‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणारी एक कवयित्री माय मराठीत होऊन गेली जिचे ऋण व्यक्त करण्यास शब्द कमी पडतात. त्या महान कवयित्री म्हणजे बहिणाई चौधरी. छोट्याशा शब्दात आभाळभर उंची गाठणारी त्यांची शब्दरचना अद्भुत आणि अद्वितीय अशी होती, मराठी साहित्यात तिची सर कधी कुणाला भरून काढता आली नाही.
‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’या पंक्तीचा विस्तार एका कथेत आहे. एका खेडेगावात एक साधू भिक्षा मागत फिरत होता. काही घरी त्याला भिक्षा मिळत होती तर काही घरी त्याला भिक्षा द्यायला कुणी नव्हतं. जी ती माणसं शेतशिवारात कामाला गेलेली होती. भटकंती करत ते साधू शेतांमधून फिरू लागले. एका वस्तीवरील घरातल्या तरुण स्त्रीने त्यांची विचारपूस केली. गूळाचा खडा, पाणी दिलं. इकडची तिकडची माहिती विचारत त्यांना भिक्षा दिली, जेवण दिलं.