शनिवार, ५ एप्रिल, २०२५

मेरे देश की धरती ..



शुक्रवार 4 एप्रिल रोजी ज्येष्ठ दिग्गज अभिनेते मनोजकुमार यांचे निधन झाले आणि सोशल मीडियासह सर्व प्रसारमाध्यमे त्यांच्या विषयीच्या माहितीने भरून वाहू लागली. अनेकांनी शोक व्यक्त केला. जवळपास हरेक चाहत्याने त्यांच्या जुन्या फिल्मी आठवणींना उजाळा दिला. त्यांची गाणी, त्यांचे संवाद आणि त्यांची शैली याविषयी लोक भरभरून बोलले. मुळात मनोजकुमार यांची स्वतःची एक इमेज होती त्यामुळे त्यांचा स्वतःचा खास असा चाहता वर्ग होता त्याच्याखेरीज अन्य वर्गातले सिनेरसिकही त्यांच्याविषयी मनःपूर्वक व्यक्त झाले हे विशेष. कारण अलीकडील काळात एक वाईट गोष्ट हमखास दृष्टीस पडते ती म्हणजे कुणा प्रसिद्ध व्यक्तीचे वा सेलिब्रिटीचे निधन झाले की लोक त्याच्या विषयी वाईटसाईट बोलू लागतात. मृत्यूनंतरचे बदनामीचे कवित्व सुरु होते. अर्थात एखाद्या व्यक्तीने त्याच्या हयातीत काही वाईट गोष्टी केल्या असतील, त्याने केलेल्या कुकर्माविषयी कबुली दिली नसेल वा त्याबद्दल त्याच्या मनात प्रायश्चित्त भावना नसेल तर लोक त्याच्या मृत्यूपश्चात वाईट बोलत असतील तर किती जणांना आपण रोखू शकणार? कुणालाच नाही! मात्र अलीकडील काळात माणूस गेला रे गेला की त्याच्या बाजूने बोलणारे नि त्याची निंदा नालस्ती करणारे असे दोन गट पडतात. याने मन व्याकुळ होतं, अंतःकारणात विषाद दाटून येतो. श्रद्धांजली देखील द्यावीशी वाटत नाही. मात्र मनोजकुमार याला अपवाद ठरले. त्यांच्या निधनानंतर समग्र माध्यमे, सोशल मीडिया त्यांच्याविषयीने आदराने बोलत होता, लोक त्यांच्या विविध गोष्टी सांगताना आढळले. हे भाग्य अलीकडील काळात क्वचित कुणाच्या वाट्याला आले आहे. मनोज कुमार यांना मृत्यूपश्चात हे साधले कारण त्यांची भारत कुमार अर्थात भारत का नायक, भारत का बेटा या प्रतिमेने लोकांच्या मनावर फार पूर्वीपासून गारुड केलेय. शिवाय ते इंडस्ट्रीमध्ये तामझाम पासून दूर होते, त्यांचे कुणाशी वैर असायचेही कारण नव्हते. त्यांची स्वतःची एक विचारधारा होती त्याच्याशी ते आयुष्यभर प्रामाणिक राहिले त्याचेच हे फळ म्हणावे लागेल.

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

गावाकडचे उन्हाळ्यातले दिवस..


आमच्या भागात उन्हाळा संपेपर्यंत पारा आता चाळीस डिग्रीहून खाली येत नाही. आणखी अडीच महीने सूर्य आग ओकत राहतो. दुपारी रस्ते ओस पडतात. गावाकडे शेतशिवारं रखरखीत वाटू लागतात. ज्यांची बागायत असते तेही घायकुतीला येतात, काही तालेवार यातही हात मारतात! जिरायतवाल्यांच्या तोंडाचे पाणी पळते. रान भुसभुशीत होऊन जातं. खुरटी झुडपंही मान टाकतात. दूरवरच्या माळांनी सगळं गवत शुष्क पिवळं करडं होऊन जात. बांधावरच्या बोरी बाभळी मौन होतात. शेतांच्या कडेने असणाऱ्या वडाच्या झाडांपाशी सावल्यांची झिल्मील अव्याहत जारी राहते.

