मंगळवार, १० मे, २०१६

स्त्रीत्वाची कोंडी - 'आई' ! प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' पुस्तकाचा रसास्वाद ...



"जायची चार वाजताची वेळ होत आली. ती हट्टानं अधिकच बेभान झाली. मी जाणार नाही हं !- तिचा पक्का निश्चय. तिच्या लक्षात आलं, बाळाला हे सोडून मला नेणार. तिला तिचा कुक व 'तो' दोघांनी दोन्ही बखोट धरून बेडरूमच्या दारापर्यंत खेचून आणलं. तिने दोन्ही पायाचे पंजे उंबरयाला घट्ट टेकवून दोन्ही हात दाराच्या चौकटीला दाबून धरले. "मला बाळाला टाकून नाही जायचं...मी नाही जाणार." दोघांनी सारी त्यांची ताकद पणाला लावली.तिला बाहेर काढली अन अक्षरशः फरफटत ओढीत बाहेरच्या दारापर्यंत आणली. ते सारं पाहून मी जमिनीवर कोसळलेच. तिची गाडी जसलोकच्या गेटपर्यत पोहोचली अन ती कोमात गेली ती अखेरपर्यंत. तिला कृत्रिम लंग्जवर ठेवून, १३ तारीख उलटली आणी बाळाच्या बारश्यापासूनची त्याची स्वप्नं पाहणारी एक बाळवेडी 'आई' त्याला सोडून कायमची निघून गेली. दुःखाचा डोंगर कोसळला, बाळाला क्षणभरही पापणीआड न करणारी. आईपणाला अखंड आसुसलेली ही थोर आई तिच्या बाळासाठी फक्त एक स्वप्न बनून राहिली.....

सोमवार, ९ मे, २०१६

शहीद भगतसिंह आणि हिंदुत्व - एक विरोधाभास ...

"एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल,
भगतसिंह 
एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणार्‍या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे की ज्याक्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.

मंगळवार, ३ मे, २०१६

प्रेमस्वरूप आई - माधव ज्युलियन


प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.
चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

ही भूक पोरक्याची होई न शांत आई,
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही.
वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे,
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परि हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?
घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !

कंदहार - हिंदूकुश पर्वतरांगा . एक रोचक शोध - इतिहास ...


क़ीमत, क़ुरबानी हे जसे खालच्या बिंदूचे उर्दू उच्चारण असलेले उर्दू शब्द आहेत तसाच क़ंदहार हा शब्द देखील आहे. आपले काही इतिहास अभ्यासक आणि संशोधक कंदहार शहर - प्रांत म्हणजे आपल्या ग्रंथ पुराणात उल्लेख असलेले काही हजार वर्षापूर्वीचे गांधार हे राज्य समजतात. तसेच उर्दू - पर्शियन इतिहास अभ्यासक या शहराला सिकंदरने (द ग्रेट वॉरियर) स्थापन केलेले सिकंदरिया हे शहर मानतात. आजच्या घडीला हे शहर तालिबानी कट्टरवाद्यांचे प्रमुख आश्रयस्थान आहे. अफगाणीस्तानच्या दक्षिणेकडील हा सर्वात अस्थिर प्रांतापैकी एक आहे, याची दक्षिणेकडील सीमा पाकिस्तानच्या उत्तरेस लागून आहे. पश्तून ही इथली मुख्य भाषा आहे. कंदहार येथील उत्खननात सापडलेल्या चीजवस्तूंना मोठे ऐतिहासिक मुल्य आहे कारण त्याचा कालखंड !

गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

राणी चेन्नम्मा असीम शौर्याची धीरोदात्त स्त्री ....



आपल्या सर्वांना झाशीची राणी आणि तिचे असीम शौर्य याविषयी माहिती आहे पण तिच्या कालखंडाहून आधी व तिच्याइतकेच शौर्य- धैर्य यांचे अलौकिक प्रदर्शन करून इंग्रजी सत्तेविरुद्ध शस्त्र उचलणारया पहिली सशस्त्र स्त्री क्रांतिकारक चेन्नम्माविषयी फारशी माहिती बहुधा नसते. १८५७च्या बंडाच्या ३३ वर्षे आधी एका स्त्रीने केलेला हा रक्तरंजित संघर्ष खरे तर भारतीय इतिहासातील स्वातंत्र्य संग्रामाच्या गाथेतील एक सोनेरी पान आहे पण आमचे दुर्दैव असे की बहुतांश लोकांना त्यांचे कार्य आणि शौर्य याबाबत अनभिज्ञता आहे. बहुधा झाशीच्या राणीचे 'मराठी'पण आणि अलीकडील काही दशकातील कन्नडिगांप्रतीचा राग याचीही झालर या अनास्थेमागे असू शकते..

बुधवार, २७ एप्रिल, २०१६

क्रूरकर्मा नादिरशहा ...



पुर्वीच्या उत्तरपुर्व पर्शियामधील आणि आत्ताच्या इराणमधील खोरासनमध्ये १६८७ सालीं एका धनगरी मेंढपाळाच्या अफ्शराच्या घरी जगात इतिहास घडवणारा एक मुलगा जन्माला आला. किझीबाश आणि अफ्शर या दोन्हीही भटक्या पण पराक्रमी पर्शियन प्रजाती होत्या. त्याच्या जन्मानंतर काही वर्षातच त्याच्या आईला उझबेकी गनिमांनी पळवून नेले. त्याचे वडिल मेंढपाळ असल्याने ते मेंढ्यांच्या चामड्यांचे कोट, टोप्या वगैरे करून विकीत असत. १३व्या वर्षी त्याचे वडिल मृत्युमुखी पडले. आजूबाजूची युद्धग्रस्तता आणि वडिलांचे निधन या अस्थिरतेमुळे लहानपणापासून त्या मुलाचे आयुष्य अनेक प्रकारच्या साहसांत गेले. सतरा वर्षांचा असतांना तो उझ्बेकांच्या कैदेत सांपडला, याचवेळेस त्याच्या आईला बंदी बनवण्यात आले आणि कालांतराने तिचेही निधन कैदेत असताना झाले.१७०८ मध्ये तो उझ्बेकांच्या तावडीतून निसटला आणि खोरासनला परतला. या सर्व घटनांचा त्याच्या युवा मनावर विपरीत परिणाम झाला आणि त्याचा स्वभाव क्रूर, विध्वंसक, परहिताविषयी निष्ठुर व मानवी संस्कृतीला विरोधी असा बनला.

भगिनी निवेदिता - एका योगिनीची कथा ....



कोलकात्त्यातील बागबाजार या जुन्या शहरी भागातली ती एक छोटीशी घरवजा शाळा होती. उन्हाळ्याचे धगधगते दिवस होते. अंगाची लाही लाही करणारया त्या हवामानात महिला,मुले आणि वृद्ध शक्यतो घरी बसून राहत. अशा वातावरणात विदेशी महिलांना फार शारीरिक हाल अपेष्ठा सोसाव्या लागत. मात्र कोलकात्त्यातील त्या छोट्याशा शाळेत एक विदेशी स्त्री अशा विषम वातावरणात आनंदात राहत होती.

मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

संयुक्त महाराष्ट्र आणि शाहीर अमरशेख .....


दिल्लीतल्या रस्त्यांवरचा मराठी माणसाचा आजवरचा सर्वात मोठा मोर्चा होता अन त्यात अग्रभागी असलेल्या एका ट्रकच्या हौदयात उभे राहून एक शाहीर माईकचा वापर न करता गळ्याच्या शिरा ताणून सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत सलग सहा तास एका हाताने डफ वाजवत आपल्या खडया पहाडी आवाजात पोवाडे गात होता आणि हे अद्भुत दृश्य बघून हैराण झालेले दिल्लीकर तोंडात बोटे घालून त्या शाहीराकडे अचंबित नजरेने बघत होते !
चार वाजता मोर्चाची सांगता जाहीर सभेने झाली. या सभेत बोलताना आचार्य अत्रे त्या शाहीराचे कौतुक करताना सदगदित होऊन बोलले -
"शाहीर, छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तुमच्या पाठीवर ‘शाब्बास शाहीर’ अशी थाप मारून हातातलं सोन्याचं कडं तुम्हाला बक्षीस दिलं असतं...."
ती सभा होती संयुक्त महाराष्ट्रासाठीची !
अन 'दो कवडी के मोल बिकने को मराठा तयार नहीं है' असं ठणकावून सांगणारे ते महान शाहीर होते - 'शाहीर अमर शेख' !
या अमरशेखांच्या कर्तुत्वाचा आणि जीवनाचा हा धांडोळा ....

