सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

अघळपघळ ....बायडाअक्का



गावाकडची माणसं मोकळी ढाकळी असतात अन त्यांची मने देखील ऐन्यासारखी !
मी घेऊन जातोय तुम्हाला अशाच एका निर्मळ मनाच्या आजीकडे जी फटकळ आहे पण मायाळू आहे..
चला तर मग माझ्या बायडाअक्काला भेटायला ...
गावाकडं कधी कधी अत्यंत इरसाल शब्दांत असे माप काढले जाते की समोरच्या माणसाची बोलती बंद व्हावी..

संजय गांधी - काही आठवणी .....



देशात जेंव्हा आणीबाणीची घोषणा झाली होती तेंव्हा पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार लुईस एम सिमन्स हे 'द वॉशिंग्टन पोस्ट'चे संवाददाता म्हणून दिल्लीत कार्यरत होते. याच वर्तमानपत्रात त्या काळात एक बातमी छापून आली होती की, एका खाजगी पार्टीमध्ये संजय गांधीनी आपल्या मातोश्री, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या श्रीमुखात भडकावली होती. स्क्रोलडॉटइन या वेब पोर्टलवर एका मुलाखतीत काही दिवसांपूर्वी त्यांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार ही घटना आणीबाणीपूर्वी काही दिवस अगोदरची असून एका निकटवर्तीय खाजगी जीवनातील जवळच्या माणसाच्या घरी एका पार्टीत घडली होती. त्यात नेमका काय वाद झाला माहिती नाही, पण संजय गांधी यांनी संतापाच्या भरात हे कृत्य केले असे ते म्हणतात. याचे दोन प्रत्यक्षदर्शी सूत्र त्यांच्या संपर्कात असल्याने ही माहिती कळाल्याची पुष्टी त्यांनी जोडली होती. कुलदीप नय्यर यांच्या आणीबाणीवरील' द जजमेंट' या पुस्तकातदेखील हा उल्लेख आहे. 'द इमरजेंसी : अ पर्सनल हिस्ट्री' या पुस्तकात वरिष्ठ पत्रकार कुमी कपूर यांनीही या घटनेला पुष्टी देणारे विधान केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेची तेंव्हा वाच्यता देखील झाली होती अन वणव्यासारखी ही बातमी पसरली होती, पण मीडियात असलेल्या अघोषित सेन्सॉरशिप आणि दहशत यामुळे ही बातमी तेंव्हा छापली गेली नाही… आता संजय गांधी हयात नाहीत आणि इंदिराजी देखील हयात नाहीत. या घटनेची सत्यासत्यता तपासणे काळाच्या कसोटीवर व्यक्तीसापेक्ष प्रामाणिकता पाहू घेता कठीण असल्याचे वाटते. सत्य काहीही असो पण संजय गांधींचे जगणे हे वादग्रस्त होते हे मात्र निर्विवाद सत्य आहे…. 

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

काहूर ....



दावणीचं दावं तोडून मोकाट उधळणाऱ्या खोंडासारखी वाऱ्याची गत झालीय. जेंव्हा बघावं तेंव्हा चौदिशेने बेफाम आणि सुसाट वावधान सुटलंय. त्याला ना आचपेच ना कसली समज. चौखूर सुटलेलं खोंड जेंव्हा अनिवार धावत सुटतं तेंव्हा कधी कधी ना कधी ते दमतंच. मग एखाद्या बांधाच्या कडेला असणाऱ्या चिचंच्या पट्टीला नाहीतर वाळून खडंग झालेल्या माळातल्या हिरव्यापिवळ्या लिंबाखाली ते जाऊन बसतं. त्याला कडबा लागत नाही की चारा लागत नाही, नुसती ताजी हवा पिऊन डेरेदार सावलीतला बावनकशी विसावा घेऊन ते पुन्हा ताजेतवानं होतं. कान टवकारून उभं राहतं, अंगावरचं पांढरं रेशमी कातडं थरथरवतं. पुढच्या उजव्या पायाने माती खरडून काढतं आणि पुन्हा उधळत फिरतं.

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

बैल आणि ढोल ...