आओगे जब तुम साजना..


2007 साली 'जब वी मेट' हा सिनेमा आला होता. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या प्रेमाची केमिस्ट्री त्यात जबर जमली होती. सिनेमा हिट झाला होता आणि गाणीही गाजली होती, बाकी गाण्यांच्या तुलनेत 'आओगे जब..' हे गाणं जास्त गाजलं नव्हतं; ते माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक! असो.
 
हे गाणं फर्माईश म्हणून अनेक प्रेमभंग झालेल्या तरुण पोरांनी गायला सांगितलेलं अजूनही पक्कं स्मरणात आहे. त्याहीआधी 1991 मध्ये नाना पाटेकर, डिम्पल, माधुरी यांच्या 'प्रहार'मध्ये शुभा गुर्टू यांनी गायलेली 'याद पिया की आये..' ही ठुमरी खूप जीव लावून ऐकलेली! तिच्याशी जसे एकरूप होता येत होतं तसेच 'आओगे जब तुम साजना'बाबतीत व्हायचे!

बुधवार, २६ मार्च, २०२५

एक दिवस शोषित जिवांच्या आनंदाचा!

'क्रांती महिला संघ' स्नेहमेळावा 

आपल्याकडे वेश्यांकडे अजूनही अत्यंत तिरस्काराने पाहिले जाते. समाज त्यांना आपला घटक मानत नाही हे वास्तव आहे. वेश्या म्हणजे किटाळ, नीच आणि व्यभिचारी स्त्रिया असंच मानलं जातं. मात्र त्याच बरोबरीने त्यांच्याकडे जाणाऱ्या म्हणजेच वेश्यागमन करणाऱ्या पुरुषांना समाज फारशी नावे ठेवताना दिसत नाही. जुगार खेळणाऱ्यास जुगारबाज म्हटले जाते, दारू पिणाऱ्यास दारूबाज म्हटले जाते परंतू वेश्येकडे जाणाऱ्यास रंडीबाज म्हटले जाते ही बाब आपल्याला खटकत नाही कारण अन्य वेळी व्यसनावरून नावे ठेवणारा समाज इथे मात्र त्या पुरुषाला नावं ठेवण्याऐवजी त्या स्त्रीलाच रंडी म्हणतो आणि तिच्याकडे येणाऱ्यास नाव ठेवताना तिलाच शिवी देऊन रंडीबाज म्हणतो! रंडी ही एक शिवी आहे जी समाज व्यभिचारी स्त्रियांना देतो, वास्तवात या बायका कुणाच्या घरी येऊन जोरजबरदस्ती करत नाहीत तरीही यांनाच नावे ठेवली जातात कारण आपल्या समाजात या स्त्रियांना छदामाचीही किंमत नाही. अशा समाजात एखादी तरुणी अक्षरश: क्रांती करावी तसे काम करते नि त्यांच्यात एकी घडवून आणते, त्यांच्या समस्यांसाठी लढते, अल्पवयीन मुलींना यातून बाहेर पडण्यास मदत करते, ज्यांच्या मुली मोठया आहेत त्यांच्या शिक्षणासाठी धडपड करते नि या स्त्रियांच्या बेसिक गरजांसाठी संघटन उभं करते तेव्हा निश्चितच काही चांगल्या गोष्टी घडतात.

मंगळवार, २५ मार्च, २०२५

माती आठवणींच्या थडग्याची!


