गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

न झुकलेला माणूस..


चुकीच्या आणि अन्याय्य गोष्टीपुढे न झुकण्यासाठी निडर बाणा हवा, मुख्य म्हणजे कोणतीही किंमत मोजायची तयारी हवी. मग तो विरोध, तो संघर्ष आभाळाहून मोठा होतो. ही हकीकत अशाच एका सामान्य माणसाची. 

तो एक सामान्य लोहार होता. तो काही शूरवीर योद्धा नव्हता ज्याला विविध शस्त्रे चालवता येत होती. तो एक सामान्य माणूस होता, तरीही त्यानं एक असं काही असामान्य कर्तृत्व करून दाखवलं की त्याच्या मायदेशी बेलारूसमध्ये आजही त्याच्या पुतळ्यापुढे लोक नतमस्तक होतात. त्याच्या स्मारकाचं नाव अगदी विशेष आहे - 'द अनकॉन्कर्ड मॅन' - शरण न गेलेला माणूस ! न झुकलेला माणूस !

रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

पौष...

हरेक मराठी महिन्याला एक वलय आहे. त्याची स्वतःची अशी महती आहे मात्र पौष त्याला अपवाद आहे. पौषची कुख्यातीच अधिक आहे.
चैत्रपालवी असते. वैशाखवणवा असतो. ज्येष्ठाचं व्रत असतं.
आषाढाला पर्जन्योत्सुकतेचा मान लाभलाय.
श्रावणमासाची हिरवाई जितकी ख्यातनाम आहे तितकेच धार्मिक महत्वही आहे.
भाद्रपदातला गणशोत्सव शहरांचा चेहरा झालाय तर भादवा गावकुसासाठी अजूनही महत्वाचा आहे.
अश्विनची नवरात्र विख्यात आहे. कार्तिक दिवाळीमुळे अमर आहे.
मार्गशीर्षातली व्रत वैकल्ये अजूनही भाव खाऊन आहेत.
माघी वारीचं महात्म्य वाढतंच आहे.

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

मौनातलं तुफान...

ना तो तिच्याकडे कधी जातो नि ती त्याच्याकडे कधी येत नाही
दोघे कधी भेटत नाहीत की बोलत नाहीत
तरीही त्यांच्यात असतं एक नातं, बेशक त्याला नाव मात्र कुठलं नसतं
भेटलेच जरी दोघे कधी तरी नजरेस नजर देत नाहीत
खरेतर दोघांच्या नजरा शोधत असतात परस्परांना

समोर येताच मात्र डोळ्यांना डोळे त्यांचे भिडत नाहीत
एकमेकाचे लक्ष नसताना चोरून मात्र पाहत असतात
दोघांपैकी जो आधी निघून जातो त्याचे डोळे असतात पाणावलेले
मागे थांबलेला डोळे भरून पाहतो त्या पाठमोऱ्या देहाकृतीकडे

त्याला जाणून घ्यायचं असतं, तिच्या ख्यालीखुशालीविषयी
तिला असते जिज्ञासा त्याच्याविषयी, त्याच्या संसाराविषयी
दोघेही विचारत नाहीत परस्परांना. मात्र
मात्र चौकशी आस्थेने करतात इतरेजनांपाशी !

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

अर्थ जगण्याचा..

ढलाण निसटलेल्या बांधावरल्या दगड मुरुमाच्या बेचक्यात सांजेपासून बसून असलेल्या सागवानी म्हाताऱ्याने आपल्या जास्वंदी नातवाला मांडीवर घेतलं होतं. अंधारून येऊ लागल्यावर पायाला रग लागलेला म्हातारा धोतर झटकत अल्लाद उठला. पुढं होत त्यानं नातवाला उचलून कंबरेवर घेतलं. निघताना नातवानं आज्ज्याला विचारलं, "आबा आता पुन्ना कदी यायचं ?"

गालफाडे आत गेलेला, पांढुरक्या दाढीचे खुंट वाढलेला, खोबणीत खोल गेलेल्या निस्तेज डोळयांच्या कडा पुसत ओठावर हसू आणत जिंदादिल म्हातारा
आपल्या तळहातावरची मखमल नातवाच्या गालावर पसरवत उत्तरला, "उद्याच्याला याचं की ! आभाळापल्याड तुजी आज्जी ऱ्हाती. माजी विचारपूस करायला रोज ती सूर्याला पाठवती. जोवर ती सूर्याला धाडून लावती तोवर आपण येत ऱ्हायचं आणि बांधावर बसून त्याला निरखत ऱ्हायचं. "
आज्जा काय सांगतोय यातलं नातवाला काहीच कळलं नाही. कंबरेत वाकलेल्या आज्ज्याला ते पोर घट्ट करकचून बिलगलं. खुललेल्या आज्ज्यानं त्याचा गालगुच्चा घेतला. आस्ते कदम दोघंही निघाले तेंव्हा त्यांच्या फिकट सावल्या पाहून दिगंताला टेकलेल्या सूर्याला गलबलून आलं !
शोधलं तर हरेक प्रश्नाचं उत्तर सापडतं.