रविवार, १४ मार्च, २०२१

बॉक्स ऑफिसची देवी - जय संतोषी माँ


ऐंशी नव्वदच्या दशकात पत्रव्यवहार तगून होता. पोस्टकार्ड, अंतरदेशीय यांचा मुबलक वापर व्हायचा. तातडीच्या निरोपासाठी तार जिवंत होती. मनीऑर्डर देखील वापरात होती. तेंव्हा ठराविक पद्धतीचा पत्रव्यवहार जास्ती चाले. कुटुंबातल्या परगावी गेलेल्या सदस्याने पाठवलेली प्रेमपत्रे, मित्रांची - प्रेमाची पत्रे, ख्याली खुशालीची पत्रे, कामकाजाची, शासनाची पत्रे असा सगळा मामला होता. यात काही आगंतुक पत्रे देखील असत. आपल्या घरच्या लोकांनी कुठं कपडे खरेदी केली असेल तर त्या दुकानदाराने आपली आणि आपल्या खिशाची आठवण काढलेली पत्रे असत, नानाविध ऑफर्सची पत्रे असतं. अगदी 'फाडफाड इंग्लिश बोला'  पासून ते 'घरबसल्या ज्ञान आणि पैसे कमवा' अशीही आवतने त्यात असत. पैकीच एक पत्र संतोषी मातेच्या भक्ती परीक्षेचं असे ! ज्यांना हा प्रकार ठाऊक नाही त्यांना त्यातली मजा कळणार नाही. आपल्यावर अधिकचा जीव असणाऱ्या कुणी तरी एका आपल्याच हितचिंतक व्यक्तीने वा परिचिताने ते पाठवलेलं असे. संतोषी मातेचा कृपाप्रसाद हवा असेल तर अशाच मजकुराचे पत्र आपल्या परिचयाच्या एकवीस व्यक्तींना पाठवावे अशी विनंती त्यात असे, असं न करता पत्र फाडून फेकून दिल्यास मातेचा प्रकोप होईल अशी धमकी देखील त्यात असे. पत्राच्या सुरुवातीसच 'जय संतोषी  माँ' असे लिहिलेलं असल्याने नंतर नंतर ही पत्रे लगेच ओळखता येऊ लागली आणि पूर्ण न वाचता फेकून दिल्याचं, फाडल्याचं समाधान लोक मिळवू लागले. ही जय संतोषी माँ पत्रे महिन्यातून किमान एकदोन तरी येत असत, इतका त्यांचा पगडा होता. हे खूळ कुणी काढलं हे सांगता येणार नाही मात्र संतोषी मातेला देशभर कुणी आणि कधी प्रकाशझोतात आणलं हे निश्चित सांगता येईल. त्यासाठी चार दशके मागं जावं लागेल.

ते साल एकोणीसशे पंच्यात्तरचं असावं. सोलापूरमधील प्रभात चित्रपटगृहात जय संतोषी माँ चित्रपट झळकला होता. बहुधा वर्षअखेरचा डिसेंबर महिना होता. तेंव्हा आतासारखे चित्रपट रिलीज होण्याआधी गाणी हिट झालेली नसत. माऊथ पब्लिसिटी आणि रिपीट व्हॅल्यूवर सगळी भिस्त असे. स्टारकास्टला खूप महत्व होतं. संगीत आणि गाणी भाव खात. कथांचे काही साचेबद्ध पॅटर्न तेंव्हा अस्तित्वात होते. देश स्वतंत्र होण्याआधी काही मोजके जॉनर अस्तित्वात होते. जसे की पौराणिक, आदर्शवाद, रोमँटीसिझम, देशभक्ती, मेलोड्रामा यांचाच बोलबाला होता. सत्तरच्या दशकानंतर पौराणिक सिनेमांचे अस्तित्व जवळपास नावाला उरलं होतं. जे काही पौराणिक सिनेमे बनत ते तिकीटबारीवर चालत नसत. त्याउलट सूडकथा, देमार हाणामारीच्या कथा, नवीन दृष्टीकोन असणाऱ्या प्रेमकथा यांच्या जोडीलाच कलात्मक सिनेमाची सशक्त भर पडली. या नव्या बदलाचं फिल्म इंडस्ट्रीने आणि रसिक प्रेक्षकानेही मनापासून स्वागत केलं. दरवर्षी एकाहून एक भारी चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलीवूडचं नाव चिटकण्याच्या आधीचा हा काळ होता. त्यातही एकोणीसशे पंचाहत्तरचे वर्ष खूप महत्वाचे होते. काही माईलस्टोन या वर्षी आले जे पुढे जाऊन ट्रेंडसेटर ठरले. यातली काही महत्वाची नावं ही गोष्ट ठळक करतील. हिंदी सिनेमाचा मुकुटमणी ठरलेला शोले याच सालचा. अमिताभचं बस्तान बसवणारा 'दिवार', राजकीय भाष्ये करणारा 'आंधी', उत्तम कुमार शर्मिला टागोरचा हळुवार सॉफ्टलव्ह असलेला 'अमानुष', ऋषीकपूरचा 'रफ़ूचक्कर', अमिताभचा एकल नायक असणारा 'जमीर', राजेशखन्नाचा 'प्रेम कहानी', रंगील्या फिरोजखानचा 'धर्मात्मा', नासिरुद्दीन शाहचा 'निशांत', हलकी फुलकी कॉमेडी असलेला 'चुपके चुपके', जया भादुरीचा क्लासिक 'मिली', लक्ष्मीचा हॉट यंग 'ज्युली', अमोल पालेकरांचा 'छोटीसी बात', मनोजकुमारचा 'संन्यासी', धर्मेंद्रचा 'प्रतिज्ञा', शशीकपूरचा 'चोरी मेरा काम', संजीवकुमारचा 'उल्झन', जितेंद्रचा 'खुशबू', सचिनचा 'गीत गाता चल' यांनी हे वर्ष गाजवले. या सर्व चित्रपटांच्या जातकुळीशी भिन्नत्व असणारा पौराणिक कथेवर आधारित 'जय संतोषी माँ' याच वर्षी रिलीज झाला. खरं तर रिलीज होईपर्यंत कुणी याला गणलं देखील नव्हतं. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जे घडलं तो चमत्कारच होता जणू ! बॉक्स ऑफिसवर त्या साली 'शोले'नंतर सर्वाधिक कमाई या सिनेमाने केली आणि चित्रपट तज्ज्ञांनी तोंडात बोटे घातली.

