सोमवार, ३० एप्रिल, २०१८

लोककलेची ढासळती कमान ...


पंढरीतल्या एका रंगात आलेल्या फडात ढोलकी कडाडत होती. लोक मनमुराद दाद देत होते. 'ती' मन लावून नाचत होती. मधूनच 'तिच्या' चेहरयावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. तिचे पोट किंचित फुगल्यासारखे वाटत होते. खरे तर 'तिला' असह्य वेदना होत होत्या तरीही 'ती' देहभान हरपून नाचत होती. तिची लावणी संपताच ती पटामागे गेली, घाईने 'तिने' साडी फेडली अन पोटाचा ताण हलका झाला तसा 'तिने' थोडा श्वास मोकळा सोडला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. 'तिला' प्रसूतीच्या वेणा सुरु झाल्या आणि काही मिनिटात 'तिची' प्रसूती झाली देखील. इकडे फडावर दोनेक लावण्या होऊन गेल्या, सोंगाडयाची बतावणी सुरु झाली. 'तिच्या'  वेदनांना मात्र अंत नव्हता. सोंगाडयांची बतावणी संपली, पुढच्या लावणीआधी लोकांनी 'तिच्याच' नावाचा धोशा सुरु केला. तिची सहकलाकार एव्हाना पुढच्या लावणीसाठी मंचावर आली होती. लोकांनी त्याआधीच शिट्ट्या फुकायला आणि खुर्च्यांचा आवाज करायला सुरुवात केली. हार्मोनियमवाला बिथरून गेला आणि त्याचे काळीपांढरीचे गणित चुकू लागले. कशीबशी ती लावणी संपली. तोवर 'तिने' दगड हाती घेऊन नाळ तोडून काढली आणि आपल्या बाळाला स्वतःपासून विलग केले, आणि पुन्हा कासोटा आवळून साडी नेसली आणि फडावर जाऊन उभी राहिली. ती जीव तोडून नाचली. त्या लावणीचे बोल होते, 'पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची!'

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

खलिल जिब्रान - लेखक ते युगकथानायक एक अनोखा प्रवास....


एका अशा माणसाची गोष्ट ज्याच्या शवपेटीवर दोन देशाचे राष्ट्रध्वज गुंडाळले होते ! त्यातला एक होता चक्क अमेरिकेचा आणि दुसरा होता लेबेनॉनचा ! एक असा माणूस की ज्याच्या अंत्ययात्रेला विविध धर्माचे लोक एकत्र आले होते जेंव्हा जगभरात सौहार्दाचे वातावरण नव्हते ! एक अवलिया जो प्रतिभावंत कवी होता, शिल्पकार होता, चित्रकार होता आणि परखड भाष्यकार होता. सर्वात महत्वाचे म्हणजे तो एक दार्शनिक होता. एक सहृदयी पुरुष जो आपल्या प्रेमासाठी अविवाहित राहिला. एक असा माणूस ज्याने वयाच्या पंधराव्या वर्षी धर्माची खरमरीत समीक्षा करणारं पुस्तक लिहिलं. ज्याला तत्कालीन चर्चने हद्दपारीची सजा सुनावून देशाबाहेर काढले होते त्याच देशात पुढे त्याच्या नावाचा डंका पिटला गेला, त्याच्या मृत्यूनंतर लोकदर्शनासाठी तब्बल दोन दिवस त्याचे पार्थिव ठेवावे लागले इतकी अलोट गर्दी त्याच्या अंतिम दर्शनासाठी एकवटली होती. ज्या मॅरोनाईट चर्चच्या आदेशाने त्याला पिटाळून लावले होते त्याच चर्चच्या आदेशानुसार त्याच्या स्वतःच्या गावातल्या दफनभूमीत त्याचे शव विधिवत व सन्मानाने दफन केले गेले. आजदेखील त्या माणसाची कबर तिथे आहे अन आजही त्या कबरीवर फुल चढवण्यासाठी मॅरोनाईट कॅथॉलिक, प्रोटेस्टंट शिया, सुन्नी, यहुदी, बौद्ध यांच्यासह अनेक संप्रदायाचे, धर्माचे लोक तिथे येतात !

शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

शायरीची ताकद..

Image result for habib jalib poetry

१९७३ मधील ही घटना आहे. पाकिस्तानात जुल्फीकार अली भुट्टो यांचे सरकार स्थापन झाले होते. आपल्या यशाचा आणि सत्तेचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी आपल्या होम टाऊनमध्ये म्हणजे लरकानामध्ये एका मेजवानीचे आयोजन केले होते. अर्थातच अत्यंत उच्चस्तरीयांकरिता निमंत्रण होते. या मेजवानीत सर्व शाही बडदास्त राखण्याचे त्यांचे आदेश होते. पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरांना विशेष आदेश दिला गेला की या प्रसंगी नृत्याची अदाकारी पेश करण्यासाठी लाहौरची प्रसिद्ध नर्तिका मुमताज हिला वर्दी देण्यात यावी. गव्हर्नर साहेबांनी याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकारी अब्दुल गनी यांच्यावर सोपवली. त्यांनी मुमताजला गळ घातली पण पाकिस्तानी मैफलीत होणारे शोषण ठाऊक असल्याने तिने कानावर हात ठेवले. पोलिस युपी बिहारचे असोत की पाकिस्तानच्या सिंध पंजाबचे असोत त्यांचा एकच खाक्या असतो तो म्हणजे दडपशाही.

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

रेड लाईट डायरीज - एक पाऊल सावरलं...


एक आनंदाची बातमी.
आमची आसिफा सुखरुप तिच्या देशी, तिच्या गावी परतली.
मागील वर्षी सप्टेबरमध्ये पुण्यात टाकलेल्या धाडीत काही मुली आणि कुंटणखाण्याच्या मालकिणींना अटक झाली होती. मोठी पोहोच असणाऱ्या आणि नोटा ढिल्या करण्यास तयार असणाऱ्या बायकांना 'रीतसर' जामीन मिळाला. यातील काही मुली अल्पवयीन होत्या. त्यातच एक होती आसिफा. बांग्लादेशाची राजधानी ढाक्यापासून काही अंतरावर तिचे गाव आहे. (तिच्या कुटुंबावर आणि तिच्यावर जे काही गुदरलं आहे ते कुणाच्याही बाबतीत घडू नये) ती कुमारवयीन असतानाच तिला आधी बंगालमध्ये एस्कॉर्ट केलं गेलं.

शनिवार, १४ एप्रिल, २०१८

शूद्रांचा भूतकाळ काय सांगतो ?




पांडवांचा वडील बंधू युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाचे महाभारतात जे वर्णन आलेले आहे त्यावरून राज्याभिषेक सोहळ्याचे ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्यांबरोबरच शूद्रांनाही निमंत्रण दिले जात होते हे सिद्ध होते. राजाच्या अभिषेक समारंभात शुद्रसुद्धा सहभागी होत होते. प्राचीन लेखक नीलकंठ यांनी राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करताना म्हटले आहे की, ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र हे चार प्रमुख मंत्री नवीन राजाला अभिषेक करीत. नंतर प्रत्येक वर्णाचा नेता व जातीचा नेता पवित्र नद्यांच्या पाण्याचा अभिषेक राजाला करीत असत. त्या नंतर ब्राम्हण हे त्या राजाचा जयजयकार करत असत. मनूच्या आधी वैदिकपूर्व काळात राज्याभिषेक समारंभात रत्नींचा महत्वपूर्ण सहभाग होता. रत्नी म्हणजे विविध जातींच्या लोकप्रतिनिधींचा समूह होय. त्यांना रत्नी म्हटले जायचे कारण, त्यांच्याजवळ एक रत्न असायचे. हे रत्न सार्वभौमत्वाचे प्रतिक मानले जात होते. रत्नींकडून राजाला हे रत्न दिले जाते व त्यानंतरच त्या राजाला सार्वभौमत्व प्राप्त होई. हे सार्वभौमत्व प्राप्त झाल्यावर राजा प्रत्येक घरी जाऊन त्यांना दान देत असे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या रत्नींमध्ये शूद्रांचा समावेश असे.
जनपद आणि पौर या दोन प्राचीन काळच्या राजकीय दरबारचे शुद्र हे मान्यताप्राप्त सदस्य होते, अविभाज्य घटक होते व ते सदस्य असल्याने त्यांचा ब्राम्हणसुद्धा आदर करीत होते.

रविवार, ८ एप्रिल, २०१८

माझा राजकीय दृष्टीकोन



माझा राजकीय दृष्टीकोन जाणून घेणाऱ्यांसाठी...

"माझे म्हणाल तर मी सदसदविवेकबुद्धीला अधिक प्राधान्य देतो न की धर्मजाती द्वेष आधारित राजकीय मूल्यांना ! कॉंग्रेस ही आपल्या विचारांशी सामावून घेणाऱ्या लोकांचे आर्थिक लाभार्थीकरण करणारी राजकीय विचार प्रणाली आहे जिने या करिता भूतकाळात मुस्लीम तुष्टीकरण केले होते.... तर भाजप ही मुसलमान द्वेषी उजवी विचार प्रणाली आहे जी आपल्या समर्थक व्यक्तींना लाभार्थी न बनवता आपल्याला पोषक संघटना आणि व्यक्तीविशेष यांचे सबलीकरण करते आहे ... भारतीय राजकारणात या दोन मुख्य विचारधारा आहेत... कम्युनिस्ट म्हणजे या दोन्हींची खिचडी आहे ... अन्य छोटे छोटे पक्ष याच झाडांची वेगवेगळी कलमे आहेत .... सबब सदसदविवेक बुद्धीने काम करणे मला क्रमप्राप्त वाटते.. "

'विकास' आणि 'प्रगती' हे दाखवायचे दात असतात खायचे प्रत्येकाचे दात वेगवेगळे असतात. तरीही राजकीय पक्षांनी फेकलेल्या बाह्य आवरणाच्या जाळ्यात लोक अलगद अडकत जातात, नंतर त्यात जाम गुरफटून जातात आणि आपली स्वतःची एक स्वतंत्र भूमिका असू शकते याचाही त्यांना विसर पडतो. किंबहुना मतदान केल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल आपल्याला वैरभाव वा मित्रभाव न राहता तटस्थभाव अंगीकारता आला पाहिजे याचा लोकांना विसर पडत चालला आहे, यामुळेच गल्ली ते दिल्ली लोक राजकीय अभिनिवेशात जगत राहतात. आपलं रोजचं सामान्य जीवन आणि आपल्या मर्यादा याचा विसर पडून राजकारण्यांनी दिलेल्या अफूच्या गोळीवर आपली उर्जा खर्चत राहतात. असो ज्याची त्याची मर्जी आणि ज्याचे त्याचे विचार ...

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

काकाणी केस सलमान का हरला ?


बिश्नोई म्हणजे बीस आणि नऊ यांचे मिश्रण. वीस आज्ञा आणि नऊ तत्वे. गुरु जांभेश्वर यांनी समाजास ह्या २९ बाबींचे पालन अनिवार्य केले आणि हा समाज बिश्नोई म्हणून ओळखला जाऊ लागला. सलमान खानच्या काळवीट हत्या खटल्यात याच समाजाचे लोक फिर्यादी आणि साक्षीदार होते म्हणूनच तो ही केस हरला असे म्हणणे चुकीचे होणार नाही. कारण हा समाज प्राण्यांना देव मानतो, त्यातही जे गवत, पानं खाऊन जगतात ते यांना पूज्य आहेत. निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संतुलन ही यांची आद्य कर्तव्ये आहेत. बिश्नोई समाजातील लोक हे प्रामुख्याने राजस्थानच्या थार वाळवंटाच्या परिसरात आढळतात. निसर्गाविषयी असलेल्या प्रेमासाठी त्यांची खास ओळख आहे. झाडे वाचवण्यासाठी काही वर्षापूर्वी आपल्याकडे चिपको आंदोलन झाले होते, नुकतेच गुगलने त्याची दखल घेत डूडलही बनवले होते. बिश्नोई समाजाने चिपको आंदोलनाहून श्रेष्ठ आणि गौरवशाली इतिहास अजमेरजवळील एका गावात घडवला होता. अमृतादेवी बेनिवाल या महिलेने आपल्या तीन मुली आणि पतीसह झाडे तोडायला आलेल्या राजा अभयसिंहाच्या सैन्यास विरोध केला आणि त्याकरिता प्राणाचे बलिदान दिले. ३६३ लोकांनी झाडांची कत्तल अडवण्यासाठी आपला जीव दिला होता. असं जगाच्या पाठीवर कुठंही कधीही घडलं नाही. इतकं कमालीचं निसर्गप्रेम या समाजात होतं, आहे आणि भविष्यातही राहील. इंटरनेटवर हरणाच्या पाडसाला आपलं दुध पाजणाऱ्या एका बिश्नोई स्त्रीचा फोटो व्हायरल झाला होता तेंव्हा समाजाने तिला नावं ठेवता तिची पाठराखण केली होती. सलमानच्या प्रकरणात त्याने सगळे प्रयत्न करूनही हा समाज बधला नाही की फुटलाही नाही.

शनिवार, ३१ मार्च, २०१८

अण्णांचे फसलेले आंदोलन..


कधी काळी लष्करी सैनिक असलेल्या आणि त्या नंतर ग्रामीण भागात सामाजिक प्रश्नांची नव्याने प्रेरणादायी उकल करणाऱ्या अण्णांनी पहिले आंदोलन १९८० मध्ये केले होते. गावास वेठीस धरणार्‍या प्रशासनाविरुद्ध गावातील शाळेला मान्यता मिळण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर अण्णांनी पहिले यशस्वी उपोषण केले. अण्णांनी एका दिवसातच यंत्रणेला झुकविले. अण्णांच्या सक्रिय सामजिक चळवळीच्या जीवनातला हा पहिला प्रसंग होता.

शनिवार, १७ मार्च, २०१८

रेड लाईट डायरीज - बायकांचे एस्कॉर्ट असेही ....



आपल्याकडे बायका पोरींना ‘धंद्याला’ लावणे वा त्यांची खरेदी विक्री करणे किती सहज सोपे आहे याचे हे आदर्श उदाहरण ठरावे. आपले कायदे किती कुचकामी आहेत आणि जी काही कलमं आहेत ती किती तकलादू आहेत हे यातून प्रकर्षाने ध्यानात यावे.

२००३ सालच्या ह्युमन ट्रॅफिकिंगच्या (अवैध मानवी तस्करी) एका खटल्यात पतियाळा येथील एका न्यायालयाने मार्च २०१८ मध्ये पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोषी ठरवले. पोलिसांच्या कर्तव्य तत्पर शिताफीने आणि न्यायालयातील वकिलांच्या न्यायिक दलालीने आय मीन दलीलांनी हा खटला १५ वर्षे रखडवला गेला आणि शिक्षा झाली फक्त दोन वर्षे !

पत्रकारिता आणि राजकारण



काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाने राज्यसभेच्या उमेदवारीसाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे नाव घोषित केले आणि अनेकांनी भुवया उंचावल्या. कुमार केतकर हे मराठीतील प्रतिथयश पत्रकार, विचारवंत आणि लेखक म्हणून विख्यात आहेत. दैनिक 'लोकसत्ता'चे ते निवृत्त प्रमुख संपादक होत. तसेच 'महाराष्ट्र टाईम्स' आणि 'लोकमत' या वृत्तपत्रांचे माजी मुख्य संपादक होते. 'डेली ऑब्झर्व्हर'चे निवासी संपादक तसेच 'इकॉनॉमिक टाइम्स'चे विशेष प्रतिनिधी म्हणूनहूी कुमार केतकरांनी काम केलेले आहे. संपादकपदाच्या कारकिर्दीत ते अखेरीस 'दैनिक दिव्य मराठी' वृत्तपत्राचे मुख्य संपादक होते. राज्यसभेच्या उमेदवारीचा हा निर्णय अनपेक्षित नव्हता तसेच ही वाटचालही इतक्या सहजासहजीची नव्हती. काँग्रेसमधील अन्य इच्छुकांनी  यावर दबक्या आवाजात चर्चा आरंभण्याचा प्रयत्न केला तर काहींनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त केली. नेहमीप्रमाणे काँग्रेसने याची काडीमात्र दखल घेतली नाही. कुमार केतकर यांच्या नावाला राहुल गांधींनीच पुढे आणल्याने यावर व्यक्त होणे काहींनी शिताफीने टाळले. काही ज्येष्ठ निष्ठावंत काँग्रेसजनांनी मात्र या निर्णयाचे स्वागत करत केतकर यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा, भाषाप्रभुत्वाचा, पत्रकारितेतील वर्तुळातील अनुभवाचा आणि चौफेर व्यासंगाचा चांगला उपयोग होईल अशी प्रतिक्रिया दिलीय. अन्य राजकीय पक्षांनी यावर सावध प्रतिक्रिया दिल्या तर पत्रकार जगतातून अनेकांनी या निर्णयासाठी काँग्रेस आणि केतकर यांचे अभिनंदन केले. इथेही काहींनी नाराजीचा सूर आळवण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसे यश लाभले नाही. या निर्णयाची सोशल मिडीयाच्या सर्व अंगांवर रंगतदार चर्चा पाहावयास मिळाली. काहींनी टवाळकी केली, काहींनी पाठराखण केली तर काही नेहमीप्रमाणे तटस्थ राहिले. तरीदेखील एक मोठा वर्ग असा आढळून आला की जो या घटनेच्या आडून पत्रकार आणि त्यांचे राजकारण व पत्रकारांच्या राजकीय भूमिका यावर टिप्पण्या करत होता. ही संधी साधत अनेकांनी सकल पत्रकारांना दुषणे दिली. काहींनी प्रिंट मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया याची गल्लत करत पत्रकारांवर हात धुवून घेतले. पत्रकारांनी राजकारणात जाऊ नये असा धोशा या लोकांनी लावून धरलेला होता. वास्तविक पाहता ही काही पहिली घटना नव्हती की लोकांनी इतकी आदळआपट करावी. अशा घटना या आधी राज्यात,देशात आणि जगभरात अनेक ठिकाणी घडल्या आहेत.