लिंगायत समाजाचा मित्र आहे. त्याच्या आईचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. विधिवत घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. मल्लिकार्जुन मंदिराला वळसा घालून अंतिम दर्शन घेऊन लिंगायत स्मशानभूमीत दाखल झाली. तिथं आधीच निर्धारीत केलेल्या जागी खड्डा खोदून ठेवला होता. अखेरचे विधी सुरु झाले नि मित्र कासावीस झाला. त्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडिलांच्या अपरोक्ष आईने लहानाचे मोठे केले होते. तिच्या परीने तिने सर्वोच्च योगदान दिले होते. तिचे आता कुठे सुखाचे दिवस आले होते नि ती चटका लावून निघून गेली. उमेदीच्या काळात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मित्राचं लग्नही उशिरा झालं नि अपत्य व्हायलाही बराच वेळ लागला. परिणामी अंगणात सानुली पाऊलं खेळण्याची त्या वृद्ध माऊलीची इच्छाही विलक्षण लांबली. मित्राची मुलगी जस्ट पाच वर्षांची. तिची आणि आज्जीची दोस्ती जिवाशिवासारखी! आज्जी गेली नि ती पोरगी पार हबकून गेली. स्मशानभूमीत ती टक लावून म्हाताऱ्या शेवरीला पाहत होती! मांडी घालून बसलेल्या अवस्थेत त्यांना माती देण्यात आली. दफनविधी पूर्ण झाल्यानंतर सारे आप्त स्नेही पुन्हा कोपऱ्यातल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोळा झाले. तिथे महंत गुरव लोकांची काही बोलणी झाली. काहींनी श्रद्धांजली वाहिली. हे सर्व होत असताना त्या चिमुरड्या मुलीचे लक्ष आज्जीला जिथे दफन केलं होतं त्याच जागेकडे होते. खरेतर बहुतांश मंडळी इथे लहान मुलांना आणत नाहीत मात्र मित्राचं म्हणणं असं आलं की मुलीच्या मनात आज्जीच्या अंतिम स्मृती खोट्या वा लपवलेल्या स्थितीतल्या नसलेल्या बऱ्या, तिच्या आज्जीचा एकेकाळी शेतीवाडीवर फार जीव होता अखेर ती मातीतच विलीन झाली हे तिला कधीतरी योग्य पद्धतीने आकळण्यासाठी तिला तो तिथे घेऊन आला होता. आता आणखी काही वर्षे तरी ही जागा आणि ही वेळ त्या मुलीच्या विस्मरणात जाणं शक्य नाही. मात्र कधी कधी या गोष्टींचा त्रासही होतो. 

गुरुवार, २० मार्च, २०२५

होळी, प्रेमाला आसुसलेल्या जिवांची!

 

   

काल धुलिवंदनानिमित्त शहराबाहेरच्या एका वृद्धाश्रमातील कार्यक्रमास गेलो होतो. बऱ्याच मोठ्या संख्येत वयोवृद्ध तिथे वास्तव्यास आहेत. तिथल्या काहींची देहबोली अगदी हतबलतेची तर काही चेहरे पूर्णतः निर्विकार, टोटल ब्लॅंक! तर काही चेहऱ्यांवरती उसन्या अवसानाची ग्वाही देणारं केविलवाणं हास्य तर काही मात्र रसरशीत वार्धक्यास संघर्षासह सामोरे जाणारे नितांत प्रसन्न चेहरे! तरीही एकुणात ते सारे ओकेबोकेसे लोक ज्यांना त्यांच्याच कुणीतरी जिवलगाने तिथं भरती केलेलं कधी काळी. कुठल्या तरी दिवशी आणून सोडलं असेल.

साऱ्यांच्या चेहऱ्यांवर सुरकुत्यांची नक्षी होती, भाळीच्या आठ्यांचं जाळे कोरीव झालेलं. काहींच्या डोईची चांदी विरळ होऊ लागलेली तर काहींची नजर क्षीण झालेली तर काहींची नजर पैलतीरी लागलेली स्पष्ट दिसत होती. तर काहींची देहबोली अजूनही आव्हानांना छातीवर झेलणारी! काही कंबरेत वाकलेले तर काहींना पाठीवर पोक आलेला! अंगी जुनेच तरीही स्वच्छ कपडे. परिसरातही काटेकोर स्वच्छता आणि सेवाभावी कर्मचारी वर्ग.

मंगळवार, ११ मार्च, २०२५

शौचालयाचे नागरिकशास्त्र!

समीरगायकवाड समीर गायकवाड
जगापुढे मान खाली घालावी लागणारी गोष्ट! 