प्रभातमध्ये 'जय संतोषी माँ' लागला तेंव्हा त्याचा फारसा बोलबाला झालेला नव्हता. मात्र पहिल्या आठवड्यानंतर चित्रपटाने वेगळाच रंग दाखवला. मूळात सोलापूर हे गिरणगाव. इथे निम्नवर्गीय, कनिष्ठवर्गीय कर्मचारी उपजीविका असणारे लोक अधिक. फुरसतीचा वेळ, बिनकामाची मुबलक माणसं यामुळे शहरात उत्सवप्रियता पूर्वीपासून सुखैनैव नांदते. सगळेच उत्सव, जयंत्या मयंत्या, सणवार, इव्हेंट्स इथे दणक्यात साजरं होण्याचे हेच कारण आहे. त्यातही लोकांचा कल गणेशोत्सवापेक्षा नवरात्रोत्सवाकडे जास्त. अवघ्या काही किमी अंतरावरील तुळजाभवानी आणि शहराची ग्रामदेवता असलेली रूपाभवानी याचा प्रभाव यामागे असावा. तर हा हा म्हणता जय संतोषी माँ ची ख्याती या देवीभक्तात वाऱ्याच्या वेगाने पसरत गेली आणि बघता बघता प्रभात टॉकीजचं रूपांतर देवीभक्तांच्या समूहात, एका भक्तीरसाने ओथंबलेल्या पब्लिकच्या लाटेत झालं. या भक्तीत नानाविध प्रकार होते.

सत्यवती नावाच्या देवीभक्त महिलेची कथा या चित्रपटात होती. नारद मुनी तिच्या भक्तीची परीक्षा घेतात. देवी संतोषी माँ अखेरीस तिच्या मदतीला धावून येते आणि तिला त्रास देणाऱ्या दुर्जनांचा नाश होतो असं साधंसोपं कथानक होतं. कानन कौशल हा चेहरा या सिनेमामुळे घरोघरी प्रसिद्ध झाला. अनिता गुहाने संतोषी मातेची भूमिका केली होती, तिला हा जॅकपॉट ठरला. सत्यवतीचा पती बिरजू मरण पावल्याची आवई उठवली जाते. सत्यवतीच्या सासरची मंडळी तिचा छळ मांडतात. मात्र डोळे उघडताच बिरजू परततो, तो श्रीमंत होऊनच ! यासाठी सत्यवतीचे संतोषी मातेचे शुक्रवारचे व्रत कामी येते. सत्यवतीच्या व्रत उद्दीपन सोहळ्या दिवशी तिचे वैरी अखेरचा प्रयत्न करून पाहतात मात्र त्यात त्यांना तोंडघशी पडावे लागते कारण साक्षात देवी संतोषीच तिच्या बाजूने उभी राहते. नारद सत्यवतीला आशीर्वाद देतात आणि संतोषी मातेची महती मान्य करतात. पुराणकथा वाटावी ही कथा होती. पुराणातील वांगी लोकांना आजही आवडत असल्याने आणि श्रद्धा अंधश्रद्धा यातली रेषा धूसर असल्याने अशा घटना घडू शकतात यावर आपली मंडळी चटकन विश्वास ठेवतात. अगदी लो बजेट चित्रपट असल्याने सेट अत्यंत किरकोळ आणि तकलादू होते, वेशभूषेपासून ते सर्वच तांत्रिक बाजूत अत्यंत सामान्य दर्जाचं काम होतं. मात्र एक बाजू कमालीची उजवी होती. ती म्हणजे याचं कर्णमधुर संगीत आणि अवीट गोडीची गाणी !

