बुधवार, ३० एप्रिल, २०२५

अक्षय तृतीया - शेतकरी ते बांके बिहारी!


अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा असे मेसेज आजच्या दिवशी अनेक जण पाठवतात मात्र अक्षय तृतीया म्हणजे काय, या दिवसाचे नेमके महत्व काय हे अनेकांना सांगता येत नाही. भारत पूर्वापार कृषक देश आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेला इथला चरितार्थाचा व्यवसाय म्हणजे शेती. शेतीचा आणि अक्षय तृतीयेचाही संबंध आहे. गुढीपाडव्याला शेतीमधील कामांची मशागत सुरू होते. गुढीपाडवा चैत्र प्रतिपदेस असतो, यादिवशी नांगरटीची सुरुवात होते. मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे मराठी ऋतूचक्रातले अखेरचे चार महीने. या चार महिन्यातले ऊन आणि अक्षय तृतीयेचे ऊन यांचे एक गणित असते.

ले के पहला पहला प्यार..

देव आनंद आणि सुरैय्या... राजहंसाची एक जोडी जिचे मिलन झाले नाही!   

विख्यात गायिका शमशाद बेगम यांनी गणपत लाल बट्टो यांच्याशी प्रेमविवाह केला होता. शमशाद बेगम चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या ठीक दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये जन्मलेल्या मात्र त्यांचं बालपण लाहोरमध्ये गेलं. त्यांचं कुटुंब तिथं स्थायिक झालेलं! पंजाबी मुस्लिम कुटुंबात जन्मलेली शमशाद अगदी गोड गळ्याची मुलगी होती. दहा अकरा वर्षांची असताना ती लग्न समारंभात गाऊ लागली तेव्हा त्यांच्या बिरादरीत गहजब उडाला. तेरा वर्षांची असताना उस्ताद गुलाम हैदर यांच्यासोबत तिचं गाणं रेकॉर्ड झालं, मग मात्र तिचे वडील हुसेन बक्ष तिच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी तिला पाठिंबा दिला. शमशादचे धाडस वाढले ती स्टेजवर गाऊ लागली. या दरम्यान तिची ओळख गणपत लाल बट्टोशी झाली. तेव्हा शमशादचे वय फक्त चौदा वर्षांचे होते तर गणपत वयाने बराच मोठा होता, मात्र त्याचे घर तिच्या शेजारीच होते. ओळख जुनी होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं. दोघांनी लग्न करायचे ठरवले. 1935 साली त्यांचे लग्न झाले. शमशाद तेव्हा फक्त पंधरा वर्षांची होती! दोघांचे धर्म भिन्न होते आणि दोन्ही कुटुंबातून प्रचंड विरोध होऊनही हा विवाह संपन्न झाला. या दरम्यानच्या काळात फाळणीचे वारे वाहू लागले नि शमशादचा जीव पाखरासारखा झाला. कारण ती पतीसोबत अमृतसरला राहत होती आणि तिच्या आईवडिलांनी जन्मभूमी सोडण्यास नकार दिला. खेरीज त्यांना शमशाद शिवाय अन्य अपत्येही होती जी लाहोरमध्ये स्थिरावली होती. त्यांनी काळजावर दगड ठेवून शमशादला कायमचं अलविदा म्हटलं! शमशाद बेगम उन्मळून पडल्या. मात्र पती गणपत लाल जे एक चांगले वकील होते नि हौशी फोटोग्राफरही होते, त्यांनी तिचे मन रमावे आणि करियरही घडावे म्हणून ते दोघे मुंबईला आले!

मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

इरेना सेंडलर - स्त्रिया जेव्हा विकारग्रस्त होतील..


युरोपमधील काही देशांत ख्रिश्चन आणि ज्यू यांच्यातला संघर्ष नाझी विचारांच्या लोकांपायी शिगेला पोहोचला तेव्हाची ही गोष्ट. ही गोष्ट एका असामान्य स्त्रीची आहे जिने शब्दश: प्राणाची बाजी लावून तब्बल 2500 ज्यू मुलांची सुटका केली. ती स्वतः कॅथलिक ख्रिश्चन होती आणि त्या काळादरम्यान अनेक ख्रिश्चन्स ज्यू लोकांना आपला परम शत्रू मानत होते तरीही तिने जीव धोक्यात घालून ही मुले वाचवली. ही कथा आहे एका विलक्षण मायाळू आणि प्रेमळ नर्सची आणि तिच्यातल्या वैश्विक मातृत्वाची! त्या जिगरबाज स्त्रीचे नाव इरेना सेंडलर! तिच्या आयुष्यावर टिलर मॅझिओ हिने ‘इरेना'ज चिल्ड्रेन’ हे विश्वविख्यात चरित्र लिहिलेय.

इरेना सेंडलर एका असामान्य व्यक्तिमत्त्वाची धनी होती, जिच्या धैर्य आणि मानवतेच्या कथा आजही प्रेरणा देतात. ती पोलंडमधील एक सामाजिक कार्यकर्ती आणि नर्स होती. तिने दुसऱ्या महायुद्धा दरम्यान वार्सा गेट्टोमधून सुमारे 2500 ज्यू मुलांना वाचवले. 'झेगोटा' या पोलिश भूमिगत संघटनेच्या बाल विभागाची ती प्रमुख होती. तिने बनावट कागदपत्रे तयार करून आणि मुलांना गुप्तपणे गेट्टोबाहेर काढून त्यांना ख्रिश्चन कुटुंबे, अनाथाश्रम तसेच कॉन्व्हेंटमध्ये आश्रय दिला. ती मुलांना रुग्णवाहिकेपासून ते बटाट्याच्या गोण्यांमध्ये लपवायची. त्यांची सुटका करताना ती कुठेही जाऊन धडकायची, अगदी गटारातून देखील मुले बाहेर काढायची!

सोमवार, २८ एप्रिल, २०२५

द्रौपदीची थाळी

 द्रौपदीची थाळी..


वृद्धाश्रमाचे प्रातिनिधिक चित्र   


परवा दिवशीचे मदतीचे आवाहन वाचून वृद्धाश्रमातील 77 वर्षांच्या आज्जीनी काल फोन केला होता आणि विचारणा केली की, "थोडीशीच रक्कम आहे, तेव्हढी रक्कम चालेल का?"

बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता.
रिकाम्या वेळी मेणबत्त्या, खडू तयार करून त्यांनी जमा केलेली ती रक्कम होती.

मागे काही वेळा मी त्यांना भेटलोय. त्यांच्याविषयी पोस्टही केली होती.
त्यांच्या केअरटेकर फेसबुक वापरतात. माझी पोस्ट त्यांना वाचून दाखवतात.

मदतीची 'ती' पोस्ट वाचून त्यांचे मन राहवले नाही. त्यांनी हट्ट धरला की समीरला फोन लावून द्या, थोडे पैसे साठले आहेत, त्याला देऊन टाकते.

महादेव देवानूर - मी शिरच्छेद करेन त्यांचा, जे देवाच्या नावावर..

महादेव देवानूर  
राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि एक दलित व्यक्ती टिकाराम जुली यांनी अलवर मंदिरास देवदर्शन घेण्यासाठी भेट दिली होती. जुली यांच्या भेटीनंतर ७ एप्रिल रोजीरामगडचे माजी आमदारा आहुजा यांनी अलवर येथील राम मंदिराचे शुद्धिकरण केले होते. त्यासाठी त्यांनी गंगाजल शिंपडले होते. उत्तरेकडील बहुतांश राज्यात, विशेषतः ग्रामीण भागात आजही दलित तरुण घॊड्यावरून वरात काढू शकत नाही, वाद्ये वाजवू शकत नाही, मिशी ठेवू शकत नाही. लग्नानंतर मंदिरात जाऊ शकत नाही हे वास्तव आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून आहुजा यांच्या अगोचरपणाची दखल घेत त्यांना पक्षातून काढून टाकले गेलेय हे बरेच झाले. यातून कठोर संदेश जायला हवा. जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत.

रविवार, २७ एप्रिल, २०२५

जगण्यासाठीचं धावणं – रनिंग द रिफ्ट


काही लोकांना युद्धाची फार खुमखुमी असते. सध्या आपल्याकडे याची लाट आलीय. असाच कंड आफ्रिका खंडातील रवांडा देशातील दोन जमातीत होता. मुळात हा देश अनेक नागरी समस्यांनी गांजलेला नि अनेक भौतिक प्रश्नांनी ग्रासलेला. स्वकमाईमधून दोन वेळच्या अन्नाला महाग असणारी अर्धी लोकसंख्या. रवांडामध्ये हुतू आणि तुत्सी या दोन वांशिक गटातील संघर्षाला नरसंहाराचे स्वरूप लाभले आणि हा देश रसातळाला गेला. तब्बल अकरा लाख लोकांना प्राण गमवावे लागले. जगातला सर्वात गरीब देश म्हणून त्याची नोंद झाली. त्या संघर्षावर आधारित एक सुंदर कादंबरी आहे. त्याविषयीची ही ब्लॉगपोस्ट.

2010 साली अल्गॉनक्विन बुक्सद्वारे प्रकाशित झालेली रनिंग द रिफ्ट ‘Running the Rift’ ही नाओमी बेनारॉन यांची एक प्रभावी आणि हृदयस्पर्शी कादंबरी. या कादंबरीत रवांडामधील हुतू - तुत्सी यांच्यातला दीर्घ संघर्ष आणि 1990 च्या दशकातील नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर एका तरुण तुत्सी मुलाच्या जीवनाचा प्रवास रेखाटलाय. ही कादंबरी सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारी असल्याने तिला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पेन-बेलवेदर पुरस्कार मिळालाय.

कादंबरीचा नायक जीन पॅट्रिक नकुबा हा एक तुत्सी मुलगा आहे, जो रवांडाच्या डोंगराळ भागात वाढलाय. त्याच्या अंगी धावण्याची नैसर्गिक प्रतिभा आहे. रवांडाचा पहिला ऑलिम्पिक ट्रॅक पदक विजेता बनण्याचे त्याचे स्वप्न असते. या स्वप्नामुळे त्याला स्वतःला आणि विवेकवादी लोकांना हुतू - तुत्सी तणावामुळे होणाऱ्या क्रूर हिंसाचारापासून मुक्ती मिळेल, अशी त्याची आशा असते. कथेचा पहिला भाग जीन पॅट्रिकच्या बालपणावर, त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्या धावण्याच्या उत्कटतेवर केंद्रित आहे. पण, जसजसा हुतू - तुत्सी संघर्ष वाढत जातो, तसतशी त्याची स्वप्ने आणि जीवन धोक्यात येतात.

शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५

सादी शिराज - मानवतेच्या गावा जावे!


भारत पाकिस्तान यांच्या तणावात मध्यस्ती करण्याची इच्छा जाहीर करत इराणच्या वतीने आज जे ट्विट केलं गेलंय त्यात सादी शिराझी यांच्या कवितेतील काही पंक्ती उद्धृत केल्यात! असो. पोस्ट त्यावर नाही.

सादी शिराज यांची बुस्तान (फळबाग) ही कविता विश्वविख्यात आहे. त्यातील काही पंक्तींचा हा हिंदी अनुवाद. मराठीत अनुवाद करताना यातली मजा जातेय म्हणून हिंदी अनुवाद.

"आदम के बेटे एक जिस्म के अंग हैं,

जो एक ही मिट्टी से बने हैं।

अगर एक अंग को दर्द होता है,

तो बाकी अंग भी बेकरार रहते हैं।

जो इंसान दूसरों के दुख से बेपरवाह रहता है,

वह इंसान कहलाने के लायक नहीं।"....

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

फरफट जिवाची, हंडाभर पाण्यासाठीची!


हंडाभर पाण्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या बायकांचा, काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ कालपरवाचाच आहे.

ही क्लिप पाहिल्या बरोबर मनात अशी तीव्र इच्छा उत्पन्न झाली की, इथल्या तमाम लोकप्रतिनिधींना या विहिरीत थेट तळापर्यंत असेच रस्सीच्या सहाय्याने उतरायला लावले पाहिजे आणि हंडाभर पाणी त्यांच्या डोईवर ठेवून थेट वाडीवस्तीपर्यंत भर उन्हात चालवत नेलं पाहिजे! आणि मग त्यांना अनिवार्य हिंदी, कबर, कुत्रा, गुरुजी, कोरटकर, सोलापूरकर यांच्या विषयीचे प्रश्न विचारले पाहिजेत. समाधानकारक उत्तरे देईपर्यंत पाण्याचा एक घोटही प्यायला द्यायचा नाही! असो.

व्हिडिओ क्लिपमधील गावाचे नाव बोरीची बारी, तालुका पेठ, जिल्हा नाशिक! म्हणजेच आपल्या डिजिटल प्रगतशील महाराष्ट्रामधलं हे दृश्य!

हे अपयश झाकण्यासाठी तर राज्यकर्त्यांना आस्तित्वात नसलेल्या मुद्यांचा सहारा घ्यावा लागत असेल का? नक्की सांगता येत नाही.

रविवार, २० एप्रिल, २०२५

अमरत्वाच्या शोधाची डिजिटल गोष्ट – डोन्ट डाय..!

अमरत्वाच्या शोधाची डिजिटल गोष्ट..   

माणसाला जेव्हापासून जन्म मृत्यूच्या संवेदना अधिकाधिक कळत गेल्या तेव्हापासून त्याला एका गोष्टीचे नेहमीच कुतूहल आणि आकर्षण राहिलेय ते म्हणजे अमरत्व! आपल्याला मरणच नको अशी इच्छा असणारे अनेक लोक आपल्या अवती भवती आढळतील. याविषयी अनेक दावे सांगणारे वा अमुक एक व्यक्ती इतक्या वर्षांची दीर्घायु आहे असं सांगणारेही अनेक नजरेस पडतात. यातले बहुसंख्य अमरत्वप्राप्तीने झपाटलेले असतात. वास्तवात जेव्हा एखाद्या सजीवाचा जन्म वा आरंभ होतो तेव्हाच हेही निश्चित असते की त्या सजीवाचा मृत्यू वा अंतही नक्की आहे, कारण जगात असा कोणताही सजीव नाही ज्याचा अंत नाही! हा जीवनचक्राचा नियम आहे, सृष्टी यावरच चालते हे विसरून चालणार नाही. तरीही अमर व्हायचे भूत काहींचा पिच्छा सोडत नाही. अशाच एका माणसाची खरीखुरी हकीकत ‘डोन्ट डाय: द मॅन हू वॉन्ट्स टू लिव्ह फॉरएव्हर’ या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवलीय. ‘टायगर किंग’ या गाजलेल्या सिरिजच्या कार्यकारी निर्मात्याने ही फिल्म बनवलीय. सत्तेचाळीस वर्षे वयाच्या एका प्रौढ पुरुषाच्या अमर होण्याच्या स्वप्नाची ही गोष्ट. मृत्यूवर मात करून अमर होण्यासाठी पणाला लावलेल्या कोट्यवधी डॉलर्सच्या प्रयत्नांचे वर्णन यात आहे. त्या व्यक्तीला असे का करावे वाटते आणि तो त्यात यशस्वी होतो का हे सांगणे म्हणजे फिल्मचा आत्मा काढून घेण्यासारखे आहे.

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

अमेरिकन स्वातंत्र्यदेवतेचे खरे अस्तित्व – एमा लॅझरस!


ही नोंद आहे एमा लॅझरस या कवयित्री विषयीची. ही नोंद आहे एका विदारक विरोधाभासाची! ही नोंद आहे बदलत्या विखारी भूमिकांची!


अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेच्या जगप्रसिद्ध शिल्पाखाली चबुतऱ्यावर एक कविता कोरली आहे. ही नोंद तिच्याविषयीही आहे.

एमा लॅझरस ही अमेरिकन कवयित्री होती, त्याचबरोबर ती ज्यू कार्यकर्ती होती. त्या काळातील ज्यू व्यक्तींना निर्वासितासारखं राहावं लागे. 1849 ते 1887 हा एमाचा कालखंड. तिचा जन्म न्यूयॉर्कमधला. तिचे पणजोबा जर्मनीहून तिथे आलेले. तिचे बाकी नातलग पूर्वज पोर्तुगालमधून अमेरिकेत पोटार्थी म्हणून आलेले. हे सगळे ज्यू होते.

गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

हिंदी भाषेच्या सक्ती विरोधातला अस्सल विरोधाचा सूर!




‘हिंदी इम्पीरियलिझम’ हे केवळ हिंदीविरोधी आंदोलनाचे ऐतिहासिक दस्तऐवजीकरण नाही, तर ते भारताच्या संघराज्यीय रचनेतील भाषिक विविधता आणि सांस्कृतिक अस्मितेच्या संरक्षणाचा पुरस्कार करते. तमिळ राजकारण, द्रविड चळवळ आणि भारताच्या भाषा धोरणाच्या इतिहासात रस असणाऱ्यांसाठी हे पुस्तक वाचनीय आहे. सध्याच्या काळात, जिथे हिंदीच्या सक्तीचे नवे प्रयत्न होत असताना याचे वाचन विशेष प्रासंगिक ठरते.

‘हिंदी इम्पीरियलिझम’ (मूळ तमिळ: हिंदी एगाथिपथियम्) तमिळनाडूतील प्रख्यात राजकारणी, लेखक आणि द्रविड मुन्नेत्र कळगम (DMK) चे नेते आलदी अरुणा यांनी लिहिलेय. हे प्रथम 1966 मध्ये प्रकाशित झाले, त्यानंतर 1993 मध्ये त्याची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली आणि 2023-24 मध्ये मरणोत्तर अद्ययावत आवृत्ती प्रकाशित झाली. पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर आर. विजया शंकर यांनी केलेय. तमिळनाडूमधील हिंदीविरोधी आंदोलनाच्या इतिहासाचे, त्याच्या मुळांचे आणि तमिळ राजकारणावर तसेच भारताच्या संघराज्यीय संरचनेवर झालेल्या परिणामांचे दस्तऐवजीकरण या पुस्तकात झालेय.