शनिवार, १४ एप्रिल, २०१८

शूद्रांचा भूतकाळ काय सांगतो ?




पांडवांचा वडील बंधू युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाचे महाभारतात जे वर्णन आलेले आहे त्यावरून राज्याभिषेक सोहळ्याचे ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्यांबरोबरच शूद्रांनाही निमंत्रण दिले जात होते हे सिद्ध होते. राजाच्या अभिषेक समारंभात शुद्रसुद्धा सहभागी होत होते. प्राचीन लेखक नीलकंठ यांनी राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करताना म्हटले आहे की, ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र हे चार प्रमुख मंत्री नवीन राजाला अभिषेक करीत. नंतर प्रत्येक वर्णाचा नेता व जातीचा नेता पवित्र नद्यांच्या पाण्याचा अभिषेक राजाला करीत असत. त्या नंतर ब्राम्हण हे त्या राजाचा जयजयकार करत असत. मनूच्या आधी वैदिकपूर्व काळात राज्याभिषेक समारंभात रत्नींचा महत्वपूर्ण सहभाग होता. रत्नी म्हणजे विविध जातींच्या लोकप्रतिनिधींचा समूह होय. त्यांना रत्नी म्हटले जायचे कारण, त्यांच्याजवळ एक रत्न असायचे. हे रत्न सार्वभौमत्वाचे प्रतिक मानले जात होते. रत्नींकडून राजाला हे रत्न दिले जाते व त्यानंतरच त्या राजाला सार्वभौमत्व प्राप्त होई. हे सार्वभौमत्व प्राप्त झाल्यावर राजा प्रत्येक घरी जाऊन त्यांना दान देत असे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या रत्नींमध्ये शूद्रांचा समावेश असे.
जनपद आणि पौर या दोन प्राचीन काळच्या राजकीय दरबारचे शुद्र हे मान्यताप्राप्त सदस्य होते, अविभाज्य घटक होते व ते सदस्य असल्याने त्यांचा ब्राम्हणसुद्धा आदर करीत होते.

प्राचीन आर्य समाजात शूद्रांना उच्च राजकीय दर्जा प्राप्त झालेला होता. हे निर्विवाद सत्य होय. ते राज्याचे मंत्री सुद्धा झाले होते याचे दाखले महाभारतात ठिकठिकाणी आढळतात. महाभारताच्या लेखकाने वर्णानुसार मंत्र्यांच्या यादीत जो उल्लेख केलेला आहे त्या नुसार ३७ मंत्र्यांपैकी ४ ब्राम्हण, ८ क्षत्रिय, २१ वैश्य, ३ शुद्र व १ सूत यांचा समावेश आहे.

केवळ राज्याचे मंत्री होऊनच शुद्र थांबले नाहीत तर ते राजे सुद्धा झाले. राजा होण्याच्या शुद्राच्या पात्रतेबद्दल मनुने जे विचार मांडले त्याच्या अगदी विरुद्ध मते ऋग्वेदातील शूद्रांच्या कथेत आढळतात. सुदास राजाच्या कारकिर्दीचा आढावा घेतल्यास राजाचा पुरोहित कोण व्हावे यावरून वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यात झालेल्या तीव्र संघर्षाचे स्मरण होईल. ब्राम्हण असलेले वसिष्ठ हे सुदास राजाचे गुरु होते. त्यांनी असा दावा केला होता की फक्त ब्राम्हणच राजाचा पुरोहित होऊ शकतो. तर क्षत्रिय असलेल्या विश्वामित्रांनी असा युक्तिवाद केला की, त्या पदासाठी क्षत्रियच पात्र आहेत. या संघर्षात विश्वामित्रांनी बाजी मारली व ते स्वतः सुदास राजाचे पुरोहित झाले. हा संघर्ष संस्मरणीय असा आहे. कारण पुरोहित होणे हा केवळ ब्राम्हणांचा अधिकार नाही हे त्या निर्णयावरून स्पष्ट झाले. परंतु प्राचीन वाङ्मयात आढळणारी ही कथा सामाजिक इतिहासात सर्वोत्तम असा नमुना आहे.

दुर्दैवाने या घटनेची गंभीर अशी दखल कोणीही घेतली नाही. इतकेच न्व्हे तर हा राजा कोण होता अशी विचारणाही केली नाही. सुदास हा पैजवानचा पुत्र होता. काशी(बनारस)चा राजा देवदासचा पैजवान हा पुत्र होता. सुदास कोणत्या वर्णाचा होता ? सुदास हा राजा शुद्र होता असे सांगितले तर फार थोडे जण त्यावर विश्वास ठेवतील. परंतु महाभारतातून ही वस्तूस्थिती असल्याचे सिद्ध होते. महाभारताच्या शांतीपर्वात पैजवानचा उल्लेख करण्यात आला आहे. पैजवान हा शुद्र होता असे त्यात नमूद करण्यात आलेले आहे. सुदास राजाच्या या कथेमुळे आर्य समाजातील शूद्रांच्या दर्जावर एक नवा प्रकाशझोत पडतो. शुद्र हे राज्यकर्तेही होते हे त्यावरून स्पष्ट होते. शुद्र राजाची सेवा करण्यात ब्राम्हण व क्षत्रियांना अपमान तर वाटत नव्हताच उलट स्वतःची राजनिष्ठा सिद्ध करण्यासाठी ते त्याच्या राजवाड्यात वैदिक समारंभ करीत होते असे दिसून येते.

