित्रपटात लता मंगेशकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली हृदयनाथ मंगेशकर यांनी अप्रतिम स्वरात हे गाणं गायले आहे.

शांताबाईंची एक कविता विजनवासात गेलेल्या देवळाचे चित्र आपल्या डोळ्यापुढे उभे करते. गावोगावी अशी चिरे ढासळलेली देखभाल नसलेली देवळे आढळतात त्याचं अगदी यथार्थ वर्णन या कवितेत आहे. ओशट ओल्या गाभाऱ्यातील शिवलिंगावर सुरु असणारी अखंड जलधारा याच हुबेहूब वर्णन त्या करतात. देवळाच्या भग्नतेचे दुःख हलके करतात.
विजनामधले पडके देऊळ
ओशट ओला तो गाभारा
काळोखातील शिवलिंगावर
अभिषेकाची अखंड धारा…

'ओलेत्या पानात' या कवितेतली शब्द निवड अप्रतिम आणि चपखल आहे. या शब्दांमुळे कवितेला एक नादमाधुर्य प्राप्त झालेय, कमालीची गेयता या कवितेत आलीय. कवितेचे रुपडे देखील देखण्या शब्दालंकाराने नटवे झालेय.
ओलेत्या पानात-
'ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले
डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले
साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची
डोहाळे या मातीला, सूर बोले थेंबातला
वाटा आता कस्तुरी, गंध उमले कोंबातला
थरारे मन, वारे नविन, सृजन रंग न्हाले
स्वप्न लहरे नवे कांचनी, धून हरवे रानातूनी
राधिका झाली बावरी, जन्म लहरे मुरलीवरी
तृप्ती निराळी, उजळीत डोळी, स्वर हे कुठून आले
हरपून दाही दिशा, ओढाळ झाल्या कशा
शिणगार करती ऋतू, प्रीत स्पर्शात जाई उतू
अभिसार न्यारा, हळवा शहारा, अरुपास रुप आले..'

शब्दाचे प्रयोजन आणि शब्दांचे महत्व विषद करताना शांताबाई लिहितात की, ' शब्द हे श्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणी आहेत आणि शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर प्रत्येक आनंद, आघात, आयुष्यातली अधिक उणी !' पण शब्द हे शस्त्र आहेत आणि त्यांचा वापर जपून करायचा आहे याची जाणीवही त्यांना आहे. त्यामुळेच त्या म्हणतात, ' तरीही शब्द हाताळताना असते (मी) सदैव साशंक कारण त्यांच्या सुक्ष्म नसा, त्यांच्याभोवती धगधगणारा जाळ, काळीज चिरीत जाणा-या त्यांच्या धारदार कडा ज्या अवचित करतात विद्ध, रक्तबंबाळ !" म्हणून शब्द जपून आणि तोलून मापून वापरावेत...
शब्द -
'तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबती
श्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणी
शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर
प्रत्येक आनंद, आघात, आयुष्यातली अधिक उणी
अजूनही जेव्हा मन भरुन येते अनिवार
करावे वाटते स्वत:ला शब्दांपाशी मोकळे
वाटते, त्यांनाच जावे सर्वस्वाने शरण
तेच जाणून घेतील आतले उत्कट उमाळे
तरीही शब्द हाताळताना असते सदैव साशंक
त्यांच्या सुक्ष्म नसा, भोवती धगधगणारा जाळ,
काळीज चिरीत जाणा-या त्यांच्या धारदार कडा
ज्या अवचित करतात विद्ध, रक्तबंबाळ
मी तर कधीचीच शब्दांची. ते कधी होतील माझे?
त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?..'

लुकलुकणाऱ्या चांदणीचं मोहक वर्णन करताना पाल्हाळ न लावता वा शब्दबंबाळ न होता नेमक्या शब्दांत त्यांनी चांदण्यांचे सौंदर्य व्यक्त केले आहे.
चांदणी -
'सायंकाळी क्षितिजावरती
मंदपणे मी करते लुकलुक
शांत राहुनी अपुल्या जागी
भवतालाचे बघते कौतुक !
अफाट वरती गगन पसरले
विशाल खाली पसरे धरती
मी सृष्टीची सुता लाडकी
चमकते क्षितिजावरती..'