शिकागोहून दिल्लीला नॉनस्टॉप येणारे एअर इंडियाचे विमान अर्ध्यातून माघारी फिरवावे लागल्याची लाजिरवाणी घटना काल उघडकीस आली. या विमानातील १२ टॉयलेट्सपैकी अकरा टॉयलेट्स / कमोड चोकअप झाल्याने विमान माघारी फिरवावे लागल्याने ही घटना अत्यंत लज्जास्पद म्हणावी लागेल. या टॉयलेट सीट्समध्ये प्रवाशांनी पॉलिथिन बॅग्ज, डायपर्स, सॅनिटरी पॅड्स, इनरविअर्स आणि बॉटल्स टाकल्याचे उघड झालेय. या घटनेमुळे आपल्याकडील काही लोक एअरइंडियाला ट्रोल करत आहेत. खरेतर अपवाद वगळता समग्र भारतीय माणूसच यासाठी ट्रोल व्हायला हवा! कारण आपल्याकडील रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड्स मधील टॉयलेट्स अत्यंत गलिच्छ घाण अवस्थेत असतात. चुकून कधी अशा ठिकाणी जायचा प्रसंग जरी आला तर केवळ दरवाजा उघडून पाहिला तरी माणूस ओकारी करेल असे दृश्य दिसते. इतकेच नव्हे तर अशा कमालीच्या घाणेरड्या ठिकाणी गेल्याची एक घृणास्पद स्मृती मनात अकारण ठासून राहते त्याचा पुनर्स्मरण देखील शरमेने मान खाली घालायला लावते!

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५

आनंदाची एक्सप्रेस..

क्रांती महिला संघाच्या स्नेह मेळाव्याचे बॅनर  

घटना काही दिवसांपूर्वीची आहे मात्र सोशल मीडियावर त्याविषयी लिहिण्यासाठीची औपचारिक अनुमती उशिराने मिळाली, सबब आज लिहितोय. विख्यात वाहिनीच्या निर्मितीप्रक्रियेत सामील असणाऱ्या सुजाण सहृदयी मित्राच्या पत्नीस कर्करोगाचे निदान झाले. कुटुंब काहीसे विस्कळीत झाले. नोकरी सोडून पत्नीला वेळ देणे क्रमप्राप्त ठरले. यात काही वर्षे गेली. डॉक्टरांच्या प्रयत्नांना आणि उभयतांच्या जिद्दीला यश आले. त्यांची पत्नी यातून बरी झाली. आपण आजवर खूप कामावले आहे आता समाजासाठी काहीतरी केले पाहिजे नि आपल्याला लाभलेले उर्वरित आयुष्य समाजकारणी लावले पाहिजे असा निर्धार त्यांनी मनोमन केला. यातून काही समाजोपयोगी उपक्रमही राबवले. तरीही ते सॅटीसफाइड नव्हते. मग त्यांनी एक नवा मार्ग निवडला.

ज्या लोकांच्या आयुष्यात आनंद नाही त्यांना एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती द्यायची. ज्यांना प्रवास करता आला नाही, पर्यटन करता आलं नाही, हॉटेलिंग करता आले नाही, विविध स्थळांना वा शहरांना भेटी देता आल्या नाहीत अशांना त्यांनी प्राधान्य दिले. विविध सामाजिक स्तरावरील गांजलेल्या, पिचलेल्या, तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांना या आनंदाची अनुभूती ते मिळवून देऊ लागले. मजूर, ओझी उचलणारे हमाल, वंचित शोषित घटक, कामवाल्या स्त्रिया, हातावर पोट असणारे गरीब यांच्या जीवनात त्यांनी आनंदाचे काही क्षण भरले! काही दिवसापूर्वी त्यांचा माझा संवाद झाला तेव्हा त्यांनी सेक्सवर्कर महिलांना मुंबईवारी करवून आणण्यासाठी मध्यस्ताचे काम करण्याबाबत विचारले. मी तत्काळ होकार दिला.

रविवार, १९ जानेवारी, २०२५

अलेक्झांडरच्या वंशाची भुरळ!


सध्या कुंभमेळयाविषयी अनेक प्रकारच्या चर्चां सुरू आहेत, त्यातलीच एक माध्यमाकर्षण असणारी गोष्ट म्हणजे मोनालिसासारखी दिसणारी भारतीय मुलगी! या मुलीच्या पार्श्वभूमीचा धांडोळा घेताना हिमाचल प्रदेशमधील मलाना या खेड्यातील बायकापोरी आठवल्या. कारण ही कथित मोनालिसा आणि या मुलींमध्ये खूप साम्य आहे. मात्र याची मूळे थेट महान योद्धा अलेक्झांडरपर्यंत जाऊन पोहोचतात! थोडे विषयांतर वाटेल मात्र यातही एक कथा, एक आख्यान आणि एक आसक्ती दडून आहे!

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

वक्त ने किया क्या हसीं सितम..

गुरुदत्तच्या 'कागज के फूल'मध्ये 'वक्त ने किया क्या हसीं सितम हम रहे ना हम...' हे निहायत देखणं अर्थपूर्ण गाणं आहे. हे लिहिलंय कैफी आजमी यांनी. हा चित्रपट 1959 मध्ये प्रदर्शित झाला होता. गुरु दत्त आणि वहिदा रेहमान यांच्या प्रमुख भूमिका यात होत्या. सिनेमा शूट झाला होता 1954 मध्ये. अप्रतिम छायाचित्रणाचे वेधक उदाहरण म्हणून या गीताकडे पाहता येईल. गुरु दत्तकडे कैफींनी गाणं दिलं तेव्हा त्यांचं वय होतं तेहतीस वर्षांचं! हे गाणं त्यांनी कागज के फूल साठी लिहिलं नव्हतं. ती त्यांची वैयक्तिक दर्दभरी कैफियत होती.

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

शोध मराठी रंगभूमीवरील 'ती'च्या अस्तित्वाचा!



सिनेमाच्या तुलनेत नाटकाची परिणामकारकता अधिक आहे हे सर्वमान्य आहे. लेखकाला काहीतरी सांगायचे असते वा मांडायचे असते त्या सूत्राला नाट्यरूप देत नाटक आकारास येते. मराठी रंगभूमीचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की बदलत्या काळानुसार रंगभूमीही बदलत गेलीय नि सादरीकरणापासून ते विंगेमागील घटकांच्या भावविश्वापर्यंत सारं काही बदलत गेलंय. नाटकांचे आशय बदलत गेले, नाटकांचे नेपथ्य वेष केशभुषा नि प्रकाशयोजना सारं सारं आमूलाग्र बदलत गेलं. त्यामुळेच नाटकांना समाजाचा आरसा असं म्हटलं गेलं तर त्यात वावगं असं काही नाही. मराठी रंगभूमीच्या मुहूर्तमेढीपासून ते अगदी अलीकडच्या नाटकापर्यंत नजर टाकली तर लक्षात येते की नाटकांनी जशी कात टाकलीय त्याहून अधिक वेगाने नि वैविध्याने नाटकांमधील स्त्री पात्रांनी कात टाकलीय. भारतीय रंगभूमीची सुरुवात ही भरताच्या नाट्यशास्त्रापासून सांगितली जाते. चारही वेदांतून आवश्यक बाबी एकत्र करून पंचमवेद तयार करण्यात आला; ज्यात सादरीकरणाचे मूल्य आणि प्रबोधनाची कास होती. भरतमुनी आणि त्यांच्या शंभर पुत्रांनी या पंचमवेदाचा अभ्यास केला. पौराणिक दाखल्यांनुसार स्वर्गात इंद्रसभेत ‘ध्वजामह’ नावाच्या महोत्सवात भरतमुनीने पहिले नाटक सादर केले, तेव्हा त्या नाटकातील स्त्री आणि पुरूष पात्रांचा अभिनय अप्सरांनी केला. म्हणजे नाट्यकलेची सुरुवात स्त्रियांकडून झाली. खरेतर स्त्रियांची पात्रे मुबलक हवी होती वा स्त्रियांच्या प्रश्नांवर नाट्यसंहिता पुष्कळ हव्या होत्या मात्र झाले उलटेच! नाट्यकला पृथ्वीतलावर आल्यावर महिलांना नाटकात प्रवेश करण्यासच बंदी झाली! जगभरातल्या लोकसंस्कृतीत जे घडत गेले तेच आपल्याकडेही घडले तेही अधिक प्रभावाने! हा प्रभाव पुरुषप्रधान संस्कृतीचा होता! समाजात हजारो वर्षे स्त्रियांवर अन्याय होत आला, त्यांची मुस्कटदाबी होत गेली मात्र त्याचे परिणामकारक चित्रण नाटकात अभावाने येत गेले. संस्कृतीच्या कडबोळ्याखाली स्त्रियांचे शोषण लपवून टाकण्यात समाजाच्या नैतिक ठेकेदारांना यश मिळाले. मात्र कोंबडे झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचा राहील काय या न्यायाने स्त्रियांच्या प्रश्नांची नि भावभावनांची दखल रंगभूमीला घ्यावीच लागली!

सुखाचे घर!



सोलापुरात आमचे घर ज्या परिसरात आहे तिथे वेगाने नवनवी बांधकामे होताहेत. गेल्या दशकापासून या भागाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. वीस वर्षांपूर्वी इथे घासगवताने वेढलेला इलाखा होता. आता मात्र मोकळी जमीन नजरेसही पडत नाही. इथे बांधकामावरचे मजूर नित्य नजरेस पडतात. या संपूर्ण भागात बांधकामांवर सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवण्यासाठी काही माणसं नेमली जातात. रामय्या आणि त्याची बायको भारती हे इथे दोन दशकापासून याच कामावर आहेत. अनेक प्रोजेक्टवर त्यांनी हे काम इमाने इतबारे केलेय. बांधकाम साहित्याची राखण केली आहे.

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

स्वर्गसुखाच्या भेटीगाठी!


दिवाळसण सरताच आपलं घर मागं टाकून अनेक बिनचेहऱ्याची माणसं आपापल्या घाण्याला जुंपून घेण्यासाठी वेगवेगळ्या इप्सित शहरांकडे रवाना झाली होती. दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरणारी मंडळी आणि उदास देहबोलीने कामावर रुजू होण्यासाठी निघालेली माणसं एकाच बसमधून प्रवास करत होती. असो. आज सकाळच्या प्रवासात माझ्या शेजारी एक बऱ्यापैकी वयस्क विधवा महिला बसून होती.

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

'गुड़िया' - सहस्त्र लेकींची आई!

मंजू सिंह त्यांच्या एका मानसकन्येसोबत    

शोषणाच्या नि देहव्यापाराच्या दलदलीत अडकलेल्या स्त्रियांना काय काय सोसावं लागतं हे मंजू सिंहनी अनुभवलं आहे. यातल्या हरेक स्त्रीला मुक्त होता यावं नि त्यांचा छळवाद संपावा यासाठी त्यांनी आयुष्य वाहिलं आहे. त्यात त्यांना पती अजित सिंह यांची उत्तम साथ मिळाली. मंजू आणि अजित या दांपत्याने आजवर साडेपाच हजार मुलींची सुटका केली आहे. बाराशे मुलींचे यशस्वी पुनर्वसन केले आहे. 

1988 साली त्यांनी वेश्यावस्तीतल्या तीन मुली दत्तक घेतल्या आणि आपल्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. दत्तक देण्यास स्त्रिया कच खाऊ लागल्या तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण थेट मुलींच्या सुटकेचे उद्दिष्ट ठेवू! त्यांनी तशा पद्धतीने काम करण्याचा एक प्रोटोकॉल ठरवला. छोटेखानी टीम बनवली. त्यांचे काम इतके जबरदस्त होऊ लागले की त्यांचा आपसूक गवगवा होऊ लागला. त्यांनी संस्थेची नोंदणी करून स्वरूप व उद्दिष्टे व्यापक करण्याचे ठरवले. 1993 मध्ये त्यांच्या 'गुड़िया' या एनजीओची अधिकृत नोंदणी झाली. 

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

आयेशा परवीन नावाची दुर्गा!

समीर गायकवाड
आयेशा परवीन 

जगात कुठेही गेलं तरी अपवाद वगळता शोषणप्रवृत्ती असणारे लोक आपल्या प्रभावाच्या बळावर यंत्रणांना हवं तसं वाकवतात हे वास्तव आहे. ही दास्तान आहे आयेशा परवीन हिची. ती पाकिस्तानातली आहे. काही दिवसांपूर्वी तिने युरोपियन देशांत दिलेल्या मुलाखती प्रकाशझोतात आल्या होत्या. जी आयेशा आज तिच्या कामाच्या बळावर जगभरात प्रसिद्धी मिळवतेय तिने काही वर्षांपूर्वी नरकयातनेहून वाईट आयुष्य भोगलंय हे कुणालाही खरं वाटणार नाही. तिचे अपहरण केले गेले, ती शुद्धीवर येऊ नये म्हणून तिला अंमली पदार्थ दिले गेले आणि एका वेश्यागृहात विकलं गेलं, जिथे तिने पाच वर्षांहून अधिक काळ काम केलं. आयशा परवीन बद्दल सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ती सहजी या गाळातून सुटली नाही परंतु तिने तिच्या स्वातंत्र्यासाठी लढणे कधीही सोडले नाही! सामान्यतः सभ्य पांढरपेशी स्त्रिया लवकर हिंमत हारून आपल्या वाट्याला आलेले भोग आयुष्यभर सोसत राहतात, त्यांना बाह्य जगातून पाठबळ असले तरीही त्या विद्रोह करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आयेशाने मात्र कठोर तपस्या करावी तसा संघर्ष केला.

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

हिरवाई..

समीरगायकवाड
हिरवाई 


आज पुष्कळ हिरवाई दिसतेय. त्याविषयी काही अवांतर. गावाकडं एखादा पिकल्या केसांचा वा अर्धवट वयाचा डंगरा इसम बाईलवेडा झाल्यागत वागू लागतो तेव्हा 'गडी लई हिरवट' असल्याचा शेरा मारला जातो.
'पिकल्या पानाचा देठ की ओ हिरवा..' ही संकल्पना यातूनच उगम पावलेली!

'पांढरे केस, हिरवी मने' या नावाचे वि. द. घाटे यांचे पुस्तक जीवनासक्त व्यक्तींच्या आयुष्याचा धांडोळा घेणारे आहे. ते 'कथित' हिरवट नाहीये. असो.

शांता शेळके यांची 'पाकोळी' ही कविता सुप्रसिद्ध आहे. कवितेची सुरुवातच हिरवी 'झाडी या शब्दांनी केलीय.
हिरवी झाडी, पिवळा डोंगर, निळी-सावळी दरी,
बेट बांबुचे त्यातुन वाजे, वार्‍याची पावरी.
कभिन्न काळ्या खडकांमधुनी, फुटति दुधाचे झरे.
संथपणे गिरक्या घेती, शुभ्र शुभ्र पाखरे!.. '

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

अनमोल 'रतन'!


भारतीय समाजमनात श्रीमंतीविषयी आणि श्रीमंत लोकांविषयी काही कॉम्प्लेक्स आहेत. जसे की, श्रीमंतांना सुखाची झोप येत नाही!, अधिक पैसा कमवून काय करणार!, श्रीमंत माणसं सतत अस्वस्थ असतात, त्यांच्या घरची पोरेबाळे अधू अपंग असतात(!), ते सतत कसल्या तरी भीतीने ग्रासलेले असतात, श्रीमंती हराम कमाईमधून येते(!), श्रीमंती वाईट नाद शिकवते, श्रीमंतांना मिजास असते ते माजोरडे असतात(!), त्यांची सुखे पोकळ असतात(!) आणि शेवटचे म्हणजे श्रीमंतांना माणुसकी नसते! आणखीही काही ऍडिशन यात करता येतील. एकंदर भारतीय माणसाला श्रीमंतीविषयी असूया असते मात्र तो ती व्यक्त करत नाही. केवळ चडफडत राहतो, आपली गरिबी त्यांच्या श्रीमंतीपेक्षा कशी श्रेष्ठ आहे याची अकारण तुलना तो करत राहतो! पैसेवाला म्हणजे माजलेला असे एक सूत्र आपल्याकडे रुजलेले आहे अर्थातच ही सर्व सूत्रे गृहीतके रुजण्यामागे काही श्रीमंत व्यक्तींची वर्तणूकदेखील कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही. जागतिक दर्जाच्या श्रीमंत व्यक्तींविषयी आपल्याकडे सातत्याने बोललं जातं. त्यात गॉसिप असतं नि दुस्वासही असतो. अनेक मोठमोठी नावे या संदर्भात घेता येतील. मात्र एक अख्खं घराणं यास अपवाद आहे आणि त्या घराण्यातला एक हिमालयाएव्हढा माणूस तर अतिव अपवाद मानला जाईल ते म्हणजे रतन टाटा! काल त्यांचे देहावसान झाले!