सोमवार, २५ एप्रिल, २०१६

माणसातला 'देव' ...

 
वाढत्या वयाबरोबर काळ माणसाच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांची नक्षी काढायला स्रुरुवात करतो तेंव्हा त्याच्या मनातला भक्ती भाव अधिक तीव्र होतो. पैलतीरीचा तट जेंव्हा खुणवू लागतो तंव्हा देव -देवत्व याविषयी अधिक ओढ लागते. अंगावरची कातडी जसजशी ढिली होत जाते तसतशी ती अधिक नरम पडत जाते अन मनातला ताठा देखील तोवर गळून पडलेला असतो, उरलेली असते ती काळजी, भीती अन त्यातून जन्मलेली श्रद्धा. काळजी राहिलेल्या आयुष्याची असते तर भीती मरणाची असते अन श्रद्धा देवावरची ! काहींची श्रद्धा पूर्वापार असते तर काहींची समयोचित असते तर काहींची गरजेतून उत्पन्न झालेली असते मात्र क्वचित काही लोकांचीच श्रद्धा अंतःकरणातून पाझरलेली असते. पण बहुतांश करून वयपरत्वे अशी श्रद्धा दाटून आलेलेच जास्ती असतात.
श्रद्धा जेव्हढी उत्कट आणि प्रामाणिक असते तितकी काळजी आपसूक कमी होते अन काळजी कमी झाली की मरणाची भीतीही कमी होते म्हणून उतारवयात माणसे परमार्थाकडे सहजच झुकतात. 'शेवटचा दिस सुखाचा व्हावा' हा स्वार्थही त्यात असतो. आयुष्यभर केलेल्या चांगल्या वाईट कर्मांनी ज्याची त्याची श्रद्धेची शिदोरी तयार होते, कधी आयुष्यात आई वडीलांची सेवा केलेली नसेल अन त्यांच्या पश्चात कोणी काशीत उंबरठे झिझवत असेल तर त्याला आईबापही कळले नाहीत अन देव तर नाहीच नाही.

बुधवार, २० एप्रिल, २०१६

काव्यमय पितापुत्र - 'राना'-माधव !


एखादया प्रथितयश डॉक्टरांचा मुलगा बहुतांश करून डॉक्टरच होतो तर राजकारणी माणसांची मुले सर्रास राजकारणी होतात. त्याच चालीवर मोठया वकिलांची अपत्ये वकिली करताना आढळतात तर बिल्डरची मुले वडिलांचा कित्ता गिरवतात. कलाक्षेत्रात ही बाब सिनेमा वा नाट्य क्षेत्रात कमीअधिक लागू होते, तिथे मातापिता जे कुणी सिनेमा नाटकाच्या क्षेत्रात असतात त्यांचा सहज पाठिंबा मिळतो. त्यांचे वलय, त्यांची साधने यांचा फायदा होतो अन पुढच्या पिढीला पाय रोवणे तिथं सोपे जाते. मात्र पुढच्या पिढीचे नाणे खोटे असेल तर मात्र ते आपोआपच मागे पडते. इतर कलाक्षेत्रात मात्र असे घडताना दिसून येत नाही. चित्रकाराचं अपत्य चित्रकारच होईल किंवा शिल्पकाराचं अपत्य पत्थराला आकार देईल असे कुणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. अशीच अवस्था क्रिडाक्षेत्रातही पाहायला मिळते. असंच काहीसं साहित्यिकाचं असतं. उत्तम साहित्यिकाचं अपत्य देखील प्रतिभावंत साहित्यिकच झाल्याचं अपवाद वगळता दृष्टीस पडत नाही. मराठी साहित्यात अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उदाहरणे आहेत जिथे मायबापापैकी कुणीतरी साहित्यिक आहे अन त्यांची दुसरी पिढी देखील साहित्यात रममाण झाली आहे. अशा दुर्मिळ साहित्यिक पितापुत्रात सोलापूरचे ज्येष्ठ कवीश्रेष्ठ रा.ना.पवार व त्यांचे प्रतिभावंत कवी पुत्र माधव पवार यांची नोंद होते. गिरणगांव म्हणून परिचित असणाऱ्या व कलाक्षेत्रात काहीसं बकालपण असणाऱ्या सोलापूरसारख्या शहरास या पवार पितापुत्रांच्या लेखनाने एक नवी ओळख प्राप्त करून दिली असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.