तर ‘ऋतू हिरवा’ या कवितेत ऋतूंचे इंद्रधनुष्यी रंगातले चित्र त्या आपल्या शब्दकुंचल्यातून साकारतात. भिजुनी उन्हे चमचमती, मधुगंधी तरल हवा, मनभावन हा श्रावण, मदनाचे चाप अशी मनमोहक शब्दसंगती त्यांनी योजली आहे.
'ऋतु हिरवा ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा
भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा
मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा...'

स्वप्ने सर्वांनाच साद घालत असतात मात्र स्वप्नांची वाट नेमकी कशी आहे आणि ती कुठे जाते याचा खरा अंदाज कुणालाच नाही. मात्र 'या वाटेने गेल्यावर तरी आपले इप्सित तिथे असेल का' हा प्रश्न सर्वांनाच असतो. जिथे आपली ध्येयपूर्ती होईल अशा स्वप्नसृष्टीचे वर्णन अत्यंत मनोहर असे आहे. अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले असेल, जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्याला असेल, जिथे मिळे धरेला आभाळ वाकलेले, जिथे सावली उन्हास कवेत घेत असेल अशा त्या सृष्टीत माझ्या मनातला रावा असेल का प्रश्न शांताबाई इथे विचारतात.
'ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा ?
जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा
घे साउली उन्हाला कवळून बाहुपाशी
लागुन ओढ वेडी खग येति कोटरासी
एक एक चांदणीने नभदीप पाजळावा
स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे
स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा...'

'सुकुनी गेला बाग' या कवितेत शांताबाई आपल्याला आठवणींच्या रम्य प्रांतात फिरवून आणतात. मात्र त्यासाठी शब्द इतके बेमालूम वापरलेत की त्यातून अर्थविस्तार होऊन ते चित्रच डोळ्यापुढे उभे राहते. मुक्या पाकळ्या, विटली नक्षी, मुकेच पक्षी, पाऊल बुडाले, हरवल्या वाटा अशी नेटकी विशेषणे त्यांनी इथे वापरली आहेत.
आठवणींच्या मुक्या पाकळ्यां पडल्या जागोजाग
आज फुलांतुन सुगंध उडले
पाचोळ्यातच पाऊल बुडले
जुन्या हरवल्या पाउलवाटा, कसा काढणे माग ?
त्या तरुखाली एकामेकां
दिल्याघेतल्या आणाभाका
पानांसंगे आशा जाळीत ये ग्रीष्माची आग
पालवीतली विटली नक्षी
झाडांवरती मुकेच पक्षी
गीत गळ्यातच गुदमरले त्या पुन्हा न येई जाग

शांताबाईंची कोळीगीते कथाप्रवण आहेत, त्यातल्या कथा उत्कंठा वाढविणाऱ्या आहेत त्यामुळे त्याला वेगळीच अनुभूती प्राप्त होते. तुफानवारं सुटल्यानंतर आपल्या डोलकराला साद घालणाऱ्या कोळीणीची आर्तता मनाला भिडणारी आहे, डोळ्यात पाणी आणून ती म्हणते की, 'डोलां लोटीला पान्याचा पूर संबाल संसार सारा..' या गाण्याला सुरसंगीताचा अप्रतिम साज चढवल्याने ते अत्यंत श्रवणीय झालेय.
माज्या सारंगा, राजा सारंगा
डोलकरा रं धाकल्या दीरा रं
चल जावया घरा !
आज पुनवा सुटलंय दमानं
दरियाच्या पान्याला आयलंय उदान
पिऊन तुफानवारा
शीड फाटलं धावतं पाठी
तुटलंय्‌ सुकानू मोरली काठी
फेसाल पान्याचा घेरा
कोलीवारा रं राहीला दूर
डोलां लोटीला पान्याचा पूर
संबाल संसार सारा