जगात बैलांच्या इतके दुःख अन वेदना कोणाच्या वाटेला येत नाहीत…. बैल आयुष्यभर ओझी वाहतात अन बदल्यात चाबकाचे वार अंगावर झेलत राहतात. बैल उन्ह वारा पाऊस यांची तमा न बाळगता झिझत राहतात, कष्टत राहतात. कितीही वजनाचे जू मानेवर ठेवले तरी तोंडातून फेसाचा अभिषेक मातीला घालत बैल तसेच चालत राहतात पण थांबत नाहीत. डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या तरी बैल हुंदके देत नाहीत. बैल आयुष्यभर कासऱ्याला बांधून असतात, वेसण आवळून नाकातनं रक्त आले तरी मान वर करत नाहीत. बैल ढेकूळल्या रानातनं जिंदगीभराचं मातीचं ऋण उतरवत राहतात, बैल क्वचित सावलीत बसून राहतात, मानेला गळू झाले तरी ओझे ओढत राहतात, बैल अविरत कष्ट करत राहतात. इतके होऊनही कुठल्याच रातीला बैलांच्या गोठ्यातून हुंदक्यांचे उमाळे ऐकायला येत नाहीत.…थकले भागलेले बैल एके दिवशी गुडघ्यात मोडतात, तर कधी बसकण मारतात तर कधी गलितगात्र होऊन कोसळून जातात अन लवकरच त्यांचे अखेरचे दिवस येतात.... पाझर सुटलेले मोठाले डोळे पांढरे होऊन जातात, पाय खरडले जातात, नाकातोंडातून फेसाचे ओघ येतात, कान लोंबते होतात, श्वासाची प्रचंड तडफड होते, मोकळी झालेली वशिंड पार कलंडून जाते, शेपटीला अखेरचे हिसके येतात अन अंगावरचे रेशमी पांढरे कातडे हलकेच थरथरते….

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

आम्ही ....



गावाच्या वेशीपासून कोसो दूर असणाऱ्या शेताजवळील वस्तीत राहणाऱ्या हरिबाला एकशे चाळीस रुपयाची जाडजूड ढवळपुरी चप्पल घ्यायचीय. एक महिन्यापासून तो तळपायाला चुका ठोकलेल्या, चार ठिकाणी शिवलेल्या चपला घालतोय. अजून पैसे बाजूला काढणे त्याला शक्य झालेले नाही.

बुधवार, २ डिसेंबर, २०१५

अनुवादित कविता - अहमद मोईनुद्दिन : मल्याळी कविता

अम्मा फक्त भल्या सकाळीच ओसरीत जाते
सूर्यकिरणे येण्याआधी ती घराबाहेर येते
लख्ख झाडून अंगण स्वच्छ करते.

अनोळखी कोणी भेटायला अब्बूकडे आला की
स्वतःला लपवत दाराआडून बोलते.

आता तीच अम्मा पडून आहे
त्याच ओसरीवरची जणू शिळा !

अनोळखी माणसांच्या त्याच
गर्दीने वेढले आहे तिला.

आता मात्र तिला अगदी मोकळं वाटत असेल.
अब्बूनंतरची आठ वर्षे एकाकी जगल्यानंतर
आता ती अब्बूच्या शेजारी असेल.

माझे ओलेते डोळे
शोधताहेत
थोडीशी जागा माझ्यासाठी
गर्दीत मेंदीच्या पानांत तिथेच
स्वतःला गुरफटून घेण्यासाठी !

माझे हृदय अजूनही आक्रंदतेय
थोडीशी घट्ट मिठी मारून
अम्माशेजारी झोपण्यासाठी ....

मल्याळी कवी अहमद मोईनुद्दिन यांच्या 'कबर' या कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे. कवीच्या वृद्ध मातेने आपल्या पतीच्या पाठीमागे एकाकी जिणं जगत, त्यांच्या आठवणीपायी हट्टाने गावातल्या घरात एकट्याने राहत आठ वर्षे घालवली. एका सकाळी कवीला कळले की गावाकडे आपली आई अनंताच्या प्रवासाला गेली आहे. तो गावातल्या घरात येतो, तिथे येताच जे दृश्य दिसले त्यावरून त्याला ही कविता स्फुरली. ही तरल कविता निस्संशय अंतःकरणाचा ठाव घेऊन जाते.

बहुतांश कब्रस्तानात मेंदीची झाडे असतात, कवीने त्याचा संदर्भ नेटका आणि नेमका वापरत कवितेत कुठेही 'मृत्यू' वा 'कबर' या शब्दांचा उल्लेखही न करता एकाच वेळी अनेक छटा रंगवल्या आहेत. कविता वाचताना वाचकाला त्यात स्वतःला, आपल्या आईला शोधावसं वाटणं हे या कवितेचं सात्विक यश आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

ഖബര്‍

ഉമ്മ
വെളിച്ചം വീഴും മുമ്പേ
അടിച്ചുവാരാന്‍ മാത്രമാണ്
പൂമുഖത്ത് വന്നിരുന്നത്
.
വാപ്പയെ തിരക്കിവരുന്നവരോട്
പാതിചാരിയ വാതിലിന്നു
മറവില്‍ നിന്നാണ്
സംസാരിച്ചിരുന്നത്..
..
ആ ഉമ്മയാണ്
ഇപ്പോള്‍
കണ്ടിട്ടുപോലുമില്ലാത്ത കുറെ
ആണുങ്ങളുടെ
നടുവില്‍ കിടക്കുന്നത്
.
ഉമ്മയിപ്പോള്‍
ആശ്വസിക്കുന്നുണ്ടാവും
എട്ടുവര്‍ഷം കഴിഞ്ഞാണെങ്കിലും
വാപ്പ അരികിലെത്തിയല്ലോ..
..
ഞാനിപ്പോള്‍ തിരയുന്നത്
മൈലാഞ്ചിച്ചെടികള്‍ക്കിടയില്‍
ഒരാള്‍ക്കുകൂടി
കിടക്കാന്‍ ഇടമുണ്ടോയെന്നാണ്
ഉമ്മയെ
കെട്ടിപ്പിടിച്ചുറങ്ങിയിട്ട്
എനിക്ക് മതിയായിട്ടേയില്ല