त्या नंतरच्या काळात शुद्र राजा झाला नाही असे म्हणता येणार नाही. या उलट इतिहासाचा असा दाखला आहे की मनूच्या नंतरही २ शुद्र राजे होऊन गेले. नंद राजाने इ.स. पूर्व ४१३ ते इ.स.पूर्व ३२२ पर्यंत राज्य केले. तो शुद्र होता. नंद राजानंतर गादीवर आलेला मौर्य राजा हा सुद्धा शुद्र होता. इ.स.पूर्व ३२२ ते इ.स.पूर्व १८३ या काळात त्याने राज्य केले. शूद्रांनाही उच्च दर्जा होता हे या २ भक्कम पुराव्याखेरिज आणखी वेगळ्या पुराव्याची काय गरज आहे. अशोक हा केवळ भारतातील सम्राट नव्हता तर तो शुद्र होता. व त्याचे साम्राज्य शुद्रांनी निर्माण केलेले साम्राज्य होते.

शूद्रांना वेदाभ्यास करण्याचा हक्क या संदर्भात छंद्योग्य उपनिषदाकडे लक्ष जाते. त्यात जनश्रुतीची कथा आहे. जनश्रुतीना रैकवा या गुरूंनी वेदविद्या शिकविलेली असते. ही कथा जर सत्य असेल तर असा एक काळ होता की ज्या काळात शूद्रांना वेदाभ्यास करण्यावर बंधने नव्हती, मनाई नव्हती हे निसंशयपणे म्हणावे लागेल.

शूद्रांना केवळ वेदाभ्यास करण्यास मुभा होती असे नव्हे तर काही शुद्रांनी ऋषीचा दर्जाही मिळवला होता. त्यांनी वेदातील काही श्लोक देखील लिहिले आहेत. कावश ऋषींची कथा या संदर्भात उल्लेखनीय आहे. तो ऋषी होता व ऋग्वेदातील अनेक श्लोक त्यांनी लिहिलेले आहेत.

शुद्र हे आर्य समाजाचे अविभाज्य, स्वाभाविक व महत्वाचे घटक आहेत हे यजुर्वेदातील प्रार्थनेवरून सिद्ध होते. ही प्रार्थना यज्ञाच्यावेळी म्हटली जाते. ती प्रार्थना अशी
"..... हे परमेश्वरा
आमच्या पवित्र धर्मगुरूस तेज, कांती दे. सत्ताधारी राजाला, वैश्याला तेज दे व कांती दे, मलाही हा तेजस्वीपणा दे."
ही प्रार्थना उल्लेखनीय आहे. उल्लेखनीय अशा अर्थाने की शुद्र हे आर्य समाजाचे घटक होते व त्यांनाही आदर व्यक्त केला जात होता हे या प्रार्थनेवरून स्पष्ट होते.

या माहितीखेरीज बाबासाहेबांनी शूद्रांना प्राचीन काळी असणारे स्थान आणि अधिकार यावर अनेक दाखल्यांसह मार्मिक भाष्य केलेलं आहे. त्यावरून तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे भान यावे. या काळात सर्व वर्णात आपद्भाव आणि आदर होता असे दिसून येते. या नंतरच्या काळात मात्र वर्णींय वर्चस्ववादाला ब्राम्हण्यत्वाची झालर लावली गेली आणि शूद्रांना खाईत लोटले गेले. सर्वच क्षेत्रातील अनिर्बंध ताबेदारी आणि उत्तरदायित्वरहित बेबंद अधिकारांचा वापर करत वर्चस्ववाद लादला गेला आणि तिथून शुद्र हे समाजव्यवस्थेच्या उतरंडीत थेट तळाशी आणि गावकुसाच्या बाहेर फेकले गेले. पुढे काय झाले हे सर्वांना ज्ञात आहे. भूतकाळातील स्नेह, विश्वास आधुनिक वैज्ञानिक युगात अधिक दृढतेने जोपासता येणे सहज शक्य आहे पण त्या साठी चौफेर इच्छाशक्तीची अनिवार गरज आहे. जिची सध्याच्या काळात कमालीची वानवा जाणवते आहे. पण यामुळे हिरमोड करून चालणार नाही, प्रत्येकाने सामाजिक विषमता नष्ट करणारा एक छोटासा दिवा जरी आपल्या हातात सलामत पुढे नेला तरी प्रकाशमार्ग उदयास येण्यास वेळ लागणार नाही.

- समीर गायकवाड.

(प्रस्तुत ब्लॉगमधील उतारे 'Writing & Speeches of Dr. Babasaheb Ambedkar', Vol - 3 यातील Chapter 7 - Shudra & evolution यातून घेतलेले आहेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा