शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

द राँग ट्रेन थिअरी - स्वतःच्या शोधाची गोष्ट!

‘द राँग ट्रेन थिअरी‘ नावाचे एक गृहीतक जपानमध्ये प्रसिद्ध आहे. कधीकधी चुकीचे लोक आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातात मात्र तो प्रवास सहनशीलतेचा अंत पाहतो! ‘द राँग ट्रेन थिअरी‘मध्ये एक सुंदर आणि तितकीच दुःखद गोष्ट आहे.
 
कधीकधी आपण चुकीचा मार्ग स्वीकारतो, चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा चुकीच्या जागी खूप वेळ थांबून राहतो. चुकीचे करिअर निवडतो, चुकीच्या गावी स्थलांतरित होतो, चुकीच्या नात्यात - भावनांत गुंतून पडतो, चुकीच्या कल्पनांना आपलं विश्व मानतो, चुकीच्या शब्दांना भुलतो - बळी पडतो, असं बरंच काही चुकीचं आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात स्वीकारलेलं असतं.

हे आपल्यासोबतच का घडतं? खरे तर आपण जेव्हा या निर्णयाचा स्वीकार केलेला असतो तेव्हा सुरुवातीला हे सगळं आपल्याला खूप भारी वाटत असतं. हे सर्व आपल्या मनासारखं घडतंय या आनंदात आपण मग्न होतो.

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

स्त्रियांचे जगातले पहिले मतदान आणि भारत -


  
संपूर्ण देशभरातील स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणारा जगातला पहिला देश न्यूझीलँड आहे. आजच्या तारखेस 132 वर्षांपूर्वी संपूर्ण न्यूझीलँडमधील महिलांनी मतदान केले होते. 19 सप्टेंबर 1893 रोजी हा कायदा तिथे संमत झाला आणि त्याच वर्षी 28 नोव्हेंबरला पार पडलेल्या निवडणुकीत किवी महिलांनी मतदान केले. खरेतर याही आधी अमेरिकेच्या वायोमिंग आणि यूटा या राज्यात स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला होता मात्र उर्वरित अमेरिकन राज्यात त्यांना मताधिकार नव्हता. म्हणूनच अशी समानता राबवणारा न्यूझीलँड हा पहिला देश ठरला. तिथे महिलांना मतदानाचा हक्क मिळण्यामागे दारूचा वाढता प्रभाव, पुरुषांमधली वाढती व्यसनाधिनता कारणीभूत होती हे सांगूनही खरे वाटणार नाही, मात्र वास्तव हेच होते.

मागील काही वर्षांत न्यूझीलँडमधल्या माओरी आदिवासी स्त्रियांचे आणि त्यांच्या परंपरिक 'हाका'चे रिल्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, याला कारण होते माओरी आदिवासींची व्यक्त होण्याची अनोखी 'हाका' शैली, माओरी जनतेचे त्यांच्या मातृभाषेवरचे असीम प्रेम! माओरी स्त्रीपुरुष दोघेही लढवय्ये आहेत हे एव्हाना जगातील सर्व देशांना कळून चुकलेय. सतराव्या शतकात हा देश ब्रिटिश अंमलाखाली होता. 1841 साली न्यूझीलँडला स्वयंशासित कारभाराची परवानगी मिळाली. मात्र पूर्ण स्वातंत्र्य आपल्याप्रमाणेच 1947 मध्ये मिळालं.

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

गोष्ट वीज कोसळण्याच्या योगायोगाची आणि झांबळमधल्या कथेची!


एका विलक्षण योगायोगाची वा कदाचित अज्ञात ऊर्जेची ही पोस्ट. 4 जून 1737 ची घटना. कॅलेब पिकमन हा बावीस वर्षांचा तरुण त्याच्या आईला भेटायला घरी आला होता. कॅलेब हा सागरी कप्तान होता. सागरी मोहिमा पूर्ण झाल्या की सहा महिन्यांनी तो घरी यायचा. घटनेच्या दिवशीही तो समुद्री सफर पूर्ण करून घरी आला होता. तो पावसाचा दिवस होता, किंचित भिजलेल्या कॅलेबने दरवाजाबाहेर अडकवलेली धातूपट्टी ओढून डोअरबेल वाजवली, त्याच्या आईने आतून हाक मारल्यावर आपण दाराबाहेर उभं असल्याचं त्यानं सांगितलं. त्याची वयस्क आई दारापाशी येऊन दरवाजा उघडेपर्यंत आकाशात विजेचा कडकडाट झाला. कॅलेबच्या आईने दार उघडून पाहिलं तर तिचा मुलगा दाराबाहेर मृतावस्थेत पडला होता. वीज कोसळून अवघ्या निमिषार्धात त्याचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील सालेम या समुद्रकिनारी असलेल्या शहरात ही घटना घडली.

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

मेडीटेशन आणि रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस!


माणूस इकडे तिकडे शांतता शोधत असतो मात्र खरी शांतता त्याच्या हृदयात असते. अर्थात या गोष्टीचा थांग तेव्हाच लागतो जेव्हा मन अशांत होते! शांततेचा शोध शांत भोवतालात अथवा सुख समृद्धीत आकंठ बुडालेल्या अवस्थेत असताना कुणीच घेत नाही! जगभरात बुद्धासारखे एखादे अपवाद असतील मात्र बाकी विश्व शांतता कधी शोधते याचे उत्तर एकसमान येते.

आज जगभरात मेडीटेशनचा बोलबाला आहे, आपल्याकडे तर मेडीटेशन्सवरच्या रिल्स, पोस्ट्स, पॉडकास्ट लाखोंच्या संख्येत रतीब घालताना दिसतात. आपल्यापैकी अनेक जण विविध प्रकारचे मेडिटेशन करताना दिसतात. मनःशांतीचा सोपा नी सहज सुलभ मार्ग म्हणून याकडे पाहिले जाते! मात्र मेडिटेशन कुणी लिहिलं याचा शोध घेतला की विस्मयकारक नाव आणि माहिती समोर येते!

आपल्यापैकी अनेकांनी 'ग्लॅडिएटर' हा सिनेमा पाहिला असेल. अभिनेता रसेल क्रो याने साकारलेला मॅक्सिमस, कमांडर ऑफ द आर्मीज ऑफ नॉर्थ, विसरणे शक्य नाही. वास्तवात हे पात्र काल्पनिक होते तरीही जगभरातील सिनेरसिकांना याची भुरळ पडली कारण, मॅक्सिमसची पार्श्वभूमी! आपला वृद्ध राजा मार्कस ऑरेलियस याच्याशी एकनिष्ठ असणारा सेनापती असणारा मॅक्सिमस आपलं सर्वस्व गमावूनही राजावर झालेल्या अन्यायासाठी प्राणांची बाजी लावतो. मार्कसचा क्रूर मुलगा सम्राट कमोडस याची तो हत्या करतो अशा मांडणीची ती काल्पनिक कहाणी होती.

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

कविता - जिचे मरण स्वस्त झाले!


ही ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे कारण अतिशय वेदनादायी आहे. अगदी खात्रीशीर माहिती स्त्रोताच्या आधारे सांगावे लागतेय की, महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने एड्स, एचआयव्ही बाधित रुग्णांना मदत, उपचार देणाऱ्या अनेक केंद्रांचा, स्वयंसेवी संस्थांचा निधी मागील तीन महिन्यापासून थांबवला आहे. सरकार कुठे कुठे कसे कसे पैसे खर्च करतेय हे आपण सारेच पाहत आहोत!

या जीवघेण्या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण घटले असले तरी संपलेले नाही, निर्मूलन झालेले नाही हे सत्य आहे! अजूनही शेकडो रुग्ण प्रत्येक केंद्रात उपचार घेतात. या बायका लाडक्या नाहीत का? यांना उपचार मिळावेत असे वाटत नाही का?

दोन हजारात त्यांची महिन्याची औषधे येत नाहीत हे या क्षेत्रात काम करणारा कोणताही माणूस सांगेल! कवितासारख्या कित्येक बायकांना नवजीवनाची संजीवनी देण्यापासून आपण मागे हटू शकत नाही! हे पाप आहे, हा कोतेपणा आहे, हे मानवतेला धरून नाही!

सरकारने रोखून धरलेली मदत पुन्हा पूर्ववत करावी आणि गांजलेल्या, नाडलेल्या अभागी महिलांचा दुवा घ्यावा! कल्याणकारी राज्यात ही गोष्ट होणं अनिवार्य आहे. ही फार मोठ्या रकमेची बाब नाही. अवघ्या काही कोटींची ही समस्या आहे, सरकार यावर विचार करेल काय? असो.

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

पंडित नेहरूंना मंटोंचे पत्र.


जागतिक किर्तीचे, विख्यात लेखक सआदत मंटो हे फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झाले. याआधी ते मुंबईत राहत होते आणि चित्रपटांसाठी लिहित होते. त्यांच्या कथांवर अश्लीलतेचे आरोप झाले होते आणि त्यांच्यावर खटलेही दाखल झाले होते.आपल्या मृत्यूच्या चार महिने बावीस दिवस आधी, ऑगस्ट 1954 मध्ये मंटोंनी नेहरुंना एक पत्र लिहिलं होतं. ‘बगैर उनवान के’ (उनवान म्हणजे शीर्षक) या लघुकथा संग्रहात मंटोंनी नेहरूंना लिहिलेले पत्र प्रस्तावनेत सामील केले गेले. त्या पत्राचा हा स्वैर मराठी अनुवाद!
___________________

अस्सलाम अलैकुम, पंडितजी

तुम्हाला लिहिलेलं हे माझं पहिलं पत्र आहे. माशाअल्लाह, तुमचं नाव पाश्चात्य समाजातही रूपवान आणि विद्वान म्हणून घेतलं जातं. पण मीही काही फार मागे नाही असं मला वाटतं. जर नशिबाने मला अमेरिकेपर्यंत पोचवलं असतं, तर कदाचित सौंदर्याच्या मोजपट्टीवर मीही काही कमी ठरलो नसतो. पण तुम्ही आहात भारताचे प्रधानमंत्री, आणि मी पाकिस्तानचा कथाकार! या दोन भूमिकांमध्ये खूप अंतर आहे. तरीही एक धागा आहे जो आपल्याला जोडतो, तो म्हणजे कश्मीर! तुम्ही नेहरू आहात, मी मंटो. आणि कश्मीरी असण्याचा दुसरा अर्थच आहे सौंदर्य, जे मी अजून डोळ्यांनी पाहिलेलं नाही, पण जाणवतं मात्र खोलवर.

मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

जॉन मिल्टन - अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भोक्ता असलेला द्रष्टा कवी!


'वास्तवाला न भिडलेले, मानवतेच्या कसोटीत अपात्र ठरलेले सद्गुण मी स्तुतीस पात्र मानत नाही!' - स्वतःला जनतेचा तारणहार, सदगुणांचा पुतळा आणि देवतासमान समजणाऱ्या एका उद्दाम राजाला उद्देशून केलेले, हे बाणेदार उद्गार एका प्रतिभाशाली कवीचे होते! तो राजा होता, ग्रेट ब्रिटनचा राजा चार्ल्स पहिला आणि ते कवी होते, जॉन मिल्टन!

1608 साली लंडनला जन्मलेले, जागतिक कीर्तीचे कवी, लेखक जॉन मिल्टन यांनी 1644 साली ब्रिटिश राजसत्ता आणि संसद या दोहोंना उद्देशून, राजकीय सेन्सॉरशिपच्या विरोधात एक पुस्तिका लिहिली होती, एरीओपॅजिटिका हे तिचे नाव.

त्यांच्याच काही भाषणांचे आणि उताऱ्यांचे एकत्रित संपादन करुन त्यांनी स्वतः हे पुस्तक प्रकाशित केले होते, या पुस्तकाने ब्रिटिश राजसत्तेच्या तोंडचे पाणी पळालं होतं!

हे पुस्तक म्हणजे जॉन मिल्टन यांचं सर्वात प्रसिद्ध राजकीय-पत्रात्मक भाषण होय. ते केवळ विचारांचं पुस्तक नसून व्यक्तिगत आयुष्यात त्यांना सोसाव्या लागलेल्या घावांमधून जन्माला आलेली साहित्यकृती होती.

कीर्तनकारांच्या मुखी घोडे लावण्याची भाषा शोभते का? – इंदुरीकरांच्या दुटप्पीपणाची नोंद!

 A person with orange turban

AI-generated content may be incorrect.


इंदुरीकर फेमस झाले ते त्यांच्या कीर्तनाच्या शैलीने!

त्यांच्या आधीच्या कीर्तनकारांनी त्यांच्यासारख्या शैलीत कीर्तन केले नव्हते. कॉमेडी कीर्तन हा वाह्यात शब्द त्यांच्यामुळे रूढ झाला. त्यांनी महिलांविषयी केलेल्या अनेक टिप्पण्या नि:संशय खालच्या दर्जाच्या आणि हीन मानसिकतेच्याच होत्या. व्यसनाविषयी आणि भरकटलेल्या तरुणांना ते झोडपून काढत हे योग्यच होते, वरवर त्यांचा आव आधुनिक कीर्तनाचा असला तरी काही बाबतीत ते मध्ययुगीन मानसिकतेचेच पुरस्कर्ते होते हे स्पष्ट जाणवत असे. असो. पोस्टचा मुद्दा तो नाहीये.

नुकताच त्यांनी त्रागा करत आपण इथून पुढे कीर्तन करणार नसल्याचे, जाहीर केलेय. त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे, आपण त्याविषयी हक्काने सांगू शकत नाही. मात्र कीर्तन बंद करण्यासाठी त्यांनी जी सबब पुढे केलीय ती अयोग्य आहे! ते म्हणतात की लोकांनी त्यांना घोडे लावलेत! (किती ओजस्वी भाषा आहे ही!)

पोरींनी लग्नात गॉगल घालून नाचू नये, गालांना मेकअप करू नये, डोळ्याखाली खाचात रंग भरू नये, लिपस्टिक लावू नये, वरात काढू नये आणि काढलीच तर त्यात नाचू नये अशा शंभर गोष्टी ते खिदळत, उड्या हाणत सांगत असत! लोकही बारुळ्यागत टाळ्या वाजवत!

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

एकमेव तत्वज्ञ सम्राट आणि मेडिटेशन!


अभिनेता रसेल क्रो याने साकारलेला 'ग्लॅडिएटर'मधला मॅक्सिमस, कमांडर ऑफ द आर्मीज ऑफ नॉर्थ, सहज विसरणे शक्य नाही. वास्तवात हे पात्र काल्पनिक होते तरीही जगभरातील सिनेरसिकांना याची भुरळ पडली याचे कारण, मॅक्सिमसची पार्श्वभूमी! प्रजेचा लाडका राजा मार्कस ऑरेलियसशी एकनिष्ठ असणारा सेनापती मॅक्सिमस आपलं सर्वस्व गमावूनही राजावर झालेल्या अन्यायासाठी प्राणांची बाजी लावतो. क्लायमॅक्सला, मार्कसचा क्रूर मुलगा सम्राट कमोडस याची तो हत्या करतो अशा मांडणीची ती काल्पनिक कहाणी होती. असो. पोस्टचा विषय तो नाहीये! पोस्ट मार्कस ऑरेलियस या अद्वितीय रोमन सम्राटाची आणि त्याने लिहिलेल्या दिव्य साहित्यकृती विषयी आहे! मेडीटेशनविषयी आहे!

आज जगभरात मेडीटेशनचा बोलबाला आहे. 'मेडिटेशन' कुणी लिहिलं याचा शोध घेतला की विस्मयकारक नाव आणि माहिती समोर येते! त्याचे मूळ रोमन साम्राज्यात पोहोचते!

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

नदीत लुप्त झालेल्या जिवांच्या शोधातला मनाचा डोह!

A person swimming in the water

AI-generated content may be incorrect.


बंगालमधली एक जुनी क्लिप पाहण्यात आली, त्यात साठीच्या आसपास वय असणाऱ्या वृद्धेविषयीची माहिती होती. तिचे घर पंधरा वर्षांपूर्वी नदीच्या पुरात वाहून गेलेलं. घरातल्या सगळ्या चीजवस्तुही वाहून गेल्या. पती निवर्तल्यापासून ती एकटीच राहायची, तिच्या हटवादी स्वभावामुळे दोन्ही मुले तिला सोडून गेली. 2010 मध्ये तिची एकुलती मुलगी बाळंतपणाला माहेरी आली होती. रात्रीतून दामोदर नदीचे पाणी वाढले आणि त्यात तिचे घर वाहून गेले, तिच्या मुलीचे शव काही दिवसा नंतर मिळाले.

त्या घटनेनंतर तिच्या मनावर खोल आघात झाला. सरकारने तिला नवे घर दिले, भांडीकुंडी घेण्यासाठी मदतही केली. अनेक विणवण्या केल्यानंतर तिने स्थलांतर केले. लोक तिला विसरून गेले. मात्र चार वर्षांनी फार मोठा पूर आला तेव्हा ती पुन्हा तिथे परतली. पूरग्रस्तांसोबत राहू लागली. सरकारी अधिकारी पुराची पाहणी करण्यास आले की ती हमखास समोर असे.

बुद्ध, मोक्ष आणि किसा गोतमी - एक अद्भुत सत्वकथा!


थेरीगाथावरील भाष्यग्रंथ असणाऱ्या अट्ठकथा या ग्रंथामध्ये किसा गोतमी नावाच्या बौद्ध भिक्खुणीची कथा आहे. किसा गोतमी हिचे तान्हे मूल आजारी पडून एकाएकी निवर्तते. आपल्यासोबत असे कसे झाले, हा प्रश्न तिला भंडावून सोडतो.

पुत्रशोकाने वेडीपिशी झालेली किसा गोतमी भगवान बुध्दांकडे याचक म्हणून येते आणि ती तथागतांना विनंती करते की, "माझ्या पुत्रावर माझे अतिव प्रेम आहे, त्याच्या शिवाय मी जगू शकणार नाही. तेव्हा हे भगवान मला मझ्या पुत्राचा जीव परत मिळवून द्या. तुमच्या शक्तींचा वापर करून हा चमत्कार करा, माझा पुत्र माझ्या पदरात टाका."

यावर भगवान बुध्दांनी तिला सांगितले की, "ठीक आहे, मी तुझे काम करेन, मात्र त्यासाठी तुला एक काम करावे लागेल. मृत्यूची गाठभेट न झालेल्या कुटुंबातून चिमुटभर मोहरी मागून आणशील तरच हा चमत्कार होऊ शकेल."

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

धर्मेंद्र - जट यमला पगला!


त्याचे श्वास अजून जारी आहेत, त्याच्या सिनेमाविषयी वा त्याच्या करिअरविषयी खूपजण खूप काही सांगतील; मला थोडेसे वेगळे सांगायचेय.. 

धरमची गोष्ट सुरु होते 1935 मध्ये. 8 डिसेंबरला पंजाबच्या साहनेवाल गावात जन्मलेला हा एक साधा जाट मुलगा. धर्म सिंह देओल त्याचं नाव. जग त्याला 'धर्मेंद्र' म्हणून ओळखते, त्याच्या आयुष्याची कहाणी, केवळ चित्रपटांच्या यशाची नाही, तर अंतर्मनातील एकाकीपणाची, प्रेमातील द्वंद्वाची आणि संघर्षातील जयपराजयाची आहे. त्याने बॉलीवूडला 'ही-मॅन' दिला, त्याच्या जीवनात असे अनेक क्षण येऊन गेलेत जेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले, हृदयात अपराधीपणाची जखम खोलवर रुजली आणि एकाकी एकांताने त्याला शांत केलं.

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

जोहरान म्हणजे आकाशातला पहिला तारा!


जोहरान ममदानी यांचा जन्म पूर्व आफ्रिकन देश युगांडाची राजधानी कंपाला इथला. त्यांना जाणून घेण्यासाठी त्यांचे वडील मोहमद ममदानी यांची माहिती घेणे अनिवार्य आहे, कारण त्याशिवाय जोहरान यांची जडणघडण आकळू शकत नाही. मोहमद ममदानी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतात मुंबईत जन्मलेले. ते दोन वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबासोबत टांझानियाला गेले आणि तिथून पुढे नजीकच्या युगांडात गेले. त्यांचे कुटुंब तिथेच स्थायिक झाले. आफ्रिकेमधल्या टॉपच्या युनिव्हर्सिटीत त्यांनी अध्यापकाचे काम केले, खेरीज ते एक उत्तम आर्थिक राजकीय तज्ज्ञ होते. इदी अमीन सत्तेत येईपर्यंत तिथल्या सर्व स्थलांतरित लोकांचे समुदाय सुखात होते, मात्र तो सत्तेत येताच त्यांना देश सोडून जावे लागले!

ड्रॅक्युला - सैतानी दुनियेच्या अनभिषिक्त सम्राटाची जन्मकथा!


हॉरर, थ्रिलर सिनेमे पाहाणाऱ्या दर्दी रसिकास 'ड्रॅक्युला' माहिती नसावा असे होत नाही! ब्रॅम स्टोकरने ज्या काळात ड्रॅक्युला ही कादंबरी लिहिली तो व्हिक्टोरियन एरा होता. या कालखंडात प्रामुख्याने चार वर्ग होते - उच्च, मध्यम, श्रमिक आणि तळाशी असणारा निम्नवर्ग. या चारही वर्गांची विभागणी केवळ सामाजिक स्तरावर नसून आर्थिक स्तरदेखील त्यात अंतर्भूत होता. या वर्गवारीचे युरोपमध्ये बऱ्यापैकी सक्त आणि कठोर विधीसंकेत होते. व्यक्तीचा आर्थिक स्तर, त्याचा हुद्दा, शिक्षण यावरून त्याचा वर्ग ठरे. यामुळे सामाजिक देवाणघेवाण अगदी कमी होई, असे असले तरी पुरुष हवे तिथे तोंड मारत आणि स्त्रियांची कुचंबणा ठरलेली असे, मग ती कोणत्याही वर्गातली असली तरीही! एखाद्या उमरावाच्या पत्नीचे जीवन भलेही ऐश आरामात, आनंदात जात असले तरी व्यक्तीस्वातंत्र्याच्या बाबतीत तिचा आणि तळाच्या स्त्रीचा स्तर जवळपास समान असे. बाहेरख्याली पुरुषांना आपल्या अवतीभवती पाहून, त्या स्त्रियांच्या मनात कोणते विचार येत असतील यावर विपुल लेखन झालेय, मात्र त्यांच्या लैंगिक शोषणाविषयी बोलताना त्यांच्या लैंगिक गरजांविषयी तुलनेने कमी लिहिले गेलेय. ब्रॅम स्टोकरने हा मुद्दा बरोबर पकडला आणि त्याच्या मनात घोळत असलेल्या गोष्टी त्यात बेमालूम मिसळल्या.

गोष्ट सुटकेसमध्ये ठेवलेल्या मृतदेहाची!


बेनाव्हिडेस हा मध्यमवयीन पुरुष. भरकटलेला आणि जगण्याच्या विविध समस्यांनी हैराण झालेला माणूस. एके दिवशी त्याच्या संयमाचा विस्फोट होतो, तो अत्यंत विचलित होतो. संतापाच्या भरात, तिशीच्या वयातल्या पत्नीची हत्या करतो. तिची हत्या केल्यानंतर काही वेळाने तो भानावर येतो. रागाच्या भरात आपण हे काय करून बसलो याचे त्याला शल्य वाटू लागते. तो गोंधळून जातो, आता काय करावे, हे काही केल्या त्याला सुचत नाही.  पत्नीचा मृतदेह तो एका मोठ्या सुटकेसमध्ये भरतो. खरेतर आपण ही सुटकेस घेऊन पोलिसांकडे गेले पाहिजे असं त्याचं एक मन सांगत असतं तर त्याचं दुसरं मन त्याला सांगतं की कदाचित डॉक्टर आपल्या पत्नीचे काय करायचे ते सांगू शकतील! द्विधा मनस्थितीत तो घराबाहेर पडतो.

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

औरते – रमाशंकर यादव विद्रोही..

A close-up of a person crying

AI-generated content may be incorrect.


काही स्त्रियांनी
स्वेच्छेने विहिरीत उडी मारून जीव दिलाय
असं पोलिसांच्या नोंदींमध्ये लिहिलंय.

आणि काही स्त्रिया
चितेवर जळून मरण पावल्या —
असं धर्मग्रंथांमध्ये लिहिलंय.

मी कवी आहे,
कर्ता आहे,
घाई कशाची?

एके दिवशी मी पोलीस आणि पुरोहित
दोघांनाही एकाचवेळी
स्त्रियांच्या न्यायालयात उभं करेन,

जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याविषयीची एक नोंद..


जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं बालपण आयर्लंडमध्ये पांढरपेशी गरिबीत गेलं. त्यांचे वडील पेशाने कारकून होते, मद्याचा अंमल चढला की त्यांना आवरणे कठीण जाई. खेरीज ते काहीसे उदासीन स्वभावाचे होते. घरात रोज भांडणं होत, भांड्यांची आदळआपट चाले. नीरव शांततेच्या जागी किंकाळ्यांचा आवाज भरलेला असे.
या वातावरणातही शॉची आई, ल्युसिंडा गार्नी शॉ हिने आपला छंद लुप्त होऊ दिला नव्हता. ती अत्यंत प्रतिभावान गायिका होती. तिचा आवाज लोकांना भावविभोर करायचा. पण तिचं आयुष्य एका अपयशी लग्नाच्या सावटाखाली हळूहळू कोमेजत चाललं होतं आणि याचं तिला शल्य होतं.

दरम्यानच्या काळात त्यांच्या घरात एक संगीत शिक्षक येत असत; जॉर्ज वँडेल ली हे त्याचे नाव. हळूहळू शॉची आई त्याच्याकडे आकर्षित झाली. दोघांमध्ये आत्मिक जवळीक वाढली. जॉर्जच्या घरी शिसवी पियानो होता. आईची बोटे पियानोच्या कळांवरुन फिरू लागली की त्याचे मन भरुन येई. त्याला विलक्षण आनंद होई.

रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

हे चाहूर आहे तरी काय?


साठच्या दशकात आईने नर्सची नोकरी प्रामाणिकपणे आणि विलक्षण संवेदनशील पद्धतीने केली. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील दहागाव या छोट्याशा खेड्यात आरोग्य केंद्रात ती रुजू झाली होती. हा भाग अजूनही निबिड अरण्यासारखा आणि अडगळीचा आहे, साठ वर्षापूर्वी तर हा भाग एखाद्या आदिम मानवी वसाहतीसारखा होता! आई अहमदनगरची, तिने कधी समुद्र पाहिलेला नव्हता, थेट कोकणात तिने काही वर्षे काढली. स्वतःला जुळवून घेण्यासाठी तिला झगडावे लागले!

अतिशय खडतर परिस्थितीतून तिने स्वतःला उभं केलं आणि कमालीच्या सहनशील, संयमी, जिद्दी वृत्तीने पुढचे आयुष्यही कष्टात काढले. विपरीत परिस्थितीतही तिने चारही अपत्ये घडवली! आम्हा चारही भावंडांना शिक्षणाची गोडी लावण्यात आणि लेखन वाचनाची ओढ निर्माण करण्यास सर्वस्वी तिच कारणीभूत होती. ती होती, म्हणून आम्ही सर्व घडलो. माझी भावंडे जितक्या चांगल्या पद्धतीने आईवडिलांच्या कसोटीस उतरली त्या मानाने मी खूपच कमी पडलो आणि नंतरही निखारु शकलो नाही, हे वास्तव मी लिहिले पाहिजे.

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

शेवाळं..



ही गोष्ट फार जुनी नाहीये. अलीकडचीच आहे, अजूनही लख्ख आठवते.
तो पस्तीसेक वर्षांचा होता. मी त्याला गावाबाहेरच्या डोहाकडे वळताना खूपदा पाहिलं होतं. नंतर त्याची कथा कळली..

त्याचा कोवळा किशोरवयीन मुलगा अकाली गेल्यापासून रोज सकाळी तो गावाबाहेरच्या डोहाजवळ यायचा. डोहातल्या माशांना प्रेमाने खाऊ घालायचा. घरून येतानाच कणकेच्या छोट्या गोळ्या घेऊन यायचा.

डोहाच्या काठावर बसून अगदी शांतपणे डोहातल्या हिरवट निळ्या पाण्यात माशांसाठी एकेक गोळी फेकायचा. त्याने कणकेची गोळी फेकताच माशांची झुंबड उडायची. खरे तर या डोहात पूर्वी एकही मासा नव्हता, हे सर्व मासे त्यानेच आणून सोडले होते.

इथे आलं की त्याला खूप शांती लाभायची. त्या डोहापाशी मनुष्यवस्ती नव्हती नि कसली वर्दळही नव्हती. तो डोह, गर्द वनराईत हिरव्या काळ्या सावल्यांच्या दाटीत दडून होता. रात्रीच नव्हे तर दिवसादेखील तिथे विलक्षण नीरव शांतता असे. एकट्याने थांबले तर मनात भीतीचे काहूर उठावे असा तिथला भवताल होता.

ब्लड रिव्हर - टिम बुचर यांची अद्भुत कादंबरी!


नुकतेच आपल्या देशाच्या राजधानीत यमुना नदीच्या अस्वच्छतेवरून मोठा तमाशा झाला, छट पूजेसाठी खोट्या स्वच्छ पाण्याची नौटंकीही करुन झाली. बेसिकली आपल्याकडे, नद्यांना आपण नावाला पवित्र मानतो, त्यापलीकडे आपली त्यांच्याप्रती आस्था नाही हे आपण खुल्या मनाने मान्य केले पाहिजे. अमुक एक नदी पुराणात आहे, तमुक एक नदी इतिहासात आहे, अलाण्या नदीचे पाणी पवित्र आणि फलाण्या नदीचे पाणी मोक्ष देते इत्यादी कल्पनात आपण, आपल्याच स्वार्थासाठी गुंतून पडलो आहोत. जसे की आपले दुष्कर्म कमी व्हावे, आपली पापे कमी व्हावीत, आपल्याला आशीर्वाद लाभावेत, आपलं कल्याण व्हावं, वगैरे वगैरे! म्हणजे आपण नदीला काही देणार नाही, नदीसाठी आपण काही करणार नाही आणि त्या बदल्यात तिच्याकडून आपल्याच कथित भल्याच्या कपोलकल्पित गोष्टी मागणार, पुण्य वाढवून मिळावे म्हणून डुबकी मारणार! आणि नदीला आपण काय देणार, तर ड्रेनेजचे पाणी, गटार नाल्यांचे पाणी, रासायनिक कारखान्यांचे दूषित पाणी आणि आपणच टाकलेला गावभराचा कचरा! नदी गढूळ विषारी घाण होऊन जाते, तरीही आपण तिच्यासाठी झिजत नाही की तिच्यासाठी आपला जीव तीळतीळ तुटत नाही! नद्या आपल्या जीवनदायिन्या आहेत वगैरे ज्ञानकण फुंकायला मोकळे होतो. सरकारेही आपल्यासारखीच कागदावर अब्जावधी रुपयांच्या योजना आणतात, काही कोटी खर्च होतात, नदी कणभरच बदलते पण मणभर पैसा इकडे तिकडे फिरतो! घाण गलिच्छ अवतारात नदी वाहत राहते! नदीविषयी आपल्यात अनास्था आहे हे कटूसत्य आहे.

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

सरस्वती चंद्र - एक हळवी व्यथा!


प्रेम जरी अपूर्ण राहिले, तरी ते आत्म्याला पूर्णत्व देऊन जाते हा अभूतपूर्व संदेश ‘सरस्वतीचंद्र‘ कादंबरीमध्ये होता; यातली नायिका शेवटी म्हणते की, 'विरहच खरेतर आत्म्याच्या मुक्तीचा आरंभ असतो.'एखाद्या व्यक्तीने कुणावर प्रेम केले असेल मात्र तिच्यासोबत विवाह झाला नसेल तर त्या व्यक्तीच्या मनात नेमकी कोणती तगमग होते?
जिच्याबरोबर प्रेम केले तिच्यासोबत विवाह होऊ न शकलेल्या व्यक्तीला त्या विवाहित प्रेयसीच्या घरात व्यवसायात रोज आपलं तोंड दाखवावं लागेल अशी परिस्थिती उद्भवली तर कशी मनोवस्था होईल?

प्रेम केले म्हणजे सर्वस्व अर्पण केले पाहिजे असे काही नाही, मात्र आपण एकमेकांवर निस्सीम निरपेक्ष प्रेम करत होतो ही गोष्ट तरी त्या दोन प्रेमी जीवांनी जाणून घेतली पाहिजे!

नूतनची मुख्य भूमिका असणारा ‘सरस्वतीचंद्र‘ हा याच नावाच्या गुजराती कादंबरीवर आधारित होता. गोवर्धन त्रिपाठी यांनी लिहिलेल्या या कादंबरीची कथा दोन गुजराती ब्राह्मण कुटुंबांवर केंद्रित आहे. लक्ष्मीनंदनचे कुटुंब मुंबईत स्थायिक आहे, त्यांचा व्यवसाय भरभराटीस आलेला आणि ते खूप श्रीमंत! सरस्वतीचंद्र हा लक्ष्मीनंदन आणि चंद्रलक्ष्मी यांचा पुत्र. तो एक उच्च बुद्धिमत्ता असणारा विद्वान, हुशार वकील आणि संस्कृत, इंग्रजी साहित्याचा स्कॉलर अभ्यासक. वडिलांच्या व्यवसायातही तो यशस्वीरित्या योगदानही देतो. त्याचे भविष्य उज्ज्वल असते.

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

इदी अमीन - स्वप्नाळू राष्ट्रवादाचा दमनकारी सत्ताधीश!


विदेशात राहणाऱ्या काही अगोचर आणि मूर्ख भारतीयांच्या आततायी वर्तनामुळे जगभरात भारतीय लोकांविरोधात आवाज उठवला जातोय हे आता लपून राहिलेले नाही, अलीकडील दोनेक वर्षात तर या गोष्टी वेगळ्याच स्तरावर पोहोचल्यात. नेमक्या याच काळात जागतिक कीर्तीच्या द इकॉनॉमिस्ट या नियतकालिकात युगांडाचा हुकूमशहा, इदी अमीन या क्रूरकर्म्याविषयीचा लेख ठळक पब्लिश झालाय. युगांडामधील परकीय नागरिकांना खास करून भारतीय नागरिकांना, त्याने अत्यंत क्रूरपणे देशातून पलायन करण्यास भाग पाडलं होतं.

1976 साली लंडनमधील मॅडम तुसॉ या मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयाने आपल्या भेट देणाऱ्यांना विचारलं की, “संग्रहालयातील सर्वात नावडती व्यक्ती कोण?” त्या मतदानात युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन दुसऱ्या क्रमांकावर आला होता, अर्थातच पहिला क्रमांक होता अडॉल्फ हिटलरचा! (आपल्याकडील काहींना याची मोठी भुरळ पडलेली असते! असो) त्या काळात ब्रिटनमधील वृत्तपत्रांत अमीनच्या क्रूर कृत्यांच्या कथांचे रकाने गच्च भरलेले असत. त्यातील काही गोष्टी खर्‍या होत्या, जसे की तो खरंच हजारो लोकांचा खुनी होता. पण काही वदंता होत्या जसे की, त्याने आपल्या फ्रीजमध्ये शत्रूंची मानवी डोकी ठेवली होती, काहींच्या मते ही गोष्ट खरी होती. तो नरभक्षक होता. कोवळी मुले आणि शत्रू त्याचे भक्ष असत. तो भोगी होता आणि अय्याश होता!

शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

शिऊलीची फुलं - अलंकृताची लोभस नोंद!

काही माणसं अगदी लोभस वर्णन करतात, केवळ एका ओळीतच ते अफाट काही सांगून जातात. कोलकत्यात फिरताना अलंकृता दासच्या घरी गेलो होतो. सोबत अबीर होता, निहायत बडबड्या स्वभावाचा हुशार तरुण! माझ्या येण्याचे प्रयोजन सांगताच अलंकृताच्या जास्वंदी चेहऱ्यावर तृप्ततेची फुले उमल्ली! माझ्या नि अबीरच्या प्रश्नांवर ती भरभरून बोलत होती.

आमच्याशी बोलत असताना पांढऱ्या शुभ्र साडीच्या पदराच्या टोकाशी तिच्या हातांचा चाळा सुरू होता तो एकाएकी थांबला आणि थांबा, तुम्हाला काहीतरी तजेलदार प्यायला देते असं म्हणत ती आत गेली.

दोनच खोल्यांचे तिचे घर अगदी नीटस होतं, अतिशय देखणं होतं! घरात श्रीमंती कुठेच डोकावत नव्हती मात्र एका कलावंत रसिक व्यक्तीचे ते घर आहे हे पाहता क्षणी लक्षात येत होतं.

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

स्वामी दयानंद सरस्वती - एक नोंद ..


ते 1867 चे साल होते. हरिद्वारच्या कुंभमेळ्यात स्वामी दयानंद सरस्वती धर्मप्रचाराच्या उद्देशाने आले होते. या मेळ्यात लाखो हिंदू स्त्री-पुरुष आणि साधू एकत्र येतात, त्यांच्याशी संवाद साधता येईल असा त्यांचा हेतू होता. कुंभमेळ्याच्या वेळी गंगेत स्नान केल्याने पाप धुतले जाते आणि मनुष्याला दुःखांपासून तसेच जन्म-मरणाच्या फेर्‍यातून मुक्ती मिळते ही श्रद्धा तेव्हाही जनमानसात रूढ होती, त्याविषयी दयानंदांना बोलायचे होते.
हरिद्वारमध्ये आल्यावर स्वामीजींनी पाहिले की, साधू आणि पंडे धर्माचा खरा उपदेश न करता लोकांना पाखंड शिकवून फसवत होते. समाज सत्य धर्माच्या मार्गावर चालण्याऐवजी अज्ञानाच्या खोल खाईत पडत चालला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कुंभ मेळ्यातील दृश्यांनी त्यांना अंतर्मनातून खोल वेदना झाल्या. त्यांनी जाणले की, लोक दुःखातून मुक्त होण्याऐवजी अशा कृत्यांमुळे दुःखाच्या भवसागरात बुडून जाताहेत.

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

बशीर बद्र - खामोशी एका शायराची..

बशीर बद्र सरांना त्यांचा ख़ुदा आता नक्कीच दिसत असेल..


विख्यात शायर, कवी बशीर बद्र आजारी असल्याचं ऐकून वाचून होतो. मध्यंतरी काही नतद्रष्ट लोकांनी त्यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल केली होती, वास्तवात ते गंभीर आजारी आहेत.

नुकताच त्यांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला, ज्यात बद्र सरांच्या पत्नी राहत बद्र, त्यांची शुश्रूषा करताना दिसल्या, बशीर सरांची यारदाश्त चांगली राहावी म्हणून त्यांच्या शेरो शायरीबद्दल बोलताना दिसल्या, बद्र सरांना डिमेन्शिया आणि अल्झायमरने ग्रासलेय.

त्यांचा भूतकाळ ते हळूहळू विसरत चाललेत, त्यांच्या माणसांची त्यांना ओळख लागेनाशी झालीय. त्यांचं स्वतःचं अस्तित्वही ते काही काळात विसरतील. त्यांचा जीव की प्राण असणारी शायरीदेखील त्यांच्या स्मरणनोंदीतून लुप्त होईल.

ते ब्लँक होतील. उरेल केवळ, त्यांची मंद गतीतली धडधडती नब्ज!

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

इतिहास बदनाम वस्तीचा - मीरतच्या कबाडी बाजारचा!



उत्तर प्रदेशच्या मीरतमधील कबाडीबाजार भागातील एका पियक्कड थोराड बाईने एका भेटीत 'ओल्ड मंक' पिणाऱ्या तरूण, प्रौढ आणि वयस्कर पुरूषांची गुणलक्षणे आणि सवयी सांगितल्या होत्या!विशेष म्हणजे तिन्ही वर्गवारीतील पुरुषांच्या त्या गोष्टी आणि त्यांची प्यायची पद्धत यांच्यात एक परस्पर सूत्र होतं, जे अफाट होतं! तेव्हापासून ओल्ड मंक पिणाऱ्या ओळखीच्या इसमांना ते वर्णन फिट बसतंय का हे चेक केल्यानंतर अक्षरश: अवाक होण्याची वेळ आली!

रेड लाइट डायरीज सिरिजमधील माझ्या आगामी पुस्तकातील मदिराक्षीच्या प्रकरणात विविध रंजक संदर्भ आणि नोंदी आहेत, त्यातच ही नोंद समाविष्ट आहे.

कबाडी बाजारची ही बदनाम वस्ती मुघल काळापासूनची आहे. 2019 मध्ये इथला हा व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासनाने जंग जंग पछाडले. धंदा पूर्ण बंद झाल्याचे जाहीरही केले पण याचवर्षी सप्टेंबरमध्ये एका रेडद्वारे वीस जणींची सुटका करण्यात आलीय, यावरून काय ते कळावे.

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

प्रेमाच्या लाडूंची गोष्ट!



स्त्री अविवाहित असो की विवाहित तिला मित्र असला की, बऱ्याच मोठ्या प्रमाणात अजूनही लोक भुवया उंचावून पाहतात. 'खुलूस'मधला संपूर्ण प्रवास एका मुलीच्या शोधातला आहे. तीन दशकांचा तो काळ आहे. त्यावर सविस्तर लिहिले तर ती एक कादंबरीच होऊ शकेल, इतका त्यात ऐवज आहे. असो. त्या मुलीचे नाव होते लक्ष्मी! कोविडच्या दुसऱ्या लाटेत जुन्या हैद्राबाद शहरात विपन्नावस्थेत तिचे देहावसान झाले. आज ती हयात असती तर तिच्या काही इच्छा नक्कीच पुऱ्या करता आल्या असत्या. मधल्या काळात तिची माझी एक जरी भेट झाली असती तरी तिला हायसे वाटले असते, तिचे जगणे सुसह्य झाले असते. सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होत नाहीत आणि साऱ्याच गोष्टी उलगडून सांगता येत नाहीत! आज तिचा उल्लेख करायचा कारण म्हणजे आजचा दिवस राष्ट्रीय गर्लफ्रेंड्स डे! तसे तर तिला विसरता येणार नाही मात्र हा दिवस खास तिच्यासाठी! ही पोस्ट तिच्यासह एका परिचित व्यक्तीच्या न पाहिलेल्या मैत्रिणीसाठी, प्रेमिकेसाठी!

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

थिरुनल्लूर करुणाकरण यांच्या कविता आणि अष्टमुडी तलाव!..


अष्टमुडी तलाव हा केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील एक नयनरम्य नि महत्त्वाचा तलाव, अद्भुत नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध. 'केरळचे प्रवेशद्वार' या नावाने ख्यातनाम! बालकवींच्या कवितेत जसा विशिष्ट भूप्रदेश सातत्याने डोकावतो तद्वत हा अष्टमुडी तलाव थिरुनल्लूर करुणाकरण या विख्यात मल्याळम कवीच्या कवितेत अनेकदा नजरेस पडतो.

बालकवींच्या औदुंबर कवितेत तलावाकाठचे नितळ औदासिन्य आहे, अगदी तसेच नसले तरीही त्याच्याशी आपली जातकुळी सांगणारी एक कविता थिरुनल्लू र करूणाकरण यांनी लिहिली आहे. 'निळासांवळा झरा
वाहतो बेटाबेटातुन, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे. हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे. ... पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर..' या पंक्ती बालकवींच्या कवितेतल्या.

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

भीमेचे अश्रू..


7 मार्च 1966. आमच्या सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या भीमेच्या (चंद्रभागा) पात्रावरील उजनी धरण प्रकल्पाचं भूमिपूजन सुरु होतं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. नाईक यांनी नारळ वाढवला आणि यशवंतराव चव्हाण कुदळ मारण्यासाठी पुढे झाले अन त्यांच्या डोळ्यात पाणी आले. धोतराचा सोगा डाव्या हाताने उचलून धरत त्यांनी कुदळ खाली टाकली. थोडेसे पुढे सरसावले. नदीपात्राच्या दिशेने दोन्ही हात जोडून ते उभे राहिले. गदगदलेल्या आवाजात ते बोलले, "विठ्ठला मला माफ कर बाबा, मी औचित्यभंग करतोय. तुझी चंद्रभागा मी अडवलीय मला पदरात घे!".. कार्यक्रमाच्या भाषणात देखील त्यांनी हा सल बोलून दाखवला. आज या भीमेने आणि तिच्या उपनद्यांनी रौद्र रूप धारण केलेय! काय झालेय नेमके?

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

मिगेल टोर्ग - देशोदेशीचे मोर्गाडो!


मिगेल टोर्ग हे पोर्तुगाल मधले महत्वाचे आणि जागतिक ख्यातीचे लेखक. त्यांचं साहित्य जगभरात वाचलं जातं. 1940 साली प्रकाशित झालेला बिशोस (Bichos) हा त्यांचा गाजलेला लघुकथासंग्रह. यात वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या चौदा कथा आहेत.

या सर्व कथा प्राणीविश्वाशी निगडित आहेत. प्राण्यांचे सहजीवन आणि त्यांच्या वाट्याला आलेले मनुष्य अशी मांडणी काही कथांत आहे. 'मोर्गाडो' ही कथा यापैकीच एक आहे. ही एका खेचराची काहीशी करुण आणि नर्मविनोदी कथा आहे.

मोर्गाडो हा, घोडा आणि गाढव यांच्या संकरापासून तयार झालेला खेचर. पोर्तुगालच्या ट्रास-ओस-मॉंटेसमधील एका श्रीमंत शेतकऱ्याच्या घरी तो वाढलाय. त्याच्या प्रथमपुरुषी निवेदनातून कथा समोर येते, ज्यात तो आपल्या जीवनाचा अर्थ, मालकाशी असलेले नाते आणि निष्ठुर मृत्यूची अटळ गोष्ट यांचा विचार मांडतो.

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

चकवा!


सुनीता सकाळच्याच ट्रेनने माहेरी निघाली होती. तिचे सारे चित्त गावाकडच्या घरी लागलं होतं. आदल्या रात्रीस तिचा थोरला भाऊ औदुंबरचा तिला फोन आला होता, "अक्काची तब्येत लई खालावलीय. आबांनी दिकून जिवाची धास्ती घेतलीय, ते तुझी वाट बघत्येत तायडे; तवा तू ताबडतोब निघून ये" इतकंच त्यानं सांगितलं होतं. बाकीचे तपशील सांगितलेच नव्हते. तिने कॉलबॅक करून विचारलं तेव्हा, 'आता जास्ती बोलायची वेळ नाहीये, तू लवकर निघ आल्यावर समदं कळंलच' असं त्यानं सांगितलेलं. अक्का म्हणजे पारुबाई, सुनीताची आई आणि आबा म्हणजे सुखदेव गणाजी भोसले, सुनीताचे वडील. सुखदेव आणि पारुबाई या जोडप्याला सहा अपत्ये, चार मुलं आणि दोन मुली. पैकी औदुंबर सर्वात थोरला होता, सुनीता त्याच्या पाठची होती. सुनीताच्या पाठीवर सहदेव महादेव ही जुळी मुलं त्यांना झाली. त्यांच्या नंतर अनिता झाली नि सर्वात शेवटी अनंता झालेला. सुखदेवचे वडील गणाजी भोसले हे गावातले तालेवार आसामी होते, त्यांची चार चाहूर जमीन होती. दहा परस खोल असणाऱ्या चार ताशीव विहिरी होत्या, भलेभक्कम दगडी चिऱ्यांचे तीन वाडे होते, शंभराहुन अधिक जित्राबांचा गोठा होता, अफाट दूधदुभतं होतं. बारमाही धान्याची कणगी भरलेली असायची. आभाळाला शिवणारी कडब्याची गंज वस्तीवर थाटात उभी असायची. रानाच्या चौदिशेने असणाऱ्या बांधांवर झाडांची हिरवाई लगडलेली असे. सोन्याच्या पिकाला मोत्याचं कणीस यायचं. घराचं छानसं गोकुळ होतं. सुखदेवच्या पाचही अपत्यांचं लग्न झालं होतं. चांगल्या घरच्या सुशील मनमिळाऊ संसारी सुना मिळाल्या होत्या नि त्याच्या लेकीही उबदारी असलेल्या घरी नांदत होत्या. घरात डझनभर नातवंडे होती, गोठ्यात खंडीभर वासरं कालवडी होत्या, शेतशिवारात रानोमाळ सुखाचं वारं वाहत होतं! सुखदेव आणि पार्वती आपल्या संसारसुखासाठी पांडुरंगाच्या चरणी लीन असत, त्याचे ऋण मानत. नियतीला हे सुख बघवलं नाही, त्यांच्या सुखात बिब्बा घातला तो थोरल्या जावयाने!

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

क्लिऑन – धूर्त कपटी रोमन नेता!


इसवीसनपूर्व पाचव्या शतकात क्लिऑन हा अथेन्समधील एक लोकप्रिय नेता (demagogue) होता, जो आपल्या आक्रमक वक्तृत्वासाठी आणि सामान्य जनतेच्या भावनांना हात घालण्यासाठी ओळखला जायचा.

क्लिऑनने पेलोपोनेसियन युद्धादरम्यान स्पार्टाविरुद्ध आक्रमक धोरणांचा पुरस्कार केला आणि सत्ताधारी वर्गाला (aristocrats) बदनाम करण्यासाठी जनतेच्या मनामध्ये आक्रोश निर्माण केला, त्याने जनतेच्या संतापाचा वापर केला.

प्रतिस्पर्ध्यांवर खोटे आरोप ठेवून किंवा त्यांच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जनतेचे लक्ष विचलित केले. उदाहरणार्थ, स्फॅक्टेरियाच्या युद्धात (Battle of Sphacteria, इ.स.पू. 425) त्याने सैन्याचे यश स्वतःच्या नावावर घेतले आणि युद्धविरोधी नेत्यांना कमजोर केले. त्याच्या या रणनीतीमुळे तो अथेन्सच्या राजकारणात प्रभावशाली नेता बनला.

मंगळवार, २९ जुलै, २०२५

साप - मनातले आणि हरवलेल्या जंगलातले!



साप हा शेतकऱ्याचा मित्रच! काही हजार वर्षापूर्वी जेव्हा आताच्या विविध धर्मातल्या देवदेवतांच्या संकल्पना रूढ नसतील तेव्हा माणूस निसर्गातील प्रतिकेच शिरी मिरवत असावा, त्यांच्यापुढेच नतमस्तक होत असावा. सूर्य, चंद्र, तारे, चांदण्या हे त्याची तत्कालीन दैवते (?) असावीत. पर्वतशिखरे, टेकड्या, नद्या, मैदाने, शेतशिवारे, जंगले यांची तो आराधना करत असावा. त्याच्यासाठी झाडे, पाने, फुलं, पाणी, पाऊस, अग्नी हे सर्व जीवश्च असणार. त्यांची आपल्यावर कृपा राहावी हा विचार त्याच्या मनात जेव्हा आला असेल वा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्याने निसर्गातल्या अशा सर्व प्रतिकांना वंदनीय स्थान दिले असणार. जेव्हापासून कृषक संस्कृती अस्तित्वात होती तेव्हापासून झाडे, पाने, फुलं, पाणी. पाऊस, साप, माती, पिके आदींना वेगळेच स्थान असावे. त्यांच्या नागपूजनाचे कारण हे असू शकते. आताच्या समाजाच्या डोक्यात नागपूजनाची ती संकल्पना अंशतःही नाही. सर्वच धर्मात अशा सर्व प्रतिकांना वेगळेच स्वरूप दिले गेल्याने यामागची मूळ भावना कधीच लोप पावली असावी. आता नारायण नागबळी या भाकड संकल्पनेपुरताच अनेकांचा नागांशी संबंध उरलाय! असो. व्ही.सुरेश या प्रसिद्ध सर्पमित्राविषयी ही पोस्ट!

मंगळवार, २२ जुलै, २०२५

चिरेबंदी गोठ्यातले नंदी!


एक काळ होता जेव्हा प्रत्येक गावातील बहुतांश शेतकऱ्यांकडे गुरे ढोरे असत. ज्याचं शेतशिवार मोठं असे त्याच्या रानात मजबूत गोठा असे. बऱ्यापैकी संख्येत शेळ्या मेंढरं असत, कोंबड्यांची खुराडी असत! रानात हिरवीगार कंच पिकं डोलत असत. पाना फुलांनी डवरलेली चॉकलेटी हिरवी झाडं माना तुकवून उभी असत. रानात कडब्याची भली मोठी गंज असे. झालंच तर गुरांना खायला हिरवंगार कडवळ नाहीतर मकवन तरी असेच, बळीराजाची लईच अडचण असली तर मागून आणलेलं हिरवं वाडं तरी असतंच. एव्हढे करूनही खेरीज जमलं तर अमुन्याची पाटी रोज संध्याकाळी गोठ्यातल्या गुरांसमोर ठेवली जायची. कडबाकुट्टी करून झाली की दावणीत त्याची लगड टाकली जाई. गुरं वळायला गुराखी पोरं असत. सकाळच्या धारा काढून झाल्यावर दिवस डोक्यावर यायच्या आधी गुरं चरायला माळावर नाहीतर गावच्या शीवेच्या हद्दीत नेली जात. हे दृश्य एके काळी खेड्यात दररोज संध्याकाळी सार्वत्रिक असे. विशेषतः गेलेली गुरे सांजेस परत येत तेव्हा हे श्यामल सुंदर दृश्य हमखास नजरेस पडे. गोठ्याकडे परतणाऱ्या लेकुरवाळ्या गायी-म्हशींच्या गळ्यातील घंटांचा आवाज ऐकून गोठ्यात दावणीला बांधून ठेवलेली त्यांची वासरे ताडकन उठून उभी राहत. कान ताठ करून आवाजाकडे कानोसा देऊ लागत, आनंदाने आपले सर्वांग थरथरवू लागत, घंटांचा आवाज जसजसा जवळ येईल तशी वासरे हंबरू लागत अन् आपल्या वासरांच्या हंबरण्याच्या आवाजाने त्या गोमाता अवखळपणे धावू लागत. धावणाऱ्या जनावरांच्या खुरांनी धुळीचे मंद लोट हवेत उडत, या गायी धावतच गोठ्यात आल्या की त्यांचे तटतटलेले पान्हे वाहू लागत. वासरांचे तोंड त्यांच्या कासेला जाऊन भिडले की, गायी आपल्या वासरांना मायेने चाटू लागत. हे मनोरम दृश्य बघून कुणाच्याही ठायी असलेला थकवा कुठच्या कुठे पळून जायचा. पाहणाऱ्याच्या प्रसन्न चेहऱ्यावर एक निरागस हसू उमटत असे. त्यांनाही आपल्या आईची आठवण येई आणि नकळत त्यांचेही मन आपापल्या माऊलीच्या ओढीने धाव घेत असे! हे दृश्य आता फारसे दिसत नाही. मात्र ज्या काळात जात्यावरच्या ओव्या अस्तित्वात होत्या, त्या काळात मात्र याचे मोठे प्रस्थ होते, त्यामुळे साहजिकच याचे प्रतिबिंब ओव्यांमध्ये पडलेले दिसते.

बुधवार, ९ जुलै, २०२५

ब्लॅक बॉक्स डायरीज – एकाकी स्त्रीच्या संघर्षनोंदी


'ब्लॅक बॉक्स डायरीज' ही 2024 मध्ये प्रदर्शित झालेली एक शक्तिशाली आणि एका पीडित महिलेच्या वैयक्तिक नोंदीविषयीची डॉक्युमेंट्री आहे, जी जपानी पत्रकार शिओरी इतो यांची निर्मिती आहे. सिनेमॅ व्हेरिटे शैलीत याची निर्मिती केली गेलीय, ज्यामध्ये शिओरी यांच्या वैयक्तिक व्हिडिओ डायरीज, कोर्टरूम फुटेज आणि गुप्त रेकॉर्डिंग्ज यांचा समावेश आहे. त्यायोगे प्रेक्षकांना एक थरारक, भावनिक अनुभव मिळतो, जो शिओरी यांच्या संघर्षाची आणि धैर्याची जाणीव करून देतो. ही त्यांची पहिली पूर्ण-लांबीची डॉक्युमेंट्री, जी त्यांनी स्वतःच्या लैंगिक अत्याचाराच्या अनुभवावर निर्मिलेली. यात शिओरी इतो स्वतःच्या केसचा तपास करतात आणि एका प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध न्याय मिळवण्यासाठीचा त्यांचा लढा दाखवतात. हा लढा जपानमधील तत्कालीन #MeToo चळवळीचा एक महत्त्वाचा भाग बनला होता आणि त्याने जपानच्या कालबाह्य कायदेशीर आणि सामाजिक व्यवस्थांवर प्रकाश टाकलेला.

मंगळवार, ८ जुलै, २०२५

बदनाम गल्ल्यातले सच्चेपण – सैली 13 सप्टेंबर!



श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेला 'सैली 13' सप्टेंबर हे आत्मकथनपर कथासंग्रह त्या काळातला आहे ज्या काळामध्ये मराठी जनमानसात सोवळे ओवळे पाळले जात होते इतकेच नव्हे तर साहित्य प्रवाहात देखील अशा प्रकारचे अंडर करंट अस्तित्वात होते. अपवाद दलित साहित्याचा! मराठी साहित्यातील शहरी / नागर आणि ग्रामीण या वर्गवारीपैकी कथित शहरी साहित्यामध्ये जे विविध आशय विषय हाताळले गेलेत त्यातही काही घटक बऱ्यापैकी अस्पृश्यच राहिलेत. अर्थात यातही काही तुरळक सन्माननीय अपवाद होते. मराठी साहित्यामध्ये ज्याप्रमाणे विज्ञान कथा, मनोविश्लेषणात्मक कथा, निढळ लैंगिक कथा, वैश्विक वैचारिक समाजपट असणारे वाङ्मय तुलनेने कमी निर्मिले गेलेय, त्याचप्रमाणे काही विशिष्ठ वंचित शोषित घटकांचा अंतर्भाव असणारे सामाजिक साहित्यही कमी लिहिले गेलेय. त्यातलाच एक घटक वेश्या होय. वेश्या आणि वेश्यावस्ती यावर ज्ञात मराठी साहित्यातले आजवरचे सर्वाधिक भेदक, परिणामकारक लेखन नामदेव ढसाळांनी केलेय हे सर्वश्रुत आहे. अन्य काहींच्या लेखनामध्ये याविषयी कधी तुरळक तर कधी दीर्घ उल्लेख आहेत. देहविक्री करणाऱ्या पुरुषांचा कथावकाश मराठी साहित्यात येण्यासाठी तर 2019 चे साल उजाडावे लागलेय. डॉ. माधवी खरात यांच्या 'जिगोलो' या कादंबरीने ती उणीव भरुन काढली.

गुरुवार, ३ जुलै, २०२५

टायटन – एका डिझास्टरची दुःखद गोष्ट!




'टायटन द ओशियनगेट सबमरीन डिझास्टर' ही 2025 मध्ये रिलीज झालेली 'नेटफ्लिक्स'वरील डॉक्युमेंटरी आहे, जी 18 जून 2023 रोजी टायटॅनिकच्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या ओशियनगेट कंपनीच्या टायटन सबमर्सिबलच्या अंतर्गत स्फोटाने झालेल्या दुर्घटनेला केंद्रस्थानी ठेवते. ही दुर्घटना जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली होती, कारण यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन मार्क मुनरो यांनी केले आहे आणि ती या घटनेच्या मुळाशी असलेल्या कारणांचा, तांत्रिक त्रुटींचा आणि मानवी चुका यांचा सखोल अभ्यास करते.

गुरुवार, १९ जून, २०२५

अभिनिवेषातून प्रसवणारी प्रेमाची, विवाहसंस्थेची हत्या!


कुटुंबाच्या संमतीची पर्वा न करता प्रेमविवाह करणाऱ्या वर वधूची हत्या करण्याचे प्रमाण आणि समाजाचा विवाह सोहळ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांचा परस्पर संबंध आहे. देशातील प्रत्येक राज्यात याचे स्वरूप भिन्न असले तरी निष्कर्ष मात्र सारखाच येतो. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास कथित उच्चवर्णीयांमध्ये याची अधिक बाधा जाणवते.