शृंगाररसाचा अतिरेक न करता देखण्या ढंगाची लावणी कशी लिहावी याचं उत्तम उदाहरण म्हणून शांताबाईंच्या लावणीकडे निर्देश करता येईल. आपल्या साडीचं मनमोहक वर्णन करतानाच आपल्या प्रितमास साडीला हात लावू नको असं लाडे लाडेचं सांगणं अगदी मधाळ शैलीत त्यांनी मांडलंय. यातला ठेका ताल धरायला लावणारा आहे. काव्यरचनेत लावणीचा ठसकेबाजपणा आहे, अगदी कोरीव रेखीव असं हे गाणं आजही रसिकप्रिय आहे.
रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलयेलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
जात होते वाटंनं मी तोर्‍यात
अवचित आला माझ्या होर्‍यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला ?
हात नगा लावू माझ्या साडीला !
भीड काही ठेवा आल्यागेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
चित्रपट - मराठा तितुका मेळवावा

विहीणबाई विहिणबाई उठा आता उठा
भातुकलीचा सार्‍या तुम्ही केला चट्टामट्टा !
पसाभर शेंगदाणे, पसाभर गूळ
एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ ?
खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा !
कुठुन मेलं बाहुलीचं लग्‍न काढलं आम्ही ?
विहीण म्हणून नशिबी आलात हो तुम्ही !
बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढा मोठा !
सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो
भिकार्‍यांशी नातं जोडुन बसलो !
वरमाईचा पोकळ नुसता पाहून घ्यावा ताठा !
बडबडगीताच्या चालीवर आधारित भातुकलीच्या विवाहप्रसंगातलं लोकगीतही शांताबाईंनी मोठ्या तन्मयतेने लिहिले आहे. त्याला तितकीच रसिकमान्यताही मिळाली ! या गाण्याला गाताना आजही बालपणातला आनंद अनुभवता येतो.

'हा खेळ सावल्यांचा' या चित्रपटासाठी लिहिलेल्या गीताने लोकप्रियतेचे परमोच्च शिखर गाठले होते. कोळीगीतातली लयबद्ध गोडी हे या गीताचं विशिष्ट्य ठरावं. या गीतात देखील कथात्मकतेची विण आहे, तिचा बाज प्रश्नोत्तर स्वरूपाचा आहे. लडिवाळीकतेच्या अंगाने जाणारे हे एक युगलगीत आहे, ज्यात ते दोघेही एकमेकासाठी आसक्त झालेयत अन निसर्गाला साक्षीस ठेवून ते साद घालताहेत.
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पान्यावरी बंदराला करतो ये जा !
आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमालता वार्‍यानं घेतंय झेपा
नथ नाकान साजीरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलिवार्‍याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतंय्‌ मौजा

हिंदी सिनेमा वा काव्यात विदाईगीत म्हणून एक स्वतंत्र उपप्रकारच अस्तित्वात आहे, मराठीत तो कमी प्रमाणात हाताळला गेलाय. या आशयाच्या ज्या काही मोजक्या कविता लिहिल्या गेल्यात त्यात या कवितेचे स्थान फार वरचे आहे.
दाटून कंठ येतो ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके, सुखाने !
हातात बाळपोथी ओठांत बाळ भाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनी मी त्या गोड आठवाने !
बोलांत बोबडीच्या संगीत जागवीले
लयताल सूरलेणे सहजीच लेववीले
एकेक सूर यावा नाहून अमृताने
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे !
घेऊ कसा निरोप ? तुटतात आत धागे
हा देह दूर जाता मन राहणार मागे !
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्यापरी अता मी येथे फिरून येणे
सासरी चाललेल्या आपल्या कन्येस निरोप देणाऱ्या पित्याच्या मनातील भावनांचा बंध मोकळा करून देणारी ही कविता प्रत्येक मातापित्यास आणि त्यांच्या कन्येस जीवापाड प्रिय आहे याचे कारण या गीतातील सहजता ! अगदी सहजपणे एका पित्याचे दुःख या कवितेत त्यांनी मांडले आहे. मात्र त्याचबरोबर तिला आशीर्वादही दिला आहे. सुखदुःखाच्या संमिश्र भावनांचा हा सुरेल संगम आपल्या काळजाला भिडल्याशिवाय राहत नाही.

काय बाई सांगू ? कसं ग सांगू ?
मलाच माझी वाटे लाज
काही तरी होऊन गेलंय आज !
उगीच फुलुनी आलं फूल
उगिच जिवाला पडली भूल
त्या रंगाचा, त्या गंधाचा
अंगावर मी ल्याले साज
काही तरी होऊन गेलंय आज !
जरी लाजरी, झाले धीट
बघत राहिले त्याला नीट
कुळवंताची पोर कशी मी
विसरुन गेले रीतरिवाज ?
काही तरी होऊन गेलंय आज !
सहज बोलले हसले मी
मलाच हरवुन बसले मी
एक अनावर जडली बाधा
नाही चालला काही इलाज
काही तरी होऊन गेलंय आज !
प्रेम भेटीस अधीर झालेल्या तरुणीच्या भावविश्वाचा अचूक वेध घेणारी ही कविता नजाकतदार शब्दसौंदर्याच्या लेण्यात अगदी अल्वारपणे रेखाटली आहे. आतुरलेल्या मनाचे उत्कट विलोभनीय चित्र या कवितेत चितारले आहे. सहज बोलले अन मलाच हरखून बसले अशी साधी पण अर्थपूर्ण रचना असलेली ही कविता भावगीतांच्या काळापासुन ते आजच्या डिजिटल युगापर्यंत तितकीच लोकप्रिय आहे.

गणराज रंगी नाचतो, नाचतो
पायि घागर्‍या करिती रुणझुण
नाद स्वर्गि पोचतो !
कटि पीतांबर कसून भर्जरी
बाल गजानन नर्तनास करी
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो !
नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणावादन
ब्रह्मा धरितो तालही रंगुन
मृदंग धिमि वाजतो !
देवसभा घनदाट बैसली
नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो !
नादयुक्त शब्दरचना कशी असावी याचे हे गीत आदर्श उदाहरण ठरावे. यातल्या प्रत्येक शब्दाला एक अनोखा झंकार आहे, यातली गेयता कर्णमधुर ठरावी अशी आहे कारण याची टिपेला जाणारी स्वररचना होय. त्याचबरोबर बालगणेशाचा ह्रदयंगम कौतुक सोहळा चपखल शब्दात अवीट गोडीच्या चालीत इथे रचला आहे. या गीतावर आपल्या नकळत आपली मान डोलावते.

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
सिंदुरचर्चित ढवळे अंग, चंदनऊटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया
गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्‍ने नेसी विलया
गणेशोत्सवात हे गाणं ऐकलं नाही असं सांगणारा माणूस अख्ख्या महाराष्ट्रात सापडणार नाही. शांताबाईंनी लिहिलेल्या या भक्तीगीताने मराठी माणसाचे खुद्द गणेशासोबतचे नाते दृढ केले आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. इतकं हे गाणं गणेशोत्सवाशी एकरूप झाले आहे.

पैठणी-
फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
अद्भुत लयबद्ध शब्द आणि मनाला भिडणारा आशय त्या साध्या कवितातून देखील समर्पकरित्या कसा मांडत याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून 'पैठणी' या कवितेकडे पाहता येईल.

जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे !
सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला
हृदये हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्यामाझ्या श्वासांमधुनी आकारा यावे
जीवनगाणे गातच रहावे !
चिमणाबाई हिरमुसली, गाल फुगवुनी का बसली ?
सान बाहुली ही इवली, लटकीलटकी का रुसली ?
रुसलीरुसली, खुदकन हसली, पापे किति घ्यावे !
जीवनगाणे गातच रहावे !
मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या मातीला, या प्रीतिला हितगुज सांगावे
जीवनगाणे गातच रहावे !
'आपली माणसं' या चित्रपटासाठी लिहिलेलं शांता शेळके यांचे हे गाणे आपल्याला रसाळ जीवनाचा अर्थपूर्ण संदेश देऊन जाते.
प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील विवाहाचा मंगल क्षण आपल्या समोर उत्कटतेने मांडताना त्या सहज लिहितात- 'चूल बोळकी इवली इवली भातुकलीचा खेळ ग
लुटुपुटीच्या संसाराची संपत आली वेळ गं..'

इतक्या विविध विषयावरची आशयघन सहजसोपी व तितकीच रसिकप्रिय काव्यरचना मराठी कवितेत अन्य कुणा कवयित्रीच्या हातून प्रसवली गेली नाही. यात शांताबाईंच्या कवितेची वेगळी उंची दिसून येते.
आपल्या अभिजात प्रतिभेच्या जोरावर मराठी साहित्यात स्वतःचं उत्तुंग स्थान निर्माण करणाऱ्या शांता शेळके प्रत्येक रसिकाला वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर वेगळ्या अवस्थेत भेटत गेल्यात ; बाल्यावस्थेत बडबडगीते, तारुण्यात प्रेमगीते, पोक्तवयात भावगीते आणि उतार वयात भक्तिगीते - भावकविता असा त्यांचा प्रत्येकाशी संवाद होत गेलाय. कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य, चित्रपटगीते, समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केलेल्या शांता शेळके ह्या वृतपत्र संपादक तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून आजच्या पिढीतही विशेष प्रसिद्ध आहेत. १२ ऑक्टोबर १९२२ रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर इथे त्यांचा जन्म झाला होता. पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले. त्यांचं 'धूळपाटी' हे पुस्तक म्हणजे कोष्टी समाजातली एक मुलगी पुढे "थोडी लेखिका, थोडी प्राध्यापिका, थोडी कवयित्री... आणि थोडीथोडीशी पण इतर भरपूर काही" घडण्यात एका मोठ्ठ्या सामाजिक कालखंडाचा जो सहभाग आहे त्याचं चित्रण आहे. स्वतः शांताबाई त्याला आत्मचरित्रं म्हणत नाहीयेत. हे असं "थोडी ... थोडी"चे उल्लेख त्याच पुस्तकातल्या मनोगतात आहेत.

आपल्या काव्यप्रतिभेने सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या शांताबाईंनी 'डॉ. वसंत अवसरे' या टोपण नावाने देखील गीते लिहिली आहेत. त्यांची बालसाहित्य संपदाही विपुल आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी आशयसंपन्न गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’, ’चौघीजणी’ त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि त्यांची पुस्तके. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत. वाचकाच्या मनावर पकड घेऊन त्याला त्यात गुंतवून ठेवण्याची क्षमता त्यांच्या गद्य साहित्यात आहे. त्यांच्या बालपणीच्या आठवणी कुणालाही मोहून टाकणाऱ्या अशा आहेत. भाषांतराकडे बघण्याचा शांता शेळके यांचा दृष्टीकोन त्यांची वैचारिक प्रगल्भता दाखवतो, भाषांतर हे केवळ अर्थार्जनापुरते सीमित नसून त्यातून स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकता येते असं प्रांजळ मत त्या व्यक्त करतात. जपानी हायकुंचे त्यांनी केलेले भाषांतर अत्यंत गाजले आणि मराठी साहित्यात एक नवे दालन त्याने खुले केले. हायकू हा काव्यप्रकार त्यांनी ’पाण्यावरच्या पाकळ्या' या नावाने मराठी रसिकांच्या ओंजळीत सुपूर्द केला. या काव्यपाकळ्या लोकांना इतक्या आवडल्या की जपानी हायकू कधी मराठी झाल्या अन लोकांनी त्याचे 'मराठी हायकू' असे नामाभिधान कधी केले हे कुणाला उमगलेच नाही. ’पावसाआधीचा पाऊस’, ’आनंदाचे झाड’, ’वडीलधारी माणसे’ हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात. शांताबाई आपल्या गाण्यात सदैव नवनवीन शब्दांचा वापर करायच्या त्यामुळे त्यांच्या कविता वाचन करणाऱ्यांचा शब्दसंग्रह आपसूकच समृद्ध होत गेला. शांता शेळकेंना काही काळ, गरजेपोटी गाईड्स लिहावी लागली याचा इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो. त्याला त्यांनी " लेखनकामाठी" हा शब्द योजला होता अन 'त्यातूनदेखील अभ्यासूवृत्तीत वाढ झाली' असं त्या अगदी कौतुकाने म्हणत !

