सोबतच्या पत्रात शिवाजी राजांनी एक अद्भुत निर्णय केला आहे.
सर्रास असं दृष्टीस पडत असतं की एखाद्या व्यक्तीने जीवापाड मेहनत करून आपल्यासाठी एखादी अजरामर कृती निर्मिली असेल तर त्याच्या समर्थनार्थ त्याच्या हातून कळत नकळत काही चुका त्रुटी झाल्या तर त्याकडे कुणीही कानाडोळाच करतो. ही वृत्ती सार्वत्रिक आणि सर्वकालीन आहे. इथं शिवाजीराजे त्याला अपवाद आहेत.
हिरोजी इदलकर आणि रायगड यांचे नाते मायलेकरासारखे आहे. हिरोजींनी आपलं सर्वस्व पणाला लावून जीवापाड मेहनत करून रायगड घडवला हे सर्वश्रुत आहेच. ६ जून १६७४ रोजी जेंव्हा शिवबांचा राज्याभिषेक झाला तेंव्हा छत्रपतींचा हिरोजींशी झालेला संवाद इतिहासात अजरामर झाला. त्याचीच फलश्रुती म्हणून रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरास असणाऱ्या पायरीवखाली ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इदलकर’ हा शिलालेख दिसतो.
तर त्या स्थापत्यप्रभू हिरोजींनी कीकवी (आताचे मु.पो.किकवी, तालुका भोर, जिल्हा पुणे) या गावची पाटीलकी मल्हार निगडे देशमुख यांच्याकडून विकत घेतली.
वस्तुतः ती पाटीलकी मंडाजी निगडे यांची होती. मल्हारजीने मंडाजीच्या परस्पर ही पाटीलकी हिरोजींना विकली होती.
ही माहिती मिळताच शिवाजीराजांनी हिरोजींना ती पाटीलकी परत करण्यास फर्मावले.
मल्हार निगडेने पाटीलकी विकून हिरोजींकडून घेतलेली रक्कम हिरोजींना परत द्यायला लावली.
शिवाय मंडाजी निगडे यास त्याची पाटीलकी पुन्हा बहाल केली.
याहीपुढे जाऊन महाराजांनी आणखी अचूक व संपूर्ण न्याय केला - हा व्यवहार केल्याबद्दल मल्हारजीची देशमुखी काढून घेतली, त्याला त्या जबाबदारीतून मोकळं केलं. देशमुखीच्या बदल्यात त्याने भरलेली अमानत रक्कम देखील जशीच्या तशी(बजिन्नस) दप्तरदखल करून घेतली. त्याचा करार रद्द केला.