पडद्यावर गाणी सुरु झाली की थियेटरमध्ये महिलावर्ग ढसाढसा रडू लागे. चित्रपटाचा गवगवा झाला नव्हता तोवर काही विशेष बाब नव्हती मात्र संतोषीमातेची ख्याती वाढल्यानंतर दृश्य बदलले. महिला वर्ग शेकडोंच्या संख्येने येऊ लागला. स्टॉल, फर्स्ट क्लास, ड्रेस सर्कल, बाल्कनी सगळीकडे महिलांचं वर्चस्व. तुलनेने पुरुष अगदी कमी. स्त्रियांसोबत पोरांचं लेंढार असणं क्रमप्राप्त होतं. देवीची महती सांगणारी ती मधुर गाणी सुरु झाली की इकडे पब्लिकमध्ये कुणाच्या तरी अंगात देवी 'आलेली' असे. सुरुवातीला हा प्रकार तुरळक व्हायचा, नंतर याला घाऊक स्वरूप आलं. साथ पसरावी तसं एकी पाठोपाठ एकेकीच्या अंगी कथित रित्या देवी संचारू लागली. आपल्या लाईनमधील अमुक एक सीट नंबरवरील बाईच्या 'अंगात आलं' म्हटल्या बरोबर बायका तिच्या भवती गोळा होऊ लागल्या, तिथेच तिच्या पाया पडू लागल्या. थियेटरमध्ये परड्या, जळते कोटंबे, पोत, दिवटी, लंगर, रुद्राक्षमाळा आणि कवड्याच्या माळा सारं काही दिसू लागलं. कुंकवाचा सडा पडू लागला. जोगते येऊ लागले आणि हुंकार भरू लागले. हे सगळं सुरु झालं की सिनेमा राहायचा बाजूला आणि हाच 'शो' जारी राहायचा. डोअर कीपर मंडळींसाठी हे एक टार्गेट होऊन बसलं. संतोषी माँ सुपरहिट झाला, त्याची सिल्व्हर ज्युबिली साजरी झाली. पोस्टरवरच्या देवीला हारांचा गराडा पडला !

अजूनही सोलापूरमधल्या कुठल्याही नवरात्र महोत्सवाच्या मांडवात 'जय संतोषी माँ'ची गाणी लागली नाहीत असं होत नाही. अश्विन महिन्याच्या गारठ्यात भल्या पहाटे उठून रुपाभवानीच्या दर्शनासाठी पायी निघालेले भक्तगण आणि अंधारल्या भवतालाच्या निरव शांततेत मंद आवाजात ऐकू येणारी 'जय संतोषी माँ'ची गाणी हे चित्र काळजावर कोरलेलं आहे, साडेचार दशके झाली तरी त्यात तसूभर बदल झाला नाही. गाण्यांवर आणि फिल्मी प्रतिमेवर इतकं प्रेम क्वचित पाहायला मिळतं. जमाना बदलला संपर्काची साधने बदलली, पत्रे अंतर्देशीय तार सगळं इतिहासजमा झालं. संतोषी मातेची ती एकवीस जणांना फॉरवर्ड करायची पत्रेही काळाच्या ओघात लुप्त झाली मात्र व्हॉट्सअपवर कधी कधी याचअर्थाचा मजकूर असणारा मेसेज येतो तेंव्हा आधी त्या सुवर्णकाळातील ऐतिहासिक सिनेमाचीच आठवण होते. मेसेज डिलिट होतो कारण ही एक अंधश्रद्धाच असते मात्र भल्याभल्यांना टक्कर देऊन आपलं नाव सुवर्णाक्षरात गोंदवण्यास भाग पाडणाऱ्या संतोषी मातेला बॉक्स ऑफिसची ऑल टाईम हिट देवी ही उपाधी लाभली हे एक वास्तव होतं. खरं तर ते एक अद्भुत कोडंच होतं ज्याचा नेमका अर्थ अजूनही कुणाला सापडला नाही.

- समीर गायकवाड

२ टिप्पण्या:

  1. या चित्रपटानंतर उत्तर भारतात संतोषी मातेची मंदिरे बांधली गेली होती असे फार पूर्वी वाचनात आले होते.

    उत्तर द्याहटवा