शांता शेळकेंनी मराठी साहित्य समृद्ध करताना विविध साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले. सर्वच प्रकारांतून त्यांनी आपले शब्दभांडार रसिकांपुढे खुले केले असले तरी प्रत्येक निर्मिकाचा त्याच्या एखाद्या कलाकृतीवर विशेष जीव असतो त्याप्रमाणे 'कविता लेखन' हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार होता. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी होती ; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह होता. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना नवचेतना दिली, प्रेरणा दिली. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात. गीतांचे लावण्या, कोळीगीते असे विविध प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले आहेत. काव्यातल्या नानाविध छटा साकारताना त्यांच्यातले शैशव त्यांनी मोठ्या कुशलतेने शब्दात चितारले आहे, त्यांनी लिहिलेली बडबडगीते, बालगीते अनेकांना आपल्या रमणीय बालपणीच्या कालखंडात घेऊन जातात. "किलबिल किलबिल पक्षी बोलती", "विहीणबाई विहीणबाई" अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या शांता शेळके आणि प्रेमकविता व भक्तीगीते लिहिणाऱ्या शांता शेळके ह्या एकच आहेत का असा प्रश्न पडावा इतकं त्या आपल्या काव्यप्रकाराशी तादात्म्य पावल्या आहेत. शांताबाईंनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. १९९६ या वर्षी आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. शांता शेळके यांच्यावर लिहिलेली पुस्तके आठवणीतील शांताबाई (संपादक - शिल्पा सरपोतदार), शान्ताबाईंची स्मृतिचित्रे (संपादक - यशवंत किल्लेदार) आवर्जून वाचण्यासारखी आहेत. १९९६मध्ये गदिमा गीतलेखन पुरस्कार व ’मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ या गीतासाठी त्यांना सुरसिंगार पुरस्कार मिळाला होता तर 'भुजंग' चित्रपटातील गीतासाठी केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार मिळाला होता. या व्यतिरिक्त शांता शेळके यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची संख्याही लक्षणीय आहे.

आज शांता शेळके आपल्यात नाहीत मात्र त्यांच्या अजरामर काव्यपंक्तींचा चैतन्यमय दरवळ आपल्या स्मृतींच्या कुपीत सदैव बहरलेला आहे. 'असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे..' असं चिरंतन चैतन्याचे गीत या आस्थेतूनच त्यांनी लिहिले असावे असे राहून राहून वाटते...

- समीर गायकवाड .

१९ टिप्पण्या:

  1. अप्रतिम लेख! सुंदर माहिती! शांता शेळके यांच्या उत्कृष्ट रचना पुन्हा वाचायला मिळाल्या..धन्यवाद!
    - प्रा.डाॅ.गणेश सोनवणे

    उत्तर द्याहटवा
  2. अचानक सापडलेला माहितीचा भांडार, धन्यवाद समीरजी

    उत्तर द्याहटवा
  3. शांताबाई शेळके म्हणजे अखंड , ओतप्रोत भरलेली प्रतिभा !! त्यांच्या मोजक्या ,नेमक्या कविता निवडून त्यावर इतके सुरेख भाष्य करण्याचे जणू शिवधनुष्य च पेलले आहे तुम्ही समीरजी !! अप्रतिम !!

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच सुंदर शब्दात कवियत्री शांताबाई शेळके यांचा जीवनपट आणि साहित्यिक प्रवास उलगडून सांगीतला.
    धन्यवाद सर.

    उत्तर द्याहटवा
  5. खूपच सुंदर 👌👌👌👌
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    उत्तर द्याहटवा