'लग्नांच्या बाबतीत गाव काय म्हणेल ?' या प्रश्नाने खेड्यातल्या मराठ्यांना इतके ग्रासलेले असते की त्यापुढे त्यांच्या जीवनातल्या सर्व समस्या त्यापुढे फालतू ठराव्यात.
लग्न थाटातच झालं पाहिजे. मानपान झाला पाहिजे. पाचपंचवीस भिकारचोट पुढारी लग्नात आले पाहिजेत. जेवणावळी झाल्या पाहिजेत. गावजेवणे झाली पाहिजेत आणि वाजतगाजत वरात निघाली पाहिजे.
एकंदर गावात हवा झाली पाहिजे, चर्चा तर झालीच पाहिजे असा सगळा माहौल असतो.

शुक्रवार, १३ जून, २०२५

एअर इंडिया फ्लाइट क्रॅश - वेटिंग फॉर फायनल कॉल..

प्रतिकात्मक फोटो 

सर्वात वाईट असतं निरोप न घेता कायमचं निघून जाणं...

कालच्या विमान अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या करुण कहाण्या एकेक करून समोर येताहेत. त्यातली अत्यंत दुःखद दास्तान पायलट सुमित सभरवाल यांची आहे. ते अविवाहित होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांचे वडील 88 वर्षांचे असून ते बेडरिडन आहेत. सुमित आपल्या वडिलांना अधिक वेळ देऊ इच्छित होते. मात्र त्यांची एक्झिट अनेकांना चुटपुट लावून गेली.

एखादा माणूस अकस्मात आजारी पडला वा त्याचा अपघात होऊन त्याची अवस्था गंभीर झाली तर निदान त्याला पाहता येतं. स्पर्श करता येतं. त्याच्याशी एकतर्फी का होईना पण संवाद साधता येतो. तो बोलण्याच्या अवस्थेत असेल तर अखेरचे दोन शब्द बोलू शकतो.
संबंधित व्यक्तीचे देहावसान झाल्यावर त्या दोन शब्दांचा आधार आयुष्यभर साथ देतो.

जाणाऱ्यालाही कदाचित काही अंशी समाधान लाभत असेल की, आपल्या अंतिम समयी आपल्या प्रियजनांना पाहू शकलो, स्पर्श करू शकलो, एखादा दुसरा शब्द बोलू शकलो! त्या जिवाची तगमग कणभर का होईना पण कमी होत असेल!

मात्र निरवानिरवीची भाषा न करता, अंतिम विदाईचा निरोप न घेता कुणी कायमचं निघून गेलं तर मागे राहिलेल्या आप्तजनांना विरहाची तळमळ आमरण सोसावी लागते. मोठे वेदनादायी नि क्लेशदायक जगणे वाट्याला येते. काहींच्या बाबतीत काळ, जखमा भरून काढतो तर काहींना त्या वेदनेसह जगावे लागते.

बुधवार, ११ जून, २०२५

कलावंतांच्या गहिऱ्या प्रेमाचे सच्चे उदाहरण!


काही गोष्टी हिंदी सिनेमांतच शोभून दिसतात मात्र काही खऱ्याखुऱ्या गोष्टी अशाही असतात की सिनेमाने देखील तोंडात बोटे घालावीत. ही गोष्ट अशाच एका युगुलाची. आपल्याकडे कला क्षेत्रातील प्रेमाचे दाखले देताना नेहमीच अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या प्लेटॉनिक नात्याचा उल्लेख केला जातो. कदाचित हिंदी आणि पंजाबीचे उत्तरेकडील वर्चस्व याला कारणीभूत असावे. खरेतर असेच एक उदाहरण आसामी कलाक्षेत्रातलेही आहे, मात्र त्याचा फारसा उल्लेख कुठे आढळत नाही. गोष्ट आहे एका ख्यातनाम चित्रकाराची आणि एका विलक्षण गोड गळ्याच्या गायिकेची. नील पवन बरुआ हा एका युगाचा कुंचल्याचा श्रेष्ठ जादूगार आणि दीपाली बोरठाकूर, ही आसामची गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध!

शनिवार, ३१ मे, २०२५

एकमेवाद्वितीय - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर!

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  

महाराणी महान रयतप्रेमी होत्या. रयतेचे हालहवाल जाणून घेण्यासाठी त्यांचे गुप्तहेर रयतेत फिरत असत. एकदा एका हेराने खबर आणिली की, लक्ष्मीबाई नामे एका विधवा वृद्धेची सकल संपत्ती ऐवज रुपये पंधरा हजार तिच्या मुलाने जबरदस्तीने काढून घेऊन पत्नीच्या स्वाधीन केली असे. ही माहिती ऐकताच राणीबाईंना संताप अनावर झाला. त्यांनी तत्काळ त्या वृद्धेच्या सुनेला एक खलिता धाडला आणि विधवा सासूचे पैसे परत करण्याकरिता बजावले. त्यांनी नुसता आदेश दिला नाही तर सज्जड दम दिला. सुनेने रक्कम परत केली राणीबाईंनी ती रक्कम त्या अभागी सासूला परत केली. या प्रसंगी धाडलेल्या खलित्याचा तजुर्मा - 
'चिरंजीव साळूबाई वाघ यासी अहिल्याबाई होळकर यांचा आशीर्वाद. गंगाजळ निर्मळ लक्ष्मीबाई वाघ यांजकडून चिरंजीव अमृतवराव वाघ याने अमर्याद करून ऐवज पंधरा हजार घेऊन तुम्हापासी ठेविले. ते हुजुरी आणले पाहिजेत. यास्तव सरकारातून पागेचे स्वारासमागमे हे पत्र तुम्हास लिहिले आहे. तरी एक घडीचा विलंब न करता रुपये पंधरा हजार स्वारासमागमे पाठवावे. ढील केल्यास परिच्छन्न उपयोगी पडणार नाही. जाणिजे.'

शनिवार, २४ मे, २०२५

परंपरेच्या आडून भरणारा वासनांचा बाजार!


ही गोष्ट आहे एका लिलाववजा बाजाराची जिथे वयात आलेल्या मुलीची, तरुण स्त्रीची आणि पोक्त महिलेची बोली लावली जाते. इथे बायकांचा बाजार भरवला जातो. सोबतच्या फोटोतली निळ्या लहंग्यामधली मुलगी कंवरबाई आहे. तिचं मुळचं नाव अनिता. ती मध्यप्रदेशातील शिवपूरीची. बंचरा या भटक्या जमातीत तिचा जन्म झालेला. या जातीत एक प्रथा पाळली जाते, घरातील थोरल्या स्त्रीने घर नीट चालावे म्हणून बाहेरख्याली व्हायचं. त्यासाठी या बायकांचा रीतसर बाजार भरतो. बंचरा समाजाच्या तरुण पिढीच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. परंपरेच्या नावाखाली आपल्या मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावावे असे आजही अनेक पुरुषांना वाटते. एकेकाळी या जमातीमधील कर्त्या पुरुषांनी आपल्या मुली स्थानिक सरदारांना देण्यासाठी गरीब समाजबांधवांवर दडपण आणलं. पुढे जाऊन याचीही परंपरा तयार झाली. आपल्या मुलींची बिनपैशाची सोय लागते या नीच स्वार्थी हेतूने हा रिवाज कधीच बंद झाला नाही!

सोमवार, १९ मे, २०२५

गोष्ट, सरहद्दीची सीमा नसणाऱ्या नद्यांची आणि स्त्रियांची!


हा फोटो आज रात्रीचा आहे, बांगलादेशातील मित्राने पाठवला आहे. भारतीय सीमेलगतच्या बांगलादेशमधील 'राजशाही' या शहरालगत पद्मा नदी वाहते. फोटोमध्ये हिरव्या रंगात दिसणारे राजशाही शहर आहे, त्याच्या पुढे काळसर करडे दिसणारे पद्मा नदीचे विशाल पात्र आहे आणि नदी पात्रापलीकडे एका रेषेत दिसत असलेले फ्लड लाइट्स असलेला भाग म्हणजे भारतीय हद्दीचा भूभाग आहे. राजशाहीच्या टेकडीवरून हा फोटो घेतलाय आणि भारतीय हद्दीत चमकत असणाऱ्या वीजा त्यात कैद झाल्या आहेत.

शुक्रवार, १६ मे, २०२५

लेट नाइट मुंबई ..

'लेट नाइट मुंबई'चे मुखपृष्ठ 

लेखक प्रवीण धोपट यांच्या 'लेट नाइट मुंबई' या देखण्या आणि आगळ्यावेगळ्या विषयाच्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाही नेमकी आहे - "सूर्य मावळल्यानंतर ज्यांचा दिवस उजाडतो त्या प्रत्येकाला...."
या देखण्या पुस्तकातले हरेक पान याला अनुसरूनच आहे हे विशेष होय! मुंबई शहराविषयी आजवर विविध भाषांमधून पुष्कळ लेखन केलं गेलंय, मुंबईच्या भौगोलिक महत्वापासून ते इतिहासापर्यंत आणि राजकीय वजनापासून ते मायानगरीपर्यंत भिन्न बिंदूंना केंद्रस्थानी ठेवून हे लेखन संपन्न झालेय. मुंबईविषयी एक आकर्षण देशभरातील सर्व लोकांना आहे, इथल्या माणसांची ओळख बनून राहिलेल्या मुंबईकर स्पिरीटवर सारेच फिदा असतात. मुंबईची आपली एक बंबईया भाषा आहे जी मराठी तर आहेच आहे मात्र हिंग्लिशदेखील आहे! मुंबईच्या बॉलीवूडी स्टारडमपासून ते धारावीच्या विशालकाय बकालतेविषयी सर्वांना जिज्ञासा असते. इथल्या डब्यावाल्यांपासून ते अब्जाधिश अंबानींच्या अँटॅलिया निवासस्थानापर्यंत अनेक गोष्टींचे लोकांना कुतूहल असते. स्वप्ननगरीचा स्वॅग असो की मंत्रालयाचा दबदबा, दलालस्ट्रीटची पॉवर असो की गेट वे ऑफ इंडियाचा भारदस्त लुक चर्चा तर होतच राहणार! अशा सहस्रावधी अंगांनी सजलेल्या, नटलेल्या मुंबईच्या रात्रींची शब्दचित्रे प्रवीण धोपट यांनी चितारलीत. यात रात्रीची मुंबई कैद झालीय असे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटेल मात्र वास्तव काहीसे तसेच आहे. फुटपाथच्या कडेला तसेच फ्लायओव्हरखालच्या अंधारल्या जागी पडून असणारी जिवंत कलेवरे यात आहेत आणि लखलखीत उजेडात न्हाऊन निघालेलं नाइट लाईफही यात आहे. मुंबईवर प्रेम असणाऱ्यांना हे आवडेल आणि ज्यांना रात्रीच्या मुंबईचं रूप ठाऊक नाही त्यांनाही हे पुस्तक आवडेल.

गुरुवार, १५ मे, २०२५

खडीच्या चोळीवर ..

खडीच्या चोळीवर 

जात्यावर दळण दळताना या स्त्रियांच्या मनात जे जे काही चालले असेल त्याला त्या शब्दबद्ध करत असत. कोणताही विषय त्यांनी वर्ज्य ठेवला नव्हता. अगदी बाहेरख्याली संबंध असो वा अन्य कुठले झेंगट असो त्यावरही या स्त्रिया व्यक्त होत असत. मग एकीने जात्याची पाळी नीट करत करत हा विषय छेडला की तिच्या पुढची जी असे ती याला जोडूनच दुसरी ओवी गाई. हा सिलसिला दळण संपेपर्यंत जारी राही. तोवर अनेकींची मने मोकळी होऊन गेलेली असत. कुणा एकीच्या मनात बऱ्याच दिवसापासून साठून असलेले मळभ रिते झालेले असे. या ओव्या अगदी थेट टीका करणाऱ्या नसत, त्यात प्रतिके असत. अशा गोष्टींची थेट वाच्यता होत नसे आणि तशी ती केलीही जात नसे. कारण तो समाज काही मर्यादा बाळगून होता. आतासारख्या सगळ्या गोष्टींचा चोथा केला जात नसे आणि कुणाचीही इज्जत सार्वजनिक रित्या उधळली जात नसे. तरीदेखील हा घाव वर्मी बसेल अशी त्यातली शब्दरचना असे.

गुलमोहर आणि डियर बाओबाब – वेध एका रंजक गोष्टीचा!

डियर बाओबाबचे मुखपृष्ठ   

आईवडिलांपासून, मायभूमीपासून दुरावलेल्या एका मुलाची आणि एका निहायत देखण्या झाडाची ही गोष्ट..
गुलमोहराला बंगाली, आसामीमध्ये कृष्णचुर म्हटले जाते! कृष्णाच्या मस्तकावरचा मुकुट या अर्थाने हे नाव आहे. तर उडीयामध्ये नयनबाण असं नाव आहे. इंग्लिशमध्ये याची पुष्कळ नावे आहेत, त्यातले mayflower नाव सार्थ आहे. तीव्र उन्हाने बाकी सगळी फुले अवघ्या काही दिवसांत तासांत कोमेजून जात असताना ऐन वैशाखात, लालबुंद गुलमोहोर अक्षरशः दहा दिशांनी बहरून येतो!

रविवार, ११ मे, २०२५

हॅरी ट्रूमन, अणूबॉम्ब आणि विनाशकाची प्रतिमा!

राष्ट्राध्यक्ष ट्रूमन  

हॅरी ट्रूमन हे अमेरिकेचे 33 वे राष्ट्राध्यक्ष होते. ट्रूमन यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात राष्ट्राध्यक्षपद स्वीकारले. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्याचा ऐतिहासिक विनाशकारी निर्णय त्यांनी घेतला, ज्यामुळे युद्ध संपले पण मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.

ट्रूमन यांच्या डेस्कवर एक पाटी असायची, ज्यावर "The Buck Stops Here" लिहिले होते. याचा अर्थ असा की अंतिम जबाबदारी त्यांचीच आहे. हा वाक्प्रचार त्यांच्यामुळे प्रसिद्ध झाला. वास्तवात ते एक साधे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म मिसूरीतील एका शेतकरी कुटुंबात झालेला. त्यांनी लहानपणी शेतात काम केलेलं, औपचारिक कॉलेज शिक्षणही ते पूर्ण करू शकले नाहीत, तरीही ते राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचले.

1947 मध्ये त्यांनी ट्रूमन डॉक्ट्रिन जाहीर केले, जे कम्युनिझमचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेने इतर देशांना मदत करावी, असा विचार मांडते. यामुळे शीतयुद्धाला सुरुवात झाली. राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर ट्रूमन आपल्या मिसूरीतील घरी परतले आणि सामान्य जीवन जगले. त्यांच्याकडे फारशी संपत्ती नव्हती, आणि त्यांनी स्वतः आपली पेन्शन मिळावी यासाठी कायदा मंजूर करवला (!)

गुरुवार, ८ मे, २०२५

कॉफी ब्लॅक - डॉन विल्यम्स

कॉफी ब्लॅक - डॉन विल्यम्स 

दरवर्षी सुट्ट्या लागल्या की त्या ब्रिटिश महिलेचा पती न चुकता भारतात यायचा. नंतरच्या काळात मात्र कैक वर्षे अंथरुणाला खिळून त्याचे देहावसान झाले. त्याच्या स्मृती जागवण्यासाठी ती वृद्धा गोव्यात टिटो बार्डेसला (दशकापूर्वी) आली होती. तिने डॉन विल्यम्सचं एक गाणं असं काही गायलं होतं की जमलेल्या तरुणाईला कावरंबावरं व्हायला झालं, ते गाणं होतं "कॉफी ब्लॅक.."

नॉर्थईस्टमधील डाऊन स्ट्रीट म्युझिक कॅफेज असोत की गोव्यातील फेरीबोट्स, वा मेट्रो सिटीमधली पंचतारांकित हॉटेल्स असोत, डॉन विल्यम्सची गाणी मंद स्वरांत कानी पडतात! 
विशेषतः केरळच्या बॅकवॉटर्समधील हाऊसबोट्स आणि गोव्यातले नाईट पब्ज रोज रात्रीस भरात येण्याआधी म्हणजे अंधार गडद होण्याआधी जी शांतशीतल  गाणी वाजवतात त्यात डॉनची गाणी आवर्जून असतात. 
गतपिढीतला कुणी दर्दी रसिक तिथं असला तर मग तो एखादा खंबा ज्यादा रिचवतो. एखाद्या कमनीय ललनेला जवळ बोलवून ओलेत्या डोळ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देतो, तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन चिल्ड 'पॉल जॉन' वा  तत्सम स्कॉचचे सिप घेत राहतो! 
रम्य भूतकाळ त्याच्या भवती घुमू लागतो! 
हे गारुड विलक्षण असतं.

बुधवार, ७ मे, २०२५

'बांगलादेश ए ब्रूटल बर्थ' आणि व्हायरल फोटोचे सत्य!

हेच ते छायाचित्र ज्याच्या आधारे खोटी द्वेषमूलक माहिती पसरवली जात आहे.

सोबतच्या छायाचित्राचा वापर अत्यंत बेमालूमपणे द्वेष पसरवण्यासाठी होत असल्याने त्यातले सत्य समोर आणण्यासाठीची ही ब्लॉगपोस्ट!

याची सत्यता जाणून घेण्यासाठी थोडी पार्श्वभूमी जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. हे छायाचित्र ज्यांनी काढले आहे ते किशोर पारेख हे भारतीय छायाचित्रकार होते. त्यांचा जन्म गुजरातमधील भावनगरचा. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी चित्रपट निर्मिती आणि माहितीपट छायाचित्रणाचे शिक्षण घेतलेलं. विद्यार्थीदशेत केलेल्या प्रोजेक्टमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 1960 ला ते भारतात परतले आणि हिंदुस्तान टाईम्सचे मुख्य छायाचित्रकार बनले. तिथं काम करताना त्यांनी 1962 च्या भारत-चीन युद्धाचे आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान संघर्षाचे वार्तांकन केले. युद्धाच्या समाप्तीच्या वेळी झालेल्या ताश्कंद शिखर परिषदेच्या वार्तांकनासाठी त्यांना तत्कालीन सोव्हिएत लँडने सुवर्णपदक प्रदान केले. त्यांनी 1966 - 1967 च्या बिहारमधील दुष्काळाचे टोकदार कव्हरेज केले. या विषयावरील त्यांच्या छायाचित्रांचे अमेरिकेत प्रदर्शन भरवण्यात आलेलं.

मंगळवार, ६ मे, २०२५

तू रूह है तो मैं काया बनूँ..

तू रूह है तो मैं काया बनूँ

प्रियदर्शिनी अकॅडमीच्या कार्यक्रमासाठी ट्रेनने मुंबईला गेलो होतो. ट्रेन पुण्यात थांबल्यानंतर एक अत्यंत तरुण उमदं कोवळं पोरगं ट्रेनमध्ये चढलेलं. त्याचं नेमकं माझ्या समोरचं बुकिंग होतं. रात्रीची वेळ होती. काही वेळात ट्रेन निघाली. त्याचे डबडबलेले डोळे एसी कोचच्या फिकट निळ्या उजेडात स्पष्ट दिसत होते. मधूनच तो ग्लासविंडो मधून बाहेर पाहत माझी नजर चुकवण्याचा प्रयत्न करत होता. थोड्या वेळाने मीच नजर हटवली. त्याच्या मोबाईलवर एकच गाणं शफल मोडमध्ये प्ले होत होतं.

गोष्ट रामकेवलच्या पराक्रमाची!

डोळ्यात आनंदाश्रू आलेला रामकेवल!

काहींचं जगणं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतं. ही उक्ती युपीच्या रामकेवल या मुलाने सार्थ करून दाखवली आहे. 1947 नंतर म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या गावातला तो पहिला विद्यार्थी आहे जो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. या कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्याचा सन्मान केला आहे ही देखील एक चांगली गोष्ट! रामकेवल हा केवळ विद्यार्थी नसून त्याच्या घरातला कमावता मुलगा आहे. युपीमध्ये सलग सहा महीने लग्न सराईचा मौसम असतो त्यानंतर तीन महीने ब्रेक घेऊन पुन्हा तीन महिने लग्ने होत राहतात. तर हा लहानगा मुलगा वरातीत डोक्यावर पेट्रोमॅक्स घेऊन चालायचे काम करायचा. रात्री उशिरा घरी यायचा आणि सकाळी उठून 6 किमी अंतरावर असणाऱ्या शाळेत जायचा!