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

आईच्या आठवणींचा पाऊस!


पावसाळ्यात वेगवेगळ्या वस्तू सादळून जातात, वातड होतात. त्यांची चव बदलते. आई होती तेव्हा घरात बहुतेक जर्मन पितळाचे डबे होते. त्यातल्या बहुतांश डब्यांची झाकणे बिघडलेली असत, सांदीतून फटीतून हवा आत जाऊन आपलं काम चोखपणे पार पाडे. आई यावर शक्कल लढवत असे, जुनेर साड्यांचे तुकडे डब्याच्या तोंडावर लावून मग झाकण लावत असे. आतल्या वस्तू सादळत नसत. जुनेर साड्या नसल्या की वर्तमानपत्रांची पाने त्यांची कसर भरून काढत. आईचा कल मात्र साड्यांच्या तुकड्यांकडे असे.

डब्यात ठेवलेल्या वाळवणाच्या वस्तू पावसाळी हवेत तळून, भाजून खाताना त्याला निराळाच स्वाद येई. डबा उघडताच आईच्या साडीचा तो स्निग्ध मायागंध दरवळे! आता एअरटाईट कंटेनर असतात, वस्तू सादळत नाहीत मूळ चव शाबित राहते मात्र त्यात तो मायेचा स्निग्ध परिमळ दरवळत नाही! कालपरवा जुन्या बोहारीण मावशी घरी आल्या होत्या, घर हुडकत हुडकत आल्या होत्या. आसपास बांधकामे पुष्कळ झाल्याने घर लवकर सापडले नाही म्हणून हैराण झाल्या होत्या. ‘घरात जुने काही कपडे असतील तर दे बाबा’, असं म्हणत हेका लावून बसल्या होत्या. अलीकडे अपवाद वगळता घरोघरी रोजच्याला कुणी साडी नेसत नाही याची त्यांना खंत होती. एक्स्टर्नल कॉलेज करत असणाऱ्या त्यांच्या तरुण सुनेला घेऊन आल्या होत्या! 

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

पैशाने साऱ्या गोष्टी मिळत नाहीत - गोष्ट मटकाकिंगची!


हितेश भगत हा कुख्यात मटकाकिंग सुरेश भगत याचा लाडाने बिघडलेला मुलगा. 2008 साली आपल्या वडिलांची सुपारी देऊन हत्या केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झालेली. त्याची आई जया भगत ही देखील या प्रकरणी आरोपी होती. नंतर ते जामीन देऊन बाहेर आलेले. मात्र या खटल्याची सुनावणी सुरु असतनाच अघटित घडलेलं.

हितेशची स्वतःची एक ऐय्याशीची नि मस्तीची दुनिया होती.
डान्सबारच्या जगात त्याचं लाडाचं नाव होतं चिंटूसेठ!

बारमध्ये तो पैसे उधळायला यायचा तेंव्हा त्याची साईज अदनान सामीसारखी सुपरहेवीवेट होती. पुढे त्याने लिपोसक्शनची शस्त्रक्रिया केली. देहाचा आकार कृत्रिमरित्या घटवून घेतला.
मात्र 2014 मध्ये या शस्त्रक्रियेचा त्याला फटका बसला आणि पोटात नव्या व्याधी उद्भवल्या, त्यातच तो मरण पावला.
त्याचे तीन फेमस डान्स बार होते (कार्निव्हल - वरळी, बेवॉच - दादर, टोपाझ - ग्रॅण्ट रोड) जिथल्या मुलींना त्यानं मोकळ्या हाताने बिदागी दिली. असो...