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Umma1
Used to enter the verandah
Only in the early mornings,
before the light even comes out,
To sweep the floors clean.
Always hid herself
behind the door,
While talking to those,
Who came for Bappa2
.
Now, the same Umma
Lies, surrounded by
All these unfamiliar men,
On the that verandah floor.
.
But, relieved she must be,
That after eight lonesome years,
She’s next to Bappa by now.
.
My eyes now seek
A bit more space for me too
To squeeze in,
Amid those Henna3 plants.
.
My heart still yearns,
To sleep some more,
hugging her tightly..
~~~~~~~~
1. Umma – Mother
2. Bappa- Father
3.Henna plants-Often found near graves.
.

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

विंदानुभूती - आनंददायी जीवनाची समृद्ध अनुभूती !


आयुष्य जगताना अनेक समस्या, संकटे येत राहतात ; जगण्याचे नेमके मार्ग अशा वेळी सन्मुख येत नाहीत आणि डगमगलेले मन औदासिन्याकडे घेऊन जाते. मग जगणे परावलंबी होऊन जाते. अशा विमनस्क अवस्थेत मनाला उभारी मिळणे खूप गरजेचे असते. अन्यथा दैनंदिन जीवनशैलीतली व्यावहारिक रुक्षता मनात खोल रुजते. परिणामी माणूसपणच हरवून जाते. अशा स्थितीत जीवनाला वळण देणारी एखादी भव्य कविता समोर आली तर जीवनाची दशा आणि दिशा दोन्हीही बदलून जातात. विंदा करंदीकरांची अशीच एक कविता आहे जी जगणे सुसह्य करते अन जीवनातले विविधार्थ नव्या संदर्भाने समोर मांडते. कवितेचे नावच आहे 'घेता'. यावरून यातील आशयाची कल्पना यावी. ही कविता वाचकाला समृद्ध करून जाते यात संदेह नाही...

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

गदिमा पर्व...



काही शाळांमध्ये मराठी हा विषय 'ऑप्शनल सब्जेक्ट' झाला आहे. त्यामुळे तिथली मुले मराठी वाचन लेखनाच्या मुलभूत मराठी शालेय संस्काराला मुकतात हे कटूसत्य आहे. इतर शाळातील विद्यार्थ्यांचा मराठीकडे 'वैकल्पिक' म्हणून बघण्याचा दृष्टीकोन चिंताजनक आहे. त्यात भरीस भर म्हणून मराठी हा ‘स्कोअरिंग’चा विषय नसल्याची गुणात्मक आवई ‘पैकीच्या पैकी' छाप शिक्षण पद्धतीत उठवली गेल्यामुळे मराठी भाषा आणि मराठी विषयाच्या नुकसानाचे खरे मूल्यमापन काही वर्षांनी अचूक होईल. बालभारतीच्या प्राथमिक व माध्यमिक इयत्तामधील क्रमिक पुस्तकातून मराठी साहित्याचे वाचन-लेखनाचे जे संस्कार मुलांच्या मनावर होत होते त्याला आता तडा जाऊ लागला आहे. ज्या प्रमाणे भक्तीसाहित्य म्हटले की ज्ञानोबांच्या ओव्या आणि तुकारामांचे अभंग आपसूक डोळ्यापुढे उभे राहतात तद्वत कविता म्हटले की केशवसुत, गदिमा, मर्ढेकर, बालकवी डोळ्यापुढे येतात. नुसते हे कवी चक्षुसापेक्ष येतात असं नव्हे तर त्यांच्या कविता वयाच्या सत्तरीत देखील तोंडपाठ असणारी माणसं आजही भवताली सापडतात. या कवितांचं बालमनावर इतकं गारुड आहे. 'आनंदी आनंद गडे' पासून ते 'पिपात पडले मेल्या उंदीर..' पर्यंत ही काव्यमाला विविध विषयात आणि आशयात बहरत जाते, इथूनच कवितेचं वेड डोक्यात शिरते. या काव्य संस्कारातून पुढे गेलेली मुले कोणत्याही शाखेतून पदवीधर होऊन कोणत्याही प्रांतात कोणत्याही क्षेत्रात चरितार्थासाठी रुजू झाली तरी डोक्यात ठाण मांडून बसलेल्या या कविता काही केल्या हटत नाहीत. शाळेतील मराठीचे शिक्षक, मराठीचे तास आणि चाल लावून म्हटलेल्या कविता मनाच्या एका कप्प्यात प्रत्येक विद्यार्थी खास आठवणी म्हणून जतन करतो कारण या कविता त्याला आपल्याशा वाटतात. या कवितांमध्ये प्रत्येकजण आपले बालपण कायम धुंडाळत असतो. इतकी परिणामकारकता या कवितांमध्ये आहे.

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

आधुनिक कवी – बा. सी. मर्ढेकर



आजच्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनात यंत्रवत आयुष्यात परावर्तीत झालेलं जिणं तकलादू आहे, त्यात जीवनातील रसरशीतपणा हरवला आहे. जीवनातील खरी आसक्ती सरून गेली आहे आणि उरली आहे ती निरस जीवन जगण्याची सक्ती. अगदी मर्मभेदक आणि परिणामकारक अशी शब्दरचना हे मर्ढेकरी काव्यवैशिष्ट्य इथेही आहे. कवितेत न वापरले जाणारे, रुढार्थाने दुर्बोध समजले गेलेले गद्याच्या अंगाने जाणारे शब्द लीलया कवितेत वापरण्यात मर्ढेकरांचा हातखंडा होता. सात दशकांपूर्वी लिहिलेल्या या कवितेत वर्णिलेली जीवनातील शुष्कता आजच्या काळात तर मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते.

'पिपांत मेले ओल्या उंदिर; माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले; माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले, पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं गात्रलिंग अन धुऊन घेउन.
जगायची पण सक्ती आहे; मरायची पण सक्ती आहे...'
ही कविता जरी वाचली तरी मनःचक्षुपुढे बा.सी.मर्ढेकरांचे नाव येतेच ! या कवितेच्या योगाने मर्ढेकरांविषयी रसिक वाचकांच्या मनात एका विशिष्ट प्रतिमेचे घट्ट नाते तयार झाले आहे.

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

दिवाळीतले 'अर्धे आकाश' ....



दिवाळीच्या रात्री साखरझोपेत आपण जेंव्हा मऊ दुलईत झोपलेलो असतो तेंव्हा रानोमाळ कष्ट करत फिरणारया ऊसतोड कामगारांचे जत्थे थंडीत कुडकुडत असतात. अंगावर शहारे आणणारया अशा लोकांच्या दुर्दैवी अपूर्वाईची ही गाथा.. जिथे या बायकांपैकी दहा मागे सात स्त्रियांचे गर्भाशय काढलेले असते, तीसपेक्षाही कमी वयाच्या तरुण स्त्रियांचे देखील गर्भाशय काढले जातात. कशासाठी, तर मासिक पाळीच येऊ नये, तिला विटाळ येऊ नये म्हणून ! ही काळजी तिच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी नव्हे तर कामाचा खाडा होऊ नये म्हणून ! ऊसतोड कामगारांच्या टोकदार दुःखांच्या जाणिवांची अनुभूती देणारा हा लेख अवश्य वाचा.......